Sunday, 8 February 2026

दिनविशेष माहिती - 10 फेब्रुवारी ( Narhar Kurundkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 

नावा वर clik करावे. 
नरहर कुरुंदकर हे आधुनिक मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे विचारवंत, समीक्षक व प्रभावी वक्ते होते. त्यांनी मराठी साहित्याला तर्कशुद्ध विचार, निर्भीड मतप्रदर्शन आणि समाजाभिमुख दृष्टिकोन दिला. त्यांच्या लेखनातून विवेक, चिकित्सक बुद्धी आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी प्रकर्षाने दिसून येते.
नरहर कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी परभणी जिल्ह्यातील ( सध्या हिंगोली जिल्हा ) नांदापूर येथे झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. साधारणतः अकराव्या वर्षापासून कुरुंदकरांनी लिखाणाला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण वाचन, चिंतन आणि अध्ययनप्रधान वातावरणात झाले. त्यांनी नांदेड येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते. विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
आपल्या अध्यापनातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची सवय लावली. व्याख्यानांमधून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक विषयांवर स्पष्ट व ठाम भूमिका मांडली. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते काम करत. किशोरवयीन अवस्थेतच ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात उतरले होते. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आलं.
त्यांचे लेखन विशेषतः निबंध आणि समीक्षा या प्रकारांत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी परंपरेचा आदर राखत आधुनिक विचारांना स्थान दिले. भावनावश लेखनापेक्षा तर्क, विवेक आणि वस्तुनिष्ठता यांवर त्यांनी भर दिला. त्यामुळे त्यांचे लेखन वाचकांना विचार करायला प्रवृत्त करते. 
‘साहित्य आणि समाज’, ‘विचार आणि विवेक’ यांसारखी त्यांची पुस्तके मराठी वैचारिक साहित्यात मोलाची मानली जातात. त्यांच्या निबंधांतून सामाजिक वास्तवाचे भान, मानवी मूल्यांची जाणीव आणि लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात २०१० मध्ये त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले.त्यांची मुलगी श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. त्यांच्या धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.
१० फेब्रुवारी १९८२ साली त्यांचे निधन झाले; मात्र त्यांच्या विचारांची परंपरा आजही मराठी साहित्यात जिवंत आहे. विवेकशील विचार, निर्भीड लेखनशैली आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांमुळे नरहर कुरुंदकर हे मराठी साहित्यातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
आज नरहर कुरुंदकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना त्रिवार वंदन !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - नरहर कुरुंदकर हे कोणत्या शाळेत शिक्षक म्हणून काम पाहिले ? 
बरोबर उत्तर आहे, नांदेड येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात नरहर कुरुंदकर यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले.

दुसरा प्रश्न - नरहर कुरुंदकर हे कोणत्या कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते ? 
बरोबर उत्तर आहे, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते. 

तिसरा प्रश्न -  ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापना कोठे करण्यात आली ?
बरोबर उत्तर आहे, नांदेड येथे  ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापना करण्यात आले.

चौथा प्रश्न - नरहर कुरुंदकर यांच्या कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे ?
बरोबर उत्तर आहे, नरहर कुरुंदकर यांच्या धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - नरहर कुरुंदकर यांचे मूळ गाव कुरुंदा कोणत्या जिल्ह्यात येते ?
बरोबर उत्तर आहे - नरहर कुरुंदकर यांचे मूळ गाव कुरुंदा हिंगोली जिल्ह्यात येते.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 11 फेब्रुवारी ( Swami Dayanand Sarswati )

         नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !  मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्र...