Friday, 30 July 2021

sri Gopatwad sir retirement articale

पर्यावरण प्रेमी विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री पुंडलिक गोपतवाड

धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापूर येथील शिक्षक श्री पुंडलिक लच्छीराम गोपतवाड आज दिनांक 31 जुलै 2021 रोजी नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

श्री पुंडलिक लच्छीराम गोपतवाड यांचा जन्म बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव या ठिकाणी 2 जुलै 1963 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. वडील शेतकरी असले तरी मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिले .आईचे नाव गंगाबाई आहे. पुंडलिक गोपतवाड यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती गुरुजनांनी सांगितलेल्या  सूचनेचे पालन ते अगदी मनापासून करत .पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण आपल्या मूळगावी जिल्हा परिषद शाळा कोल्हे बोरगाव येथे झाले. त्यापुढील शिक्षण सगरोळी येथील श्री छत्रपती विद्यालयात यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अध्यापक विद्यालय उमरदरी येथून त्यांनी आपले डीएड शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी डीएड पदवी घेतल्यानंतर लगेच नोकरी लागत होती. त्यानुसार डी एड उत्तीर्ण झाल्याबरोबर 02 जानेवारी 1988 रोजी  धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनुर येथे त्यांची प्राथमिक शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक झाली. त्याच बरोबर जिल्हा परिषद हायस्कूल धर्माबाद, जिल्हा परिषद प्रा शाळा बाचेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघलवाडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूर व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापूर येथे शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवण्याचे  कार्य केलेले आहे. जिथे जावे तिथे प्रामाणिकपणे काम करावे हा त्यांचा स्वभाव गुण आहे .आपल्या जीवनात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानले. त्यांनी अनेक चरित्र ग्रंथाचे वाचन केले या सर्व वाचनाच्या व्यासंगातून आपण देखील सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा म्हणून ते अविरत कार्यरत राहिले. आपल्या कार्यातून त्यांनी पाणीबचतीचा संदेश दिला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आपल्या घराच्या छतावर वरील वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी तयार केला असून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी ते सदैव आग्रही असतात. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वृक्ष जगली तर माणूस जगेल म्हणून ' वृक्ष लावा' असे ते आवर्जून सांगतात. ज्या ठिकाणी त्यांनी सेवा केली आहे त्या प्रत्येक शाळेत त्यांनी वृक्षारोपण केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, स्काऊट गाईड, शाळेचे सुशोभीकरण या कामामुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडली आहे. स्काऊट गाईड मधून त्यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीपर्यंत घेऊन जाऊन आपल्या शाळेला जिल्हा पुरस्कार मिळवून दिले आहे. लहान मुलांना गोष्टी आवडतात म्हणून त्यांनी गोष्टी रूपाने विद्यार्थ्यांवर संस्कार घडवण्याचा प्रयत्न केला. शिक्षक म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो याचे भान त्यांनी नेहमी ठेवले. प्रौढ साक्षरता, बेटी बचाव, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या शासनाच्या मोहिमेमध्ये त्यांनी स्वतः गीते तयार करून लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ' 'आधी केले मग सांगितले " याप्रमाणे त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे नेहमी समाजाची व पर्यावरणाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. सुंदर अक्षर, शुद्धलेखनाचा ध्यास, चांगल्या गुणांचा स्वीकार अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये सांगता येतील. आदर्श शिक्षक म्हणून तालुका पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'माणसे जोडणे' हा त्यांचा छंद. प्रत्येक गावात आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी मित्र जमवली. आज त्यांचा मित्र वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीची गोष्ट विद्यार्थी वर्गात पसरली, सर शाळेत येताच छोटे विद्यार्थी 'सर आप रिटायर्ड हो रहे हो ' 'तुम्ही रिटायर होऊ नका ,इथेच राहा' असे म्हणत त्यांच्या भोवती जमा झाले एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठी कामाची पावती कोणती असेल !
 आज त्यांच्या वयाची 58 वर्षे पूर्ण होत असून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची पत्नी सौ. शोभा गोपतवाड ह्या गुरुकुल मित्रमंडळ सेवाभावी संस्थेचे सचिव आहेत. त्यांना दोन अपत्य असून मुलगा गजानन हा धर्माबाद येथे विज्ञान विषयाची खाजगी शिकवणी घेतो तर मुलगी सुप्रिया विवाहित असून जावई राहुल दोडेवार चंद्रपूर येथे शासकीय सेवेत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. एकूणच काय 'सुखी कुटुंबाचे' त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा
- मनमोहन कदम, मुख्याध्यापक, गुरुकुल विद्यालय, धर्माबाद
— ———— ————
शुभेच्छा - 
पर्यावरण प्रेमी व चांगला सहकारी - पुंडलिक गोपतवाड हे नेहमी माझ्या कामात मदत करतात. पर्यावरण प्रेमी त्यांची ओळख आहे .ते चांगला सहकारी म्हणून त्यांची आठवण कायम मनात राहील

संतोष नाईक मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापुर
—————————
श्री गोपतवाड हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रभागी असतात. आज निवृत्त होत असले तरी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळेल ही अपेक्षा. पुढील जीवनासाठी त्यांना शुभेच्छा.
सुधाकर जाधव
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बाळापूर
- - - - - - - - - - - - - - - - - 
करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी त्याचे या साने गुरुजी च्या उक्तीप्रमाणे कार्य करणारे शिक्षक म्हणजे श्री गोपतवाड त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो

लक्ष्मण आगलावे सहशिक्षक जि प प्रा शाळा वाघलवाडा

Monday, 19 July 2021

Hari Om Vitthala

          ।। हरी ॐ विठ्ठला ।।

        चारोळी
01) 
चंद्रभागेच्या तिरावर त्या
उभा आहे विठ्ठल सावळा
यंदा ही नाही पायी वारी
घरीच जमलंय भक्तांचा मेळा

02) 
हरी ओम विठ्ठला
नाम तुझे मुखी
एकच प्रार्थना देवा
ठेव सर्वाना सुखी

नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~
     कविता - विठ्ठल नाम

विठ्ठलाचे नाम आहे मुखावरी
भजन भूवरी चालतसे

भेटाचिये आस लागलिया मनी
 लावुनिया ध्यानी पांडुरंग

आषाढीला निघे पायी दिंडी वारी
 भेटी वारकरी एकमेकां

ओळख नाही ना पाळख ही नाही
प्रेम देत राही भजनात

थकवा नाही ना कोणता आळस
 घेऊन तुळस पायी चाले

पांडुरंग भेटी लाखो लोकं येई
गडबड नाही कसलेही

वारकरी शिस्त जगाला शिकवी
प्रेम हे करवी आपसात

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
   कविता - ध्यास विठ्ठलाचा

मनी लागे आस । भेटावया खास ।
लागला तो ध्यास । विठ्ठलाचा ।।

दूर ती पंढरी । मुखी नाम हरी ।
पायी चाले वारी । दरवर्षी ।।

ऊन वारा पाणी । कुणी अनवाणी ।
संग अन्नपाणी । ठेवुनिया ।।

ओढ पंढरीची । पर्वा ना जीवाची ।
नाम जपायची । बा विठ्ठला ।।

सोडुनिया घर । चालला तो दूर ।
लागे हूर हूर । या मनाला ।।
 
यंदा वारी नाही । पायी जाणे नाही । 
घरूनच पाही । विठुराया ।।

एकच प्रार्थना । करतो याचना ।
संपू दे कोरोना । पांडुरंग ।।

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
    कविता - चुकलेली वारी

बसलाय पंढरीत माझा तारणहार
गळ्यात घालुनी तुळशीचा हार

रंग त्याचा सावळा कर ठेवुनी कटेवरी
मंदिर आहे त्याचे चंद्रभागेच्या तिरी

पायी दिंडी चाले शिस्तीत वारकरी
पाऊले चालताना मुखात फक्त हरी

थंडी ऊन पाऊस वारा झेलतो अंगावर
देहभान विसरून सारे प्रेम  पांडुरंगावर

यंदा रुखरुख लागली भेट नाही माऊलीची
असा दिवस नको पुन्हा हीच विनंती भक्तांची

 - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
   कविता - वारकरी दिंडी
 
डोईवर शोभून दिसे पांढऱ्या टोपीचा
पोशाख पांढरा छान वारकऱ्यांचा

गळ्यात असे त्याच्या तुळशीची माळ
दोन्ही हाताने वाजवित राही टाळ

मुखी चाले नामस्मरण विठ्ठलाचे
दोन्ही पाऊल वाट धरी पंढरपुराचे

हरी ओम विठ्ठलाचे घेता ध्यान
ना लागे भूक ना लागे तहान

पायी दिंडी वारी ही शिस्तीत चाले
प्रत्येकजण एकमेकां प्रेमाने बोले

जय हरी विठ्ठल हरी ओम विठ्ठल
सर्वांचा लाडका सावळा विठ्ठल

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
     कविता - आषाढ वारी

लोकांच्या येण्या जाण्यावर संचारबंदी
कोरोनाने सर्वाना घरातच केली बंदी

आली पहा जवळ आषाढी एकादशी
विठ्ठलाच्या भेटीसाठी जीव वेडा होई

वर्षातून एकदा सर्वाना लागते ही आस
पांडुरंगाच्या भेटीचा मनी लागे ध्यास

कोरोनामुळे यंदा ही होणार नाही भेट
घरातूनच मनाने माऊलीला दंडवत थेट

तरीही माझे मन काही मानतच नाही
दर्शनाशिवाय काही चैन पडतच नाही

म्हणून मनाने नक्की ठरवलं यावेळी
कुणी ही जागी होण्याअगोदर सकाळी

पक्षासारखी आकाशात मारावी भरारी
करावे म्हणतो यंदा हवेतून आषाढ वारी

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
     कविता - विठुराया
 
आली आषाढी एकादशी 
दिंडी चाले विठुरायापाशी 

मुखात चाले विठ्ठल नाम 
हातात घेऊन त्याचेच काम 

मनात उत्सुकता असे वारीची
 इच्छा असते पंढरी पाहण्याची 

चला जाऊ या पंढरपुराला 
माझ्या विठूरायाच्या दर्शनाला

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

- नासा येवतीकर,  धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~
कविता - ओढ वारीची

आला हा आषाढ । घेऊन पाऊस ।
मनात उल्हास । भेटाचिये ।।

शेतातील कामे । त्वरा उरकुनी । 
पाहतो बसुनी । वाट तुझी ।।

एकादशी रोजी । नाम जप करी ।
विठ्ठल भूवरी । अवतरे ।।

कोरोना संकट । बसलोय घरी ।
मना ओढ वारी । चालतसे ।।

हे देवा विठ्ठला । एकच प्रार्थना । 
संपू दे कोरोना । जगातूनी ।।

- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~
*🚩 ।। विठ्ठल भजन ।। 🚩*

मनात विठ्ठल । तनात विठ्ठल । 
जनात विठ्ठल । हरी हरी ।।

ओठात विठ्ठल । पोटात विठ्ठल ।
तोंडात विठ्ठल । जप नाम ।।

चालावा विठ्ठल । बोलावा विठ्ठल
पहावा विठ्ठल । मनोमनी ।।

सांगावा विठ्ठल । ऐकावा विठ्ठल
भजावा विठ्ठल । घरोघरी ।।

सुखात विठ्ठल । दुःखात विठ्ठल ।
सर्वत्र विठ्ठल । मज दिसे ।।

घरात विठ्ठल । दारात विठ्ठल ।
अंगणी विठ्ठल । खेळतसे ।।

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~

सर्व कविता वाचन केल्याबद्दल आपले मनस्वी आभार. 

सर्व वाचकांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा ......!

Saturday, 17 July 2021

कविता - अंगणात माझ्या ( anganat majhya )

अंगणात माझ्या

अंगणात माझ्या आली एक चिमणी
तिच्यासोबत झाल्या खूप गप्पा गाणी

अंगणात माझ्या आला एक कावळा
बोलतांना मला वाटला जरा बावळा

अंगणात माझ्या आला एक कोंबडा
लुकलुक हलत होता तुरा त्याचा तांबडा

अंगणात माझ्या आला एक पोपट
माणसासारखा बोले किती पटापट

अंगणात माझ्या आली एक मैना
( तिला बोलताना हिची झाली दैना )
एकसारखे बोलून तिची झाली दैना

अंगणात माझ्या आला एक कबुतर
पक्ष्यांवर प्रेम करा जीव आहे जोवर

अंगणात माझ्या आली एक सुंदर परी
मला घेऊन गेली ती आकाशातल्या घरी

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

वाचनाची आवड ( interest in reading )

मुलांमध्ये वाचनाची आवड कशी वाढवाल ?

वाचन हे आपल्या डोक्यातील मेंदूचे खुराक आहे. माणसाला भूक लागली की माणूस भाकर-भाजी खातो आणि पोटाची भूक मिटवितो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या डोक्यातील मेंदूला भूक लागली तर वाचन करून त्याची भूक भागवावी लागते तरच आपला मेंदू नेहमी क्रियाशील राहतो. भाषा विकासाच्या कौशल्यात श्रवण आणि भाषण यानंतर वाचनाचा नंबर लागतो. आजकाल असे ऐकायला मिळत आहे की, मुलांचे वाचन खूप कमी झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत जर विचार केला तर नक्कीच ते ऐकलेले सत्य आहे, असे वाटते. त्याला कारण ही तसेच आहे. पूर्वीच्या काळी ज्ञान मिळविण्यासाठी वाचनाशिवाय अन्य कोणताच पर्याय नव्हता. आज आपल्यासमोर टीव्ही, संगणक, मोबाईल यासारखे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे मुले वाचनापासून दूर गेले आहेत किंवा जात आहेत. 
जरासे आपण वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आठवून बघू या. किराणा दुकानातून साखर आणलेला पेपर वाचल्याशिवाय राहत नव्हता. हातात काहीही पडले की अधाशासारखे वाचनाची सवय होती कारण दुसरं काही मिळतच नव्हतं. रोजच्या रोज पेपर तरी कोठे वाचायला मिळायचं ? काही हौशी वाचक मंडळी वाचनालयातील पुस्तकं वाचायची. वाचनालयातील पुस्तकं देखील वाचून संपून जायची पण त्यांची भूक मिटायची नाही. मला आठवते मी लहान असताना रद्दीमध्ये गुजराती भाषेतील पेपर यायचे. गुजराती भाषेची लिपी देवनागरी लिपीशी जवळपास सारखी असल्याने ते गुजराती भाषेतील पेपर वाचून काढत असे. त्या रद्दी पेपरातून मला वाचनाची सवय लागली. घरी किशोर आणि चंपक नावाचे मासिक यायचे. त्यातील चित्र आणि कविता पाहून मला वाचनाचे वेड लागले. 
आजच्या मुलांना देखील वाचनाची आवड निर्माण करणे काही अवघड गोष्ट नाही. त्यासाठी पालकांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवं असे मला वाटते. मुलांना उपयुक्त असलेले किशोर, चंपक यासारखी पुस्तके त्यांना द्यावे, बालकविता वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे, चित्ररूप कथा वाचून दाखवावे आणि त्यांना वाचण्यास द्यावे, घरात नेहमी वाचन करण्याचा वातावरण ठेवावे, मोबाईलवर वाचन करण्यापेक्षा पुस्तकं वाचण्याचा प्रसंग तयार करावा. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून मुले वाचनाकडे वळू शकतात. लहानपणी एकदा त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण केली की, त्यांना त्या वाचनाची भूक लागत राहते आणि ते भूक मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुळात हल्ली आपण मुलांना वाचनाची भूक निर्माण करण्यात अपयशी ठरलो आहोत म्हणून आजची मुले वाचन करण्यात निरुत्साह दाखवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, आपल्याजवळ दोन रुपये असतील तर एक रुपयांत पाव खरेदी करा म्हणजे पोटाची भूक मिटवेल आणि उरलेल्या एक रुपयांत पुस्तक खरेदी करा म्हणजे ते मेंदूची भूक मिटवेल. म्हणून आतापासून ठरवा की दर महिन्याला एकतरी पुस्तक विकत घेऊन घरातील मुलांना ते वाचण्यास देईन. असे झाले तरच वाचन संस्कृती वाढीस लागेल असे वाटते. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याची प्रक्रिया ही एका तासाची किंवा एका दिवसाची नाही तर ही निरंतर आहे. याचे परिणाम आपणाला लगेच दिसून येत नाही. आजचा बालक जेव्हा यशस्वी पालक म्हणून समाजात वावरेल त्यावेळी आजच्या वाचनाचे महत्व कळेल. बी पेरलं, अंकुरले, मोठे झाले आणि लगेच फळ लागले असे चमत्कारिक बदल येथे दिसत नाहीत. यासाठी खूप तपश्चर्या आणि मेहनत करावी लागते. म्हणून पालकांनी जरा सतर्क राहून मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करू शकतात. हा लेख वाचून झाल्यावर पुस्तक विकत घेऊन वाचण्यासाठी आपण प्रेरित व्हाल एवढी माफक अपेक्षा आहे. 

- नासा येवतीकर, भाषा विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Wednesday, 14 July 2021

उघडू दे शाळा - कविता ( shala ughadu de )

किशोर माहे जुलै 2021 अंगावरील मुखपृष्ठ पाहून सुचलेली कविता. 

        ।। उघडू दे शाळा ।।
मान्सून आला, पाऊस बरसला
आता प्रतीक्षा शाळा उघडण्याची
कित्येक दिवस झाले भेटलो नाही
आज आठवण येते वर्गातील मित्रांची

छत्री असताना पावसात नाचणं
मित्राच्या अंगावर पाणी उडवणं
डोकं भिजू नये म्हणून दप्तर ठेवणं
वाहत्या पाण्यात कागदी जहाज सोडणं

बाहेर पाऊस धो धो पडत आहे
घरातल्या खिडकीतून पाहत आहे
झाडावरील पक्षी मनसोक्त भिजताना
मी मात्र मनातून त्यावर जळत आहे

शाळा उघडली असती तर बरे झाले असते
पहिल्यासारखं पुन्हा मजा आली असती
वाटते यंदा हे सारे स्वप्नातच पूर्ण होतील
कोरोना जोपर्यंत असेल आपल्या अवतीभवती

दंगा नाही ना कुठली मस्ती नाही 
घरातच चुपचाप बसलोय दडून
कोरोना संपून उघडू दे शाळा
हीच मनोमनी प्रार्थना मित्रांकडून

- नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड

Saturday, 19 June 2021

muncipal school

नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळा

सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. ग्रामीण भागातल्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतची थोडीफार मदत मिळू शकते त्यामुळे त्या शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो. मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित क्षेत्र यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळांना सध्या अच्छे दिन दिसत आहेत. बघायला गेलं तर येथे ही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यानंतर मनपाच्या शाळा म्हणजे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा यांना सुद्धा मनपाचे सहकार्य मिळते. स्वतंत्र शिक्षण विभाग असतो आणि प्रत्येक कार्य स्वतंत्रपणे चालत असल्याने सर्वत्र लक्ष देणे शक्य आहे. मात्र नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सरकारी शाळा यांची स्थिती कोणी ही लक्षात घेत नाही त्यामुळे येथील शाळांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते. नगरपालिका हद्दीतील सरकारी जिल्हा परिषद शाळांना फक्त शासनाची म्हणजे सर्व शिक्षा अभियानाचेच अनुदान मिळते. ज्याप्रकारे ग्रामीण भागात 14 वा किंवा 15 वा वित्त आयोगातून शिक्षणावर 20 टक्के रक्कम खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसे नगरपालिकामध्ये शाळांसाठी कोणतीच तरतूद का करण्यात आली नसेल ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. नगरपालिका ह्या शाळेला आर्थिक मदत तर सोडाच त्यांचे इमारत भाडे भरले नाही म्हणून त्यांचे अधिकारी येऊन सिल ठोकतात. यावर चिंतन होणे आवश्यक आहे. 
नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. ह्या शाळा नगरपलिका हद्दीत असल्याने जिल्हा परिषदेचा कोणताच निधी मिळत नाही. ग्रामीण भागात जसे खासदार निधी, आमदार निधीमधून शाळेला सहकार्य मिळते तसे सहकार्य येथील शाळांना दिल्या जात नाही त्यामुळे ह्या शाळा कित्येक वर्षांपासून उपेक्षित आहेत. नगरपालिका क्षेत्र म्हटल्यावर सरकारी शाळेसोबत इतर ही अनेक अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यच्या शाळा येथे अस्तित्वात असतात. त्यांच्या मानाने सरकारी शाळा कोणत्याच पालकांना आकर्षित करू शकत नाही, त्यामुळे अर्थातच तेथील पटसंख्या रोडावली जाते. पूर्वीच्या काळी सरकारी शाळेशिवाय पर्याय नव्हता तेंव्हा याच सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नव्हती आणि आज यांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. कारण खाजगी आणि इंग्रजी शाळेचे प्रमाण एवढं वाढलं आहे की, सरकारी शाळेकडे आता मजुरीवर काम करणारे पालक देखील ढुंकून पाहत नाहीत. येथील सरकारी शाळेत कोणता विद्यार्थी प्रवेश घेतो तर जो पालक आपल्या पाल्याना साधी वही पेन घेऊन देऊ शकत नाहीत असे दारिद्र्याच्या खाईत असलेली गरीब मुलेच प्रवेश घेतात. त्यांची शाळा शिकण्याची मानसिकता नसल्यात जमा असते. आई-वडील मजुरीला निघून गेले की आपला पाल्य शाळेत गेला किंवा नाही याची साधी चौकशी देखील करत नाही. शिकला तर शिकला नाही तर नाही या मानसिक अवस्थेत असणारी पालकांसाठी ह्या शाळा एक आधार केंद्र असते.  मुलांच्या दुपारच्या जेवण्याची सोय आणि दिवसभर सांभाळ करणारे केंद्र. हाताच्या बोटावर मोजता येतील असे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. त्याच सोबत शासनाच्या काही धोरणाचा फटका देखील या शाळांना बसतो. प्रत्येक शिक्षकांना शहरात नोकरी करावी वाटते विशेष करून महिलांना. तीन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बदलीने या शहरातील शाळेचा पूर्ण वाटोळं करून टाकलं आहे. पालकांचे असे मत झाले आहे की, आता या शाळेत सेवानिवृत्तीला जवळ आलेले, बिमार असलेले, अश्या शिक्षकांना संधी देऊन शहरातल्या शाळेत भरती केल्यावर ते स्वतःला पाहतील की आमच्या मुलांना. तरुण वयोगटातील शिक्षक ज्या उत्साहाने शिकवितात त्या उत्साहात हे शिकवतील का ? असा प्रश्न अनेक पालकांनी व्यक्त केला तेंव्हा हे ही योग्य आहे असे वाटते. अजून एक निर्णय चुकीचा वाटतो. सरकारी शाळा वाचवायचे असतील तर सरकारी योजना ह्या सरकारी शाळा सोडून अन्य कोणत्याच शाळांना देण्यात येऊ नये. मोफत पाठ्यपुस्तक योजना किंवा शालेय पोषण आहार योजना फक्त सरकारी शाळेतुनच दिल्या गेलं तर येथील शिक्षकांना म्हणता येईल की, आपल्या मुलांना फुकट पुस्तकं देऊ, दुपारचं जेवण देऊ, मोफत गणवेश देऊ आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. पण मोफत गणवेश वगळता पाठ्यपुस्तक आणि दुपारचे जेवण अनुदानित शाळेत देखील दिल्या जाते म्हणून काही पालक जे की या कारणांसाठी सरकारी शाळेत कदाचित येण्याची शक्यता राहिली असती ते ही धूसर झाली. शहरातल्या खाजगी शाळेत सर्व सोयी सुविधा पूर्ण असतात आणि त्याच शहरातल्या सरकारी शाळेत वर्गखोल्या झाडायला साधा चपराशी नसतो. याची देखभाल करण्यासाठी चौकीदार नसतो त्यामुळे या सार्वजनिक मालमत्तेचे रोजच्या रोज अतोनात नुकसान होत राहते. शासनाच्या सर्वच योजना राबविणे अत्यंत कष्टप्रद होऊन बसते. शालेय व्यवस्थापन समिती ही प्रत्येक शाळेला असते त्यात एक नगरपालिकेचा प्रतिनिधी देखील असतो पण नावापुरताच. त्यांच्या स्थायी समितीत शिक्षण नावाचा विषयच राहत नाही तर ते काय तरतूद करतील. पण खरोखरच नगरपलिका हद्दीतील सरकारी शाळांचा विकास व्हावा असे वाटत असेल तर येथील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शाळेकडे लक्ष दिल्यास आपल्या आजूबाजूच्या शाळेचा नक्की विकास होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे फक्त नि फक्त आपल्या सर्वांच्या ईच्छाशक्तीची. आज ग्रामीण भागातील सरकारी शाळा जसे कात टाकून आपल्यात बदल करत आहेत तोच बदल नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळेत होऊ शकतो, चला तर मग या शाळांना हातभार लावू या आणि गरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय करू या. 

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
9423625769

yoga Day

सहशालेय उपक्रम आणि योग

मुलांच्या जडणघडण मध्ये शाळा महत्वाची भूमिका बजावत असते. मुलं घरातून कौटुंबिक ज्ञान घेऊन जेंव्हा शाळेत प्रवेशित होतात तेंव्हा त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी अर्थातच शाळेवर येऊन पडते. शाळेतील पहिली चार वर्षे म्हणजे इयता पहिली ते चौथी वर्गापर्यंतच्या शिक्षणावरच मुलांचे पुढील भविष्य अवलंबून असते. म्हणून या प्राथमिक शाळेत मुलांवर संस्कार करणारी शाळा नेहमी प्रगतीपथावर राहते. बहुतांश पालक आपला मुलगा हुशार व्हावं असे बोलतात तर काही पालक माझा मुलगा हुशार झाला नाही तरी चालेल पण त्याला सर्व काही आलं पाहिजे, तो सर्वगुणसंपन्न असला पाहिजे असे बोलतात. मात्र अश्या प्रकारे बोलणाऱ्या पालकांची संख्या खूपच कमी आढळून येते. शाळेत विविध उपक्रम आणि प्रयोगाच्या माध्यमातून शिक्षक मुलांना सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या बौद्धिक विकासासोबत त्याच्या शारीरिक विकासाकडे शाळेतून लक्ष दिले जाते. घरात आणि समाजात वावरत असतांना मुलांनी कसे वागावे ? याचे शिक्षण याच प्राथमिक वर्गात दिले जाते. या लहान वर्गातील मुले घरातल्या आई बाबा किंवा दादा बहीण यांचे अजिबात ऐकत नाहीत मात्र सरांनी किंवा बाईंनी सांगितलेलं काम नेटाने पूर्ण करतात. मुलांचा त्याच्यावर असलेला हा विश्वास असतो. त्याचमुळे शिक्षकांनी देखील मुलांना याच वयात चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करावा. शाळेत वेगवेगळे खेळ खेळले जातात. काही उनाडकी मुलेच यात सहभागी होतात. पण सारेच मुले खेळात सहभागी करून घेतल्यास त्या मुलांचा फायदा होतो. शाळेत शेवटचा तास म्हणजे खेळाचा हे ठरलेले वेळापत्रक आहे. मुलांना बाहेर खेळायला सोडून दिले की शिक्षक मोकळे असे चित्र बऱ्याच शाळेत पाहायला मिळतं. त्याला कारणे अनेक असू शकतात. मात्र शिक्षकांनी नियोजन करून एखादे खेळ त्यांच्या नियंत्रण आणि मार्गदशनखाली खेळवल्यास मुलांना फायदा होऊ शकतो. खेळाचे शिक्षक याविषयी जेवढा न्याय देऊ शकतात तेवढा साधा प्राथमिक शिक्षक देऊ शकत नाही. लहान मुले कधीच थकत नाहीत. त्यांच्यामध्ये भरपूर ऊर्जा साठविलेले असते. त्याचा वापर आपणांस करता आले पाहिजे. जी मुले लहानपणी खूप खेळतात ते मोठेपणी कमी आजारी पडतात किंवा त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती असल्यामुळे ते आजाराला पळवून लावू शकतात. तर घरात बसून टीव्ही पाहणारे किंवा मोबाईलवर गेम खेळणारे साधे फडसे जरी आले तरी दवाखान्यात हजार रुपये खर्च करतात. म्हणून शालेय जीवनात मुलांच्या आवडत्या खेळाला प्रोत्साहित केले तर त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. या खेळाबरोबर मुलांच्या आहाराकडे देखील लक्ष देता येते.प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. यावेळी मुलांना जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, ताटात आलेले अन्न कुरकुर न करता खाणे, जेवण करतांना पूर्ण लक्ष आपल्या ताटात ठेवणे अश्या गोष्टी मुलांना नकळत कळत जाते. त्याचा फायदा निरोगी शरीर राहण्यास होतो. ज्यांचे शरीर तंदुरुस्त त्याचे मन देखील तंदुरुस्त. मग त्याचे आरोग्य देखील तंदुरुस्त राहू शकते.

21 जून रोजी जागतिक योग दिवस आहे. या दिवसापासून आपण सर्वांनी आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योग करायचे आहे. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी प्रत्येक शाळेत परिपाठच्या माध्यमातून दोन मिनिटांचे मौन घेतले जाते. शाळा सुटताना देखील असे मौन काही शाळेत घेतले जाते. ज्याद्वारे आज दिवसभार काय केले ? याची एकदा उजळणी होते. म्हणूनच मुलांनी योग करायचे म्हणजे शाळेतल्या विविध उपक्रमात हिरीरीने सहभाग घ्यावे. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. यातूनच आपणांस सुखी जीवन मिळू शकते. चला तर मग आपले शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी शाळेतल्या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य वाढवू या.


- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व विषय शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769  

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...