Thursday, 25 January 2018

प्रजासत्ताक दिन

26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन

आपल्या देशात प्रामुख्याने दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरे प्रजासत्ताक दिन होय. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन किंवा गणतंत्र दिवस म्हणून सुद्धा ओळखले जाते. व्यापारी म्हणून आलेले आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी भारतावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले. भारतातील अनेक क्रांतिकारक लोकांच्या आंदोलनामुळे इंग्रजांना अखेर भारत देश सोडावा लागला. 15 ऑगस्ट 1947 या सुवर्ण दिवशी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. देश तर स्वातंत्र्य झाला पण देश चालवायचे कसे ? त्यासाठी काही नियमावली असणे गरजेचे आहे. म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची समिती तयार करण्यात आली. संविधान तयार करण्यासाठी मसुदा आवश्यक असते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी जगातील विविध देश व त्यांच्या घटनेचा अभ्यास केला. दिवस-रात्र मेहनत करून घटना तयार केली. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. तयार केलेले संविधान त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केले. त्यास्तव 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्याचे आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले.  प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारी हाच दिवस का निवडण्यात आले ? असा प्रश्न लहान मुलांच्या मनात पडणे साहजिक आहे. हा भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत, सर्वत्र इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष धुसमुसत होता. त्याच काळात सन 1930 च्या काँग्रेसच्या अधिवेशनात असे ठरविण्यात आले होते की, 26 जानेवारी हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा. पण पुढे चालून असे झाले की, भारत देश 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य झाला. काळाच्या ओघात 26 जानेवारी हा दिवस विस्मृतीमध्ये जाऊ नये आणि प्रत्येक भारतीयांना या दिवसाची जाणीव कायम राहावी, याचसाठी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले असावे. चला तर मग संविधानात दिलेल्या नियमानुसार आचरण ठेवून आपला तिरंगा ध्वज उंच शिखरावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करूया. आज 68 वा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त सर्व भारतीयांना हार्दीक शुभेच्छा ! जय हिंद !

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Monday, 22 January 2018

राष्ट्रीय मतदार दिन

राष्ट्रीय मतदार दिवस

इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेले राज्य. येथे मतदार आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले अमूल्य मत व्यक्त करणे खूप महत्वाचे ठरते. अनेक लोकं अनेक प्रकारे आपल्या देशाची सेवा करतात. शास्त्रज्ञ मंडळी संशोधनाद्वारे आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करतात. युवक-युवती सैन्यामध्ये विविध पदांवर काम करत देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, राजकारण या माध्यमातून अनेकजण देशाप्रती आपले सेवा देत असतात. याचबरोबर शाळेतील विद्यार्थी एन.सी.सी.च्या माध्यमातून देशसेवा करण्याचा प्रयत्न करतात. मग मतदान करणे हे सुद्धा एकप्रकारे देशसेवेचाच एक भाग आहे. आपली लोकशाही बळकट, सुदृढ व सक्षम करण्यासाठी देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यासाठी, विकासाला गती येण्यासाठी या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास चूकीचे ठरणार नाही. बहुतांश वेळा आपण असे विचार करतो की, माझ्या एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडणार आहे ? मतदानाच्या निमित्ताने जी सुट्टी मिळाली आहे त्या सुट्टीचा आनंद उपभोगावे म्हणून आपण कुठेतरी सहल काढतो. खरोखरच यावर आपण कधी आत्मपरीक्षण किंवा स्वतःला कधी एक प्रश्न विचारले आहे का की, मी माझे कर्तव्य विसरलो काय ? मतदान करणे माझे कर्तव्य नव्हे काय ? माझ्यासारखे अनेक लोकं असेच विचार करतात आणि मतदान करीत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान झाल्याची टक्केवारी खूप कमी दिसून येते. पण थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आपल्या एका-एका मतामुळेच उमेदवारांच्या खात्यात मत जमा होत राहतात. कधी कधी असे ही ऐकायला मिळते की, अमुक एक व्यक्ती एका मताने निवडून आला. त्यावेळी त्या मताचे खरे मूल्य आपणास कळते. यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपली लोकशाही अधिक सक्षम होणार नाही हे लक्षात घ्यावे.
ज्यांची वयाची 18 वर्षे पूर्ण झाली ते सर्वजण निवडणूक प्रक्रियेत मतदार म्हणून सहभागी होत असतात. निवडणूक आयोग त्यासाठी दरवर्षी नवीन मतदार नागरिकांची नोंदणी बी.एल.ओ. मार्फत करीत असते. आपली वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आपले नांव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे. कारण आपले नांव मतदार यादीत नोंदविले नाही तर मतदानाच्या पवित्र हक्कापासून आपण वंचित राहू शकतो. नव्याने मतदार झालेले युवक फार मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभागी होतात. मात्र पुढे पुढे त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग कमी होत जातो, याचे कुठे तरी संशोधन व्हायला हवे. देशातील प्रत्येक मतदार यात सहभागी झाल्यास निवडणूक निकाल अधिक पारदर्शकपणे दिसून येईल असे वाटते. मात्र वेगवेगळ्या कारणामुळे दरवेळी मतदानाची टक्केवारी घसरलेली दिसून येते. मतदान यादी अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे. बहुतांश मतदार यादीत मयत लोकांची आणि काही दुबार नावे आढळून येतात. तसेच त्या यादीतील काही कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून काम पाहतात त्यांच्यात मतदान करण्याची टक्केवारी वाढली पाहिजे. निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका, निवडणूक कार्य प्रमाणपत्र यांच्या साहाय्याने मतदान करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते मात्र या पद्धतीने मतदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी दिसून येते. ही टक्केवारी वाढली पाहिजे. मतदान करण्याची सक्ती केली पाहिजे. जी व्यक्ती मतदान करणार नाही त्यांच्या काही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करायलाच हवे. निवडणुकीच्या ओळखपत्राचा वापर आपण वेगवेगळ्या कामासाठी करत असतो आणि प्रत्यक्षात मात्र जेव्हा मतदान करण्याची वेळ येते तेंव्हा मात्र त्याकडे पाठ फिरवली जाते. म्हणून त्याचा वापर नागरिक तेंव्हाच करतील जेव्हा ते मतदान करतील, अशी काही व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे असे वाटते. सर्वात शेवटी अत्यंत महत्वाचे म्हणजे आपण देशातील एक जागरूक मतदार आहोत म्हणून आपले अमूल्य मत काही गोष्टीच्या लालचीमध्ये पडून विकू नये. निवडणुकीच्या काळात दारू आणि पैसा याचा महापूर असतो असे त्या काळातील बातम्या वरून दिसून येते. त्यामुळे पन्नास रुपयाच्या दारूपायी किंवा लाल, पिवळ्या नोटाच्या मोहात पडून आपले मत कोणाला दान करू नये. त्याऐवजी आपणास योग्य वाटणाऱ्या उमेदवारास आपले अमूल्य मत देऊन लोकशाही बळकट करण्यात खरे शहाणपण आहे.  आपले राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्यदिन आणि  प्रजासत्ताक दिन. या दिवशीच प्रत्येकांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहताना दिसते. नैसर्गिक आपत्ती असो ध्वजदिन निधी संकलन प्रत्येक जण देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे येतो व आपल्या कुवतीनुसार मदत करतो. याप्रमाणे मतदानाच्या बाबतीत देखील लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे गरजचे आहे. म्हणूनच भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा करीत असतो. तर चला मग आजच्या दिवशी शपथ घेऊ या जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्याविषयी जागरूक करू या.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Wednesday, 17 January 2018

मार्कंडेय जयंती विशेष लेख

महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत

ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा मृकंड यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तेव्हा  भगवान शंकर म्हणाले, " तुमच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नाही, परंतु माझी एवढी कठोर तपश्चर्या केल्यामुळे, मी आपणास एक पुत्र देत आहे. मात्र त्याचे आयुष्य फारच कमी आहे. तो अल्पायुषी आहे. तो फक्त सोळा वर्षे जगेल." मृकंड आणि त्याची पत्नी मरूधावती यांनी ते मान्य केले आणि भगवान शंकर तथास्तू म्हणून लुप्त झाले.
दिवस-महिना करीत काही वर्ष उलटले. मृकंडच्या घरी एका मुलाने जन्म घेतला. त्याचे नाव मार्कंडेय असे ठेवण्यात आले. शिक्षण घेण्यासाठी मार्कंडेय यांना ऋषीमुनींच्या आश्रमात पाठविण्यात आले. तल्लख बुद्धिमत्तेचा मार्कंडेय सगळी विद्या घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या घरी परतले. घरातील उदास व नाराजीचे वातावरण पाहून मार्कंडेय चिंताग्रस्त झाले. एवढे दिवसापासून दूर राहिलेले मुल घरी परतल्यावर अाई-बाबा खुश होतात, आनंदून जातात. मात्र माझे आई-बाबा का आनंदी नाही ? याचा ते विचार करू लागले. मार्कंडेयच्या आई-वडिलांना माहीत होते की, मार्कंडेय हा अल्पायुषी आहे. सोळा वर्षे पूर्ण झाले की, तो इहलोकातून परलोकात जाणार. पण हे त्या मार्कंडेयला कसे सांगणार ? परंतु मार्कंडेयने आई-वडिलांजवळ नाराजीचे कारण जाणून घेण्याचा हट्ट धरला. आई-वडिलांनी मार्कंडेयला संपुर्ण कहाणी सांगितली. तेव्हा मार्कंडेय यांनी निश्चय केला आणि आपल्या आई-वडिलांना सांगितले, ' मला काहीही होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. ' असे सांगून आई वडिलांची आज्ञा व आशीर्वाद घेऊन भगवान शंकराची तपश्चर्या करण्यासाठी मार्कंडेय घराबाहेर पडले
  भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी मार्कंडेय यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली आणि त्याची सलग एक वर्ष जप करीत राहिले. वयाची सोळा वर्ष पुर्ण झाले. त्यांची मृत्यूची वेळ जवळ आली. तेव्हा साक्षात यमराज त्यांना घेऊन जाण्यासाठी आले. त्यावेळी मार्कंडेय शिवभक्तीत तल्लीन होते. जसेही यमराजने मार्कंडेय यांचे प्राण घेण्यासाठी पुढे आले तसे मार्कंडेय यांनी शिवलिंगाच्या भोवती घट्ट आलिंगन घेतले.  त्यावेळी स्वतः शंकर भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले आणि यमराजाला म्हणाले की, " या बाळाचे प्राण तुम्ही नेऊ शकत नाही, मी या बालकास दीर्घायुष्य प्रदान करीत आहे." हे ऐकून यमराज मार्कंडेयचा प्राण न घेता जीवदान देऊन परत गेला. त्यानंतर भगवान शंकर म्हणाले," मार्कंडेय, आपणाकडून लिहिण्यात आलेल्या महामृत्युंजय मंत्र आपणास खूप प्रिय असून भविष्यात जो कोणी या मंत्राचा स्मरण करेल त्यांना माझा आशीर्वाद सदैव मिळत राहील. या मंत्राचे जप करणारा व्यक्ती मृत्यूचा भीतीपासून मुक्त होईल आणि भगवान शंकराची कृपा त्यांच्यावर सदैव राहील." हेच ते बालक जे की पुढे महर्षी मार्कंडेय या नावाने ओळखले जाऊ लागले
महर्षी मार्कंडेय ऋषी हे भारतातील पद्मशाली समाजाचे कुलदैवत आहेत. भारतात आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक व केरळ अश्या संपूर्ण दक्षिण भागात वास्तव्य आढळून येते. या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे कापड विणणे हे आहे. मार्कंडेय ऋषींचे वंशज भावना ऋषी यांनी कमळाच्या तंतूपासून धागा बनवून कापड तयार केले आणि ते देवांना वाहिले. यावरूनच पद्म म्हणजे कमळ आणि शाली म्हणजे कापड असे पद्मशाली नाव पडले असे म्हटले जाते. महर्षी मार्कंडेय ऋषीची जयंती पद्मशाली समाजबांधव फार मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करतात. महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून वीस किलोमीटर अंतरावर चंद्रपूर मार्गावर मार्कंडेय नावाचे ठिकाण आहे ज्या ठिकाणी लहान मोठे शिवलिंग पडलेले दिसून येतात. हजारो वर्षांपासून हे मंदिर उभी आहे. महाराष्ट्रात सोलापूर, नांदेड, जालना, चंद्रपूर आणि ठाणे जिल्ह्यात पद्मशाली बांधव फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आज महर्षी मार्कंडेय ऋषीची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद 
9423625769

Monday, 15 January 2018

साहित्यसेवा

साहित्यसेवा हेच खरे साहित्यिकांचे काम

साहित्यासाठी भाषा खुप महत्त्वाची आहे. भाषेचा विकास साधण्यासाठी साहित्यातून बोलीभाषेचा वापर करायलाच हवे. बोलीभाषेतून मग प्रमाण भाषेकडे वाटचाल करता येते. आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य वापरत असतो. काही जण आपल्या मनातील विचार भाषणाच्या माध्यमातून व्यक्त करतात तर काही लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करतात. भाषणामधून जे व्यक्त होते ते संग्रही ठेवणे जरा कठीण जाते मात्र लिखित स्वरूपातील विचार चिरकाल टिकून राहतात. आज आपण संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील साहित्य लिखित स्वरुपात असल्यामुळे वाचन करू शकतो. कागदाचा शोध लागण्यापूर्वी माणसे तोंडातोंडी माहिती लक्षात ठेवत असत. पाठांतर करण्यावर जास्त भर राहत असे. एकाजवळ असलेली माहिती दुसऱ्यांजवळ तोंडीच जात असे, त्यास गुरुकुल पध्दत असे म्हटले आहे. अश्मयुगीन काळातील लोक झाडाची पाने, साल आणि दगड गोट्याचा वापर करून काही नोंदी करत असत. काही कालावधी उलटल्यानंतर कागदाचा शोध लागला आणि लिखित साहित्याला चांगले दिवस बघायला मिळाले. प्रसिध्द कवयित्री बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या मात्र त्यांचे कवन अप्रतिम होते. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते पण त्यांच्या नात्यातील एका व्यक्तिने ते सर्व लिहून ठेवले म्हणून आज ते साहित्य आपणास वाचायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक संतानी त्यांच्या प्राकृत मराठी भाषेत आपले साहित्य लिहून ठेवले म्हणून आज ते सर्व साहित्य आपणास दिशा देण्यासाठी खुपच उपयोगी ठरत आहेत. त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धिसाठी नाही तर लोककल्याणासाठी साहित्य लिहून ठेवले. साहित्यात अनेक प्रकार आहेत जसे की, कविता, कथा, चारोळी, ललित आणि वैचारिक लेख इत्यादी. अश्या अनेक माध्यमातून व्यक्ती आपले विचार जतन करू शकतो. भारतीय परंपरेत असे अनेक साहित्यिक मंडळी होऊन गेले त्यांच्या नावाची यादी करीत बसलो तर कागद अपूरे पडेल. त्यांनी प्रसिद्धिची हाव न ठेवता विपुल साहित्य लिहून ठेवले म्हणून मराठी साहित्य आज समृद्ध बनले आहे, एवढे मात्र खरे आहे. आज साहित्याची काय स्थिती आहे किंवा साहित्य किती जतन केल्या जात आहे ? तर याचे उत्तर म्हणजे आज साहित्य विपुल प्रमाणात तयार होत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जतन केल्या जात आहे. मात्र पूर्वीप्रमाणे दर्जेदार साहित्य निर्माण होत नाही अशी खंत अधुनमधून ऐकायला मिळते. साहित्य निर्माण करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. खुप शिक्षण घेतलो म्हणजे साहित्य निर्माण करता येते असे मुळीच नाही. साहित्य निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ तशी प्रतिभा असावी लागते, त्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते, नविन शिकण्याची जिद्द ठेवावी लागते, अपार मेहनत करण्याची तयारी असावी लागते, या सर्वासोबत विनम्रता असणे आवश्यक आहे तरच आपले साहित्य दर्जेदार निर्माण होते. आज प्रत्येकजण प्रसिध्दीच्या लालसेपोटी अक्षराला अक्षर जोडून, यमक जुळवून साहित्य तयार करीत आहेत. लगेच त्यास स्थानिक वृत्तपत्रामधून प्रसिध्दी मिळाले की झाले साहित्यिक. लगेच आपल्या नावसमोर किंवा नावाखाली बिरुदावली मिरवण्यास तयार. हे तर काहीच नाही काही साहित्यिक मंडळी इतरांचे साहित्य आपल्या नावावर प्रकाशित करून स्वतःची वाहवा मिळवितात. त्यामुळे ते खरोखरच साहित्यिक होतात काय ? हा प्रश्न सुटत नाहीच. आजकाल सोशल मीडियामुळे खुप साहित्य तयार करता येत आहे आणि अनेक साहित्य जतन करून ठेवता येत आहेत. म्हणून आपले साहित्य प्रसिध्द व्हावे म्हणून लेखन न करता आपल्या मनाच्या समाधानासाठी पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न करावे. मनोरंजनातून लिहिलेले साहित्य दर्जेदार बनते. त्यानंतर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लिहावे म्हणजे आपल्या साहित्याला आपोआप प्रसिध्दी मिळेल. जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुनी सोडावे, सकळजन या उक्तीनुसार सर्व लोकांना काही बाबी कळाव्यात म्हणून साहित्य निर्माण करावे. स्वतःच्या नावाच्या प्रसिध्दीसाठी जो लिहितो तो मुळात लिहित नसून आपला स्वार्थ शोधत असतो. म्हणून साहित्यिक मित्रांना माझी नम्रतेची विनंती आहे की प्रसिध्दीसाठी कधी ही साहित्य लिहू नका. आपल्या लेखनीद्वारे समाजाचा, गावाचा, राज्याचा त्याचप्रमाणे देशाचा विकास होईल असे साहित्य निर्माण करणे आवश्यक आहे. जातीजातीत किंवा धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असे कोणतेही लेखन प्रसिध्दीच्या मोहापायी प्रकाशित करू नये. त्यामुळे आपणास तर त्रास होतोच शिवाय आपल्यामुळे इतरांना देखील त्रास होऊ शकतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की, शब्द हे तलवारी सारखे धारदार शस्त्र आहे, जरा जपून वापरा. शब्दाने मन जसे जोडली जातात तसे तोडली देखील जातात. तेंव्हा चला प्रसिध्दीची जरा देखील आस न धरता निर्भेळ साहित्याची सेवा करूया आणि आपले साहित्य आपल्या नंतर येणारी पिढी अभ्यासेल असे तयार करू या.

- नागोराव सा. येवतीकर 
प्राथमिक शिक्षक 
मु. येवती ता. धर्माबाद 
9423625769

प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत

*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*

प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र हळूहळू हे चित्र बदलत गेले. आज प्रत्येक गावात शाळेसाठी किमान दोन वर्गखोल्या आणि दोन शिक्षक आहेत. गावाला या शाळेचा खूप आधार असतो. अडी अडचणी ला गावातील लोक याच शाळेचा आधार घेतात. गावातील एखादे छोटे मोठे लग्न असो किंवा इतर काही कार्यक्रम प्रत्येकजण शाळेच्या मैदानाचा आणि वर्गखोलीचा हमखास वापर करतात. सरकारी शाळा ही सार्वजनिक मालमत्ता असते त्यामुळे शिक्षक मंडळी देखील कोणाला काही बोलू शकत नाहीत. मात्र ज्या शाळेला संरक्षण भिंत आहे त्या शाळेची सुरक्षितता जास्त प्रमाणात आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेतल्याशिवाय येथे काही करता येत नाही. त्यामुळे शाळेत बाहेरच्या बाजूला असलेली रंगरंगोटी टिकून राहते. शाळेचे मैदान कोणी खराब करू शकत नाही. मैदानातील बाग विविध फुलझाडांनी बहरून आणता येते. मनात जे काही आणले ते सिद्धीस नेता येते. शाळेचे सौदर्य देखील।खुलून दिसते. याउलट संरक्षण भिंत नसेल तर मात्र अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. शिक्षक आणि विद्यार्थी दिवसभर शाळेत स्वच्छता करून ठेवतात. शाळा सुटल्यानंतर काही क्षणात गावातील उनाड मुले शाळेत विविध खेळ खेळून शाळेचा परिसर अस्वच्छ करतात. काही तरुण मुले तंबाखू आणि गुटखा खाऊन शाळेच्या दारात थुंकतात. त्यामुळे सकाळी त्याचा उग्र वास दरवळत असतो. काही मद्यपी मंडळी शाळेच्या आवारात दारू पितात आणि दारूची बाटली मैदानात फोडून काचा पसरवितात. याहीपुढे जाऊन काही महाभाग वर्गात दारूची बाटली फोडतात आणि सकाळी गुरुजीला काम लागावे असे करतात. शाळेतील शौचालय तर कधी ही पहा तेथे घाण केल्या जाते. शिक्षक मुलांच्या मदतीने स्वच्छ करून घेतात तर काही विघ्नसंतोषी लोक शौचालय विद्रुप करून ठेवतात. शाळेचा बाह्य भिंतीवरील अनेक चित्रे आणि नकाशे विद्रुप केली जातात. वृक्षारोपण किती ही वेळा करू द्या तेथे एक ही वृक्ष लागवड होऊ शकत नाही. गावातील लोकं जाण्याचा रस्ता शाळेतूनच, जनावरे जाण्याचा रस्ता शाळेतूनच, गाड्या आणि वाहने जाण्याचा रस्ता देखील शाळेतूनच त्यामुळे शाळेतील मुलांना शिक्षक कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ शकत नाही. काही शाळेतील अत्यंत महत्त्वपूर्ण साहित्य चोरीला गेल्याची बातमी जेंव्हा वाचण्यात येते तेंव्हा खूप दुःख वाटते. आज गावोगावी च्या शाळा डिजिटल मध्ये रूपांतरित होत आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेत एक लाखांच्या आसपास डिजिटल साहित्य असते. मात्र त्याची सुरक्षितता रामभरोसे आहे. शाळेतील काही खेळ किंवा कृतीयुक्त बाबी घेण्यासाठी शाळेचे मैदान काहीच कामी येत नाही. ततेच जर संरक्षण भिंत असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार आणि खासदार यांनी शासनाला याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याविषयी निवेदने देऊन प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी खास तरतूद करण्याची सूचना केल्यास शाळेची सुरक्षितता वाढेल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...