Saturday, 19 May 2018

ठेविले अनंते तैसेचि राहावे

ठेविले अनंते तैसेचि राहावे

व्यक्तीचा स्वभाव जन्मल्यापासून मरेपर्यंत वयापरत्वे सारखे बदलत राहते. लहानाचे मोठे होत असताना अनुभवाची शिदोरी घेत घेत व्यक्ती मोठा होतो. काही लोकांचा स्वभाव सुंभ जळाला तरी पीळ जात नाही या उक्तीप्रमाणे नेहमी तशीच राहते. " ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान " असे संत तुकाराम महाराजांनी लोकांना उपदेशपर सांगितले आहे. त्याचाही काही जणांवर निश्चितपणे प्रभाव जाणवतो. काही व्यक्ती मात्र जीवनात आलेल्या कटू अनुभवातून काहीतरी तथ्य शिकून आपल्या स्वभावात थोडा फार बदल करतात. ते लोक एका अर्थी परिस्थितीशी जुळवून घेतात. ज्यांचे स्वभाव बदलतात तेच कोणत्याही परिस्थितीशी समायोजन करू शकतात. ज्यांचा मूळ स्वभाव कुत्र्याची शेपूट वाकडे ते वाकडेच अशी राहते ते जीवनात हेकेखोर, तापट, रागीट स्वभावाची व्यक्ती बनतात. समाजात अशी त्यांची ओळख होते ती कायमस्वरूपी राहते.
अगदी लहानपणापासूनच व्यक्तीचा स्वभाव पदोपदी अनुभवाला येत असतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा वापर या स्वभावावरूनच केल्या जाते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रत्येक लहान मुलांमध्ये एक सहज स्वभाव आढळून येतो ते म्हणजे नको म्हटलेले करून पाहणे. आई-वडीलांनी  हे करू नका असे म्हटले की केले तर काय होते ? याची उत्सुकता व जिज्ञासेमुळे नको म्हटलेले तो नक्की करून पाहतो. हुशार असलेले पालक मुलांच्या या उत्सुकता व जिज्ञासेचा फायदा उचलत नको-नको म्हणत त्यांच्याकडून हव्या त्या क्रिया सहजरीत्या करून घेतात. आज जेवण करू नको असं म्हटलं की त्या दिवशी तो थोडा जास्तच जेवण करणार हे ठरलेलं गणित आहे. तेथे पालकांची कल्पकता फारच कामाला येते.
असंच बालपण सरताना काही गोष्टींची जाणीव होत जाते तसा तो तारुण्यात पदार्पण करतो. या वयात अतिआत्मविश्वास हा स्वभाव सरसकट सगळ्याच तरुणांमध्ये दिसून येतो. गोष्ट पूर्ण करण्यापूर्वी मी ते सहजरित्या करू शकतो. आत्मविश्वासाने विविध स्वप्न रंगविण्याचे काम या वयातील सर्व युवकांचे बनलेले असते. यात त्यांचा मुळीच दोष नसतो, याठिकाणी दोष आहे तो त्या वयातील स्वभावाचा. जे युवक अशा वयात आपल्या स्वभावावर संयम ठेवून वागतात त्यांचे स्वप्नभंग होत नाही आणि तो जीवनात यशस्वी होतो. या वयातील युवक " डर के आगे जीत है " या आशेने भन्नाट काम करू इच्छितात. परंतु यात सर्वांनाच विजय मिळत नाही हेही तेवढेच खरे आहे.
तारुण्यातून व्यक्ती जेव्हा संसारात पडतो तेव्हा अनुभवाच्या शिदोरीवर त्याचे स्वभाव बदलत राहतात. विवाह म्हणजे फक्त महिलांसाठी दुसरे जन्म नसून पुरुषांचा सुद्धा आहे. विवाहानंतर दोघांनाही आपापल्या स्वभावाशी जुळवून घ्यावेच लागते. संसारात लहान-सहान गोष्टी नेहमी घडतात ज्यामुळे कुरबुर होत राहते. अशा वेळेसच स्वभावाची कसोटी लागते. घरात माहेराकडील मंडळी आली की आपली सौ. लगबगीने कामाला लागते आणि श्री थोडासा हिरमुसला होतो. याउलट सासरकडील मंडळी आली की उलट चित्र बघायला मिळते. असे प्रत्येक श्री आणि सौ यांच्या संसारात निदान एकदा तरी पाहायला मिळते. स्वभाव बदलला नाही किंवा परिस्थितीशी दोघांनीही जुळवून घेतले नाही तर संसाराचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. संसार म्हणजे एका रथासारखे आहे. रथाचे दोन्ही चाक व्यवस्थित असतील तरच रथ चालू शकतो अन्यथा फसून बसतो. आज ज्यांचे संसार वार्‍यावर हवेत गिरक्या खात आहेत त्यांच्याशी विचारपूस केल्यास त्यांचा संसार असे होण्यामागे श्री किंवा सौ यापैकी कुणाचा तरी एकाच्या स्वभावामुळे असे झाले हे लक्षात येते.
स्ववभावच्या बाबतीत वृद्धापकाळाकडे जरासं लक्ष दिले तरी एक बाब प्रकर्षाने जाणवते घरातील मुख्य असलेले व्यक्ती आज गौण झाल्याचे त्यांना दुःख मनामध्ये सलते. त्याना वाटते की आपण पूर्वीप्रमाणे सर्वकाही करावे. वय वाढले तरी त्यांचा स्वभाव बदलत नाही. त्यांचा त्यांना जेवढा त्रास होतो तेवढाच कुटुंबातील इतर सर्वांना सुद्धा होतो. वयापरत्वे काम आणि जबाबदारी बदलत असतात. त्या बदलानुसार त्यांनी आपला स्वभाव बदलला तर निश्चितपणे कोणालाही त्रास होणार नाही. आश्रमात राहणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत ही खरोखरच दुःखद बाब आहे. वृद्धाश्रमातील ही वाढत चाललेल्या संख्येमागे अन्य अनेक कारणे असू शकतील त्यात त्यांचा स्वतःचा न बदललेला स्वभाव काही अंशी तरी नक्की असतोच याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा लागेल.
व्यक्तीचा स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते. व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या सभोवताली असणाऱ्या परिसरावर, कुटुंबावर आणि मित्रांवर सुद्धा अवलंबून असतो. कुटुंबात ज्या प्रकारचे वातावरण असते त्यानुसार कुटुंबातील व्यक्तींचा स्वभाव बनत जातो. जन्मत:च कोणी सोबत स्वभाव घेऊन जन्माला येत नाही असे म्हटले जाते मात्र अनुवंशिक गुणानुसार व्यक्तीला जन्मतः काही गुण मिळतात त्यात स्वभावाचाही समावेश होतो. परंतु खरोखरच व्यक्तीचा स्वभाव चांगला व्हावा असे वाटत असल्यास जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास तसे होऊ शकते. नेहमी चांगल्या परिसरात राहावं म्हणून आपण त्याच परिसरातील घर निवडतो ज्या ठिकाणी चांगल्या स्वभावाची लोकं राहतात. कारण आपल्या व कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर स्वभावाचा फरक दिसून येतो तसेच शालेय आणि कॉलेज जीवनात चांगल्या स्वभावाचा मित्रांचा सहवास मिळणे प्रत्येकांच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सुसंगती सदा घडो या संत रामदासांच्या उक्तीची याठिकाणी खास करून आठवण येते. वाईट स्वभावाच्या मित्रांच्या संगतीने आपलं आयुष्य वाईट होते याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असते. शेवटी एक सारख्या स्वभावाच्या व्यक्तीची जुळवणी फार लवकर होते.
आपल्या स्वभावात अनुकूल बदल करण्यासाठी स्वतः जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास आपले आयुष्य अजून सुंदर होऊ शकते त्यास्तव प्रत्येकाने ठेविले अनंते तैसेची रहावे काय ? याचा जरूर विचार करावा.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Friday, 18 May 2018

लेख क्रमांक 06 युवा आरोपी

लेख क्रमांक 06

*युवा आरोपींचे पुनर्वसन आवश्यक*

कोल्हापूरच्या शाहूवाडी पोलीस लॉकअपमधून चार कैदी पसार झाल्याची आजची बातमी वाचण्यात आली. नेहमीप्रमाणे ही देखील बातमी म्हणून नजरेआड टाकली मात्र त्या चार आरोपीचे फोटो मला।बातमी वाचण्यास प्रवृत्त करीत होते म्हणून ती बातमी पूर्ण वाचली. तेंव्हा मनाला एक धक्का बसला कारण ती चार ही आरोपी विशी च्या आतले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नुकतेच मिसरूड फुटू लागले होते. त्यांच्या पुढे खूप मोठे आयुष्य पडून आहे आणि एवढ्या लहान वयात ते चार ही मुलांवर घरफोडी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल झालेली आहेत. खरोखरच ही बाब देशाच्या विकासासाठी घातक नाही काय ? ज्या युवकांचे हात देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी आवश्यक आहेत तेच हात दरोडा आणि घरफोडीसाठी वापरले जात आहेत. आज देशात असे किती तरी युवक आहेत ज्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते वाम मार्गाला लागले आहेत. काही युवक व्यसनाधीन झाले आहेत आणि आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी ते कोणता ही मार्ग स्वीकारण्यास तयार असतात. त्यांना त्याचे काही देणे घेणे नसते. काही ठिकाणी तर अश्याच युवकांच्या हातून पैशासाठी खून सुद्धा घडले आहेत. भारत देश हा सर्वात तरुण लोकांचा देश आहे असे म्हणताना छाती फुलून येते आणि त्याचवेळी सर्वात जास्त बेकारी असलेला देश म्हणताना लगेच गळून पडते. दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या लाखों च्या पटीत वाढत आहे आणि रोजगार मात्र हातच्या बोटावर मोजता येतील असे निर्माण होत आहे. एका जागेच्या नोकरीसाठी हजारोंच्या संख्येत अर्ज येत आहेत. यावरून देशातील बेरोजगारी लक्षात येते. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध विभागात 72 हजार पदे भरणार असल्याचे जाहीर केले. ही बातमी ऐकून बेरोजगार युवकांच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या असतील यात शंका नाही. मात्र देशात वीस ते पंचवीस वर्षाच्या आत असलेल्या आरोपीना समुपदेशन करून अश्या युवकांच्या हाताला काम दिल्यास ते भविष्यात काही चांगले कार्य करू शकतील अन्यथा त्यांची पिढी तर वाया जाणारच सोबत त्यांच्या नंतर येणारी पिढी सुद्धा वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वाढत्या वयात नकळत आरोपी झालेल्या युवकांचे पुनर्वसन आवश्यक आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लेख क्रमांक 05 बदल्या

*अखेर शिक्षकांच्या बदल्याना सुरुवात*

मे महिना म्हटले की बदल्यांची सुगी असते. प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. तसे विशेष करून शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वांचे खास लक्ष लागलेले असते. शिक्षक हा सर्वांच्या ओळखीचा आणि जिवाभावाचा कर्मचारी असतो. गावातल्या प्रत्येक क्षेत्राशी त्याचा संबंध येतो. गावात काही अडचण निर्माण झाली तर लोकं शाळेतील शिक्षकांकडे मदतीसाठी धावून येतात. लोकांची मदत मागण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यामुळे कधी पूर्ण होते तर कधी अपूर्ण राहते. पण शिक्षकांच्या शब्दाला आजही गावात मान आहे, यात शंका नाही. तसे आजकाल शिक्षकांचे संबंध फक्त गावपूरतेच मर्यादित राहिले नसून आजचा शिक्षक थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या शिक्षकांच्या बदल्याविषयी थोडी फार माहिती घेतली तर लक्षात येईल की सूर्य छाप जर्दाच्या चिटोरीवर शिक्षकांचे नाव लिहून बदल्या झाल्या आहेत. लोकप्रतिनिधीच्या आजूबाजूला असलेल्या लोकांद्वारे ह्या बदल्या व्हायच्या. पूर्वीचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते माणुसकी तसेच संबंध या गोष्टी लक्षात घेऊन काम करीत असत. परंतु शिक्षकांच्या बदल्यात लोकप्रतिनिधींचा हस्तपेक्ष सर्वांसाठी एक डोकेदुखी बनली होती. प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांना या बदल्याच्या कालावधीत रजेवर जावे लागायचे. त्याशिवाय बदल्या होत नव्हत्या. म्हणजे अधिकारी वर्गासाठी कमाई कमी आणि डोकेदुखी जास्त होते. त्यांच्या मनात नसेल तरी बदल्याच्या प्रक्रियेवर सह्या कराव्या लागत असे. त्यामुळे पैसेवाले सर्व चांगल्या ठिकाणी बदली करून घेत असत आणि जे पैसे खर्च करू इच्छित नाही त्यांना मात्र अवघड क्षेत्रांत किंवा शहरापासून दूर नोकरी करावे लागत. पण या सर्व बाबीला फाटा देऊन पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या स्तरावरून होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच ग्रामविकास मंत्रालयातून होत आहेत. शासनाचा हा निर्णय खरोखरच स्तुत्य आणि वाखाणण्याजोगे आहे. या प्रक्रियेमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि सहज बदल्या संपन्न होत आहेत. आत्तापर्यंत राज्यतील दहा एक जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 25 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण होण्याचे संकेत आहेत. अगदी सुरुवातीला या प्रक्रियेचा अभ्यास न करता अनेक शिक्षक संघटना आणि इतर शिक्षक मंडळींनी यास विरोध केले होते. मात्र सरल ऑनलाईन प्रणालीच्या बळावर यावेळी शिक्षकांच्या बदल्या करून दाखविण्यात येत आहे. प्रत्येकांनी आपल्या पसंदीचे आवडीचे 20 गावांची यादी दिलेली असल्यामुळे शिक्षकांच्या इच्छेनुसार बदली होत असल्याचे चित्र निर्माण होत आहेत. ज्यांची बदली झाली आहे ते निश्चित आहेत तर ज्यांची बदली होणे शिल्लक आहे ते मात्र अस्वस्थ आहेत. त्यांचे हृदयाचे ठोके वाढत चालले असून रात्रीची झोप उडाली आहे. मात्र यावर्षी शिक्षकांच्या होत असलेल्या बदल्या न भूतो न भविष्यती अश्याच आहेत असे म्हणावेसे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

Sunday, 13 May 2018

लेख क्रमांक 04

लेख क्रमांक 04
दिनांक 14 मे 2018 सोमवार

*तुज आहे तुजपाशी*

जीवनात प्रत्येकाला सुख हवेहवेसे वाटते तर दुःखाचा ससेमिरा कोणालाही नकोसा वाटतो. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे " सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे " सुख मिळवण्यासाठी मग आपली रात्रंदिवस नेहमी धडपड चालू असते. बहुतांश जणांना वाटते की भरपूर संपत्ती, गाडी, टुमदार बंगला, उंची फर्निचर, अंगावर दागिने, चांगले कपडे, खिशात महागडे मोबाईल मिळाले की आपण सुखी राहू. परंतु जसे दिसते तसे नसते. वर उल्लेखिलेल्या सर्वच्या सर्व वस्तू त्यांच्याजवळ आहेत त्याला विचारले की तू सुखी आहेस का ? समाधानी आहेस का ? तर त्याचे उत्तर नाही असे येते. कारण वरील कल्पना केलेल्या सुखी वस्तू थोड्याच अवधीत दुःख द्यायला सुरुवात करतात. या सर्व महागड्या वस्तूंची काळजी घेण्यात त्यांच्या जीवनातून सुख कधी निघून गेले ?  हे कळतच नाही. सदानकदा चिंतेच्या विचारात गढून गेलेल्या व्यक्ती खरोखरच सुखी असू शकते का ?
यापेक्षा विपरीत परिस्थितीत असलेला व्यक्ती ज्याच्याजवळ वरीलपैकी काहीही नाही, त्याची स्थिती भुकेला कोंडा अन निजेला धोंडा अशी गरीब व दरिद्रीची आहे ती व्यक्ती श्रीमंत व्यक्ती पेक्षा नक्कीच सुखी असतो. गरिबी व दारिद्र्यामुळे त्याला कष्ट करावे लागते त्यामुळे या व्यक्तीला भूक सुद्धा लागते आणि झोपही शांत लागते. याला कोणत्या महागड्या बाबींच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे मन स्थिर राहते व समाधानी राहते. म्हणूनच तो सुखी राहतो. गरिबीमुळे समाजात त्याचे चित्र थोड्या वेगळ्या पद्धतीने रंगविण्यात आले आहे. मात्र श्रीमंत लोकांपेक्षा गरीब व्यक्ती कधीही धनाने नव्हे तर मनाने श्रीमंत व सुखी असतो. कस्तुरीच्या शोधाप्रमाणे श्रीमंत लोक सुखाच्या मागे धावत राहतात. परंतु सुख त्यांना काही केल्या मिळत नाही. काखेत कळसा गावाला वळसा म्हणीप्रमाणे सुखाची परिभाषा न समजल्यामुळे सुखाच्या मागे पळणाऱ्या लोकांसाठी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांनुसार " तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी " असे म्हणावेसे वाटते. त्यास्तव सुखाला समजून घेणे क्रमप्राप्त आहे
जीवनात सुख मिळवायचे असेल तर आपल्याजवळ असलेल्या गोष्टीत संतुष्ट आणि समाधानी राहणे आवश्यक आहे. आपले मन कल्पवृक्षाखाली बसलेल्या व्यक्तीसारखे आहे. ज्याची कामना कधीच पूर्ण होत नाही शेवटी त्याचा अंत होतो पण त्याला सुख किंवा समाधान मिळत नाही. कारण आपली इच्छा कधीच संपत नाही. अति सुखाची लालसा हे माणसाचे जीवन रसातळाला नेते. रोज एक।सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापून त्याच्या पोटातील सर्व अंडी एकदाच प्राप्त करू इच्छिणार्‍या व्यक्तीच्या हातात अतिलालसेमुळे काय मिळाले ? अति तेथे माती. त्यास्तव अति संपत्ती किंवा इतर वस्तु प्राप्तीची लालसा ही सुखाला झाकोळून दुःख देऊन जाते. या बाबींची जाणीव सर्वप्रथम ठेवावी लागते.
मनात लालसा ठेवू नये आणि त्याचसोबत आपण जीवनात सुखी राहावे असे वाटत असेल तर आपणाला शक्य होईल तेवढ्या तन-मन-धनाने इतरांना मदत करावी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपण कोणाच्या दुःखात मदत केल्यास आपल्या दुःखात कोणीतरी धावून येतील. दुखी व्यक्तींना मदत केल्याने जे समाधान मिळते ते प्रत्यक्ष अनुभवल्यानेच कळते. त्याची मोजदाद कशातच करता येत नाही. इतरांविषयी द्वेष, मत्सर, वैरभाव न ठेवता नेहमी गोड बोलावे. बहुतांश वेळा बोलण्यातून सुद्धा पदरी निराशा येते. त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेले केव्हाही बरे. इतरांचे काही चांगले करता येत नसेल तर निदान त्याचे वाईट तरी करू नये, इतरांचे दुःख वाटुन घ्यावे व आपले सुख मुक्तहस्ते द्यावे.
नेमके आपण याच्या उलट वागतो त्यामुळे आपण नेहमी दु:खी वाटतो. याउलट संत-महात्मे निर्धन असून सुखी वाटतात कारण त्यांना जीवन जगण्याचा खरा सार कळलेला असतो. तुज आहे तुजपाशी याचा शोध लागला की रात्रीला झोप येण्यासाठी झोपेची गोळी घेण्याची काहीच गरज नाही

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लेख क्रमांक 01 अनाठायी खर्च टाळू या

लेख क्रमांक 01 
दिनांक 11 मे 2018 शुक्रवार

*अनाठायी खर्च टाळू या*

लहानपणी शाळेत शिकत असताना घरात आणि शाळेत पैशांची बचत करण्याविषयी सांगितले जायचे. घरात कोणी पाहुणे आले की किंवा बाबा  गावाला जात असताना हातावर दहा पैशाची मोठी बंदी द्यायचे. त्या बंदीला पाहून मन हरखून जायचे आणि नकळत पाय दुकानाकडे वळायचे. घराशेजारीच दुकान असल्यामुळे जास्त कष्ट कधी लागायचे नाही. बालपणीचा काळ असा सर्वांचाच सुखाचा असतो. मात्र वय वाढत जाते तसे घरातील मंडळी आणि पाहुणे सुद्धा लाड कमी करतात. पूर्वी जो पैसा हातात यायचा ते आता कोणी देत नसत तेव्हा मनात कुठेतरी वाटायचे बाबा आणि पाहुण्यांचे पैसे द्यायचे ते जर मी खर्च न करता वाचविले असतो तर माझ्याकडे भरपूर पैसा जमा राहिला असता. माझ्यावर असे हात पसरण्याची वेळ कदापिच आले नसते. हा विचार जेव्हा मनात येतो त्याचवेळी पासून व्यक्ती पैशाची बचत करायला शिकतो. काही व्यापार नाही आणि काम धंदा किंवा नोकरी नाही त्या व्यक्तीला एक तर पैसा फार मुश्कीलीने मिळतो आणि मिळालेला पैसा बचत करण्याचा विचार करण्यापूर्वी खर्चून जातो. मात्र जी व्यक्ती व्यापार कामधंदा किंवा नोकरी करते त्यांच्या हातावर पैसा सदोदित खेळत असतो. त्यामुळे अशा लोकांनी पदोपदी अनाठाई खर्च करण्याचे टाळून त्याठिकाणी पैशाची बचत कशी करता येईल ? याचा विचार करणे आवश्यक आहे. मी कमावलेला पैसा आहे आणि माझा पैसा आहे, मी वाट्टेल त्या पद्धतीने खर्च करणार असा विचार एक ना एक दिवस आपणाला नक्कीच रसातळाला घेऊन जाणार यात शंका नाही. पण काही श्रीमंतांनी किंवा करोडपती मंडळी लग्नसमारंभ, वाढदिवस या सारख्या कार्यक्रमातून लाखो रुपयांचा चुराडा करतात. त्यांना वाटते की समाजात माझी जी इमेज किंवा स्टेटस आहे ती फार वरच्या वर्गाची आहे साधेपणाने कार्यक्रम साजरे कसे करणार ? या स्वतःच्या इगोमुळे प्रचंड प्रमाणात अनावश्यक खर्च केला जातो. हीच पद्धत वरून खालपर्यंत पसरत आहे मराठीतील प्रसिद्ध म्हणीनुसार अंथरूण पाहून पाय पसरावे याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा अनेक ठिकाणी आपण आपल्याला गरज नसतानाही त्या गोष्टीवर पैसा  खर्च करतो. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही तेव्हा खर्च करताना मी का विचार करू ? ही विचार करण्याची वृत्ती समाजास कधीही घातकच आहे. तेव्हा आजपासून आपण ठरवले पाहिजे आणि अनावश्यक खर्च टाळलेच पाहिजे तरच स्वतःचा आणि देशाचा विकास होऊ शकतो अन्यथा नाही. प्रत्येकाने अनाठाई खर्च टाळण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांनी दुकानातील रंगबिरंगी दिसणारे आकर्षक वस्तूकडे आकर्षित न होता ते खाण्याचा मोह टाळावा. बहुतांश वेळा घरातील मंडळींना बालहट्ट पूर्ण करावाच लागतो. दुकानातल्या त्या वस्तूपासून मुलांना कोणते विटामिन मिळत नाही उलट पोटाचे विकार सुरू होतात. म्हणजे पहिल्यांदा खाऊसाठी पैसा खर्च करायचा आणि त्यानंतर दवाखान्यासाठी दुपटीने खर्च करायचा. या बाबीचा विचार करून प्रत्येक मुलाने शहाण्या लेकराप्रमाणे दुकानातील ते आकर्षक वस्तू खाण्याचा मोह टाळून रोज जे दहा-वीस रुपये होणार खर्च वाचविता येतो याचा जरूर विचार करावा. पुरुष मंडळींनी घराबाहेर खर्चावर स्वताबद्दल बंधने टाकणे गरजेचे आहे. बहुतांश पुरुष मंडळींना तंबाखू, दारू आणि सिगारेट यांचे व्यसन लागलेले असते. या व्यसनामुळे काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर काहीजणांचे जीवन संपले आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे किंवा मी खूप पैसे कमावतो तेव्हा थोडा शौक केला तर काय बिघडते अशी विचारधारा मनात ठेवून काही मंडळी या व्यसनाकडे वळतात. परंतु या शोधामुळे आपला रोजचा अनाठायी खर्च किती वाढला याचा लेखाजोखा एखाद्या दिवशी काढल्यास आपणास धक्काच बसतो. पानटपरीवर बाबारत्ना गुटखा साधारणपणे वीस ते पंचवीस रुपयाला मिळते आणि बहुतांश जण दिवसातून तीन ते पाच वेळा गुटखा खातात म्हणजे एका दिवसाचा गुटख्यावरचा खर्च 80 ते 100 रुपये आणि महिन्याचा 2000 ते 3000 रुपये. एवढा खर्च फक्त गुटखा खाऊन थुकल्या जाते. तंबाखू खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होतो, छातीत जळजळ होते, भूक लागत नाही, पाय दुखतात अशा अनेक त्रास संभवतात. गुटखा खाण्याचा अतिरेक झाला की एक दिवस दवाखान्यात जावे लागते. तेथील खर्च तर सांगता सोय नाही. असेच काही दारू पिणे आणि सिगारेट सोडणे या व्यसनाबाबत सुद्धा घडते. खरोखरच या व्यसनापासून शरीराला काही चांगल्या बाबी मिळतात का ? मग या गोष्टीवर आपण तो नित्य खर्च करतो तो अनाठायी आहे किंवा नाही याचा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शासन तंबाखू निर्मिती व विक्री या दोन्हीवर कायदेशीर बंदी घातलेली आहे तरी त्याची खरेदी आणि विक्री नेहमीपेक्षा दुप्पट होत आहे. अशा गोष्टींवर बंदी घातल्याने तंबाखू खाणे बंद होणार नाही तर त्यांचे मन परिवर्तन करणे ही काळाची गरज आहे. स्वतःच्या कुटुंबाची आपल्या माघारी काय होणार ? याची काळजी आपण करायलाच हवे. कुटुंबाला आपली आज खरी गरज आहे. त्यामुळे तंबाखू,दारू, सिगारेट सोडा आणि अनाठाई खर्च वाचवा. आपल्या कुटुंबाला प्रेम द्या, माया द्या तर समाजात शांतता राहिल. लहान मुले आणि पुरुष मंडळी यानंतर खर्च करण्यात सर्वात पहिला क्रमांक लागतो ते म्हणजे महिलांचा.  बालहट्ट जसे पूर्ण करावे लागते तसेच स्त्रीहट्ट सुद्धा पूर्ण करावा लागतो. स्त्री हट्टापुढे कोणाचे काही चालत नाही. महिला वर्गांच्या मागण्यांकडे जर लक्ष दिले तर खरोखरच त्यांची मागणी किती अनाठाई खर्चाची आहे हे लक्षात येईल. महिलांचा सर्वात जास्त आवडीचा भाग म्हणजे साडी खरेदी करणे आणि सोन्याचे दागिने तयार करून घेणे.  विवाहाचा योग सुरू झाल्यापासून तर पुढे आयुष्यभर पती-पत्नी या दोघांमध्ये साडी आणि सोने या विषयावर कधी वाद तर कधी संवाद घडत असतो. ज्या पुरुषाची पत्नी साडी व सोने याविषयी हट्ट करत नाही तो पती खूपच सुदैवी आहे. असा सुदैवी पती मिळणे मात्र दुर्मिळ आहे. दागिनेशिवाय कोणतीही स्त्री सुंदर दिसत नाही हे त्रिकालबाधित सत्य असेलही कदाचित मात्र अवाजवी सोने अंगावर टाकून मिरवणे हे सौंदर्याला लुप्त करते असे वाटत नाही का ? सुंदर स्त्रीला कोणत्याही आभूषणांची गरज नाही. परंतु मी किंवा माझे कुटुंब किती श्रीमंत आहेत हे पुढच्यांना नकळतपणे सांगण्यासाठी कदाचित हा खटाटोप असू शकतो. मात्र या साड्या आणि सोने यामुळे आपल्या व्यक्तिगत जीवनात काय प्रगती झाली. चोरी होण्याच्या भीतीमुळे घरात सोने असणाऱ्या बायकांना रात्रभर झोप येत नाही,  याउलट आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या आवश्यक तेवढे साडी आणि सोने बाळगले तर आपल्याच कुटुंबाचा खर्च आवाक्यात राहू शकतो. ज्या कुटुंबातील महिला छोटी-छोटी बचत करीत संसार करतात तेच कुटुंब भविष्यात चांगले आयुष्य बघू शकतात. घरात लागणार्‍या वस्तू असो वा स्वयंपाक घरातील वस्तू त्या प्रत्येकाची योग्य काळजी घेऊन विनाकारण ते नष्ट होणार नाही किंवा वस्तू वापरात न आणता पडून राहणार नाही याची काळजी घेणारी महिला घराला अनाठाई खर्चापासून वाचवून पुढे आणू शकते. तिचेच  संस्कार घरातील प्रत्येक लहान बालकावर होत असतात. हीच लहान मुले भविष्यात मोठी होऊन आईच्या पावलावर पाऊल ठेऊन चालायला लागतात. त्यास्तव महिलांनी आजच्या आपल्या आयुष्यासाठी आणि उद्याच्या लेकरांच्या आयुष्यासाठी अनाठायी  खर्च करण्याचा मोह टाळला तर संसार सुखाचा होईल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...