Friday, 22 March 2024

पुस्तक परिचय - निसर्गायन ( Nisargayan )

निसर्गाची सहल करविणारा निसर्गायण काव्यसंग्रह
किती पाहू अन साठवू किती मनात 
ही सारी किमया एका रोपट्याची

निसर्गाची निर्मिती ही एका रोपट्यातूनच होते. याच रोपट्याची नीट काळजी घेतली तर त्याची चांगली वाढ होते आणि त्याला फुले आणि फळे लागतात. आपण ज्या ठिकाणी वास्तव्यास राहतो त्याठिकाणी देखील आपणांस निसर्गाची साथ मिळत असते. पावलोपावली आपणावर निसर्गाचे अनंत उपकार आहेत, याची जाणीव सौ. निर्मला भयवाळ यांच्या निसर्गायण काव्यसंग्रहात पानापानावर आढळून येते.  त्याचा हा दुसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी सन 2008 मध्ये सारीपाट नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. यास पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. प्रत्येक माणसात काही ना काही प्रतिभा लपलेली असते, ती प्रतिभा आपण स्वत: ओळखू शकत नाही, त्यासाठी गरज असते एका मित्राची, गुरुजीची. ज्याप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अक्षरशत्रू असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्यातील प्रतिभा ओळखून भारतातील पहिली महिला शिक्षिका बनविल्या, त्यांच्या हातून उत्तम साहित्य निर्मिती करण्याची प्रेरणा दिली म्हणूनच बावनकशी सावित्रीबाई आपणांस लाभली. याठिकाणी देखील सौ. निर्मला भयवाळ ह्या मला सावित्रीबाई फुले वाटतात तर त्यांचे पती जेष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ हे ज्योतिबा फुले सारखे वाटतात. कारण त्यांच्या पतीने त्यांना प्रोत्साहित केले नसते, प्रेरणा दिले नसते तर सौ. निर्मला भयवाळ यांच्या हातून सारीपाट आणि निसर्गायण सारखे काव्यसंग्रहाचे साहित्य क्षेत्रात आगमन झाले नसते. गेल्या पंचवीस वर्षापासून ते आपल्या पतीसोबत काव्यप्रवास करत आहेत. सौ. निर्मला भयवाळ ह्या एक साधे गृहिणी आहेत पण त्यांच्या अंतर्मनात असलेली कविते विषयांची ओढ, लिखाणाविषयांची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. कवयित्री स्वतः या सर्व बाबीचे यशाचे श्रेय आपल्या यजमानांना देतात. कवयित्रीना पूर्वीपासूनच निसर्गामध्ये फिरण्याची आणि रमण्याची आवड आहे. झाडे, फुले, फळे यांच्याविषयी त्यांच्या मनात आत्यंतिक प्रेम आहे. त्यांच्या घराच्या अंगणातील विविध प्रकारची झाडे हे त्यांचे निसर्गावर असलेल्या प्रेमाची साक्ष देतात. म्हणूनच त्यांच्या यजमानांनी त्यांना वृक्षमित्र हा पुरस्कार दिलेला आहे. निसर्गायण या काव्यासंग्रहात निसर्गाची विविध रूपे दाखवणाऱ्या एकंदरीत तीस कविता आहेत. ज्या कविता वाचतांना आपण आपल्या घराभोवतीच्या पर्यावरणात वावरत आहोत की काय अशी शंका येते. या काव्यसंग्रहाला डॉ. ज्योती कदम यांनी प्रस्तावना देऊन सौ. निर्मला भयवाळ यांची पाठराखण केली आहे. आजपर्यंत निसर्गावर अनेक कवी आणि कवयित्री यांनी कविता लिहिल्या आहेत. मात्र सौ. निर्मला यांच्या निसर्ग कविता जरा वेगळ्या वळणाच्या आणि निसर्गात आलेल्या अनुभवावर आधारित आहेत, असे वाटते. म्हणूनच जरासे हटके वाटतात. निसर्गातील वृक्ष, नदी, नाले, ऊन, वारा, पाऊस, चंद्र, चांदणे, सूर्य आणि धरती यावर कविता वाचण्यास मिळतात.
त्यांची पहिलीच अंकुरला एक मोड ही कविता पर्यावरण कसे तयार झाले ? याचे अनुभव विशद करते. जोपर्यंत मोड अंकुरण होत नाही तोपर्यंत त्याची पुढील कोणतीच क्रिया होत नाही. या कवितेतून त्यांचे अति सूक्ष्म निरीक्षण दृष्टीस पडते. निसर्गाने आपणाला भरभरून दिले पण मानवाने परतफेड करायचे विसरून गेला. माणसाने जंगलतोड करून सिमेंटची जंगले उभारली आणि हवा प्रदूषित केली. मोठं मोठी कारखाने उभे करून नद्या नाले सारे दूषित केले. अस्वस्थ निसर्ग या काव्यातून त्यांनी तेच सांगितले आहे. 

पक्ष्याची घरटी यामुळे झाली उध्वस्त
म्हणूनच आज निसर्ग आहे अस्वस्थ

निसर्गाचे काही नियम ठरवलेले असतात, त्याच्या विरुद्ध कोणालाच वागता येत नाही. चांगले कार्य व्हावे म्हणून आपण खूप झटतो पण कधी कधी त्या चांगल्या कामात व्यत्यय येत असतात, ज्याचा त्रास काम करणाऱ्यांना होतो. असाच भावार्थ लपलेली कविता म्हणजे एक निवडुंग. आनंदाचे क्षण पाहण्यासाठी काही दुःखाचे क्षण देखील नकळत पाहावे लागतात. म्हणून कवयित्री म्हणतात,

टोचला काटा निवडुंगाचा
आणि क्षणभर विव्हळले मी.

कळी या कवितेतून सामाजिक संदेश देण्याचा कवयित्रीने प्रयत्न केला आहे. आपल्या घरात जर गुलाबाचे झाड असेल तर आपण तिची खूप काळजी घेतो, कोणाच्या दृष्टीस पडू नये असे वाटते पण गुलाबाच्या काही खट्याळ कालळ्या असतात किती जरी काळजी घेतली तरी देखील ते बाहेरच्या लोकांच्या दृष्टीस पडतेच पडते आणि लोकं ' व्वा काय सुंदर फुल!' आहे म्हणून तोडण्यास हात पुढे करतात तेंव्हा तेथे असलेले काटे तोडणाऱ्याच्या हाताला लागतात. याठिकाणी कळीच्या जागी मुलगी असे रूपक वापरले तर कवितेचा भावार्थ अजून गहिरा होतो. कवयित्री स्वतः एक महिला असल्याने त्यांच्या मनातील एक सल कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक व्यक्ती एकाच गोष्टीचा शोध घेत असतो ते म्हणजे कुठे झाडाची सावली मिळते का ?  पण तप्त उन्हामुळे सर्व झाडांची पाने वाळून जातात आणि कुठेच सावली दृष्टीस पडत नाही. मात्र एकच असं झाड आहे जे की भर उन्हाळ्यात देखील हिरवेगार आणि फुलून दिसतो ते म्हणजे गुलमोहर. याच दृष्टी वरून उन्हाळा या कवितेत त्या म्हणतात की,
छान गुलमोहर डवरला,
डेरेदार तो वृक्ष पाहुनी,
आनंद मनी झाला.

माणसांच्या निरुपयोगी वस्तुंना जीवनात काहीच अर्थ नसतो या आशयाची कविता म्हणजे खुडलेल्या कळ्या. जाईच्या फुलांची मागणी नाही म्हणून माळी जाईच्या सर्व कळ्या खुडून टाकतो तसेच त्याची वेल देखील. या कवितेतून कवयित्रीने समाजात चालत असलेल्या काही गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही बाबी निरुपयोगी वाटत असले तरी त्यांचे असणे आपल्यासाठी खूप मोलाचे आहे जसे की आपले वृद्ध आई-बाबा. तेव्हा त्यांना जाईचे फुल समजून घराबाहेर काढू नका किंवा दुर्लक्ष करू नका असा संदेश ते या कवितेतून देऊ इच्छितात असे वाटते. मुके प्राणी एकमेकांना कसे संदेश देतात हा एक संशोधनाचा विषय आहे. लाल मुंग्या एका रांगेत कसे चालतात ? तसे मधमाशी आपले मध कशाप्रकारे गोळा करते ? हा ही एक निरीक्षण करण्याजोगा विषय आहे. कवयित्री आपल्या बारीक नजरेतून हे सारे धुंडाळून काढले आहे मधमाशी विषयीचे सुंदर वर्णन त्यांच्या गंध या कवितेतून वाचायला मिळते. 

एकीस मिळता मध
दुसरीस साद घाली
पाहता पाहता सारी 
झुंड की हो आली

पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या सर्वाना आकर्षित करतात. खास करून उन्हाळ्यात जेव्हा जेवण झाल्यावर आपण बाहेर फिरतो किंवा बसतो त्यावेळी आकाशात जे सुंदरता दिसते, ते सर्वाना भुलवून टाकते. ते सुंदर दृश्य डोळ्यांत साठवून त्यावरच दिवस जात असतात असे सुंदर विवेचन चांदणे या कवितेत पाहायला मिळेल. निसर्गामध्ये जुने जाणे आणि नवीन येणे ही क्रिया चालूच असते. कोणत्या ऋतूत पाने गळतात आणि कोणत्या ऋतूत नवीन पालवी फुटते याच ज्ञानाच्या आधारावर चिमण्यांचा चिवचिवाट ही कविता निर्माण झाली असावी असे वाटते. फार पूर्वीच्या काळी जो चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता, तो आवाज आता गायब झाला आहे. त्यामुळे आज कोणाची पहाट रम्य राहिली नाही. आपल्या घरी कोणीतरी येणार हे कळल्यावर घरातील सर्वचजण सजून धजून बसतात. तसे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी धरणीमाता हिरवा शालू आणि चोळी नेसून सजल्याचे सुंदर चित्रण धरणीमाता या कवितेत केले आहे. धरती ही खनिजांचे भांडार आहे, ऋतुप्रमाणे आपले रूप बदलत असते, निसर्गाच्या बदलामध्ये तो आपणाला काही ना काही संदेश देत असतो. ते पूर्वीचे लोकं समजून घ्यायचे आताच्या लोकांनी समजून घेणं सोडलं आहे. सुंदर आणि रम्य निसर्ग राखण्यासाठी निसर्गाचे बोलणे आपण सर्वांनी ऐकायला हवं असा संदेश निसर्ग काही सांगतो आहे, निर्जर आणि निसर्गाची किमया या कवितेत कवयित्री देण्याचा प्रयत्न करतात. सकाळचा पहाटवारा आल्हाददायक असतो. दिवसभरातील शीण घालविण्यासाठी सकाळची वेळ खूप उत्तम आहे. अंधार संपून उजेड येण्यासाठी सकाळ ही एक महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवनात आलेल्या विविध अनुभवाच्या बळावर निसर्गाशी सांगड घालून रचना तयार केल्या आहेत, म्हणून वाचकांना ते नक्की भावतात.
पाऊस पडणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. पाऊस पडताना ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट या दोन गोष्टी घडणारच आहेत. पहिलं पाऊस आणि दरवळलेला मातीचा सुंगध याचे सुंदर असे वर्णन पहिला पाऊस, पावसाच्या धारा, पाऊस पडून गेला आणि पावसा रे पावसा या कवितेत केले आहे. पायवाट या कवितेतून ग्रामीण भागातील भागाचे सुंदर वर्णन करून शहरातील पायवाटला ग्रामीण भागातील पायवाटची गंमत नसल्याची खंत व्यक्त करतात. खास माणसं शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, सामान्य माणसे पावलोपावली भेटतात पण त्यांना काही किंमत नसते. याच अर्थाचा बगीचा ही कविता वाचतांना लक्षात येते की, दुर्मिळ वस्तू शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. 
पावसाळ्यात कधी सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत नाही मात्र वळवाच्या पावसात तो हमखास दृष्टीस पडतो. ते पाहून मन आनंदी होऊन जाते. या सर्व बाबीचा आढावा वळवाचा पाऊस या कवितेतून पाहण्यास मिळेल. ती कविता वाचतांना शंकर पाटील यांची वळीव ही कथा वाचकांच्या मनात तरळून जाते. एकापेक्षा एक सुंदर आणि भावगर्भ असलेल्या कविता वाचतांना आपण खरोखरच निसर्गात भटकत आहोत याची जाणीव होत राहते.
कोणत्याही गोष्टीचा शेवट गोड व्हावा असे म्हटले जाते तसे कवयित्री सौ. निर्मला भयवाळ यांनी त्यांच्या या काव्यसंग्रहात शेवटची सृष्टीच्या रंगात रंगू या ही कविता वाचकांना प्रोत्साहित करून जाते.

खळखळ वाहे हा झरा
देत चाहुल निसर्गाची
निसर्गाच्या संगतीत हरवू या
गाऊ गाणी निसर्गाची

औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळने निसर्गायण कवितासंग्रह गेल्या वर्षी 2020 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रकाशित केले असून काव्यसंग्रहावरील सुंदर आणि मनोवेधक असे मुखपृष्ठ महेश जोशी यांनी तयार केले आहे. एकूणच काव्यसंग्रहातून निसर्गावरील प्रेम आणि निसर्ग बचाव करण्यासाठी असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते. सर्व कविता साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहेत. आबालपसून वृद्धांपर्यंत सर्वाना हा  कवितासंग्रह नक्की आवडेल, याची मला खात्री आहे. कवयित्री सौ. निर्मला भयवाळयांना पुढील काव्य लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

काव्यसंग्रहाचे नाव - निसर्गायण
कवयित्री :- सौ. निर्मला भयवाळ
प्रकाशन :- जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
पृष्ठ :- 40 पाने
किंमत :- 70 रुपये

पुस्तक परिचय कर्ता

- नागोराव सा. येवतीकर, लेखक व शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - शृंगार मनाचे ( Shrungar Manache )


मानवी मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह शृंगार मनाचे
कवी पांडुरंग आडबलवाड हे धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलमध्ये गेल्या 32 वर्षांपासून मराठी विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि वसतिगृहात राहून 'कमवा व शिका' या तत्वानुसार त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाचे दारिद्र्य संपविण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी मिळविली. 
मराठी विषयाचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे भरपूर शब्दसंपत्ती आहे. त्याच बळावर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आध्यात्मिक धार्मिक, नैसर्गिक व चालू घडामोडीवर आशयघन, यमकबद्ध , समाजाभिमुख कविता लिहिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या विविधाऺगी अनेक कविता महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या असून अनेक कवितांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट तारा॑कित बक्षीस प्राप्त कविता " शृंगार मनाचे " काव्यसंग्रह स्वरुपात वाचकांसमोर विस्तृत स्वरूपात ठेवली आहे. 
या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातील थोर विचारवंत, लेखक, साहित्यिक, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना देऊन काव्यसंग्रहाची उंची वाढविली आहे तर सुप्रसिध्द काद॑बरीकार आणि साहित्यिक देवीदास फुलारी या॑नी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. या संग्रहात विजेत्या 85 उत्कृष्ट रचनेचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे असे म्हटले जाते. कवी पांडुरंग आडबलवाड यांच्या कविता वाचतांना पूज्य साने गुरुजी यांची प्रकर्षाने आठवण येते. कवी सहा महिन्यांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांना आईचे सुख-दुःख, आईची तगमग आणि मेहनत जवळून पाहता आले, आईशिवाय त्यांना कुणाचा आधार नव्हता म्हणूनच ते पहिलीच कविता माय माझी मध्ये म्हणतात,

माय माझी वृक्ष । वृक्षांची सावली
एकच माऊली । जगामधी ।।

कवींनी उभ्या आयुष्यात अनेक दुःखाचा सामना केला. अश्या कठीण प्रसंगात आपली जोडीदार भक्कमपणे सोबत उभी होती. म्हणूनच ते ही भक्कम उभे राहू शकले. त्यास्तव ते वाचकांना आयुष्याचा जोडीदार कसा असावा ? याची माहिती सांगताना म्हणतात, 

सुख दुःख आजारात
हवा साथी जोडीदार
वेळ येता आणीबाणी
जीव अर्पिण्या उदार

अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने कवी खूप उदास होतो आणि अशा प्रसंगी कवीच्या मनात ' पोरका पुष्प भुंग्याचा दरबार ' ही रचना जन्मास येते. कवीच्या मनात एक शंका निर्माण होते, 

दीनदुबळ्या पामरा नाही सृष्टीत कुठेही आसरा
स्वामी होऊन कुणी हातात धरली का कासरा

तसेच भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जाण्याने देखील कवी भावूक होऊन 'हरपले सप्तसुर' कवितेत कवी म्हणतो, 

कंठेश्वर हा जिवात्मा ! जगी जनात अद्भूत!
स्वर्ग भूवरी थाटण्या ! आल्या लता देवदूत!

कवीला शालेय जीवनापासून कविता लिहिण्याचा छंद होता. मध्यंतरीच्या काळात कविता लिहिणे सोडले होते मात्र कोरोना काळात पुन्हा एकदा त्यांची काव्यलेखन प्रतिभा जागी झाली. कविता लेखन करण्यासाठी कोरोना काळात खूप रिकामा वेळ मिळाला. हीच संधी समजून त्यांनी काव्यलेखनास परत एकदा सुरुवात केली आणि सोशल मीडियातील विविध समूहात सहभागी होऊन त्यांना विविध वाड्मय प्रकारात कविता सादरीकरण करण्याची संधी मिळाली. म्हणून ते पुन्हा एकदा कविता करण्याकडे वळले. म्हणूनच ते म्हणतात, 

सुख शांती समाधान
मोद साहित्यात दिसे
देह मना लेखनाचा
छंद जिवा लावी पिसे

कोरोना काळात लोकांना अनेक कडू अनुभव आले. या काळात डॉक्टर जसे देव म्हणून धावून आले तसे पोलीस देखील लोकांच्या मदतीसाठी पांडुरंग म्हणून उभे राहिले. याची प्रचिती कोरोना काळात अनेकांना आली म्हणूनच 'पोलीस' कवितेतून कवी म्हणतो, 

माय बाप लेकरे त्यागुनी
प्रजेप्रती घाळतात घाम
कर्तव्य तत्पर पांडुरंगाला
करू सर्व शतशः प्रणाम !

मुलांवर संस्कार टाकण्याचे महत्वाचे कार्य आई-बाबा करत असतात. लहानपणी त्यांचे बोट धरून चालणारे मूल त्यांनी दाखविलेल्या वाटेवर चालतात. खाण तशी माती या म्हणीनुसार जसे आई-वडील असतात तसेच मुले तयार होतात. अश्याच अर्थाचा जन्मदाता कवितेतून गर्भित असा संदेश देतात.

आई बाबा खरे दाते
शील संस्कार नीतिचे
बोट धरुनी सामर्थ्य
देती संसार मतीचे

त्याहीपुढे चालून संस्कार म्हणजे काय असते ? याचे महत्व सांगताना कवी म्हणतो, 

संस्काराची धनलक्ष्मी
नित्य नांदते ज्या घरी
जन्मा येती हिरे मोती
माता भगीनी  उदरी

बहिणाबाई चौधरी यांची अरे संसार संसार ह्या कवितेची जराशी झलक त्यांच्या कवितेत जाणवते. कवी देखील संसाराची गाऱ्हाणे सांगताना म्हणतो,

अरे संसार संसार
जना द्यावा आधार
होवो किती दुःख पर
दुजा वंदावे साभार

श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जीवनात जिवाभावाचे मित्र खूप महत्वाचे आहे. दुःखांच्या प्रसंगी फक्त मित्रच धीर देऊ शकतो, 'भाव मैत्रीचा' या कवितेत कवी म्हणतो,

सुख दुःखी प्रसंगात
मित्र देती जिवाजीव
भाव मैत्रीचा अपार
नसे कशाची उणीव

माणसाचे मन हे खूप चंचल आणि अस्थिर आहे. वाऱ्याप्रमाणे तो सैरभैर धावत असतो. याविषयी कवी म्हणतो,

मन उधाण वाऱ्याचे
स्तब्ध बसेना घरात
सदा धावे बाहेरच
जणू खगांची वरात

काव्यसंग्रहाचे शीर्षक रचना "शृंगार मनाचे" या कवितेतून कवी मानवी मनाचा वेध घेताना आपणांस मुक्ती मिळवायची असेल तर कर्णासारखे दानशूर होण्याचा सल्ला देतात. 

लाभो मुक्ती स्वर्गस्थान
हेच शृंगार मनाचे
कर्ण बळी परी दाता
व्हावे उदात्त गुणांचे

आंतरजातीय विवाह पद्धतीला आजही समाजात मानाचे स्थान नाही. कवीची स्वतःची एकुलती एक मुलगी आंतरजातीय विवाह करून घराबाहेर पडल्यावर कवी मनाला काय दुःख झाले असेल याची प्रचिती 'सुख लाभो तुला' ही कविता वाचतांना येते सोबतच आपल्या लेकीला आशीर्वाद देऊन संकटात सोबत असल्याची देखील ते ग्वाही देतात. 
काव्यसंग्रहातील सर्वच कविता वाचनीय आणि चिंतनीय आहेत. जास्तीत जास्त कविता अष्टाक्षरी काव्यप्रकारात लिहिलेल्या असून आशयघन आणि चिंतनीय आहेत. काव्यसंग्रहातील विठोबा, कौलारू घर, विश्वकर्मा, गुढीपाडवा, शेतकरी, महिला, भ्रूण हत्या, जन्म-मृत्यू, सैनिक,  मराठी राजभाषा, प्रतीकात्मक कविता घड्याळ, बैलगाडी, रेल्वे, पुस्तक, धावते निवास, काठी असे अनमोल, प्रेम काव्य वेड्या मनाचा फकिर, सखे तुझ्या हसण्याने व कोरोना या विषयासह राजे शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, हुतात्मा पानसरे यांच्यावर आधारित प्रासंगिक कविता देखील उत्तम आहेत. संगत प्रकाशनने संग्रहाची बांधणी उत्तम केली असून उच्च दर्जाचे कागद वापरले आहे. संतोष घोंगडे यांनी नावाला अनुसरून सुंदर मुखपृष्ठ सजविले आहे. कवीच्या मनातील काव्य शृंगार अजून असेच फुलत राहो आणि अनेक चांगल्या चांगल्या कविता वाचकांना वाचण्यास मिळो अशी यानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा .......!

काव्यसंग्रहाचे नाव - शृंगार मनाचे
कवी - पांडुरंग आडबलवाड
प्रकाशक - संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे - 136
किंमत 220 ₹

पुस्तक परिचय - 
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - काजळपाणी ( Kajalpani )

काळजाला भिडणारी गाणी काव्यसंग्रह काजळपाणी
      नाशिक येथील 'अलका कुलकर्णी' म्हणजे लेखिका कवयित्री, निवेदिका, अनुवादक , संपादिका अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. त्यांनी विविध मंचावर , आकाशवाणीवर कविता सादरीकरण तसेच विविध कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले आहे . विविध प्रकारच्या साहित्याचे संपादन केले आहे, म्हणून त्या उत्तम लेखिका देखील आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच त्यांच्या निबंध लेखन, कथालेखन, लघुकथा, ललित लेखनाला देखील पुरस्कार मिळाले आहेत. कवयित्रीचे मन निसर्ग व अध्यात्म यांच्याशी जुळलेले आहे. त्यांच्या कविता वाचताना त्यांच्या मनातील वेदना, समाजाप्रती असलेली तळमळ लक्षात येते. काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरून एक गोष्ट लक्षात येते की कवयित्री ह्या कृष्णभक्त आहेत. ह्या काव्यसंग्रहाविषयी कवयित्री आपल्या मनोगतात म्हणतात, ' मुळात काव्य, कविता हे प्रत्येकात भिनलेलं आहेच. कवितेचा छंद हाच कवितेचा प्राण असतो. कवितेची निर्मिती ही मुळी वेदनेतून होते. कविता ही आपल्या अनुभवांची सावली असते. एखादा शिल्पकार जसा ओबडधोबड पाषाणातून त्याला हवेसे नेटके शिल्प साकारतो तशीच काहीशी ही धडपड.' कवीच्या मनात कविता कशी जन्मास येते याचे सुंदर वर्णन 'जन्मते कविता ....' ह्या कवितेत केले आहे. जीवन जगताना जे अनुभव मिळतात, सुख आणि दुःख मिळतात, मनातील घुसमट, वेदना, तळमळ हे सारे शब्दात उतरतात आणि त्या शब्दाला एक वेगळा अर्थ मिळतो. आभाळात जशी वीज चमकते आणि सर्वत्र लख्ख प्रकाश पडतो, त्या प्रकाशाकडे सर्वांचे लक्ष जाते तशी कवयित्रीची कविता साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आपल्या कवितेत त्या म्हणतात,
"कधी नजाकत नक्षत्रांची, या शब्दा अर्थाना येते
चंद्र चांदणे विहंग होते, निळ्या नभी चमचमते कविता!"

      मुसळधार, संततधार तर कधी कधी रिमझिम पडणारा पाऊस श्रावण महिन्यात दिसून येतो. प्रत्येक कवी श्रावण या विषयावर कविता करतो. श्रावणाविषयी त्यांच्या मनातील भाव-भावना व्यक्त करतो. या ठिकाणी श्रावण या कवितेत कवयित्रीने देखील श्रावणाचे खूप छान वर्णन करताना श्रावणाला धरतीचा एक महत्त्वाचा सण असा उल्लेख केला आहे. कारण ही तसेच आहे याच श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, गोपाळकाला अश्या नेक सणांची रेलचेल असते. 
"श्रावण म्हणजे सण आहे हा,
अवघ्या धरतीच्या देहाचा.."

      आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच पाऊस हवाहवासा आणि आवडणारा आहे. लहान मुले तर पावसाला विनवणी करतात ' ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ' असे म्हणतात. कवयित्रीने निळ्या आभाळाला पावसाळ्यामध्ये जांभूळ रंगाची उपमा दिली आहे. पहिल्या पावसात झिम्मड भिजून जावं अशी इच्छा त्या कवितेतून व्यक्त करतात. पाऊस येण्यापूर्वी आणि पाऊस पडल्यानंतर माणसांची अवस्था, घराची स्थिती, वेली, वनस्पती, गवताचे पाते याचे सुंदर असे वर्णन करताना जांभुळल्या आभाळात ह्या कवितेतून म्हणतात की ,
      "जांभुळल्या आभाळात पावसाचं गावं
      नवथर सर येता झिम्माड भिजावं..."

     ह्या काव्यसंग्रहातील अनेक कविता गजल प्रकारातील आहेत. यावरून गजल लिहिण्यात कवयित्रीचा हातखंडा आहे असे दिसून येते. त्यांना गझल कशी सुचली याचे वर्णन करताना 'त्याचा सुंदर मिसारा होतो' ह्या कवितेत कवयित्री म्हणतात,  जीवनात अनेक वळणे आली ज्यात काही सुखाची होते तर काही दुःखाची होती . त्या सर्वच संकटाला दोन हात करण्याची शक्ती व त्यातून नवा मार्ग दाखवण्याचे काम या गजलेने केले आहे. याच गजलेने कवयित्रीचे जीवन नितांत सुंदर केले आहे.  
      कितीतरी वळणे वाटेवर, तरी पुढे चालते निरंतर
      दोन हात संकटास करण्या, मार्ग नवा दाखवी गजल ही...!

       पंढरपूरचा सावळा विठ्ठल हा प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचा दैवत आहे. वारी, वारकरी, टिळा, तुळशीमाळा, मृदंग, टाळ हे सर्व त्या सावळ्या विठ्ठलाचे प्रतीक आहेत. कवयित्रीला देखील ती सर्व प्रतीके आकर्षित करतात. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट याची उपमा ढोल ( मृदंग ) आणि टाळ यांना देऊन कवयित्री आषाढ कार्तिकी मध्ये पंढरपूरच्या वाटेवर जे चित्र दिसते ते आपल्या रचनेतून व्यक्त केले आहे. 
      'दैवत माझे ......' या कवितेत कवयित्री म्हणते,
      "ढोल ढगांचा टाळ विजांचे, सजले अंबर भक्तीने
मस्तक चरणावरती माझे, भान हरपले घोषाने"

        'मी सखी माझीच होता .....' ह्या कवितेत कवयित्रीने मनातील सल व्यक्त केली आहे. आपल्या मनातील दुःख इतरांना सांगितले तर दुःख हलके होते असे म्हणतात. पण कधी कधी आपल्या दुःखामुळे इतरांनाही दुःख होते, त्यांची चिंता वाढते. त्यापेक्षा माझ्या दुःखाची मी जर मैत्रीण झाले तर माझे एकटेपण दूर होईल असे कवयित्रीला वाटते.
       "काळजाची काळजी घेण्या कुणी आतुर झाले ,
     मी सखी माझीच होता एकटेपण दूर झाले"

दोन वर्षांपूर्वीचा कोरोनाचा काळ कोणीही विसरू शकत नाही. या कोरोनामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली, अनेक जण अनाथ झाले, मरणाची एक अनामिक भीती सर्वांच्याच मनात होती. आज आहे उद्या असेन की नाही याची शाश्वती नव्हती, अशा या विषम काळात कवयित्रीने 'आधार पुन्हा' कवितेत मनातल्या भावना सुंदररीत्या शब्दबद्ध केल्या आहेत. माणुसकी काय असते त्याची शिकवण देखील याच काळात अनुभवास मिळाले. आधार पुन्हा .... या कवितेत कवयित्री म्हणतात,
"कोप जाहला तुझा निसर्गा रौद्र रूप अवतार पुन्हा
आले वादळ सोसाट्याचे कोसळले घरदार पुन्हा"

   ‌‌     नारी म्हटले की, दासी, अबला, कोमल, कमजोर हे चित्र रेखाटले जाते. पण कवयित्रीने ह्या सर्व चित्राला दूर सारत नारीचे सुंदर चित्र निर्माण केले आहे. नारीच्या हातातील हिरव्या बांगड्या हे समृद्धीचे लेणे आहे, जे की कुटुंबाला उर्जित अवस्था देते. कुटुंबावर संस्कार करणारी, मर्यादा शिकवणारी, ओठावर हसू तसेच मृदु बोलून व्यवहार करणारी, घरात सर्वांशी प्रेमाचे नाते जीवापाड जपून, कुटुंबातील सुसंवाद वाढवणारी, ती नारी आहे असे यथार्थ सुंदर वर्णन गर्व मला मी नारी आहे ...या कवितेत केले आहे. कवयित्री म्हणतात,
"जीवन परिभाषित करणारा, प्रबंध विद्याधारी आहे,
सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे..!" 

       त्याही पुढे जाऊन 'स्त्री कुणास पुरती कळली नाही' या कवितेत झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, पौराणिक कथेतील उर्मिला, राधा, सीता, यशोधरा, गांधारी, आणि आधुनिक काळातील सावित्रीबाई फुले यांचे कार्य लोकांना कळते पण अजूनही स्त्री पूरती कळाली नाही याची खंत कवयित्री व्यक्त करते. 

        कोणालाही कळणार नाही असे हे मन आहे. मनकवड्याला दुसऱ्याच्या मनातील ओळखता येईल ही कदाचित, पण खरंच माझ्या मनात काय चाललंय ? हेच मला कधी-कधी कळत नाही असे म्हणताना कवयित्रीने आपल्या मनाला सोसाट्याचा वादळ, भिरभिरणारा वारा, चमचमणारा पारा, सागराच्या लाटा, खोल जलाशय अशा अनेक उपमा दिल्या आहेत.  
कवयित्री कृष्ण भक्त असल्याने कृष्ण आणि राधा यांच्यावर आधारित अनेक कविता या कवितासंग्रहात वाचण्यास मिळतात. कृष्णावर अनेकांचे प्रेम होते. कृष्णासारखा सखा भेटावं असे प्रत्येक स्त्रीला वाटते, तसे कवयित्रीला देखील वाटते म्हणून ते म्हणतात, 
"कृष्णासम कोणी भेटावा तोच असावा प्राणसखा
हळवे कोमल चंचल मन हे राधेसम पावन व्हावे..!"

      कवयित्री ह्या आत्माचे ऐकून लिहिणाऱ्या कवयित्री आहेत. त्यांची इच्छा आहे की, जे जे माझ्या डोळ्यांना दिसेल ते ते मी लिहिणार आहे. निसर्ग असेल, कुटुंबातील नाते असेल, आयुष्यात येणारे चढ-उतार असतील वा पशु-पक्षी या सर्व बाबींवर कवयित्री लिहीणार आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे अर्थातच याच कवितेच्या माध्यमातून कवयित्रीचे दुसरे काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होईल अशी खात्री वाचकांना येते. 
     काजळपाणी काव्यसंग्रहाला कवयित्री 'नीलम माणगावे' ह्यांची प्रस्तावना लाभली असून 'वैशाली प्रकाशन पुणे' यांनी काव्यसंग्रह प्रकाशित केले आहे. 'सौ. रूपिका पाटील' यांनी ह्या काव्यसंग्रहाचे सुंदर मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. या काव्यसंग्रहात एकूण १२४ पाने असून निसर्ग, पाऊस, श्रावण, सावळा विठ्ठल, कोरोना, आणि नववर्षं  अश्या वेगवेगळ्या विषयावरील १०२ कवितांचा हा संग्रह आहे. या पुस्तकाची किंमत १५० रुपये आहे. या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या संग्रहातील काही कवितेच्या खाली बारकोड छापलेले आहे ज्याला स्कॅन केल्यावर ती कविता युट्युबवर पाहता देखील येईल. 
     कवयित्री अलका कुलकर्णी यांच्या पुढील काव्यलेखनास मनःपूर्वक शुभेच्छा..!

पुस्तक परिचय - 
नासा येवतीकर, स्तंभलेखक , 
विषय शिक्षक कन्या शाळा 
धर्माबाद जि. नांदेड : 9423625769

पुस्तक परीक्षण - सुश्री द्रौपदी मुर्मु ( Susri Droupadi Murmu )

आदिवासींची नायिका : सुश्री द्रौपदी मुर्मु

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक व भारतीय सशस्त्र दलांचे सरसेनापती (कमांडर-इन-चीफ) असतात. भारतातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्वाचे पद म्हणजे राष्ट्रपती. अश्या या पदावर आजपर्यंत डॉ. राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद असे चौदा राष्ट्रपती या देशाने पाहिले आणि अनुभवले. पंधरावे राष्ट्रपती म्हणून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी जुलै 2023 मध्ये शपथ घेतल्या. ओरिसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या छोट्याश्या गावात आदिवासी जमातीत जन्मलेल्या सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पदावर विराजमान होतांना प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटत होता. सोशल मीडियात चर्चेत नसलेले, प्रसिद्धी ज्योतात नसलेले, शांत व्यक्तिमत्त्व अचानक लोकांच्या समोर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपा पक्षाने केले. तेव्हा सुश्री द्रौपदी मुर्मु कोण आहेत ? त्यांचा जन्म कोठे झाला ? त्यांचे शिक्षण कुठपर्यंत झाले ? त्यांचे जीवन कसे आहे ? असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडणार यात शंकाच नाही. सामान्य नागरिकांच्या याच प्रश्नांना उत्तर मिळावे आणि भारताचे पहिले आदिवासी नायिका महिला राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांची माहिती सर्वांना व्हावी या निर्मळ हेतूने लेखक विनोद पंचभाई यांनी सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु हे चरित्र पुस्तक वाचकांसमक्ष ठेवले आहे.
 मराठी साहित्य क्षेत्रात विनोद पंचभाई यांचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या लेखनशैलीमुळे. समाजातील सर्वच स्तरावरील वाचकांसाठी ते लिहितात. चरित्र लेखन आणि रहस्यमय कथा लिहिण्यात त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. हॉटेल हवेली ही त्यांची रहस्यमय कादंबरी खूप गाजलेली आहे. त्याचसोबत त्यांनी बालसाहित्य देखील लिहिले आहे. भारताचे आजपर्यंत झालेले राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय शास्त्रज्ञ यांच्यावर देखील त्यांचे पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. विनोद पंचभाई हे अभ्यासपूर्ण लेखन करतात, त्यासाठी त्यांना अनेक पुस्तकांचे वाचन, खूप भटकंती आणि टिप्पणी लिहून ठेवावे लागतात. त्यांच्या पुस्तकावरून त्यांनी केलेले अभ्यास, चिंतन आणि मनन हे सारं लक्षात येते.
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्याविषयी सोशल मीडियात कुठेच काही माहिती उपलब्ध नव्हती. कारण त्या प्रसिद्धीपासून कोसो दूर राहत होत्या. त्यांचा स्वभाव म्हणजे नेकी कर दर्या में डाल. कधी त्यांना आपल्या कामाची प्रसिद्धी व्हावी असे वाटले नाही की त्यांनी आपल्या कामाचा गवगवा केला नाही. अगदी शांत चित्ताने, मन लावून आणि पक्षप्रमुखाने दिलेली जबाबदारी नेटाने पूर्ण करीत राहिल्या. सन 1999 मध्ये पहिल्यांदा ते राजकारणात उतरल्या आणि नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय सेवेला प्रारंभ केल्या आणि अवघ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सर्वोच्च अश्या पदावर विराजमान झाल्या. अर्थातच हे सहजासहजी घडले असे नाही किंवा कोणती जादू देखील झाली नाही. तर यामागे सुश्री द्रौपदी मुर्मु यांची पक्षश्रेष्ठीशी असलेली निष्ठा, जनतेसोबत असलेले प्रेमपूर्वक संबंध आणि समाजातील तळागाळातील आपल्या जमातीच्या आदिवासी लोकांच्या समस्येची जाण ठेवून त्यांनी केलेले निस्वार्थ काम या साऱ्याचे एकत्रित फळ म्हणजे राष्ट्रपती पद होय. लेखकांनी याविषयी आपल्या पुस्तकात संदर्भासहित सुंदर अशी माहिती दिलेली आहे. ते वाचतांना सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या अजून महान ठरतात.
भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाविषयी बोलतांना म्हणतात की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्याचे जो कोणी प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणसाला ज्ञान मिळते, ज्ञानामुळे माणूस विचार करू लागतो आणि त्याला जीवन जगण्याचे कौशल्य मिळते. भारतीय शिक्षणतज्ज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून थांबले नाही तर तळागाळातील गरीब लोकांच्या मुलां-मुलींसाठी शाळा सुरू केल्या. त्यांच्या मते घरातील एक पुरुष शिकला तर फक्त तोच शिकतो आणि घरातील एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंबाला ती शिकविते. समाजातील मुलींना शिकविण्यासाठी महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अगोदर शिकविले आणि इतरांना शिकविण्यासाठी तयार केले. याचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी आपले कार्य केले. त्यांच्या गावात फक्त सातव्या वर्गापर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा होती. त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना गाव सोडणे गरजेचे होते. घरची परिस्थिती आणि सामाजिक स्थिती या दोन्ही संकटाशी दोन हात करून त्यांनी गाव सोडून आपले शिक्षण पूर्ण केले. त्या गावातून शिक्षण घेणारी सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या पहिल्या होत्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते, त्यामुळे त्यांनी संघर्ष केला पण शिक्षण सोडले नाही. आपण जसे शिकलो तसे समाजातील इतर मुली देखील शिकल्या पाहिजे यासाठी त्यांनी अगदी निस्वार्थपणे शिकविण्याचे कार्य केले. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला जे अनुभव येतात ते अनुभव त्यांना देखील आले पण त्यांनी समाजासाठी व देशासाठी उंबरठा ओलांडून शिकविण्याचे काम केले. हे त्यांचे पहिले धाडसी पाऊल होते जे की, राष्ट्रपती होण्यासाठी कारणीभूत ठरले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
माणसाच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. जीवनात सुख आणि दुःखांचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. सुख मिळाले म्हणून हरखून जाऊ नये आणि दुःख मिळाले म्हणून स्वतःला संपवून टाकू नये. प्रत्येक गोष्टीचा सामना करीत, त्या प्रसंगाशी दोन करीत जीवन जगण्यात खरा आनंद आहे, याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. सुश्री द्रौपदी मुर्मु या आज राष्ट्रपती पदावर दिसत आहेत, ही खरोखरच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. पण त्यांनी आपल्या जीवनात कोणत्या संकटाला तोंड दिले आणि कोणते दुःख पचविले ? त्यांना संकट काळात कोणी धीर दिला ? हे जर एकदा त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर ते किती महान आहेत ? याची प्रचिती येते. शालेय शिक्षण पूर्ण करण्यात त्यांना खूप कष्ट सोसावे लागले, लग्न झाल्यानंतर ही त्यांनी निस्वार्थपणे एक ही रुपया पगार न घेता शिकविण्याचे काम केले. ऐन उमेदीच्या काळात, घरात सुख आणि आनंद नुकतेच प्रविष्ठ झालेले असताना पाच वर्षात चार मोठे धक्के त्यांना बसले. पहिल्यांदा मोठ्या मुलांचा मृत्यू, नंतर लहान मुलांचा मृत्यू त्यानंतर पती देखील सोडून गेले. याच दुःखाच्या काळात लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. जवळजवळ सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या ढासळल्या होत्या. पण त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांना सावरले, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी आध्यात्मिकची जोड देऊन त्यांना ध्यानधारणा करण्यास प्रवृत्त केले. असे म्हणतात की, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. या सर्व गोष्टीचा अनुभव सुश्री द्रौपदी मुर्मु यांना अनुभवावे लागले.
लेखक विनोद पंचभाई यांनी अति परिश्रम घेऊन, अनेक संदर्भ पुस्तक वाचून, सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या संपर्कात व सहवासात आलेल्या लोकांच्या भेटी घेऊन, प्रत्यक्षात सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या जन्मगावी उपरबेडा येथे भेट देऊन हे अप्रतिम असे पुस्तक लिहिले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. रमेश भारताल यांनी सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे सुंदर चित्र पुस्तकावर रेखाटले आहे. पुणे येथील दुर्वा एजन्सीजने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याची किंमत फक्त 250 रु. आहे. भारतातील आजपर्यंतचे राष्ट्रपती कोण कोण होते आणि त्यांचा स्वभाव कसा होता ? सुश्री द्रौपदी मुर्मु यांची निवड कशी झाली ? इतर सर्व राष्ट्रपतीपेक्षा सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे जीवन कसे वेगळे आहे ? याची माहिती जाणून घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने विशेष करून महिलांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे वाटते. त्यासाठी आपण लेखक विनोद पंचभाई यांच्या 9923797725 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पुस्तकाची प्रत मागवून घ्यावे. भविष्यात लेखकांच्या हातून असेच अप्रतिम पुस्तक वाचकांस वाचण्यास मिळत राहो ही सदिच्छा आणि पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा ......!

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड, 9423625769.

पुस्तक परीक्षण - सीता-शक्ती ( Seeta-Shakti )

स्त्रीचं मन सांगणारी सीता-शक्ती कादंबरी
भारताच्या इतिहासाला हजारो वर्षांची परंपरा आहे. रामायण हे महर्षी वाल्मिकी रचित आदिमहाकाव्य असून त्याचा चरित्र नायक मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भारतीयांचे श्रद्धेय दैवत आहेत. मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीराम यांचे गुणगान समस्त लोक नेहमी करत असतात. मात्र त्यांची पत्नी सीता यांच्याविषयी फारसे बोलल्या जात नाही. काही काही जण तर सीतेमुळे रामायण घडलं असे बोलतात. कदाचित ते सत्य ही असेल ! मात्र संपूर्ण जीवनात सीतेला किती त्रास सहन करावा लागला असेल ? तिने त्रास का सहन केला असेल ? कोणासाठी सहन केला असेल ? कधी सीतेच्या भूमिकेत जाऊन आपण विचार केला आहे का ? नाही. पण हैद्राबादच्या मीना खोंड यांनी तसा विचार केला आणि सीतेच्या भूमिकेत जाऊन त्यांनी " सीता-शक्ती " नावाची कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी प्रत्येक स्त्रीचं मन काय सांगत असते ? काय बोलत असते ? हे सीता बनून लिहिले आहे.
रामायणाची कथा आपणा सर्वांना तोंडपाठ आहे. रामायणात अनेक पात्र आहेत आणि प्रत्येक पात्राचे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे. त्याच्यातील मुख्य पात्र आणि त्यांच्या घटना आपणांस माहीत आहेत. पण लेखिकेने फक्त सीता ही मध्यवर्ती कल्पना डोळ्यासमोर ठेवून सुंदर असं सितायन लिहून काढलं आहे. कुणाच्या प्रारब्धात काय लिहून ठेवले आहे ? हे कसे कळणार ? नशिबात जे लिहिलं आहे ते घडणारच आहे, फक्त त्यासाठी कोणीतरी निमित्त होत असते !
कैकयीने राजा दशरथ यांना दोन वर मागितले नसते तर श्रीराम वनवासात जाण्यासाठी निघाले नसते. सुख असो वा दुःख पती-पत्नी नेहमी एकत्र असावेत ही भावनिक परंपरा पूर्वीपासुन चालत आलेली आहे. 'जेथे राघव तेथे सीता ‘ त्यानुसार सीता श्रीरामासोबत वनवासाला गेली . तिच्या नशिबात हा पहिला वनवास होता आणि तिने हा वनवास स्वेच्छेने  स्वीकारला होता .राज्य, ऐश्वर्य भोगण्याच्या मनस्थितीत असतांना परिस्थिती बदलली आणि वनवास भोगावा लागला. सीतेने वनवास खंबीरपणे संकटं संघर्ष सहन करत भोगला. सुख दुःखात पतीला साथ देण्याची सीता शक्ती अलौकिक आहे .
            या कथेतून अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे तो म्हणजे स्त्री हट्ट. कैकयीने राजा दशरथ जवळ हट्ट केला आणि सीतेने श्रीरामाला कांचनमृग आणून देण्याचा हट्ट धरला. स्त्री हट्टामुळे कधी कधी जीवनात अडचणीचे प्रसंग निर्माण होतात. म्हणून स्त्रियांनी आपला हट्ट पूर्ण करून घेतांना संसाराची देखील काळजी घ्यावी.
सीतेला पती रामाचा अतिशय अभिमान होता. ती म्हणते “ तुम्ही संघर्ष करून समुद्रपार करून त्या कपटी राक्षस रावणाचा वध केला आणि लंकेतून माझी मुक्तता केली. हा तुमचा पराक्रम माझ्याकरिता प्रेम, अभिमान, उपकार, अलौकीक दिव्य होते. अश्वमेध यज्ञाच्या वेळी आपली वामांगी सुवर्णप्रतिमा बघून प्रेमाची एकपत्नी व्रताची साक्ष पटली!”
" सीते तू माझी आंतरिक शक्ती होतीस. मी रावणवध करून हे युद्ध जिंकले आणि महत्वाचे म्हणजे तुझी सुटका झाली." राम सीतेचे असे अद्वैत होते.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना महत्व दिले जात नाही. तसेच संशयाचे बळी स्त्रियाच ठरतात. कधी ही पुरुषावर असे संशय घेतल्या जात नाही किंवा घेतले तरी काही होत नाही. पण स्त्रीवर संशय घेतल्यावर अग्निपरीक्षा द्यावी लागते. सीता गरोदर असतांना देखील एका व्यक्तीच्या बोलण्यावरून श्रीराम सीतेला अरण्यात सोडून देतात. त्यावेळी सीता चलबिचल होते. पण गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी ती सर्व विचार बाजूला ठेवून सकारात्मक विचार करते. कारण मातेने नाराज, उदास होऊन नकारात्मक विचार केला तर त्याचा परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो. सीतेचे उच्च विचार लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी कसे वागावे ? एकल मातेने संस्कार कसे करावे ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीतामाता होय.
व्यक्तीगत जीवनापेक्षा राजाला राज्य महत्वाचे, व्यक्तीगत नात्यापेक्षा प्रजा महत्वाची हे तत्व राजारामाला पाळावे लागेल ! प्रजा प्रथम, नाती दुयम्म राहतील. राजाला नाती नसतात. राजा फक्त प्रजेचा असतो. श्रीराम हे प्रथम अयोध्येचे राजा आहेत आणि त्यानंतर आपले पती ! म्हणून श्रीराम अडचणीत किंवा संकटात येऊ नये म्हणून त्यांनी 14 वर्षाच्या वनवासानंतर दुसरा वनवास भोगला होता. मानसकन्या सीतेला वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमात घेऊन गेले .वाल्मिकी ऋषींनी रामचरित्र रामायणात लिहिल्यामुळे आजच्या लोकांना रामायण वाचायला मिळत आहे. त्यांच्या संस्कारामुळे लव-कुश यांच्या माध्यमातून श्रीरामाची भेट झाली. पण सीता मात्र आपल्या धरतीमातेच्या कुशीत गेली. पुस्तकातील लेखिकेची भाषा सहज, सोपी, हळवी आणि मनाला भावणारी आहे.
जीवनात संघर्ष, संकटं, परीक्षा, वनवास, एकटेपण, अपमान, कलंकितेचा चारित्र्यावर असलेला संशयाचा आघात सहन करणं हे सारं सीतेच्या आत्मिक शत्तीमुळे शक्य झालं. पतिव्रता आणि माता दोन्ही भूमिका तिने यशस्वीपणे पार पाडल्यात.
जन्म भू मातेच्या उदरी
मृत्यू भू मातेच्या अंतरी
सीता-राम मनामनात जनाजनात
जोवर चंद्र सूर्य आहेत भूवरी
सीता-शक्ती या पुस्तकाविषयी लेखिका म्हणते, ' मी सीतेवरील अन्यायाच्या दृष्टीकोनातून सीताशक्ती लिहायला घेतली. जसा जसा मी अभ्यास करायला लागले, तशी मी श्रीरामाच्या गुणसमुच्चय, चारित्र्य, आदर्श या सार्‍या मूल्यामुळे मर्यादा पुरुषोत्तमाकडे आकर्षित व्हायला लागले. माझे चिंतन वाढले आणि... रामाचे एकपत्नी व्रत, सीतेचा त्याग, सीतेचा आत्मघात या प्रश्नांची उत्तरे मला मिळत गेली.'
खरंच काही प्रश्नांची उत्तरे शोधत असतांना आपणाला त्या प्रश्नाचे उत्तर तर सापडतेच. शिवाय त्याच्याशी निगडित अन्य माहितीची देखील भर पडत असते. म्हणून प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारून त्याचे उत्तरं शोधण्याचा नक्की प्रयत्न करावे.
लेखिकेने स्त्री भावना अतिशय संतुलितपणे मांडल्या आहेत हे विशेष. श्रीरामाला कुठलेही दुषण न देता सीतेच्या भावना व्यक्त करणं हे फार कठीण काम आहे, पण लेखिकेने ते फार छान प्रकारे लिलया केलंय हेच मला या पुस्तकाचे यश वाटते. हे सीताशक्ती निश्चित वाचनीय आणि संग्रह ठेवण्यासारखे आहे.

पुस्तकाचे नाव :- सीता-शक्ती
लेखिकेचे नाव :- मीना खोंड, हैद्राबाद
प्रकाशन - विजय प्रकाशन, नागपूर
पृष्ठे :- 84
मूल्य :- 125 ₹

पुस्तक परिचय -
नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परीक्षण - यौवन ते विवाह ( Youvan te Vivah )

तारुण्याचा दिशादर्शक प्लॅटफॉर्म सांगणारा लेख संग्रह - यौवन ते विवाह
तारुण्यावस्था म्हणजे मनास उमलविणारा व तनास फुलविणारा आयुष्यातील एक महत्वाचा संक्रमण काळ, याच काळावरून प्रत्येकांची पुढचे भविष्य ठरले जाते. या तारुण्याच्या वयात नकळतपणे चुका होतात आणि भविष्य उध्वस्त होऊन जाते. म्हणून या उमेदीच्या वयात थोडीशी काळजी आणि थोडीशी जागरूकता ठेवल्यास संपूर्ण आयुष्य निरोगी, निरामय आणि यशस्वीपणे कसे जगता येईल याचे उत्तम असे मार्गदर्शन प्रा. देवबा शिवाजी पाटील यांच्या यौवन ते विवाह या लेखसंग्रहात वाचण्यास मिळतात. प्रा. देवबा पाटील हे एक सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांचे आजपर्यंत खूप साहित्य प्रकाशित झालेले आहे. आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांसाठी त्यांनी लेखन केले आहे. पुणे येथील कृष्णायन प्रकाशन द्वारे प्रकाशित झालेले यौवन ते विवाह हा लेखसंग्रह फक्त वयात आलेल्या तरुण-तरुणी यांच्यासाठीच नाही तर किशोरवयीन मुलामुलींना, पालकांना, महिलांना या सर्वांसाठी उद्बोधक आणि मार्गदर्शक आहे. या पुस्तकात त्यांनी सदतीस विषयाच्या माध्यमातून तारुण्यातील अनेक घटनांचा मागोवा घेतलेला आहे. रस्ता चुकलेल्या वाटसरूला जर रस्त्यात कोणी वाटाड्या भेटला आणि त्याने खऱ्या रस्त्याच्या मार्ग सांगितला तर वाटसरू आपल्या इच्छित स्थळापर्यंत निश्चित पोहोचतो. प्रा. देवबा पाटील यांचे हे पुस्तक देखील तरुण मंडळींना वाटाड्या म्हणून काम करेल, यात शंकाच नाही. 
आपल्या पहिल्याच यौवनारंभ या प्रकरणात लेखकाने तारुण्यावस्था म्हणजे काय ? याचे योग्य वर्णन केले आहे. या वयात आई-वडिलांच्या भूमिका काय असायला पाहिजे हे सांगताना ते म्हणतात, केवळ आईवडिलांचे निर्मळ प्रेमच त्यांचा हा उत्साह नियंत्रित करू शकते. मुलांना सुधारण्यासाठी प्रेमाचा मार्ग हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाएवढा खरा व सार्वकालिक आहे. खरे प्रेम हे शहाणे असते व ते मुलांना नीट शिस्त लावते. घरात मुलांना प्रेमपूर्वक व मोकळे वातावरण मिळाले नाही तर ती मुले इतर मार्गावर वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
तरुण किंवा युवा कोणाला म्हणावे यांची खूप चांगली व्याख्या युवा सजगता या प्रकरणात वाचायला मिळते. सर्व प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्याची ज्याच्यात हिंमत असते ते युवा असे ते म्हणतात. या युवा काळात अनेक गोष्टीचे आकर्षण असते परंतु त्यावेळी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले ठेरवलेले ध्येय गाठण्यासाठी मनात जिद्द ठेवून अतोनात मेहनत करण्याचे गुण अंगी बाणले पाहिजे. तरुणपणात जो आळस करतो आयुष्यभर मग त्याला कष्ट सोसावे लागतात. या वयात मुला-मुलींना एकमेकांचे आकर्षण असते. म्हणून आपले पाऊल चुकीच्या दिशेने टाकू नये असा मोलाचा सल्ला ते देतात. 
आपले जीवन सुखी, समृद्ध आणि यशस्वी करायचे असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे. सदानकदा काहीतरी नवीन शिकले पाहिजे. शिक्षणाची गरज या प्रकरणात लेखक शिक्षणाविषयी खूप मौलिक विचार व्यक्त केले आहेत. ते म्हणतात, स्वतःचे निरीक्षण करणे, स्वतःचे आत्मपरिक्षण करणे आणि स्वतःमधील दोष शोधून, ते दूर करून स्वतःमध्ये स्वतः सुधारणा करणे व जीवन घडविणे हीच खरी शिक्षणाची क्रिया आहे. शिक्षण घेणे म्हणजे नोकरी मिळविणे हे नसून त्या शिक्षणाने आपल्या जीवनात बदल करणे होय. तरुणांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी अखंडित शिक्षण घेत राहिले पाहिजे. ज्याचे शिक्षण थांबला तो तिथेच संपला. 
लेखकाला तरुणांशी हितगुज करायला खूप आवडते. आजचे तरुण हे देशाचे उद्याचे भावी आधारस्तंभ आहेत. ते जर पोकळ, निरुउद्योगी आळशी आणि व्यसनी असेल तर देशाचा विकास कसा होईल ? तरुणाईशी हितगुज या प्रकरणात लेखक तरुणांना टाईमपास न करता आपला फावला वेळ पुस्तके वाचनात, आपला छंद जोपासण्यात घालावा. ज्यामुळे आपले मन अजून परिपक्व होण्यास मदत मिळते. 
ईश्वराने फक्त मानवाला बुद्धी दिली आहे. त्यामुळे माणूस आपल्या बुद्धीच्या बळावर विचार करू शकतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीनुसार प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि त्याची विचार करणारी बुद्धी देखील वेगळी असते. लेखकाच्या मते ज्याला आपल्या बुद्धीचा उपयोग करून घेणे हे सुयोग्य तऱ्हेने जमते तोच पुढे जातो. बुद्धिमता देई सुबत्ता या प्रकरणात लेखकाने बुद्धीचा विकास करण्यासाठी वाचन, चिंतन आणि मनन करणे आवश्यक असल्याचे सांगताना आहार आणि व्यायाम हे देखील महत्वाचे आहे असे सांगितले आहे. जर शरीर साथ देत नसेल तर बुद्धी देखील साथ देत नाही म्हणूनच योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य पुस्तकांचे वाचन करून आपल्या बुद्धीचा सर्वांगीण विकास करता येऊ शकते. 
माध्यमिक शाळेचा निकाल लागला की प्रत्येक तरुणाला कॉलेजचे स्वप्न पडत असते. कॉलेजच्या जीवनाचे प्रत्येक तरुणाला विशेष आकर्षण असते. महाविद्यालयीन जीवन या प्रकरणात कॉलेजमध्ये युवकांचे जडणघडण कशी होते ? याचे यथार्थ वर्णन केले आहे. नो कॉलेज नो नॉलेज असे फार पूर्वीपासून म्हटले जायचे. पण आजकाल मुलं कॉलेजमध्ये कमी आणि कोचिंग क्लासेसमध्ये जास्त वेळ दिसून येतात. त्यामुळे कॉलेज मधील अनेक घटनांच्या अनुभवापासून मुकत आहेत, हे ही सत्य आहे. 
जीवनाचा खरा आनंद लुटायचा असेल तर सोबतीला एक तरी मित्र असावा. मित्राशिवाय जीवन म्हणजे मिठाशिवाय भाजी जशी सपक आणि बेचव लागते अगदी तसेच आहे. मित्र/मैत्रीण कसे असावेत ? या प्रकरणात लेखकाने मित्राचे खूप छान वर्णन केले आहे. चांगले मित्र मिळणे ही खरी संपत्ती आहे. मित्रांमुळे जीवन सुधारू शकते तर त्यांच्यामुळे बिघडू ही शकते. आपली ओळख ही आपल्या मित्र परिवारावरून केली जाते. 9म्हणून मित्राची निवड करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. 
आजकालच्या मुलांमुलीत सैराट प्रेम वाढीस लागले आहे. म्हणून क्षणभंगुर प्रेमाच्या जाळ्यात न पडता या वयात अभ्यास करणे व यश मिळविणे आवश्यक आहे. त्याच कामावर फोकस करण्याचा मार्मिक सल्ला आभासी प्रेमाचे मृगजळ या प्रकरणात सविस्तरपणे मांडले आहे. 
एखादा व्यक्ती दिसायला खूप सुंदर दिसतो पण मनाने तो तितकाच सुंदर असेल असे ठामपणे सांगता येत नाही. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ? या ओळीनुसार कुणाच्याही वरवर दिसण्यावर न जाता त्याचे चारित्र्य, गुण पाहायला हवे. उत्तम चारित्र्य हाच जीवनाचा पाया आहे. आपल्याकडे किती पैसा, किती बंगले, किती संपत्ती आहे ? यापेक्षा आपले चारित्र्य किती चांगले आहे ?हे अत्यंत महत्वाचे आहे. लेखकाने याविषयी चारित्र्य हेच खरे सौदर्य या प्रकरणात उत्तमरीत्या केले आहे.
व्यक्तिमत्व विकास या लेखात लेखक म्हणतो, 
माणसाचा चेहरा हा त्याच्या मनाचा आरसा, व्यक्तिमत्वाचा निदर्शक असतो. आपले चालणे, बोलणे, आपली कार्यपध्दती, आपल्या सवयी यातून आपल्या व्यक्तिमत्वाचे लोकांना दर्शन होते. मनात जसे विचार असले त्याप्रमाणे आपला चेहरा बनतो, दिसतो. दुःखद विचारांनी चेहरा कोमेजतो, वाईट विचारांनी चेहरा आक्रसतो, दृष्ट विचारांनी चेहरा उग्र बनतो तर चांगल्या विचारांनी चेहरा आपोआप प्रफुल्लित होते. 
विचार प्रबळ जीवन सबळ या लेखात लेखक आपले विचार व्यक्त करताना म्हणतो की, 
जीवनात यशस्वी होण्यासाठी विचारआचार उच्च असायला पाहिजेत. ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो. विचार हे वाहत्या पाण्यासारखे असतात. पाण्यात जे मिसळले तसे पाणी बनते. सकारात्मक विचार जीवनाला उचित वळण देतात. सकारात्मक विचारांनीच आपण आपल्या जीवनाचा विकास करू शकतो. नकारात्मक विचार हे प्रत्येक कामातील अडथळा असतात आणि त्यांच्यामुळे अनेक कामे खोळंबतात.
प्रत्येक तरुण तरुणी आणि वैवाहिक जीवनात नुकतेच प्रवेश केलेल्या नावदाम्पत्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शक पुस्तक आहे. 

पुस्तक - परिचय 

नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परीक्षण - आपली सूर्यमाला ( Apli Suryamala )

जिज्ञासा मुलांसाठी विज्ञानकथा आपली सूर्यमाला
सकाळी सकाळी पूर्व दिशेला उगवणारा सूर्य आपल्या दिवसाची सुरुवात करतो आणि पश्चिमेला मावळल्यावर आपला दिवस संपतो. अगदी लहानपणापासून आपल्या मनात या सुर्याविषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सूर्य कसा उगवतो आणि मावळतो ? सूर्य मावळल्यावर कोठे जातो. जिज्ञासा जागृत करणारे असे प्रश्न लहान मुले मोठ्यांना नेहमीच विचारत असतात. कधी कधी त्या बालबोध मनाला समाधानकारक उत्तर मिळते तर कधी मिळत नाही. सूर्य आणि त्याचा परिवार याची खूप छान अशी माहिती लेखक प्रा. देवबा शिवाजी पाटील यांनी 'आपली सूर्यमाला' ह्या छोट्याशा पुस्तकातून केली आहे. लेखक सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांच्या नावे भरपूर साहित्य संपदा प्रकाशित आहेत. त्यात विज्ञान विषयी आभाळाचे गुपीत, नभ नवलाई, आकाशगंगा ही काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून त्या संग्रहास पुरस्कार देखील मिळाले आहेत. पाठ्यपुस्तक मंडळाने देखील त्यांच्या कवितेची दखल घेतली असून खार ही कविता अमराठी शाळेच्या दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. जेष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड संपादित बालकुमार कथा व कविता कोश यामध्ये देखील त्यांच्या कथा व कविताचा समावेश झाला आहे. आकाशवाणी जळगाव रेडिओ केंद्रावरून त्यांचे कवितावाचन प्रसारित झाले आहेत. 
सूर्याची निर्मिती कशी झाली ? ग्रह-उपग्रह, लघुग्रह कसे निर्माण झाले ? ग्रहांचे प्रकार किती आहेत ? ते सूर्याभोवती आपापल्या कक्षेतच कसे फिरतात ? ते गोलाकारच का दिसतात ? प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्ये, ते सूर्याच्या प्रचंड उष्णतेने जळत का नाहीत ? ते आकाशात केव्हा व कसे दिसतात ? ते तसेच का दिसतात ? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ? सूर्य कसा प्रकाशतो ? ग्रहांना स्वतःचा प्रकाश का नसतो ? तरीही शुक्र ग्रह चमकताना का दिसतो ? ग्रहांवर वातावरण का नाही ? आपल्या पृथ्वीवरच सजीव का निर्माण झाले ? ग्रहांवरही ग्रहणे होतात का ? तारा कसा तुटतो ? उल्का कशा बनतात ? धूमकेतू कसे तयार होतात ? शेवटी आपल्या सूर्यमालेचा शेवट कसा होणार ? अशा अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नांविषयीची वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केलेली माहिती आकलनसुलभ भाषेत वर्णिली आहे. लहान मुलांच्या वयानुसार व त्यांच्या आकलनक्षमता लक्षात घेऊन सूर्यमालेविषयी वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत लिहिली आहे. रंगीत आकर्षक चित्रांमुळे ही माहिती अजून वाचनीय ठरते. शालेय जीवनात मुलांना विज्ञान हा विषय नकोसा वाटतो. त्यामुळे विज्ञाना पासून अनेक मुले दूर पळतात. पण तेच विज्ञान विषय शिकविताना कथा व कवितेच्या माध्यमातून सांगितले गेले तर विद्यार्थ्यांना समजायला सोपे होईल आणि मुलांमध्ये अभिरुची निर्माण होईल असा लेखकाला विश्वास वाटतो. विज्ञानाच्या क्लीष्ट भाषेच्या गुंतवळ्यात न अडकता साध्या, सरळ, रंजक, आणि सोप्या भाषेत संपूर्ण माहिती तुमच्याप्रमाणेच, हुशार व जिज्ञासू मुलामुलींनी वर्गामध्ये त्यांच्या सरांना विचारलेल्या विविध प्रश्नांतून व सरांनी त्यांना दिलेल्या समर्पक उत्तरांमधून प्रवाही, रंजक व संवादी भाषेत मांडली आहे. भाषा साधी व सरळ असल्याने ही वैज्ञानिक माहिती समजण्यास एकदम सुलभ आहे. असे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे हे विज्ञानदायक छोटेसे पुस्तक जिज्ञासू मुलामुलींसाठी खूप खूप उपयोगी तर आहेच पण सुजाण व अभ्यासू शिक्षकांसाठी देखील ते अत्यंत उपयोगी आहे. प्रत्येकांनी संग्रही ठेवावे असे हे सुंदर व उपयुक्त असे पुस्तक आहे. पुढील लेखनासाठी हार्दीक शुभेच्छा ....! तसेच सर्व वाचकांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .......!

पुस्तकाचे नाव :- आपली सूर्यमाला
लेखकाचे नाव :- प्रा. देवबा शिवाजी पाटील, 9420795307
प्रकाशक :- दिलीपराज प्रकाशन, पुणे
एकूण पृष्ठ :- 56
किंमत :- 170 ₹

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...