Tuesday, 11 March 2025

जीवन गाणे (Jeevan Gaane )

जीवन गाणे - आनंदी तराणे
चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ...... त्या गुणगुण्याचा आवाज कानी पडताच बाळ अलगद आपले डोळे मिटतो आणि झोपी जातो. थोडं मोठा झाल्यावर जेव्हा तो चालू आणि पळू लागतो त्यावेळी त्याला बडबड गाणे एकविले जाते आणि बोबड्या बोलीतून बोलाविले जाते. तो आपल्या बोबड्या बोलीत जेव्हा एखादे गाणे म्हणतो तेव्हा आई-वडिलांना किती आनंद होतो. अर्थात गाणे सुरात म्हटले पाहिजे असा आपला अट्टाहास कधीच नसतो आणि तो नसायला ही नको हवे. त्यानंतर मूल ज्यावेळी शाळेत प्रवेश करतो त्यावेळी त्याला अनेक कविता व गाण्याची ओळख होत जाते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात त्या मुलांचा आवडता भाग म्हणजे गाणे. जे शिक्षक या वर्गातील मुलांना जास्तीत जास्त गाणे ऐकू घालतात ते त्या मुलांचे सर्वात प्रिय बाई किंवा गुरुजी म्हणून ओळखल्या जातात. गाण्यात काय ताकद आहे ? हे त्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना चांगलेच ठाऊक असायला हवे. शाळेच्या प्राथमिक वर्गात मुले जे काही काही शिकतात ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहतात, त्यात गाण्याची खूप मोठी भूमिका असते. आज पन्नाशी ओलांडलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बालपणाविषयी विचारले तर ती व्यक्ती बालपणीची स्मरणात असलेली एखादी कविता गाऊन दाखवितो. यावरून गाण्याची ताकद आपणाला समजून येईल.
माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे गाण्याची आवड देखील बदलत जाते. पूर्वीच्या काळी गाणे ऐकण्यासाठी रेडिओ हे एकच माध्यम होते. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे गाणी ऐकण्यासाठी कान आसुसलेले असायचे. बऱ्याच आकाशवाणी केंद्रावरून त्याकाळी पत्रव्यवहारावर आधारित आपली आवड किंवा आपकी पसंद अश्या कार्यक्रमात तून गाणी ऐकविले जात असे. आपले आवडते गीत ऐकावे म्हणून बरेच रसिक मंडळी पत्राद्वारे आपल्या आवडीचे गाणे लिहून पाठवत असत यासाठी आजही सिलोन व विविधभारती या आकाशवाणी केंद्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरीच्या काळात टेपरेकॉर्डर आल्याने आपल्या मनावर गाणे ऐकण्याची सोय झाली. कॅसेटच्या माध्यमातून अनेकजण आपल्या आवडीचे गाणे ऐकू लागले. गुलशन कुमार यांची टी सिरीज नावाची कंपनी याच काळात भरभराटीस आली होती. अश्याच काळात फक्त गाण्याचा शो म्हणून ऑर्केस्ट्रा खूप चालला होता. अनेक कलाकारांना यामुळे स्टेज शो करण्याची संधी ही मिळाली होती. अनेक जणांनी यातून आपले करिअर देखील घडविले. पण गाण्याच्या या स्टेज शोला देखील गळती लागली. त्यानंतर टीव्हीचा जमाना सुरू झाल्यावर लोकांना गाणे ऐकण्यासोबत बघण्याची संधी उपलब्ध झाली. ज्यावेळी दूरदर्शन ही एकच वाहिनी देशभरात बघितले जायचे त्यावेळी येथे प्रसारित होणारी हिंदी सुमधुर गाण्याची रंगोली कोणी ही विसरू शकत नाही. ह्या कार्यक्रमाने प्रत्येकाच्या रविवारची सकाळ प्रसन्नतेने सुरुवात व्हायची. एका तासाभराच्या कार्यक्रमात एखादे गाणे दिवसभर मनात रुंजी घालायचं. याच टीव्हीमुळे टेपरेकॉर्डर मागे पडून व्हीसीआर पुढे आलं. त्यातून रसिक मंडळी आपले आवडते गाणे वाट्टेल तेव्हा टीव्हीवर पाहू लागले. मग डीव्हीडीचा जन्म झाला. मग श्रोते खूप गाणे एका डीव्हीडी मध्ये पाहू लागले. असे करता करता मोबाईलची क्रांती झाली आणि रेडिओ, टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, डीव्हीडी हे सर्व एका अडगळीत कोपऱ्यात जाऊन बसले. आज एका क्लीकवर आपणाला आवडणारी गाणी ऐकू शकतो आणि पाहू शकतो. त्याला ना वेळेचे बंधन आहे ना काळाचे. पण अर्थातच जुन्या काळात ठराविक वेळेत मिळणारी मजा या मोबाईलच्या जमान्यात नक्कीच नाही. 
तरी देखील गाणे हे मनाला आनंद व समाधान देणारी एक बाब आहे. म्हणून प्रत्येकाने आपले आवडते गाणे ऐकायला व पाहायलाच पाहिजे. अजून त्यापुढील संतोष मिळविणारी बाब म्हणजे आपला आवाज कसे ही का असेना ते गुणगुण करायला पाहिजे. जसे की एक मराठी गीत आहे, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सखे गं साजनी ये ना. तसे आपण ही गाण्याच्या धुंदीत लहरीत जगायला शिकले पाहिजे. मनावरील ताणतणाव, चिंता, काळजी आणि नैराश्य दूर करण्यासाठी आपल्या मनपसंत गायक गायिका यांच्या आवाजातील सुमधुर आणि कर्णमधुर गाणे ऐकायला पाहिजे. घरात निवांत क्षणी अगदी बारीक आवाजात किशोरदा, रफी साहेब आणि लता दीदी यांचे गाणे घरातील वातावरण अजून प्रसन्न केल्यासारखे वाटते. मित्रांनो, आपल्या जीवनात समाधान मिळविण्यासाठी गाणे ऐकणे हा एक सुंदर पर्याय तुम्हांला कसा वाटतो ? यावर एकवेळ जरूर विचार करावा. 

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

Friday, 28 February 2025

वसंतदादा पाटील ( Vasantdada Patil )

*वसंतराव बंडूजी पाटील*

(१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) 


महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या. म्हणून त्यांना सहकार महर्षी या नावाने ही ओळखले जाते.

वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिका येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबंधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारणातून संन्यास घेतला.

महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).

श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.

( सौजन्य - इंटरनेट )

*संकलन : नासा येवतीकर*

Tuesday, 4 February 2025

डॉ. निला सत्यनारायण ( Nila Satyanarayan )

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त - डॉ. निला सत्यनारायण
डॉ. नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला आणि वडिलांचे नाव वासुदेव आबाजी मांडके होते. ते पोलीस विभागात होते. या भारतीय लेखक, कवयित्री आणि प्रशासकीय अधिकारी होत्या. त्यांनी १९७२ च्या बॅचमध्ये भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्य केले. 
शिक्षण आणि कारकीर्द : नीला सत्यनारायण यांचे शिक्षण मुंबई, पुणे आणि नाशिक येथे झाले. १९६५ साली दिल्ली स्कूल बोर्डातून संस्कृत विषयात प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर इंग्रजी वाङ्मय विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९७२ मध्ये त्यांनी IAS परीक्षा उत्तीर्ण केली. नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत झोपडपट्टीतील लोकांना निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले. 

लेखन आणि सांस्कृतिक योगदान : नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील 'एक पूर्ण अपूर्ण' हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. 'सत्यकथा' हे उद्योजकतेबाबतचे पुस्तक आणि 'एक दिवस (जी)वनातला' हे वन विभागातील अनुभवांवर आधारित पुस्तकही प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या आणि काही मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले. त्यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला, ज्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले. 

पुरस्कार : नीला सत्यनारायण यांना त्यांच्या लेखनासाठी आणि सांस्कृतिक योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात केंद्र शासनाचा अहिंदी भाषी लेखक पुरस्कार, 'इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री'चे इंग्रजी कवितेसाठीचे एडिटर्स ॲवॉर्ड आणि राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार यांचा समावेश आहे. 

निधन : १६ जुलै २०२० रोजी करोनाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. 

नीला सत्यनारायण यांची आज जयंती त्या निमित्ताने विनम्र अभिवादन .....!

( वरील माहिती इंटरनेटवरून संकलित केली आहे. )

Friday, 24 January 2025

प्रजासत्ताक दिन ( Republic Day )

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा

Thursday, 9 January 2025

विश्व हिंदी दिवस ( World Hindi Day )

विश्व हिंदी दिवस दरवर्षी १० जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरात हिंदी भाषेचे प्रचार आणि प्रसाराला चालना देणे तसेच जागतिक स्तरावर हिंदीचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.
इतिहास:
हिंदी ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी भाषा जगभरात अनेक ठिकाणी शिकली आणि बोलली जाते. पहिल्या क्रमांकावर इंग्रजी भाषा, दुसऱ्या क्रमांकावर मंदारिन आणि तिसऱ्या क्रमांकावर स्पॅनिश भाषा आहे. जगात हिंदीचा विकास व्हावा आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून तिचा प्रचार व्हावा या उद्देशाने जागतिक हिंदी परिषदा सुरू झाल्या. १० जानेवारी १९७५ रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद झाली.
पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे(World Hindi Diwas 2022) उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. संमेलनाशी संबंधित राष्ट्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष बी.डी.जट्टी होते. मॉरिशसच्या भूमीवर दुसऱ्या जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. १९८३ साली भारताची राजधानी दिल्ली येथे तिसरी जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती.
या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी हा दिवस "विश्व हिंदी दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. 
उद्देश:
1. हिंदी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय बनवणे.
2. परदेशातील भारतीय समुदायामध्ये हिंदी भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवणे.
3. हिंदी भाषेचा विविध क्षेत्रांमध्ये (शिक्षण, साहित्य, माध्यम) वापर वाढवणे.
साजरा करण्याचे स्वरूप:
परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावासे आणि वाणिज्य दूतावासांद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
हिंदी साहित्य, भाषण स्पर्धा, कविता वाचन, चर्चासत्रे आयोजित करणे.
परदेशातील भारतीय विद्यार्थी आणि हिंदीप्रेमींना भाषेच्या महत्त्वाबद्दल माहिती देणे.
जागतिक पातळीवर हिंदीची ओळख निर्माण करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर.
हिंदीचे जागतिक महत्त्व:
हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे.
हिंदीचे साहित्य, चित्रपट (बॉलीवूड), आणि संगीत यामुळे तिचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढले आहे.
हिंदी दिवस आणि विश्व हिंदी दिवसातील फरक:
हिंदी दिवस हा भारतात १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
विश्व हिंदी दिवस हा १० जानेवारी रोजी जागतिक स्तरावर हिंदीच्या प्रचारासाठी साजरा केला जातो.

विश्व हिंदी दिवस हा हिंदी भाषेचा जागतिक प्रचार-प्रसार करणारा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो भारतीय भाषा आणि संस्कृतीला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देतो.

संकलन - नासा येवतीकर

Monday, 30 December 2024

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 )

मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता जाता त्यांच्या संस्कृतीमधील काही गोष्टी भारतात सोडून गेले. एक जानेवारीचा नवीन वर्षाचा कार्यक्रम हा पाश्चिमात्य पद्धतीचा असल्यामुळे बहुतांश जण यास विरोध दर्शवितात, ते खरेही आहे. कारण भारतातील हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष चैत्र प्रतिपदेला प्रारंभ होतो. त्यास आपण गुढीपाडवा असे म्हणतो. हा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. कारण याच दिवसापासून ते आपल्या शेतातील जमा-खर्चाचा हिशोब मांडतात. व्यापारी मंडळी आश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करून त्यानंतर येणाऱ्या बलिप्रतिपदेला आपल्या नवीन व्यवहाराला सुरुवात करतात. दिवाळीच्या पाडव्याला व्यापारी नववर्ष मानतात. शासन किंवा सरकारी कार्यालयात आर्थिक लेखाजोखा व्यवस्थित राहण्यासाठी एक एप्रिल हा दिवस त्यांच्यासाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात असते. बालगोपाळांची शाळा जून महिन्यात प्रारंभ होतो. या महिन्यात नव्या वर्गात, नव्या मित्रांसोबत आणि नव्या करकरीत पुस्तकांच्या भेटीसाठी उत्सुक असतो. त्यास्तव आपल्यासाठी जून महिना हा नववर्षाचा भासतो. असो, आपण सुद्धा या सर्वांसोबत नवीन वर्ष साजरा करीत असतो. नवीन वर्ष साजरा करताना केशव नाईक यांचे सुवचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणजे, जीवन हा एक घडविला जात असलेला सोन्याचा दागिना आहे. तो जितका काळजीपूर्वक घडविला जाईल तितका अधिक शोभेल. तेव्हा आपणा सर्वांचे जीवन सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे सुंदर घडत जावो, परमेश्वर चांगली विचार करणारी बुद्धी आणि उत्तम पाहण्याची दृष्टी प्रदान करो हिच या नववर्षानिमित्त शुभेच्छा.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~

खालील लेख देखील जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया whatsapp द्वारे द्यायला विसरू नका.

हर कॅलेंडर कुछ कहता है ।


 31 डिसेंबर संपला की घरातील भिंतीवर असलेले  कॅलेंडर बदलले जाते आणि त्याठिकाणी नव्या वर्षाची जानेवारी महिन्याची कॅलेंडर लटकविली जाते. पाहता पाहता एक वर्ष संपून जाते. गेल्या एका वर्षात काय काय घडले ? याचा आढावा थोडक्यात घ्यायला बसलोत तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून सरकतात. काही बाबी तीव्रतेने आठवतात तर काही बाबी आठवण करण्यासाठी डोक्याला ताण द्यावा लागतो. वर्ष संपले की आपण कॅलेंडर फेकून देतो. पण जर हेच कॅलेंडर आपणास विविध प्रकारचे काम करू शकते. त्यानुसार त्याचा वापर करायला हवे. कॅलेंडरवर लिहिण्यासाठी थोडी फार तरी जागा राहते. तेंव्हा त्या ठिकाणी आपण जानेवारी महिन्यात किंवा एखाद्या महिन्यात काही विशेष घटना घडली असेल तर त्यावर नमूद करून ठेवावे. अगदी सहजपणे ते डोळ्याला दिसत राहते. अश्या नोंदी आपल्या कॅलेंडर वर केल्यास वर्ष संपल्यावर ते फेकावे वाटत नाही तेंव्हा त्याच्या बाजूला नवीन वर्षाचे कॅलेंडर ठेवावे म्हणजे दोन्ही कॅलेंडरवर लक्ष जाते आणि गेल्यावर्षी या तारखेला काय घडले याची भूतकाळातील आठवण होते. त्यानिमित्ताने परत एकदा साऱ्या बाबी आठवणीमध्ये येतात. अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणीचे वाढदिवस या कॅलेंडरवर नोंदी करून ठेवल्यास त्या त्या तारखेला आठवण करून शुभेच्छा देता येतील. कधी कधी वाढदिवसाची आगाऊ तारीख लक्षात राहिल्याने नियोजन देखील करता येईल. विम्याचा हप्ता किंवा आर डी चा हप्ता भरण्याची तारीख नोंद करून घेतल्यास आपण विसरणार नाही. आज काल लेट फी मध्ये खूप मोठी रक्कम भरावी लागते. कॅलेंडरवर नोंद करून ठेवल्यास लेट फी टाळता येऊ शकेल. काही महत्वाचे फोन क्रमांक या कॅलेंडरवर लिहिले तर शोधण्याची गरज राहत नाही. घरात रोज मिळणाऱ्या वरव्याच्या दुधाचे किती पैसे झाले याची माहिती या कॅलेंडरवरूनच मिळते, हे तर आपल्या घरातील गृहिणीमुळे आपणा सर्वाना ज्ञात आहेच. 1990 च्या दशकात क्रिकेटच्या विश्वकपचे घराघरात वारे वाहत होते. त्यावेळी क्रिकेट सामन्याचे वेळापत्रक कॅलेंडरवर लिहिलेले बऱ्याच जाणाला आज ही आठवत असेल.  कॅलेंडरचे असे विविध उपयोग आपणास घेता येऊ शकते. शालेय मुलांनी देखील आपल्या अभ्यासाचे नियोजन व परीक्षेचे वेळापत्रक लिहून ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. बाजारात अनेक प्रकारचे कॅलेंडर विकत मिळतात. आजकाल विविध प्रकारच्या कंपन्या आणि बँकेकडून देखील कॅलेंडरअगदी मोफत वितरित केल्या जाते. काही समाजातील मंडळी आपापल्या समाजाची कॅलेंडर काढून वाटप करतात. जेवढं काही वृत्तपत्र किंवा साप्ताहिक आहेत ते देखील आपले कॅलेंडर काढतात आणि वाचकापर्यंत पोहोचकरतात. घरात असे तीन-चार प्रकारचे कॅलेंडर जमा झाले तरी घरातील गृहिणीचे मन कालनिर्णय घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तिची इच्छा असते की, " भिंतीवरी कालनिर्णय असावे. " बरेचजण डायरी वापरत नाहीत पण घरातील कॅलेंडरचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक घरातील कॅलेंडर काही ना काही सांगत असते, असे सांगावेसे वाटते. हर कॅलेंडर कुछ कहता है । चला पुन्हा भेटू या काही नव्या विचारासह. 

आपणा सर्वाना नवीन वर्षाच्या मनस्वी शुभेच्छा .....!


- नासा येवतीकर, स्तंभलेखक

मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

9423625769

Tuesday, 19 November 2024

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
जनजागृती

चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. 

कन्या शाळा धर्माबाद येथील मतदान केंद्रावर काढलेली रांगोळी
मी पोस्टल मतदान केलोय
दैनिक गाववाला मध्ये प्रकाशित कविता
मतदान माझा अधिकार, लोकशाहीचा आधार
धन्यवाद ......!

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...