Monday, 19 June 2023

ललाटरेषा ( Lalatresha )

            कथा - ललाटरेषा


( निवेदन :- या कथेतील पात्र आणि घटना सर्व काल्पनिक आहेत. यातील काही घटनेचा आपल्या जीवनाशी संबंध येत असेल तर तो निव्वळ योगायोग समजण्यात यावे. )

या कथेतील मुख्य पात्र, त्याचं नाव सुशांत, तो एका खाजगी कंपनीत काम करतो आणि चांगला पगार देखील मिळवितो. दुसरे पात्र म्हणजे त्याची पत्नी तिचे नाव सुमती असून ती चांगली गृहिणी, चांगल्या स्वभावाची पण जरा आळशी आहे. दोघांचा स्वभाव मात्र एकसारखा आहे तो म्हणजे माझे तेच खरे आहे. नशिबात जे काही घडणार आहे ते घडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी काही गोष्टी निमित्तमात्र असतात. म्हणूनच कोणाच्या नशिबात काय लिहिलं आहे ? कोणाची ललाटरेषा कशी आहे ? हे कोणी ओळखू शकतो किंवा सांगू शकतो का ? नाही ना ! प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे आहे. यावर आधारित ही कथानक आहे, मला आशा आहे ही कथा आपणांस हे नक्की आवडेल. तेव्हा चला वाचू या .....!

पहिला भाग 

तालुक्यापासून बरेच दूर अंतरावर असलेल्या एका छोट्याश्या गरीब कुटुंबात सुशांतचा जन्म झाला. तसे ते कुटुंबात सर्वात शेवटचे पुत्र रत्न, त्यांना दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. म्हणजे छोट्याशा घरात आई-वडील आणि पाच भावंडे असे एकूण सात जण राहत होते. काम करणारे हात एक आणि खाणारी तोंडे मात्र सहा यामुळे सुशांतच्या वडिलांची घर चालविताना ससेहोलपट व्हायची.
त्यांचे राहते घर म्हणजे काय ते घर होते काय ? ती एक झोपडीच होती. पावसाळ्यात तर पावसाचे पूर्ण पाणी त्या झोपडीत यायचे, हिवाळ्यात हवेतील गारवा झोपडीत शिरायचं आणि उन्हाळ्यात तर सारेच मंडळी झोपडीच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आपले बस्तान मांडलेले असायचे. पाऊस, थंडी, वारा आणि ऊन याची त्यांना सवय झाली होती. सहन केल्याशिवाय पर्याय देखील नव्हता. सुशांतचे आई-वडील दोघेही दिवसभर शेतात काम करायचे. त्यांच्याकडे स्वतःची फार कमी शेती होती, त्यामुळे ते दोघे इतरांच्या शेतात मजुरी करायचे. मिळालेल्या पैशात आपले घर चालवित असत. घरच्या गरिबीमुळे दोन भाऊ व दोन बहिणींनी गावातल्या शाळेत शिक्षण घेऊन थांबले आणि आई-वडिलांच्या कामात मदत करू लागले. कमावणारे हात वाढले म्हणून घरात थोडी फार लक्ष्मी येऊ लागली होती. काही वर्षानंतर त्यांनी झोपडीच्या जागी दोन खोल्याचे बांधकाम केले. थोडीफार शेती देखील खरेदी केले. गरिबीचे दिवस जाऊन जरा चांगले दिवस त्यांच्या जीवनात येऊ लागले होते. सुशांत त्यावेळी प्राथमिक वर्गात शिक्षण घेत होता. कमीतकमी सुशांत तरी शिकून मोठा व्हावा म्हणून घरातील सर्व मंडळी दिवसरात्र मेहनत करीत होती. जास्तीत जास्त पैसा कमावून आपली प्रगती करत होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग दुसरा

सुशांतची मोठी बहीण उपवर झाली होती. त्यामुळे तिच्यासाठी वर संशोधन करण्याचे काम चालू झाले होते. एकदा तिचे लग्न जमले तर सुशांतच्या मोठ्या भावाचे देखील सोयरीक जुळवून दोघांचे लग्न एकाच मंडपात करावे असा विचार त्याचे आई-वडील करत होते. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन स्थळ बघितली पण कोणाचीही सोयरीक जुळत नव्हती, त्यामुळे जरा परेशान झाले होते. चिंताग्रस्त दिसत होते. शेतकरी बापाची ही पोरं, घर ही जेमतेम त्यामुळे कोणीही येऊन नाक मुरडून जायचं. सुशांतच्या मामाला दोन मुली होत्या त्यातील एका मुलींसाठी त्यांनी मागणी घातली होती पण ते विचार करून सांगतो असे कळवून चार-सहा महिन्यांचा काळ उलटला तरी त्यांचे उत्तर काही मिळत नव्हते. गावातीलच एका गृहस्थाने सुशांतच्या बहिणीसाठी एक स्थळ सुचवलं. ते गावातच होतं. पण यांच्या घरापेक्षा गरीब होतं म्हणून ते स्थळ नाकारत होते. मात्र त्याला इलाज नव्हता म्हटल्याप्रमाणे शेवटी सुशांतच्या आई-वडिलांनी त्या स्थळाला होकार दिला. त्याच गृहस्थाच्या मध्यस्थीने मावळ्यांच्या घरी देखील भावाची सोयरीक जुळली.
दोघा बहीण-भावाचे लग्न एकाच मंडपात करून एक मुलगी सासरी गेली तर दुसरी सून म्हणून घरात आली. आपल्या भावाची मुलगी म्हणून सुशांतच्या आईने तिला आपली लेक समजत होती. मात्र दोन-चार महिन्यात तिने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. नवऱ्याला गोडी गुलाबी ने बोलून वेगळं राहण्याचं सोंग करू लागली. आपण दिवसरात्र मेहनत करायची आणि यांचं घर चालवायचं हे चालणार नाही. असे म्हणून ती घरात त्रागा करू लागली. शेवटी मुलगा आणि सून तरी आनंदात राहावं म्हणून त्या दोन खोलीपैकी एक खोली त्यांना देऊन एका खोलीत आता ते पाच जण राहू लागले. दोन वेगळे चूल मांडले गेले. एकीकडे खाण्याचे वांदे होऊ लागले तर एकीकडे गोड धोड, चंगळमंगळ खाल्ले जाऊ लागले. सुशांत त्यावेळी माध्यमिक शिक्षण घेत होता. सुट्टीच्या दिवशी तो देखील कामाला जाऊन कुटुंबाच्या खर्चाला हातभार देऊ लागला. घरातले पाच ही जण काम करू लागले आणि घरात लक्ष्मी यायला वेळ लागला नाही.
सुशांत माध्यमिक परीक्षेसाठी तयारी करू लागला होता. महत्वाचे वर्ष असल्याने तो कुठेही कामावर न जाता शाळा-अभ्यास करू लागला. दहावीच्या परीक्षेत तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षण घेण्यासाठी घरातून विरोध होत होता मात्र धाकटी बहीण त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होती. अकरावी बारावी शिकून पुढे काय करावं ? हा प्रश्नच होता. ते नाही तर काय शिकावं ? घरातले सर्वजण तर अडाणी होते, त्यांना काही कळत नव्हते. कोणतं शिकावं ? काय करावं ? हे काही सुशांतला सुचत नव्हतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग तिसरा

दहावीच्या नंतर सुशांतला पुढं शिकायचं होतं मात्र त्यासाठी जो पैसा लागतो तो मात्र जवळ नव्हता. त्याच्या शाळेतील शिक्षकाने त्याला आयटीआय शिकण्यास सांगितले, त्याचे फायदे देखील सांगितले त्यानुसार तो आयटीआय शिकण्याच्या मनस्थितीत होता. त्याचवेळी त्याच्या घरात धाकट्या भावाच्या लग्नाची चर्चा देखील चालू होती. धाकटा भाऊ शेताची कामे सोडून जवळच्या शहरात किराणा दुकानात काम करत होता. त्यामुळे त्याची सोयरीक जुळविताना काही तेवढा त्रास जाणवला नाही. झट मंगणी पट ब्याह या उक्तीनुसार एका महिन्यात सोयरीक जुळली आणि लग्न देखील पार पडले. छोट्याशा घरात माणसाची गर्दी वाढली होती. धाकट्या भावाला आणि त्याच्या बायकोला त्या घरात राहणे जरा अवघडल्यासारखे होऊ लागले त्यामुळे सुशांतच्या वडिलांनी त्याला त्याच शहरात एक खोली घेऊन राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळी सुशांतला एक संधीची लकेर दिसून आली. मी पण दादा सोबत शहरात राहायला जातो आणि आयटीआय चे शिक्षण घेतो म्हणून तो हट्ट करू लागला. त्याच्या हट्टापायी आई-वडिलांने त्याला होकार दिला.
पावसाळा सुरू झाला, शेतीची कामे सुरू झाली आणि धाकटा भाऊ, त्याची पत्नी आणि सुशांत राहायला गेले. गावात इकडे आता तिघेच जण राहू लागले. आई-वडील शेतात काम करायला जाऊ लागले आणि धाकटी बहीण स्वयंपाक करू लागली. सुशांतला आयटीआय मध्ये सहज प्रवेश मिळाला. त्याचे कॉलेज घरापासून जरा दूर होते त्यामुळे तो एकदा सकाळी गेला की सायंकाळी घरी परत यायचा. सुरवातीचे काही दिवस त्याची चांगली सोय झाली मात्र हळूहळू त्याची त्या घरात गैरसोय होऊ लागली. धाकट्या भावाच्या बायकोला सुशांत अडचणीचा वाटू लागला. म्हणून त्याला ती मनासारखे जेवायला देत नव्हती आणि छोट्या मोठ्या गोष्टीवर त्याला खिसखीस करू लागली. धाकट्या भावाला दुसरे कारण सांगून सुशांतला बदनाम करू लागली. काही दिवसांतच सुशांत ते घर सोडून बाहेर पडला. त्यादिवशी खूप वाद झाला होता. म्हणून सुशांतने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तो गावी परत गेला. घरी गेल्यावर शहरात झालेली सर्व कहाणी सांगितली. त्याने एक जुनी सायकल विकत घेतली आणि घरून तो कॉलेजला जाऊ-येऊ लागला. शिकून भविष्यात आपण काहीतरी चांगली नोकरी करावी या हेतूने तो जिद्दीने शिकत होता. खूप कठीण आणि अवघड परिस्थितीत दोन वर्षात त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. या दोन वर्षात शहरात स्थायिक झालेल्या धाकट्या भावाने घराकडे एक रुपया देखील दिला नाही उलट गावकडूनच लागणारं रेशन घेऊन जात होता. त्यामुळे तर सुशांतला अजून राग यायचा पण नाईलाज होता. धाकट्या भावाच्या बायकोला आयतं कोलीत सापडलं होतं, घर सोडून शहरात राहण्याचा. त्याचा जास्तीत जास्त पैसा तुच्या राहण्या-सहाण्यावर खर्च होत होता. सुशांतला असे समजले होते की त्याला जुआ खेळण्याचा देखील नाद लागला होता. नोकरीमधून मिळालेले अर्ध्याहून जास्त पैश्याचा तो जुआ खेळत असे. कधी कधी जिंकत होता मात्र जास्तीत जास्त वेळा तर तो हारतच होता. काही दिवसांत त्याच्या घराचे दिवाळे निघाले आणि तो कर्जबाजारी झाला. माझं मला वाटणी करून द्या म्हणून त्याने अनेकवेळा सुशांतच्या वडिलांना भांडण केला होता. पण सुशांतचे वडील म्हणायचे,  जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणालाही काही देणार नाही. अजून दोघांचे लग्न करणे बाकी आहे. तेव्हा तुमचे तुम्ही कसेही जगा. माझ्याकडे हात पसरू नका. आयटीआय केल्यामुळे एक-दोन महिन्यात त्याला मोठ्या शहरात नोकरी चालून आली. चार आकडी पगार होता आणि राहायला त्याच्याच कंपनीत सोय होती. लागलीच त्याने ती कंपनी जॉईन केली. त्यावेळी धाकट्या बहिणीला व आई-वडिलांना खूप आनंद झाला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग चौथा


सुशांत कंपनीच्या परिसरात राहू लागला. कंपनीकडून एक वेळचे नाष्टा, चहा, जेवण मिळत होते. सायंकाळी फक्त त्याला स्वतःला जेवण तयार करून घ्यावे लागायचे. काही दिवसात तो त्याठिकाणी चांगला रमला आणि काम देखील मन लावून करू लागला. इकडे गावात मोठ्या भावाच्या घरी पैश्याची चणचण भासू लागली. त्याला दोन लेकरं होती, त्याच्या शाळेचा आणि घराचा खर्च सोबत दवाखाना देखील लागला होता. मोठ्या भावाला बिडी पिण्याची खूपच सवय होती. एके दिवशी रात्री तो खूप खोकलत होता. खोकल्याची त्याला उमळ आली होती. शेजारच्या आई-वडिलांना त्याच्या खोकलण्याचा आवाज कानावर गेला. म्हणून त्याच रात्री ते त्याच्या घरात गेले. खोकलून खोकलून पार तो थकून गेला होता, त्याला धड बोलता ही येत नव्हते. त्याच्याशी जरा वेळ बोलून ते परत आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला घेऊन त्यांनी सरकारी दवाखान्यात गेले. तेथे सर्व बाबीची तपासणी केल्यावर कळाले की, त्याला टीबी झालंय. डॉक्टरांनी त्याची काळजी घेण्यास सांगितले आणि बिडी न पिण्याचे देखील सांगितले. बिडी सोडली तर काही काळ जगू शकतो आणि बिडी न सोडल्यास लवकरच तो आपल्या सर्वाना सोडून जाऊ शकतो. डॉक्टरांचे बोलणे ऐकून घेऊन आणि गोळ्या-औषध घेऊन ते घरी परत आले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर दिसत होती. कोणाला काही सुचत नव्हते. मुलाला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगावं असे त्याचे वय नव्हते तरी आई त्याला म्हणाली, बापू बिडी पिनं सोडून दे, चार दिस आमच्या सोबत लेकरा सोबत राहशील. सर्वजण आपापल्या कामाला निघून गेली. तो गावातील एका सवकाराकडे सालगडी म्हणून काम करायचा. त्या सावकाराला बिडी पिण्याची सवय होती. बिडीचा कट्टा आणून देण्याचे काम तो करत होता. एके दिवशी सहजच तो सावकार सोबत बिडीचा झुरका मारून बघितला. त्याला एकदम ठसका लागला, पण कसं तरी वेगळंच वाटलं. त्यानंतर तो रोज बिडीचे झुरके मारू लागला आणि त्याला बिडी पिण्याची सवय लागली. याच विचारात तो घरात एकटाच घराच्या छताकडे शून्य नजरेने पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या संसाराचे विस्कटलेले चित्र उभे होते. माझ्या माघारी माझ्या लेकराचे काय होणार ? त्यांचे शिक्षण कसे पूर्ण होणार ? माझी बायको घर काशी चालवेल ? मी तर एक रुपया देखील बाजूला ठेवला नाही, माझे आई-बाबा त्यांना जवळ घेतील का ? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. आजाराची आणि कुटुंबाची चिंता यामुळे दिवसेंदिवस तो अजून कमकुवत होत होता. त्याची पत्नी मिळेल ते काम करून कसेबसे आपले घर चालवित होते. अखेर तो काळा दिवस उगवला, त्यादिवशी तो रोजच्या प्रमाणे रात्रभर खोकलत राहिला. मध्यरात्र उलटली होती,  त्यावेळी त्याला जरा डोळा लागला. इतर मंडळी ही झोपी गेले. सकाळ झाली मात्र तो काही हालचाल करत नव्हता. रात्रीच्या गाढ झोपेत तो शांत झाला होता. त्याच्या पत्नीने एकच हंबरडा फोडला. घरात दुःखांचे वातावरण होते. सुशांतला बातमी कळल्याबरोबर तो कंपनीत सुट्टी टाकून घरी परत आला. धाकट्या भावाला देखील ही बातमी कळाली पण तो कुठेतरी जुआ खेळण्यात व्यस्त होता. त्याला गावाकडे येण्यासाठी आणि मेलेल्या भावाचे शेवटचे मुख दर्शन घ्यावे असे देखील वाटले नाही. पूर्ण गाव त्याच्या अश्या वागण्याला आश्चर्य व्यक्त करत होते. निदान त्याची बायको तरी यायला हवी होती पण ती देखील अंत्यविधीसाठी आली नाही. आपल्या लेकराच्या अंत्यविधीला बापाला खांदा द्यावं लागतं आहे म्हणून बापाला खूप दुःख वाटू लागले. पण वेळच तशी आली होती. दोन लेकरं आणि बायको अनाथ झाली होती. सुनबाई ही सुशांतच्या आईच्या भावाची मुलगी होती म्हणून तिला खूप दया येऊ लागली. पण ती जरा जास्तच भांडकुदळ होती. आईच्या प्रेमाला तिने समजून घेतलं नाही उलट त्याचाच फायदा घेऊन ती वाटा देण्याविषयी वाद करू लागली. बापाला शेवटी नाईलाज होता. तिच्या माहेरच्या लोकांनी येऊन घरासमोर खूप नाटक केलं. हे सुशांतच्या वडिलांना पाहावलं नाही. त्यांनी काही दिवसांनी गावातील पंचासमक्ष मोठ्या भावाच्या हिश्यात जे काही येते ते देऊन टाकले आणि त्यांना कुठेही जाऊन जगण्यासाठी मोकळं केले. तिच्या माहेरची लोकं खूपच धूर्त होती. तिच्या नावावर सर्व काही करून घेऊन ते तिला आणि लेकरांना घेऊन आपल्या घरी आले. सुशांत हे सारं आपल्या डोळ्यासमोर घडतांना फक्त पाहत होता. तो लहान असल्याने त्याला काहीच बोलता येत नव्हते. काही दिवसानी सुशांत आपल्या कंपनीत काम करण्यासाठी निघून गेला.

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग पाचवा


मोठ्या मुलाचे असे अचानक निघून जाण्यामुळे सुशांतच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला होता, त्यात अजून एक धक्का म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीच्या बाबतीत घडले. तिची गरिबी आणि त्यात नवऱ्याची वागणूक यामुळे ती नेहमीच त्रस्त राहायची. एक-दोन महिन्यातून एकदा तरी ती माहेरी यायची. नवऱ्यापासून होणाऱ्या त्रासाबद्दल आई-वडिलांना सांगायची. दिवसभर काम करून आलेला पैसा तो दारू पिण्यात टाकायचा. दारूच्या नशेत तिला काही बाही बोलून शिव्या शाप द्यायचा आणि काही वेळा मारझोड देखील करायचा. तिला एक मुलगा होता. ती देखील शेतात काम करायला जायची. तिच्या कामाचे पैसे देखील तोच घ्यायचा. घरात लागणारे रेशन कुठून आणू असा प्रश्न विचारला की, तो म्हणायचा, जा तुझ्या घरी आणि घेऊन ये तिकडून. नेहमीच्या या त्रासाला ती खूप कंटाळली होती. जेव्हा तो दारू पीत नाही त्यावेळी गोडी गुलाबीने बोलायचा. रात गई बात गई उक्तीनुसार रात्री काय बोललो आणि कोणते कृत्य केलोय याची त्याला काही आठवण राहायचं नाही. पण पश्चाताप वाटत राहायचं. हुई श्याम उनका खयाल आ गया म्हणजे जशी जशी सायंकाळ होऊ लागते तसे तसे त्याचे मन बेचैन होऊन जात असे. सूर्य मावळतीला गेलं की त्याचे पाय दारूच्या गुत्याकडे वळायचे. दारू ढोसून घरी आलं की, कधी जेवणावरून तर कधी दुसऱ्याच कारणावरून घरात वाद व्हायचे. त्या वादाचे कडाक्याचे भांडणात रूपांतर व्हायचं आणि मग तो आपल्या नवऱ्याचं मी पण दाखविण्यासाठी हातात असेल ती वस्तू फेकून मारायचा. बिचारा तो लहान मुलगा आपल्या वडिलांच्या या नाटकामुळे भिऊन लपून बसायचा. आपल्या वडिलांना साधे बोलण्याची देखील त्याच्यात हिम्मत नव्हती. तिच्या आई-वडिलांच्या देखील जावयाला चार लोकांत बसवून समजावून सांगितले होते पण त्याच्यात काही एक फरक पडला नव्हता.
त्या दिवशी देखील त्याने खूप दारू ढोसली आणि आपल्या घरी आला. रोजच्या प्रमाणे जेवणावरून जरासे वाद झाले आणि त्यानंतर वाद वाढला. तिला मारण्यासाठी तो उठून तिच्याकडे धाव घेतला तसा ती घराबाहेर पडली. तिच्या मागोमाग तो ही बाहेर पडला. दारू पिऊन तर्रर्र झाल्याने त्याचा तोल बिघडला आणि धाडकन खाली पडला. बाजूला असलेल्या एका दगडावर त्याचे डोके आपटले. डोक्याच्या मागच्या बाजूला जोरात आदळल्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध झाला. थोड्याच वेळात डोक्यातून रक्त वाहू लागलं हे पाहून ती जोरजोरात ओरडू व रडू लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकं जमा झाले. त्यातील एकाने लागलीच ऑटो बोलावून त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मृत झाल्याचे सांगितले. डॉक्टरांचे बोलणे ऐकून ती तेथेच कोसळली. तो दारू पिऊन तिला काही ही बोलत होता, मारझोड करत होता तरी ही तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते. तो कितीही वाईट असला तरी तिचा नवरा कुंकवाचा धनी होता. त्याचे असे अचानक निघून जाणे तिला सहन होत नव्हते. मोठा मुलगा जाऊन तीन महिन्यांच्या काळ उलटला नाही की जावई असा अपघाती निघून गेला. जावयाकडे स्वतःची अशी काहीच जमीन जुमला शेती घर काहीही नव्हते. त्यामुळे जावयाच्या मृत्युनंतर मोठी मुलगी आपल्या लेकरासह माहेरी येऊन राहू लागली. भाऊजी च्या अचानक जाण्याने सुशांतला देखील धक्का बसला. कंपनी मधून त्याला जो काही पगार मिळत होता, त्यातील काही रुपये जवळ ठेवून बाकीचे रुपये तो वडिलांकडे देत होता. आई-वडील आता थकायला आले होते. त्यांना पूर्वीप्रमाणे शेतीची कामे होत नव्हती. त्यामुळे सुशांतची नोकरी हेच एकमेव आधार होते. सुशांतची धाकटी बहीण उपवर झाली होती आणि तिच्या लग्नाची काळजी देखील वाटत होती. ती दहावी पर्यंत शिक्षण घेऊन कपडे शिवण्याचे काम शिकून घेतली होती. त्यामुळे आजूबाजूचे बायका तिच्याकडून शिवून घेत होते आणि घरच्या खर्चात तिचा देखील हातभार लागत होता. मोठा मुलगा वारल्यानंतर त्याची बायको आणि लेकरं तिच्या माहेरी गेल्याने बाजूची खोली मोठ्या मुलीला राहण्यासाठी दिली. आपापली कामे करून ती तेथेच राहू लागली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग सहावा

सुशांतच्या छोट्या बहिणीसाठी वर संशोधन चालू झाले होते. सुशांत देखील त्याच्या ओळखीच्या मित्राकडे बहिणी विषयी सांगून ठेवलं होतं. बहिणीला चांगल्या घरी द्यावं, त्यासाठी किती ही हुंडा द्यावा लागला तरी तो तयार होता. मोठ्या बहिणी सोबत जसे घडले तसे या बहिणी सोबत काही अनर्थ   घडू नये याची काळजी घेत होता. काही ठिकाणी यांना वर पसंत पडत होते तर तिकडून नकार मिळत होता. यांना एखादे स्थळ पसंतीस उतरत नव्हते ते होकार देत होते त्यामुळे ते धर्मसंकटात सापडत होते. सुशांतला कंपनीत काम करायला सुरू होऊन पाच वर्षे उलटली होती. त्याच्याकडे आता बऱ्यापैकी पैसा ही जमा झाला होता आणि त्याने पैश्यासोबत मित्र ही कमावला होता. सुशांत आपल्या नावाप्रमाणे सुशील आणि अगदी शांत स्वभावाचा तसेच इतरांना नेहमी सहकार्य करणारा असा होता. कधी कधी सुट्टीच्या दिवशी मोठ्या शहरात काही कामासाठी गेल्यास आपल्या कामासोबत इतर मित्रांचे काम देखील आवडीने आणि न विसरता पूर्ण करायचा. त्याच्या याच सवयीमुळे तो त्या कंपनीत सर्वाना हवासा वाटत होता. त्याच्या या सहकारी वृत्तीचा त्याला एक फायदा झाला. त्याच्या एका मित्राने सुशांतच्या बहिणीसाठी चांगले स्थळ सुचविले आणि सोबत एक अट देखील ठेवली की,  त्याच्या एका मित्राच्या बहिणीला सुशांतने लग्न करावं. एवढ्यात त्याला लग्न करायचे नव्हते त्यामुळे तो अट मान्य करण्यास तयार नव्हता. बहिणीचे लग्न झाल्यावर एक-दोन वर्षांनी मी लग्न करणार असा विचार सुशांतचा होता. मित्राची ही अट सुशांतच्या आई-वडिलांच्या कानावर गेली. तो एका सुट्टीत गावी आल्यावर आई-बाबांनी तो विषय काढला. आता तुझे ही लग्नाचे वय झाले आहे, किती दिवस असा एकटा राहणार आहेस म्हणून त्याची आई त्याला समजावून सांगू लागली. तो काही ऐकायला तयार होत नव्हता. त्यावेळी धाकट्या बहिणीने एक विलक्षण अट टाकली ज्यावर सुशांत काही म्हणू शकला नाही. ती म्हणाली, सुशांत तू लग्न केलंस तरच मी लग्न करणार. तिच्या या बोलण्यावर सुशांतला काही एक बोलता आले नाही. तो गप्प राहिला. दुसऱ्या दिवशी मित्राला त्याची अट मान्य असल्याचे कळविण्यात आले. बहिणीसाठी अगोदर स्थळ बघण्यासाठी सारेजण गेले. चांगले घर होते, एकुलता एक मुलगा आणि पुण्यात एका कंपनीत काम करत होता. बघताक्षणी ते स्थळ सर्वाना पसंद पडले. त्यानंतर ते मित्राच्या मित्राच्या बहिणीला पाहण्यासाठी गेले. ते ही घर चांगले होते. मुलीचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी होते. मुलगी जीचे नाव सुमती होते, ती दिसायला सुंदर जरी नसली तरी नाका डोळ्यांनी सुरेख होती पण जरा स्थूल होती. सुशांतने आपल्या बायको विषयी जे स्वप्न पाहिलं होतं तशी ती स्वप्नातली परी नव्हती. तिथे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. त्यामुळे आई-वडिलांना ते स्थळ पसंत पडले. आई-वडिलांच्या आनंदासाठी त्याने देखील त्या स्थळास होकार दाखविला. काही दिवसांनी दोघांच्या स्थळांची बोलाचाली झाली. त्याला हुंड्यात आलेला सारा पैसा त्याने बहिणीच्या हुंड्यासाठी देऊन टाकला. सुशांत आज ज्या जागेवर उभा होता ते फक्त या धाकट्या बहिणीच्या पाठबळामुळे हे तो विसरला नव्हता. काही दिवसात त्याच्याच गावात बहीण-भावाचे लग्न सुरळीत पार पडले. अनेक लोकांच्या सांगण्यावरून धाकटा भाऊ आणि त्याची पत्नी लग्नाला आले होते. सारे घर पुन्हा एकदा भरून गेले होते. हे दृश्य पाहून आई-वडिलांच्या डोळयांत आनंदाश्रू वाहू लागले. सुशांतच्या चांगुलपणामुळे आज त्या घराला नवे घरपण मिळाले होते. गावातील प्रत्येक व्यक्ती सुशांतची प्रशंसा करत होते. इकडे धाकट्या भावाच्या मनात त्याची स्तुती व प्रशंसा डोळ्यात खुपत होती. लग्न होऊन पाच दिवस झाले नाही की, त्याने वाटणीचा मुद्दा सर्वांसमक्ष उपस्थित केला. धाकट्या मुलीचे लग्न झाल्यावर वाटणी पाहू असे त्याला सांगण्यात आले होते. त्यामुळे आता सुशांतच्या वडिलांचा नाईलाज झाला होता. लगेच गावातील पंच लोक एकत्र आले आणि वाटणी केली. त्यांच्याकडे एक दोन खोल्याचे घर होते आणि तीन एकर जमीन होती. यापलीकडे काहीच नव्हते. मोठा भाऊ वारल्यानंतर त्याला एक एकर तेव्हाच देऊन टाकण्यात आले होते. उरले दोन एकर त्यातील एक एकर धाकट्या भावाला आली. सुशांतने मात्र आपल्या वाटणीत जे काही मिळेल ते आई-वडील जिवंत असेपर्यंत त्याच्याकडे राहील असे सांगून टाकले. राहिला प्रश्न घराचा तर पंचांनी विचार करून निर्णय दिला की, त्याच्या मोठ्या बहिणीला एक खोली द्यावी आणि दुसरी खोली आई-वडिलांना द्यावी. धाकट्या भावाला वाटणी पसंत पडली आणि पंचासमोर त्या वाटणीवर सही करून शहरात निघून गेला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या घराची विभागणी होताना पाहून वडिलांना खूप दुःख वाटले पण सुशांतचा अभिमान वाटू लागला. लग्नासाठी घेतलेल्या सुट्ट्या संपल्यावर सुशांत कंपनीत काम करण्यासाठी आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी निघाला. आता त्या घरात आई आणि बाबा दोघेच राहणार होते. स्वतःची नीट काळजी घ्या, लागेल ते मी पाठवत राहतो, काळजी करू नका असे सांगून भरल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग सातवा

घरात सारे मुलं राहत असतांना घर कसं गोकुळ वाटत होतं. पण जसा काळ पुढे सरकत गेला तसं एक-एक जण आपापल्या मार्गाने सोडून निघून गेले. आता त्या छोट्याश्या घरात सुशांतचे आई-वडील दोघेच राहू लागले. बाजूला मोठी मुलगी व त्याचा एक मुलगा सोबतीला होता म्हणून थोडसं बरं वाटत होता. तो मोठ्या मुलीचा मुलगाच त्यांना लाडका झाला. घरातली छोटी छोटी कामे तो चुटकी सरशी पूर्ण करत होता. आजी-आजोबा या नात्याने त्यांनी देखील त्यालाच लळा लावू लागले. सुशांत अधूनमधून त्यांची चौकशी करत होता. महिन्याचे महिन्याला काही पैसे देखील पाठवत होता. आता त्या दोन जीवांना पैश्याची नाही तर मायेची व आपुलकीची गरज होती मात्र ती त्यांना मिळत नव्हती. सुशांतचे वडील कधी कधी शून्य नजरेत पाहत विचार करायचा तेव्हा त्याची आई त्याला म्हणायची, नका हो एवढं विचार करू, सर्वांच्या जीवनात असे प्रसंग येतात. सुशांतला कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी तेथे राहावेच लागते. त्याला त्याचा संसार देखील पहावा लागतो की नाही. तुम्ही एवढी काळजी नका करू. होईल सर्व ठीक. यावर तो चिंतीत मुद्रेत फक्त हुं एवढंच म्हणायचा आणि गप्प गुमान बसून राहायचा. माणूस काम करत राहिला तर वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. कामाविना बसून राहिलं की डोक्यात नाना विचार येतात असे तो नेहमी तिला बोलायाचा. यावर ती म्हणायची मग या वयात तुम्ही काय करू शकता ? कोणाच्या घरी सालगडी म्हणून राहता काय ? कोणी ठेवून घेतील का ? आता आपलं वय म्हणजे देवाचं नामस्मरण करायचं आणि दिवस काढायचे. जेवण करताना दोघांचे संभाषण चालू होते. तिचं बोलणं ऐकून तो म्हणाला, मग असं करू या की, तू म्हटल्या प्रमाणे, देवाचे नामस्मरण करण्यापेक्षा देवाला भेटायला जाऊ या का ? यावर तिने प्रश्नार्थक नजरेने म्हणाली, म्हणजे, मला नाही समजलं. यावर तो तिला समजाविण्याच्या सुरात म्हणाला, म्हणजे देवाच्या भेटीला पंढरपूरला जाऊ या. ते दोघे पांडुरंगाचे परमभक्त होते. ती जरा वेळ विचार केली आणि म्हणाली, सुशांत जाऊ देणार नाही, आपले दोघांचे थकलेले वय आहे, प्रवास शक्य होणार नाही, असे म्हणेल. यावर तो म्हणाला, तसं काही नाही, मी सांगतो त्याला, माझं तो नक्की ऐकतो. असे म्हणून जेवण आटोपल्यावर त्यांनी सुशांतला फोन लावला आणि पंढरपूरला जात असल्याबाबत कळविले. सुरुवातीला सुशांतने स्पष्ट नकारच दिला कारण सध्या पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खूप गर्दी आहे, या गर्दीत जाऊ नका, दिवाळीच्या सुट्ट्यात आपण सारे मिळून पंढरपूरला जाऊ या. सुशांतचे हे बोलणे त्याच्या वडिलांनी मान्य तर केले नाहीच उलट आषाढी एकादशीला गावातून महाराजांची दिंडी निघते त्यात आम्ही जाऊ. स्वतः भगवंत आम्हांला येण्यासाठी बोलावत आहे, तू नकार देऊ नको. वडिलांच्या या बोलण्यावर सुशांत निरुत्तर झाला आणि ठीक आहे, जाऊन या. असे म्हटल्यावर लहान मुलांना जसा आनंद होतो तसा आनंद त्या दोघांना झाला. कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा महाराजांना भेटून दिंडीत आम्ही पण येतोय हे सांगू असे त्यांना झालं होतं. त्याच आनंदाच्या भरात पांडुरंगाचे नामस्मरण करीत झोपी गेले.
पहाटे कोंबड्याचे आरवण्याने जाग आली. सकाळचा चहा पिऊन सुशांतचे वडील महाराजांकडे गेले. दिंडीत आम्ही नवरा-बायको येत असल्याची व सुशांतने होकार दिल्याचे देखील सांगितलं. महाराजांनी लगेच त्यांचे नाव दिंडीत समाविष्ट केले. आम्हाला पांडुरंग आजच भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. घरी येऊन सुशांतच्या आईला गोड वार्ता दिली, महाराजांनी आपले नाव दिंडीत घेतलं. तेव्हा घरात बाजूला राहत असलेली मोठी मुलगी होती. तिने ते ऐकलं आणि मी पण तुमच्यासोबत दिंडीत येते म्हणून विनवणी करू लागली. मुलीच्या इच्छेला नकार देणे खूपच अवघड गोष्ट असते. ठीक आहे, महाराजांना विचारून येतो म्हणून लगेच तो महाराजांकडे गेला आणि आमच्या सोबत मुलगी पण येणार आहे, तिचे ही नाव लिहून घ्या की यादीत म्हणून विनंती केली. यावर महाराजांनी होकार दिला पण मुलीच्या सोबत जो लहान मुलगा आहे, त्याचे काय ? यावर तो म्हणाला, तो पण येईल ना सोबत. आम्ही सांभाळून घेऊ. महाराजांनी थोडा वेळ विचार केला आणि त्यांचे ही नाव यादीत समाविष्ट केले. दोन-चार दिवसात दिंडी पंढरपूर साठी निघणार होती. त्यांनी सारी तयारी पूर्ण केली. ते चार दिवस कसे संपले हे कळाले देखील नाही. गावातून दिंडी निघण्याचा दिवस उगवला. सुशांत सुट्टी घेऊन घरी आला होता. आई-बाबा, बहीण आणि भाचा यांना प्रवासात काळजी घेण्याविषयी सांगितलं. महाराजांनी एकच जयघोष केला, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय ...... टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी गावातून बाहेर पडली. सर्वांनी गावाच्या वेशीपर्यंत जाऊन सर्व वारकऱ्यांना निरोप दिला. पंढरीच्या वाटेने दिंडी चालू लागली आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना बोलावत आहे असे वाटू लागले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग आठवा

पाऊले चालती पंढरीची वाट, ज्ञानबा तुकाराम, अवघी विठाई माझी, विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषात महाराजांची दिंडी मजल दर मजल करीत पंढरपूर च्या दिशेने निघाली. सुशांतचे आई-वडील सकाळच्या प्रसंगी दोन-तीन तास पायी चालायचे आणि नंतर त्याच्यासोबत असलेल्या गाडीत बसून राहायचे. सोबत लहानगा देखील असायचा. रात्रीला मुक्कामाच्या ठिकाणी महाराज कीर्तन करायचे, सोबती मंडळी भजन करायचे, त्या दिंडीत एक विलक्षण अशी शक्ती होती. तहानभूक सारे विसरून मंडळी तल्लीन व्हायचे. भक्तांच्या पोटाची चिंता पांडुरंगाला असायची. दिंडी ज्या गावात मुक्कामी राहणार त्या गावात दिंडी पोहोचेपर्यंत रात्रीचे जेवण तयार असायचे. जेवण एवढं सुंदर व्हायचं की कोणी त्याला नावं ठेवू शकत नव्हते. चालून चालून थकल्याने सर्व मंडळी मोकळ्या पटांगणात निद्रिस्त व्हायची. ना विंचूची भीती ना सापाची. पांडुरंगावर दृढ विश्वास ठेवून ही मंडळी घराबाहेर पडतात. नाना प्रकारची लोकं, वेगवेगळ्या स्वभावाची मंडळी भेटतात आणि त्यांना जवळून अनुभव घेता येतो. सकाळी झुंजूमुंजू च्या वेळी उठायचं आपले सकाळचे कार्यक्रम आटोपते घेतले की दिंडी निघाली पुढच्या मुक्कामाला. असे करत करत दहा-बारा दिवसात महाराजांची दिंडी एकदाची पंढरपूरला पोहोचली. पुण्य अश्या पावन पंढरपूर भूमीत पाय ठेवल्याबरोबर मन अगदी शांत आणि तृप्त होऊन जाते. पंढरपूर मध्ये माणसाचे महापूर आलंय की काय एवढी गर्दी. तरी देखील त्यांच्यात जी स्वयंशिस्त आहे ना ती कोणामध्ये दिसत नाही. थोड्याफार चोरीचे प्रकार होत असतील ही पण इतर काही प्रकार आजपर्यंत घडला नाही, पुढे घडणार देखील नाही. जो तो एकमेकाला माऊली नावाने हाका मारत प्रेमाने वागणूक देण्याची परंपरा फक्त इथेच पाहायला मिळते. पांडुरंग म्हणजे अख्या महाराष्ट्रातल्या लोकांचं दैवत आहे. त्याच्या विषयी प्रत्येकाच्या मनात एक विलक्षण ओढ असते. जन्मात येऊन एकदा तरी पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकाला वाटते. पंढरपूरला गेल्यावर एवढ्या गर्दीत पांडुरंगाचे दर्शन होईल काय ? हा प्रश्न देखील मनात येऊ द्यायचा नाही. कारण तो स्वतःहुन दर्शन करवून घेतो. पंढरपूरला गेल्या गेल्या दिंडी एका मोकळ्या जागेवर आपले निवास तयार केली. साऱ्या मंडळींनी चंद्रभागेत जाऊन डुबकी मारली आणि मग दर्शनाच्या रांगेत जाऊन थांबली. मंदिरात खूप गर्दी होती. दर्शनासाठी किती वेळ लागेल याची कोणालाही माहिती नव्हती. एक तास दोन तास म्हणता म्हणता बारा तास उलटून गेले. रांगेत कोणालाही थकवा जाणवत नव्हता ना कंटाळा आला होता. वारकरी टाळ-मृदंगाच्या सुरात भजन गात होती, इतर मंडळी त्याला साथ देत होती अशी ही दर्शनाची रांग पुढे पुढे जात होती. सलग पंधरा तासांनी त्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. विठ्ठलाची मूर्ती डोळ्यांत साठवून घेऊन आणि पदस्पर्श करून लेकरांना सुखी ठेव एवढं मागणी मागून ते दर्शन घेऊन बाहेर पडले. विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांना धन्य धन्य झाले असे वाटले. मंदिराचा परिसर फिरून बघितला. छोट्या लेकराला काही खेळणी घेऊन दिलं आणि आपल्या निवासाकडे परतले. विठ्ठलाच्या भेटीसाठी पंधरा दिवस कसे संपले हे कळालेच नाही. साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पुढच्या वर्षीच्या वारीत पुन्हा येऊ असा एकमेकांना निरोप देत त्यांची परतीची यात्रा सुरू झाली. 

ही सारी मंडळी वारीसाठी पंढरपूरला गेलेली होती आणि या पंधरा दिवसात गावात मात्र वेगळंच नाटक घडलं. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग नववा 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावातील लोकांची दिंडी पंढरपूरला रवाना झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सुशांतचा धाकटा भाऊ जो की शहरात राहत होता, तो गावी आला. त्यांच्या नावाने एक एकर शेत होतं, ते शेत विकण्यासाठी तो गावात आला होता. त्याचे शेत विकत घेण्याची ऐपत फक्त एकाच व्यक्तीची होती तो म्हणजे गावाचा सावकार. त्याने थेट सावकाराचे घर गाठले. सावकार आपल्या ओसरीत बसले होते. सावकारला नमस्कार घालून त्यांच्याकडे येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावर सावकारांनी त्याचे शेत घेण्यास सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता. त्याचे कारण सावकाराला चांगलेच ठाऊक होते, हा शेत विकून आलेला सारा पैसा जुआ मध्ये टाकतो. शेत विकत घेण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला पण सावकाराने त्याचे शेत घेण्यास शेवटपर्यंत नकारच देत राहिला. अगदी उदास आणि नाराज होऊन तो सावकाराच्या घराबाहेर पडला. गावाच्या बाहेरील मारोती मंदिराच्या पारावर बसला. गावात शेत विकत घेऊ शकेल असा कोणी ही नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. काय करावं ? हे त्याला सुचत नव्हतं. तेवढ्यात गावातील एक व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि त्याच्या नाराजीचे कारण विचारलं, त्यावर त्याने शेत विकायचे आहे पण सावकार घेत नाही म्हणाला, गावात दुसरा कोण आहे ? यावर तो व्यक्ती म्हणाला, गावात एक माणूस आहे जो की, तुझे शेत विकत घेऊ शकतो, नुकतेच त्याला शासनाकडून मोठी रक्कम मिळाली. त्याचे शेत समृद्धी महामार्गात गेल्याने सरकारने त्याच्या शेतीची भरपाई म्हणून मोठी रक्कम दिली होती आणि तो शेतीच्या शोधात आहे. हे ऐकून त्याचे डोळे चमकले, कोण आहे तो सांग की. यावर ती व्यक्ती म्हणाली, मी त्याचे नाव सांगतो, त्याच्या घरी देखील घेऊन जातो, पण शेत विकल्यावर मला दहा हजार रुपये द्यावे लागतील. तात्काळ त्याने होकार दिला. दोघे मिळून त्या माणसाच्या घरी गेले. त्या व्यक्तीने सारी हकीकत सांगितली. थोडीफार घासाघीस करून पाच लाख रुपयाला एक एकर विकत घेण्याचा करार झाला. बोलाचली पूर्ण झाली. शेतीचा बयाना म्हणून त्याने एक लाख रु. दिले. दुसऱ्या दिवशी शेती त्याच्या नावाने केल्यावर उर्वरित रक्कम देण्याचे कबूल करून ते दोघे तिथून बाहेर पडले. एक लाख रूपयातील पाच हजार त्या व्यक्तीला दिला आणि उद्या शहरात या म्हणून तो निघून गेला. शहरात गेल्यावर त्याने अगोदर सोनाऱ्याचे दुकान गाठले आणि त्या पैशातून एक तोळा सोन्याचे दागिने तो घरी गेला. आपला नवरा कधी नाही ते आपल्यासाठी सोन्याचा दागिना घेऊन आला म्हणून ती जाम खुश झाली. ती आपणाला टोकू नये म्हणून त्याने बायकोला खुश करण्यासाठी ही चाल खेळला होता. त्यात तो यशस्वी देखील झाला. पैसे कुठून आले ? कसे आले ? याची काही चौकशी केली नाही. ती आपल्याच दुनियेत गर्क होती. 

दुसऱ्या दिवशी ते दोघे शहरात आले. ठरल्या करार पत्रकान्वये त्याने आपले एक एकर शेत त्या माणसाच्या नावाने करून दिला. आणि त्या माणसाने चार लाख रु. त्याच्याकडे सुपूर्त केले. लागलीच मध्यस्थी व्यक्तीला त्याने राहिलेले पाच हजार देऊन एकमेकांचा निरोप घेतले. अगदी आनंदात तो घरी गेला आणि जातांना बरेच काही खाऊ घेऊन गेला. स्वारी एवढी आनंदात का आहे ? याचा उलगडा तिला होत नव्हता. सायंकाळी चारच्या सुमारास ते दोघे बसून चवीचवीने खाऊ खाल्ला आणि मस्त मसालेदार चहा घेतला. त्या दोघांना स्वर्ग दोन बोटे उरल्या सारखे वाटत होते. थोडा वेळ गप्पा झाल्यावर मी बाहेर जाऊन येतो म्हणून तो घराबाहेर पडला. घरातून बाहेर पडलेली स्वारी थेट जुआच्या अड्ड्यावर जाऊन थांबली. आज त्याच्या खिशात खूप पैसा होता. कचऱ्यावर कचरा पडतो तसे लक्ष्मी जवळ लक्ष्मी येते अशी एक म्हण त्याने ऐकली होती. आज आपल्याजवळ खूप पैसा आहे, तेव्हा भरपूर पैसा जिंकून जाऊ या इराद्याने तो डाव खेळण्यास बसला. जवळ पैसा जास्त असल्याने किती आले नि किती गेले याचा काही पत्ता लागत नव्हता. रात्र झाली. बायको घरी वाट पाहत होती, पण तो डावावरून काही उठत नव्हता. रात्रभर वाट पाहत ती तशीच झोपी गेली. सकाळ झाली, दुपार झाली, सायंकाळ देखील झाली. आता येईल तेव्हा येईल म्हणून ती वाट पाहू लागली. तो कुठे जातो, काय करतो, याचा तिला कधी ही काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे ती त्याला शोधणार तरी कुठं. फोन देखील लावून बघितला तो ही स्वीच ऑफ म्हणून दाखवत होता. आजची रात्र वाट पाहू म्हणून ती वाट पाहत राहिली. रात्रीचे आठ वाजले, दहा वाजले, बारा वाजले तरी तो आला नाही. काय झालं असेल ? कुठे गेला असेल ? याचा विचार करत , ती वाट पाहत तशीच झोपी गेली. यापूर्वी त्याने असे कधी केले नाही. सकाळ झाली, तेव्हा तिला जरा काळजी वाटू लागली म्हणून शेजाऱ्या पाजाऱ्याना विचारून पाहिली. त्यापैकी एकाने सल्ला दिला की, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कळवलेले बरे राहील. त्याचा सल्ला ऐकून ती पोलीस स्टेशनला हरवल्याची बातमी द्यावी म्हणून गेली. ती पोलीस स्टेशनमध्ये गेल्याबरोबर हादरून गेली कारण पोलीस लॉकअप मध्ये तो दिसला. तो लगोलग त्याच्याकडे वळली आणि त्याची विचारपूस करू लागली. तुम्ही इकडे कसे काय ? तुम्ही काय गुन्हा केला ? म्हणून तुम्हाला लॉकअप मध्ये टाकले. एक नाही अनेक प्रश्न विचारलं, पण तो काही बोलत नव्हता. तिने सरळ तेथे उभे असलेल्या पोलिसांना विचारलं की यांना लॉक अप मध्ये का ठेवलं ? यांनी काय गुन्हा केला ? त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, रात्री जुआच्या अड्ड्यावर धाड पडली आणि तेथे तो जुआ खेळतांना सापडला म्हणून लॉकअप मध्ये टाकलं आहे. हाय रे देवा म्हणून ती  कपाळावर हात मारून रडू लागली. तेव्हा त्या पोलिसाने रडण्यासाठी मज्जाव केला व बाहेर जाण्यासाठी सांगितले. तसे ती बाहेर गेली. आजूबाजूच्या लोकांना ती विचारू लागली, नवरा जुआ खेळतांना सापडला आहे, त्याला बाहेर कसं आणायचं ? अनेक लोकं अनेक मार्ग सांगू लागले. त्यापैकी एकजण म्हणाला काही नाही साहेबाला थोडं विनंती करा आणि काही रुपये द्या ते सोडून देतील. पण साहेबाला मी कशी बोलणार, साहेबाला मी ओळखत नाही आणि माझी देखील तेवढी ओळख नाही असे म्हणाल्यावर तो व्यक्ती म्हणाला मी करतो ना हे काम, मला या कामाचे दोन हजार द्यावे लागतील आणि साहेबांना पंचवीस हजार रु द्यावे लागतील. हे ऐकून तिला प्रश्न पडला एवढं पैसा आणायचं कुठून ? ती व्यक्ती पुढे म्हणाली, त्याच्यावर अजून FIR झाला नाही आणि तो जर झाला तर तो सुटू शकणार नाही. त्याचे बोलणे ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली. काहीही करून पैसा आणावा लागेल हा विचार करतानाच तीन चार दिवसांपूर्वी त्याने दिलेला एक तोळा सोन्याच्या दागिण्याची आठवण झाली आणि ती त्या व्यक्तीला म्हणाली, मी पैसा आणून देते, तुम्ही त्यांना सहीसलामत बाहेर काढायचा तेवढं बघा. म्हणून ती धावत पळत आपल्या घराकडे गेली. संदूकमध्ये ठेवलेले ते सोन्याचे दागिने काढली आणि सोनाऱ्याचे दुकान गाठली. चिठी नाही चपाटी नाही म्हणून सोनाऱ्याने त्या दागिन्यांचे पाऊण रक्कम तिच्या हातात ठेवलं. ती रक्कम घेतली आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. ती व्यक्ती तिची वाट पाहत तिथे झाडाखाली उभा होता. तिने त्याच्या हातात साहेबांचे व त्याचे अशी सत्तावीस हजार रुपये हातावर ठेवली आणि त्याच झाडाखाली बसली. तो पैसे घेऊन स्टेशनच्या मध्ये गेला. थोड्या वेळाने परत आला. काम झालं असे सांगितले. ती बाहेरच त्याची वाट पाहत राहिली. एक तास झाला असेल तरी तो बाहेर अजून आला नाही म्हणून त्याची काळजी वाटू लागली. पोलिसांनी त्याची कान उघाडणी केली आणि बायकोच्या तोंडाकडे पाहून साहेबांनी तुला सोडलं म्हणून लॉक अप मधून बाहेर सोडलं. तसा तो बाहेर येताना पाहून ती धावतच त्याच्याकडे गेली. दोघे मग आपल्या घराकडे निघाले. तो काहीच बोलत नव्हता. अगदी शांत गप्प गुमान होता. त्याला जुआ खेळतांना पोलिसांनी पकडलं हे लोकांना कळाले तर माझी काय इज्जत राहील असा तो विचार करत होता. तर त्याची बायको त्याला समजावित होती. घरी गेल्यावर तिने स्वयंपाक केली, दोघे मिळून जेवण केले आणि झोपी गेले. दिवसभराच्या त्रासामुळे ती थकली होती, तिला डोळा लागला. पण त्याला डोळा काही लागत नव्हता. 

पहिल्या दिवशी तो हरला होता पण त्यादिवशी त्याने बरेच पैसे जिंकले होते आणि त्याच्याकडे पैसा भरपूर दिसत होता. हे कुणाच्या तरी डोळ्यात खुपले होते आणि त्याने पोलिसांना खबर दिली. रात्री बाराच्या सुमारास पोलिसांची धाड पडली. त्यात सर्वजण पळून गेले मात्र हा सापडला. त्याच्याजवळ असलेला सर्व पैसा पोलिसांनी जप्त केला आणि त्याला अटक केले. हातात असलेला सारा पैसा गेला व नाव बदनाम झालं म्हणून तो रात्रभर विचारात पडला. असले जीवन जगण्यात काही अर्थ नाही म्हणून तो त्याच रात्री बाहेर गेला आणि घराशेजारील लिंबाच्या झाडाला फाशी घेतली. तिला पहाटे पहाटे जाग आली. आजूबाजूला तो दिसला नाही म्हणून तिने दार उघडले. दार उघडल्याबरोबर झाडाला लटकलेला तो दिसल्याबरोबर ती जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकं ही आले. सर्वाना धक्काच बसला. याने आत्महत्या का केली ? याबाबत उलटसुलट चर्चा करू लागली. पोलीस स्टेशनला ती बातमी धडकली. लागलीच दोन पोलीस तेथे आले आणि झाडाला लटकलेला त्याचे शरीर खाली जमिनीवर टाकलं. जागेवरच पंचनामा करून पोस्टमार्टम साठी पाठविण्यात आले. दोन दिवसांत तिच्या जीवनात अंधकार पसरला होता. सुशांतला ही बातमी कळाली तसा तो मिळेल त्या बसने पोहोचला. आई-वडील आणि बहीण पंढरपूरला गेले होते त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचविणे कठीणच होते. सुशांतने मग सर्व उत्तरक्रिया पूर्ण केली. सुशांतला आत्महत्येमागील कारण कळाल्यावर तो खूप दुःखी झाला. त्याच्या कर्माने तो गेला, जुआ खेळला नसता तर ही वेळ आलीच नसती असे मनातल्या मनात म्हणू लागला. 

क्रमशः

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग दहावा

पंढरपूरची वारी करून आई-वडील आणि मुलगी मोठ्या आनंदात घरी आले. घरी आल्याबरोबर त्यांच्या कानावर धाकटा मुलगा आत्महत्या केल्याची बातमी आली. तसे ते हादरून गेले. काय झालं ? म्हणून ते चौकशी केली पण कोणी पूर्ण माहिती दिली नाही. म्हणून जसे आले तसे शहराकडे निघाले. तिथे गेल्यावर कळाले की, नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आपल्या माहेरी गेली. तसे ते तिघे तिच्या माहेरच्या गावी गेले. धाकटी सून घरात एकटीच बसली होती. रडून रडून चेहरा खूप सुजला होता. आई-वडिलांना बघून तिला रडू आले. त्यांनी तिच्याजवळ बसून सांत्वन केले आणि अखेर हे कसे घडले याची विचारणा केली. तेव्हा तिला जे अर्धवट माहीत होतं ते तिने सांगितलं. त्याने एक एकर शेत विकली आणि आलेल्या पैश्यातून त्याने जुआ खेळला. एक तोळा सोन्याचा दागिना त्याच पैश्यातून घेऊन आला हे सारं तिला खूप उशिरा कळलं. तिच्याशी चार गोष्टी बोलून घरी चालण्यास विचारलं तर तिच्या आई-वडिलांनी आमची मुलगी इथेच राहील, असे सांगितले. यावर जास्त काही न बोलता ते तिथून निघून आले. पंढरपूरला जाऊन येईपर्यंत जो आनंद होता तो सारा आनंद क्षणात नाहीसा झाला. आपल्या डोळ्यासमोर मुलांचे निघून जाणे वडिलांना खूप जड जात होते. घरात उदासीचे वातावरण होते. तो कधीही घरावर माया लावला नाही, उलट त्रासच दिला होता. तरी त्याच्या अश्या अकाली जाण्याने सर्वाना धक्काच बसला होता. मधल्या सुट्टीच्या काळात सुशांत गावाकडे येऊन आई-वडिलांची भेट घेतली, त्यांच्याशी चार गोष्टी बोलून तो परत कंपनीत कामावर निघून गेला. दिवसामागून दिवस जाऊ लागले. मोठ्या बहिणीच्या मुलाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले होते. त्याला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठविणे गरजेचे होते. त्याला शहरात सुशांत जवळ राहायला पाठवू अशी आईची मनोमन ईच्छा झाली होती पण बहिणीची ईच्छा मुळीच नव्हती. घरात या विषयावर खूप चर्चा झाली. त्याला कारण ही तसेच होते. 

सुशांत आणि सुमती यांचे लग्न होऊन पाच वर्षांचा काळ लोटला पण त्यांच्या घरात अजून पाळणा हलला नव्हता. सुरुवातीचे दोन वर्षे काही वाटले नाही परंतु जसे जसे दिवस सरू लागले तसे तसे काळजी वाटू लागली होती. मूल व्हावे म्हणून अगदी सुरुवातीला त्याच्या आईने अनेक वैद्य व पूजा अर्चा केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी अनेक दवाखान्यात चकरा मारल्या. जे कुणी एखाद्या अमुक ठिकणी जा तेथे नक्की यश मिळेल असे सांगितले की ही जोडी त्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेऊन येत. मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत होती. याच गोष्टीवर त्या दोघात नेहमी वाद होत राहायचे. तो म्हणायचा तुझ्या दवापाणीवर माझा खूप पैसा खर्च होत आहे. तू काही वेळा औषध बरोबर घेत नाहीस. स्वतःची काळजी घेत नाहीस. तू खूपच आळशी आहेस. असे नाना प्रकारे तो बोलत राहायचा. मागील काही दिवसांपासून शांत स्वभावाचा सुशांत जरा चिडचिड करतांना दिसून येत होता. लेकरूबाळ होत नाही याचीच काळजी त्याला खात असावी, अशी त्याची आई त्याला नेहमी म्हणायची. म्हणूनच बहिणीच्या मुलाला आपल्या जवळ ठेवण्यासाठी त्याची आई त्याला अनेकदा बोलली पण त्याचे गावातील शाळा तर पूर्ण होऊ दे म्हणून आजपर्यंत चालढकल करीत चालला होता. खरं तर याच गोष्टीवर घरात त्या दोघांचे भांडण होत राहायचे. ती घरात कोणालाच येऊ देण्याच्या मनस्थितीत नाही हे आई-वडिलांना सांगता येत नव्हते. म्हणून तो आज उद्या करत पुढे ढकलत होता. पण पुन्हा तो प्रश्न आज निर्माण झालाच ......!

क्रमशः

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग अकरावा 

उन्हाळी सुट्या संपायला अजून काही दिवस शिल्लक होते. सुशांत आणि त्याची पत्नी सुमती या दरम्यान आपल्या गावी आलेले होते. आज घरात जरा तणावाचे वातावरण दिसत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी आईने विषय काढला. बहिणीच्या मुलांचं गावातील शिक्षण संपलं आहे तर त्याला तुम्ही घेऊन जा. आईच्या या बोलण्यावर सुमती उपरोधात्मक सुरात म्हणाली, त्यापेक्षा तुम्ही सर्वजणच चला की, तिथेच राहू, त्याचं शिक्षण देखील होईल. पण त्यावर त्यांनी नकार दिला. त्या विषयावर बोलता बोलता आईने सुमतीला न होणाऱ्या बाळाविषयी बोलली, एवढं वैद्य आणि दवाखाना केल्या पण हिला काही लेकरू होत नाही तेव्हा तू दुसऱ्या लग्नाचा विचार का करत नाहीस ? पाच वर्षात आईने असे कधीच बोलली नाही. आज तर तिने बॉम्ब टाकला होता. तिच्या बोलण्याने सुमतीच्या पाया खालची वाळू सरकल्यासारखं झालं. सुशांत आणि सुमती या विषयावर काहीच बोलले नाही. घरात थोडा वेळ नीरव शांतता होती. सगळ्याचे जेवण आटोपल्यावर जराशी विश्रांती घेऊन ते दोघे शहरात आपल्या घराकडे जाण्यास निघाले. जाता जाता आईने परत दुसऱ्या लग्नाचा विषय काढून त्यावर विचार करा अशी बोलली. 

सुशांत आणि सुमती सायंकाळी आपल्या घरी आले. आईच्या बोलण्यामुळे सुमती जरा नाराज झाली होती. गेल्या पाच वर्षांच्या काळात आई कधी अशी बोलली नाही, याच वेळी का बोलली असेल ? यावर ती विचार करू लागली. दोघे ही अगदी गप्प होते. बोलायला सुरुवात कोण करणार ? याची ते वाट पाहू लागले होते. शेवटी सुमती म्हणाली, आज आई अशी का बोलली असेल बरं ? यावर सुशांत म्हणाला, हो, मला ही तिच्या बोलण्याचा जरा आश्चर्य वाटलं. 

मला वाटते मी तुमच्या बहिणीच्या मुलाला ठेवून घेण्यास नकार देत असल्याने आई अशी बोलली वाटते, ती म्हणाली

नाही, मला असे वाटत नाही. उलट मी आईला म्हणालो होतो, त्याचं गावातील शाळा संपू दे मग मी त्याला घेऊन जातो, तो म्हणाला.

पण मला तर तसंच वाटतंय, मी नकार दिल्यामुळे आई तशी बोलली. गेल्या पाच वर्षात मूल होत नाही म्हणून कधी अशी बोलली नाही, बोलता बोलता ती थोड्याश्या साशंक नजरेने सुशांतला म्हणाली, पण तुमच्या मनात तर नाही ना दुसरं लग्न करायचं. 

नाही, माझ्या मनात तसं काही विचार अजिबात नाही. पण मला वाटतं की, माझ्या बहिणीच्या मुलाला शिकण्यासाठी ठेवून घेण्यास तू होकार द्यावं, जरा लाडीगोडीत येऊन तो बोलला. यावर ती थोडा वेळ विचार केली, याच गोष्टीवर आईने दुसऱ्या लग्नाचा विषय काढला, ह्याच विषयावर जर सुशांतला जर नकार दिला तर त्याच्या मनात देखील दुसऱ्या लग्नाचा विचार येऊ शकतो. सवतीपेक्षा हा मुलगा परवडला म्हणून ती सुशांतच्या बोलण्याला होकार दिली. त्याबरोबर सुशांतचा चेहरा चांगलाच खुलला होता. सुमतीने सुशांतचा आणि त्याच्या आईचा डाव पक्का ओळखला होता. दुसऱ्या लग्नाचा विषय काढला की ती मुलाला ठेवून घेण्यास नक्की तयार होते आणि झाले ही तसेच. ती मनातून खूप नाराज झाली. मनात नसतांना सुद्धा त्या मुलाला स्वतःच्या घरी ठेवून घेण्यास तयार झाली. पण त्या परिस्थितीत तिच्याजवळ दुसरा पर्याय देखील नव्हता. काही दिवसांनी शाळा सुरू होणार होती आणि घरात एक पाहुणा म्हणून सुशांतच्या बहिणीचा मुलगा यांच्यासोबत राहायला येणार होता. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग बारावा 

सुशांत बाहेरच्या जगात खूप चांगला, शांत आणि सहकारी वृत्तीचा असला तरी घरात मात्र अगदी वेगळ्या स्वभावाचा होता. तो सुमतीला कधीच एका स्त्रीचा दर्जा दिला नाही. नेहमीच तिला टाकून बोलायचा. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय असते ? तिला ठाऊकच नव्हते. छोट्या कारणावरून तिला खूप बोलण्याची त्याला एकप्रकारे सवय लागली होती. घरात कुठे कचरा किंवा धूळ दिसलं की तो लगेच बोलायचा, आजकाल तू खूपच आळशी झाली आहेस, दिवसभर काय झोपा काढतेस की काय ? तुला हे धूळ आणि कचरा कसे दिसत नाही. त्याच्या अश्या बोलण्याने ती खूप नाराज व्हायची. पुढे चालून ती तेव्हा खूप दुःखी व्हायची ज्यावेळी तो तिच्या माहेरच्या आई-वडिलांच्या नावाने काही बोलायचा. तुझ्या आई-बाबाने तुला हेच शिकवलं का ? म्हणून तो नेहमी तिला बोलायचा. त्यादिवशी तर हद्द झाली, जेवणात एक केस निघालं म्हणून तो तिला खूप बोलला आणि सरळ तिच्या आई-बाबाला फोन लावून घरी बोलावून घेतलं. त्यादिवशी ती खूप रडली, कधी कधी तिचं काहीच कारण नसतांना तो तिला वाद करत होता. आई-बाबांनी तिला समजवून सांगितलं की, सुशांतच्या मनानुसार वागत जा, त्यांना दुःख होईल असं वागू नये, त्यांना जे आवडते त्याप्रमाणे करावे, थोडासा आळस बाजूला कर. असे नाना प्रकारे समजावून ते दोघे आपल्या घरी गेले. हे एका दिवसाचं नव्हतं तर चार-आठ दिवसातून एकदा हे वादळ असं चालूच राहायचं. गेल्या पाच वर्षात कदाचित तिला सवय झाली असेल म्हणून ती देखील तेवढं मनावर घेत नव्हती. कदाचित लेकरूबाळ नसल्याने तो असा चिडचिड करत असावा असे तिला आणि तिच्या आई-बाबांना वाटायचे. पण तसे काही नव्हते, त्याचा मुळात स्वभावच तसा होता. मी नवरा आहे आणि तू बायको आहेस. त्यांच्यामध्ये नवऱ्याचे मी पण स्पष्टपणे जाणवत होतं. नाहीतर बाहेर माणूस जसा वागतो, राहतो, बोलतो तसे घरात देखील असायला पाहिजे पण तसे दिसत नव्हते. त्यांच्याकडे पैश्याची कमतरता नव्हती तरीपण कधी बायकोला काय आवडते आणि काय आवडत नाही याची साधी चौकशी सुद्धा केली नाही. उलट घरात माझ्या आवडीचे जेवण तयार करायला पाहिजे असा हट्ट मात्र असायचा. हौसेने कधी कोठे फिरायला नेलं नाही आणि स्वतः मात्र वर्षातून एकदा कंपनीतील मित्रांसोबत फिरायला जात असे. कपड्याच्या बाबतीत सुद्धा तसेच होते, ती साडी घेतो म्हटलं की, परवाच तर साडी घेतलीस ना. बघ साड्याने कपाट भरून गेले आहे. अजून किती घेतेस ? असे म्हणायचा आणि स्वतः मात्र वर्षातून दोन वेळेस दोन दोन ड्रेस विकत घ्यायची. आपली शान शौक पूर्ण करतांना एक वेळ सुद्धा आपल्या पत्नीचा विचार करीत नव्हता. अश्या विचित्र वागण्यामुळे ती पुरती कंटाळली होती. ह्या गोष्टी बाहेर कोणाला सांगता येत नाही. मूग गिळून गप्प बसून राहावे लागते. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सांगितलं तर आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होईल. ती खूप विचार करायची आणि मोठ्या मनाने जाऊ द्या असे म्हणून दिवस काढत राहायची. तिला वाटायचं घरात आम्ही दोघेच असल्याने असे होत असेल कदाचित उद्या त्यांच्या बहिणीचा मुलगा भाचा आल्यावर तरी तो आनंदात राहील आणि मी देखील आनंदात राहीन अशी भोळी आशा तिच्या मनात होती.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग तेरावा 

पावसाळा ऋतू सुरू झाला आणि शाळेला ही सुरुवात झाली. सुशांतच्या बहिणीचा मुलगा राजू माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी आपल्या मामाच्या घरी आला. शहरातील एक प्रसिद्ध आणि नामांकित शाळेत त्याला प्रवेश देण्यात आला. त्यानंतर बाजारात जाऊन त्याच्यासाठी दप्तर, गणवेश, वह्या, पुस्तक आणि इतर साहित्य खरेदी करून ते दोघे आपल्या घरी परतले. सुशांत आज थोडा आनंदात दिसत होता असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसले. भाच्यासमोर जास्त काही न बोलता तो शांतपणे टीव्ही पाहत होता. सायंकाळ झाली. जेवण वगैरे झाल्यावर झोपी जाण्याच्या सुमारास राजुला त्याच्या आईची आठवणी येत होती म्हणून तो रडवेला चेहरा करून बसला होता. तो आजपर्यंत आईला सोडून कुठे राहिलाच नव्हता त्यामुळे त्याला आजचा दिवस खूपच जड वाटत होता. पण सुशांतने त्याला जवळ घेतले आणि आपल्याजवळ घेऊन झोपी गेला. मात्र सुमतीला अवघडल्यासारखे झाले. त्यांची राहायचे घर हे फक्त दोनच खोल्याचे होते. एका खोलीत स्वयंपाक करायचं आणि दुसऱ्या खोलीत उठणे, बसणे आणि झोपणे हे चालायचं. राजूच्या येण्याने त्यांची प्रायव्हसी संपली होती. कसेबसे पहिला दिवस संपला. सकाळी उठल्यावर सुशांत आणि राजू सकाळचे कार्यक्रम उरकून घेऊन तयार झाले. तोपर्यंत सुमतीने स्वयंपाक तयार केला. जेवण झाल्यानंतर डबा घेऊन सुशांत कंपनीला तर राजू शाळेला निघाले. मग सुमती आपल्या उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तयारीला लागली. हा एका दिवसाचा दिनक्रम तिचा रोजचा झाला होता. ती एखाद्या मोलकरीण प्रमाणे राब राब राबत होती. धन्यवाद चे एक शब्द ना सुशांत बोलत होता ना राजू. आठवड्यातून एक सुट्टी मिळते तर ती सुट्टी ते दोघे एकतर गावाकडे जायचे किंवा शहरात काही तरी खरेदी करण्यात घालवायचे. तिला मात्र घरातच बांधून ठेवल्यासारखं राहावं लागायचं. कधी तरी एखादे दिवस माहेरी जाण्याचा विषय काढलं की, राजुच्या जेवणाचा आणि डब्याचं काय होणार ? असे म्हणून नकार मिळू लागला. एक तर सुशांतसोबत दोन गोष्टी बोलता येत नव्हते आणि दोघांमधला एकांतपणा देखील संपला होता, यामुळे तिचा जीव मेटाकुटीला आला होता. पण ती काहीच करू शकत नव्हती. राजू शाळेला जाऊन आला की दप्तर एका बाजूला फेकायचा आणि मित्रांसोबत खेळत राहायचा. अंधार पडू लागला की घरी यायचा आणि टीव्हीसमोर बसायचा. मामा आता कंपनीतून येणार म्हटलं की तेव्हा तो पुस्तक घेऊन वाचन-लेखन करायचा. मामा घरी आल्यावर त्याला अभ्यास करताना पाहून आनंद वाटायचा. सुमतीने एके दिवशी त्याचे कारनामे सुशांतला सांगितले. शाळेतून आल्यावर तो काय काय करतो आणि अभ्यास तुम्ही येण्याच्या काही मिनिटे अगोदर सुरू करतो. सुमतीच्या या बोलण्यावर त्याचा अजिबात विश्वास बसत नव्हता. उलट तुझ्या मनात राजू विषयी खोट आहे म्हणून तू अशी बोलत आहेस असा तो म्हणायचा आणि इकडे राजूला अजून बळ मिळायचं. राजू बद्दल माझ्या मनात विष कालविण्याचं काम तू करत आहेस मात्र मी कधीच असे होऊ देणार नाही असे तिला बजावून सांगितले. अगदी सुरुवातीला राजू सुमतीला घाबरून राहत असे. पण काल झालेल्या घटनेमुळे राजू शेफारून गेला आणि आता सुमतीचे काही ऐकेनासा झाला. दुकानातून काही सामान घेऊन ये ? असे काम सांगितले तरी त्याकडे दुर्लक्ष करू लागला. याही पलीकडे जाऊन राजुने एक मोठे कारस्थान केले. सुमतीच्या विरुद्ध काहीबाही सांगून सुशांतचे कान भरले. शाळेतून आल्यावर मला चहा बिस्कीट देत नाही, भूक लागली म्हटलं तर जेवायला देत नाही, शेजारच्या घरी जाऊन घंटा बोलत असते असे अनेक कारणं सांगून त्याने सुशांतला भडकावून टाकले. म्हणजे एकप्रकारे राजुने आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यादिवशी सायंकाळी आल्यावर राजुने मला टीव्ही पाहू दिली नाही म्हणून त्याने सुशांतला सांगितला. सुमती त्यावर काही तरी स्पष्टीकरण करणार त्यापूर्वीच तिच्या गालावर सुशांतने जोराची चापट मारली. गेल्या सहा वर्षात सुशांत खूप काही बोलला असेल पण असे हात कधीच उगारला नाही. पण आज भाचाचे बोलणे ऐकून माझ्यावर हात उगारले म्हणून ती दुसऱ्या खोलीत जाऊन बसली. घरात बराच काळ शांतता होती. जेवायची वेळ झाली. तरी सुमती जागेवरून उठली नाही की स्वयंपाक सुरू केला नाही. ती सुद्धा हट्टी होती. आज यांची खैर नाही म्हणून ती रुसून बसली. तेव्हा सुशांतच्या सांगण्यावरून राजू सुमतीजवळ आला आणि I am Sorry म्हणून कान पकडला. तशी त्याला बुद्धी सुचली नाही पण सुशांतचा इगो चा प्रश्न होता, तो कसा सॉरी म्हणेल. शेवटी तिने त्या लहान मुलाला भुकेला ठेवू नये म्हणून ताबडतोब खिचडी तयार केली. सर्वजण जेवण केले. जेवताना मात्र कोणीही बोलत नव्हते. सुशांतने राजुला समजावण्याच्या सुरात म्हणाला, लहान मुलांनी आपला अभ्यास पूर्ण करायचा असतो, टीव्ही पाहायचं नसते. राजू यानंतर टीव्ही पाहायचं नाही. मामी देखील तुला हेच म्हटलं असेल नाही का गं. यावर सुमती काहीच बोलली नाही. जेवण आटोपून घेऊन स्वयंपाक घर खोलीत जाऊन झोपली. ती डोळे मिटून घेतली आणि मनोमनी देवाच्या धावा करू लागली, पोटच्या लेकरांसाठी नवऱ्याचे मार खाल्ली तर मला वाईट वाटलं नसतं. पण मी त्याच्याच भल्यासाठी सांगायला गेलं आणि फुकटचा मार खाल्ला. देवा एवढी कठोर परीक्षा पाहू नको. पदरात फक्त एक मूल दे, बाकी तुला माझं काही मागणी नाही. देवाला आठवण करीत करीत ती झोपी गेली.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग चौदावा

14

बघता बघता दोघांचे लग्न होऊन आठ वर्षे संपून गेले पण अजूनही घरात पाळणा हलला नाही. त्याच्या सोबत लग्न झालेल्या काही मित्रांना लेकरं झाली आणि ते शाळेत देखील जाऊ लागली. लेकरू व्हावं म्हणून  सुशांत आणि सुमती यांनी अनेक ठिकाणच्या दवाखानाच्या वाऱ्या केल्या. अनेक खाजगी उपचार केले. सुमतीने तर एवढा उपास तपास केला की,आठवड्यातले एक-दोन दिवसच ती जेवण करीत होती. बाकी सर्व दिवस कोणत्या ना कोणता देवाच्या वा देवीच्या नावाने उपवास करायची. पण अजून पावेतो त्यांना देवाने यश दिले नव्हते. राहूनराहून ही गोष्ट सुशांत पेक्षा सुमतीला अपार दुःख देऊन जात होती. प्रत्येक स्त्री आई होण्यासाठी उत्सुकलेली असते, त्याशिवाय तिचे जीवन अपूर्ण असल्यासारखे वाटते. ज्यांना लेकरू होत नाही अश्या स्त्रियांना समाजात वावरताना अनेक गोष्टीला तोंड द्यावे लागते. पुरुष मंडळींना याचे काही सोयरसुतक नसते. याच जीवघेण्या अनुभवातून सध्या सुमती जात होती. आज तिच्या कानावर तर भलतेच ऐकू आले होते. सुशांतच्या आईने थेट तिला काही म्हटले नाही पण त्यांच्या शेजारी-पाजारी लोकांमध्ये ती सांगत सुटली की, सुशांतला आता लेकरूबाळ होत नाही, आता राजूलाच त्यांना दत्तक घ्यायला लावतो. ही वार्ता हळूहळू सुमतीच्या कानावर येऊन धडकली. तशी ती खूपच बेचैन झाली. काही दिवसापासून सुशांत देखील राजुच्या प्रत्येक मागणी पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष देऊ लागला असल्याचे जाणवत होते. कानावर आलेल्या बातमीची सत्यता कशी पडताळून पहावी ? याविषयी सुमती विचार करू लागली पण तिला काही तोडगा मिळत नव्हता. यावर्षी राजू दहावीची परीक्षा देणार होता. म्हणून तिने जेवता जेवता दहावीनंतर काय करायचा आहे ? असा सहज विषय काढला. पुढे इथल्याच शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पुढे शिकायचं आहे. असे राजुने आपले मत व्यक्त केले. त्यावर सुमतीला जराशी कुणकुण लागली की, आपल्या कानावर आलेली बातमी सत्य आहे. ती रोजच देवाकडे धावा करत होती. देवाला खूप विनवणी करत होती. राजुला दत्तक घेण्याच्या विषयावर सुशांत आणि सुमतीमध्ये खूपदा वाद झाले. आपण एखाद्या अनाथाश्रमातून एखाद्या वर्षाचे बाळ दत्तक घेऊ या असा विचार देखील तिने व्यक्त केला होता. पण त्यावर त्याने त्या अनोळखी बाळापेक्षा माझ्या ताईचा मुलगा काय वाईट आहे. तो गरीब आहे. त्याला एक सहारा मिळेल. त्याचे जीवन सुंदर होईल, तू असा का विचार करत नाही. शेवटी किती झालं तरी आपल्या रक्ताचं नातं आहे. यावर ती निरुत्तर झाली. देव वरचेवर परीक्षा कठीण करत आहे, असे तिला वाटू लागले. अजूनही तिचा देवावर विश्वास होता. भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं या म्हणीप्रमाणे तिचे दवाखान्यात जाणे-येणे चालूच होते. रुटीनप्रमाणे त्या दिवशी ते दोघे दवाखान्यात तपासणी करण्यासाठी गेले. डॉक्टरांनी तपासणी करून पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याची आनंदाची व गोड बातमी दिली. तब्बल आठ-नऊ वर्षानंतर तिला दिवस गेल्याची बातमी तिच्या तनामनाला आनंदाची लहर देऊन गेली. सुशांतला देखील खूप आनंद झाला. ही गोड बातमी त्याने आई-वडिलांना देखील कळविली. सारेच आनंदात होते फक्त काहीजणांना सोडून. डॉक्टरांनी गोड बातमी सांगितल्यापासून तिला तर स्वर्ग फक्त दोन बोटे उरली होती. देवाने शेवटी आपली हाक ऐकली, आपली मागणी पूर्ण केली म्हणून तिने देवाचे मनोमनी खूप आभार मानले. सुशांत देखील आपण बाबा बनणार असल्याची बातमी ऐकून मनोमन सुखावला होता. त्याच दरम्यान राजुची दहावीची परीक्षा संपली आणि तो सुट्टीमध्ये आपल्या गावी परत आला. सुमतीला आता विश्रांतीची आणि गर्भातील बाळाची काळजी घेण्याची आवश्यकता होती. तिथे राहून तिला कोणतेही काम करणे अशक्य होते. आपलं बाळ सुखरूप राहावे याची तिला चिंता आणि काळजी लागली होती. म्हणून तिने सुशांतला विनंती केली की तिला आपल्या माहेरी जाऊ देण्याची परवानगी द्यावी. तुम्ही काही दिवस मेस लावून घ्या आणि वेळेवर जेवण करत राहा. सुट्टीच्या दिवशी कधी गावाकडे तर कधी माझ्याकडे या, असे म्हणाली. यावर तो देखील आढेवेढे न घेता परवानगी देऊन टाकली. सुट्टीच्या दिवशी ते दोघे तिच्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी तो परत आपल्या कामावर आला. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग - पंधरावा

घरात छोटे बाळ येणार या आनंदात सुशांत आणि सुमती यांचे दिवस आनंदात जात होते. याच दरम्यान अजून एक आनंदाची गोष्ट घडली की, सुशांतला त्याच्या कंपनीत बढती मिळाली. आता तो पंधरा कर्मचाऱ्याचा बॉस झाला होता. बॉस झाल्यामुळे जरा मेहनत कमी झाली पण जबाबदारी वाढली. पूर्वी काम संपले की घरी निघून जाता येत असे पण बॉस झाल्यामुळे सर्व कामाची देखरेख करून सर्व व्यवस्थित पूर्ण झाले का याची खातरजमा करूनच बाहेर पडावे लागत होते. त्यामुळे घरी परत येण्यासाठी वेळ लागू लागला. कधी कधी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कंपनीत थांबून काम पाहावे लागू लागले. सुमतीला सातवा महिना लागला होता. त्यानिमित्ताने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला सुशांत, त्याचे आई-वडील, बहिणी सर्वजण उपस्थित झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. अनेक पाहुणे, नातलग आणि मित्र परिवारात डोहाळे जेवणाचा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम संपल्यावर सर्वजण आपापल्या घरी गेले आणि सुशांत आपल्या कामावर परतला. 

सुमतीला एक एक दिवस मोजावे लागत होते. तिला त्रास होता पण बाळाच्या सुखासाठी ती सर्व त्रास सहन करत होती. आपले मन रिझविण्यासाठी ती चांगले पुस्तक वाचत होती, धार्मिक पुस्तकाचे पारायण करीत होती. बाळावर चांगले गर्भसंस्कार व्हावे म्हणून ती सदा आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत होती तर तिची आई देखील तिची खूप काळजी घेत होती. महिन्यातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध पाणी घेत होती. इकडे सुशांत आपल्या कंपनीत व्यस्त राहत होता. दुपारच्या जेवणाचा डबा कंपनीत मिळत होता पण सायंकाळच्या जेवणाचे मात्र वांदे होऊ लागले होते. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यात एक राणी नावाची महिला कर्मचारी होती. राणी त्या कंपनीत येऊन जेमतेम एक वर्ष झाले असेल, तिने कंपनीत चांगला जम बसविला होता. ती दिसायला काळी सावळी होती पण तिचा चेहरा हसमुख होता आणि सुडौल बांध्याची होती. त्यामुळे तिला पाहताक्षणी जो तो तिच्याकडे आकर्षिला जात होता. सुशांतच्या घरापासून चार-पाच घरे सोडून ती एकटीच राहत होती. ती गरीब घरातील होती आणि तिचे आई-बाबा गावाकडे राहत होते. आर्थिक परिस्थितीमुळे ती या कंपनीत नोकरी करण्यासाठी आली होती. सुशांत सुरुवातीला तिच्यासोबत एक कर्मचारी म्हणून काम करत होता. मात्र बढती मिळाल्याने तो तिचा बॉस झाला होता. आपल्या बॉसचे सायंकाळच्या जेवणाचे वांदे होत आहेत हे तिला लक्षात आल्यावर तिने एक-दोन वेळा आपल्या घरी जेवायला बोलाविले. सुरुवातीला सुशांतने जेवण्यासाठी घरी येण्यास नकार दिला होता. मात्र बाहेरच्या जेवणामुळे त्याला ही अपचनाचा त्रास होत होता म्हणून नाईलाजाने तो एक-दोन वेळा राणीकडे जेवायला गेला. लगेच कंपनीत सुशांत आणि राणी यांच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली. काही काम पडले की, राणी सुशांतकडे जात होती. कामानिमित्त जरी ते एकत्र आले तरी सहकारी कर्मचारी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. दोघांच्या मनात तसे काही नव्हते. पण लोकांच्या कुजबुज करण्यामुळे त्यांना कसे तरी वाटायला लागले. त्यांच्या मनात नसले तरी नियतीने त्यांना वारंवार एकत्र येण्याची योग घडवीत होता. कंपनीत आता सर्वत्र त्या दोघांच्या नावाची खूपच चर्चा होऊ लागली होती. राणीच्या मनात काय आहे ? हे सुशांतला माहीत नव्हते आणि सुशांतच्या मनात काय चालू आहे ? हे राणीला माहीत नव्हते. पण दोघेही मूक संमतीने वागत होते. लोकांची चर्चा त्यांच्या कानावर येत होती तसे ते दोघे चलबिचल होत होते. सुशांत एक विवाहित पुरुष आहे आणि त्याची पत्नी बाळंतपणसाठी माहेरी गेली आहे हे सर्वाना माहीत होतं पण राणी कोण आहे ? तिची पार्श्वभूमी काय आहे ? याविषयी कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि सुशांतला देखील काहीच माहिती नव्हती. ती एक गरीब, असहाय आहे एवढंच काय ते माहिती सर्वाना होती. पण राणीचे खरे रूप जरा वेगळे होते. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग सोळावा

सुशांतच्या कंपनीत काम करणारी राणी ही एक घटस्फोटित महिला होती. त्याच आधारावर तिला कंपनीत नोकरी मिळाली होती. ती एक महत्त्वाकांक्षी स्त्री होती. स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवावे असे तिला वाटायचे. पाच वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. पण तिचे नवऱ्यासोबत कधीच जमले नाही. त्याचे म्हणणे होते की, स्त्रियांनी नोकरी करण्यासाठी घराबाहेर जायचं नाही. नवरा कमावतो आणि बायकोच्या सर्व ईच्छा तो पूर्ण करत असेल तर बायकांनी नोकरीसाठी बाहेर जायचे कशाला ? यावर ती म्हणायची, मग मी जे शिक्षण घेतलं, त्याचा उपयोग कशासाठी करायचा. मी सुद्धा नोकरी केली तर आपल्या घरालाच हातभार लागेल. तसेच मी नोकरी केली नाही तर मला काही काम पडले तर प्रत्येकवेळी नवऱ्यासमोर हात पसरून पैसे मागावे लागतील, हे मला पटणारे नाही. याच गोष्टीवरून त्या दोघांचे रोज वाद व्हायचे. शेवटी तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि हेकेखोर नवऱ्यापासून मुक्ती मिळविली. काही दिवस आपल्या माहेरी राहिली. आई-बाबा तिच्या हट्टीपणामुळे काहीच बोलू शकत नव्हते. त्यामुळे बाहेरचे लोकं कितीही काही बोलले तरी ते गप्प ऐकून घेत होते. एक-दोन महिन्यांनी कंपनीचा कॉल आला आणि ती या कंपनीत रुजू झाली. कोणी काही बोलो तिला काही फरक पडणार नाही अशी ती एक बिनधास्त महिला होती. सुशांतचा स्वभाव तिला खूप आवडला होता म्हणून तर ती त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होती. पण सुशांतच्या मनात तसे काही नव्हते. तो एक भोळा आणि सरळ माणूस होता. याचाच फायदा घेऊन ती त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होती. सुशांतच्या मित्रांनी त्याला राणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ती जशी दिसते तशी नाही. त्यामुळे वेळीच सावध होण्याविषयी त्याला अनेकांनी सांगितलं पण तिच्या गोड बोलण्यात सुशांत फसत चालला होता. काही ना काही काम काढुन ती सुशांतच्या जवळ जायची आणि प्रेमाने बोलायची. सुशांतला ते हवेहवेसे वाटू लागले. तो नकळत कधी तिच्या जाळ्यात अडकला हे त्याला कळालेच नाही.
इकडे दवाखान्यातून सुशांतला गोड बातमी समजली. त्याला ट्विन्स मुली झाल्या होत्या. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे कळविण्यात आले. त्याने कंपनीत सर्वाना पेढे आणून वाटले आणि लगेच बाळाच्या भेटीसाठी गेला. दवाखान्यात तिची आई सोबत होती. तो थेट दवाखान्यात गेला. दोन्ही लेकरांना पाहून तो एकदम खुश झाला आणि त्याला धन्यवाद देखील दिला. त्यादिवशी तो तिथेच दवाखान्यात थांबला. सुमती आणि सुशांत खूप वेळ गप्पा मारल्या. बाळ झाल्यावर सुमती आनंदी दिसायला हवं पण ती जरा उदास दिसत होती. हे सुशांतच्या नजरेतून सुटले नाही. लगेच तो म्हणाला, " काय झालं, एवढी उदास का दिसतेस ? मुलगी जन्मास आली म्हणून तू नाराज आहेस का ? " यावर ती म्हणाली, " नाही हो, तसे काही नाही. " वास्तविक पाहता सुशांतचे आणि राणीचे किस्से तिच्या काना पर्यंत पोहोचले होते. पण यावेळी विषय काढणे तिला जरा अवघडल्यासारखे वाटले म्हणून ती विषय बदलत म्हणाली, " तुमच्या जेवणाचे खूप वांदे झाले आहेत, बघा किती रोड दिसत आहात तुम्ही. अजून तीन महिने तरी तुमच्या जेवणाचे वांदे होऊ शकतात." यावर तो काहीच बोलला नाही. फक्त होय एवढंच बोलला. सुमतीच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले होते तर सुशांतच्या डोक्यात काही वेगळेच चालत होते. सकाळी तो दवाखान्यातून थेट कंपनीकडे गेला. मुलगी जन्माला आल्याबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. तसे राणीने ही अभिनंदन केले आणि म्हणाली, " बॉस, पार्टी द्यावी लागेल सर्वाना." राणीच्या बोलण्यावर सर्वांनी सुशांतला पार्टीची मागणी केली. आनंदाची गोष्ट आहे तेव्हा नकार देऊन कसे चालेल. म्हणून त्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी पार्टी देण्याचे निश्चित केले. कामाच्या घाईत दोन-चार दिवस निघून गेले. रविवारचा दिवस उजाडला. कंपनीतील सर्व कर्मचारी त्याच कॅम्पस मध्ये राहत होते. त्यामुळे सर्वांनी सायंकाळी सुशांतच्या घरी एकत्र येण्याचं ठरलं आणि नियोजित वेळेनुसार सर्वजण उपस्थित झाले. पार्टी म्हटले की, काही जणांना दारू पिण्याची लहर येते. त्यानुसार दोन-चार मित्रांनी आपले आवडते पेय सोबत आणलेले होते. सुशांतने छान पैकी नॉन व्हेज भाजी तयार केली. एका मित्राने घरून येताना भाकरी आणल्या होत्या. त्या पार्टीत राणी मात्र आली नाही. सर्वांचे जेवण झाल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. राणीला या पार्टी मध्ये केलेली भाजी नेऊन द्यावे म्हणून सुशांत भाजी घेऊन राणीच्या घरी गेला. घरात ती एकटीच बसलेली होती. त्याने दारावर टकटक केल्याबरोबर राणीने दरवाजा उघडला. तेव्हा तो म्हणाला, " ही घे भाजी, स्वतः मी बनविली आहे." त्यावर तिने धन्यवाद म्हणाली आणि मी जेवण करेपर्यंत घरात येऊन बैस, मला एकटीला जेवण करताना कंटाळा येतोय, असे बोलली. यावर तो तिच्या घरात जाऊन बसला. ती आपले जेवायचे ताट घेऊन आली आणि गप्पा मारू लागली. गप्पा मारता मारता ती बाळाची व तिच्या आईच्या तब्येतीविषयी विचारली आणि त्याने उत्तर दिले. गप्पा मारता मारता तिचे जेवण संपले. छान भाजी केलंस म्हणून तिने कौतुक केलं. त्याला बरं वाटलं. माझी बायको सुमती कधी अशी लाडात येऊन बोलतच नाही, जेव्हा केव्हा मोठ्या आवाजात नाहीतर रागात बोलते. हे ऐकून राणी जरा लाजली. तिचे लाजणे देखील त्याला आवडले. गुड नाईट म्हणून तो आपल्या घरी निघून गेला. पण त्या रात्री त्याला डोळ्याला डोळा लागला नाही. वारंवार राणीचे बोलणे आणि लाजणे त्याच्या डोळ्यासमोर तरळत राहत होते. त्याच्या मनात राणीविषयी कुठे तरी प्रेम व आपुलकी निर्माण होऊ लागली होती. जेव्हापासून राणी व सुशांत यांच्या विषयीचे किस्से सुमतीच्या कानावर आले त्या दिवसापासून ती बेचैन होती. सुशांतवर तिचा विश्वास होता मात्र राणी वर अजिबात नव्हता. त्यामुळे ती जरा चिंतेत दिसत होती. कधी एकदा सुशांतकडे जातो असे तिला न्हाळे होते. तिच्या घरी बाळाच्या अगमना प्रित्यर्थ एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ती सुशांत सोबत जाणार होती. त्या कार्यक्रमाला अनेक पाहुणे, मित्रमंडळी, नातलगांना आमंत्रण दिले होते. सुशांतने कंपनीतील आपल्या मित्रांना देखील आमंत्रण दिले होते. त्यामुळे ते सर्व मित्र देखील त्या कार्यक्रमाला आले होते, त्यात राणी देखील होती. कंपनीतील सर्व मित्रांची जवळपास ओळख होतीच त्यामुळे सुशांतने फक्त राणीची ओळख करून दिली. राणीला ती वरून खालपर्यंत एक वार नजर टाकली. तिला पाहताक्षणी कोणीही तिच्यावर भाळून जावं अशी ती बला होती, हे पाहिल्यावर लक्षात आलं. तिने बाळाच्या हातात शंभराच्या नोटा ठेवली व हसत हसत तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सुमती, सुशांत व त्यांच्या दोन मुली रिद्धी व सिद्धी आपल्या घरी जाण्यास निघाले. गेली वर्षभर सुमती माहेरीच होती. दोन लेकरांना घेऊन कशी सांभाळ करील अशी चिंता तिच्या आईला लागली होती तर घरी गेल्यावर डोळ्याला काय बघायला मिळेल आणि अजून काय काय कानावर ऐकायला मिळेल याची काळजी सुमतीला लागली होती. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग सतरावा

कामवाली बाईच्या मदतीने ती आल्या आल्या आपले घर स्वच्छ व टापटीप करून घेतले. गेली वर्षभर घरात बाई माणूस नसल्याने घराचा पुरता उकंडा झाला होता. तसे तर सुशांतला स्वच्छ राहायची सवय आहे, घरात सुमतीला स्वछतेच्या बाबतीत कित्येकदा बोलणी खावे लागले होते, याची तिला जाणीव होती. पण ती काही एक न बोलता घरातील जाळी व जलमटी काढून घर एकदम चकाचक केले. त्या कामवाली बाईला एका दिवसासाठी नाही तर अजून काही महिने कामावर येण्याची विनंती केली. ती बाई देखील काम करण्यासाठी तयार झाली. घर साफ सफाई करणे, घरातील भांडे घासणे, कपडे धुणे आणि बाळाला अंघोळ घालण्याची दिवसभराची कामे तिला करायची होती. शक्य असेल तेव्हा अडचणीच्या वेळी स्वयंपाक देखील करण्यासाठी तिने होकार दिला. हे ऐकून तिला जरा बरे वाटले. घराची सफाई झाल्यावर तिने गरमागरम चहा केला आणि दोघांनी त्याचा आस्वाद घेतला. रिद्धी आणि सिद्धी चांगले खेळत होते. त्या लेकरांना पाहून कामवाली बाई म्हणाली, किती सुंदर आहेत हो बाई, तुमच्या जुळी मुली.' म्हणून लगेच त्यांची दृष्ट देखील काढली. ती घरी जाऊन येतो म्हणून बाहेर पडली. सायंकाळच्या वेळी सुशांत कंपनीत घरी येताना रात्रीसाठी भाजीपाला घेऊन आला. तिने छान स्वयंपाक केला आणि दोघे गप्पा मारत मारत जेवण केले. कामवाली बाई सकाळी कामावर येणार होती म्हणून ती सर्व भांडी कुंडी तशीच ठेवली. आनंदात दोघे ही झोपी गेले. 
राजू दहावीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला. आपल्यासारखे त्याने राजुला आयटीआय करण्याचा सल्ला दिला आणि शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राजुला आता स्वतःजवळ ठेवून घेणे सुशांतला अवघड जाणार होते, याची त्याला कल्पना होती आणि घराकडून देखील तसे काही बोलणे झाले नव्हते. पण राजू गावाकडून कॉलेज ला कसा येईल म्हणून त्याने एक जुनी सायकल खरेदी करून दिली. त्या सायकलवर तो रोज कॉलेजला यायचा आणि कधी तरी घरी यायचा. सुमतीला आता राजू विषयी आपुलकी वाटू लागली कारण ती स्वतः आता एक आई बनली होती. तिच्या मनात राजू विषयी कणव निर्माण झाली. ती त्याची चांगली विचारपूस देखील करू लागली. शिकून आपल्या मामासारखा मोठा माणूस हो अशी त्याला नेहमी म्हणायची. तो देखील हो मामी म्हणून काही वेळ तेथे थांबायचा आणि आपल्या गावी परत यायचा. 
रिद्धी आणि सिद्धी चंद्रकलेप्रमाणे वाढत होते. त्यांच्या बोबडी बोलीने घर सारा आनंदून जात होता. सुशांत आणि सुमिता दोघांच्या जीवनात लेकराने एक नवी लर आणली होती. असेच सुखाचे दिवस नेहमीच राहावे असे प्रत्येकांना वाटत असते मात्र नियतीला ते मान्य नसते. सुशांतच्या वडिलांचे अपघात झाल्याची बातमी आली, तसा सुशांत गावाकडे गेला. अंगणात चालत असताना वडिलांचा तोल गेला आणि ते खाली पडले. एक बाजू काम करत नव्हती. त्यांना लकवा मारला होता.  दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार केले. दोन-चार दिवसांनी ते घरी आले. त्यांना स्वतःहुन काहीच हालचाल करता येत नव्हती. तोंड देखील जरा वाकडे झाल्याने नीट बोलता देखील येत नव्हते. एकप्रकारे ते आता अधू झाले होते. त्यांना बेड रेस्ट आवश्यक होती. सर्व औषधपाणी देऊन काळजी घ्या म्हणून तो परत गेला. माणसाच्या जीवनात आजारपण येऊ नये, कारण आजार माणसाला एवढा विकलांग करून टाकतो की, जीवन जगावे असे त्याला वाटतच नाही. सदा ना कदा त्याच्या मनात माझी या मरणयातनेतून कधी एकदा सुटका होते, असे वाटते. नाना प्रकारचे विचार डोक्यात येत राहतात. त्यातल्या त्यात लकवा झालेल्या माणसाची अवस्था तर खूपच बिकट असते. त्याच्या आजारपणात चांगला धडधाकट व्यक्ती देखील बेजार होऊन जातो. तीच काही अवस्था सुशांतच्या आईची होत होती. पलंगावरच जेवणे आणि पलंगावरच त्यांच्या सर्व क्रिया होत होत्या. सोबतीला बघायला गेलं तर मुलगी होती पण कधी कधी ती देखील घरी राहायची नाही त्यावेळी खूप पंचायत होत असे. ती राहून राहून विठ्ठलाच्या धावा करीत असे, पांडुरंगा, काय पाप केलं म्हणून असे दिवस माझ्यापुढं आणून ठेवलास, असे ती म्हणायची. सुशांतचे वडील सुद्धा आजाराने त्रस्त झाले होते. त्यांनी देखील देवाकडे मागणी केली, पांडुरंगा मला या जाचातून मुक्ती दे. पांडुरंगाने त्याची आर्त हाक ऐकली आणि रात्री झोपेतच तो निद्रिस्त झाला. सकाळी बाबा गेल्याची बातमी सर्वत्र पसरली. सुशांत आपल्या पत्नी लेकरासोबत आला. पुण्याहून बहीण व तिचा नवरा आला. धाकट्याची पत्नी काही आली नाही. सुशांतने आपल्या हाताने अंत्यसंस्कार केला. काही दिवस त्याला गावाकडेच राहावे लागले. कंपनीत किती दिवस सुट्टी मिळू शकते. जास्तीत जास्त एक आठवडा त्यानंतर कामावर जाणे आवश्यक असते. पण बाबांचे सर्व क्रियाक्रम केल्याशिवाय त्याला गाव सोडणे अशक्य होते. कोणतीही तिथी अर्धवट सोडून गेल्यास लोकं काय म्हणतील ? या विचाराने तो थांबला. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग आठरावा

वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्व क्रियाक्रम करेपर्यंत तीन आठवड्याचा काळ उलटला. तोपर्यंत त्याला गावाकडेच राहणे आवश्यक होते. म्हणून तो थांबला. इकडे कंपनीत त्याच्या जागेवर एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली. सुशांतच्या जागेवर आलेला कर्मचारी मन लावून काम करत होता. तीन आठवड्यानंतर कंपनीत रुजू होण्यासाठी गेला. पण त्याला त्याच्या पूर्वीच्या जागेवर नोकरी मिळाली नाही. कंपनीत सुरुवातीला जे पद होते त्या पदावर एक कर्मचारी म्हणून काम करण्याची त्याच्यावर वेळ आली. त्याचे बॉस असलेले पद मिळाले नाही. याविषयी तो कंपनीच्या मालकांशी बोलला पण काही फायदा झाला नाही. शेवटी नाईलाजास्तव त्याने ते मूळ पद स्वीकारले. बॉस म्हणून काम केलेल्या सुशांतला त्याच कंपनीत कर्मचारी म्हणून काम करतांना कसे तरी वाटत होते. काम करण्यात विशेष रुची वाटत नव्हते त्याला दुसरे एक कारण म्हणजे आता त्याच्या ग्रुप मध्ये राणी देखील नव्हती. त्यामुळे अजून त्याला अस्वस्थ वाटत होते. दुसरीकडे याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळणार ही नव्हते त्यामुळे तो रडत पडत तिथे काम करू लागला. राणीला देखील सुशांत शिवाय काम करण्यात विशेष रस वाटत नव्हता. सुशांतची आणि तिची भेट अशी सहजासहजी होत नव्हती. जेव्हा दुरावा निर्माण होते, भेटी होण्यात अनेक संकटे येतात त्यावेळी प्रेम उफाळून येते. मनात एक प्रकारची उत्कंठा व उत्सुकता लागलेली असते आणि भेट होण्यासाठी मग नाना प्रकारच्या कल्पना डोक्यात येत राहतात. सुशांत तिच्या घरासमोरून जात होता पण विनाकारण घरात जाण्याची हिंमत होत नव्हती. यावर राणीने एक शक्कल लढवली. सुशांतला बाजारातून एक वस्तू आणण्यासाठी विनंती केली. सुशांतला तर इतरांना मदत करण्याची सवय होती. आपल्या सवयीप्रमाणे तो राणीने सांगितलेल्या वस्तू बाजारातून आणून दिल्या. त्यानिमित्ताने त्याला राणीच्या घरी जाता आले. हा चांगला बहाणा राणीला मिळाला होता. त्यामुळे ती नेहमीच त्याला काही ना काही बाजारातून वस्तू आणण्यासाठी सांगू लागली व तो देखील ती वस्तू राणीला आणून देऊ लागला. आता त्यांची रोजच गाठीभेटी होऊ लागल्या. तशी ही गोष्ट सुमतीच्या कानावर जायला वेळ लागला नाही. घरी जी कामवाली बाई होती, ती एका जासूस प्रमाणे तिला हर एक माहिती देत होती. त्यामुळे तिचे डोके अजून गरगरत होते. त्यादिवशी सायंकाळी देखील सुशांत राणीच्या घरी जाऊन आला होता. घरी आल्याबरोबर सुमतीने त्याला त्याबाबत विचारणा केली. असता तो समाधानकारक उत्तर देत नव्हता. ती वारंवार एकच प्रश्न विचारत होती, ' तुम्हीच का मदत करता तिची ? दुसरे कोणी मिळत नाही का तिला ? हे बंद व्हायला पाहिजे.' असे बोलणे ऐकून सुशांतचे डोके भनकले, तो तिला गप्प राहण्याच्या सूचना केल्या. ती बिचारी एकटी आहे, तिला काही गोष्टी बाजारातून आणून देऊन मी फक्त तिला मदत करतो. यापलीकडे काही नाही असे तो म्हणाला. पण लोकं तुमच्याविषयी व राणीविषयी काय बोलतात ? हे तरी तुम्हाला माहित आहे की नाही. तिच्या या बोलण्यावर तो म्हणाला, लोकं काय म्हणतात याचे मला काही घेणे देणे नाही. तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे की नाही. की तू पण लोकासारखे समजतेस मला. यावर ती काय बोलणार ? बिचारी निरुत्तर झाली. दोघे ही अगदी चुपचाप जेवण करून झोपी गेले. दिवसेंदिवस त्यांचे दोघांचे भेटणे वाढत होते आणि इकडे सुमतीच्या मनात चलबिचल चालू होतं. सुशांतवर पूर्ण विश्वास होता पण राणीवर नव्हता. ती एक ना एक दिवस सुशांतला आपल्या मुठीत घेईल आणि माझा संसार उध्वस्त होऊन जाईल ही अनामिक भीती तिच्या काळजात घर करून होते. म्हणून ती जास्त काळजी करत होती. पण सुशांत काही समजून घेण्यास तयार नव्हता, तो फक्त एवढंच म्हणायचा, मी तसा माणूस नाही. मला जर वाटले असते तर केव्हाच की मी तिच्यासोबत घरोबा केला असतो. पण मी तसा केलोय का ? नाही ना ! नेहमी हेच उत्तर ऐकून सुमती देखील त्याला त्या विषयावर बोलणे सोडून दिले. कितीदा जरी सांगितलं तरी सुशांत ऐकत नाही म्हणून ती आता गप्प गुमान काय होते हे बघत राहण्याचा निश्चय केली. 

सुटीचा दिवस होता. सुशांत अगदी सकाळीच तयार होऊन बाहेर पडला. जातांना फक्त ' जातो मी' एवढंच बोलला. तेव्हा ती म्हणाली, जाताना कधी ही जातो मी म्हणू नये तर येतो मी असं म्हणायचं. पण तो न ऐकताच निघून गेला. आज राणीचा वाढदिवस होता. त्यामुळे तो तिच्यासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता. ठरल्या वेळाप्रमाणे ते शहराबाहेरील एका ठिकाणी भेटण्याचे ठरविले होते. त्याठिकाणी ते दोघे भेटले. सुशांत एकीकडे तिच्यावर प्रेम नाही असे छाती ठोकून सांगत होता. आज ही तो तिच्या हट्टीपणामुळेच गेला होता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी सांगितलेल्या ठिकाणी आला नाहीस तर माझं मेलेलं तोंड पाहशील अशी ती बोलली म्हणून तो तिला भेटण्यासाठी गेला. बराच वेळ गप्पा टप्पा झाल्यावर ते दोघे परत जाण्यासाठी निघणार तेवढ्यात तोंडावर रुमाल बांधलेले दोन तरुण तिथे आले. एकाने सुशांतवर हल्ला करून त्याला गच्च पकडले. जवळच असलेल्या झाडाला त्याला बांधून टाकले. राणी खूप ओरडू लागली होती पण ऐकायला तिथे जवळपास कुणीच नव्हते. दोघांपैकी एकाने राणीला गच्च धरून ठेवला आणि सुशांत समोर तिच्यावर अमानुष अत्याचार केला. दुसऱ्या तरुणाने देखील आपली हवस पूर्ण केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर तिचा गळा दाबून खून केला. त्या दोघांच्या वर्तनावरून असे वाटत होते की, ते दोघे पूर्वीपासून राणीला ओळखत असावे आणि आपली जुनी दुश्मनी काढण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले. अन्यथा सुशांतला असे जिवंत सोडले नसते. तोंडावर रुमाल बांधलेले असल्याने ते दोन तरुण कोण होते ? कुठले होते ? हे सुशांतला ओळखू येणे कठीण होते. थोड्याच वेळात राणी जमिनीवर शांत झाली. तसे ते तिथून पळून गेले. सुशांतने कसेबसे बांधलेल्या दोरीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्याला काहीच सुचत नव्हते. झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना द्यावी की नाही ? या विचारात तो विचार करू लागला.  पुढे काय करावं ? त्याला काहीच सुचत नव्हतं. आपल्या डोळ्यासमोर राणीचा खून झाला आणि आपण काहीच करू शकलो नाही याचा त्याला स्वतःवर खूप राग येत होता. तो प्रश्नार्थक चेहऱ्याने राणीच्या मृतदेहाकडे टकमक बघत होता. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग - एकोणीसावा

सायंकाळ होत आली होती. सुशांतच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. पोलिसांना जाऊन सांगावं तर उलट पोलीस मलाच त्रास देतील ? तुम्ही दोघे इथे कशासाठी आलात ? तुमच्या दोघांचा संबंध काय होता ? राणीचा खून कोणी केला ? त्यावेळी तू काय करत होतास ? खून केलेल्या लोकांना तुम्ही ओळखता का ? असे नाना प्रकारचे प्रश्न पोलीस विचारतील आणि त्यांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे काय उत्तर राहणार आहे. खरं तर मी राणीच्या हट्टामुळे येथे आलोय. पण आता लोकं काय विचार करतील ? असे विचारचक्र त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. शेवटी आपले मन घट्ट करून सुशांतने आपला काढता पाय घेतला. सकाळी आनंदात गेलेली स्वारी सायंकाळी मात्र उदास चेहरा घेऊन परत आली. खूप वेळ लावलात, कुठे गेला होतात, एवढा वेळ ? सुमतीने आल्या आल्या त्याला विचारलं पण तो काहीच बोलला नाही. हात-पाय धुतला आणि पलंगावर जाऊन बसला. डोकं दुखतंय का, चहा करून देऊ का म्हणून तिने विचारपूस केली. पण त्याने नको एवढंच बोलला. जेवताना तो देखील तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त राणी आणि तिच्यासोबत आज झालेली घटना तरळत होती. तो मनातून घाबरलेला होता. उद्याची सकाळ कशी असेल ? उद्या काय होईल ? याची त्याला काळजी लागलेली होती. त्याच विचारात तो रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत होता पण त्याला झोप काही लागत नव्हती. मोबाईल रिंगने त्याला जाग आली. तो मोबाईल उचलला तसं पलीकडून त्याच्या मित्राचा आवाज होता, तो म्हणाला, " सुशांत, काल राणीचा खून झाला म्हणे, आज सकाळी पोलिसांना तिचा मृतदेह शहराच्या बाहेर सापडला." त्याला यातलं काहीच माहीत नसल्यासारखे तो फोनवर मित्राला म्हणाला, " ऑ .... खरं काय ? " मित्राने हो म्हणून फोन कट केला. राणीचा खून झाल्याची बातमी हा... हा.... म्हणता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. तशी बातमी सुमतीच्या कानावर देखील आली. पहिल्यांदा तर तिला वाईट वाटलं पण नंतर मनातल्या मनात म्हणाली, बरं झालं, सटवी माझ्या नवऱ्याला गिळायला चालली होती. कंपनीत देखील राणीच्या खुनाची सर्वत्र चर्चा चालू होती. थोड्याच वेळात दोन पोलीस राणीच्या खुनाबाबत काही माहिती मिळते का म्हणून कंपनीत आले. त्यांनी सर्वांची कसून चौकशी केली. तशी सुशांतची पण चौकशी केली. कालचीच घटना होती त्यामुळे तो मनाने चलबिचल व अस्वस्थ होता. पण त्याने मनाशी पक्की खूणगाठ बांधली होती की, कालची घटना कुणालाही सांगायचं नाही. म्हणून तो पोलिसांसमोर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. राणी सोबत तुमचे संबंध चांगले होते असे अनेकजण सांगितले त्याविषयी सांगा म्हटल्यावर तो म्हणाला, " होय, आमचे संबंध मैत्रीपूर्ण होते. ती एक चांगली महिला होती. तिला काही गरज पडेल तेव्हा मी तिला माणुसकी या नात्याने मदत करत होतो. त्यापलीकडे काहीही नव्हते. ठीक आहे म्हणून सुशांतला जाऊ देण्याची परवानगी दिली. पण पोलिसांची संशयाची सुई सुशांत भोवतीच फिरत होती. पोलिसांना घटनास्थळी कोणताच पुरावा सापडला नाही. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून गळा दाबून खून करण्यात आला. जर सुशांतचे राणीवर खरोखरच प्रेम राहिले असते तर तो तिचा खून का करेल ? तिचा खून झाल्याने खरंच सुशांतला काही फायदा होणार होता का ? सुशांतच्या जवळच्या मित्रांनी सुशांतचे वर्णन केले त्यावरून तो खून करेल असे पोलिसांना वाटले नाही. काही दिवसांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट आले. त्यानुसार सुशांतची रक्त तपासणी झाली. त्यांचे बोटाचे ठसे घेतले गेले. पण कुठेही त्याच्याशी या खुनाचा संबंध येत नव्हता. दरम्यानच्या काळात सुशांत खूप तणावाखाली वावरत होता. आपल्या परम दैवत पांडुरंगाला त्याने साकडं घातलं तेव्हा या संकटातून सावरून घे. असाच वर्ष-दोन वर्षांचा काळ निघून गेला. राणीची फाईल काहीही तपास निष्पन्न न झाल्यामुळे बंद करण्यात आलं. सुमती आणि सुशांत या आषाढी एकादशीला आपल्या आईला सोबत घेऊन पायी वारी करण्यासाठी निघाले. पांडुरंगाच्या विटेवर नतमस्तक होऊन मनोमन दर्शन घेतले आणि दरवर्षी न चुकता वारी करण्याचा निश्चय केला. 

••••••••••• - समाप्त - •••••••••••••

Sunday, 18 June 2023

कथा - नवऱ्याचे मी पण ( Navryache mi pan )

कथा - नवऱ्याचे मी पण
- नासा येवतीकर, धर्माबाद

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा आणि कथा वाचनाचा आनंद घ्या. 
~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग आठवा ......... लवकरच येत आहे.

कथा वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला विसरू नका.

Thursday, 8 June 2023

पंढरीची वारी ( Pandhari Wari )

          पंढरीची वारी

तुकोबांची गाथा । ज्ञानोबाचे ज्ञान । 
नामाचे भजन । मुखी असे ।।

समर्थांचे श्लोक । नाथाचे भारुडे ।
चोखा मेळा घडे । संगतीत ।।

पहाटे काकडा । सायं हरीपाठ । सज्जनाची गाठ । कीर्तनात ।।

सावळा विठ्ठल । उभा तो पंढरी ।
चंद्रभागे तिरी । वाट पाही ।।

हरीचा तो भक्त । भजनात दंग ।
गातसे अभंग । रातदिन ।।

पायी दिंडी चाले । आषाढी कार्तिकी । 
हरी नाम मुखी । घरोघरी ।।

मन हे चंचल । नसे जरा स्थिर ।
वाहे सैरभैर । चहूकडे ।।

श्रावण मासात । पावसाचा जोर । 
जिवा लागे घोर । हर एक ।।

नको ती काळजी । करू नको चिंता ।
विठ्ठलच आता । मदतीला ।।

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Wednesday, 7 June 2023

विद्यार्थी लाभाच्या योजना ( Vidyarthi Labhachya Yojana )

01) शालेय पोषण आहार योजना ज्याचे सध्याचे नाव प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना

उद्देश्य - विद्यार्थ्यांची गळती कमी करणे आणि कुपोषण थांबवणे. 

इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणा-या शासकीय, निमशासकीय, खाजगी-अनुदानित शाळाांमधील सर्व विद्यार्थ्यांना यांचा लाभ मिळतो. ही योजना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहाराव यांनी 22/11/1995 पासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जून 2002 पासून शिजवलेले अन्न देण्यास सुरुवात झाली. 

शासकीय आदेशाप्रमाणे इ. 1ली ते 5 वी साठी 100 ग्रॅम ताांदूळ, तर इ. 6 वी ते 8 वी = 150 ग्रॅम ताांदूळ या प्रमाणात अन्न शिजवले जाते. 


02) मुलींचा उपस्थिती भत्ता 

उद्देश्य - दुर्बल घटकातील मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे. आणि शिक्षणातील सातत्य टिकावे. मुलींचे गळतीचे प्रमाण कमी होऊन उपस्थितीचे प्रमाण वाढविणे. 

1) इ. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या आदिवासी क्षेत्रातील व  दारिद्र्यरेषेखालील सर्व मुली. 

2) आदिवासी क्षेत्राबाहेरील अनु.जाती, अनु.जमाती, नवमुक्त जाती/भटक्या जमातीच्या मुलींना. 3) किमान उपस्थिती 75 टक्के असणाऱ्या मुलींना प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे मुलींचा उपस्थिती भत्ता दिला जातो. 

4) वर्षभरातील एकूण कार्यदिनापैकी 220 रु. अनुज्ञेय आहे. 

5) ही योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी म्हणजे 03 जानेवारी 1992 रोजी सुरू करण्यात आली. 


3) मोफत पाठ्यपुस्तक योजना

 इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, निमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी. या योजनेसाठी पात्र आहेत. 

उद्देश्य - ई. 1ली ते 8 वी मध्ये शिकणारे बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये. शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे


04) मोफत गणवेश योजना

 इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणाऱ्या शासकीय, निमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी. *अनु.जाती, अनु.जमाती व दारिद्र्यरेषेखालील सर्व मुले. वार्षिक दोन गणवेशाकरिता 600 रु. प्रति लाभार्थी याप्रमाणे अनुदान मिळते. 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश 

*इ. 1 ली ते 4 थी मध्ये शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, निमशासकीय शाळेतील अल्पसंख्याक विद्यार्थी. वार्षिक दोन गणवेशाकररता 400 रु. प्रती लाभार्थी


आदिवासी विद्यावेतन 

आदिवासी मुलींमधील गळती थांबवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता

विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे. 

1) इ. 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी. 2) अदिवासी / बिगर आदिवासी क्षेत्रातील सर्व आदिवासी विद्यार्थी (पालकाचे उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे.)

3) किमान 75 टक्के उपस्थिती 4) चांगली वर्तणूक व समाधानकारक प्रगती. मुले 500/- मुली 600/-

5) योजना सन २००३-०४ पासून सुरु करण्यात आली आहे. 


6) आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती 

विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे. 

1) सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील इ. 1 ली ते 10 वी च्या अनु.जमातींचे विद्यार्थी. 2) पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी. 3) विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बॅंकेतील खाते अनिवार्य. इ. 1 ली ते 4 थी = 1000/- इ. 5 वी ते 7 वी = 1500/- इ. 8 वी ते 10 वी = 2000/-


अस्वच्छ व्यवसायाचे काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती 

* मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे. * शिक्षणाची सोय करणे. इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणारे अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांची मुले. 110 रु.प्रति माह प्रति लाभार्थी(10 महिने फक्त) व 750 रु. वार्षिक अनुदान. एकूण=1850 रु.


समाज कल्याण विभागाकडून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती


उद्देश्य - मुलींची गळती थांबणे . 

इ. 5 वी ते 10 वी तील अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त-भटक्या, अनुसूचित जाती फक्त मुली. 

इ. 5 वी ते 7 वी = 60 रु. दरमहा

ही योजना 1995-96 मध्ये सुरू झाली तर  

इ. 8 वी ते 10 वी = 100 रु. दरमहा (फक्त 10 महिन्याकरिता)

ही योजना 2002-2003 मध्ये सुरू झाली. 


सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ( 1990 पासून सुरू झाली ) तत्कालीन शिक्षण संचालक वि वि चिपळूणकर यांनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली. 

आर्थिक / दुर्बल घटकातील विद्यार्थांना मदत करणे. आर्थिक / दुर्बल घटकातील विद्यार्थांना शाळा व्यवस्थापन समितीची सभेत पूर्व परवानगी घेणे, उपस्थिती 75 टक्के. 30 रु. दरमहा (फक्त 10 महिने)



अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत बस प्रवास ( 13 ऑगस्ट 1996 रोजी शासकीय परिपत्रक काढण्यात आले. )

मुलींना शिक्षण प्रवाहात आणणे.

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा देणे 

1) इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनी पुढे चालून ही योजना बारावी पर्यंतच्या मुलींसाठी करण्यात आली. 2) गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसेल तरच लाभ. 3) 75 टक्के उपस्थिती अनिवार्य राहत्या गावापासून शाळेपर्यांचा बस प्रवास मोफत.


राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांना नुकसान भऱपाई देणे. विद्यार्थाचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास / मृत्यू झाल्यास. मृत्यू = 75000 रु., कायम अपंगत्व = 50000 रु., एक अवयव / डोळा निकामी झाल्यास = 30000 रु.



पूर्व माध्यमिक /माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. इ. 4 थी व 7 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी. पुढील 3 वर्षासाठी शिष्यवृत्तीचा लाभ इ. 4 थी = 750 रु. प्रति वर्ष (5वी, 6वी, 7वी), इ. 7 वी = 1000 रु. प्रति वर्ष (8वी, 9वी, 10वी)


मुलींची सैनिकी शाळा - 

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा पिरंगुट जि. पुणे येथे आहे. 

* मुलींना सैनिकी शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे. 

* मागासवर्गीय मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत प्रवेश मिळवणे. 

* शिस्त, आत्मविश्वास, देशभक्ती, नेतृत्व विकसित करणे. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

* 1997 मध्ये सुरू झालेली, महाराष्ट्रातील मुलींसाठीची पहिली आणि देशातील दुसरी मिलिटरी स्कूल

*इयत्ता सहावी वर्गात येथे प्रवेश मिळतो. बौद्धिक व शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाते. 


मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह 

मागासवर्गीय मुलामुलींना शिक्षण घेता येणे. मागासवर्गीय मुलामुलींना प्रस्ताव सादर करणे. --------



शासकीय विद्यावेतन 

ग्रामीण, होतकरू, हुशार चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे व दर्जेदार शिक्षण देणे. स्पर्धा परीक्षा (गुणवत्ता निकषांनुसार इ. 5 वीत प्रवेश) --------



राजमाता जिजाऊ सायकल वाटप 

मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे. 

1)दुर्गम / अति दुर्गम / झोपडपट्टी / गलीच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य. 2) इ. 7 वीत किमान 45 टक्के गुण (अट) 3) दारिद्रय रेषेखाली असणे आवश्यक. प्रत्येकी एक सायकल इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना.



अल्पसंख्यांक प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती 

अल्पसंख्यांक मुलांना शिक्षणास प्रोत्साहित करणे. 

1) मुस्लीम, ख्रिचन, बौद्द, शीख, पारसी धर्मातील विद्यार्थी 2) शासकीय / नीमशासकीय, मानयताप्राप्त खाजगी शाळामधील अल्पसंख्यांक विद्यार्थी 3) 50 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक 4) एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 5) एका कुटुंबातील दोनच विद्यार्थांना शिष्यवृत्ती 6) 30 टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव. प्रति वर्षाला 1000 रु. पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.



अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता 

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, उपस्थथती किमान 75 टक्के. 2 रु. प्रतिदिन


शालेय आरोग्य तपासणी 

* मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे. 

* विद्यार्थांना संदर्भसेवा पुरवणे. 

इ. 1 ली ते 8 वी चे सर्व विद्यार्थी वर्षातून एकदा तपासणी



अपंग शिष्यवृत्ती 

अपंग विद्यार्थांना शैक्षणिक प्रवाहात आणणे. 

1) इ. 1 ली ते 12 वी चे अपंग विद्यार्थांना 2) 40 टक्के पेक्षा जाथत अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक. समाजकल्याण विभागाकडून इ. 1 ली ते 4 थी = 600 रु. प्रति वर्ष , इ. 5 वी ते 7 वी = 750 रु. प्रति वर्ष, इ. 8 वी ते 10 वी = 1000 रु. प्रति वर्ष.


राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) 

शिष्यवृत्ती प्रज्ञावान विद्यार्थाचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे. 

1) इ. 10 वी चे विद्यार्थी - राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) राष्ट्रीय स्तर परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे आवश्यक. 2) देशात फक्त 1000 विद्यार्थी निवडले जातात. एन. सी. ई. आर. टी कडून 1) इ. 11 वी ते 12 वी = 1250 रु. दरमहा, 2) पदवीपूर्व शिक्षण व पदव्यूत्तर शिक्षणासाठी = 2000 रु. दरमहा, 3) पी.एच.डी विद्यार्थासाठी विद्यावीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे



राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी(N.M.M.S.) शिष्यवृत्ती 

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यायांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना इ. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत करणे. 

1) इ. 8 वी चे विद्यार्थी 2) पालकाचे वार्षिक उत्पन्न 150000 पेक्षा कमी असावे. 3) संबधित परीक्षेतील गुणवत्ता यादी व सामाजिक आरक्षणाप्रमाणे निवड एन. सी. ई. आर. टी./मानव सांसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली कडून 1) 12 वी पर्यंत = 500 रु. दरमहा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ( Droupadi Murmu )

 आदिवासी नायिका : द्रौपदी मुर्मु
भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक व भारतीय सशस्त्र दलांचे सरसेनापती (कमांडर-इन-चीफ) असतात. भारतातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्वाचे पद म्हणजे राष्ट्रपती. अश्या या पदावर आजपर्यंत डॉ. राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद असे चौदा राष्ट्रपती या देशाने पाहिले आणि अनुभवले. पंधरावे राष्ट्रपती म्हणून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी जुलै 2023 मध्ये शपथ घेतल्या. ओरिसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या छोट्याश्या गावात आदिवासी जमातीत जन्मलेल्या सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पदावर विराजमान होतांना प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटत होता. सोशल मीडियात चर्चेत नसलेले, प्रसिद्धी ज्योतात नसलेले, शांत व्यक्तिमत्त्व अचानक लोकांच्या समोर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपा पक्षाने केले. तेव्हा सुश्री द्रौपदी मुर्मु कोण आहेत ? त्यांचा जन्म कोठे झाला ? त्यांचे शिक्षण कुठपर्यंत झाले ? त्यांचे जीवन कसे आहे ? असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडणार यात शंकाच नाही. सामान्य नागरिकांच्या याच प्रश्नांना उत्तर मिळावे आणि भारताचे पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांची माहिती सर्वांना व्हावी या निर्मळ हेतूने लेखक विनोद पंचभाई यांनी सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु हे चरित्र पुस्तक वाचकांसमक्ष ठेवले आहे.
 मराठी साहित्य क्षेत्रात विनोद पंचभाई यांचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या लेखनशैलीमुळे. समाजातील सर्व स्तरावरील वाचकांसाठी ते लिहितात. चरित्र लेखन आणि रहस्यमय कथा लिहिण्यात त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. हॉटेल हवेली ही त्यांची रहस्यमय कादंबरी खूप गाजलेली आहे. त्याचसोबत त्यांनी बालसाहित्य देखील लिहिले आहे. भारताचे आजपर्यंत झालेले राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय शास्त्रज्ञ यांच्यावर देखील त्यांचे पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. विनोद पंचभाई हे अभ्यासपूर्ण लेखन करतात, त्यासाठी त्यांना अनेक पुस्तकांचे वाचन, खूप भटकंती आणि टिप्पणी लिहून ठेवावे लागतात. त्यांच्या पुस्तकावरून त्यांनी केलेले चिंतन आणि मनन हे सारं लक्षात येते.
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्याविषयी सोशल मीडियात कुठेच काही माहिती उपलब्ध नव्हती. कारण त्या प्रसिद्धीपासून कोसो दूर राहत होत्या. त्यांचा स्वभाव म्हणजे नेकी कर दर्या में डाल. कधी त्यांना आपल्या कामाची प्रसिद्धी व्हावी असे वाटले नाही की त्यांनी गवगवा केली नाही. अगदी शांत चित्ताने, मन लावून आणि पक्षप्रमुखाने दिलेली जबाबदारी नेटाने पूर्ण करीत राहिल्या. सन 1999 मध्ये पहिल्यांदा ते राजकारणात उतरल्या आणि नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय सेवेला प्रारंभ केल्या आणि अवघ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सर्वोच्च अश्या पदावर विराजमान झाल्या. अर्थातच हे सहजासहजी घडले नाही किंवा कोणती जादू झाली नाही. तर यामागे सुश्री द्रौपदी मुर्मु यांची पक्षश्रेष्ठीशी असलेली निष्ठा, जनतेसोबत असलेले प्रेमपूर्वक संबंध आणि समाजातील तळागाळातील आपल्या जमातीच्या आदिवासी लोकांच्या समस्येची जाण ठेवून त्यांनी केलेले निस्वार्थ काम या साऱ्याचे एकत्रित फळ म्हणजे राष्ट्रपती पद होय. लेखकांनी याविषयी आपल्या पुस्तकात संदर्भासहित सुंदर अशी माहिती दिलेली आहे. ते वाचतांना सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या अजून महान ठरतात.
भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाविषयी बोलतांना म्हणतात की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्याचे जो कोणी प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणसाला ज्ञान मिळते, ज्ञानामुळे माणूस विचार करू लागतो आणि त्याला जीवन जगण्याचे कौशल्य मिळते. भारतीय शिक्षणतज्ज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून थांबले नाही तर तळागाळातील गरीब लोकांच्या मुलां-मुलींसाठी शाळा सुरू केल्या. त्यांच्या मते घरातील एक पुरुष शिकला तर फक्त तोच शिकतो आणि घरातील एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंबाला ती शिकविते. समाजातील मुलींना शिकविण्यासाठी महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला अगोदर शिकविले आणि शिकविण्यासाठी तयार केले. याचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी आपले कार्य केले. त्यांच्या गावात फक्त सातवी वर्गापर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा. त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना गाव सोडणे गरजेचे होते. घरची परिस्थिती आणि सामाजिक स्थिती या दोन्ही संकटाशी दोन हात करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्या गावातून शिक्षण घेणारी सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या पहिल्या होत्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते, त्यामुळे त्यांनी संघर्ष केला पण शिक्षण सोडले नाही. आपण जसे शिकलो तसे समाजातील इतर मुली देखील शिकल्या पाहिजे यासाठी त्यांनी अगदी निस्वार्थपणे शिकविण्याचे कार्य केले. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला जे अनुभव येतात ते अनुभव त्यांना देखील आले पण त्यांनी समाजासाठी व देशासाठी उंबरठा ओलांडून शिकविण्याचे काम केले. हे त्यांचे पहिले धाडसी पाऊल होते जे की, राष्ट्रपती होण्यासाठी कारणीभूत ठरले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
माणसाच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. जीवनात सुख आणि दुःखांचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. सुख मिळाले म्हणून हरखून जाऊ नये आणि दुःख मिळाले म्हणून स्वतःला संपवून टाकू नये. प्रत्येक गोष्टीचा सामना करीत, त्या प्रसंगाशी दोन करीत जीवन जगण्यात खरी मजा आहे. सुश्री द्रौपदी मुर्मु या आज राष्ट्रपती पदावर दिसत आहेत, ही खरोखरच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. पण त्यांनी आपल्या जीवनात कोणत्या संकटाला तोंड दिले आणि काय दुःख पचविले ? हे जर एकदा त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर ते किती महान आहेत ? याची प्रचिती येते. शालेय शिक्षण पूर्ण करण्यात त्यांना खूप कष्ट सोसावे लागले, लग्न झाल्यानंतर ही त्यांनी निस्वार्थपणे एक ही रुपया पगार न घेता शिकविण्याचे काम केले. ऐन उमेदीच्या काळात, घरात सुख आणि आनंद नुकतेच प्रविष्ठ झालेले असताना पाच वर्षात चार मोठे धक्के त्यांना बसले. पहिल्यांदा मोठ्या मुलांचा मृत्यू, नंतर लहान मुलांचा मृत्यू त्यानंतर पती देखील सोडून गेले. याच दुःखाच्या काळात लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. जवळजवळ सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या ढासळल्या होत्या. पण त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांना सावरले, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी आध्यात्मिकची जोड देऊन त्यांना ध्यानधारणा करण्यास प्रवृत्त केले. असे म्हणतात की, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. या सर्व गोष्टीचा अनुभव सुश्री द्रौपदी मुर्मु यांना अनुभवावे लागले.
लेखक विनोद पंचभाई यांनी अति परिश्रम, अनेक संदर्भ पुस्तक वाचून, सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या संपर्कात व सहवासात आलेल्या  लोकांच्या भेटी घेऊन, प्रत्यक्षात सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या जन्मगावी उपरबेडा येथे भेट देऊन हे अप्रतिम असे पुस्तक लिहिले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. रमेश भारताल यांनी सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे सुंदर चित्र पुस्तकावर रेखाटले आहे. पुणे येथील दुर्वा एजन्सीजने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याची किंमत फक्त 250 रु. आहे. भारत आजपर्यंतचे देशाचे राष्ट्रपती आणि त्यांचा स्वभाव कसा होता ?सुश्री द्रौपदी मुर्मु यांची निवड कशी झाली ? इतर सर्व राष्ट्रपती पेक्षा सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे जीवन कसे वेगळे आहे ? याची माहिती जाणून घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने विशेष करून महिलांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे वाटते. त्यासाठी आपण लेखक विनोद पंचभाई यांच्या 9923797725 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पुस्तकाची प्रत मागवून घ्यावे. भविष्यात लेखकांच्या हातून असेच अप्रतिम पुस्तक वाचकांस वाचण्यास मिळत राहो ही सदिच्छा आणि पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा ......!

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे. 

Friday, 31 March 2023

April fool Day

एप्रिल फूल दिन 


( पूर्ण लेख वाचल्यावर उत्तर कळेल )

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’  म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या प्रथेची सुरुवात केव्हा व कशी झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि काही लोक तिचा संबंध प्राचीन रोममधील व्हीनस व फॉर्चुना व्हिरिलीस या देवतांच्या उत्सवाशी लावतात. ग्रेगोरियन पंचांग १५६४  साली स्वीकारल्यानंतर फ्रान्समध्ये या प्रथेस सुरुवात झाली व ती १६०० पर्यंत इतरत्र पसरली असेही म्हटले जाते. काही लोक त्यास लूच्या वसंतोत्सवाची स्मृती मानतात.

प्राचीन रोममधील हिलेरिया व भारतातील होळी या उत्संवाशी या एप्रिल फूलचे बरेच साम्य आहे. होळी व हिलेरिया यांच्याप्रमाणेच हा प्रकार वसंतागमनाच्या वेळीच साजरा करतात.

मेक्सिकोत २८ डिसेंबरला हा दिवस पाळतात. त्या दिवशी उसनी घेतलेली वस्तू परत न करण्याची तेथे प्रथा आहे. बनलेल्या व्यक्तीस इंग्‍लंडमध्ये  ‘एप्रिल फूल’, स्कॉटलंडमध्ये ‘एप्रिल गॉक’ व फ्रान्समध्ये ‘एप्रिल फिश’ म्हणतात. ब्रिटिशांच्या अंमलाबरोबर ही प्रथा भारतात आली. या दिवसास सकल मूर्खांचा दिवस असेही म्हणतात.

खोडवे, अच्युत.

संकलन :- इंटरनेट

उत्तर - 

Monday, 6 March 2023

जागतिक महिला दिन ( World Women Day )

08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त

कविता - नको भृणबळी

आई, मला जग बघू दे
बाबाला एकदा भेटू दे

माझी मुलगी होती 
गर्भातुन बोलत
मी ओझे नाही होणार
कोणाच्या घरात

मी काम करेंन 
घरातील सारी
शिक्षण घेईन खुप 
होईन अधिकारी

तुझ्या हाताला देईन
नेहमी मदत 
विचार करू नको
दे मला साथ

आई, तुझं मन कर
एकदा कठोर
तुझ्यासारखेच माझं
जीव आहे तर

निश्चय केला पक्का 
नको भृणबळी
मुलगा-मुलगी समान
संधी द्या वेळोवेळी

तिचे बोलणे ऐकून
मन गहिवरलं
गोंडस कन्या रत्नाला
जन्म दिलं

- नागोराव सा. येवतीकर
विषय शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••


जागतिक महिला दिनानिमित्त 

" ती " ला समर्पित माझी कविता


कविता - ती

- नासा येवतीकर, 9423625769


ती रोज सकाळी

सर्वांच्या अगोदर उठते

आम्ही सर्व झोपेत असतो

तिच्या कामाला सुरू होते


ती रोज सर्वांसाठी

चवदार स्वयंपाक करते

आम्ही त्याला नावे ठेवतो

त्याकडे ती कानाडोळा करते


ती रोजच आम्हा सर्वांची

एवढी देखभाल ठेवते

आमच्या कडून कसलीच

तिची कधी ही अपेक्षा नसते


सकाळपासून झोपेपर्यंत

ती खूप राब राब राबते

आम्हांला तिची किंमत कळते

ती जेंव्हा आजारी पडते


मग ती कोण आहे ? 

आई आहे ताई आहे

कुणाची मावशी तर 

कुणाची बायको आहे

••••••••••••••••••••••••••••••••••••

कविता - ती काय करते ?

सर्वाना असंच वाटते की
ती काहीच करत नाही
ती काय करते म्हणून कोणी
विचारल्याशिवाय राहत नाही

नेहमी हा प्रश्न सतावतो
कोणी विचारलं ती काय करते
माझं ठरलेलं उत्तर असल्याचं
ती खूप काही काम करते

सकाळी भल्या पहाटे उठून
घरासमोर सडा टाकते
छान छान रंगाची रांगोळीने
सारे अंगण सजवून टाकते.

आम्ही सारे अंथरुणात असतो
सर्वाना चहा फराळ करते
सर्वांची अंघोळी होईपर्यंत
जेवणाचा डबा तयार करते

सारे गेले आपापल्या कामाला
घरदार पुसून स्वच्छ करते
घरात पडलेला पसारा आवरून
धुणी-भांडी स्वच्छ करून घेते

दुपारच्या वेळी विश्रांती म्हणून
जराशी डुलकी काय घेते
घड्याळात चारचा ठोका वाजला
आमची परत येण्याची वाट पहाते

तिन्ही सांजाच्या सायंकाळी ती
सर्वाना चहा देऊन ताजे करते
बैठकीत आम्ही टीव्ही पाहतो
ती किचनमध्ये स्वयंपाक करते

पटकन आम्ही झोपी जातो
तिच्यामुळे काळजी नसते
दाराची कडी कोंडा पाहूनच
ती समाधानाने झोपी जाते

सारे आनंदात मजेत राहावे
यासाठी तिचा खटाटोप असते
परत मला कोणी विचारू नका
ती काय करते ? ती काय करते ?

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

लेख - स्‍त्री जन्‍माचे स्वागत करूया ...!


" नकोशीला फेकून मातेचे पलायन, मुलीला जन्म दिला म्हणून सुनेला जाळले, मुलींची भ्रूण हत्या करण्यात जिल्हा अग्रेसर " अशा मथळ्याच्या बातम्या जेंव्हा  ऐकायला आणि वाचायला मिळतात तेव्हा वरील क्रूर कर्म करणार्‍या मंडळीविषयी तळपायाची आग मस्तकाला जाते आणि वाटते की, आपल्या पाल्याविषयी एवढे निष्ठुर का होतात ? समाजात आजही असे कुटुंब आढळते की ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असते मग ती मुलगा असो वा मुलगी, याचा ते अजिबात विचार करीत नाहीत. तर दुसऱ्या बाजूला त्याच समाजात नकोशीला फेकणारी ही मंडळी आढळतात. आपल्या संस्कृतीमध्ये ' कुपुत्रो जायेत क्वचिदपि, कुमाता न भवती ' असे म्हटल्या जाते. परंतु काही वेळा महिलांना कुमाता होताना पाहून मन खिन्न होते. एवढ्या थराला ते का जातात ? असे जे कोडे पडते ते कोडेच राहते, त्याची उकल होत नाही. याहीपुढे समाजात असे बघायला मिळते की, एखाद्याच्या घरी मुलगा जन्माला आला की, नवरा-बायको, आई-वडील, भाऊ-बहीण असे  घरातील, परिवारातील आणि नात्यातील लोकांना खूपच आनंद होतो. आपला आनंद ते सर्वाना पेढे वाटून व्यक्त करतात. याउलट जेव्हा एखाद्याच्या घरी मुलगी जन्माला येते तेव्हा 'अरेरे ' असे सहजच उद्गार तोंडातून बाहेर पडतात. तिच्या येण्याने कुणालाच आनंद वाटत नाही. उलट प्रत्येकाच्या कपाळावर आठ्या पडलेल्या दिसून येतात. मुलगा जन्मल्यास पेढे आणि मुलगी जन्मल्यानंतर पेढेच्या ऐवजी जिलेबी वाटण्याची प्रथा समाजात दिसून येते. म्हणजे मुलगी म्हणून जन्माला येण्याचा एका सेकंदापासून मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. भारत देश वगळता कोणत्याही देशात मुलगा किंवा मुलगी यांच्या जन्मास किंमत किंवा भाव दिला जात नाही. म्हणजे मुलगा होवो किंवा मुलगी त्याना त्या ठिकाणी अपत्य समजल्या जाते आणि येथे आपल्या देशात मुलगा जन्मल्यास ' वंशाचा दिवा, कुलदीपक ' आणि मुलगी जन्मल्यास ' परक्याचे धन, डोक्यावरील ओझं ' असे समजले जाते. समाजात चालू असलेल्या घाण प्रथा, अनिष्ट चालीरीती, सनातन पद्धती, लग्नात वधू पक्षाकडून मागितली जाणारी वरदक्षिणा या सर्व रुढीपरंपरामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत समाजात केल्या जात नाही. म्हणून तिच्या स्वागतासाठी काय करावे लागेल ? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
समाजात चालू असलेल्या अनिष्ट रूढी व परंपरा यामुळे पालक मंडळी स्त्री जन्मास घाबरत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जर या प्रथा भारतात नसते तर काय झाले असते ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? मुलींच्या बापाला काय त्रास होतो ? मुलांच्या आई बापाला कधी कळणार ? जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे या म्हणीप्रमाणे समाजात असे नित्यनेमाने बोलले जाते ते उगीच नाही.  पण मुलगा आणि मुलगी यांच्या बुद्धिमत्ता किंवा गुणवत्ता याचा जर विचार केला तर मुलगी ही मुलापेक्षा काकणभर सरसच असते हे दरवर्षीच्या दहावी व बारावीचा निकालावरून स्पष्ट होत असते. प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकांच्या मतानुसार या प्राथमिक वर्गात सुद्धा मुली या मुलांच्या बाबतीत सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. कदाचित मुलींना देण्यात येत असलेल्या विविध योजनांचा अनुकूल परिणाम असू शकतो. दहावी बारावीपर्यंत चांगले गुण घेणारी मुली पुढे मात्र दिसेनाशी होतात. उच्च शिक्षणात मुलांची संख्या लक्षणीय दिसते. प्राथमिक वर्गात हुशार  नसलेल्या किंवा सर्वसाधारण असलेला विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करतो आणि काही ना काही रोजगार मिळवितो. मात्र दहावी बारावीपर्यंत हुशार असलेली मुलगी उच्च शिक्षणात न दिसता कुणाच्या तरी घरी सून म्हणून दिसते. तिचे पुढील शिक्षण खुंटल्या जाते. शंभरातून एक-दोन मुली यशस्वी झाल्या म्हणजे त्याचे सारे श्रेय सर्व मुलींना देता येत नाही. मुलींच्या संरक्षणासाठी भारतात भरपूर कलम व कायदे तयार केल्या जातात मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यामुळे समाजात ही अराजकता माजली आहे. कायद्याची भीती इथे कुणालाच वाटत नाही. त्यामुळे इथे प्रत्येकजण कायदा मोडण्याची व तोडण्याची भाषा बोलतात. आपल्या अज्ञानपणामुळे निरक्षर व अडाणी माणूस चुकतो असे म्हटले तर कोणी समजून घेतील पण सुशिक्षित सुजाण व साक्षर मंडळीसुद्धा याबाबतीत चुका करताना दिसत आहेत. त्यांना कसे समजावलं ?  झोपी गेलेल्या माणसाला एखाद्यावेळी उठविणे सोपे आहे मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठविणे महाकठीण आहे. स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी समाजाने काही प्रथा व पद्धतीमध्ये बदल करणे भावी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
समाजातील अनिष्ट प्रथा आणि पद्धतीत शासन किंवा कायद्यापेक्षा समाजानेच त्यात बदल करणे अपेक्षित आहे. सर्वात पहिल्यांदा वधूपित्याने द्यावयाची वरदक्षिणा म्हणजे हुंडा ही पद्धत समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वरपित्याने याची सुरुवात केली पाहिजे आणि समाजाने त्या वरपित्यांचा वेळोवेळी विविध ठिकाणी सत्कार करावा म्हणजे याचा प्रचार व प्रसार योग्य प्रकारे होईल. कायद्याने सर्व काही बदलता येत नाही. काही वेळा आणि काही ठिकाणी कायद्याच्या ऐवजी तडजोड कामाला पडते. प्रथम ही वरदक्षिणा किंवा हुंडा पद्धत बंद झाली की स्त्री जन्माचे स्वागत नक्कीच हसत हसत होईल. घरी आलेली सून ही सून नसून माझी मुलगी आहे, असे प्रत्येक सासू-सासऱ्यांचा मनात तयार होणे गरजेचे आहे. आपण आपल्या मुलींची काळजी ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने सुनेची काळजी घेतली जावी. याठिकाणी सुनेने सुद्धा आपल्या सासू-सासऱ्यांना आई-वडील मानून त्यांची मनोभावे सेवा करणे गरजेचे आहे. नातेसंबंध हे प्रेमावर टिकतात आणि संवादामुळे विस्तार पावतात. बऱ्याच कुटुंबात वाद होतात मात्र प्रेमाचे संवादच होत नाहीत त्यामुळे कलह निर्माण होते आणि त्या वादाचे रुपांतर काहीतरी अघटित स्वरूपात समोर येतात. मुलगा किंवा मुलगी यांचा भेद मनात न ठेवता आई-वडिलांनी आपल्या लेकराचे संगोपन करावे. लहानपणी त्यांच्या मनात मुलगा मुलगीचा भेदभाव निर्माण केल्यास मोठेपणी त्यांच्यावर तेच संस्कार कायम राहतात. त्यासाठी मुलगा-मुलगी समान ही भावना त्यांच्यात लहानपणीच रुजवावे. शासन मुलीच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवित आहेत त्यात सातत्यपणा ठेवून मुलींच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बरेच पालक आर्थिक अडचणीमुळे आपल्या मुलींना उच्च शिक्षणाला पाठवित नाहीत मात्र तेच पालक मुलांना मात्र पाठवितात हा विरोधाभास दिसून येतो. त्यास्तव मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केल्यास त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी होऊ शकते. आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने काही महिलांचा सत्कार करून किंवा गुण गौरव करून मुलींच्या जन्माचा दर वाढविता येणार नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक माणसाची मानसिक स्थिती बदलल्याशिवाय स्त्री जन्माचे स्वागत वाजत गाजत होईल असे तरी वाटत नाही.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

ग्रामीण महिला आणि महिला दिन


आज 08 मार्च अर्थात जागतिक महिला फिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलोय ? कुठपर्यंत यश लाभलं ? यांच्यासमोर काय करायचं ? इत्यादी विविध प्रश्नांच्या बाबतीत आज चर्चा केली जाते. अश्या या बाबीमुळे आज महिला थोडीफार सुधारली ( ? ) असे म्हणायला हरकत नाही. 

नेमिची येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण हा उत्सव साजरा करणार, यात काही शंका नाही. शहरात असलेली मुलगी पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभी राहण्यास पात्र ठरत आहे. महानगरातील मुली ही शिक्षण घेऊन सरकारी, खाजगी किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या कार्यालयात विविध पदावर काम करतांना दिसत आहेत, शहरातील मुलीं मुलांबरोबर शिक्षण घेऊन त्यांच्या पेक्षाही वरचढ ठरत आहेत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील मुलींचे जीवन चांगले आहे, याचा अर्थ असा नव्हे की, मुली शिक्षणाच्या बाबतीत आता वंचित राहिलेल्या नाहीत. पण जरा शहारावरचा आपला कॅमेरा ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या विकासाकडे फिरविल्यास आपणास अनेक समस्या आणि प्रश्न तेथे दिसून येतात. 

शहरातल्या मुली शिक्षणात किंवा अन्य क्षेत्रात जेवढ्या पुढारलेले आहेत, तेवढेच ग्रामीण भागातील मुली मागासलेले आहेत. एकदम विरुद्ध टोक आहेत. ग्रामीण मुलीवर आज देखील अन्याय होत आहे. ग्रामीण भागात मुलींसाठी शिक्षण आवश्यक नसून त्यापेक्षा आवश्यक आहे त्यांना घरात स्वयंपाक करता येणे, धुणी-भांडी करता येणे, मुलं बाळांना सांभाळता येणे, घरातील पुरुषांना आनंदी ठेवता येणे, इत्यादी कामे तिला जमलेच पाहिजे. पण तिला शाळेत जाण्याची किंवा काही नवीन शिकण्याची संधी मात्र दिल्या जात नाही. आज ही ग्रामीण भागात शंभर मुलींमागे सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले पन्नास टक्के आढळतील मात्र पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सापडतात. ही किती चिंतनीय बाब आहे. मुलींसाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आणि त्या राबविल्या देखील तरी ही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आज ही म्हणावी तेवढी प्रगती नाही, असे का ? कारण ग्रामीण भागातील लोक आजही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि कर्मकांडमध्ये रुतलेले आहेत. त्याच्या विरोधात त्यांना वागणे कदापिच जमणार नाही. विज्ञानाच्या आधारे माणूस चंद्रावर गेला पण ग्रामीण भागातील लोकं आहे त्याच ठिकाणी घट्ट बसून आहेत. त्या लोकांचा विकास फक्त शिक्षणाने होते हे सुद्धा एक निर्विवाद सत्य आहे. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे त्याच वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकविले जाते. काळजी आणि सुरक्षा या कारणांमुळे मुलींना पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पाठविले जात नाही. यात पालकांची मानसिकता लक्षात घेण्यासारखे आहे. आजच्या विषम वातावरणात कोणत्याही पालकांना असे विचार मनात येणे साहजिक आहे, मात्र त्यासाठी तिला उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याची चूक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना कार्यान्वित झाल्यापासून अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलींच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे बहुतांश महिला शिक्षिकानी मत व्यक्त केले. अशीच काही योजना ग्रामीण भागात राबविणे आवश्यक आहे. महिलांना स्वयं रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी शहरात ज्याप्रकारे सोयी सुविधा निर्माण केल्या जातात अश्याच सुविधा ग्रामीण भागात पोहोचविणे आवश्यक आहे. छोटे छोटे काम शिकण्यासाठी त्यांना शहरात येणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या गावांत जाऊन मुलींना स्वयंरोजगाराचे धडे दिल्यास ते स्वतःच्या पायावर नक्की उभे राहतील. 

जगात सर्वत्र कायद्याला मान दिला जातो. त्यात खूप शक्ती आहे, याची जाणीव असून देखील महिलांवरील अत्याचार व अन्याय का कमी होत नाही ? एक दिवस सुद्धा असे उजाडत नाही, ज्या दिवशी महिलांवर अन्याय, अत्याचार, अमानुष छळ, किंवा बलात्कार झाले नाही. पैशाच्या जोरावर श्रीमंत लोकं नाचतात, कायदा हातात घेतात, पैशाच्या बळावर काही ही करायला ते तयार असतात. कधी जर त्यांच्या घरातील महिलांवर असा प्रसंग ओढवला तर तेंव्हा त्यांना कळते की खरोखरच किती वेदना होतात ते ? 

आपण दरवर्षी असे दिन उत्सवाप्रमाणे साजरा करतो. काही जुने संकल्प सोडतो तर काही नवीन संकल्प करतो. नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे त्या संकल्पला ही विसरतो. एखाद्या महिलेवर आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर आपण फक्त अरेरे असा खेद व्यक्त करून तोंड जरासे वेडेवाकडे करून निघून जातो किंवा पाहत बसतो. त्यापलीकडे आपण काही करत नाही. ग्रामीण भागातील लोकांना अनेक गोष्टी मुळात माहिती नसतात म्हणून त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम पहिल्यांदा करणे आवश्यक आहे. माहिती नसल्यामुळे येथील लोकं वर्षनुवर्षे मागासलेले आहेत. 

आजच्या या महत्वपूर्ण दिवशी असा संकल्प करू या की, गावातील प्रत्येक तरुणीला स्वयं रोजगार करण्यासाठी मदत कारेन, त्यांना योजनांची माहिती देऊन जागृत करेन आणि मी महिलांवर अत्याचार करू देणार नाही, तिला जे हवं ते मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. 


- नागोराव सा. येवतीकर

स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक

मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

लेख - मुलींचे शिक्षण: प्रगतीचे लक्षण

शनि शिंगणापूर येथील मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा किंवा नाही या बाबत समाजात, मि‍डियामध्‍ये जोरदार चर्चा होते.. खरोखरच शनि मंदिराच्‍या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळाला तर त्‍यांचे सारेच प्रश्‍न सुटतात काय ? चारशे वर्षापासून चालू असलेली परंपरा सहजा सहजी बदलेल असे वाटत नाही. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण, महिलांची कुचंबणा, घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलल्‍या जाते. त्‍यांच्‍या प्रश्‍नांना वाचा फोडल्‍या जात नाही त्‍यांमूळे त्‍यांच्‍या वरील अन्‍याय काही केल्‍या कमी होत नाही. यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्‍ंयत गरजेचे आहे. महिलांवर होणारे अन्‍याय महिलांनीच सक्षमरित्‍या सामना करून सोडविले पाहिजे, त्‍याशिवाय महिलांची प्रगती अशक्‍य आहे आणि ही शक्‍ती महिलांमध्ये फक्‍त शिक्षणामूळेच येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्‍त्रोत आहे. शिक्षण घेतल्‍यामुळे आपल्‍या जीवनाला एक दिशा मिळते, संजिवनी मिळते.  यांचे उत्‍तम उदाहरण म्‍हणून आपण महात्‍मा ज्‍योतिबा फुले आणि त्‍यांची पत्‍नी सावित्राबाई फुले यांच्‍या जीवनचरित्राकडे पाहू शकतो. अनाडी व निरक्षर पत्‍नी मूळे एके दिवशी ज्योतिबाना त्यांचा महत्‍वाचा कागद गमवावा लागला आणि त्याच वेळी पत्‍नी सावित्रीबाईला साक्षर  करण्‍याचा त्यांनी मनसुभा केला. तेवढ्याच तत्परतेने त्‍यास सावित्रीबाईंनी होकार दिला. घरातल्‍या घरात शिक्षण दिले. त्‍याचा फायदा एवढा झाला की, देशातील पहिली महिला शिक्षिका होण्‍याचा मान सावित्राबाई फुले यांना मिळाला. साहित्‍याच्‍या क्षेत्रात त्‍यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महात्‍मा फुले यांना शिक्षणाचे महत्‍व कळाले होते. त्‍यामुळे त्‍यांनी सन १८४८ मध्‍ये पुणे येथील भिडेच्या वाड्यात खास करून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. एक स्‍त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकते अशी त्‍यांची धारणा होती त्‍यातूनच मग त्‍यांनी आपल्‍या पत्‍नीला शिकवले. असे महत्‍व प्रत्‍येक पालकांना,  नव-यांना म्‍हणजेच  पुरूष मंडळींना कळणे गरजेचे आहे. समाजात आजही मुलींच्‍या शिक्षणाच्‍या बाबतीत पालक जागरूक नाहीत. असे  म्‍हणण्‍यापेक्षा मुलांच्‍या व मुलींच्‍या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात. मुलगी शिकून काय करणार ? ही पालकांची  भावना  अजूनही दुर झालेली नाही. इंग्रजांच्‍या गुलामीगिरीच्‍या काळात महिलानी घराबाहेर जाणे अगदी तुच्‍छ समजले जायचे. महिला या " चूल आणि मूल " एवढ्याच कामासाठी समाजात राबत असत, तर शिक्षणासाठी घराबाहेर जाणे दूरची गोष्‍ट. भारत स्‍वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर निरक्षरता ही फार मोठी समस्‍या होती. त्‍यातल्‍या त्‍यात महिलांची निरक्षरता तर देशाच्‍या प्रगतीत फार मोठी अडसर ठरत आले आहे. त्‍यामुळे शासन प्रथम पासुनच महिलांच्‍या शिक्षणावर भर देत आले आहे. गेल्‍या वीस एक वर्षापासुन शिक्षणाच्‍या बाबतीत भारताची प्रगती उल्‍लेखनीय झाली म्हणणे चुकीचे ठरणार  नाही. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्‍या शिक्षणाला प्रेरणा मिळाली.  शासनाने मुलींच्‍या  शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्‍हावा या साठी मुलींचा उपस्थिती भत्‍ता,  सावित्रीबाई फुले दत्‍तक पालक योजना, मोफत  गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्‍यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटी ने  मोफत  प्रवास  करण्‍यासाठी अहिलाबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय, मानव विकास योजना, तसेच लेक वाचवा लेक शिकवा या सारख्‍या अनेक योजनाच्‍या माध्‍यमातून मुलींच्‍या शिक्षणासाठी शासन  प्रयत्‍न करीत होते आणि करीत आहे. त्‍यांना त्‍यात काही अंशी यश  मिळाले पण पुर्ण यश मिळालेच नाही. त्‍यांची अनेक कारणे आहेत. त्‍या कारणाचा  विचार करून त्‍यावर उपाय योजना  करणे आवश्‍यक  आहे. 
* पालकांची शिक्षणाबात अनास्‍था - 
मुलींच्‍या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील  पालकामध्‍ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही, जेवढे शहरी  भागातील पालक जागरूक असतात. ग्रामीण भागातील पालक स्‍वत: शिक्षणाच्‍या  बाबतीत अनभिज्ञ असतात,  त्‍यामुळे त्‍यांना शिक्षणाचे महत्‍व पटत नाही. बरं  शिक्षणाचे महत्‍व पटत नाही असे जर म्‍हणावे तर हेच निरक्षर पालक आपल्‍या मुलाचे शिक्षण कुठेच थांबू  देत नाहीत. पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाचे शिक्षण पुर्ण करतात आणि मुलीचे शिक्षण मात्र या ना त्या कारणांवरुन थांबवितात. गावात ज्‍या वर्गापर्यंत शाळा त्‍याच  वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकण्‍याची मुभा  दिली जाते. पुढील शिक्षणासाठी जवळच्‍या गावात किंवा शहरात जावे लागते आणि त्‍याठिकाणी जाण्‍यासाठी मुलींना परवानगी दिली  जात नाही, ही वस्‍तुस्थिती आहे. त्‍यामुळे आज प्राथमिक  वर्गातील मुलींची  संख्‍या माध्‍यमिक वर्गात गेल्‍यावर ५० % पेक्षा कमी  होते ही गळती मुलीच्‍या विकासास नक्‍कीच बाधक ठरत आहे. 
* अनिष्‍ठ रूढी व परंपरा - 
ग्रामीण भागातील समाज आज ही अनिष्‍ठ रुढी व परंपरेच्‍या खोल गर्तेतुन बाहेर येण्‍यास तयार नाहीत. मुलींच्‍या शिक्षणा विषयी त्‍यांच्‍या मनात आज ही तेच विचार घोळत आहेत जे की, वीस वर्षापूर्वी होते. मुलीने शिकून काय करावं ? शेवटी घरच तर सांभाळायचे आहे. त्‍यासाठी एवढं शिक्षण पुरेस आहे या विचाराने ग्रामीण भागातील पालक आपल्‍या मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच बंद करायला भाग पाडतात. काही पालक मंडळी मुलींना सुरक्षेच्या कारणांवरून शाळेत पाठविणे बंद करतात. मुलींचे लग्‍न होईपर्यंत आई-वडिलांना तिची काळजी वाटते, मुलींच्या वाट्याला कोणतेही वाईट प्रसंग येऊ नये असे प्रत्येक पालकांना वाटते त्यामुळे त्यांचे  पुढील शिक्षण बंद करण्‍यात आल्‍याचे काही पालक खाजगीत बोलतात. तर काही पालक मुलगी आता उपवर झाली, तिच्‍या साठी एखादे चांगले स्‍थळ बघुन एकदाचं हात पिवळं केलं की, मी मोकळा होईन असे बोलतात. त्‍यांच्‍या या बोलण्‍यातून मुलीं विषयी असलेली त्यांची तळमळ व काळजी स्‍पष्‍टपणे दिसून येते. सध्‍या समाजात असलेले गढूळ वातावरण आणि मुलींच्‍या बाबतीत वाढत चाललेली असुरक्षितता यामूळे कोणीही मुलीच्‍या शिक्षणासाठी पुढील पाऊल टाकताना दिसून येत नाही. त्‍याच बरोबर देशात चालत आलेली वधूपक्षाकडून वरपक्षाला द्यावी लागणारी देणगी म्‍हणजे हुंडा. यामुळेसुध्‍दा मुलींच्‍या शिक्षणावर फार मोठा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. एखाद्या पालकांने आपल्‍या मुलींना खुप शिकविले, तिच्‍या शिक्षणावर खूप खर्च केला, असे असले तरी मुलींच्‍या लग्‍नाच्‍या वेळी देणगी द्यावीच लागते अशी परंपरा मुलींच्‍या शिक्षणास घातक ठरत आहे. त्‍यामुळे अश्‍या अनिष्‍ठ रूढी व परंपरा यास तिलांजली देणे अत्‍यावश्‍यक आहे. एवढं शिकवून, खर्च करून जर पुन्‍हा आहे तीच प्रथा सांभाळायची असेल तर मुलींच्‍या शिक्षणावर खर्च का करावा ? असा सर्व सामान्‍य विचार पालक करतोच, यात त्‍याचा तरी काय दोष ? पण याउलट मुलगी शिकून सवरून नौकरीला लागली किंवा स्‍वत:च्‍या बुध्‍दीमत्‍तेच्‍या बळावर रोजगार मिळवून कमावती झाली तर समाजात तिची पद, प्रतिष्‍ठा, मानसन्‍मान या सर्वच गोष्‍टी वाढीस लागतात. महिलांच्‍या हातात स्‍वत:चा पैसा असला किंवा पुरुषांकडे भीक मागण्‍याची वेळ जर महिलांवर येत नसेल तर तिला स्‍वाभिमानाने जीवन जगता येते. स्‍वाभिमानी स्त्रिया ह्या अनिष्‍ठ रूढी, परंपरा आणि प्रथा यांच्‍याविरोधात लढा देऊ शकतात आणि त्‍यात यश सुध्‍दा मिळवू शकतात. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण अत्‍यंत महत्‍चाचे आहे.
* हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण - 
भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत. ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. त्‍या सर्वाची यादी करीत बसलो तर फारच लांबलचक यादी होईल. महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार  समाधानकारक नाही. कारण आज ही महिलांना म्‍हणावी तशी संधी मिळत नाही, हे वास्‍तव नाकारून चालणार नाही. देशाच्‍या राजकारणात आणि इतर महत्‍चाच्‍या क्षेत्रात महिलांना संधी मिळावी, त्‍यांच्‍यात धाडस, साहस, प्रगती व्‍हावी यासाठी सरकारने महिलांना पन्‍नास टक्‍के आरक्षण देण्‍याच्‍या तयारीत आहे. परंतु आज जे काही महिला राजकारणात आहेत किंवा ज्‍यांनी निवडणूक जिंकून सत्‍ता व पद मिळविले आहेत. त्‍या पदावर खरोखरच महिलाच राज्‍य करीत आहेत काय ? याचे वास्‍तव चित्र असे आहे की बहुतांश ठिकाणी सरपंच, पोलिस पाटील, तालुक्‍याचे सभापती, शहराचे नगराध्‍यक्ष किवा जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षपदी महिलांची वर्णी लागत आहे.  त्‍यांचे रिमोट मात्र त्यांच्या पतीराजच्‍या हातात आहे. यास कारण एकच आहे ते म्‍हणजे या पदाधिकारी महिला शिकलेल्‍या नसल्‍यामूळे ते आपल्‍या पतीच्‍या हातून कारभार पाहत असतात. संविधानाने ज्‍या हेतूने किंवा उदेश्‍याने नियमावली तयार केली त्‍याचा आपण अश्याप्रकारे अनादर करीत असतो.  आपणाला आपले हक्‍क आणि कर्तव्‍याची जाण निर्माण करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. निरक्षर किंवा अडाणी बाई लोकप्रतिनिधी झाली तर त्‍या विभागाचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा होतो का ? निदान याचा एक वेळा विचार करून आपल्‍या मुलींना शिकवू या. उद्या कदाचित ती गावची सरपंच बनून गावाचा कायापालट करू शकेल. 
* पालकांचे दारिद्र्य – मुलींच्‍या शिक्षण विकासात पालकांचे दारिद्र्य ही फार मोठी समस्या आहे. पोटाचे प्रश्‍न जो पर्यंत सुटत नाहीत तो पर्यंत माणसाचे कशातच लक्ष नसते. शेती काम करतांना घरातील लहान मोठी कामे करण्‍याची गरज घरातील मुलीं कडून पूर्ण केल्‍या जाते. घरातील छोटी भांवडे सांभाळणे, कपडे धुणे, भांडी घासणे, घर सांभाळणे इत्‍यादी कामे अर्थातच मुलींना करावे लागते. याउलट मुले काहीच काम करीत नाहीत तरी आई-वडीलांचा मुलांविषयी वेगळाच भाव असतो आणि मुलीं विषयी वेगळाच. एवढं असून सुध्‍दा प्राथमिक वर्गात मुलींची अभ्‍यासातील प्रगती मुलांपेक्षा जास्‍त दिसून येते. याची प्रचिती दहावी व बारावीच्या निकाल ज्‍यावेळेस लागतो त्यावेळेस निदर्शनास येते. मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा नेहमीच सरस असतो. पहिल्‍या दहा मध्‍ये सर्व श्रेष्‍ठ गुणांत मुलींच बाजी मारतात. मात्र पुढे पदवीचे शिक्षण घेतांना मुलींच्या संख्येत लक्षणीय घट होते. गुणवत्‍ता यादीत झळकणा-या मुलीं कदाचित कुठे तरी नौकरी मिळवतिल परंतु बाकीच्या मुलींचे पुढे काय प्रगती होते ? या बाबत प्रश्‍न चिन्‍हच आहे. याउलट दहावी-बारावीत सर्वसाधारण गुण मिळविलेला मुलगा मात्र आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्‍न करतो. ही प्रथा कुठे तरी बंद व्‍हायला पाहिजे मुलगा असो वा मुलगी सर्वांना शिक्षण मिळायलाच हवे. याउलट मुलींचे शिक्षण समाजाच्‍या व देशाच्या प्रगतीसाठी आवश्‍यक आहे. आज देशात जे काही अनैतिक किंवा अराजकता वाढत चालले आहे. त्‍यास मुलींना शिक्षण न देणे हेच प्रमुख कारण दिसून येते. मुलीने शिक्षण घेतले तर तिला स्‍वत:बद्दल आत्‍मविश्‍वास निर्माण होतो. आज घरोघरी हुंडाबळी किंवा विवाहित मुलींचा जो छळ चालू आहे त्यास शिक्षण घेतलेली मुलगी नक्कीच विरोध करेल यात शंकाच नाही. मुलींच्‍या सुरक्षित आयुष्‍यासाठी तिला वयाच्‍या आठराव्‍या वर्षा पर्यंत शिक्षण देणे आवश्‍यक आहे. देशाच्‍या प्रगतीसाठी मुलींचे शिक्षण हे फारच आवश्‍यक आहे. पराया धन किेंवा परक्‍या घरची सून म्‍हणून जाणारी, आपल्‍या घरांसाठी तिचा ज्ञानाचा काय फायदा ? अश्‍या गोष्‍टीचा विचार न करता मुलींना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यायाच्‍या विरूध्‍द आवाज उठविण्‍यासाठी  मुलींना शिकवलेच पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. म्‍हणूनच मुलींचे शिक्षण म्‍हणजे प्रगतीचे लक्षण असे म्हटल्या जाते ते काही खोटे नाही हे आपण नेहमी साठी लक्षात ठेवावे. 


- नागोराव सा. येवतीकर 

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद

ता. धर्माबाद जि. नांदेड
 
  9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

लेख - स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी.....

" यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, तत्र रमन्ते देवता " या संस्कृत भाषेतील सुवचनाचा अर्थ आहे ज्याठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी देव रमतो. हे झालं त्या श्लोकाचा शब्दशः अर्थ परंतु प्रत्यक्षात त्याचा अर्थ असा आहे. ज्या घरात स्त्रियांची पूजा केली जाते म्हणजे स्त्रियांना मानाचे स्थान दिले जाते, त्यांच्या विचारांना वाव दिले जाते, त्यांचा मान ठेवला जातो आणि त्यांना समानतेची वागणूक दिली जाते, त्या घरात देव रमतो यांचा अर्थ त्या घरात शांतता व समृद्धी राहते. त्या घरची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. वरील सुवचन आपणांस बऱ्याच ठिकाणी वाचण्यात येते. नेहमीप्रमाणे वाचन करणे आणि सोडून देणे यापलीकडे आपण काहीच करीत नाही हे ही सत्यच आहे. पुरातन काळापासून महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता अजूनही बदललेला नाही हे वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या छोट्या मोठ्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यामधून कळून येते. आजही स्त्रियाना चूल आणि मूल या क्षेत्रापुरतेच बांधून ठेवले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आजही त्यांना त्यांचा दर्जा मिळालेला नाही. तेंव्हा त्यांचा दर्जा उंचाविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ? यांचा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे असॆ वाटते. 
शनि मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी समाजात वादविवाद झाले आणि  न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु समाज तो निकाल मानण्यास तयार नाही. तेंव्हा प्रश्न असा पडतो की, महिलांना मंदिरात प्रवेश दिल्याने त्यांचे सर्व प्रश्न सुटणार आहेत काय ? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, अमानुष छळ या विषयावर आंदोलने झाली असती तर कदाचित महिलांना मोकळा श्वास घेता आले असता.  स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या समस्येवर सर्वांनी भरभरून लिहिले आहे मात्र समाजात आजही महिलांच्या समस्या काही कमी झाले नाहीत कारण या समस्यावर ठोस अशी उपाययोजना झालीच नाही. फक्त चर्चा आणि चर्चाच झाली. म्हणूनच उपायांची अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता आहे. संसारात पुरुष आणि स्त्री दोघांनाही समान महत्व आहे. रथाच्या चाकाप्रमाणे पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक आहेत. एक जरी चाक खराब झाले तर ज्याप्रमाणे रथ चालत नाही अगदी तसेच पुरूष आणि स्त्रियांचे आहे. दोघांच्याही प्रगतीत एकमेकास असलेला आधार महत्वाचे आहे त्याशिवाय जीवनाची प्रगती शक्यच नाही. 
शिक्षणाने माणसाचा संपूर्ण विकास होतो हे यापूर्वी महात्मा फुले यांनी सांगितले आहे. शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण होते. अन्यायाविरूध्द लढण्याची शक्ती मिळते. समाजात मान आणि सन्मान दोन्ही मिळतात. याचमुळे समाजात स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचसोबत याच शिक्षणाच्या माध्यमातून ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले तर कोणत्याही संकटाला न डगमगता यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात. आज कित्येक स्त्रिया स्वतःच्या पायांवर उभे होत आहेत. त्यामुळेच समाजात त्यांचा दर्जा सुध्दा उंचावला जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलींची संख्या समाधानकारक आहे मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत लक्षणीय फरक दिसते. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मुली उच्च शिक्षण पूर्ण करतात, यांत बदल झाले पाहिजे. शासनाने सुध्दा मुलींच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष देवून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यायलाच पाहिजे. मुलगा - मुलगी यांत भेद न मानता समान तत्वावर चालले पाहिजे असॆ वाटते. 
जी व्यक्ती पैसा कमाविते, त्यांस घरात, समाजात आणि गावात प्रतिष्ठा मिळते आणि आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये पैसा फक्त पुरुष कमावितो म्हणूनच त्यालाच प्रतिष्ठा मिळते, यांत काही चूक नाही. मग स्त्रियांनी देखील रोजगार किंवा नौकरी मिळविले आणि त्याद्वारे पैसे कमावू लागले तर समाजात, घरात आणि गावात त्यांची सुध्दा प्रतिष्ठा नक्कीच वाढू लागेल, यांत शंकाच नाही. यांचाच विचार करून प्रत्येकाने आपल्या बहिणीला किंवा मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असॆ शिक्षण देऊन त्यांना रोजगार किंवा नौकरी करण्याची संधी दिली तर ते स्वतः प्रगल्भ होतील आणि त्यांची समाजातील पत वाढून दर्जा सुध्दा वाढण्यास मदत होईल. कायद्याने प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी देण्याची तरतूद केलेली आहे. आज नोकरी असो वा राजकारण तेथे महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल न ठेवणारी महिला आज रात्र पाळी च्या ठिकाणी काम करण्याची तयारी दर्शविते यावरून तिचा दर्जा उंचावला आहे असे नक्कीच म्हणता येईल. पण हे वर वर दिसणारे चित्र आहे. याच चित्राची दुसरी बाजू फारच भयानक आहे. आज बऱ्याच स्त्रिया  नोकरी किंवा इतर कारणाने घराबाहेर पडत आहेत, पुरुषा सारखे काम करून पैसा देखील कमावित आहेत मात्र तरी ही त्यांना त्यांच्या मनासारखे जीवन जगता येत नाही. नोकरी करावी महिलांनी आणि तिच्या पगारावर नियंत्रण पुरुषाचे. ATM सारख्या कार्डने पुरुषांना खूप  सोईचे केले आहे. नाही तर पूर्वी पैसे काढण्याच्या निमित्ताने बँकेत जायला भेटायचे. आत्ता ती ही सोय उपलब्ध नाही. काही महिलांची एवढी बिकट अवस्था आहे की ATM चा पिन क्रमांकदेखील त्यांना माहीत नसतो. मग आपल्या एवढ्या शिक्षणाचा आणि नोकरीचा फायदा तो काय ? इकडे राजकारणामध्ये ही महिलासाठी अच्छे दिन आहेत असे वाटत नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील राजकारण मध्ये सहभागी व्हावे म्हणून त्यांना आरक्षण दिले आहे. त्याचमुळे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी श्रीमती इंदिरा गांधी विराजमान होऊ शकल्या. भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीच्या पदावर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची निवड झाल्यावर सर्व महिलांना नक्की अभिमान वाटला असेल यात शंका नाही. भारतीय राजकारणात नाव घेण्याजोग्या अजून भरपूर महिला आहेत. जे की स्वबळावर पुढे आले आहेत. पण नेमके याच ठिकाणी आपल्या हातून चूका होतात आणि ग्रामपंचायतच्या सरपंचपदापासून ते महापालिकेच्या महापौरपदापर्यंत महिलांना संधी दिली जाते. मात्र याठिकानी त्या महिलांना निर्णय घेण्याची संधी फार कमी वेळा मिळते. कारण त्यांचे पतिदेव किंवा घरातील कर्तबगार पुरुष निर्णय घेत राहतो. महिलांना फक्त सहीपुरते सिमीत  ठेवल्या जाते. कळसूत्रीबाहुली प्रमाणे यांचे वागणे होऊन जाते. याठिकाणी एक गोष्ट खास करून नमूद करावेसे वाटते, सभापती किंवा अध्यक्ष पदावर महिला असेल तर त्यांचे पती किंवा इतर कोणी तरी पुरुष सर्व सूत्रे हातात घेऊन काम पाहतात. असेच जर एखादी महिला नोकरदार आहे, याठिकाणी त्या महिलेच्याऐवजी तिच्या पतीला किंवा घरातील एखाद्या पुरुषांना तिथे पाठविले तर याच लोकप्रतिनिधी मंडळीना ही बाब नक्की पटत नाही. असे का ? याचा ही जरा विचार करावा लागेल. नुकतेच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका पूर्ण होऊन त्याचे निकाल देखील जाहीर झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी सभापती, अध्यक्षा किंवा महापौर होण्याची संधी महिलांना मिळाली असेल. त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानासाठी जरा विचार करावा. पुरुष मंडळीनी सुद्धा महिलेला मिळालेल्या संधीनुसार तिला मार्गदर्शन करावे आणि स्वतंत्र व्यवहार तिला करू दिल्यास काही तरी विकास नक्की होईल.
जुन्या विचारांचा पगडा डोक्यावर असल्यामूळे समाज आज सुध्दा त्या सनातन परंपरेत अडकून पडले आहे. महिला वर्ग या विचार पध्दतीत मोठ्या प्रमाणात दिसून येतात. श्रध्दा आणि अंधश्रद्धाच्या विळख्यातून महिला अजूनही बाहेर आले नाहीत. तेंव्हा महिलांनी आत्ता आपला समाजातील दर्जा वाढविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे सुध्दा तेवढेच आवश्यक आहे. समाजात एकाएकी असॆ बदल होणार नाही. त्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही सामंजस्यपणे वागणे ही गोष्ट सुध्दा विसरून चालणार नाही. 

नागोराव सा . येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. ) 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
nagorao26@gmail.com

••••••••••••••••••••••••••••••••••••

लेख - तिला मदत .... ?*

आठ मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिन साजरा केला जातो. महिलांना सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस फक्त आजच्या दिवशी साजरा करण्यात काही अर्थ आहे का ? महिला दिन रोजच साजरा करण्यासारखा आहे. कारण पुरुषांच्या जीवनातून महिला वजा केल्यावर जीवन काय उरते ? याची साधी कल्पना देखील करवत नाही. विचार करण्यासारखी बाब आहे, पण यावर कोणाताच पुरुष विचार करत नाही, हीच फार मोठी खेदाची बाब आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना देखील वागणूक मिळायलाच हवे असे बोलणारे अनेक भेटतील पण बोलल्या प्रमाणे कृती करणारे फारच कमी बघायला मिळतात. महिलांना घरात मिळणारे दुय्यम स्थान हा विषय सर्वांसाठी चिंतन करणारा आहे. यासाठी सर्वात पहिल्यांदा पुरुषाला स्वतः मध्ये बदल करणे आवश्यक आहे तरच महिलांना काही करता येईल.
घरात, समाजात कामाची झालेली विभागणी यावर चर्चा व्हायला पाहिजे. आपल्याकडे कामाची अशी विभागणी झालेली आहे की, अमुक काम पुरुषांनी आणि तमुक काम स्त्रियांनीच केली पाहिजे. याठिकाणी कसलीही तडजोड स्वीकारायला आपले मन तयार होत नाही. याची शिकवण अर्थात लहानपणापासून मिळते ज्यामुळे एकामेकांची कामे वाटून घेतली आहे. म्हणून महिलांच्या या कामामध्ये पुरुषांनी स्वतः हुन सहभागी झाल्यास काही बदल होऊ शकेल. प्रत्येक पुरुषांनी घरातील महिलांच्या कामात थोडीशी मदत करायला हवी. आपली जराशी मदत देखील महिलांना खुप काही बळ देऊन जाईल. प्रत्येक घरातील महिला सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भरपूर काम करत असते. त्या सर्व कामातील काही काम पुरुषांनी केले तर तेथे खरी समानता सुरू होईल. ज्या घरात पुरुष आपल्या पत्नीला किंवा आईला मदत करतो त्या घरात असणारे मुलं देखील भविष्यात तसे वर्तन करतील. म्हणजे नकळत आपण आपल्या मुलांवर असे संस्कार करत असतो हे महत्वाचे आहे.
आज रोजची वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चालू केले की महिलांवर होत असलेल्या अनेक अन्यायकारक बातम्या वाचायला व पाहायला मिळते. अनैतिकता खूप वाढली आहे असे चिंताजनक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडते पण ही अनैतिकता का निर्माण झाली असेल यावर चिंतन करत नाहीत. पूर्वी महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती आज त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी मिळून देखील ते निर्भयपणे फिरू शकत नाहीत. म्हणजे ते आज ही आपल्या घरातच कैद असल्यासारखे आहेत. एखादी महिला रात्रीच्या वेळी सुमसान रस्त्यावर असेल तर तिच्या जीवाला धोखा ठरलेला आहे. दिल्ली, मुंबई सारखी महानगरे रात्रीला झोपत नाहीत असे म्हणतात पण त्याच न झोपणाऱ्या शहरात लोकांची झोप उडून जाईल अश्या घटना घडत आहेत. महिलांच्या मनातील भीती काढण्यासाठी प्रत्येकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. नुसते असे महिला दिन साजरे करून काही निष्पन्न होणार नाही. म्हणून महिला दिन एक दिवस नाही तर 365 दिवस ही साजरे व्हायला पाहिजे असे वाटते.

- नासा येवतीकर, 9423625769

••••••••••••••••••••••••••••••••••••

लघुकथा - मुलांपेक्षा मुलगी बरी.....!

आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन तपासून निघुन गेले. काही त्रास होते काय ? अशी विचारण करून डॉक्टर आपल्या जागेवर गेली. तसे सासुबाई आणि डॉक्टर यांच्यात काही तरी कुजबुज बोलणे झाले. पण तिला काही त्यातले कळू दिले नाही. घरी आल्यावर चर्चा झाली. गर्भात मुलींचे अंश असल्यामुळे गर्भपात करावा अशी सासुबाईची ईच्छा होती. कारण तिला पहिली अडीच तीन वर्षाची एक सुंदर मुलगी होती. सध्या तिला दिवस गेले होते. सासुबाईची ईच्छा होती की यावेळी मुलगाच हवा अशी ती हट्ट करत होती. कारण मुलगा हा वंशाचा दिवा असतो. तो जर नसेल तर आपल्या साऱ्या संपत्तीचे करायचे काय ? या समस्येमुळे तिला खुप त्रास होत होता. तो सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होता. त्याला तिची समस्या कळत होती पण तो आईला समजावू शकत नव्हता. काही केल्या ती कोणाचे ऐकत नव्हती. ती जुन्या विचारसरणीची होती.  त्यामुळे त्या दोघांना पण डोक्यावर टेंशन येत होते. पण गर्भपात करायचे नाही यावर ते दोघे ठाम होते. त्यादिवशी पोटात त्रास होत असल्यामुळे सकाळी सकाळी तिला दवाखान्यात भरती करावे लागले. काही वेळानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलींपेक्षा ही ती खुप सुंदर दिसत होती. तो तिच्या सोंबतच होता. मुलगी झाली हे कळताच सासुबाईचा चेहरा खुप उतरुन गेला. सासुबाई मुलगी जन्मली हे कळाल्यावर देखील दवाखान्यात आली  नाही. त्यामुळे तिला खुप दुःख वाटले पण त्याची खंबीर सोबत होती म्हणून तिला काळजी वाटत नव्हती मात्र चिंता लागली होती पुढे काय होणार ?
दिवस असेच पुढे सरकत होते. दोन्ही मुलीं चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. दोन्ही मुलीं खुप हुशार होत्या त्यामुळे चांगले गुण घेत प्रत्येक वर्गात उत्तीर्ण होत गेल्या. दोघांनाही मेडिकलला प्रवेश मिळाला आणि एक मुलगी डोळ्याची डॉक्टर झाली तर छोटी मुलगी मेडिकल ऑफिसर झाली. सर्व काही आनंदात होते. दोघीचे थाटामाटात लग्न झाले. लग्न होऊन ते सासरी जरी गेले असतील तरी आई बाबा आणि आजी यांना ते विसरले नाहीत. दोन्ही मुलीं आजीवर खुप प्रेम करायचे एवढे असून देखील सासुबाई अजुन मोकळेपणाने बोलत नव्हत्या. पण एके दिवशी सासुबाईला डोळ्याचा त्रास झाला तेंव्हा तिला मोठ्या मुलींच्या दवाखान्यात एडमिट करण्यात आले. मोठ्या मुलीने आपल्या अभ्यासाच्या बळावर डोळ्याची यशस्वीपणे शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यावेळी तिच्या आई बाबाला खुप आनंद झाला. डोळ्यांची समस्या सुटल्यामुळे सासुबाईचे डोळे उघडले आणि आज ती म्हणते मुलापेक्षा मुलगी बरी उजेड देते दोन्ही घरी.
( आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने मुलींच्या जन्माविषयी प्रत्येकाने डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे. हेच या कथेच्या माध्यमातून सांगण्याचा एक छोटा प्रयत्न. )

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. )
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

साहित्य वाचन केल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया खाली comment करावे plz. 

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...