Friday, 13 January 2017

कुटुंबव्यवस्था


वसुदेव कुटुंबकम "

कुटुंब म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते एक असे चित्रं ज्यात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू आणि इतर मंडळी असा जवळपास दहा ते पंधरा लोकांचा समूह. या कुटुंबात वावरत असताना मिळतो अनेक गोष्टीचे संस्कार जसे की वडिलांनी एखादी वस्तू घरात आणली असेल तर ती सर्वांनी मिळून मिसळून खावी. यामूळे मुलांवर समानता या मूल्यांची नकळत रुजवण होते. घरात वाडवडिलांचा वावर असल्यामुळे घरातील सर्वच जण दबक्या आवाजात संवाद करतात. म्हणजे नवरा-बायको, भाऊ-बहीण यांच्यात होणारे भांडण किंवा धुसफुसला आळा बसतो. कोणी मोठ्या आवाजात बोलत नाही. घरातील सर्व कामे विभागली जातात. ज्यांना जे काम जमते ते काम कुणी सांगण्याच्या अगोदर केली जातात. काही जण तर वडील मंडळीकडून शाबासकी मिळविण्यासाठी पुढे पुढे येऊन काम करतात. जणू त्यांचामध्ये स्पर्धा लागली असते. घरातल्या प्रत्येक बाबींवर नियंत्रण असते. ते मग खरेदी करण्याचे असेल वा कुठे गावाला जायचे असेल. प्रत्येक गोष्ट वाडवडील मंडळींना विचारूनच करावे लागते त्यामूळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चैन किंवा ऐश आरामच्या बाबीला एकप्रकारे लगाम घातल्या जाते. एकत्रित कुटुंब पध्दतीमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात. लहान मुलांना घरातील आजी अन् आजोबा व्यवस्थितरित्या सांभाळ करतात. त्यांना रामायण  व महाभारत इसापनीती किंवा इतर गोष्टी सांगतात. आजी गाणे ऐकवते त्यामूळे मुले भविष्यात चांगले व्यक्ती बनू शकतात. आजोबा व्यवहारज्ञान देतात.
परंतु सध्याच्या नवीन पध्दतीमधील जोडप्याना असे एकत्र कुटुंब पध्दत म्हणजे डोक्याला ताप वाटत असते. वधूपिता आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत असताना प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो त्यात हे पण विचारपूस करतो की लग्नानंतर मुलगा कोठे राहणार आहे ? मुलगा स्वतंत्र राहणार असेल तरच वधूपिता लग्नासाठी होकार देतो अन्यथा नाही. यांत त्या वधूपित्याची काही  चूक दिसत नाही. कारण आपल्या मुलीला सासरी जास्त कष्ट पडू नये, तिने सुखात रहावे याच विचारात प्रत्येक वधूपिता असतो. ज्यावेळी आपल्या मुलांच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा मात्र हाच वधू पिता सासरी आलेल्या मुलीला नावे ठेवतो. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. सासू सासऱ्या सोबत राहिले तर हिला जास्त काम करावे लागते म्हणून तिच्या घरांच्या लोकांनी आमचं नातं तोडून काढलं असा आव आणतात. परंतु प्रत्यक्षात त्यांची सु्रुवात कोणाकडून झाली ? माझ्याकडून झाली याचा मात्र विचार केला जात नाही. याच विचार शैलीतून आज एकत्रित असलेली कुटुंब पध्दती विभक्त झाली आहेत. हम दो हमारे दो किंवा आम्ही दोघे राजा-राणी, नको आमच्यात कोणी ही भावना दिवसेंदिवस बळावत चालली आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कदाचित या गोष्टीची चिंता कोणी करीत नाहीत किंवा त्यांची जाणिव त्यांना अजून झाली नाही. आपल्या आई वडिलांपासून विभक्त राहून खरेच आपल्या कुटुंबाची प्रगती होते काय ? या गोष्टीचा गंभीरतापूर्वक विचार केल्यास, त्याचे  उत्तर नाही असेच येते. मात्र तरी सुध्दा वेगळी चूल मांडण्याचा अट्टाहास कधी बायकोकडून तर कधी नवऱ्याकडून होते. यांत कोणाचा दोष आहे ? यांपेक्षा याची झळ आपल्या लेकरांना लागते हे आपण कधीच विचार करीत नाहीत. विभक्त कुटुंबात राहणारी मुले सहसा एकलकोंडी होतात. प्रत्येक गोष्ट मागितली की मिळते त्यामुळे हट्टी होतात. घरात आणलेली वस्तू आपलीच, त्याच्यावर आपलाच जास्त अधिकार आहे या सवयीमुळे त्याच्यात स्वार्थी भावना खोलपर्यंत रुजते. कारण त्यांचा सहवास फक्त कुटुंबातील आई-वडील आणि भाऊ-बहिण एवढ्यापुरतेच सिमित राहते. त्यांच्यावर आजीच्या गाणी आणि आजोबांच्या गोष्टी ऐवजी टीव्ही वरील अश्लील व बिभत्स गोष्टीचे संस्कार होतात. समाजात काही अनैतिक बाब घडली की आपणंच बोलून मोकळे होतो काय ही आजकालची पोरं, काहीच मॅनर नाहीत.
घराघरात नवरा-बायको यांचा वादविवाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यावसन घटस्फोटामध्ये होण्याचे प्रमाण वाढण्यामागे सुध्दा ही विभक्त कुटुंब पध्दत कारणीभूत आहे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. घरातील नवरा बायकोच्या भांडणाचे प्रतिकूल परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. रात्री भांडण झाले की दिवस उगवल्याबरोबर बाई माहेरी जाते, जाताना सोबत लेकरांना घेऊन जाते. पण लेकरांची शाळा बुडेल, त्याचा अभ्यास राहून जाईल या गोष्टीचा विचार ते कदापिच करणार नाहीत. शहरांत अश्या घटना फार कमी घडत असतील मात्र ग्रामिण भागात असे प्रकार सर्रास घडतात. बायको म्हणेल तसा नवरा ऐकावेच लागते किंवा नवरा म्हणेल तसे बायकोला ऐकावेच लागते असे चित्रं या राजा-राणीच्या कुटुंबात दिसून येते. अश्या कुटुंबात एकमेकास विरोध झाला की भांडण होणार हे ठरलेलं आहे. परंतु जर राजा व राणी दोघेही सामंजस्यपणाने एकमेकाला समजून घेऊन संसार केल्यास त्यांच्याएवढा सुखी जगात शोधूनही सापडणार नाहीत.
आजची कुटुंब व्यवस्था कशीही असेल आणि आपण एकत्रित असो वा विभक्त कुटुंब पध्दती मध्ये राहत असो आपल्या लेकरांसाठी वर्षातून किमान एक दोन वेळा तरी काही ना काही कारणांनी एकत्र आले पाहिजे मौजमस्ती केली पाहिजे यामुळे मुलांवर योग्य संस्कार होतात जे की किती ही पैसा खर्च केला तरी विकत मिळणारी वस्तू नव्हे त्यासाठी आपण आपल्या वागणूकीत बदल केला पाहिजे. सुखी कुटुंबात सर्व लोकं एकमेकाना समजून घेऊन राहतात म्हणूनच ते दूर दूर राहून सुध्दा सुखी राहतात. त्यांच्याजवळ काही जादूटोणा नाही की मंत्र तंत्र नाही. कुटुंबातील आई-वडील हे फार महत्वाचे व्यक्ती आहेत पण त्यांची काळजी न घेता त्यांना वृध्दाश्रम मध्ये पाठविले जाते. तेंव्हा प्रश्न पडतो की वृध्दाश्रम कश्यासाठी निर्माण झाले असतील. वास्तविक पाहता आई - वडील हेच आपली खरी दौलत आहे. एका कवितेत म्हटले आहे घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. खरोखरच आई वडीलांची आपल्या लेकरांबाबतची माया निराळीच असते. तळहाताच्या फोडाप्रमाणे आई वडील मुलांची देखभाल करतात, त्यांना मोठी करतात. आजच्या काळात मात्र मुले मोठी झाल्यावर आपल्या जन्मदात्यालाच विसरतात. ज्यांनी आपणाला या सुंदर अश्या पृथ्वीवर आणले, त्यांना वृध्दाश्रमात धाडण्यास सुध्दा मागे पुढे पहात नाहीत. ज्या आई वडिलांनी आपणाला लहानाचे मोठे केले त्यांच्याप्रति आपले काहीच कर्तव्य नाहीत काय ? त्यांच्यावर आपण एवढा अन्याय का करावा ? आजच्या विभक्त कुटुंब पध्दती मुळे नातवंडाना आजोबांची कथा आणि आजीचे गाणी ऐकायलाच मिळत नाहीत.आजी - आजोबांचे प्रेम कसे असते हे फक्त चित्रपटातून पाहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या नातवंडाचे किती दुर्भाग्य ! अशा घटनांना सर्वस्वी ही मुलेच जबाबदार आहेत असे मला वाटते. काही कुटुंबात भावाभावाचे वाद होतात. काही वेळा बायकोच्या कटकटीमुळे ईच्छा असूनही मुलांना आई वडिलांपासून दूर रहावे लागते. अशा वेळी घरातील चिमुकल्याचे खूप नुकसान होते. दिवसेंदिवस समाजातील नीतीमत्ता खालवली जात आहे. घरातील थोरासाठी ज्या काळात वृध्दाश्रमाची सोय झाली, त्याच काळात नितिमत्ता लयास जाण्यास सुरुवात झाली. मी माझ्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही, असे म्हणताना आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपले पोट भरविले या गोष्टीची आठवण मुलांनी एकदा तरी ठेवायला हवी. रोज सकाळी उठून देवपूजा करते, देवाला गोडधोड नेवैद्य देते, पण सासू सासऱ्याच्या तब्येतीबद्दल न विचारणाऱ्या सुनेला आयुष्यभर देव कळणार नाही. आजकाल माहेरच्या सांगण्यावरून किंवा कुठल्याही कारणावरून " आम्ही दोघे राजा राणी, घरात नको परका कोणी " अशीच संसाराची पध्दत नवीन मुलींच्या मनात रूढ होऊ पाहत आहे. संकृतमध्ये एक श्लोक आहे मातृ देवो भव, पितृ देवो भव अर्थात आई वडिलांना देव माना व त्यांचा आदर करा, सेवा करा, यांतच मुलांची पुण्याई आहे. एखाद्या तीर्थक्षेत्री ठिकाणी भेट दिल्याने जे पुण्य मिळविता येते असे वाटते त्यापेक्षा जास्त पुण्य आई वडिलांच्या सेवेतून मिळते. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांना जर वृध्दाश्रमात पाठवित असाल तर उद्या तुम्हांला सुध्दा याच वृध्दाश्रमात तुमची मुलं तुम्हांला पाठवणार नाहीत कश्यावरून. कारण जसे पेराल तसे उगवणार ते तर ठरलेलेच आहे. तेंव्हा प्रत्येक मुलाने " वृध्दाश्रम कश्यासाठी " यावर सखोल चिंतन करून आपल्या आई वडीलांची आजन्म सेवा करावी यातच आपली पुण्याई आहे.
आपण शाळा, महाविद्यालयामधून कितीही शिक्षण घेऊ द्या. आपणास जन्म देणारी आई हीच आपल्या सर्वाची पहिली गुरु आहे. जीवनामध्ये गुरुचे स्थान अनन्य साधारण महत्वाचे आहे. गुरु विना ज्ञान मिळविणे अशक्य आहे, असे संत कबीर आपल्या दोहात सांगतात. लहानपणापासून ते वृध्द अवस्थेपर्यन्त आपणास गुरुची आवश्यकता भासते.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक वळणावर आपणास गुरुची गरज भासते.गुरु म्हणजे कोण असतो ? गुरु म्हणजे मार्गदर्शक, गुरु म्हणजे ज्ञान देणारा, गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधारात दिवा लावून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा, गुरु म्हणजे दिशादर्शक. जेव्हा जेव्हा आपणास काही अडचणी निर्माण होतात, समस्या उद्भवतात तेंव्हा तेंव्हा आपणास जाणकार तज्ञ व्यक्तिकडे जावे लागते. म्हणजेच गुरुकडे जावे लागते. गुरु म्हणजे लघू नसलेला, लहान नसलेला. ज्याच्याकडे भरपूर ज्ञान व विद्या आहे तोच खरा गुरु. जे लोक गुरु होण्याचा मुखवटा धारण करतात ते एक ना एक दिवस उघडे पडतात आणि त्यांची पत घसरल्याशिवाय राहत नाही. आपले स्थान टिकविण्यासाठी गुरु लोकांना खुप मेहनत घ्यावी लागते.आपले ज्ञान सतत वाढवत ठेवावे लगाते.त्यासाठी नियमित अभ्यासाचा सराव करावा लागतो. पूर्वीच्या काळात गुरुच्या घरी जाऊन आणि तेथेच राहुन शिक्षण घ्यावे लागत असे त्यास गुरुकुल पद्धत असे म्हटले जाते. त्याठिकाणी गुरु हा शिष्याना ज्ञान देण्याचे काम करीत असत आणि त्या विभागाचा राजा त्या गुरुचा यथायोग्य धनसंपत्ती देऊन स्वागत करायचा, ही पध्दत होती. ही गुरुकुल पद्धत आत्ता हॉस्टेलच्या स्वरुपात दिसून येते. मात्र त्यात गुरुकुलमध्ये जी आत्मीयता , प्रेम किंवा जिव्हाळा दिसून येत असे ते मात्र दिसून येत नाही. मधल्या काळात गावोगावी गुरुकुल ऐवजी शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा उदयास आली आणि गुरुकुल मधील गुरु हे शिक्षक या नावाने ओळखले जाऊ लागले. विद्येचे घर अगदी आपल्या घराजवळ उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण घेणारे आणि देणारे यांची संख्या वाढीस लागली. राजाच्या ऐवजी शासन त्यांना दरमहा वेतन देत शासकीय कर्मचारी केले. असे हळूहळू गुरुचे पद व्यावसायिक होत गेले. गुरुच्या व्यवसायात जैसेही लक्ष्मी, पैसा प्रवेश केला तैसे विद्या मंद गतीने दूर निघून गेली. कारण लक्ष्मी आणि सरस्वती सहसा एकत्र राहू शकत नाहीत.
शाळेच्या बाबतीत सुध्दा असेच घडले शाळेत जैसे ही लक्ष्मीने प्रवेश केला तसे शाळेचेही रूप पालटले. पूर्वी शाळेतल्या गुरुजींना खुप मान सन्मान मिळायाचा, आदर मिळायाचा, लोक त्यांना सन्मानाने बोलायचे,मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज गुरूजी बदलले,समाज बदललला, आणि परिस्थिती सुद्धा बदलली. आज कोणालाही शाळेतील गुरूजीची गरज भासत नाही. कारण त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी घरात संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल, स्मार्ट फोन सारखे तंत्रज्ञान 24 तास त्यांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना गुरुचे ज्ञान तोकडे वाटत असेल ? सोशल मिडियाच्या विविध माध्यमातून ज्ञानाची झरे वाहत आहेत. काही वर्षानंतर गुरुची संकल्पना मागे पडते की काय ?अशी भीती सुध्दा राहुन राहुन मनात येते.त्यासोबत अजुन ही या गोष्टीवर विश्वास वाटतो की गुरुशिवाय मनुष्याचे जीवन सफल होऊच शकत नाही. संगणका सारखे निर्जीव वस्तू बटण दाबता क्षणी माहिती देईल ;परंतु गुरु -शिष्य या दोन सजीवात ज्ञानाची जी देवाणघेवाण ते कदापि ही शक्य नाही. मुलांवर संस्कार टाकण्याचे काम निर्जीव वस्तू नक्कीच करू शकणार नाही, त्यासाठी सजीव व्यक्तीच पाहिजे.
मनुष्याच्या जीवनात गुरुचे पहिले स्थान हे आपणास जन्म देणाऱ्या आईला दिले जाते. पृथ्वीवर जन्माला येण्यापूर्वी पासून आईचा संबंध येतो. आई आपल्या बाळाला नऊ महीने नऊ दिवस गर्भात वाढवून मोठी करते. गर्भसंस्कार सुध्दा जीवनात मोलाचे काम करतात. आई आपल्या मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्कार करते आणि मुलभुत ज्ञान सुध्दा देते. ऐकणे आणि बोलण्याची क्रिया आईने जर शिकविली नसती तर त्या मुलाचा काय विकास होऊ शकतो ? याची आपण कल्पना करू शकतो. समाजामध्ये आणि शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वी प्रत्येक मुलांना आई ज्ञानाचे धडे देऊन तयार करते. म्हणूनच आई माझा गुरु आई कल्पतरु असे एका कवीने आपल्या कवितेत म्हटले आहे, ते काही खोटे नाही. इतर सर्व गुरुपेक्षा आई ही अत्यंत महत्वाची आद्य गुरु होय. आपले मूल चांगले संस्कारी, हुशार आणि सुजाण नागरिक म्हणून समाजात जगावे असे वाटत असेल तर प्रत्येक आईने तज्ञ गुरुच्या भूमिकेतून आपल्या मुलांना घडविण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र राज्याचे आणि हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांची आई राजमाता जिजाऊ यांनी घडविले म्हणून ते लहान वयात सुध्दा खुप मोठा पराक्रम करून दाखवू शकले. परमपूज्य सानेगुरूजी सारखा हळव्या मनाचा आणि आईच्या हृद्याचा व्यक्ती आपणास लाभला ते फक्त त्यांच्या आईमुळेच, हे त्यांच्या श्यामची आई पुस्तकातुन पानोपानी दृष्टिस पडते. अशियम्मा सारख्या मातेच्या संस्कारामुळे ए पी जे अब्दुल कलाम सारखे मिसाईल मैन देशाला राष्ट्रपती म्हणून लाभले होते.
कुटुंबव्यवस्थेत सर्वच घटक अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे सर्वाशी आदरपूर्वक, सन्मानपूर्वक वागणे आपले कर्तव्य आहे.
चला आपण ही सर्वच जण या गोष्टीचा अंगीकार करू आणि संपूर्ण देश सुखी कुटुंब करू या

- नागोराव सा येवतीकर
  मु येवती ता धर्माबाद
  9423625769

Thursday, 12 January 2017

तिळगुळ घ्या गोड-गोड बोला

गोड गोड बोलण्याचा सण

नविन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत.
मकरसंक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर  राशीत प्रवेश करतो तो दिवस. सूर्य या दिवशी  दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सुर्य उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. याच दिवसापासून हिवाळा हळूहळू संपू लागतो आणि उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो तो याच दिवशी.
इंग्रजी महिन्यानुसार मकरसंक्रांत हा दिवस १४  जानेवारी रोजीच येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एका दिवसानी पुढे सरकते.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवसात साजरी करण्याची पध्दत आहे. संक्रांतीच्या पूर्वी भोगी, आणि संक्रांती नंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांती  म्हणजे कर सण साजरा केला जातो. संक्रांती सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातलगाना आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला  तिळगुळ देतात आणि 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असे सांगून स्नेह, प्रेमात वाढ होण्याविषयी शुभकामना शुभेच्छा देतात. थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. जीवनामध्ये नेहमीच आपणाला हा संदेश उपयोगात येऊ शकतो. जगात बंधुता निर्माण करायची असेल तर सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे. गोड बोलणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याने त्रास होणार नाही असे बोलणे होय. बहुतांश वेळा मोठ्या भांडणाचे मूळ जर शोधले तर ते बोलण्यावरुन घडल्याचे लक्षात येते. त्यामुळे असे म्हटले जाते की, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणे केव्हाही चांगले. सतत आपले बोलणे म्हणजे पिरपिर चालू ठेवण्यापेक्षा फार कमी बोलल्यास त्याचा फायदा आपणास नक्की होतो. ' उचलली जीभ लावली टाळ्याला ' या म्हणीनुसार जर आपण बोलत असू, तर आपल्या बोलाण्याला काहीच किंमत उरणार नाही. त्यास्तव आपले महत्त्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकही घर शोधूनही सापडणार नाही, ज्यांच्या शेजारी शेजारी भांडण होत नाही. परंतु आपण आजच्या दिवसाचे तत्व जर वर्षभर अवलंबिले तर शेजाऱ्यांसोबतची भांडणे कमी होतील. संकट काळात किंवा अडीअडचणीत आपणाला आधार कोण देतो ? तर तो असतो शेजार. घराला कुलूप लावून जायचे असेल तर आपण कुलुपाची  चावी कुठे ठेवणार ? दुपारच्या सुट्टीत घरी येणाऱ्या मुलांची व्यवस्था कोठे होते ? घरी वडील नसते वेळी घरात काही अपघात घडले तर कोणाला बोलवणार ? अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरे शेजाऱ्यांच्या घरी जाऊन थांबतात. संतानी सांगून गेलत की, शेजाऱ्यांवर प्रेम करा. म्हणून विशेष करून शेजाऱ्यांपाजाऱ्यांना नेहमीच गोड बोलणे फायद्याचे ठरते.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचा कुठे ना कुठे शेतीशी संबंध येतो. जानेवारीच्या दिवसांमध्ये शेतातून उत्पन्न येण्यास प्रारंभ झालेले असते. शेतातून आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करतात. हरभरे, उस, बोरे गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात तसेच सुवासिनीची ओटी ही भरतात.
भारतातल्या विविध प्रदेशात वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. जसे की उतर भारतातील हिमाचल प्रदेश  आणि पंजाब मध्ये लोहरी या नावाने हा सण साजरा केला जातो. पूर्व भारतातील आसाम राज्यात भोगाली बिहु असे म्हटले जाते. पश्चिम भारतात गुजरात व राजस्थान मध्ये हा सण उतरायण म्हणजे पतंग उडविण्याचा सण म्हणून ओळखला जातो. आबालापासून वृध्दापर्यंत सर्वच जण खुप मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून धमाल करतात. भारताच्या दक्षिण भागातील तामिळनाडू राज्यात हा सण पोंगल या नावाने खुप प्रसिध्द आहे. भारतातल्या  इतरत्र भागात संक्रांती या नावानेच हा सण प्रसिध्द आहे.
मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी यात्रा आयोजित केले जातात. प्रामुख्याने प्रत्येक बारा वर्षांनी आयोजित करण्यात येणारी कुंभमेळा यात्रा, ज्याची बरेच जण प्रतिक्षा करतात. याशिवाय कोलकाता शहराजवळ जेथे  गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. भारतातल्या विविध भागातील आणि प्रदेशातील लोक यादिवशी एकत्र येतात. भारतातील ही सर्वात मोठी यात्रा समजली जाते. केरळ राज्याच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते. मकरसंक्रांत हा सण जरी एक असेल परंतु भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पध्दतीने सण साजरी करतात. त्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे एकमेकांना प्रेम देणे आणि घेणे. तेंव्हा चला तर मग पुढच्या मकरसंक्रांती पर्यंत काळजी घ्या स्वतः ची आणि हो शेजाऱ्यांची सुध्दा.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Wednesday, 11 January 2017

राजमाता जिजाऊ

आई असावी जिजाऊ सारखी

कुटुंबातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे आई. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते खरोखरच ज्यास आई नाही त्यालाच वरील ओळीचा अनुभव येईल. आईंची महती शब्दात व्यक्त करणे कठिण आहे. एक कवी आईला आपल्या कवितेत प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई असे संबोधतो. आपल्या जीवनाला वळण देणारी, आपले जीवन संस्कारक्षम करणारी म्हणजे आई. वडिलांचे संस्कार आपणास धाडसी करतात तर आईचे संस्कार आपणास मायाळू बनवतात. आईच्या वागणुकीवर मुलांचे वागणे अवलंबून असते. ज्या घरातील आई ही उद्योगी, सतत क्रियाशील, प्रेमळ, इतर लोकांना मदत करणारी असते त्यांची मुले सुद्धा त्याच वृत्तीची तयार होतात. या गोष्टीचा आपण कधीही विचार न करता लहान मुलांसमोर घरात वावरत असतो. लहान मुले टीप कागदाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करतात आणि त्याचे अनुकरण देखील करतात. प्रत्येक मुलांची कुटुंब ही पहिली शाळा आहे तर आई ही त्यांची पहिली शिक्षिका. वडील म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक समजू या. कुटुंबामधून मुलांना प्रत्येक गोष्टीचे संस्कार नकळत होत राहते. संस्कार जाणीवपूर्वक करता येत नाही मात्र तसे जाणीवपूर्वक वर्तन केल्यास मुलांवर नक्की फरक पडतो. कधी कधी आपण लहान मुलांसमोर नकळत खोटे बोलतो मग मुले ही खोटे बोलण्यास सुरुवात करतात. खोटे बोलू नका अशी आपली शिकवण असते आणि आपणच जर मुलांसमोर खोटे बोलत असू तर त्याचा खरोखर चांगला परिणाम बघायला मिळेल काय ? अर्थात याचे उत्तर नाही असेच येते. कुटुंबातील शिक्षण हीच मुलांची खरी प्रगती दर्शवित असते. म्हणून तर शिकलेली आई घरादाराला पुढे नेई असे म्हटले जाते. संस्कृत मध्ये एक श्लोक आहे 'कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति' अर्थात एखाद्या वेळी कुपुत्र म्हणजे वाइट मुलगा जन्मास येऊ शकतो मात्र कुमाता म्हणजे वाइट आई जन्मास येणे अशक्य आहे. प्रत्येक आई आपल्या मुलांविषयी चांगले तेच पाहते.
जगात असे अनेक उदाहरण आहेत ज्या ठिकाणी आईच्या सहवासामुळे ते व्यक्ती महान झाले. ज्यात पहिले नाव येते अर्थात साने गुरुजी यांचे. यशोदा सारखी आई लाभली नसती तर कदाचित श्याम सारखा मुलगा पाहायला मिळाला नसता. तिच्या वागण्या बोलण्यातुन श्याम म्हणजे साने गुरुजी घडले. त्या नंतर दुसरे नाव आवर्जून घ्यावे वाटते ते म्हणजे विनोबा भावे. विनोबा लहान असताना त्यांची आई शेजारच्या लोकांना खूप मदत करीत असे. असाच एक प्रसंग विनोबाजी वर संस्कार करून गेला. विनोबाला सेवा, त्याग, सौहार्द हे संस्कार आपल्या आईकडून मिळाले. एकदा विनोबाच्या शेजारीच राहणारा एक जण आजारी पडला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये विनोबाच्या आईने शेजाऱ्यांना सहकार्य केले. ती आपल्या घरी जेवण बनवल्यानंतर शेजा-याच्या घरी जाऊन जेवण करून द्यायची आणि आजारी व्यक्तीची सेवाही करायची. एकदा विनोबाने आपल्या आईला विचारले, आई, तू किती मतलबी आहेस, स्वत:च्या घरचे जेवण आधी बनवतेस आणि नंतर शेजा-याचे जेवण तयार करतेस. आईने उत्तर दिले. तुला समजत नाही. विनोबा, शेजा-याचे जेवण आधी बनवले तर ते थंड होईल. त्यामुळे मी त्यांचे जेवण नंतर बनवते. दुसऱ्याला संकटाच्या वेळी सहकार्य करण्याचा हा भाव विनोबांनी  नेहमीसाठी सांभाळून ठेवला आणि त्यांचे संपूर्ण जीवन याच भावाचे प्रत्यक्ष उदाहरण बनले. विनोबाच्या मनात प्रेम, माया हे संस्कार त्यांच्या आईच्या वागणुकीतून रुजत गेले. सहज केलेले वर्तन बरेच काही शिकवून जाते. यांच्या आई सारखी आपली आई आहे काय ? मी श्यामची आई किंवा विनोबाच्या आई सारखी बनू शकते का ? याचा कधी आपण विचार करीत नाही. समाजात अजून एकनआई आहे ज्यांच्याकडे सर्वच जण आदर्श माता म्हणून पाहतो ते म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजे यांच्याशी  दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. जिजाबाईंनी छत्रपती शिवाजीला रामायण आणि महाभारतातील शुर वीराच्या गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता इत्यादी गोष्टी सांगितल्या. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजीराजे घडले. जिजाबाईनी  नुसत्या याच गोष्टी सांगितल्या नाहीत तर आपल्या शेजारी बसवून राजकारणाचे धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस सुध्दा दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले. राजमाता जिजाऊमुळे छत्रपती शिवाजी राजे घडले. म्हणून प्रत्येक जण म्हणतो की आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखी. ज्याना कुणाला अशी आई मिळते त्यांचे जीवन खरोखरच धन्य होते. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Sunday, 8 January 2017

पोशाख

पोशाख म्हणजे व्यक्तीची ओळख

व्यक्तीच्या अंगावर असलेले पोशाख म्हणजे पेहराव त्या व्यक्ती विषयी बरीच माहिती सांगते. साधी राहणी अन उच्च विचारसरणीमध्ये राहणारे लोक आपल्या पोशाखाकडे कधी लक्ष देत नाहीत. कारण त्यांना आपल्या पोशाखापेक्षा त्यांना त्यांचे विचार फार महत्वाचे वाटतात. महात्मा गांधी संपूर्ण आयुष्य एका पंचा वरच व्यथित केले होते हे आपण जाणतो. त्यानंतर दुसरे काही व्यक्ती दिसतात जे की आपल्या पोशाखाकडे विशेष लक्ष देतात. एक निरिक्षण असेही दिसते की जी व्यक्ती आपल्या पोशाखाकडे जास्त लक्ष देते ती आपल्या विचाराकडे तेवढे लक्ष देत नाही. आपल्या कपड्याला एक ही डाग लागू नये याची काळजी ते हमखास घेतात. एकवेळ आपल्या विचाराना डाग लागलेले यांना चालते. असे लोक खुप खालच्या स्तरावर जाऊन विचार करतात. काही लोकांना सेवा शर्तीच्या अधीन राहून पोशाख करावा लागतो. एखाद्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना कंपनीने ठरवून दिलेला पोशाख टाकणे बंधनकारक असते. शाळेत शिकणाऱ्या मुलांना शाळेने ठरवून दिलेला गणवेष म्हणजे पोशाख टाकून शाळेला जावेच लागते. शाळेची शिस्त मोडायला जमत नाही. एकसारखा गणवेष परिधान केल्यामुळे मुलांमध्ये एक समानता दिसून येते. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेदभाव दिसू नये यासाठी गणवेषाची सक्ती केली जाते. काही शाळेत याचे वेगळे स्वरुप दिसते त्यामुळे त्यास वेगळेच वळण लागते. मात्र या एकसारखा पोशाख टाकण्यामागे स्पष्ट उद्देश्य म्हणजे मुलांमध्ये एकसूत्रता दिसून यावी. परिवहन मंडळ म्हणजे बस मधील चालक आणि वाहक यांचा पोशाख पाहिल्या बरोबर लक्षात येते की हे बसचे संबंधित व्यक्ती आहेत. त्यांना पाहून आपण सरळ त्यांच्याशी संवाद करतो. तेच जर त्यांच्या अंगावर पोशाख नसेल तर प्रवाशी देखील गोंधळामध्ये पडतो. विद्युत मंडळात देखील असे कर्मचारी दिसून येतात ज्यांच्या अंगावर पोशाख असतो. काही ठिकाणी चौकीदार असतात त्यांचा ही पोशाख ठरलेला असतो. पोशाखावरुन निरक्षर, अडाणी व्यक्ती देखील त्यांना ओळखू शकतो की सदरील व्यक्ती कोण आहे ? एवढे त्या पोशाखाचे महत्त्व आहे. अंगावर पांढरा पोशाख दिसला की आपणास आठवतो तो म्हणजे शाळा मास्तर. जुन्या काळी पांढरा सदरा आणि पांढरी धोती हा पोशाख म्हणजे शाळा मास्तर अशी ओळख असायची मात्र काळ बदलला आज शाळेत शिकवित असलेले मास्तर अश्या पोशाखात दिसून येत नाहीत. मात्र काही राष्ट्रीय सण आणि उत्सवाच्या वेळी आवर्जून पांढऱ्या पोशाखात दिसून येतात. विविध कार्यालयातून परिचर पदावर काम करणाऱ्या लोकांना मात्र पांढरा पोशाख मात्र सक्तीचे आहे. या पांढऱ्या पोशाखाचा वापर खास करून राजकारणी लोक फार मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येतात. पांढरा पोशाख सर्वानाच शोभुन दिसतो म्हणून प्रत्येक जण या पोशाखाचा वापर करताना दिसून येतो. नेपाळी  किंवा गुरखा व्यक्ती देखील आपल्या पोशाखामुळे पटकन ओळखता येऊ शकतो. अजुन एका पोशाखाची ओळख आवर्जून द्यावीसी वाटते ते म्हणजे पोलिसांच्या खाकी वर्दीची. आबालापासून तर वृध्दापर्यंत सर्वाना या पोशाखाचे नेहमीच आकर्षण राहते. पोलिसाची वर्दी पाहिल्याबरोबर अनेक लोकांच्या भुवया उंचावतात. त्यातल्या त्यात डोक्यावर त्याच रंगाची अधिकारी वर्गाची टोपी असल्यास त्यांच्या पासून जरा दूरच राहत असल्याचे दिसून येते. तीच व्यक्ती जर साध्या पोशाखात कुठे बाजारात किंवा इतरत्र दिसली तर त्यांच्याकडे कुणी पाहत देखील नाही. म्हणजे हा पोशाखाचाच कमाल म्हणावे लागेल ! देशाच्या सैनिकांचा पोशाख बघितला की छाती गर्वने फुलून येते. त्या सैनिकांचा सर्वाना अभिमान वाटतो. कधी कुठे दिसला तर त्यांच्याशी हस्तांदोलन करावेसे वाटते. मुलींचा पोशाख वेगळा तर महिलाचा पोशाख वेगळा. लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात परिधान करण्यात येणारे पोशाख अंत्यविधीमध्ये परिधान करता येणार नाही. 

लग्न कार्यात बैंडबाजा वाजविणारे एका पोशाखात दिसतात आणि त्यामुळे त्यांची यूनिट लक्षात राहते. खेळात एका संघाला एक सारखा पोशाख असल्या मुळे दोन विरुद्ध गट स्पष्ट कळतात. हॉटेल मध्ये काम करणारे वेटर एका पोशाखात असल्यामुळे होणारा गोंधळ कमी होतो. आपली आर्डर कोणाला द्यायची हे पटकन लक्षात येते. दवाखान्यात गेल्यानंतर पांढऱ्या पोशाखातील महिला बघितले की तोंडातून सिस्टर असे सहज बाहेर पडते. मग सुरु होतो आपला संवाद. आपल्या समस्या त्यांना सांगू शकतो. पांढऱ्या रंगाच्या पोशाखात गळ्यात स्टेथोस्कोप असेल की लगेच ते डॉक्टर आहेत अशी ओळख आपल्या मनाला होते. डाकिया डाक लाया म्हणत गाव भर फिरणारा पोस्टमन त्याच्या खाकी पोशाखा वरुन दूर असलातरी लगेच ओळखता येतो. रेल्वे स्टेशनवर देखील आपणास विविध पोशाखातील व्यक्ती आढळून येतात. रेल्वेतुन खाली उत्तरल्या बरोबर आपले डोळे लाल रंगातील पोशाख असलेल्या व्यक्तीच्या शोधात फिरत असतात ज्यास कुली म्हणतात. निळ्या रंगाच्या पोशाखातील व्यक्ती रेल्वे स्टेशनची संपूर्ण देखभाल करतात तर पांढऱ्या रंगातील पोशाख घातलेले व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेवर नियंत्रण ठेवतात आणि प्रवाश्याना तिकीट देतात. काळा कोट अंगावर असलेले व्यक्ती टी. सी. म्हणून रेल्वेत तपासणी करतात. असाच काळा कोट अंगावर असलेले व्यक्ती न्यायालयात दिसून येतात त्यांना न्यायाधीश आणि वकील असे संबोधले जाते. डोक्यावर पांढऱ्या रंगाची गांधी टोपी, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळावर गंध, हातात टाळ बघितले की आपल्या समोर वारकरी माणसाचे चित्र आपसुक उभे राहते. जो दर पंढरपुर यात्रा वारी न चुकता करतो. मानवी जीवनात पोशाखाचे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजात असे अनेक पोशाखाचे उदाहारण दिसून येतात. ज्यामुळे आपणास आपल्या समोरील व्यक्ती आणि त्यांचे कार्य स्पष्ट होतात.

- नागोराव सा. येवतीकर

  स्तंभलेखक

मु. येवती ता. धर्माबाद

9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...