दिनविशेष माहिती कार्यक्रम
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज २३ जुलै लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती जाणून घेणार आहोत.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
चला तर मग जाणून घेऊ या ......
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान राष्ट्रपुरुष, थोर समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर राष्ट्रवादी व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे मूळ नाव 'केशव गंगाधर टिळक' होते. लहानपणापासून त्यांना 'बाळ' या टोपणनावाने ओळखले जात असे. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे होते.
टिळकांनी शिक्षणाला राष्ट्रीय विकासाचे प्रभावी साधन मानले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणातून देशप्रेम, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, हा त्यांचा उद्देश होता.
लोकमान्य टिळक हे निर्भीड पत्रकारही होते. त्यांनी मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजी भाषेतून 'द मराठा' हे वृत्तपत्र सुरू केले. त्यात ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका केली. त्यांच्या लेखणीतून जनतेमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली.
टिळकांनी समाजात एकात्मता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. या उत्सवांमुळे सामान्य जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागृत झाले आणि स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली.
त्यांची प्रसिद्ध गर्जना म्हणजे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." या एका वाक्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चळवळ अधिक जोमाने उभी राहिली.
लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा महत्त्वपूर्ण ग्रंथही लिहिला. कर्मयोग, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवा हा जीवनाचा खरा मार्ग असल्याचा संदेश त्यांनी या ग्रंथातून दिला.
दिनांक १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले. परंतु त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
प्रिय विद्यार्थ्यांनो, लोकमान्य टिळकांचे जीवन आपल्याला सत्य, धैर्य, परिश्रम, शिक्षणाचे महत्त्व आणि देशभक्ती यांचा अमूल्य संदेश देते. आपणही प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन, शिस्तीचे पालन करून आणि आपल्या देशाचा जबाबदार नागरिक बनून त्यांना खरी आदरांजली वाहूया.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - लोकमान्य टिळक यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला.
दुसरा प्रश्न - लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या मराठी वृत्तपत्राचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, केसरी हे मराठी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरु केले.
तिसरा प्रश्न - लोकमान्य टिळकांची प्रसिद्ध गर्जना कोणती ?
बरोबर उत्तर आहे, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ही त्यांची प्रसिद्ध गर्जना आहे.
चौथा प्रश्न - लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
बरोबर उत्तर आहे, लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला.
शेवटचा पाचवा प्रश्न - लोकमान्य टिळकांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
No comments:
Post a Comment