Tuesday 13 February 2024

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना पत्र ( CM Letter to Student )

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान अंतर्गत पत्र


एकनाथ संभाजी शिंदे
मुख्यमंत्री महाराष्ट्र

मंत्रालय
मुंबई ४०० ०३२


प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

नव्या दिशेचे, नव्या उषेचे गीत सूर हे गाती,
या मंगल देशाचे आहे, भविष्य अपुल्या हाती'

आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा महान वारसा लाभला आहे. शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी आपला देश घडवला आहे. विविध प्रयोगशील व्यक्तिमत्त्वांनी रुजवलेल्या संशोधनाच्या बीजाचा वटवृक्ष झालेला आपल्याला आज पाहायला मिळतो आहे. 'चांद्रयान-३' मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळावरही सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत, ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. अंतराळ विज्ञानाकडे अभ्यासात्मक तसेच व्यवसायात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे, हे दर्शवणारी ही घटना आहे, जनसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणे महत्त्वाचे आहे.
आपल्या भारत देशाचे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला वर्तमानातच करावी लागणार आहे. शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला हवा. त्यासाठीच सर्वप्रथम शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर आम्ही सदैव भर दिला असून विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे. या अभियानांतर्गत चाकोरीबाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्याथ्यांच्या सर्वागीण विकासास चालना मिळेल. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्यायोगे साहित्याप्रती त्यांच्या अभिरुचीत व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी, यासाठी 'महावाचन महोत्सव' हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण व्हावी तसेच लागवडीचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावे यासाठी 'माझी शाळा, माझी परसबाग' हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी 'स्वच्छता मॉनिटर-टप्पा २' हे अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांत राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन मी या प्रसंगी करीत आहे.
राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'एक राज्य, एक गणवेश' योजना राबवित आहोत, गणवेशासोबत सर्व भुलामुलींना बूट आणि पायमोज्यांची जोडीही देण्यात येत आहे. तुमच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तुमच्या शरीरस्वास्थ्यासाठी शालेय पोषण आहारात सुधारणा करण्यात येत असून त्याद्वारे राज्याच्या विविध भागांतील प्रादेशिक आहाराच्या आवडीनिवडी आणि सवयी विचारात घेऊन त्यानुसार पोषण आहाराची आखणी केली जात आहे. प्रत्येक शाळेत तुम्हा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातून परसबाग विकसित करून त्यातील भाज्या व फळभाज्यांचा समावेश तुमच्या आहारात

करण्याची योजना आखली आहे. तुमच्या आरोग्याची तपासणी करून पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी आम्ही भारतीय बालरोगतज्ज्ञांच्या असोसिएशनसोबत करार केला आहे. विद्यार्थिनीच्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनिटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येत आहेत जेणेकरून मुलीना सॅनिटरी नॅपकिन निःसंकोच उपलब्ध व्हावेत.
तुम्हा सर्वांना नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून HCL, TISS या संस्थांबरोबर आपल्या सरकारने करार केला आहे. पूर्वी इयत्ता आठवीपासून दिले जाणारे व्यावसायिक शिक्षण आता इयत्ता सहावीपासून सुरू होत आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या अद्ययावत प्रशिक्षणाद्वारे तुमच्यापैकी सुयोग्य विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या देशाशी करार करण्यात येत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आसपासच्या परिसरातील उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या कक्षा विचारात घेऊन त्या दृष्टीने मनोवैज्ञानिक चाचण्या घेऊन तुमचे आणि तुमच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सर्व शाळांमध्ये Digital Library, English Language Lab, STEM Lab, Robotic Lab, इत्यादी उभारून त्याद्वारे तुम्हाला २१ व्या शतकातील शिक्षणाच्या अद्ययावत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
राज्यातील काही शाळांची सद्यस्थिती आणि शासनाच्या अनुदानाच्या मर्यादा विचारात घेऊन 'दत्तक शाळा योजना' राबविण्यात येत आहे, जेणेकरून त्या शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवता येतील.
मित्रांनो, या राज्याचे, देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे. तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल. त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत पारंगत व्हायला हवे. 'शासन आपल्या दारी' सारख्या अभिनव उपक्रमाची तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यात साथ मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातील कोट्यावधी नागरिकांना याचा लाभ होत आहे. तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल, पुस्तके, गणवेश यांसह अनेक वस्तु, साधने आपण उपलब्ध करून देत आहोत. तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू आहे.
शासन, समाज हे जसे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न करताहेत, तसाच विचार तुम्हीही अगदी छोट्या गोष्टींपासून करू शकता. तुमचे घर, परिसर, गाव स्वच्छ राहावे हे जसे तुम्हाला वाटते, तसेच तुमची शाळा सुंदर करण्यासाठी रोज थोडा वेळ द्या. त्यातून आरोग्यदायी आणि सुदृढ समाज घडू शकेल. तुम्हीच हा बदल घडवू शकता. हा बदल स्वतःपासून सुरू करावा लागतो, असे मला वाटते. या बदलातून तुम्ही प्रगत महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकाल. यात तुमचा सहभाग तुम्ही नक्कीच नोंदवाल, अशी मी अपेक्षा बाळगतो.
या प्रसंगी सर्व पालकांना व शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना मी असे आवाहन करीत आहे की, त्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून त्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती आपले योगदान  द्यावे.

*जय हिंद, जय महाराष्ट्र !*


No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...