Friday 17 November 2017

अवयवदानाचे संकल्प

*मरावे परी अवयवरूपी उरावे*

जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ही कविता मनात शिरली. मराठीच्या शिक्षकांनी तसा जीव ओतून शिकविला त्यामुळे ती कविता आज ही मनात घर करून आहे. कवितेतील प्रत्येक ओळीतून एकच अर्थ मिळतो की, आपल्या मरणानंतर आपले येथे काहीच उरत नाही. जसे राम आणि कृष्ण आले व गेले तसे आपण ही आलो आहोत आणि एके दिवशी जाणार आहोत. आपल्या मृत्यूनंतर घरातील मंडळी आणि नातलगामधील लोक काही काळासाठी शोक करतील, दुःख व्यक्त करतील आणि त्यानंतर नित्यनेमाने कामाला लागतील. जो जन्माला आलेला आहे तो उद्या मरणारच आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे यात शंकाच नाही. या पृथ्वीवर जन्माला येताना रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. याबाबतीत जगजेत्ता सिकंदराचे उदाहरण तंतोतंत लागू पडते. त्याची शेवटची ईच्छा होती की, दोन्ही हात बाहेर दिसतील असे ठेवा म्हणजे लोकांना कळेल की, एवढं श्रीमंत असून देखील त्यांनी सोबत काही नेले नाही. आपण केलेली कमाई, धनदौलत, जमीनजुमला, घर, संपत्ती, सर्व काही येथेच राहते. फक्त आपल्या चांगल्या कर्मामुळे आपले नाव तेवढे जिवंत राहते. म्हणूनच म्हटले जाते की, पैसा कमाविण्यापेक्षा माणुसकी कमवा. धनाने गरीब असाल तरी चालेल पण मनाने गरीब राहु नका. चांगली कर्मे करणारा व्यक्ती हा कधी ही गरीब राहू शकत नाही. समाजात त्याला चांगली प्रतिष्ठा , मानसन्मान ह्या सर्व गोष्टी अगदी फुकटात मिळतात. पैसा खर्च करून सुध्दा ह्या बाबी सहजासहजी मिळत नाहीत. समाजाला आणि देशाला उपयोगी पडेल असे कार्य केल्यास आपले जीवन व्यर्थ जाणार नाही. देशाच्या रक्षणापायी आजपर्यंत कित्येक जवान मृत्यूमुखी पडले. त्यांचे जीवन व्यर्थ गेले नाही. ते अजरामर झाले आहेत. आपले अनमोल जीवन ही व्यर्थ जाऊ नये, आपण ही या देशाचे व समाजाचे ऋण फेडावे असे वाटत असेल तर अगदी फारच सोपे कार्य आपणासमोर आहे ते म्हणजे आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणे. आज आपण एकविसाव्या शतकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील संगणक युगात वावरत आहोत. कवी केशवसुत यांनी आपल्या तुतारी कवितेत म्हटल्याप्रमाणे जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. जुन्या चालिरिती, पध्दती, प्रथा यांना तिलांजली देऊन आपल्या मृत्यूनंतर अवयवदान देण्याची तयारी ठेवणे गरजू लोकांसाठी एक संजीवनी ठरणार आहे, एवढे मात्र नक्की.
आपल्या शरीरातून जेंव्हा चेतना नष्ट होते तेंव्हा आपला मृत्यू झाला असे जाहीर केल्या जाते. आपल्याला मृत्यू म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. हा विषय देखील चर्चिला जाऊ नये असे वाटते. पण प्रत्येक सजीवाला मृत्यू अटळ आहे.  आपल्या मृत्यूनंतर परंपरेनुसार त्या शरीराची काही जण दफन करतात तर काही जण दहन करतात. म्हणजेच मृत्यूनंतर ते शरीर काहीच कामाचे नाही म्हणून ही कृती केल्या जाते. परंतु आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधातुन माणसाच्या मृत्यूनंतर काही तास शरीरातील काही अवयव त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे जिवंत राहतात. जसे की, डोळे ( सात ते आठ तास ) किडनी, हृदय इत्यादी ठराविक वेळासाठी मेलेल्या व्यक्तीमध्ये जिवंत राहतात. तसेच ते अवयव गरजू लोकांना ठराविक कालावधीत प्रत्यारोपण करून बसविता येते. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते. त्यामुळे त्या व्यक्तीची ती गरज पूर्ण होते आणि त्यास दीर्घकाळाचे जीवन मिळू शकते. जसे रक्त कोठेच तयार करता येत नाही अगदी तसेच  मानवाच्या शरीरात असलेले अत्यंत महत्वाचे असे डोळे, किडनी, हृदय इत्यादी अवयव कोणत्याच कारखान्यात तयार करता येत नाही. त्यास मनुष्य जन्मच घ्यावा लागतो. त्यास्तव तो देह जाळणे आणि पुरणे एवढ्याच कामासाठी शिल्लक असेल तर त्यास दान दिल्याने काय बिघडते ? मात्र यामुळे अनेकांच्या समस्या दूर होऊ शकतात. अनेक गरजूना नवजीवन मिळू शकते. तसे जिवंत असताना आपण अनेक प्रकारचे दान देऊन पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करतो. दानशूर व्यक्ती त्यालाच म्हटले जाते जो आपल्या जवळील सर्व वस्तूचे दान देतो. यासाठी महाभारतातील कर्णाचे उदाहरण दिले जाते. बहुतांश लोक अन्नदान करतात. काही नवयुवक मंडळी रक्तदान करतात. काही लोक पैसा दान करतात तर काही कपडे दान करतात. काही मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्याचा संकल्प करतात. या सर्व दानाच्या प्रकारात अवयवदान सर्वश्रेष्ठ आहे. त्याची आपणास पूर्ण माहिती झाल्याशिवाय तसेच प्रचिती आणि स्वअनुभव आल्याशिवाय त्याची महती कळणार नाही. अवयवदान केल्यामुळे मृत्यू झालेली व्यक्ती सुद्धा त्या अवयवाच्या रुपात दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जिवंत असू शकतो. म्हणजे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी या स्लोगनप्रमाणे. दक्षिण भारतीय चित्रपटातील नागार्जुना, सौंदर्या आणि श्रीकांत या अभिनेत्यांनी नुवस्तावनी या तेलगू चित्रपटात या अवयवदानाचे महत्त्व फार सुंदररित्या अधोरेखित केले आहे. प्रशासन आणि वैद्यकशास्त्र विभागानी या अवयवदानाबाबत लोकामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. चित्रपट क्षेत्रातील मंडळीनी या विषयावर चांगला चित्रपट तयार करून लोकांमध्ये अवयवदानाची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करावा. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या मी जाता राहील कार्य काय ? या प्रश्नाचे उत्तर अवयवदानाच्या संकल्पनेतून नक्कीच करता येईल. याविषयी सर्वानी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे वाटते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असे पूर्वी म्हटले जायचे पण आत्ता मरावे परी अवयवरूपी उरावे असे म्हणणे उचित ठरेल.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

5 comments:

  1. चांगला लेख आहे असेच लिहून लोक जाग्रती करावी

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती👌👌👌👌

    ReplyDelete
  3. आजचा फ्रेश माॅर्निंग बुलेटीन .चा अंक खूप आवडला . मनोरंजन , ज्ञान , माहिती याने परिपूर्ण असा आहे . विशेष म्हणजे *अवयव दानाचा संकल्प* हा ना . सा . सरांचा लेख अतिशय उत्कृष्ट आहे .
    हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी लेखन शुभेच्छा !

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...