Monday, 28 October 2024

आनंददायी दिवाळी ( Happy Diwali )


सर्वांना आनंद देणारा सण : दिवाळी

दिवाळी सण लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडता सण आहे. प्रत्येकालाच या सणाची उत्सुकता लागलेली असते. कोजागिरी पौर्णिमा संपला की दिवाळीची चाहूल लागते. घराच्या छतावर किंवा अंगणात आकाशकंदील लावला की दिवाळीची प्रतीक्षा सुरू होते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. अंधार दूर सारून प्रकाश देणारा सण. लक्ष लक्ष दिव्याने सारा परिसर तेजोमय होतो. सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. इतर सर्व सण एका दिवसात संपतात मात्र दिवाळी हा सण पाच दिवस असतो. वसूबारसपासून चालू चालला सण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलीप्रतिपदा म्हणजे पाडवा अर्थात दिवाळी आणि त्यानंतर शेवटी भाऊबीज सणाने संपन्न केला जातो. प्रत्येक दिवसाचे महात्म्य वेगळे आहे आणि महत्व देखील वेगळे आहे. 
दिवाळी सणामुळे बाजारात एक नवचैतन्य निर्माण होते. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करणारा हा सण आहे. घराघरांत फराळाची तयारी केली जाते, त्यामुळे किराणा दुकानातील सर्वात जास्त खरेदी महिला वर्गाकडून केली जाते. साखर, पोहे, शेंगदाणे, गोडेतेल, रवा, मैदा याची सर्वात जास्त मागणी याच दिवाळीच्या काळात केली जाते. वर्षभर जेवढा माल विकल्या जात नाही तेवढा माल या दिवाळीच्या काळात विकला जातो. त्यानंतर कपड्याच्या खरेदीवर देखील लोकांचा कल दिसतो. दिवाळी म्हटले की नवे कपडे आलेच. लहान मुलांना तर दिवाळीची खास करून कपड्यासाठी आकर्षण असते. तसेच माहेरी आलेल्या मुलींना नवे कपडे करून सासरी पाठविण्याची जुनी प्रथा आहे. नुकतेच लग्न झालेल्या मुलींचा व जावईचा दिवाळीसण देखील करावा लागतो. म्हणूनच या काळात कपड्याच्या दुकानात लोकांची एकच गर्दी दिसून येते आणि दुकानदार देखील एकावर एक फ्री देऊन ग्राहकांना आकर्षित करत असतात. दिवाळी आणि फटाके यांचा अनोखा संबंध आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी अशक्यप्राय वाटते. खास करून लहान व किशोरवयीन मुले फटाक्यांची मागणी करत असतात. त्यामुळे दहा-अकरा दिवस या दुकानाची देखील रेलचेल असते. काही व्यापारी फटाक्याच्या विक्रीतून वर्षभराची कमाई करत असतात. त्यानंतर लोकांचा खरेदीचा कल असतो तो चैनीच्या वस्तूकडे. दिवाळी निमित्ताने प्रत्येक कंपनी काही ना काही ऑफर ठेवून ती चैनीची वस्तू लोकांनी विकत घ्यावी अशी जाहिरात करत असतात. आपल्या घरात कोणत्या वस्तूची कमतरता आहे आणि आपले बजेट किती आहे ? यानुसार लोकं कलर टीव्ही, फ्रीज, ए सी, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरसह चार चाकी वाहनांची खरेदी करतात. तर काही लोकं पाडवाच्या शुभ मुहूर्तावर सोने वा घराची खरेदी करतात. अश्या लोकांची संख्या जरी कमी असले तरी आर्थिक उलाढालीमध्ये यांच्या खरेदीचे देखील महत्वपूर्ण योगदान असते. त्याचसोबत भाजीपाला मार्केटमध्ये देखील खरेदीची तेजी दिसून येते. फराळासाठी लागणाऱ्या विविध वस्तूची खरेदी करावीच लागते. दिवाळी म्हणजे विद्युत रोषणाई, त्यामुळे वीजेवर चालणाऱ्या विविध आकर्षक लायटिंग वस्तूची बाजारात खूप मागणी होते, त्याच अनुषंगाने दरवर्षी नवनवी डिझाईनच्या वस्तू लोकांना आकर्षित करतात. याच दिवाळीच्या काळात लोकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणे-जाणे होते. बच्चे कंपनीला सुट्या असल्याने घराघरात सहलीचे नियोजन होते. काही लोकं यासाठी सार्वजनिक वा खाजगी वाहनाचा वापर करतात तर काहीजण आपल्या स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे ट्रॅव्हल्स, बस आणि रेल्वेमध्ये प्रवाश्याची एकच गर्दी अनुभवयास मिळते. त्यानिमित्ताने पर्यटन स्थळावरील हॉटेल व लॉज फुल्ल होतात. त्यामुळे त्यांची देखील एकप्रकारे चांदीच होते नाही का ! म्हणजेच दिवाळी हा सण माझा, तुमचा एकट्याचा नसून समाजातील सर्व घटकांचा आहे. म्हणूनच दिवाळीच्या पर्वात सर्वत्र आनंदी आनंद वातावरण दिसून येते. 
याच दिवाळीत अजून एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या भेटीला येत असतात ते म्हणजे दिवाळी अंक. विविध नियतकालिक, दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक अंक प्रकाशित करणारे या दिवाळीत हमखास विशेषांक काढतात. त्याचसोबत काही विशेष मंडळी दरवर्षी आपला दिवाळी अंक प्रकाशित करतात. पुस्तकाच्या स्टॉलमध्ये हे दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधून घेतात. काही वाचक खास करून या दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पाहतात. साहित्यिक मंडळी देखील आपल्या लेखणीने वाचकांची दिवाळीच्या फराळासोबत वाचनाची भूक भागविण्यासाठी विविध प्रकारच्या साहित्याची मेजवानी देतात. वर उल्लेख केलेल्या बाजारपेठेप्रमाणे या व्यवहारात जास्त मोठा आर्थिक उलाढाल दिसत नसला तरी दिवाळीची परंपरा जतन करण्याचे काम हे दिवाळी अंक करत असतात. आपण सर्व वाचक वर्गानी दरवर्षी एक तरी दिवाळी अंकाची खरेदी करून वाचन करण्याची सवय लावून घ्यावी म्हणजे आपल्या घरात ही परंपरा कायम चालत राहील आणि दिवाळी अंकाला ही अच्छे दिन येतील, असे वाटते. 
महाराष्ट्रातीलच नव्हे तर मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारी इतर राज्यातील मराठी भाषिक लोकांनी देखील अंकासाठी लेखन करत असतात. यावर्षी नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, हे आपल्या सर्वच मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. नुसता अभिजात दर्जा मिळवून चालणार नाही तर त्यासाठी प्रत्येक मराठी माणसांनी आपली मते आपल्या बोली भाषेतून विविध साहित्य प्रकारातून व्यक्त करत राहणे आवश्यक आहे. वाचकांची संख्या वाढविण्यासाठी लेखकांनी नेहमी लिहीत राहायला हवे आणि लिहित्या हातांना बळ देण्याचे काम हे दिवाळी अंक नेहमीच करत असतात. म्हणून वाचकांनी दिवाळीच्या फराळासोबत दिवाळी अंकाचे देखील उत्स्फूर्तपणे स्वागत करावे आणि एका तरी अंकाचे वाचन करावे. सर्व वाचकांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा .......!

- नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769

Wednesday, 9 October 2024

ललाटरेषा पुस्तक परिचय ( Lalatresha book review )

ललाटरेषा : महाकादंबरीची बीजे !
    शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर म्हणून सर्वदूर परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ना.सा. येवतीकर! नुकताच त्यांचा 'ललाटरेषा' हा कथासंग्रह वाचण्यात आला. शॉपिजेन डॉट इन, अहमदाबाद या प्रकाशन संस्थेने अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित केलेला हा छोटेखानी संग्रह वाचनीय आहे. हे कथानक एका गरीब शेतकरी नि कष्टकरी कुटुंबाचे आहे. हे कुटुंब गरीब असले तरीही खाऊन पिऊन तसे सुखी आहे. आपल्या अपत्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईवडिलांचे हे कथानक आहे. तीन भाऊ आणि दोन‌ बहिणी असे आजच्या मानाने मोठे अशा कुटुंबाची तगमग, घालमेल, ससेहोलपट, भाऊबंदकी, नात्यानात्यातील भांडणं, आशा, भ्रमनिरास असे विविध‌ कंगोरे असणारे हे कुटुंब आहे. ह्या कथानकाचा सुशांत मुख्य नायक आहे. गावातील शाळेत मिळणारे तितके शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाच्या अर्थार्जनाला हातभार लावणारे दोन भाऊ आणि दोन्ही बहिणी यांची ही गोष्ट आहे. गावातील शिक्षण पूर्ण झाल्यावर शेंडेफळ सुशांतने शिकावे ही जशी त्याची स्वतःची इच्छा तशीच त्याच्या एका बहिणीची इच्छा! त्यापूर्वी मोठा भाऊ आणि त्याच्या पाठची बहीण या दोघांचे लग्न एकाच मांडवात लावून आर्थिक भार सुसह्य करण्याची इच्छा तडीस नेणाऱ्या कुटुंबीयाची ही कथा!
       मुलगी जाते नि सून येते इथेच कुटुंबाची ललाटरेषा रंग बदलायला सुरुवात करते. आलेली सून ही सुशांतच्या मामाची मुलगी असली तरीही ती थोड्याच दिवसात स्वतःचा रंग दाखविते आणि दोन खोल्यांमध्ये राहणारे कुटुंब विभक्त होते. एका खोलीत नवविवाहित जोडप्यांसाठी, दुसऱ्या खोलीत इतर सदस्य राहतात. लग्न झालेला मुलगा शहरात एका किराणा दुकानात काम करीत असतो त्याची होणारी कुचंबणा पाहून त्याला पत्नीसह शहरात राहण्याचा सल्ला मिळतो आणि त्या पतीपत्नीच्या मनाजोगते होते. दरम्यान बहीण आणि एका शिक्षकाच्या इच्छेनुसार सुशांत आयटीआयला प्रवेश घेतो. त्याच शहरात त्यांचे भाऊ- भावजय राहत होते. सुशांत शिक्षण आणि निवास दोन्ही प्रकारच्या सोयी झाल्यामुळे आनंदाने शिकू लागला परंतु थोड्याच दिवसात त्याच्या वहिनीला त्याची अडचण होऊ लागली. त्याचा परिणाम त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. सुशांत घरी परतला. अर्धवट शिक्षण सोडून काहीच करता येणार नाही म्हणून सुशांतने एक जुनी सायकल घेतली आणि तो शहरात जा-ये करू लागला. भावाकडे राहत असताना तो भाऊ जुआ खेळत असल्याचे आणि त्यात बराच पैसा हारत असल्याचे सुशांतला समजले होते परंतु लहान असल्यामुळे तो काही बोलला नाही. त्या भावाचे जुआ खेळण्याचे व्यसन वाढले. पगार पुरेनासा झाला तेव्हा त्याने वडिलांकडे वाटणीची मागणी केली. वडिलांनी ती ठामपणे फेटाळली.
     सुशांत इंजिनिअर झाला. त्याला नोकरीही मिळाली. परंतु कर्मभोग पिच्छा सोडत नव्हते. गावी राहणाऱ्या भावाला बिडी पिण्याचे व्यसन जडले. त्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याला खोकल्याचे आणि निदानानंतर टि.बी. सारख्या आजाराने कवेत घेतले असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी बिडी किंवा आयुष्य या दोहोंपैकी एक निवडावे लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला परंतु दुर्दैवाने त्याला बिडीने घातलेल्या मगरमिठीने घात केला आणि संसारातून उठवले. काही दिवस जाताच सुनेच्या माहेरचे लोक आले. त्यांनी मुलीला सोबत नेताना घराच्या वाटणीचा डाव खेळला आणि निघाले. म्हणतात ना संकटाची मालिका सुरू झाली की मग भल्याभल्यांची वाताहत होते, घर फिरले की घराचे वासेही फिरतात याप्रमाणे सुशांतच्या कुटुंबाला चोहोबाजूंनी घेरले. 
     सुशांतच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याला दारुने स्वतःच्या जाळ्यात ओढले. जावई दारू पितोय, बायकोला शिवीगाळ करतोय, प्रसंगी मारहाणही करतोय हे सुशांतच्या आईवडिलांच्या कानावर येत होते. अधूनमधून माहेरपणाला आलेली मुलगी आईच्या गळ्यात पडून सांगत होती. परंतु यांची का परिस्थिती वेगळी होती? 'एकादशीच्या घरी शिवरात्र आली' अशी परिस्थिती! जावयाचे पिणे खूपचं वाढले. एका सायंकाळी तो भरपूर दारू पिऊन आला आणि बायकोला मारायला तिच्या अंगावर धावला. परंतु पहिला फटका चुकवून ती घराबाहेर पडली तसा संतापाने तो मागे फिरला नि बायकोच्या मागे धावत असताना नशेत चूर असल्याने एका दगडावर पडला. मार इतका जोरदार होता की, क्षणापूर्वी सधवा असणारी त्याची पत्नी दुसऱ्या क्षणी विधवा झाली.
    कधीकधी नशिबाचे भोग संपता संपत नाहीत, ते अविचितपणे वार करतात नि होत्याचं नव्हतं करून टाकतात. सुशांतच्या कुटुंबाच्या बाबतीत ते वारंवार घडत होते. ललाटरेषा सारख्या दोलायमान होत होत्या. भावाच्या पाठोपाठ मेहुणा गेला आणि बहीण माहेरवाशीण म्हणून आली ती कायमचीच! सूनबाई माहेरी गेल्यानंतर रिकामी झालेली खोली बहिणीला नि तिच्या मुलाला देण्यात आली. सुशांतची एक बहीण उपवर होती. तिच्यासाठी मुलगा पाहत असताना सुशांतच्या मित्राने एक स्थळ सुचविले. मुलगा चांगला होता. परंतु कुणालाही स्वप्नात वाटले नसेल अशी अट मुलाकडून पुढे आली ती म्हणजे सुशांतच्या बहिणीला तो वरमाला घालत असताना सुशांतने त्याच्या बहिणीशी लग्न करावे. ध्यानीमनी नसताना आलेल्या प्रस्तावामुळे सारेच हादरले. परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, बहिणीने त्याच्या शिक्षणासाठी दिलेला पाठिंबा हे सारे लक्षात घेऊन सुशांतने स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देत तो प्रस्ताव स्वीकारला. काही वर्षांपूर्वी जे घडले तेच पुन्हा घडले. मुलगी दिली सून आणली. लग्नासाठी पाहुण्याप्रमाणे शहरातील भावाचे कुटुंब गावी आले होते. लग्नाचे सारे सोपस्कार आणि विधी आटोपल्यानंतर वाटणीचा विषय काढला आणि खऱ्या अर्थाने कुटुंब विभक्त झाले. सुशांतही पत्नीला घेऊन नोकरीच्या गावी राहायला गेला.
    घडलेल्या घटनांमुळे सुशांतच्या वडिलांचे नैराश्य वाढले परंतु त्यांनी आगळावेगळा निर्णय घेतला नाहीतर सरळ पंढरीच्या वारीला जाऊन विठुरायाच्या चरणी लीन होण्याचे ठरविले. आईबाबांसोबत त्यांची मुलगी नि नातू हेही वारीला निघाले. तिकडे ते वारीत रमलेले असताना नियतीने मुलाच्या खांद्यावर हात ठेवून जणू डाव टाकला. मुलाला जुआ खेळण्याचे जडलेले व्यसन विकृतीत बदले. गावी घरी कुणी नाही ही संधी साधून तो गावी आला. स्वतःच्या हिश्याचा जमिनीचा तुकडा एका दलालाच्या मध्यस्थीने विकून लाखो रुपये घेऊन शहरात परतला. जाताना बायकोला काही दागिने घेऊन घरी गेला. बायकोला मिळालेल्या पैशाबाबत काहीही न सांगता बाहेर पडला. तो सरळ जुव्याच्या अड्ड्यावर गेला. लक्ष्मीकडे लक्ष्मी येते हा प्रत्यय आपणास येईल, आयुष्यभर या नादात गमावलेले सारे मिळेल या हेतूने तो खेळत राहिला. दोन दिवस झाले नवरा परतला नाही म्हणून बायको काळजीने पोलीस स्थानकात गेली आणि तिला मोठा धक्का बसला कारण तिचा नवरा लॉकअपमध्ये बंद होता. जुगार खेळताना कुणीतरी डाव साधला होता. तक्रार केली होती आणि हा पकडला गेला. नवऱ्याला सोडविण्यासाठी तिने दोन दिवसांपूर्वी घेतलेले दागिने विकून पतीची सुटका केली.‌ परंतु तो धक्का सहन न झाल्याने त्याने रात्रीच्या अंधारात एक दोरी घेऊन झाडाला जवळ केले. पंढरपुरी आशीर्वाद घ्यायला गेलेले आईवडील गावी परतले. घडलेली घटना समजताच टाहो फोडणाऱ्या आईने विठ्ठलाला जणू विचारले, 'हीच का तुझी कृपा?'
      सुशांतच्या लग्नाला अनेक वर्षे झाली परंतु त्याच्या पत्नीची कुस उजवत नव्हती. तशात गावी राहणाऱ्या राजू नावाच्या बहिणीच्या मुलाला सुशांतने ठेवून घ्यावे असा प्रस्ताव पुढे आला. सुशांतच्या पत्नीला तो प्रस्ताव मान्य नव्हता परंतु सुशांतपुढे तिचे काही चालले नाही. राजू राहावयास आला आणि त्यांच्या संसारात वेगळेच वादळ आले. राजूमुळे पतीपत्नीमध्ये वाद होतो का? सुशांतला मूल होते का?सुशांतची आई त्याला दुसरे लग्न करण्यासाठी तगादा लावते. सुशांत दुसरे लग्न करतो का?त्याच्या पत्नीला वेगळाच संशय येतो. साधा सरळ स्वभाव असणाऱ्या सुशांतच्या स्वभावात काय बदल होतो? बदललेल्या परिस्थितीत त्याची ललाटरेषा अजून कायकाय संकटं निर्माण करतात. सुशांत आई आणि त्याची पत्नी पंढरपूरची वारी का करतात ? या अजून बऱ्याच घटनांचे मूळ येवतीकर लिखित 'ललाटरेषा' या संग्रहात वाचायला मिळेल. लेखकाची भाषा साधी सरळ आहे, कुठल्याही प्रतिकाचा विनाकारण उपयोग केला नाही. घटनाक्रम वेगवान असला तरीही आटोपशीर असल्याने कंटाळवाणे होत नाही. लेखक येवतीकरांचे अनुभव विश्व दांडगे असून समृद्ध भाषा संपत्ती असल्याचे या कथानकात वारंवार जाणवते. हे कथानक भविष्यात महाकादंबरीच्या स्वरूपात वाचकांपुढे यायला हवे इतके ते सखोल आहे. लेखक नासा. येवतीकर यांना आगामी लेखनासाठी भरघोस शुभेच्छा!
              ००००
ललाटरेषा: दीर्घ कथासंग्रह 
लेखक : ना.सा.येवतीकर
             {९४२३६२५७६९}
प्रकाशक : शॉपिजेन डॉट इन
               अहमदाबाद 
पृष्ठ संख्या : ५४ 
मूल्य : ₹२५०/-
परिचय: नागेश शेवाळकर, पुणे 
                 {९४२३१३९०७१}

Sunday, 6 October 2024

वणीची सप्तशृंगी ( Saptashgungi )

वणीची सप्तश्रृंगी


सप्तशृंगी हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला. या काळात भाविकांची खूप मोठी गर्दी असते. आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे.


सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभवी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. 

कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे.

( वरील माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आली आहे. )

- नासा येवतीकर

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...