Saturday, 23 March 2024

पुस्तक परिचय - लखलखणारी शाळा ( Lakhalakhanari Shala )

' लखलखणारी सरकारी शाळा '

जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली असते. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेशिवाय दुसरा पर्याय देखील नसतो. काही श्रीमंत किंवा पैसेवाले मंडळी आपल्या पैशाच्या बळावर शेजारच्या इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना पाठवितात. वास्तविक पाहता सरकारी शाळा एवढ्या वाईट नव्हते किंवा नाहीत, सध्या वर्ग एक किंवा दोन पदावर काम करणा-या अधिका-यांचे प्राथमिक शिक्षण कोठून पूर्ण झाले ? या प्रश्नांच्या उत्तरांतून कळेल की, ते सर्व जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आढळून येतील.
पूर्वीच्या शाळेचा इतिहास पाहता सध्याच्या सरकारी शाळा त्या मानाने खूप चांगल्या आहेत. खडू - फळा मोहिम आणि सर्व शिक्षा अभियानामूळे पडक्या घरात, ग्रामपंचायतीत किंवा झाडाखाली भरणा-या शाळा स्वत:च्या इमारतीत भरू लागल्या आज गावोगावी सर्व सोयी सुविधायुक्त शाळा आहेत. शिक्षकांना ये-जा करण्यासाठी रस्ते चांगले झाले आहेत. त्यास्तव त्या गावात त्यांना राहण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच स्वत:कडे वाहन असल्यामुळे तर ये-जा करण्याचा प्रश्नच मिटला. आज शाळेवर अध्यापन करण्यासाठी येत असलेला शिक्षक हा स्वत: हुशार असल्यामूळे स्वत:चे प्रतिबिंब विद्यार्थ्यांत पाहणार, यात आश्चर्य ते काय ? याच विचार प्रक्रियेतून आज राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकतंय असे म्हणणे चूकीचे अन अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अशीच एक ' लखलखणारी शाळा ' म्हणजे पुणे-लातूर हायवे वरील लातूर तालुक्यात करकट्टा गावापासून पाच किमी. अंतरावर असलेली माटेफळ येथे कार्यरत लेखिका आणि प्राथमिक पदवीधर उपक्रमशील शिक्षिका अनिता जावळे यांनी स्वतः च्या कार्यकर्तृत्वाने आणि सर्वाना सोबत घेऊन या जिल्हा परिषद शाळेचा संपूर्ण कायापालट कसा झाला याचा इतिहास सांगणारे हे पुस्तक लातूरच्या अरुणा प्रकाशनद्वारे विद्यार्थी दिनी प्रकाशित केले आहे. ज्यांनी हे कार्य करण्यास प्रोत्साहन दिले आणि लेखिकेच्या मनात ज्योत पेटविली त्या पंचायत समिती लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी पुस्तकाला प्रस्तावना देऊन सर्वाना दिव्याचा प्रकाश दिला आहे. शिक्षक मुलांना शिकवितात म्हणजेच काय काय करतात हे ह्या पुस्तकात सांगितले असल्याचा त्यांचा उल्लेख सर्व शिक्षकांसाठी नक्कीच प्रेरीत करेल. कदाचित लेखिकेच्या संपर्कात मा. तृप्ती अंधारे मॅडम आल्या नसत्या तर लेखिका पुस्तकाच्या रुपात बाहेर येऊ शकले असते किंवा नाही याबाबत मनात शंका निर्माण होते. म्हणजेच पुस्तकाच्या निर्मिती मागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब चासकर यांनी या पुस्तकाला शुभेच्छा देताना सरकारी शाळेतील प्रयोगांचे आजवर नीटसे डॉक्यूमेंटेशन झाले नाही ती व्ह्ययला पाहिजे अशी खंत व्यक्त केली. जे की या पुस्तकांच्या निमित्ताने भविष्यात पुढे येऊ शकेल. लेखिकेने पुस्तकात एकूण तीन प्रकरण दिले ज्यातून लेखिका शाळेवर येण्यापूर्वी काय परिस्थिती होती, शाळेत लोकसहभाग कसा मिळविला आणि शाळेत उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेत कसे रमले असे थोडक्यात पण मार्मिक शब्दात मांडणी केली आहे. प्रत्येक शिक्षक नव्याने जेंव्हा शाळेवर रुजू होतो त्यावेळ च्या आठवणी नेहमी स्मरणात राहतात. तशीच काही आठवण पुस्तक वाचताना प्रत्येक शिक्षकांस होते.
राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार साहेब आणि विभागाचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना दिलेल्या प्रोत्साहनामूळेच आज महाराष्ट्रात डिजिटल शाळा आणि लोकसहभाग याचे राज्यात सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत आहेत. संगणक युगाच्या काळात आज प्रत्येकांच्या घरी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाचा वापर चालू झाला आहे. घरात ही वस्तू असल्यामूळे त्याचा वापर शालेय मुले सुध्दा करू लागली. जमाने के साथ चलो प्रथेनूसार येथील शिक्षक मंडळींनी सुध्दा प्रवाहात सामिल होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेत. त्यानुसार ‘डिजिटल शाळा’ ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी लागणारा लाख-दिड लाख रूपयांपर्यंतचा निधी सरकार ऐवजी शिक्षक, गावकरी, तरुण मंडळ, ग्रामपंचायत याच्या लोकसहभागातून त्यांनी कसा जमा केला याचे अनुभव वाचन करणे खरोखरच प्रशंसनीय आहेत.
ज्ञानरचनावाद युक्त शाळा असेल तर प्रत्येक मूल शिकते. घरी राहणाऱ्या इमरान ला शाळेत कसे रममान करण्यात आले ? वडिलांच्या मृत्यूनंतर ही फिजा शाळेत कशी नियमित येऊ लागली ? मतिमंद विशाल शाळेत कसे शिकू लागला ? लेकरांच्या भावविश्वात शिक्षक सहभागी झाला तर काय चमत्कार होतो ते या पुस्तकात नक्कीच वाचायला मिळेल. लेखक मी होणार या सारख्या उपक्रमातून याच शाळेतील इयत्ता सातव्या वर्गात शिकणारा संकेत चव्हाणच्या डोक्यातून गोट्या नावाची कथा बाहेर पडते आणि पुस्तक रूपाने वाचकासमोर ठेवली जाते. यात लेखिकेचे अपार मेहनतीतून मिळालेले खुप मोठे यश दडलेले आहे.
इंग्रजी शाळेला लाजवेल अश्या सरकारी शाळा पहायला मिळतात. पूर्वीसारखा शिक्षक आज नक्कीच नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर मोबाईल, टॅब, लेपटॉप आणि संगणकाचा वापर करीत मुलांना गुणवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरज आहे लोकांनी या सरकारी शाळाकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याची. सरकारी शाळेतील शिक्षकावर विश्वास ठेवून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची, नक्कीच ते चांगले करून दाखवू शकतात. बहुतांश गावात लोकांची मदत शाळेला मिळत नाही, शाळेला भरपूर निधी येतो तेंव्हा या शाळेला आम्ही का मदत करायची ? अशी विचार प्रणाली गावातील लोकांची असते म्हणून त्या गावाची शाळा नावारूपास येत नाही. शीतावरून भाताची परीक्षा न करता आपल्या गावातील शाळांचे भविष्य आपणच घडवावे. तालुक्यात, जिल्हयात माटेफळ सारख्या अनेक शाळा आहेत ज्याचा कायापालट शिक्षकांनी आणि गावातील लोकांनी मिळून केला आहे. आपली एक रुपयांची मदत देखील शाळेला लाखमोलाचे काम करून जाते. गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा आधार, शाळा आपली आहे ही संकल्पना तयार होण्यासाठी शाळेला थोडा वेळ द्या, शिक्षकाची समस्या समजून घ्या, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना गावकरी मंडळीच्या आधाराची खरी गरज असते. या सर्व बाबीची जाणीव लेखिका अनिता जावळे-वाघमारे यांनी ' लखलखणारी शाळा ' या पुस्तकातून करून दिली आहे. प्रत्येक शिक्षकां नी हे पुस्तक वाचायलाच हवे एवढे च नाही तर एक वेळ या शाळेला प्रत्यक्षात भेट ही देण्याचा प्रयत्न करावा. लेखिका अनिता जावळे-वाघमारे यांच्याशी 9545050292 या मोबाईल क्रमांकावर आणि anitajawale1977@gmail.com या ई मेल आय डी वर तसेच anitajavle.blogspot.com या ब्लॉग वर संपर्क करता येईल. माटेफळ शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - सोनेरी भोपळा (Soneri Bhopala )

*सोनेरी भोपळ्यात चिंटुचा सैर*
पुण्याच्या अरिहंत पब्लिकेशन प्रकाशित आणि 
व्यंकटेश काटकर लिखित कादंबरी सोनेरी भोपळा हाती घेतल्याबरोबर संपल्याशिवाय खाली ठेवावे वाटत नाही. पुस्तकाचे नाव वाचल्यापासून या पुस्तकात काय दडलंय याविषयी मनात कुतूहल निर्माण होते. पुस्तकाचा रंग सुद्धा सोनेरी वाटतो असा आहे आणि त्यावरील एका परीचे चित्र ती मुलाला काहीतरी बोलत आहे आणि बाजूला सोनेरी रंगातील भोपळा विस्मयपणे दोघांना पाहत आहे. आजूबाजूला हिरवेगार जंगल आहे, यातून वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात कोल्हापूरचे मुखपृष्ठकार राज बकरे नक्की यशस्वी होतील. म्हणून वाचक लगेच वाचण्यात सुरुवात करेल यात शंका नाही.
           पुस्तक उत्सुकतेने वाचनास सुरु केले कि पहिल्या पानापासून वाचक वर्ग वाचण्यात गुंग होतो. वाचतांना सर्व सोनेरी वाचून डोळे सुद्धा सोनेरीमय होऊन जाते. जसे सूर्याचा सोनेरी रंगाचा प्रकाश, सोनेरी बेट, सोनेरी रंगाची सोनेरी झोपडी, म्हातारीचा रंग सोनेरी, केस सोनेरी लांबसडक, अंगात सोनेरी रंगाची चोळी, दोन्ही हातांना सोनेरी चार-चार बांगडया, सोनेरी रंगाची वाकडी काठी, सोनेरी विळा, असे सर्व सोनेरी-सोनेरी वाचन करतांना सोनेरी भोपळा कसा येतो ?  आणि केव्हा येतो ? याची उत्सुकता वाचकांना लागून राहते अन वाचन ही चालूच राहते.
किशोर वयातील मुलांना त्यांच्या स्वभावानुसार काल्पनिक जगाविषयी प्रचंड आकर्षण असते. कल्पना विश्वात वावरतांना ती स्वप्ने पूर्ण करता येतील काय? याचाही विचार करीत असतात. अपेक्षेप्रमाणे त्या सोनेरी बेटावर तीन परी उतरतात आणि त्यांचे नाव अर्थातच सोनपरीपासून सुरु होते, तिला संपूर्ण कथानक मध्ये मुख्य भूमिकेत ठेवण्यात आले. यावरून लेखकांना एक संदेश द्यायचा असेल कदाचित आपले विचार चांगले असतील तर आपल्या मतांना व विचारांना किंमत मिळते अन्यथा नाही. कहाणी पुढे-पुढे चालत राहते. परी या सोनेरी बेटावर राहू इच्छितात मात्र सोना आजीला त्यांना तेथून पाठवून द्यायचे असते. मग तेथे या पुस्तकाचा मुख्य नायक 'सोनेरी भोपळा' प्रवेश करतो. तेथील गमती-जमती खरंच वाचनीय आहेत. "अय्या कित्ती मोठ्ठा हा भोपळा...!" असे त्या परीचे बोल वाचन करीत असतांना अगदी लहानपणी ऐकलेली 'एवढा मोठा भोपळा' ही  कवितेतील कथा सहज आठवून जाते. अगदी त्याचबरोबर या कथानकमध्ये सुध्दा असे काहीतरी आहे असे वाटायला लागते. सोना आजी मंतर टाकून परींना भोपळ्यात बसविते आणि त्यांचा प्रवास सुरु होतो तसा वाचकांच्या भुवया उंचावल्या जातात.
परी भोपळ्यात बसून आकाशातून विहार करताना पर्यावरणाचे सुंदर वर्णन करण्यात आले, असे वाटते की आपण जंगलातून फिरत आहोत. कथानकाच्या मध्यात चिंटुचा प्रवेश होतो आणि कथा अजून मजेशीर वळण घेते. शाळा आणि तेथील परिसर, शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते हे वर्णन वाचनीय आहे. लेखक स्वत: शिक्षक असल्यामुळे या क्षेत्रातील बरीच बारीकसारीक गोष्टी विचारात घेतले आहेत. लहान मुलांना एखादी अनपेक्षित वस्तू भेटल्यावर मुलांना कसे वाटते ? याचे उत्तम चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. शाळेची वेळ संपल्यावर मुले जर घरी आले नाहीत तर प्रत्येक आई-बाबाला आपल्या लेकरांची काळजी वाटते. ती चिंटू विषयी त्यांच्या आई-बाबांची काळजी वाचन करताना प्रसंग मनाला नक्की भावतो, नव्हे, डोळ्यातून अश्रू गळतात. चिंटु आणि परी यांची भेट होणे आणि ते संपूर्ण धरती पाहण्यासाठी भोपळ्यात बसून भ्रमण करणे खरोखरच वाचनीय आहे. चिंटू आपल्या घरी काही ही न सांगता परी सोबत जातो तेंव्हा त्यांच्या आई-बाबांची काय अवस्था होते ? शाळेतील मुख्याध्यापक कसे चिंताग्रस्त होतात ? वर्गशिक्षक स्वतःला कसे कोसतात ? चिंटु चे मित्र-मैत्रिणी चिंटू शिवाय कश्याप्रकारे राहतात ? चिंटू परत घरी येतो काय ? घरी आल्यावर काय काय घडते ? या सर्व प्रश्नांची उकल होण्यासाठी सोनेरी भोपळा हे पुस्तक वाचावेच लागेल. कथानक अगदी सुंदर प्रकारे सरकवत नेले आहे. पुढे काय ? याची उत्सुकता मनाला लागून राहते आणि पुस्तक कधी संपले हेच कळत नाही. यात आलेले गीत 
' जंतर मंतर तू रे वाटोळा 
असा तू आमचा सोनेरी भोपळा
छान छान दिसतोस सोन्याचा गोळा
वाटतोस आम्हाला भोळा रे भोळा
आमच्यापुढे तू छोटाच छोटा
कामा मध्ये तर दिसतोस मोठा
नको करूस आत्ता फाजिल लाड
आम्हाला घेऊन लांब सैर काढ
म्हणू नकोस तू इथेच थांब 
घेऊन जा आम्हाला लांबच लांब
खूपच मजेशीर आहे. हे गीत वाचत असताना चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या गीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या पुस्तकात निसर्गातील विविध रंगाच्या पक्षी, प्राणी, आणि इतर बरेच काही अनाकलनीय गोष्टी भेटतात. 
कथानकाच्या शेवटी सोनपरीने चिंटूला दिलेला उपदेश किशोरवयीन मुलांसाठी फारच उदबोधक आहे. सदैव खरे बोल, चांगले काम कर, दीन दुबळ्याची सेवा कर, आई-वडिलांची सेवा कर, मित्र-मैत्रिणीला अंतर देऊ नकोस, एवढं केलस तर परमेश्वर तुला काही कमी करणार नाही. असा हा संदेश किशोर मुलांसाठी दिलेला आहे, ज्याची आज खरीच आवश्यकता आहे. सोनेरी भोपळा पुस्तक खरोखरच सोन्यासारखे आहे. विशेष म्हणजे या कादंबरीला पाठराखण जेष्ठ साहित्यिक आदरणीय देवीदास फुलारी सरांनी केल्यामुळे कादंबरीला पूर्ण रुप प्राप्त झाले. प्रत्येकानी एक वेळ जरूर वाचावे अशी कथानक एखाद्या टीव्हीवरील मालिके प्रमाणे बहरत जाते. या पुस्तकात एकूण पृष्ठे असून त्याची किंमत 125 रू आहे. त्यांच्या लेखनीतून असेच उत्तमोत्तम साहित्य तयार होवो हीच शुभकामना आणि हार्दीक शुभेच्छा

पुस्तक परिचय -
                  नागोराव सा. येवतीकर
                    स्तंभलेखक
                    9423625769

पुस्तक परिचय - पाऊलवाट ( Paulwat by Digambar Kadam )

*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक*
    पुस्तक परिचय – दिगंबर गं.कदम
दिसामाजी काहीतरी लिहित जावे | 
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।। 
असे संत रामदासांनी म्हटले आहे. ह्या ओळी मला वाटते शिक्षकांना उद्देशून, अखंडपणे वाचन करणाऱ्या वाचक प्रेमीसाठी म्हटले असावे. शिक्षकांनी तर आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात नेहमीच वाचन करावे असे वाटते . कारण आजची पिढी खूप पुढे गेलेली आहे, अशा परिस्थितीत शिक्षकांनी नेहमी अपडेट असावे आउटडेट असता कामा नये. आजचा विद्यार्थी संगणक जाणतो आहे. त्यातून त्याला हवे असणारे ज्ञान प्राप्त होत आहे. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या पुढचे ज्ञान हवे म्हणून शिक्षकांनी नेहमीच वाचनाच्या अगदी जवळ गेले पाहिजे. असा शिक्षकच विद्यार्थ्यांचा आवडीचा गुरुजी होऊ शकतो. त्याच्याजवळ माहितीचे भांडार असणे ही काळाची गरज झाली आहे. यातलेच एक उत्तम, सुसंस्कारित गुरुजी म्हणून ज्याचे नाव घेतले जाते ते म्हणजे धर्माबाद येथील प्राथमिक शिक्षक नागोराव सा. येवतीकर. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाचे वारंवार स्वरूप जाणून घेऊन ते विद्यार्थ्यांच्या अंगी कसे बाणवता येतील याचे प्रात्यक्षिक ते नेहमीच करत असतात. त्यांच्या *पाउलवाट* या पुस्तकातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एक नवी दिशा मिळते असे एक सर्वांग सुंदर पुस्तक त्यांनी लिहून शैक्षणिक क्षेत्रात एक प्रकारची क्रांतीच केली आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    शिक्षण क्षेत्रात जी धडपडणारी शिक्षक आहेत, त्यात नागोराव येवतीकर हे एक. पाऊलवाट हे वैचारिक दर्जाचे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने वाचावे व संग्रही  ठेवावे असे आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर शिक्षकास आपणही काही तरी करावे असे वाटते. शिक्षक हा नेहमी चौफेर दृष्टी ठेवणारा असावा असे लेखकाना वाटते. अगोदर स्वतः माहिती करून घ्यावी आणि नंतर ते आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रांरभीच सांगतात,  
जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे | शहाणे करुनी सोडावे सकळ जन |
  या पुस्तकात त्यांनी तीन टप्पे पाडले आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणजे आपले दैवत विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी बचत कशी करावी. यात फक्त पैशाचीच बचत एवढा संकुचित अर्थ न ठेवता विजेची बचत, पाण्याची बचत, कागदाची बचत, वेळेची बचत हे अतिशय साध्या सोप्या शब्दात त्यांनी वर्णन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त असावी. शिस्तीत केलेले काम चांगले होते. शिस्त ही असलीच पाहिजे. सत्य बोला, बोलणे महत्त्वाचे नाही तर कृतीला ही महत्त्व आहे . कृतीशिवाय उक्ती ही कामाची नाही दुसऱ्यावर विसंबून राहू नये, राग धरू नये. मित्र सावधानतेने निवडावेत. मित्रावरून आपली परीक्षा होते. जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. यावर देखील नागोराव येवतीकरानी आपली मते मांडली आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन यावर भाष्य करताना पाप आणि पुण्य काय असते याचे विवेचन त्यांनी पाऊलवाट मध्ये केले आहे . लोभामुळे माणसाचे किती अधःपतन होते आहे ते ही गमावून बसतो .म्हणून लोभ धरू नये,  तसा क्रोधाला जवळ येऊ देऊ नये असेही ते सांगतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किडा होऊ नये .मैदानी खेळ खेळावेत. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असते. मग मस्तिष्क बरोबर चालते .जे जे वाचले, पाहिले, ते ते कायम लक्षात राहते .म्हणून शरीराची काळजी घ्या असेही ते सांगतात. विद्यार्थ्यानी नेहमी सकारात्मक विचार करावा नकार हा शब्द त्यांच्या जवळ येऊच नये. कारण संत तुकाराम महाराज सांगतात
असाध्य ते साध्य | करिता सायास कारण अभ्यास | तुका म्हणे || 
अलीकडे मुले आई-वडिलांना विसरायला लागलीत. त्यांचे प्रती, ज्येष्ठाप्रती आदराची भावना ठेवा. कृतज्ञतेची भावना ठेवा. कृतज्ञतेची भावना ठेवून उतराई होण्याचा प्रयत्न करावा हे नीतिशास्त्र  विद्यार्थ्यांनी आत्मसात केले तर वृध्दाश्रम ओस पडतील. प्रत्येक विद्यार्थ्यांना आजी आजोबा भेटतात. त्यांच्याकडून गोष्टी , भजने , गीते  शिकतील . आजीच्या हातच्या भाकऱ्या किती गोड लागतात. ते खाल्ल्याशिवाय कळत नाहीत, म्हणून आई-वडील हीच आपली खरी दौलत आहे, हे लक्षात ठेवण्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. माणसे जोडणे महत्त्वाचे. तोडणे वाईट. एकदा मन वैरी झाले कि कितीही जरी जुळवण्याचा प्रयत्न केला तरी वेल्डिंग ही कायम राहतेच. म्हणून एकजीवपणा आपल्या अंगी ठेवावा. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. गरीब असो, श्रीमंत असो, दलित असो कि सवर्ण, त्यांची सेवा करा .खरा ईश्वर त्यांचातच दडलेला आहे. वाचनाची गोडी ही जीवन जगण्यातली गोडी आणते. म्हणून विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्त्वाचे जाणावे असे वाचाल तर वाचाल या वैचारिक लेखात त्यांनी मोठ्या मार्मिकपणे विवेचन केले आहे.
पाऊलवाटाचा दुसरा टप्पा आहे पालकासाठी . पालकांनी विद्यार्थ्याचे मित्र बनावे. वाढदिवसाला मेणबत्त्या विझवण्यापेक्षा वृक्षलागवड करून वाढदिवस साजरा केल्यास किती तरी वृक्ष तयार होतील. विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार असणे गरजेचे आहे. संस्काराच्या बाबतीत कुठेही तडजोड करू नका. याचेही विवेचन त्यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. सुख आणि दु:ख एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत दोन्ही काळी माणसाने खंबीर असावे. सुखात आणि दु:खात आनंदी असाल तर जीवन जगण्याची मजा येते. आहारात जेवढे महत्त्व मिठाला आहे, तेवढेच महत्त्व दु:खाला आहे. दु:ख आहे म्हणून तर सुखाची किंमत कळते. आजचा विद्यार्थी बौद्धिक दृष्ट्या खूपच पुढे गेलेला आहे. तेंव्हा त्यांच्या बुध्दीचातुर्याकडे पालकाने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. जे जे होईत ते ते पहावे ही वृत्ती माणसाला अधोगतीकडे नेणारी आहे. एखादी बाब आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून तिची काळजी घ्यावी. माणूस जन्माला येतो पण माणुसकी जन्माला येत नाही. ती निर्माण करावी लागते. माणुसकी हाच खरा धर्म आहे त्याला विसरता कामा नये असे ही लेखक पालकाना या ग्रंथातुन सांगतात.
पाऊलवाट पुस्तकातील तिसरा टप्पा आहे शिक्षकांसाठी. शिक्षक हा खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे. त्याला कितीही कष्ट पडले तरी हरकत नाही. शिल्पकाराच्या भूमिकेला बाधा येईल असे कुठलेही कृत्य त्याच्याकडून होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मराठीचा विकास शासन करणार नाही. मराठी भाषेचा विकास तमाम मराठी शिकवणारे शिक्षकच करतील यावर माझा विश्वास आहे, असे लेखक आपल्या *मराठीचा विकास आपल्याच हाती* या लेखात अगदी तळमळीने सांगतात. शिक्षक जेव्हा फळ्यावर लिहितो. तेव्हा विद्यार्थ्याला ते चांगले वाचता आले पाहिजे. बिनचूक, सुंदर, वळणदार अक्षर, हा शिक्षकाचा दागिना आहे. आपल्या विद्यार्थ्यांना साने गुरुजीचे मातृप्रेम द्या. मग पहा शाळेविषयी विद्यार्थांना लळा लागेल. गुरुजीच्या वागण्यातून, बोलण्यातून विद्यार्थ्यांवर नकळत संस्कार घडत असतात. म्हणून शिक्षकाने समाजात शिक्षक, लोकशिक्षक, प्रवचनकार, शिल्पकार ही भूमिका बजावायची आहे. या विषयीची यात मते मांडली आहेत.
    लेखकानी सहज, सोपी, ओघवती भाषा, म्हणी, वाक्प्रचार, उदाहरणे देवून पाऊलवाटला दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षकासाठी, शिक्षणप्रेमीसाठी, वाचनालयासाठी संग्रही ठेवावे असेच आहे. पुस्तकाची बांधणी व मांडणी अमरावतीचे प्रकाशक शशी प्रिंटर्स रमेश एन. बाहे यांनी उत्तम केली आहे. मुखपृष्ठ उत्तम आणि दिशादर्शक आहे. नागोराव येवतीकरांच्या लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असेच वैचारिक पुस्तके विचार करायला भाग पडतील, अशी आशा.

दिगंबर गं. कदम 
संवेदना, नांदेड हौसिंग सोसायटी 
विजयनगर, नांदेड 
मो. ९४२२८७०३८१

Friday, 22 March 2024

पुस्तक परिचय - फुंकर ( Funkar )

मानवी मनातील घालमेल व्यक्त करणारा - फुंकर कवितासंग्रह
        
                मोबाईल स्मार्ट फोन आल्यामुळे आजकाल पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली अशी ओरड सध्या ऐकायला येत आहे मात्र पुस्तकं लिहिणाऱ्यांची संख्या या स्मार्टफोनमुळे किंचित का होईना वाढू लागलेली आहे, असे कोणी म्हणताना दिसत नाहीत. पण हे सत्य आहे. स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या वापरामुळे वाचक संख्या वाढली. तळहातावरील छोट्याशा मोबाईलवर एका क्लीक मध्ये हवी ती माहिती हवे तेव्हा मिळू लागले त्यामुळे वाचकांची भूक वाढीस लागली. तसेच साहित्याला ताबडतोब प्रसिद्धी मिळत असल्याने लिहिणाऱ्यांची संख्या देखील वाढली. आज समाजात फक्त साहित्यिक क्षेत्राला संपुर्णपणे वाहून घेतलेले अनेक व्हाट्सअप्प समूह आढळून येत आहेत, ज्यातून गोविंद कवळे सारखे नवकवी जन्म घेतांना दिसत आहेत. ही तशी साहित्य क्षेत्रासाठी आनंदाची बाब आहे.
          नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोदावरीच्या काठावर वसलेल्या अगदी छोट्याशा इळेगाव गावातील शेतकरी कुटुंबात कवी गोविंद कवळे यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे कवीवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ज्यामुळे आपले शिक्षण त्यांना अर्धवट सोडावे लागले. संसाराचा रहाटगाडे चालविण्यासाठी काहीतरी काम करणे भागच होते. ते काम करता करता त्यांनी सामाजिक चळवळीत सहभाग घेतला, त्यात अनेक चांगल्या सद्विचारी लोकांचा सहवास घडला ज्यातून कविमनाचा माणूस " फुंकर " च्या माध्यमातून समाजात प्रतिबिंबित झाला. उमरी तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक कै. ग. पि. मनूरकर यांच्या साहित्याने ते पूर्वीच प्रभावित झाले होते आणि त्यांच्यामुळेच लिहिण्याची उर्मी मिळाली असे कवी स्वतः म्हणतात. कवीला कसल्याही प्रकारचा साहित्यिक वारसा नसतांनाही त्यांनी साहित्यिक क्षेत्रात घेतलेली गरुडझेप लक्षवेधी आहे. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातील अनेक नामवंत दैनिकातून यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. फुंकर हा त्यांचा पहिलावहिला कवितासंग्रह आहे.
       कवी स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांचे कष्ट, दुःख, हाल-अपेष्टा, निसर्गाची अवकृपा आणि सावकाराकडून होणारी फसवणूक हे सारे त्यांनी याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहिले आहे म्हणून फुंकर मधील शेतकऱ्यांविषयीच्या प्रत्येक कवितेत त्याविषयीची तळमळ दिसून येते. म्हणूनच कष्ट करणारा बाप या कवितेत कवी म्हणतो,


शेतात पेरणी करतांना, तोचतो पायात काटा
कोणा सांगेल हे दुःख करतो सहन एकटा
                           

            शेतकरी किती जरी दुःखात राहिला किंवा स्वतः ला कितीही कष्ट सहन करावे लागले तरी दारावर आलेल्या कोणालाही तो माघारी फिरवत नाही, तो इतरांना मदत करायला वा दान करायला विसरत नाही म्हणून कवी शिवार फुलला या कवितेतून म्हणतो,

रास केला धान्याची, लाव हात पायलीला
दे चार चार पसा, आलेल्या आपुल्या दाराला

                                                 शिक्षणाचा गंध सुटला होता, संसाराची जबाबदारी वाढली होती. त्यातही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत काम करतांना अनेक सद्विचारी लोकांचा सहवास लाभला. श्रीपाद राऊतवाड, नागोराव डोंगरे, गुरू नागोराव तिप्पलवाड, कवी कट्टाचे संयोजक अशोक कुबडे यांच्या ओळखी झाल्यामुळे त्यांच्या लेखणीला खरी गती मिळाली. म्हणूनच कवी जगण्याचा मागमूस मध्ये आपली कृतज्ञता व्यक्त करतांना म्हणतो की,
काय कमावलो काय गमावलो, कसला आला हिशोब
भेटत गेली गुणी माणसे, उजळून आलं नशीब
                                      

               भारत देशाला घडविण्यात संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, कर्मवीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे अनेक थोर, महात्मा, शूरवीर व शैक्षणिक विचारवंतांनी आपले जीवन पणास लावले. त्या सर्व महापुरुषांना काव्यरूपाने कवी वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त मागासवर्गीय लोकांसाठीच नाही तर सर्वांसाठी संविधान लिहून खरे स्वातंत्र्य दिले आहे  ही भावना वंदन तुम्हांस या कवितेतून व्यक्त करताना कवी म्हणतो,
संविधानाचे निर्माते तुम्ही, दिला आम्हा प्रकाश
सर्वावरी माया तुमची, केले मोकळे आकाश
                                     

            स्वच्छतेचे प्रसारक आणि समाजातील अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी गावोगावी फिरून समाज प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांच्याविषयी कवी म्हणतो,
हातात असायचे झाडू, मुखात असायचे कीर्तन
त्यातूनच करायचे, समाजप्रबोधन
                                              

            सामाजिक चळवळीत काम करतांना कुटुंबातील सदस्यांना विसरून चालणार नाही. शेवटी त्यांची साथ असेल तरच जीवनातील आनंद दीर्घकाळ टिकून राहतो आणि मानसिक समाधानाचे सुख मिळते. म्हणूनच कवी आपल्या पत्नीवर, लेकीवर स्वप्नातल्या प्रेयसीवर देखील रचना लिहिल्या आहेत. मानवाच्या आयुष्यातील एक सोनेरी पान म्हणजे विवाह. दोन विभिन्न मन एकत्र येण्याचा तो प्रसंग, संसार फुलविण्याचा आनंदी क्षण, तो विसरणे कदापि शक्य नाही. पण तो दिवस नेहमी लक्षात राहावं म्हणून एक कविता लिहीत असल्याची संकल्पना सांगताना लग्नाचा वाढदिवस या कवितेत कवी म्हणतो,
येत आहे लग्नाचा वाढदिवस, उत्साहाने मन भरत आहे
आठवण ठेवू प्रत्येक वर्षी, म्हणून लिहितो आहे
                   या कवितासंग्रहात सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि भावनिक काव्यरचनासह श्रावण, पाऊस, शेतकरी, पांडुरंग, शाळा, मैत्री, महापुरुष असे अनेक विषयाच्या कवितांचा समावेश केलेला आहे. कवीने आपल्या साध्या, सोप्या आणि इतरांना सहज समजेल अश्या भाषेत आपल्या मनातील भावना सुंदररित्या व्यक्त केल्या आहेत. ६४ पृष्ठांच्या कवितासंग्रहात एकूण ५१ रचना आहेत. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार दिगंबर ग. कदम यांनी या संग्रहाची प्रस्तावना केली असून प्रसिद्ध कवी देविदास फुलारी यांनी पाठराखण केली आहे. या कवितासंग्रहाचे सुंदर असे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी केले तर देगलूरच्या पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या गणगोत प्रकाशन संस्थेने हे प्रकाशित केले आहे. या कवितासंग्रहाचे मूल्य १४० ₹ असे आहे.
             एकूणच मानवी मनातील घालमेल सांगणारी व बळीराजाच्या जीवनातील दुःख व्यक्त करणारी ह्या फुंकर कवितासंग्रहाचे साहित्यिक नक्की स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. तसेच गोविंद कवळे यांच्या पुढील काव्यलेखनासाठी मनस्वी शुभेच्छा ........!

पुस्तक परिचय :-
नासा येवतीकर, भाषा विषय शिक्षक,
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - नजराणा ( Najarana )

विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट गीतांचा " नजराणा " काव्यसंग्रह

अक्षरक्रांती प्रकाशन मुंबई द्वारा प्रकाशित आणि वृषाली सुरेश खाडये यांच्या अथक परिश्रमातून संपादित झालेलं " नजराणा " प्रातिनिधिक काव्यसंग्रह शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना देखील आनंद देणारा असा आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक असून पुस्तक वाचताना मुलं कसे रममान होतात ? याची प्रचिती प्रत्यक्षात हे पुस्तक वाचतांना मिळेल. एकापेक्षा एक सुंदर व सुरस अश्या कविता यात समाविष्ट आहेत जे वाचताना वाचक नक्कीच दंग होतील. राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, कवी आणि कवयित्री यांनी " शाळा व विद्यार्थी " केंद्रबिंदू मानून कविता लिहिल्या आहेत आणि संपादिका वृषाली सुरेश खाडये यांनी उत्तमरित्या संकलन करून त्यावर संपादन करण्याचे काम केले आहे. पर्यावरण, निसर्ग, शाळा, शिक्षक, तंत्रज्ञान, अभंग, देश या विषयावर बालकवितांचा समावेश केलेला आहे. यातील सर्वच कविता वाचनीय, काही लयबद्ध तर काही बडबड गाण्याच्या स्वरूपात आहे. त्यापैकीच काही विशेष म्हणजे दिलीप यशवंत माने आपल्या श्रावण कवितेतून म्हणतात, 

ओथंबून नभ आले
अवनीच्या रे भेटीला
श्रावणात असा सारा
घननिळा बरसला

श्रावण महिन्यात आकाशात काळे काळे ढग जमा होतात आणि धरतीच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात याचेच वर्णन कवी आपल्या या कवितेतून केले आहे. 
अंगाईगीत सहसा आईच्या मुखातून ऐकायला मिळते मात्र प्रा. प्रकाश पुना चऱ्हाटे यांनी मुलाला झोपविण्यासाठी वडिलांनी म्हणजे बाबांनी गायलेलं अंगाई गीत लिहिले. ते म्हणतात

बैल झोपले वाड्यात, खोप्यामध्ये चिमणदादा
परसातील बागेमध्ये, झोपला रे गुलाब-चाफा
अंगावर घे पांघरूण, वाट आता नको पाहू

शाळेतील विद्यार्थ्यांना आवडणारे प्रतिभा बोबे यांचे अंक गाणे, प्रभाकर शिंदे यांचे बे एके बे हे पाढ्यावरील गाणे लयबद्ध आहेत. ती कविता वाचतांना विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळणार आहे. संध्याराणी कोल्हे यांच्या पाऊस या कवितेतून कवयित्री म्हणतात की, 

पावसाचे गाणे भिजत भिजत गाऊ
वृक्षासव आपणही आनंदाने न्हाऊ

लहान मुलांना पावसात भिजायला खूप आवडते. त्याच बाबीचा संदर्भ लक्षात घेऊन वृक्षाचे महत्व ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. 

पाणी हेच आपुले जीवन
काटकसरीने वापरू हे धन
असा छानसा संदेश सौ. रोहिणी राजेंद्र गायकवाड हे पर्यावरण या कवितेतून दिला आहे. 
साने गुरुजी यांची खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना महाराष्ट्रातील संपूर्ण शाळेतून गायले जाते. त्याच काव्याचा आधार घेऊन सौ. स्नेहल अमित ओंबळे यांनी खरा तो एकचि धर्म ह्या कवितेतून ते म्हणतात, 

कुणा ना व्यर्थ तोडावे
कुणा ना व्यर्थ मोडावे
समस्ता जीव गणावे
निसर्गा मित्र मानावे

कोणतेही झाड विनाकारण तोडू नये, मोडू नये, प्रत्येक सजीवात जीव असतो हे जाणून घेऊन संपूर्ण निसर्गाला मित्र मानावे असा सुंदर संदेश आपल्या कवितेतून दिले आहे. तंत्रस्नेही शिक्षक, संगणक आणि देशावर आधारित कवितांचाही यात समावेश केलेला आहे. 
प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना बडबडगीते खूप आवडतात. सुनीता पांडुरंग अनभुले यांच्या माणसा जग वाचव .... सायली राणे यांची उंदीरमामा, प्रवीणा वाघमारे यांची वृक्षगीत या बालानो या रे या अश्या अनेक सुंदर बडबड गीतांच्या कविता यात आहेत. भारत देशावर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर देखील कविता येथे वाचायला मिळतात. एकापेक्षा एक अश्या सुंदर व छान छान कविता या काव्यसंग्रहात वाचकांना वाचण्यास मिळतात. 
या काव्यसंग्रहाची पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. सुरज कुदळे, संदीप सोनार, दिलीप जाने, वर्षा चोपदार आदीनी संपादकीय मंडळात काम करून काव्यसंग्रह उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण 65 पृष्ठात महाराष्ट्रातील साठ कवी-कवयित्रींच्या कविता आहेत. या काव्यसंग्रहाचे स्वागतमूल्य 150 रु. आहे. प्रत्येक मराठी शाळेत संग्रही असायलाच हवे असे हे काव्यसंग्रह तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक मुख्याध्यापकानी, शाळा प्रमुखांनी व जाणकार वाचकांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे त्यासाठी संपादिका वृषाली सुरेश खाडये यांच्याशी 9967001411 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप्पद्वारे संपर्क करून सदरील काव्यसंग्रह पोस्टाने मागविता येईल. येत्या काळात असेच अजून छान छान काव्यसंग्रह वाचण्यास मिळो हीच सदिच्छा .....!

पुस्तक परिचय - 

नासा येवतीकर, कवी तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - अभंग समतेचे( Abhang Samteche )

विविध अंग मानवाचे, सांगे अभंग समतेचे
मानवी मनाची घालमेल सांगणारा काव्यसंग्रह
महाराष्ट्रातील संत आणि अनेक कवींनी अभंग रचना तयार करून जनप्रबोधन करण्याचे काम केले आहे. कमी शब्दांत जास्त अर्थ सांगण्याचे सामर्थ्य अभंगात आहे. अभंग रचना वाचतांना जरी सहज आणि सोपे वाटत असले तरी ती तयार करतांना खूप कठीण आहे. त्यासाठी कविजवळ दांडगी शब्दसंपत्ती असायला हवी, जे की चंद्रकांत गायकवाड यांचा अभंग समतेचे हा काव्यसंग्रह वाचतांना जाणवत राहतो. तसा त्यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह जरी असला तरी रचना वाचतांना कुठेही तसे जाणवत नाही. मुरलेल्या कविसारखे शिर्षकाला अनुसरून अभंग लिहिले आहेत. संतांनी आपल्या अभंगातून आध्यत्मिक बाबी सांगितल्या आहेत तर चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या अभंगातून समाजात समता कशी प्रस्थापित होऊ शकेल ? याचे विचार पेरण्याचा प्रयत्न केला आहे. आज सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागोजागी विषमता दिसून येते. ती विषमता संपविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणे आवश्यक असल्याचे कवी आपल्या रचनेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सर्वच रचना ह्या इतरांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. स्त्रियांच्या समस्या, रोजीरोटी, मुलगी, माहेर, भूक दारिद्र्य, गरिबी, शेतीभाती, नातीगोती, समाजातील विसंगती यावर त्यांनी आपल्या अभंगातून विचार व्यक्त केले आहे. 
मनुष्याचा विकास फक्त शिक्षणानेच होते असे अनेकांनी सांगितले आहे. शिक्षणाने माणसाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश पसरतो हे सांगताना विवेक मध्ये कवी म्हणतो

शिक्षणाचे मळे
आनंदाचे खळे
भेदू तम जाळे
विवेकाने

पुस्तकातून मिळालेले जगाचे कल्याण करते. जसे संत गाडगेबाबा माणसात देव शोधा म्हणून संदेश दिले होते तसे कवी आपल्या पुस्तक या रचनेतून म्हणतात

उद्धार नाही हो
देव दर्शनात
पहा पुस्तकात
विश्व सारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते कारण दिवसरात्र अभ्यास करून त्यांनी देशाचे संविधान लिहिले. याच संविधानामुळे आज भारतातील लोकशाही टिकून आहे. संविधान हे सर्व प्रकारच्या समस्येवर जालीम औषध आहे हे लोकांनी जाणले पाहिजे आणि देशाला दिलेले सर्वात मोठे दान आहे असे सांगताना संविधान मधून कवी म्हणतो, 

उतारा औषध
संविधान जाण
हेची जना दान
भीमराया

भिमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेबाबत कवी खूप दुःखी होऊन सिदनाक अभंग रचनेत म्हणतो

माणसांचा गाव
उभारू नव्याने
पशूचे वागणे
नको आता

आज माणसाचे जीवन पशू पेक्षा हिंस्त्र झाले आहे. जो तो गटातटात विभागल्या जाऊन माणुसकी विसरला आहे. म्हणूनच कवीला तसे खेदाने म्हणावे लागते. 
म्हणायला गेलं तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्याला संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. पण तोच पोशिंदा येथे कुपोषित आहे. शेतात पिकणाऱ्या मालाला कधीच भाव मिळत नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मातीत काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था आपल्या निरंजन काव्यातून मांडताना कवी म्हणतो

काबाडाचा धनी
मातीत मरतो
तोंडच मारतो
लेकरांचे

माणूस हा समाजप्रिय आहे. समाजशिवाय तो जीवन जगणे अशक्य आहे. समाज म्हटले की नातेसंबंध येतातच. पण काही नाते एवढे स्वार्थी आणि आपमतलबी झाले आहेत की, लोकांना नाते त्या आरश्यासारखे वाटायला लागले असे नाते या काव्यातून मांडले आहे.
  
जोडू नवे नाते
गाऊ नवे गाणे
आरशाचे जिणे
माणसाचे

पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणतेही काम करू शकतो. राजेश खन्ना यांच्या रोटी या चित्रपटातून देखील असाच काही संदेश दिला तसाच संदेश लूट या अभंगातून कवी सांगण्याचा प्रयत्न करतो

भूक माणसाला
दावी रूप नवे
जगावे मरावे 
पुन्हा पुन्हा

महाराष्ट्राचे कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचा राज्यकारभार करण्याचा दृष्टिकोन प्रजाहितदक्ष असेच होते. पर स्त्री मातेसमान माना असा आदेश ते आपल्या मावळ्यांना देत असत. शीलवंत या काव्यातून कवी शिवराय विषयी म्हणतो 

नर नारी कधी 
भेद नाही केला 
मावळ्यांना सल्ला 
विवेकाने 

पौराणिक कथेतील स्त्रियांच्या जीवनाकडे एक कटाक्ष टाकला तर लक्षात येते की, त्यांना किती छळ सहन करावा लागला होता. पण आधुनिक काळातील स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांनी लावलेले स्वातंत्र्याचे दीप आज घरोघरी दीपमाळ बनून सदोदित जळत आहेत. म्हणूनच कवी स्वयंदीप या शिर्षकातून खूप मार्मिक लिहिलं आहे 

सीता द्रौपदीचे
किती झाले छळ 
जिजा साऊ बळ 
आत्मभान

जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशमय जीवन जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे अनेक विचारवंत लोकांनी सांगितले आहे. असत्य काही क्षण आपणांस आनंद देऊ शकतो पण कायमचा नाही म्हणून प्रकाश कवितेतून कवी वाचकांच्या डोक्यात प्रकाश टाकू इच्छितो.  

बारुद दारुखाने
असत्य रिकामे 
ज्ञान प्रकाशाने 
उजळले

मानवी जन्म मिळाले आहे तर त्याचा सदुपयोग करायला हवे. हा जन्म पुन्हा मिळणार नाही. स्वर्गात जाईन की नरकात या सगळ्या गोष्टी निव्वळ भूलथापा आहेत असे म्हणतात

जन्म नाही पुन्हा
हाती मानवाच्या 
स्वर्ग नरकाच्या 
भूलथापा

शिक्षणाने मानवाचा विकास होतो. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा सारा भेद कमी होतो. समाजात मान-सन्मान मिळवायचा असेल तर ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. असाच संदेश अक्षर या काव्यातून देताना म्हणतो 

अक्षर जागर
जीवनाचा साज 
सौजन्याने आज 
वागविते

जगावर कोरोनाचे संकट आल्यावर माणसाला माणुसकी शिकायला मिळाली. या लाटेत कित्येकजण आपल्या जीवाला मुकले तर काहीजण या संकटातून वाचले. जीवन हे क्षणभंगूर आहे याची प्रचिती या निमित्ताने झाली. म्हणूनच कवी फासे या अभंगातून खूप छान संदेश देतो

फुटू दे, पालवी
नवीन अंकुरी 
तू ही सदाचारी 
हो, ना जरा !

संविधानामुळे एक चांगला भारत देश घडेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मात्र येथील राजकारणी मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी सर्व समाजात फूट पाडली आणि आपण मात्र आलिशान मजेत जीवन जगत असल्याचे विदारक चित्र शेज या काव्यातून मांडतात

राजस्वार्थापायी
तोडला समाज 
रंगविली शेज 
आलिशान

या राजकारणी लोकांच्या भूलथापाना बळी न पडता सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं असा संदेश द्यायला देखील कवी विसरत नाहीत
जनहिता या काव्यातून म्हणतात की, 

प्रेमाची करूया
जीवनी कदर 
जातीचा कहर 
सोडू चला

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याची देणं असा समज पसरत गेल्याने मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दर हजारी पुरुष मुलांच्या जन्ममागे मुलींच्या जन्माचा दर शंभरने कमी होत आहे. जे की खूपच चिंताजनक आहे. म्हणून कवी खुपच चिंताग्रस्त होऊन अवकळा काव्यातून म्हणतो 

सम नर नारी 
एकच रे खाण 
जन्म एक जाण 
प्रत्येकाचा

पुढे जाऊन लेकी जन्म मधून कवी एक छान संदेश देतो. 

वसुंधरा तुझे 
निर्मितीचे देणे 
स्त्री जन्माचे लेणे 
माय होणे

धरती आणि स्त्री ह्या दोन्ही निर्मितीचे उगमस्थान आहे. याच्यावर अन्याय करून कसे चालेल. प्रत्येक स्त्री ही आई झाल्यावर परिपूर्ण होत असते. म्हणून आई होणाऱ्या मातेच्या उदरातील बालकांना हे जग पाहू द्या. गर्भातच कळी खुडू नका असा छानसा संदेश आपल्या काव्यातून देतात. 
आपल्या संग्रहातील शेवटच्या कवितेत सर्व कवितांचा सार मांडला आहे असे वाटते. कोणालाही खरं बोललं की राग येतो. तोंडावर स्तुती करणारे माणसं प्रत्येकाला आवडत असतात आणि खरं बोलणाऱ्या माणसाशी कोणाचेही लवकर जुळत नाही. येरझारा या अभंगातून कवी म्हणतो

सत्य मांडू जाता
मस्तकात जाळ 
खोट्याचा रे काळ 
सरो बापा

एकूणच अभंग समतेचे काव्यसंग्रहातील सर्वच रचना सहज शब्दातील, सोपी रचना आणि गर्भित आशयाचे आहेत. लातूरच्या डॉ. नरसिंग वाघमोडे यांची या पुस्तकाला सुंदर अशी प्रस्तावना लाभली असून मुखेडचे प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक दा. मा. बेंडे यांचे पाठराखण लाभले आहे. 

 अभंग समतेचे काव्यसंग्रह
कवी चंद्रकांत गायकवाड
प्रकाशक - पांडुरंग पुठ्ठेवाड, गणगोत प्रकाशन
मुखपृष्ठ - संतोष घोंगडे
अक्षरजुळवणी सौ. कलावती घोडके
मुद्रक रामकृष्ण प्रिंटर्स हैद्राबाद
किंमत 150 ₹

पुस्तक परिचय - गाठीभेटी ( Gathibheti )

मनातील भावनांचा ' गाठीभेटी ' सांगणारा काव्यसंग्रह

शाबासकीची एक थाप अनेक काम यशस्वीपणे करून दाखवते. म्हणूनच शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप देतात. त्या प्रेरणेतून विद्यार्थी घडत असतात. साहित्याच्या क्षेत्रात देखील कोणी जाणकार साहित्यिक गुरू नवोदित कवीला शाबासकीची थाप दिल्यावर चांगला कवी घडतो याचे प्रत्यय कवी प्रल्हाद घोरबांड यांचा गाठीभेटी कवितासंग्रह वाचतांना जाणवते. त्यांचा हा पहिला वहिला कवितासंग्रह असून नांदेड येथील प्रसिद्ध कवी जगदीश कदम यांनी प्रस्तावना देऊन त्यांना एक प्रकारे प्रेरणा दिली आहे तर प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. कवी प्रल्हाद घोरबांड हे गणिताचे शिक्षक असून देखील त्यांची मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आजोबा वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांच्यावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा पगडा दिसून येतो. या काव्यसंग्रहात अनेक काव्यातून पांडुरंग भेटीला येतो. म्हणून तर एकच वाट या कवितेतून कवी म्हणतो,

"तुकोबांची गाथा
वाचा ज्ञानेश्वरी
अविट हा धर्म
जिवना उद्धारी"

आपल्या जीवनाचा खरोखरच उद्धार करायचं असेल तर संत तुकाराम महाराज यांची गाथा आणि संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी यांचे नित्यनेमाने पारायण करणे आवश्यक आहे. कवी स्वतः पांडुरंगाचे परम भक्त असल्यामुळे त्यांना जीवनात जे आनंद मिळाले ते वाचकांना सांगतात. आपल्या पांडुरंग या कवितेत कवी म्हणतो, 

"भक्ती भावाने भजता 
नाही आनंदाला तोटा
दूर करतो व्यथा, पांडुरंग....."

सध्या समाजात जे काही घडत आहे ते खूपच अन्यायकारक आणि क्लेशदायक आहे. हे कवी स्वतः आपल्या डोळ्याने पाहतो आहे, त्याचे दुःख आणि मनातील शल्य आपल्या काव्यातून व्यक्त केले आहे. आई आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस स्वतःच्या पोटात वाढविते, तिला जन्म देते, लहानाचे मोठे करते पण तेच मूल मोठे झाल्यावर स्वतःच्या आईला विसरून कित्येक महिने भेट घेत नाही. गहिवर या कवितेतून कवी आपले दुःख व्यक्त करतांना म्हणतो की, 

"मायेचा गहिवर 
कंठ आला दाटून
लेक नाही आला
महिने झाले भेटून"

आई ही कधीच कुमाता होऊ शकत नाही. मूल जरी आई बाबांना विसरले असेल तरी ते त्यांना विसरू शकत नाही आणि रागात येऊन शाप देखील देऊ शकत नाहीत, ते देताता तर फक्त आशीर्वाद. म्हणूनच कवी आपल्या ममता या कवितेतून लेकरांना आशीर्वाद देताना म्हणतो की, 

"प्रेमाच्या परतफेडीची 
केली नाही आशा
सुखाने राहा बाळा 
जरी आमची दशा"

आई-बाबा आणि मूल या फारच नाजूक विषयाला कवींनी आपल्या काव्याच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. कवींचा आवडता विषय म्हणजे कविता. मनातील भाव शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारे एक माध्यम म्हणजे कविता. याविषयी कविता या काव्यातून कवी म्हणतो, 

"कविता ह्या कविताच असतात
शब्दांच्या त्या सविताच असतात
शब्दात भाव, दगडात देव
शोधणाऱ्यालाच दिसत असतात"

कवितासंग्रहाचे शीर्षक असलेली कविता गाठीभेटीमध्ये कवीचे मन कसे असते ? हे सांगितले आहे. नुकतीच तयार केलेली कविता कोणाला तरी ऐकवावी असे प्रत्येक कवीला वाटत असते. याच भावनेतून कवी सुंदर रचना तयार करत असतात. कवी म्हणतो,

"कवी धावतो श्रोत्यांच्या मागे
एखादीच कविता ऐकविण्यासाठी
जसे नामदेव धावले घेऊन
हातात तुपाची वाटी"

शेती, शेतकरी, पाऊस, हिवाळा, उन्हाळा, निसर्ग याविषयी देखील उत्तमोत्तम काव्य या संग्रहात वाचण्यास मिळतात. कवी गोपालक आहे म्हणून गाय विषयी कविता काव्यसंग्रहात असणे अपेक्षित आहेच. काव्यसंग्रहातील पहिलीच कविता प्रसन्न मध्ये ते म्हणतात की, 

"घरात घरात देशी गाय
सात्विक मिळेल अन्न
गायी वाचली तर पर्यावरण वाचेल
सगळे राहू प्रसन्न"

याविषयावर अन्य काव्य देखील वाचनीय आहेत. कवी स्वतः गुरुजी असल्याने त्यांनी गुरुजी या कवितेतून गुरुची महती विशद करतांना म्हणतात की, 

जीवनाला दिशा देऊन
तेच दाखवतात वाट
गुरुजींच्या मार्गदर्शनाविना
चढता येत नाही ज्ञानाचा घाट

देशातील गलिच्छ राजकारण, भ्रष्टाचार आणि वाढत चाललेले अत्याचार यावर देखील आपल्या काव्यातून प्रहार केले आहेत. महात्मा गांधीजीनी दांडी यात्रा करून मीठ मिळवून दिले पण सध्याच्या काळासाठी दंड देणारी यात्रा भरविणे आवश्यक आहे असे ते आपल्या काव्यातून व्यक्त करतात. 
एकूणच या काव्यसंग्रहात एकापेक्षा एक सरस आणि उद्धबोधन करणारे विविध विषयांवरील एकूण एक्याऐंशी काव्य आहेत. सहज आणि सोपी भाषा असल्यामुळे वाचक काव्य वाचतांना समरस होऊन जातो. वारकरी चळवळीतील संत आणि रामायण-महाभारतातील संदर्भ घेऊन केलेले अनेक रूपकात्मक काव्य वाचतांना मन विभोर होऊन जाते. जरी कवी प्रल्हाद घोरबांड यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असला तरी गेल्या तीन दशकापासून संग्रह करून ठेवलेल्या त्यांच्या मनातील भावनाच्या गाठीभेटी या संग्रहातून वाचण्यास मिळतात. संतोष घोंगडे यांनी काव्यसंग्रहाला साजेशीर असे मुखपृष्ठ तयार केले आहे. भगवा पताका, पांडुरंगाचा गंध, दोन पाऊल, पांढरे ढग आणि दोन पिंपळाचे पान ज्यात एक हिरवेगार आहे तर दुसरे वाळलेले. यातून कवींच्या मनातील अनेक भावना मुखपृष्ठावरील चित्राच्या माध्यमातून व्यक्त होतात. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग गोशाळेतील गाईंच्या चा-यासाठी केला जाणार आहे, हे विशेष उल्लेखनीय बाब आहे. म्हणून वाचक प्रेमीं या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील, अशी आशा ठेवू या. पुढील काव्यलेखनास कवींना मनस्वी शुभेच्छा.

पुस्तकाचे नाव :- गाठीभेटी
कवीचे नाव :- कवी प्रल्हाद विश्वनाथराव  घोरबांड
प्रकाशकाचे नाव :- संजय सुरनर, संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे :- 96
किंमत :- 150 ₹ फक्त

पुस्तक परिचय :- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...