Friday, 22 March 2024

पुस्तक परिचय - फुंकर ( Funkar )

मानवी मनातील घालमेल व्यक्त करणारा - फुंकर कवितासंग्रह
        
                मोबाईल स्मार्ट फोन आल्यामुळे आजकाल पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली अशी ओरड सध्या ऐकायला येत आहे मात्र पुस्तकं लिहिणाऱ्यांची संख्या या स्मार्टफोनमुळे किंचित का होईना वाढू लागलेली आहे, असे कोणी म्हणताना दिसत नाहीत. पण हे सत्य आहे. स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या वापरामुळे वाचक संख्या वाढली. तळहातावरील छोट्याशा मोबाईलवर एका क्लीक मध्ये हवी ती माहिती हवे तेव्हा मिळू लागले त्यामुळे वाचकांची भूक वाढीस लागली. तसेच साहित्याला ताबडतोब प्रसिद्धी मिळत असल्याने लिहिणाऱ्यांची संख्या देखील वाढली. आज समाजात फक्त साहित्यिक क्षेत्राला संपुर्णपणे वाहून घेतलेले अनेक व्हाट्सअप्प समूह आढळून येत आहेत, ज्यातून गोविंद कवळे सारखे नवकवी जन्म घेतांना दिसत आहेत. ही तशी साहित्य क्षेत्रासाठी आनंदाची बाब आहे.
          नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोदावरीच्या काठावर वसलेल्या अगदी छोट्याशा इळेगाव गावातील शेतकरी कुटुंबात कवी गोविंद कवळे यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे कवीवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ज्यामुळे आपले शिक्षण त्यांना अर्धवट सोडावे लागले. संसाराचा रहाटगाडे चालविण्यासाठी काहीतरी काम करणे भागच होते. ते काम करता करता त्यांनी सामाजिक चळवळीत सहभाग घेतला, त्यात अनेक चांगल्या सद्विचारी लोकांचा सहवास घडला ज्यातून कविमनाचा माणूस " फुंकर " च्या माध्यमातून समाजात प्रतिबिंबित झाला. उमरी तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक कै. ग. पि. मनूरकर यांच्या साहित्याने ते पूर्वीच प्रभावित झाले होते आणि त्यांच्यामुळेच लिहिण्याची उर्मी मिळाली असे कवी स्वतः म्हणतात. कवीला कसल्याही प्रकारचा साहित्यिक वारसा नसतांनाही त्यांनी साहित्यिक क्षेत्रात घेतलेली गरुडझेप लक्षवेधी आहे. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातील अनेक नामवंत दैनिकातून यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. फुंकर हा त्यांचा पहिलावहिला कवितासंग्रह आहे.
       कवी स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांचे कष्ट, दुःख, हाल-अपेष्टा, निसर्गाची अवकृपा आणि सावकाराकडून होणारी फसवणूक हे सारे त्यांनी याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहिले आहे म्हणून फुंकर मधील शेतकऱ्यांविषयीच्या प्रत्येक कवितेत त्याविषयीची तळमळ दिसून येते. म्हणूनच कष्ट करणारा बाप या कवितेत कवी म्हणतो,


शेतात पेरणी करतांना, तोचतो पायात काटा
कोणा सांगेल हे दुःख करतो सहन एकटा
                           

            शेतकरी किती जरी दुःखात राहिला किंवा स्वतः ला कितीही कष्ट सहन करावे लागले तरी दारावर आलेल्या कोणालाही तो माघारी फिरवत नाही, तो इतरांना मदत करायला वा दान करायला विसरत नाही म्हणून कवी शिवार फुलला या कवितेतून म्हणतो,

रास केला धान्याची, लाव हात पायलीला
दे चार चार पसा, आलेल्या आपुल्या दाराला

                                                 शिक्षणाचा गंध सुटला होता, संसाराची जबाबदारी वाढली होती. त्यातही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत काम करतांना अनेक सद्विचारी लोकांचा सहवास लाभला. श्रीपाद राऊतवाड, नागोराव डोंगरे, गुरू नागोराव तिप्पलवाड, कवी कट्टाचे संयोजक अशोक कुबडे यांच्या ओळखी झाल्यामुळे त्यांच्या लेखणीला खरी गती मिळाली. म्हणूनच कवी जगण्याचा मागमूस मध्ये आपली कृतज्ञता व्यक्त करतांना म्हणतो की,
काय कमावलो काय गमावलो, कसला आला हिशोब
भेटत गेली गुणी माणसे, उजळून आलं नशीब
                                      

               भारत देशाला घडविण्यात संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, कर्मवीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे अनेक थोर, महात्मा, शूरवीर व शैक्षणिक विचारवंतांनी आपले जीवन पणास लावले. त्या सर्व महापुरुषांना काव्यरूपाने कवी वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त मागासवर्गीय लोकांसाठीच नाही तर सर्वांसाठी संविधान लिहून खरे स्वातंत्र्य दिले आहे  ही भावना वंदन तुम्हांस या कवितेतून व्यक्त करताना कवी म्हणतो,
संविधानाचे निर्माते तुम्ही, दिला आम्हा प्रकाश
सर्वावरी माया तुमची, केले मोकळे आकाश
                                     

            स्वच्छतेचे प्रसारक आणि समाजातील अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी गावोगावी फिरून समाज प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांच्याविषयी कवी म्हणतो,
हातात असायचे झाडू, मुखात असायचे कीर्तन
त्यातूनच करायचे, समाजप्रबोधन
                                              

            सामाजिक चळवळीत काम करतांना कुटुंबातील सदस्यांना विसरून चालणार नाही. शेवटी त्यांची साथ असेल तरच जीवनातील आनंद दीर्घकाळ टिकून राहतो आणि मानसिक समाधानाचे सुख मिळते. म्हणूनच कवी आपल्या पत्नीवर, लेकीवर स्वप्नातल्या प्रेयसीवर देखील रचना लिहिल्या आहेत. मानवाच्या आयुष्यातील एक सोनेरी पान म्हणजे विवाह. दोन विभिन्न मन एकत्र येण्याचा तो प्रसंग, संसार फुलविण्याचा आनंदी क्षण, तो विसरणे कदापि शक्य नाही. पण तो दिवस नेहमी लक्षात राहावं म्हणून एक कविता लिहीत असल्याची संकल्पना सांगताना लग्नाचा वाढदिवस या कवितेत कवी म्हणतो,
येत आहे लग्नाचा वाढदिवस, उत्साहाने मन भरत आहे
आठवण ठेवू प्रत्येक वर्षी, म्हणून लिहितो आहे
                   या कवितासंग्रहात सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि भावनिक काव्यरचनासह श्रावण, पाऊस, शेतकरी, पांडुरंग, शाळा, मैत्री, महापुरुष असे अनेक विषयाच्या कवितांचा समावेश केलेला आहे. कवीने आपल्या साध्या, सोप्या आणि इतरांना सहज समजेल अश्या भाषेत आपल्या मनातील भावना सुंदररित्या व्यक्त केल्या आहेत. ६४ पृष्ठांच्या कवितासंग्रहात एकूण ५१ रचना आहेत. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार दिगंबर ग. कदम यांनी या संग्रहाची प्रस्तावना केली असून प्रसिद्ध कवी देविदास फुलारी यांनी पाठराखण केली आहे. या कवितासंग्रहाचे सुंदर असे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी केले तर देगलूरच्या पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या गणगोत प्रकाशन संस्थेने हे प्रकाशित केले आहे. या कवितासंग्रहाचे मूल्य १४० ₹ असे आहे.
             एकूणच मानवी मनातील घालमेल सांगणारी व बळीराजाच्या जीवनातील दुःख व्यक्त करणारी ह्या फुंकर कवितासंग्रहाचे साहित्यिक नक्की स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. तसेच गोविंद कवळे यांच्या पुढील काव्यलेखनासाठी मनस्वी शुभेच्छा ........!

पुस्तक परिचय :-
नासा येवतीकर, भाषा विषय शिक्षक,
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - नजराणा ( Najarana )

विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट गीतांचा " नजराणा " काव्यसंग्रह

अक्षरक्रांती प्रकाशन मुंबई द्वारा प्रकाशित आणि वृषाली सुरेश खाडये यांच्या अथक परिश्रमातून संपादित झालेलं " नजराणा " प्रातिनिधिक काव्यसंग्रह शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना देखील आनंद देणारा असा आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक असून पुस्तक वाचताना मुलं कसे रममान होतात ? याची प्रचिती प्रत्यक्षात हे पुस्तक वाचतांना मिळेल. एकापेक्षा एक सुंदर व सुरस अश्या कविता यात समाविष्ट आहेत जे वाचताना वाचक नक्कीच दंग होतील. राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, कवी आणि कवयित्री यांनी " शाळा व विद्यार्थी " केंद्रबिंदू मानून कविता लिहिल्या आहेत आणि संपादिका वृषाली सुरेश खाडये यांनी उत्तमरित्या संकलन करून त्यावर संपादन करण्याचे काम केले आहे. पर्यावरण, निसर्ग, शाळा, शिक्षक, तंत्रज्ञान, अभंग, देश या विषयावर बालकवितांचा समावेश केलेला आहे. यातील सर्वच कविता वाचनीय, काही लयबद्ध तर काही बडबड गाण्याच्या स्वरूपात आहे. त्यापैकीच काही विशेष म्हणजे दिलीप यशवंत माने आपल्या श्रावण कवितेतून म्हणतात, 

ओथंबून नभ आले
अवनीच्या रे भेटीला
श्रावणात असा सारा
घननिळा बरसला

श्रावण महिन्यात आकाशात काळे काळे ढग जमा होतात आणि धरतीच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात याचेच वर्णन कवी आपल्या या कवितेतून केले आहे. 
अंगाईगीत सहसा आईच्या मुखातून ऐकायला मिळते मात्र प्रा. प्रकाश पुना चऱ्हाटे यांनी मुलाला झोपविण्यासाठी वडिलांनी म्हणजे बाबांनी गायलेलं अंगाई गीत लिहिले. ते म्हणतात

बैल झोपले वाड्यात, खोप्यामध्ये चिमणदादा
परसातील बागेमध्ये, झोपला रे गुलाब-चाफा
अंगावर घे पांघरूण, वाट आता नको पाहू

शाळेतील विद्यार्थ्यांना आवडणारे प्रतिभा बोबे यांचे अंक गाणे, प्रभाकर शिंदे यांचे बे एके बे हे पाढ्यावरील गाणे लयबद्ध आहेत. ती कविता वाचतांना विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळणार आहे. संध्याराणी कोल्हे यांच्या पाऊस या कवितेतून कवयित्री म्हणतात की, 

पावसाचे गाणे भिजत भिजत गाऊ
वृक्षासव आपणही आनंदाने न्हाऊ

लहान मुलांना पावसात भिजायला खूप आवडते. त्याच बाबीचा संदर्भ लक्षात घेऊन वृक्षाचे महत्व ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. 

पाणी हेच आपुले जीवन
काटकसरीने वापरू हे धन
असा छानसा संदेश सौ. रोहिणी राजेंद्र गायकवाड हे पर्यावरण या कवितेतून दिला आहे. 
साने गुरुजी यांची खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना महाराष्ट्रातील संपूर्ण शाळेतून गायले जाते. त्याच काव्याचा आधार घेऊन सौ. स्नेहल अमित ओंबळे यांनी खरा तो एकचि धर्म ह्या कवितेतून ते म्हणतात, 

कुणा ना व्यर्थ तोडावे
कुणा ना व्यर्थ मोडावे
समस्ता जीव गणावे
निसर्गा मित्र मानावे

कोणतेही झाड विनाकारण तोडू नये, मोडू नये, प्रत्येक सजीवात जीव असतो हे जाणून घेऊन संपूर्ण निसर्गाला मित्र मानावे असा सुंदर संदेश आपल्या कवितेतून दिले आहे. तंत्रस्नेही शिक्षक, संगणक आणि देशावर आधारित कवितांचाही यात समावेश केलेला आहे. 
प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना बडबडगीते खूप आवडतात. सुनीता पांडुरंग अनभुले यांच्या माणसा जग वाचव .... सायली राणे यांची उंदीरमामा, प्रवीणा वाघमारे यांची वृक्षगीत या बालानो या रे या अश्या अनेक सुंदर बडबड गीतांच्या कविता यात आहेत. भारत देशावर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर देखील कविता येथे वाचायला मिळतात. एकापेक्षा एक अश्या सुंदर व छान छान कविता या काव्यसंग्रहात वाचकांना वाचण्यास मिळतात. 
या काव्यसंग्रहाची पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. सुरज कुदळे, संदीप सोनार, दिलीप जाने, वर्षा चोपदार आदीनी संपादकीय मंडळात काम करून काव्यसंग्रह उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण 65 पृष्ठात महाराष्ट्रातील साठ कवी-कवयित्रींच्या कविता आहेत. या काव्यसंग्रहाचे स्वागतमूल्य 150 रु. आहे. प्रत्येक मराठी शाळेत संग्रही असायलाच हवे असे हे काव्यसंग्रह तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक मुख्याध्यापकानी, शाळा प्रमुखांनी व जाणकार वाचकांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे त्यासाठी संपादिका वृषाली सुरेश खाडये यांच्याशी 9967001411 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप्पद्वारे संपर्क करून सदरील काव्यसंग्रह पोस्टाने मागविता येईल. येत्या काळात असेच अजून छान छान काव्यसंग्रह वाचण्यास मिळो हीच सदिच्छा .....!

पुस्तक परिचय - 

नासा येवतीकर, कवी तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - अभंग समतेचे( Abhang Samteche )

विविध अंग मानवाचे, सांगे अभंग समतेचे
मानवी मनाची घालमेल सांगणारा काव्यसंग्रह
महाराष्ट्रातील संत आणि अनेक कवींनी अभंग रचना तयार करून जनप्रबोधन करण्याचे काम केले आहे. कमी शब्दांत जास्त अर्थ सांगण्याचे सामर्थ्य अभंगात आहे. अभंग रचना वाचतांना जरी सहज आणि सोपे वाटत असले तरी ती तयार करतांना खूप कठीण आहे. त्यासाठी कविजवळ दांडगी शब्दसंपत्ती असायला हवी, जे की चंद्रकांत गायकवाड यांचा अभंग समतेचे हा काव्यसंग्रह वाचतांना जाणवत राहतो. तसा त्यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह जरी असला तरी रचना वाचतांना कुठेही तसे जाणवत नाही. मुरलेल्या कविसारखे शिर्षकाला अनुसरून अभंग लिहिले आहेत. संतांनी आपल्या अभंगातून आध्यत्मिक बाबी सांगितल्या आहेत तर चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या अभंगातून समाजात समता कशी प्रस्थापित होऊ शकेल ? याचे विचार पेरण्याचा प्रयत्न केला आहे. आज सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागोजागी विषमता दिसून येते. ती विषमता संपविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणे आवश्यक असल्याचे कवी आपल्या रचनेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सर्वच रचना ह्या इतरांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. स्त्रियांच्या समस्या, रोजीरोटी, मुलगी, माहेर, भूक दारिद्र्य, गरिबी, शेतीभाती, नातीगोती, समाजातील विसंगती यावर त्यांनी आपल्या अभंगातून विचार व्यक्त केले आहे. 
मनुष्याचा विकास फक्त शिक्षणानेच होते असे अनेकांनी सांगितले आहे. शिक्षणाने माणसाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश पसरतो हे सांगताना विवेक मध्ये कवी म्हणतो

शिक्षणाचे मळे
आनंदाचे खळे
भेदू तम जाळे
विवेकाने

पुस्तकातून मिळालेले जगाचे कल्याण करते. जसे संत गाडगेबाबा माणसात देव शोधा म्हणून संदेश दिले होते तसे कवी आपल्या पुस्तक या रचनेतून म्हणतात

उद्धार नाही हो
देव दर्शनात
पहा पुस्तकात
विश्व सारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते कारण दिवसरात्र अभ्यास करून त्यांनी देशाचे संविधान लिहिले. याच संविधानामुळे आज भारतातील लोकशाही टिकून आहे. संविधान हे सर्व प्रकारच्या समस्येवर जालीम औषध आहे हे लोकांनी जाणले पाहिजे आणि देशाला दिलेले सर्वात मोठे दान आहे असे सांगताना संविधान मधून कवी म्हणतो, 

उतारा औषध
संविधान जाण
हेची जना दान
भीमराया

भिमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेबाबत कवी खूप दुःखी होऊन सिदनाक अभंग रचनेत म्हणतो

माणसांचा गाव
उभारू नव्याने
पशूचे वागणे
नको आता

आज माणसाचे जीवन पशू पेक्षा हिंस्त्र झाले आहे. जो तो गटातटात विभागल्या जाऊन माणुसकी विसरला आहे. म्हणूनच कवीला तसे खेदाने म्हणावे लागते. 
म्हणायला गेलं तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्याला संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. पण तोच पोशिंदा येथे कुपोषित आहे. शेतात पिकणाऱ्या मालाला कधीच भाव मिळत नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मातीत काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था आपल्या निरंजन काव्यातून मांडताना कवी म्हणतो

काबाडाचा धनी
मातीत मरतो
तोंडच मारतो
लेकरांचे

माणूस हा समाजप्रिय आहे. समाजशिवाय तो जीवन जगणे अशक्य आहे. समाज म्हटले की नातेसंबंध येतातच. पण काही नाते एवढे स्वार्थी आणि आपमतलबी झाले आहेत की, लोकांना नाते त्या आरश्यासारखे वाटायला लागले असे नाते या काव्यातून मांडले आहे.
  
जोडू नवे नाते
गाऊ नवे गाणे
आरशाचे जिणे
माणसाचे

पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणतेही काम करू शकतो. राजेश खन्ना यांच्या रोटी या चित्रपटातून देखील असाच काही संदेश दिला तसाच संदेश लूट या अभंगातून कवी सांगण्याचा प्रयत्न करतो

भूक माणसाला
दावी रूप नवे
जगावे मरावे 
पुन्हा पुन्हा

महाराष्ट्राचे कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचा राज्यकारभार करण्याचा दृष्टिकोन प्रजाहितदक्ष असेच होते. पर स्त्री मातेसमान माना असा आदेश ते आपल्या मावळ्यांना देत असत. शीलवंत या काव्यातून कवी शिवराय विषयी म्हणतो 

नर नारी कधी 
भेद नाही केला 
मावळ्यांना सल्ला 
विवेकाने 

पौराणिक कथेतील स्त्रियांच्या जीवनाकडे एक कटाक्ष टाकला तर लक्षात येते की, त्यांना किती छळ सहन करावा लागला होता. पण आधुनिक काळातील स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांनी लावलेले स्वातंत्र्याचे दीप आज घरोघरी दीपमाळ बनून सदोदित जळत आहेत. म्हणूनच कवी स्वयंदीप या शिर्षकातून खूप मार्मिक लिहिलं आहे 

सीता द्रौपदीचे
किती झाले छळ 
जिजा साऊ बळ 
आत्मभान

जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशमय जीवन जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे अनेक विचारवंत लोकांनी सांगितले आहे. असत्य काही क्षण आपणांस आनंद देऊ शकतो पण कायमचा नाही म्हणून प्रकाश कवितेतून कवी वाचकांच्या डोक्यात प्रकाश टाकू इच्छितो.  

बारुद दारुखाने
असत्य रिकामे 
ज्ञान प्रकाशाने 
उजळले

मानवी जन्म मिळाले आहे तर त्याचा सदुपयोग करायला हवे. हा जन्म पुन्हा मिळणार नाही. स्वर्गात जाईन की नरकात या सगळ्या गोष्टी निव्वळ भूलथापा आहेत असे म्हणतात

जन्म नाही पुन्हा
हाती मानवाच्या 
स्वर्ग नरकाच्या 
भूलथापा

शिक्षणाने मानवाचा विकास होतो. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा सारा भेद कमी होतो. समाजात मान-सन्मान मिळवायचा असेल तर ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. असाच संदेश अक्षर या काव्यातून देताना म्हणतो 

अक्षर जागर
जीवनाचा साज 
सौजन्याने आज 
वागविते

जगावर कोरोनाचे संकट आल्यावर माणसाला माणुसकी शिकायला मिळाली. या लाटेत कित्येकजण आपल्या जीवाला मुकले तर काहीजण या संकटातून वाचले. जीवन हे क्षणभंगूर आहे याची प्रचिती या निमित्ताने झाली. म्हणूनच कवी फासे या अभंगातून खूप छान संदेश देतो

फुटू दे, पालवी
नवीन अंकुरी 
तू ही सदाचारी 
हो, ना जरा !

संविधानामुळे एक चांगला भारत देश घडेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मात्र येथील राजकारणी मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी सर्व समाजात फूट पाडली आणि आपण मात्र आलिशान मजेत जीवन जगत असल्याचे विदारक चित्र शेज या काव्यातून मांडतात

राजस्वार्थापायी
तोडला समाज 
रंगविली शेज 
आलिशान

या राजकारणी लोकांच्या भूलथापाना बळी न पडता सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं असा संदेश द्यायला देखील कवी विसरत नाहीत
जनहिता या काव्यातून म्हणतात की, 

प्रेमाची करूया
जीवनी कदर 
जातीचा कहर 
सोडू चला

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याची देणं असा समज पसरत गेल्याने मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दर हजारी पुरुष मुलांच्या जन्ममागे मुलींच्या जन्माचा दर शंभरने कमी होत आहे. जे की खूपच चिंताजनक आहे. म्हणून कवी खुपच चिंताग्रस्त होऊन अवकळा काव्यातून म्हणतो 

सम नर नारी 
एकच रे खाण 
जन्म एक जाण 
प्रत्येकाचा

पुढे जाऊन लेकी जन्म मधून कवी एक छान संदेश देतो. 

वसुंधरा तुझे 
निर्मितीचे देणे 
स्त्री जन्माचे लेणे 
माय होणे

धरती आणि स्त्री ह्या दोन्ही निर्मितीचे उगमस्थान आहे. याच्यावर अन्याय करून कसे चालेल. प्रत्येक स्त्री ही आई झाल्यावर परिपूर्ण होत असते. म्हणून आई होणाऱ्या मातेच्या उदरातील बालकांना हे जग पाहू द्या. गर्भातच कळी खुडू नका असा छानसा संदेश आपल्या काव्यातून देतात. 
आपल्या संग्रहातील शेवटच्या कवितेत सर्व कवितांचा सार मांडला आहे असे वाटते. कोणालाही खरं बोललं की राग येतो. तोंडावर स्तुती करणारे माणसं प्रत्येकाला आवडत असतात आणि खरं बोलणाऱ्या माणसाशी कोणाचेही लवकर जुळत नाही. येरझारा या अभंगातून कवी म्हणतो

सत्य मांडू जाता
मस्तकात जाळ 
खोट्याचा रे काळ 
सरो बापा

एकूणच अभंग समतेचे काव्यसंग्रहातील सर्वच रचना सहज शब्दातील, सोपी रचना आणि गर्भित आशयाचे आहेत. लातूरच्या डॉ. नरसिंग वाघमोडे यांची या पुस्तकाला सुंदर अशी प्रस्तावना लाभली असून मुखेडचे प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक दा. मा. बेंडे यांचे पाठराखण लाभले आहे. 

 अभंग समतेचे काव्यसंग्रह
कवी चंद्रकांत गायकवाड
प्रकाशक - पांडुरंग पुठ्ठेवाड, गणगोत प्रकाशन
मुखपृष्ठ - संतोष घोंगडे
अक्षरजुळवणी सौ. कलावती घोडके
मुद्रक रामकृष्ण प्रिंटर्स हैद्राबाद
किंमत 150 ₹

पुस्तक परिचय - गाठीभेटी ( Gathibheti )

मनातील भावनांचा ' गाठीभेटी ' सांगणारा काव्यसंग्रह

शाबासकीची एक थाप अनेक काम यशस्वीपणे करून दाखवते. म्हणूनच शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप देतात. त्या प्रेरणेतून विद्यार्थी घडत असतात. साहित्याच्या क्षेत्रात देखील कोणी जाणकार साहित्यिक गुरू नवोदित कवीला शाबासकीची थाप दिल्यावर चांगला कवी घडतो याचे प्रत्यय कवी प्रल्हाद घोरबांड यांचा गाठीभेटी कवितासंग्रह वाचतांना जाणवते. त्यांचा हा पहिला वहिला कवितासंग्रह असून नांदेड येथील प्रसिद्ध कवी जगदीश कदम यांनी प्रस्तावना देऊन त्यांना एक प्रकारे प्रेरणा दिली आहे तर प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. कवी प्रल्हाद घोरबांड हे गणिताचे शिक्षक असून देखील त्यांची मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आजोबा वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांच्यावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा पगडा दिसून येतो. या काव्यसंग्रहात अनेक काव्यातून पांडुरंग भेटीला येतो. म्हणून तर एकच वाट या कवितेतून कवी म्हणतो,

"तुकोबांची गाथा
वाचा ज्ञानेश्वरी
अविट हा धर्म
जिवना उद्धारी"

आपल्या जीवनाचा खरोखरच उद्धार करायचं असेल तर संत तुकाराम महाराज यांची गाथा आणि संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी यांचे नित्यनेमाने पारायण करणे आवश्यक आहे. कवी स्वतः पांडुरंगाचे परम भक्त असल्यामुळे त्यांना जीवनात जे आनंद मिळाले ते वाचकांना सांगतात. आपल्या पांडुरंग या कवितेत कवी म्हणतो, 

"भक्ती भावाने भजता 
नाही आनंदाला तोटा
दूर करतो व्यथा, पांडुरंग....."

सध्या समाजात जे काही घडत आहे ते खूपच अन्यायकारक आणि क्लेशदायक आहे. हे कवी स्वतः आपल्या डोळ्याने पाहतो आहे, त्याचे दुःख आणि मनातील शल्य आपल्या काव्यातून व्यक्त केले आहे. आई आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस स्वतःच्या पोटात वाढविते, तिला जन्म देते, लहानाचे मोठे करते पण तेच मूल मोठे झाल्यावर स्वतःच्या आईला विसरून कित्येक महिने भेट घेत नाही. गहिवर या कवितेतून कवी आपले दुःख व्यक्त करतांना म्हणतो की, 

"मायेचा गहिवर 
कंठ आला दाटून
लेक नाही आला
महिने झाले भेटून"

आई ही कधीच कुमाता होऊ शकत नाही. मूल जरी आई बाबांना विसरले असेल तरी ते त्यांना विसरू शकत नाही आणि रागात येऊन शाप देखील देऊ शकत नाहीत, ते देताता तर फक्त आशीर्वाद. म्हणूनच कवी आपल्या ममता या कवितेतून लेकरांना आशीर्वाद देताना म्हणतो की, 

"प्रेमाच्या परतफेडीची 
केली नाही आशा
सुखाने राहा बाळा 
जरी आमची दशा"

आई-बाबा आणि मूल या फारच नाजूक विषयाला कवींनी आपल्या काव्याच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. कवींचा आवडता विषय म्हणजे कविता. मनातील भाव शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारे एक माध्यम म्हणजे कविता. याविषयी कविता या काव्यातून कवी म्हणतो, 

"कविता ह्या कविताच असतात
शब्दांच्या त्या सविताच असतात
शब्दात भाव, दगडात देव
शोधणाऱ्यालाच दिसत असतात"

कवितासंग्रहाचे शीर्षक असलेली कविता गाठीभेटीमध्ये कवीचे मन कसे असते ? हे सांगितले आहे. नुकतीच तयार केलेली कविता कोणाला तरी ऐकवावी असे प्रत्येक कवीला वाटत असते. याच भावनेतून कवी सुंदर रचना तयार करत असतात. कवी म्हणतो,

"कवी धावतो श्रोत्यांच्या मागे
एखादीच कविता ऐकविण्यासाठी
जसे नामदेव धावले घेऊन
हातात तुपाची वाटी"

शेती, शेतकरी, पाऊस, हिवाळा, उन्हाळा, निसर्ग याविषयी देखील उत्तमोत्तम काव्य या संग्रहात वाचण्यास मिळतात. कवी गोपालक आहे म्हणून गाय विषयी कविता काव्यसंग्रहात असणे अपेक्षित आहेच. काव्यसंग्रहातील पहिलीच कविता प्रसन्न मध्ये ते म्हणतात की, 

"घरात घरात देशी गाय
सात्विक मिळेल अन्न
गायी वाचली तर पर्यावरण वाचेल
सगळे राहू प्रसन्न"

याविषयावर अन्य काव्य देखील वाचनीय आहेत. कवी स्वतः गुरुजी असल्याने त्यांनी गुरुजी या कवितेतून गुरुची महती विशद करतांना म्हणतात की, 

जीवनाला दिशा देऊन
तेच दाखवतात वाट
गुरुजींच्या मार्गदर्शनाविना
चढता येत नाही ज्ञानाचा घाट

देशातील गलिच्छ राजकारण, भ्रष्टाचार आणि वाढत चाललेले अत्याचार यावर देखील आपल्या काव्यातून प्रहार केले आहेत. महात्मा गांधीजीनी दांडी यात्रा करून मीठ मिळवून दिले पण सध्याच्या काळासाठी दंड देणारी यात्रा भरविणे आवश्यक आहे असे ते आपल्या काव्यातून व्यक्त करतात. 
एकूणच या काव्यसंग्रहात एकापेक्षा एक सरस आणि उद्धबोधन करणारे विविध विषयांवरील एकूण एक्याऐंशी काव्य आहेत. सहज आणि सोपी भाषा असल्यामुळे वाचक काव्य वाचतांना समरस होऊन जातो. वारकरी चळवळीतील संत आणि रामायण-महाभारतातील संदर्भ घेऊन केलेले अनेक रूपकात्मक काव्य वाचतांना मन विभोर होऊन जाते. जरी कवी प्रल्हाद घोरबांड यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असला तरी गेल्या तीन दशकापासून संग्रह करून ठेवलेल्या त्यांच्या मनातील भावनाच्या गाठीभेटी या संग्रहातून वाचण्यास मिळतात. संतोष घोंगडे यांनी काव्यसंग्रहाला साजेशीर असे मुखपृष्ठ तयार केले आहे. भगवा पताका, पांडुरंगाचा गंध, दोन पाऊल, पांढरे ढग आणि दोन पिंपळाचे पान ज्यात एक हिरवेगार आहे तर दुसरे वाळलेले. यातून कवींच्या मनातील अनेक भावना मुखपृष्ठावरील चित्राच्या माध्यमातून व्यक्त होतात. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग गोशाळेतील गाईंच्या चा-यासाठी केला जाणार आहे, हे विशेष उल्लेखनीय बाब आहे. म्हणून वाचक प्रेमीं या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील, अशी आशा ठेवू या. पुढील काव्यलेखनास कवींना मनस्वी शुभेच्छा.

पुस्तकाचे नाव :- गाठीभेटी
कवीचे नाव :- कवी प्रल्हाद विश्वनाथराव  घोरबांड
प्रकाशकाचे नाव :- संजय सुरनर, संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे :- 96
किंमत :- 150 ₹ फक्त

पुस्तक परिचय :- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - निसर्गायन ( Nisargayan )

निसर्गाची सहल करविणारा निसर्गायण काव्यसंग्रह
किती पाहू अन साठवू किती मनात 
ही सारी किमया एका रोपट्याची

निसर्गाची निर्मिती ही एका रोपट्यातूनच होते. याच रोपट्याची नीट काळजी घेतली तर त्याची चांगली वाढ होते आणि त्याला फुले आणि फळे लागतात. आपण ज्या ठिकाणी वास्तव्यास राहतो त्याठिकाणी देखील आपणांस निसर्गाची साथ मिळत असते. पावलोपावली आपणावर निसर्गाचे अनंत उपकार आहेत, याची जाणीव सौ. निर्मला भयवाळ यांच्या निसर्गायण काव्यसंग्रहात पानापानावर आढळून येते.  त्याचा हा दुसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी सन 2008 मध्ये सारीपाट नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. यास पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. प्रत्येक माणसात काही ना काही प्रतिभा लपलेली असते, ती प्रतिभा आपण स्वत: ओळखू शकत नाही, त्यासाठी गरज असते एका मित्राची, गुरुजीची. ज्याप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अक्षरशत्रू असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्यातील प्रतिभा ओळखून भारतातील पहिली महिला शिक्षिका बनविल्या, त्यांच्या हातून उत्तम साहित्य निर्मिती करण्याची प्रेरणा दिली म्हणूनच बावनकशी सावित्रीबाई आपणांस लाभली. याठिकाणी देखील सौ. निर्मला भयवाळ ह्या मला सावित्रीबाई फुले वाटतात तर त्यांचे पती जेष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ हे ज्योतिबा फुले सारखे वाटतात. कारण त्यांच्या पतीने त्यांना प्रोत्साहित केले नसते, प्रेरणा दिले नसते तर सौ. निर्मला भयवाळ यांच्या हातून सारीपाट आणि निसर्गायण सारखे काव्यसंग्रहाचे साहित्य क्षेत्रात आगमन झाले नसते. गेल्या पंचवीस वर्षापासून ते आपल्या पतीसोबत काव्यप्रवास करत आहेत. सौ. निर्मला भयवाळ ह्या एक साधे गृहिणी आहेत पण त्यांच्या अंतर्मनात असलेली कविते विषयांची ओढ, लिखाणाविषयांची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. कवयित्री स्वतः या सर्व बाबीचे यशाचे श्रेय आपल्या यजमानांना देतात. कवयित्रीना पूर्वीपासूनच निसर्गामध्ये फिरण्याची आणि रमण्याची आवड आहे. झाडे, फुले, फळे यांच्याविषयी त्यांच्या मनात आत्यंतिक प्रेम आहे. त्यांच्या घराच्या अंगणातील विविध प्रकारची झाडे हे त्यांचे निसर्गावर असलेल्या प्रेमाची साक्ष देतात. म्हणूनच त्यांच्या यजमानांनी त्यांना वृक्षमित्र हा पुरस्कार दिलेला आहे. निसर्गायण या काव्यासंग्रहात निसर्गाची विविध रूपे दाखवणाऱ्या एकंदरीत तीस कविता आहेत. ज्या कविता वाचतांना आपण आपल्या घराभोवतीच्या पर्यावरणात वावरत आहोत की काय अशी शंका येते. या काव्यसंग्रहाला डॉ. ज्योती कदम यांनी प्रस्तावना देऊन सौ. निर्मला भयवाळ यांची पाठराखण केली आहे. आजपर्यंत निसर्गावर अनेक कवी आणि कवयित्री यांनी कविता लिहिल्या आहेत. मात्र सौ. निर्मला यांच्या निसर्ग कविता जरा वेगळ्या वळणाच्या आणि निसर्गात आलेल्या अनुभवावर आधारित आहेत, असे वाटते. म्हणूनच जरासे हटके वाटतात. निसर्गातील वृक्ष, नदी, नाले, ऊन, वारा, पाऊस, चंद्र, चांदणे, सूर्य आणि धरती यावर कविता वाचण्यास मिळतात.
त्यांची पहिलीच अंकुरला एक मोड ही कविता पर्यावरण कसे तयार झाले ? याचे अनुभव विशद करते. जोपर्यंत मोड अंकुरण होत नाही तोपर्यंत त्याची पुढील कोणतीच क्रिया होत नाही. या कवितेतून त्यांचे अति सूक्ष्म निरीक्षण दृष्टीस पडते. निसर्गाने आपणाला भरभरून दिले पण मानवाने परतफेड करायचे विसरून गेला. माणसाने जंगलतोड करून सिमेंटची जंगले उभारली आणि हवा प्रदूषित केली. मोठं मोठी कारखाने उभे करून नद्या नाले सारे दूषित केले. अस्वस्थ निसर्ग या काव्यातून त्यांनी तेच सांगितले आहे. 

पक्ष्याची घरटी यामुळे झाली उध्वस्त
म्हणूनच आज निसर्ग आहे अस्वस्थ

निसर्गाचे काही नियम ठरवलेले असतात, त्याच्या विरुद्ध कोणालाच वागता येत नाही. चांगले कार्य व्हावे म्हणून आपण खूप झटतो पण कधी कधी त्या चांगल्या कामात व्यत्यय येत असतात, ज्याचा त्रास काम करणाऱ्यांना होतो. असाच भावार्थ लपलेली कविता म्हणजे एक निवडुंग. आनंदाचे क्षण पाहण्यासाठी काही दुःखाचे क्षण देखील नकळत पाहावे लागतात. म्हणून कवयित्री म्हणतात,

टोचला काटा निवडुंगाचा
आणि क्षणभर विव्हळले मी.

कळी या कवितेतून सामाजिक संदेश देण्याचा कवयित्रीने प्रयत्न केला आहे. आपल्या घरात जर गुलाबाचे झाड असेल तर आपण तिची खूप काळजी घेतो, कोणाच्या दृष्टीस पडू नये असे वाटते पण गुलाबाच्या काही खट्याळ कालळ्या असतात किती जरी काळजी घेतली तरी देखील ते बाहेरच्या लोकांच्या दृष्टीस पडतेच पडते आणि लोकं ' व्वा काय सुंदर फुल!' आहे म्हणून तोडण्यास हात पुढे करतात तेंव्हा तेथे असलेले काटे तोडणाऱ्याच्या हाताला लागतात. याठिकाणी कळीच्या जागी मुलगी असे रूपक वापरले तर कवितेचा भावार्थ अजून गहिरा होतो. कवयित्री स्वतः एक महिला असल्याने त्यांच्या मनातील एक सल कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक व्यक्ती एकाच गोष्टीचा शोध घेत असतो ते म्हणजे कुठे झाडाची सावली मिळते का ?  पण तप्त उन्हामुळे सर्व झाडांची पाने वाळून जातात आणि कुठेच सावली दृष्टीस पडत नाही. मात्र एकच असं झाड आहे जे की भर उन्हाळ्यात देखील हिरवेगार आणि फुलून दिसतो ते म्हणजे गुलमोहर. याच दृष्टी वरून उन्हाळा या कवितेत त्या म्हणतात की,
छान गुलमोहर डवरला,
डेरेदार तो वृक्ष पाहुनी,
आनंद मनी झाला.

माणसांच्या निरुपयोगी वस्तुंना जीवनात काहीच अर्थ नसतो या आशयाची कविता म्हणजे खुडलेल्या कळ्या. जाईच्या फुलांची मागणी नाही म्हणून माळी जाईच्या सर्व कळ्या खुडून टाकतो तसेच त्याची वेल देखील. या कवितेतून कवयित्रीने समाजात चालत असलेल्या काही गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही बाबी निरुपयोगी वाटत असले तरी त्यांचे असणे आपल्यासाठी खूप मोलाचे आहे जसे की आपले वृद्ध आई-बाबा. तेव्हा त्यांना जाईचे फुल समजून घराबाहेर काढू नका किंवा दुर्लक्ष करू नका असा संदेश ते या कवितेतून देऊ इच्छितात असे वाटते. मुके प्राणी एकमेकांना कसे संदेश देतात हा एक संशोधनाचा विषय आहे. लाल मुंग्या एका रांगेत कसे चालतात ? तसे मधमाशी आपले मध कशाप्रकारे गोळा करते ? हा ही एक निरीक्षण करण्याजोगा विषय आहे. कवयित्री आपल्या बारीक नजरेतून हे सारे धुंडाळून काढले आहे मधमाशी विषयीचे सुंदर वर्णन त्यांच्या गंध या कवितेतून वाचायला मिळते. 

एकीस मिळता मध
दुसरीस साद घाली
पाहता पाहता सारी 
झुंड की हो आली

पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या सर्वाना आकर्षित करतात. खास करून उन्हाळ्यात जेव्हा जेवण झाल्यावर आपण बाहेर फिरतो किंवा बसतो त्यावेळी आकाशात जे सुंदरता दिसते, ते सर्वाना भुलवून टाकते. ते सुंदर दृश्य डोळ्यांत साठवून त्यावरच दिवस जात असतात असे सुंदर विवेचन चांदणे या कवितेत पाहायला मिळेल. निसर्गामध्ये जुने जाणे आणि नवीन येणे ही क्रिया चालूच असते. कोणत्या ऋतूत पाने गळतात आणि कोणत्या ऋतूत नवीन पालवी फुटते याच ज्ञानाच्या आधारावर चिमण्यांचा चिवचिवाट ही कविता निर्माण झाली असावी असे वाटते. फार पूर्वीच्या काळी जो चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता, तो आवाज आता गायब झाला आहे. त्यामुळे आज कोणाची पहाट रम्य राहिली नाही. आपल्या घरी कोणीतरी येणार हे कळल्यावर घरातील सर्वचजण सजून धजून बसतात. तसे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी धरणीमाता हिरवा शालू आणि चोळी नेसून सजल्याचे सुंदर चित्रण धरणीमाता या कवितेत केले आहे. धरती ही खनिजांचे भांडार आहे, ऋतुप्रमाणे आपले रूप बदलत असते, निसर्गाच्या बदलामध्ये तो आपणाला काही ना काही संदेश देत असतो. ते पूर्वीचे लोकं समजून घ्यायचे आताच्या लोकांनी समजून घेणं सोडलं आहे. सुंदर आणि रम्य निसर्ग राखण्यासाठी निसर्गाचे बोलणे आपण सर्वांनी ऐकायला हवं असा संदेश निसर्ग काही सांगतो आहे, निर्जर आणि निसर्गाची किमया या कवितेत कवयित्री देण्याचा प्रयत्न करतात. सकाळचा पहाटवारा आल्हाददायक असतो. दिवसभरातील शीण घालविण्यासाठी सकाळची वेळ खूप उत्तम आहे. अंधार संपून उजेड येण्यासाठी सकाळ ही एक महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवनात आलेल्या विविध अनुभवाच्या बळावर निसर्गाशी सांगड घालून रचना तयार केल्या आहेत, म्हणून वाचकांना ते नक्की भावतात.
पाऊस पडणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. पाऊस पडताना ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट या दोन गोष्टी घडणारच आहेत. पहिलं पाऊस आणि दरवळलेला मातीचा सुंगध याचे सुंदर असे वर्णन पहिला पाऊस, पावसाच्या धारा, पाऊस पडून गेला आणि पावसा रे पावसा या कवितेत केले आहे. पायवाट या कवितेतून ग्रामीण भागातील भागाचे सुंदर वर्णन करून शहरातील पायवाटला ग्रामीण भागातील पायवाटची गंमत नसल्याची खंत व्यक्त करतात. खास माणसं शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, सामान्य माणसे पावलोपावली भेटतात पण त्यांना काही किंमत नसते. याच अर्थाचा बगीचा ही कविता वाचतांना लक्षात येते की, दुर्मिळ वस्तू शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. 
पावसाळ्यात कधी सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत नाही मात्र वळवाच्या पावसात तो हमखास दृष्टीस पडतो. ते पाहून मन आनंदी होऊन जाते. या सर्व बाबीचा आढावा वळवाचा पाऊस या कवितेतून पाहण्यास मिळेल. ती कविता वाचतांना शंकर पाटील यांची वळीव ही कथा वाचकांच्या मनात तरळून जाते. एकापेक्षा एक सुंदर आणि भावगर्भ असलेल्या कविता वाचतांना आपण खरोखरच निसर्गात भटकत आहोत याची जाणीव होत राहते.
कोणत्याही गोष्टीचा शेवट गोड व्हावा असे म्हटले जाते तसे कवयित्री सौ. निर्मला भयवाळ यांनी त्यांच्या या काव्यसंग्रहात शेवटची सृष्टीच्या रंगात रंगू या ही कविता वाचकांना प्रोत्साहित करून जाते.

खळखळ वाहे हा झरा
देत चाहुल निसर्गाची
निसर्गाच्या संगतीत हरवू या
गाऊ गाणी निसर्गाची

औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळने निसर्गायण कवितासंग्रह गेल्या वर्षी 2020 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रकाशित केले असून काव्यसंग्रहावरील सुंदर आणि मनोवेधक असे मुखपृष्ठ महेश जोशी यांनी तयार केले आहे. एकूणच काव्यसंग्रहातून निसर्गावरील प्रेम आणि निसर्ग बचाव करण्यासाठी असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते. सर्व कविता साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहेत. आबालपसून वृद्धांपर्यंत सर्वाना हा  कवितासंग्रह नक्की आवडेल, याची मला खात्री आहे. कवयित्री सौ. निर्मला भयवाळयांना पुढील काव्य लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

काव्यसंग्रहाचे नाव - निसर्गायण
कवयित्री :- सौ. निर्मला भयवाळ
प्रकाशन :- जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
पृष्ठ :- 40 पाने
किंमत :- 70 रुपये

पुस्तक परिचय कर्ता

- नागोराव सा. येवतीकर, लेखक व शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - शृंगार मनाचे ( Shrungar Manache )


मानवी मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह शृंगार मनाचे
कवी पांडुरंग आडबलवाड हे धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलमध्ये गेल्या 32 वर्षांपासून मराठी विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि वसतिगृहात राहून 'कमवा व शिका' या तत्वानुसार त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाचे दारिद्र्य संपविण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी मिळविली. 
मराठी विषयाचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे भरपूर शब्दसंपत्ती आहे. त्याच बळावर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आध्यात्मिक धार्मिक, नैसर्गिक व चालू घडामोडीवर आशयघन, यमकबद्ध , समाजाभिमुख कविता लिहिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या विविधाऺगी अनेक कविता महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या असून अनेक कवितांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट तारा॑कित बक्षीस प्राप्त कविता " शृंगार मनाचे " काव्यसंग्रह स्वरुपात वाचकांसमोर विस्तृत स्वरूपात ठेवली आहे. 
या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातील थोर विचारवंत, लेखक, साहित्यिक, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना देऊन काव्यसंग्रहाची उंची वाढविली आहे तर सुप्रसिध्द काद॑बरीकार आणि साहित्यिक देवीदास फुलारी या॑नी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. या संग्रहात विजेत्या 85 उत्कृष्ट रचनेचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे असे म्हटले जाते. कवी पांडुरंग आडबलवाड यांच्या कविता वाचतांना पूज्य साने गुरुजी यांची प्रकर्षाने आठवण येते. कवी सहा महिन्यांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांना आईचे सुख-दुःख, आईची तगमग आणि मेहनत जवळून पाहता आले, आईशिवाय त्यांना कुणाचा आधार नव्हता म्हणूनच ते पहिलीच कविता माय माझी मध्ये म्हणतात,

माय माझी वृक्ष । वृक्षांची सावली
एकच माऊली । जगामधी ।।

कवींनी उभ्या आयुष्यात अनेक दुःखाचा सामना केला. अश्या कठीण प्रसंगात आपली जोडीदार भक्कमपणे सोबत उभी होती. म्हणूनच ते ही भक्कम उभे राहू शकले. त्यास्तव ते वाचकांना आयुष्याचा जोडीदार कसा असावा ? याची माहिती सांगताना म्हणतात, 

सुख दुःख आजारात
हवा साथी जोडीदार
वेळ येता आणीबाणी
जीव अर्पिण्या उदार

अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने कवी खूप उदास होतो आणि अशा प्रसंगी कवीच्या मनात ' पोरका पुष्प भुंग्याचा दरबार ' ही रचना जन्मास येते. कवीच्या मनात एक शंका निर्माण होते, 

दीनदुबळ्या पामरा नाही सृष्टीत कुठेही आसरा
स्वामी होऊन कुणी हातात धरली का कासरा

तसेच भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जाण्याने देखील कवी भावूक होऊन 'हरपले सप्तसुर' कवितेत कवी म्हणतो, 

कंठेश्वर हा जिवात्मा ! जगी जनात अद्भूत!
स्वर्ग भूवरी थाटण्या ! आल्या लता देवदूत!

कवीला शालेय जीवनापासून कविता लिहिण्याचा छंद होता. मध्यंतरीच्या काळात कविता लिहिणे सोडले होते मात्र कोरोना काळात पुन्हा एकदा त्यांची काव्यलेखन प्रतिभा जागी झाली. कविता लेखन करण्यासाठी कोरोना काळात खूप रिकामा वेळ मिळाला. हीच संधी समजून त्यांनी काव्यलेखनास परत एकदा सुरुवात केली आणि सोशल मीडियातील विविध समूहात सहभागी होऊन त्यांना विविध वाड्मय प्रकारात कविता सादरीकरण करण्याची संधी मिळाली. म्हणून ते पुन्हा एकदा कविता करण्याकडे वळले. म्हणूनच ते म्हणतात, 

सुख शांती समाधान
मोद साहित्यात दिसे
देह मना लेखनाचा
छंद जिवा लावी पिसे

कोरोना काळात लोकांना अनेक कडू अनुभव आले. या काळात डॉक्टर जसे देव म्हणून धावून आले तसे पोलीस देखील लोकांच्या मदतीसाठी पांडुरंग म्हणून उभे राहिले. याची प्रचिती कोरोना काळात अनेकांना आली म्हणूनच 'पोलीस' कवितेतून कवी म्हणतो, 

माय बाप लेकरे त्यागुनी
प्रजेप्रती घाळतात घाम
कर्तव्य तत्पर पांडुरंगाला
करू सर्व शतशः प्रणाम !

मुलांवर संस्कार टाकण्याचे महत्वाचे कार्य आई-बाबा करत असतात. लहानपणी त्यांचे बोट धरून चालणारे मूल त्यांनी दाखविलेल्या वाटेवर चालतात. खाण तशी माती या म्हणीनुसार जसे आई-वडील असतात तसेच मुले तयार होतात. अश्याच अर्थाचा जन्मदाता कवितेतून गर्भित असा संदेश देतात.

आई बाबा खरे दाते
शील संस्कार नीतिचे
बोट धरुनी सामर्थ्य
देती संसार मतीचे

त्याहीपुढे चालून संस्कार म्हणजे काय असते ? याचे महत्व सांगताना कवी म्हणतो, 

संस्काराची धनलक्ष्मी
नित्य नांदते ज्या घरी
जन्मा येती हिरे मोती
माता भगीनी  उदरी

बहिणाबाई चौधरी यांची अरे संसार संसार ह्या कवितेची जराशी झलक त्यांच्या कवितेत जाणवते. कवी देखील संसाराची गाऱ्हाणे सांगताना म्हणतो,

अरे संसार संसार
जना द्यावा आधार
होवो किती दुःख पर
दुजा वंदावे साभार

श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जीवनात जिवाभावाचे मित्र खूप महत्वाचे आहे. दुःखांच्या प्रसंगी फक्त मित्रच धीर देऊ शकतो, 'भाव मैत्रीचा' या कवितेत कवी म्हणतो,

सुख दुःखी प्रसंगात
मित्र देती जिवाजीव
भाव मैत्रीचा अपार
नसे कशाची उणीव

माणसाचे मन हे खूप चंचल आणि अस्थिर आहे. वाऱ्याप्रमाणे तो सैरभैर धावत असतो. याविषयी कवी म्हणतो,

मन उधाण वाऱ्याचे
स्तब्ध बसेना घरात
सदा धावे बाहेरच
जणू खगांची वरात

काव्यसंग्रहाचे शीर्षक रचना "शृंगार मनाचे" या कवितेतून कवी मानवी मनाचा वेध घेताना आपणांस मुक्ती मिळवायची असेल तर कर्णासारखे दानशूर होण्याचा सल्ला देतात. 

लाभो मुक्ती स्वर्गस्थान
हेच शृंगार मनाचे
कर्ण बळी परी दाता
व्हावे उदात्त गुणांचे

आंतरजातीय विवाह पद्धतीला आजही समाजात मानाचे स्थान नाही. कवीची स्वतःची एकुलती एक मुलगी आंतरजातीय विवाह करून घराबाहेर पडल्यावर कवी मनाला काय दुःख झाले असेल याची प्रचिती 'सुख लाभो तुला' ही कविता वाचतांना येते सोबतच आपल्या लेकीला आशीर्वाद देऊन संकटात सोबत असल्याची देखील ते ग्वाही देतात. 
काव्यसंग्रहातील सर्वच कविता वाचनीय आणि चिंतनीय आहेत. जास्तीत जास्त कविता अष्टाक्षरी काव्यप्रकारात लिहिलेल्या असून आशयघन आणि चिंतनीय आहेत. काव्यसंग्रहातील विठोबा, कौलारू घर, विश्वकर्मा, गुढीपाडवा, शेतकरी, महिला, भ्रूण हत्या, जन्म-मृत्यू, सैनिक,  मराठी राजभाषा, प्रतीकात्मक कविता घड्याळ, बैलगाडी, रेल्वे, पुस्तक, धावते निवास, काठी असे अनमोल, प्रेम काव्य वेड्या मनाचा फकिर, सखे तुझ्या हसण्याने व कोरोना या विषयासह राजे शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, हुतात्मा पानसरे यांच्यावर आधारित प्रासंगिक कविता देखील उत्तम आहेत. संगत प्रकाशनने संग्रहाची बांधणी उत्तम केली असून उच्च दर्जाचे कागद वापरले आहे. संतोष घोंगडे यांनी नावाला अनुसरून सुंदर मुखपृष्ठ सजविले आहे. कवीच्या मनातील काव्य शृंगार अजून असेच फुलत राहो आणि अनेक चांगल्या चांगल्या कविता वाचकांना वाचण्यास मिळो अशी यानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा .......!

काव्यसंग्रहाचे नाव - शृंगार मनाचे
कवी - पांडुरंग आडबलवाड
प्रकाशक - संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे - 136
किंमत 220 ₹

पुस्तक परिचय - 
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - काजळपाणी ( Kajalpani )

काळजाला भिडणारी गाणी काव्यसंग्रह काजळपाणी
      नाशिक येथील 'अलका कुलकर्णी' म्हणजे लेखिका कवयित्री, निवेदिका, अनुवादक , संपादिका अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. त्यांनी विविध मंचावर , आकाशवाणीवर कविता सादरीकरण तसेच विविध कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले आहे . विविध प्रकारच्या साहित्याचे संपादन केले आहे, म्हणून त्या उत्तम लेखिका देखील आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच त्यांच्या निबंध लेखन, कथालेखन, लघुकथा, ललित लेखनाला देखील पुरस्कार मिळाले आहेत. कवयित्रीचे मन निसर्ग व अध्यात्म यांच्याशी जुळलेले आहे. त्यांच्या कविता वाचताना त्यांच्या मनातील वेदना, समाजाप्रती असलेली तळमळ लक्षात येते. काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरून एक गोष्ट लक्षात येते की कवयित्री ह्या कृष्णभक्त आहेत. ह्या काव्यसंग्रहाविषयी कवयित्री आपल्या मनोगतात म्हणतात, ' मुळात काव्य, कविता हे प्रत्येकात भिनलेलं आहेच. कवितेचा छंद हाच कवितेचा प्राण असतो. कवितेची निर्मिती ही मुळी वेदनेतून होते. कविता ही आपल्या अनुभवांची सावली असते. एखादा शिल्पकार जसा ओबडधोबड पाषाणातून त्याला हवेसे नेटके शिल्प साकारतो तशीच काहीशी ही धडपड.' कवीच्या मनात कविता कशी जन्मास येते याचे सुंदर वर्णन 'जन्मते कविता ....' ह्या कवितेत केले आहे. जीवन जगताना जे अनुभव मिळतात, सुख आणि दुःख मिळतात, मनातील घुसमट, वेदना, तळमळ हे सारे शब्दात उतरतात आणि त्या शब्दाला एक वेगळा अर्थ मिळतो. आभाळात जशी वीज चमकते आणि सर्वत्र लख्ख प्रकाश पडतो, त्या प्रकाशाकडे सर्वांचे लक्ष जाते तशी कवयित्रीची कविता साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आपल्या कवितेत त्या म्हणतात,
"कधी नजाकत नक्षत्रांची, या शब्दा अर्थाना येते
चंद्र चांदणे विहंग होते, निळ्या नभी चमचमते कविता!"

      मुसळधार, संततधार तर कधी कधी रिमझिम पडणारा पाऊस श्रावण महिन्यात दिसून येतो. प्रत्येक कवी श्रावण या विषयावर कविता करतो. श्रावणाविषयी त्यांच्या मनातील भाव-भावना व्यक्त करतो. या ठिकाणी श्रावण या कवितेत कवयित्रीने देखील श्रावणाचे खूप छान वर्णन करताना श्रावणाला धरतीचा एक महत्त्वाचा सण असा उल्लेख केला आहे. कारण ही तसेच आहे याच श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, गोपाळकाला अश्या नेक सणांची रेलचेल असते. 
"श्रावण म्हणजे सण आहे हा,
अवघ्या धरतीच्या देहाचा.."

      आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच पाऊस हवाहवासा आणि आवडणारा आहे. लहान मुले तर पावसाला विनवणी करतात ' ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ' असे म्हणतात. कवयित्रीने निळ्या आभाळाला पावसाळ्यामध्ये जांभूळ रंगाची उपमा दिली आहे. पहिल्या पावसात झिम्मड भिजून जावं अशी इच्छा त्या कवितेतून व्यक्त करतात. पाऊस येण्यापूर्वी आणि पाऊस पडल्यानंतर माणसांची अवस्था, घराची स्थिती, वेली, वनस्पती, गवताचे पाते याचे सुंदर असे वर्णन करताना जांभुळल्या आभाळात ह्या कवितेतून म्हणतात की ,
      "जांभुळल्या आभाळात पावसाचं गावं
      नवथर सर येता झिम्माड भिजावं..."

     ह्या काव्यसंग्रहातील अनेक कविता गजल प्रकारातील आहेत. यावरून गजल लिहिण्यात कवयित्रीचा हातखंडा आहे असे दिसून येते. त्यांना गझल कशी सुचली याचे वर्णन करताना 'त्याचा सुंदर मिसारा होतो' ह्या कवितेत कवयित्री म्हणतात,  जीवनात अनेक वळणे आली ज्यात काही सुखाची होते तर काही दुःखाची होती . त्या सर्वच संकटाला दोन हात करण्याची शक्ती व त्यातून नवा मार्ग दाखवण्याचे काम या गजलेने केले आहे. याच गजलेने कवयित्रीचे जीवन नितांत सुंदर केले आहे.  
      कितीतरी वळणे वाटेवर, तरी पुढे चालते निरंतर
      दोन हात संकटास करण्या, मार्ग नवा दाखवी गजल ही...!

       पंढरपूरचा सावळा विठ्ठल हा प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचा दैवत आहे. वारी, वारकरी, टिळा, तुळशीमाळा, मृदंग, टाळ हे सर्व त्या सावळ्या विठ्ठलाचे प्रतीक आहेत. कवयित्रीला देखील ती सर्व प्रतीके आकर्षित करतात. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट याची उपमा ढोल ( मृदंग ) आणि टाळ यांना देऊन कवयित्री आषाढ कार्तिकी मध्ये पंढरपूरच्या वाटेवर जे चित्र दिसते ते आपल्या रचनेतून व्यक्त केले आहे. 
      'दैवत माझे ......' या कवितेत कवयित्री म्हणते,
      "ढोल ढगांचा टाळ विजांचे, सजले अंबर भक्तीने
मस्तक चरणावरती माझे, भान हरपले घोषाने"

        'मी सखी माझीच होता .....' ह्या कवितेत कवयित्रीने मनातील सल व्यक्त केली आहे. आपल्या मनातील दुःख इतरांना सांगितले तर दुःख हलके होते असे म्हणतात. पण कधी कधी आपल्या दुःखामुळे इतरांनाही दुःख होते, त्यांची चिंता वाढते. त्यापेक्षा माझ्या दुःखाची मी जर मैत्रीण झाले तर माझे एकटेपण दूर होईल असे कवयित्रीला वाटते.
       "काळजाची काळजी घेण्या कुणी आतुर झाले ,
     मी सखी माझीच होता एकटेपण दूर झाले"

दोन वर्षांपूर्वीचा कोरोनाचा काळ कोणीही विसरू शकत नाही. या कोरोनामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली, अनेक जण अनाथ झाले, मरणाची एक अनामिक भीती सर्वांच्याच मनात होती. आज आहे उद्या असेन की नाही याची शाश्वती नव्हती, अशा या विषम काळात कवयित्रीने 'आधार पुन्हा' कवितेत मनातल्या भावना सुंदररीत्या शब्दबद्ध केल्या आहेत. माणुसकी काय असते त्याची शिकवण देखील याच काळात अनुभवास मिळाले. आधार पुन्हा .... या कवितेत कवयित्री म्हणतात,
"कोप जाहला तुझा निसर्गा रौद्र रूप अवतार पुन्हा
आले वादळ सोसाट्याचे कोसळले घरदार पुन्हा"

   ‌‌     नारी म्हटले की, दासी, अबला, कोमल, कमजोर हे चित्र रेखाटले जाते. पण कवयित्रीने ह्या सर्व चित्राला दूर सारत नारीचे सुंदर चित्र निर्माण केले आहे. नारीच्या हातातील हिरव्या बांगड्या हे समृद्धीचे लेणे आहे, जे की कुटुंबाला उर्जित अवस्था देते. कुटुंबावर संस्कार करणारी, मर्यादा शिकवणारी, ओठावर हसू तसेच मृदु बोलून व्यवहार करणारी, घरात सर्वांशी प्रेमाचे नाते जीवापाड जपून, कुटुंबातील सुसंवाद वाढवणारी, ती नारी आहे असे यथार्थ सुंदर वर्णन गर्व मला मी नारी आहे ...या कवितेत केले आहे. कवयित्री म्हणतात,
"जीवन परिभाषित करणारा, प्रबंध विद्याधारी आहे,
सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे..!" 

       त्याही पुढे जाऊन 'स्त्री कुणास पुरती कळली नाही' या कवितेत झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, पौराणिक कथेतील उर्मिला, राधा, सीता, यशोधरा, गांधारी, आणि आधुनिक काळातील सावित्रीबाई फुले यांचे कार्य लोकांना कळते पण अजूनही स्त्री पूरती कळाली नाही याची खंत कवयित्री व्यक्त करते. 

        कोणालाही कळणार नाही असे हे मन आहे. मनकवड्याला दुसऱ्याच्या मनातील ओळखता येईल ही कदाचित, पण खरंच माझ्या मनात काय चाललंय ? हेच मला कधी-कधी कळत नाही असे म्हणताना कवयित्रीने आपल्या मनाला सोसाट्याचा वादळ, भिरभिरणारा वारा, चमचमणारा पारा, सागराच्या लाटा, खोल जलाशय अशा अनेक उपमा दिल्या आहेत.  
कवयित्री कृष्ण भक्त असल्याने कृष्ण आणि राधा यांच्यावर आधारित अनेक कविता या कवितासंग्रहात वाचण्यास मिळतात. कृष्णावर अनेकांचे प्रेम होते. कृष्णासारखा सखा भेटावं असे प्रत्येक स्त्रीला वाटते, तसे कवयित्रीला देखील वाटते म्हणून ते म्हणतात, 
"कृष्णासम कोणी भेटावा तोच असावा प्राणसखा
हळवे कोमल चंचल मन हे राधेसम पावन व्हावे..!"

      कवयित्री ह्या आत्माचे ऐकून लिहिणाऱ्या कवयित्री आहेत. त्यांची इच्छा आहे की, जे जे माझ्या डोळ्यांना दिसेल ते ते मी लिहिणार आहे. निसर्ग असेल, कुटुंबातील नाते असेल, आयुष्यात येणारे चढ-उतार असतील वा पशु-पक्षी या सर्व बाबींवर कवयित्री लिहीणार आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे अर्थातच याच कवितेच्या माध्यमातून कवयित्रीचे दुसरे काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होईल अशी खात्री वाचकांना येते. 
     काजळपाणी काव्यसंग्रहाला कवयित्री 'नीलम माणगावे' ह्यांची प्रस्तावना लाभली असून 'वैशाली प्रकाशन पुणे' यांनी काव्यसंग्रह प्रकाशित केले आहे. 'सौ. रूपिका पाटील' यांनी ह्या काव्यसंग्रहाचे सुंदर मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. या काव्यसंग्रहात एकूण १२४ पाने असून निसर्ग, पाऊस, श्रावण, सावळा विठ्ठल, कोरोना, आणि नववर्षं  अश्या वेगवेगळ्या विषयावरील १०२ कवितांचा हा संग्रह आहे. या पुस्तकाची किंमत १५० रुपये आहे. या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या संग्रहातील काही कवितेच्या खाली बारकोड छापलेले आहे ज्याला स्कॅन केल्यावर ती कविता युट्युबवर पाहता देखील येईल. 
     कवयित्री अलका कुलकर्णी यांच्या पुढील काव्यलेखनास मनःपूर्वक शुभेच्छा..!

पुस्तक परिचय - 
नासा येवतीकर, स्तंभलेखक , 
विषय शिक्षक कन्या शाळा 
धर्माबाद जि. नांदेड : 9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...