Thursday, 11 April 2019

रामनवमी

रघुपती राघव राजाराम

भगवान श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे व जनतेचे अधिष्ठान आहेत. पुन्हा पुन्हा ऐकू येणारी श्रीराम जय राम जय जय रामचा उदघोष याची साक्ष आहे. भारतातील ग्रामीण भागात आजही दोन व्यक्ती समोरासमोर आले की परस्परांना दोन्ही हात जोडून " रामराम " म्हणतात. यातून एक अर्थ असाही निघतो की, प्रत्येक व्यक्तीत राम वसलेला आहे. कोणत्याही सुव्यवस्थित व संपन्न राज्यव्यवस्थेसाठी रामराज्य हा शब्द पर्याय म्हणून वापरला जातो. कारण त्यांचे राज्यच होते तसे आदर्श. एखाद्या व्याधी, समस्येवर किंवा संकटावर शेवटचा उपचार म्हणजे रामबाण उपाय होय. कारण त्यांचा प्रत्येक कर्म हा जीवनातील प्रत्येक समस्येवर शेवटचा उपाय आहे. भगवान श्रीरामाचे प्रेमशासन भारतीयांच्या हृदयावर आजतागायत चालू आहे. 
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हात झाला. जेंव्हा जग आणि जीव आधि, व्याधि आणि उपाधी यात तप्त होत होते तेव्हा जगाला सुख, शांती देण्यासाठी प्रेम, पावित्र्य व  प्रसन्नतेचा हा पुंज जन्म घेतला. त्यांचा जन्माने संपूर्ण जगाला जीवन जगण्याचा आदर्श मार्ग लाभलेला आहे. श्रीरामाच्या संपूर्ण चरित्राचा अभ्यास करून एक-एक गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास रामो भुत्वा राम यजेत अर्थात राम होऊन रामाची पूजा करणे असा उजाडेल यात शंका नाही. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय या सर्वच क्षेत्रात वावरताना आपली मर्यादा कोणती ? हे कळण्यासाठी भगवान श्रीराम चरित्रांचा अभ्यास करावा. श्रीरामांनी आपल्या विचारात, विकासात किंवा व्यवहारात सर्वच कार्यात कधीही मर्यादा ओलांडली नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. आजच्या श्रीरामनवमीच्या दिवशी त्यांच्या गुणांचा परामर्श घेऊन त्याचा स्वीकार केल्यास खऱ्या अर्थाने नवमी साजरी केल्यासारखे होईल.
भगवान श्रीरामांनी आपल्या समोर एक कौटुंबिक आदर्श ठेवले आहे. रामाला दुसरे तीन बांध होते. परंतु त्यांच्यात कधीही कलह किंवा वाद झाला असे आपण कधी ऐकलेले नाही. त्यागात पुढे व भोगात मागे असा त्यांचा जीवन मंत्र होता. येथे नेहमी दुसर्‍यांचा विचार करण्यात येतो, त्यागाची तयारी ठेवण्यात येते, तेथे क्लेश, भांडण, झगडा, कलह, वाद  हे सर्व शेकडो कोस दूर रहातात. आज आपणाला या विचारांची नितांत आवश्यकता आहे. पिता राजा दशरथाने वनात जाण्याची आज्ञा दिल्यावर ते थोडेदेखील दुःखी झाले नाही वडिलांची आज्ञा पाळणे हे मुलांचे परमकर्तव्य आहे त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसणारा पुत्रच आदर्श बनू शकतो.
वृद्ध माता पित्याला सहारा देण्यात यावे असा कायदा सरकारला तयार करावा लागतो. यात आपली फार मोठी नामुष्की आहे. जिच्या वचनामुळे श्रीराम यांना वनवास भोगावा त्या कैकयी मातेवर त्यांनी कधीच राग धरला नाही. आईला समजून घेणारे पुत्र बनणे म्हणजेच तिने आपणाला जन्म देताना घेतलेल्या त्रासाची परत केलेली पावती नव्हे काय ? श्रीरामाचे तीन ही आईवर सारखेच प्रेम होते. रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवून आणल्यानंतर अयोध्या नगरीतील लोकांची कुजबुज लक्षात घेऊन श्रीरामाने आपली पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. यामागे राज्यातील लोकांचा विश्वास संपादन करणे हे राजाचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे श्रीरामाने सीतेचा त्याग केला. त्यांच्या हृदयात फक्त एकच स्त्रीसाठी जागा होती ती म्हणजे सीता. एकपत्नी निष्ठ पती राहणे म्हणजेच त्याला सितापती म्हटले जाते. आज भारतात जो अनैतिक किंवा अत्याचार बोकाळला आहे त्यावर सितापती हा पर्याय सर्वोत्तम आहे, असे वाटते. 
ऋषी विश्वामित्र हे श्रीरामाचे गुरू होते. विश्वामित्रांचे श्रीरामावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा जास्त श्रीरामाचे विश्वामित्रावर होते. आश्रमात एक हृदय दुसऱ्या हृदयाशी बोलत होते. विश्वामित्रांनी श्रीरामांना धनुर्विद्येसोबत जीवन जगण्याचा आदर्श मार्ग सुद्धा नकळत शिकविले. श्रीरामाच्या गुरुभक्तीमुळे व गुरुवर असलेल्या अपार श्रद्धेमुळे त्यांना ऋषींनी जगातील सर्व ज्ञान दिले. गुरुविना जीवन नाही आणि गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. याची जाणीव त्यांच्या चरित्राच्या अभ्यासावरून होते. कष्किंध्येच्या असुरी व जुलमी वाली वानराला मारून श्रीरामाने सुग्रीवाचे मन जिंकले आणि सुग्रीवाने लंकेतील सीतेला सोडविण्यात श्रीरामाला सर्वतोपरी मदत करून मैत्री कायम केली. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे त्यांचे कार्य होते. संकटात मदत केलेला मित्रच खरा मित्र म्हणून ओळखला जातो. रावण हा रामाचा शत्रू होता. त्यांच्या निधनानंतर बिभीषण अग्निसंस्कार करण्यास नकार देतो त्यावेळी स्वतः श्रीराम हे काम करण्यास पुढे येतात यातून त्यांचे शत्रूवर असलेले प्रेम ही कळते. कष्किंध व लंका राज्य जिंकून त्यांनी आपले साम्राज्य वाढविले नाही. याउलट ते दान करून तेथील लोकांचे मन जिंकले. दुसऱ्याची वस्तू घेण्याने त्याच्यात प्रेम तर राहणारच नाही उलट वितुष्ट निर्माण होते. भगवान श्रीरामाच्या अंगी असलेल्या मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, शत्रूप्रेम, मित्रप्रेम, पत्नीप्रेम, राज्यप्रेम, जनप्रेम, आणि गुरूप्रेम या नऊ गुणांचा जीवन जगतांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास पृथ्वीतलावर असलेले दुःख, क्लेश, तणाव नक्की नाहीशे होतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी सुद्धा जनतेला रामाच्या जीवनाचे पालन करण्यास सांगितले होते. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम ह्या त्यांच्या धूनमुळे संपूर्ण वातावरण मंगलमय होऊन जाते. श्रीरामनवमीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
(लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Monday, 8 April 2019

IPL

आय पी एल मुळे ........

सन 2007 मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग नावाची टी20 क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून क्रिकेट विश्वात खूप मोठा उलाढाल चालू झालंय. भारतीय क्रिकेट संघात संपूर्ण देशातील इन मिन 15 ते 20 खेळाडू समाविष्ट व्हायचे. काही जणांकडे क्षमता असून देखील ते आपली।प्रतिभा जगाला दाखविण्यापासून वंचित राहायचे. काही नशीबवान खेळाडू संघात निवडले जायचे तर काही जणांची आयुरसिमा संपून जायची, प्रतीक्षा करून करून शेवटी ते एखाद्या अकॅडमी चे कोच व्हायचे इतकी दयनीय अवस्था या खेळातील खेळाडूची होती. पण आय पी एल।ला सुरुवात झाली आणि भारतातील अनेक खेळाडू ना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळू लागली. त्याच सोबत रग्गड पैसा देखील मिळू लागला. आय पी एल मुळे हा एकच काय तो स्पष्ट दिसणारा फायदा आहे मात्र याच आयपीएल मुळे इकडे देशातील नवयुवक आणि काही मंडळी वाम मार्गाला लागत आहे याकडे दुर्लक्षून चालणार नाही.
क्रिकेट आणि मॅच फिक्सिंग हे एकाच नाण्यांचे दोन बाजू आहेत. फार पूर्वी खेडेगावात कुस्तीचे खेळ व्हायचे. कुस्ती खेळणाऱ्या दोन पहिलवान विषयी लोकं पैजा लावायचे. कोण जिंकणार ? यावर पैज लावण्याची ही जुनी पद्धत हळूहळू क्रिकेट मध्ये स्थिरावली. अगदी सुरुवातीला सामना कोण जिंकणार कोण हरणार यावर पैज म्हणजे सट्टा लावले जाऊ लागले. याच सट्टापायी भारताचा माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार स्व. हनसी क्रोनिए यांना संघातून बाहेर व्हावे लागले होते. पूर्ण सामन्यावर तेंव्हा सट्टा लावले जायचे. हे सामने वर्षातून काही ठराविक वेळेतच व्हायचे. पण आय पी एल ने मात्र रोजच सामना आणि रोजच सट्टा सुरू केला आहे. टॉस कोण जिंकते ? पहिल्या सहा, दहा आणि शेवटच्या चार षटकात किती धावा निघतील ? यावर आजकाल पैजा म्हणजे सट्टा लावल्या जात आहे. याचे लोण आता घरात येऊन पोहोचले आहे. घरातील लहान मुलांना आय पी एल एक मनोरंजनाचे साधन तर झालेच शिवाय  घरातल्या घरात साध्या साध्या गोष्टी लक्षात धरून पैजा लावल्या जात आहेत. एका घरात दोघे भाऊ राहत असतील तर तू कोणाकडून आणि मी कोणाकडून अशी भाषा ऐकायला मिळत आहे. मनोरंजनाच्या नावाखाली आय पी एल ने भारताची संस्कृती देखील बिघडवून टाकते की काय अशी अनामिक भीती देखील वाटत आहे. एखादा युवक सट्टा मध्ये हजार एक रुपये जिंकला की मित्रांमध्ये त्यांची पार्टी आयोजित केल्या जात आहे. त्यात मग दारू सिगारेट आणि इतर काही व्यसनांचा शिरकाव त्यांच्या जीवनात नकळत होत आहे. या दोन महिन्यात लागलेली सवय नंतरच्या दहा महिन्यात त्यास स्वस्थ बसू देत नाही आणि विचार ही करू शकत नाही या स्थितीच्या पलीकडे त्याचे जीवन होते. आय पी एल ने देशातील चाळीस खेळाडूना आपली प्रतिभा दाखवायला संधी दिली हे सत्य जरी वाटत असले तरी शेकडो युवक मात्र या खेळावर पैजा लावून देशोधडीला जात आहेत, हे ही सत्य नाकारून चालणार नाही. रोजच्या या खेळांमुळे देशातील कोणकोणत्या बाबीचा अपव्यय होत आहे त्याचा विचार केला तर खूप मोठी यादी तयार होईल. एकीकडे कोरडा दुष्काळ असून लोकांना घोटभर पिण्यासाठी पाणी नाही. हंडाभर पाणी घेण्यासाठी कोसो मैल दूर पायी जावे लागते आणि इथे आय पी एल सामन्याच्यासाठी मैदान तयार करतांना किती तरी लीटर पाणी जमिनीवर ओतावे लागते. किती तरी विद्युत खर्च केला जातो. प्रत्येक खेळाडूसारखे आपण दिसावं म्हणून मुले त्यांच्या प्रमाणे हेअर स्टाईल करण्याच्या फंदात पडतात. मुलांच्या ऐन परीक्षेच्या तोंडावरच या स्पर्धेची सुरुवात होते. त्यामुळे मुलांचे अर्धे लक्ष परीक्षेत तर अर्धे लक्ष क्रिकेटच्या स्पर्धेकडे असते. खेळ हे मनोरंजन म्हणून जितका वेळ असेल तितका वेळ खूप छान असतो पण तोच खेळ स्पर्धेच्या रुपात उतरतो ना तेंव्हा खूपच घातक ठरत जातो. आय पी एलची स्पर्धा बंद करा असे ओरडून सांगून काही फायदा नाही फक्त आपली मुलं या खेळापासून जास्तीत जास्त दूर कसे राहतील याचा प्रत्येकांनी विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Tuesday, 26 March 2019

उन्हाळ्यात घेऊ या काळजी

उन्हाळ्यात घेऊ या काळजी

जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या रायगड जिल्ह्यातील भिरा येथे नुकतेच 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८ ते ४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक शाळांनी तयार करावे. काही दिवसांत शाळेतील परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. उन्हाचा त्रास सहन करण्यापेक्षा त्याची काळजी घेतलेली केव्हाही बरे. म्हणून आपण ही काळजी घ्या आणि इतरांना काळजी घ्यायला सांगू या.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक, धर्माबाद

Thursday, 21 March 2019

जलसाक्षरता

 जलसाक्षरता : काळाची गरज

मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ? याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच. वास्तविक पाहता प्रयोगशाळेतून पाणी म्हणजे H2O हायड्रोजन डाय-ऑक्साइड तयार करणे फार खर्चिक आणि जिकरीचे काम आहे. त्याद्वारे तयार करण्यात आलेले पाणी आपण वापरू ही शकत नाही, त्यास्तव आपण त्या भानगडीत सुद्धा पडत नाही. कारण पृथ्वीवर जमीन कमी म्हणजे 29% तर पाण्याचा भाग जास्त म्हणजे 71% हे आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पृथ्वीला निलग्रह असेसुद्धा म्हटले जाते. त्यामुळे आपल्याकडे निसर्गतःच पाणी भरपूर आहे अशी समाजाची धारणा होती. त्याचा परिणाम असा झाला की, उपलब्ध पाणीसाठा किती आहे व ते किती महत्त्वाचे आहे याचा विचार करणे माणसाने सोडून दिले. पाण्यापासून पैसा तयार करण्याच्या मानवाच्या अति स्वार्थी स्वभावामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी व विकासासाठी पाण्याचा पुरेपूर किंवा त्यापेक्षा जास्त वापर करून आज पाणीटंचाई सारख्या भीषण समस्येच्या गर्तेत अडकून पडला आहे. 
आदिमानव किंवा आपले पूर्वज पाण्याचे महत्व ओळखून होते. म्हणूनच त्यांच्या वस्त्या ह्या नदीच्या काठावर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी आढळून आल्या आहेत. पाण्याचा वापर करून शेती करता येते याची जाणीव सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पाण्यामुळे अन्न मिळू लागले याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाल्यावर त्यांनी पाण्याला पंचमहाभूतात समाविष्ट केले. पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर येतो हे समजल्यावर पाऊस व त्या पावसाची निर्मिती करणारा समुद्र यांना त्यांनी देवत्व बहाल केले. संगणक युगातील पिढी या लोकांना अशा वागण्यामुळे मूर्खात काढतील कदाचित परंतु त्यांच्या मनात भीती होती आपण निसर्गाचे नियम तोडले तर तो कदाचित आपणाला शिक्षा देऊ शकतो. भीतीपोटी तो निसर्गाने तयार केलेले नियम तोडत नव्हता आणि पर्यावरण संतुलित राहून त्याचा समतोल कधी बिघडत नव्हता. परंतु आज आपण सजग, जागरूक, सज्ञान झालो आहोत म्हणून वरील गोष्टी काही मानत नाही. मात्र आपण जलसाक्षर झालो नाही. लिहिता वाचता यावे म्हणून साक्षर झालो खरे परंतु पाण्याची चणचण तुटवडा यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
एका वर्षातून पावसाचे चार महिने ठरलेले असतात. त्या पर्जन्याच्या काळात योग्य प्रमाणात पाऊस झाला तर त्यावर्षी कोणत्याच बाबींची चणचण भासत नाही. मात्र तसे होत नाही. पावसाची वेळ, त्याचा वेग आणि त्याचे प्रमाण याबद्दल काही अंदाज व्यक्त करणे फारच कठीण आहे. हवामान तज्ज्ञ दरवर्षी पावसाचा आपला अंदाज व्यक्त करतात. मात्र त्या प्रमाणात पाऊस पडतोच असे नाही. त्याच्याबाबतीत वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे. कधीकधी वर्षभराचा पाऊस एका महिन्यात तर कधीकधी एका महिन्याचा पाऊस एका दिवसात पडतो. पाऊस जास्त पडला तर अतिवृष्टी आणि कमी पडला तर अनावृष्टी यासारखी नैसर्गिक संकट ओढावू शकतात. पावसाचे पडलेले पाणी वाहून जाणे आणि पाण्याचा वाटेल तसा वापर करणे यामुळे पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. म्हणूनच निसर्गतः आपणास प्राप्त झालेले पाण्याचे स्तोत्र जपून वापरणे, पावसाचे पडलेले पाणी साठवून ठेवणे, दैनंदिन जीवनात पाण्याचा योग्य व जपून वापर करणे या गोष्टीबाबत सजगता निर्माण करण्यासाठी जलसाक्षरतेची अत्यंत आवश्यकता आहे.
जलसाक्षरता म्हणजे फार मोठे काम नाही. परंतु लहान-सहान गोष्टीकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाणी कसे वाचविता येईल किंवा बचत करता येईल ? याचा विचार करणे म्हणजे जलसाक्षरता म्हणता येईल. घरात असलेले नळ तर आपण वेळोवेळी तपासणी करतो परंतु नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमार्फत जे पाणी आपण नळाद्वारे घेतो त्याची वेळोवेळी तपासणी करावी. बहुतांशी ठिकाणी हे नळ उघडेच राहतात. त्याला चालू बंद करायची तोटी नसते त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या गावाला जातो त्यावेळी या नळाद्वारे भरपूर पाणी वाया जाते. ते पाणी तोटी लावून वाचविता येऊ शकते याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा. सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ चालू असेल तर लगेच ते बंद करण्याची काळजी आपण घ्यावी. दररोज सकाळी दात घासताना, दाढी करताना, हात-पाय धुते वेळेस नळ चालू करून भरपूर पाणी वापरण्याची प्रथा आपण बंद करावी व कमीत कमी पाण्यात उपरोक्त क्रिया करावी. यामुळे पाण्याची बचत होईल. मोटार चालू करून वाहने धुण्याची बऱ्याच लोकांची सवय असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी बकेटभर पाणी घेऊन स्पंजद्वारे गाडी पुसल्यास पाणी कमी लागेल आणि गाडी साफ ही होईल. पाण्याची टाकी पूर्ण भरल्यानंतर ओवरलोड साठी एक पाइप बाहेर काढल्या जाते. त्याद्वारे जास्त पाणी बाहेर येणार नाही याची काळजी नेहमी घेणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा आपण पाण्याची टाकी भरण्यासाठी मोटार चालू करतो आणि टाकी भरून पाणी उलटून जाते तरी आपले लक्ष राहत नाही. त्यामुळे बरेच पाणी वाया जाऊ शकते. या सर्व बाबीसाठी घरातील महिलांना सजग करणे गरजेचे आहे. पाण्याची अत्यंत आवश्यकता त्यांनाच असते व त्याची काळजी सुद्धा सर्वात जास्त त्यांनीच घेणे आवश्यक आहे.
घरात पाहुणे मंडळी आली असता त्यांना ग्लास भरून पाणी न देता अर्धा ग्लास भरलेले पाणी द्यावे. ज्यामुळे त्यांना आवश्यक असल्यास पाहुणे अजून पाणी मागतील किंवा कमी पाणी दिल्यास तेवढे संपवतील. परंतु आपण या छोट्या बाबीचा विचार ही सहसा करत नाही. पाहुणे मंडळी सुद्धा आपली तहान लक्षात घेऊन विचार करावा अन्यथा " नको " म्हटलेले केव्हाही चांगले. त्यामुळे पाण्याची नक्कीच बचत होईल. आपल्या घरात पिण्यासाठी किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन भाडे भरून घ्यावे. पाणी कधीही शिळे होत नसते याची जाणीव सर्वप्रथम महिलांनी करून घेऊन पाण्याची भांडी रोज ओतून देऊ नये. भाजी किंवा फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी परसबागेतील किंवा कुंडीतील झाडाना टाकणे आवश्यक आहे. घरातील सांडपाणी सुद्धा बागेसाठी वापरावे यामुळे बागेला स्वतंत्रपणे पाणी देण्याची आवश्यकता रहात नाही. झाडांना किंवा शेतात पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे कमी पाण्यावर उत्तम शेती होईलच शिवाय त्या पिकांना मुळापर्यंत पाणी जाऊन त्याची योग्य वाढ होईल. याउपर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पडणारे पाणी साठवणे व त्याचा वापर करणे. आपण या पावसाच्या पाण्याचा शेती वगळता त्याचा काहीही उपयोग करून घेत नाही. दरवर्षी पावसाचे पडणारे कितीतरी पाणी वाहून जाते. त्याची साठवणूक कशी व कोठे करावे आणि त्याचा वापर नंतर कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे आपणास ते पाणी साठविता येत नाही. राज्यातील राळेगणसिद्धी येथे मा. अण्णा हजारे यांनी पावसाचे पाणी वापरून त्या गावाला कसे नंदनवन केले हे प्रत्यक्षात या गावाला भेट दिल्याशिवाय कळणार नाही. व्यक्ती अनुभवातून बरेच काही शिकतो त्यासाठी हिवरेबाजारचे आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार यांना भेटून ही माहिती मिळवू शकतो. रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिमद्वारे आपण पावसाचे पाणी जमिनीत मुरवू शकतो किंवा भांड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा करून त्याचा वापर करू शकतो. अशाप्रकारे फार लहान लहान घटनांमधून पाणी वाचविता येऊ शकते. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीप्रमाणे एखादी क्रिया करताना ती लहान वाटते परंतु काही काळानंतर मोठ्या स्वरूपात दिसून येते. त्याच तो प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून उद्यासाठी पाणी।हवे असेल तर आज आणि आजच ते पाणी वाचवावे लागेल हे घोषवाक्य नेहमी लक्षात ठेवावे. संत रामदास महाराजांनी म्हटल्याप्रमाणे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार आपण सर्वांनी पाण्यासाठी हे काम केले पाहिजे. सध्या राज्यात पाणीदार गावासाठी वॉटरकप स्पर्धा चालू आहे. राजीव तिडके नावाच्या एका शिक्षकाने यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केलाय हे खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे. अश्या कार्यासाठी प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेमधून देखील पाण्याचे बचत आणि वापर करता येऊ शकतो. या योजनेमुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्ता खरी गरज आहे हे होऊ शकते असे  प्रत्येकाच्या इच्छा शक्तीची. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Sunday, 17 March 2019

होळी स्पेशल

पळस, होळी आणि धुलिवंदन

होळीची चाहूल म्हणजे आजूबाजूच्या परिसरात फुललेला पळस. पळसाची फुले आपल्या विशिष्ट रंगामुळे सर्वाना आकर्षित करत असतात. मराठी वर्षातील शेवटच्या फाल्गुन महिन्याला सुरुवात झाली की शेतात आणि जंगलात पळसाच्या झाडाला अनेक फुले दिसू लागतात. असे म्हटले जाते की पूर्वीच्या काळातील माणसे ही पळसाची फुले एकत्र करून त्याचा रंग तयार करीत असत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर हा रंग टाकून धुलीवंदनाचा सण साजरा करीत. परंतु काळ बदलत गेला तसा लोकांच्या सण साजरा करण्याच्या पद्धती देखील बदलत गेल्या. आज या पळसाच्या फुलांकडे लोकांचे फक्त लक्ष जात आहे मात्र त्याचा रंग म्हणून कोणी वापर करत नाहीत. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध रंगाचा वापर आज केल्या जात आहे, ज्यामुळे अनेकांना त्वचारोग होण्याचा धोका देखील संभवत असतो. काही महाभाग मंडळी वोर्निश कलर ही वापरतात. ज्यामुळे खूप त्रास होतो. मित्रा-मित्रात हा खेळ खेळताना कोण कशाचा वापर करेल हे सांगता येत नाही. एकमेकांवर अंडे फोडण्याचे प्रकार देखील काही ठिकाणी होतात. अंड्याच्या उग्र वासामुळे रंगाचा खेळ बेरंग होऊ शकतो. म्हणून सर्व बाबी लक्षात घेऊन नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमीचा सण साजरा केल्यास ते सर्वासाठी सोईस्कर होईल. 

सायंकाळच्या कातरवेळी
शेतात करूया मुक्त विहार
रखरखत्या वातावरणात
पाहू पळस फुलांचा बहार

*झजरी दादा, झजरी दादा*

फाल्गुन महीना सुरु झाला की आमच्या बच्चे कंपनीला खुप आनंद व्हायचा कारण सर्वात आवडणारा आमचा होळीचा सण जवळ आलेला असायचा. होळीच्या पंधरा दिवासपूर्वीच आम्हाला वेध लागायाचे. तीन चार मित्र मिळून एक गट केल्या जायचे. सुताराजवळ जाऊन दोन छान लाकडे तासुन घ्यायचे, ज्यास आज टिपरी म्हणतात हे कळले. ते दोन लाकडे एकमेकावर आपटून प्रत्येकाच्या घरा समोर जाऊन *झजरी दादा, झजरी दादा* हे गीत म्हणून खांद्यावर असलेल्या झोळीमध्ये घरातील माई, ताई, अक्का वाटीभर ज्वारी टाकायचे. हे दिवस म्हणजे प्रत्येकांच्या घरी शेतातून ज्वारी आलेली असायची त्यामुळे ज्वारी देताना कोणी कुरकुर करायचे नाही. जर कोणी दान दिले नाही तर त्यांच्या नावाने बोंबा मारुन पुढे जायचो. असे आम्ही रोज पंधरा दिवसात पूर्ण गाव पिंजुन काढायचो. जवळपास एक-दीड पायली ज्वारी जमा व्हायची. ते सर्व ज्वारी दुकानात विकून मिळालेल्या पैश्यात खोबऱ्याचे व साखरचे हार प्रत्येकाला एक-एक मिळेल असे घ्यायचो आणि उरलेल्या पैश्यात रंग घेत असू. होळीच्या सायंकाळी आम्ही सर्व मित्र मारोतीच्या पाराजवळ जेथे होळी तयार केलेली असायची तेथे जमा व्हायचो. वेगवेगळ्या नावाने मग बोंबा मारायचो. गावातील मानकरी वाजत गाजत येऊन होळी पेटवायचा. आम्ही होळीतील जाळ घरी नेऊन छोटी होळी करायचे आणि त्यात खोबरा व हरभरा भाजून खायचो. मग रात्री जेवताना पूरणपोळी आणि कढीची मजा काही औरच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाटच पाहत असू. सकाळपासून मग मित्रामध्ये रंग खेळण्याची मजा यायची. कोणी कोणास ओळखू येणार नाही एवढा रंग लावले जायचे. दुपारपर्यंत रंग खेळून झाल्यावर स्नान करून मग घरातच बसायचो. आज परत ते सर्व दिवस आठवू लागले. ते मित्र परत दिसू लागले. परत एकदा छोटे व्हावे आणि खुप मजा करावे असे वाटते.

धुलिवंदन

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. मनातील राग, द्वेष इत्यादी भावनाना मोकळी वाट करून देण्यासाठी हा सण अत्याधिक महत्वाचा आहे. एकीकडे मुले रंगात न्हाऊन निघतात तर याच दिवशी कुमारिका मुली प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवाळणी करतात आणि त्यांच्याकडून भेट म्हणून धान्य किंवा पैसे घेतात. घरात काम करणारे जे काही कामगार मंडळी असतात ते देखील खुशाली मागतात आणि घरधनी त्यांना खुशाली देऊन खुश करतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. 

दरवेळी सण येतात नि जातात
एकमेकांत प्रेम निर्माण करतात
सणाचे महत्व समजून घेतले तर
प्रत्येक सण सदा आनंदच देतात.

आपली आठवण अशीच येत राहो, मित्रांनो आपणा सर्वाना होळी आणि धूलिवंदनच्या रंगबिरंगी शुभेच्छा.

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...