Tuesday, 23 June 2026

पुस्तक परिचय - माय माती अन ती ( Book Review )

मातीशी नाळ जुळलेला काळजाचा ठाव घेणारा कवी अनिकेत देशमुख यांचा कवितासंग्रह " माय माती अन् ती "
उच्चविद्याविभूषित असलेल्या व कवी निवेदक म्हणून सर्वदूर सुपरिचित असलेल्या कवी अनिकेत देशमुख यांचा नुकताच प्रकाशित झालेला दुसरा काव्यसंग्रह "माय माती अन् ती" वाचण्यात आला. याआधी त्यांचा "पाऊलखुणा" नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला असून वाचकांनी त्यास खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अनिकेत देशमुख हे साहित्यिक जगतातलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून अनेकांना सुपरिचित आहेत. अनिकेत देशमुख एक विद्यार्थीप्रिय नवोपक्रमशील आदर्श शिक्षक आहेत. ते एक युवा कवी, बहारदार निवेदक व उत्कृष्ट सुत्रसंचालनकर्ते आहेत. त्याचबरोबर ते एक नम्र, मितभाषी व प्रतिभावंत कवी साहित्यिक आहेत. त्यांची कविता त्यांच्यासारखीच साधी, सरळ, सोपी, नितळ, लयदार, कसदार, मातीशी नाळ जोडणारी आहे. हा काव्यसंग्रह काव्यरसिक वाचकांच्या काळजाचा ठाव घेणारा काव्यसंग्रह आहे. काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर असलेली युवा कादंबरीकार पुष्पराजदादा गावंडे माजी सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांची पाठराखण या कवीला व या काव्यसंग्रहाला समर्पक अशी आहे.
 या काव्यसंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत लोककवी प्रा.प्रशांतदादा मोरे यांनी चिंतनात्मक व अभ्यासपूर्ण स्वरूपात लिहिलेली  "सृजनाची गाथा- माय माती अन् ती" ही प्रस्तावना वाचनीय आहे त्याचबरोबर काव्यसंग्रहाची महती वाढविणारी आहे. त्याचबरोबर कविता कशी असावी हे अत्यंत साध्या व सोप्या शब्दात आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख यांनी मांडले आहे. त्यांनी कवी अनिकेत देशमुख यांच्या कवितेची वाट प्रसिद्ध लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या वाटेवर जाणारी कविता असा महत्त्वाचा उल्लेख केला आहे. जो महत्त्वाचा आहे.
माय, माती अन् ती म्हणजे लेखणी  या तिन्ही एकमेकांशी अतूट नात्याने जोडलेल्या आहेत. माय माणसाला जन्म देते, प्रेम, माया आणि संस्कार देते. माती माणसाला अन्न, आधार आणि ओळख देते. तर लेखणी या दोन्हींचे महत्त्व, त्याग, वेदना आणि गौरव शब्दरूपाने समाजासमोर मांडते. त्याचबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी "ती " आपल्याला वेगवेगळ्या रूपात या काव्यसंग्रहात भेटत राहते वाचकांशी हितगुज करते. हे या काव्यसंग्रहाचे वेगळेपण आहे.
आईच्या मायेतून आणि मातीच्या सहवासातून माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते. या अनुभवांमधूनच लेखक किंवा कवीला प्रेरणा मिळते आणि त्याची लेखणी सशक्त बनते. लेखणी माय आणि मातीचे ऋण व्यक्त करण्याचे कार्य करते. त्यामुळे माय, माती आणि लेखणी या तिन्ही मानवी जीवनाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. या कवितासंग्रहात एकूण ५७ कविता असून त्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आधारित रचना आहेत. 
आपल्या पहिल्याच माय कवितेत कवी म्हणतात, 
धग इस्तवाची सोसे
 माय थापते भाकर
 मायासाठी 'कोहिनूर'
 तिच्या हाताची बिल्लोर
अर्थात आई आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट घेते, याचे सुंदर वर्णन या ओळींमध्ये केले आहे. चुलीतील जळत्या आगीची धग सहन करून आई प्रेमाने भाकरी थापते. तिच्या कष्टांमागे केवळ कर्तव्य नसून अपार माया आणि त्याग दडलेला असतो. आईच्या हातची भाकरी ही अतिशय चविष्ट आणि अमूल्य असते. म्हणूनच कवीने आईच्या हातच्या बिल्लोर म्हणजेच बांगडीची तुलना जगातील सर्वात मौल्यवान 'कोहिनूर' हिऱ्याशी केली आहे. आईचे प्रेम, त्याग आणि तिच्या हातच्या अन्नाची गोडी ही अनमोल असल्याचा संदेश या ओळींतून व्यक्त होतो.
आनंदसरी कवितेत कवी एका ठिकाणी म्हणतो, 
घाम रक्ताचं बियाणं
बळी पेरतो मातीत 
खरा पाऊस कळतो 
शेतकऱ्याच्या जातीत 
अर्थात शेतकरी आपल्या शेतात पीक घेण्यासाठी खूप मेहनत करतो. तो जणू स्वतःच्या घामाचे आणि रक्ताचेच बियाणे मातीत पेरत असतो, म्हणजेच शेतीसाठी तो अथक परिश्रम करतो. पाऊस वेळेवर पडणे किंवा न पडणे याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यावर होतो. त्यामुळे पावसाचे खरे महत्त्व, त्याची किंमत आणि त्याची प्रतीक्षा काय असते, हे शेतकऱ्यालाच सर्वाधिक जाणवते. या ओळींतून शेतकऱ्याचे कष्ट, त्याचे निसर्गावर असलेले अवलंबित्व आणि पावसाशी असलेले त्याचे अतूट नाते व्यक्त झाले आहे. 
दुःख वावराचे, साहेब आणि वांझ या कवितेतून कवीने शेतकऱ्याचे कष्ट आणि दुःख वाचकासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
घाबरायचं नाही या लयबद्ध असलेल्या कवितेत कवी म्हणतो 
कृषीप्रधान देशातून दिसेनाशी होईल माती
सिमेंटच्या जंगलात अमली पदार्थांच्या राती
जुलमी कपटी धोरणास या गाडायाचं हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय...
अर्थात भारत हा कृषीप्रधान देश असला तरी आज वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि चुकीच्या धोरणांमुळे सुपीक जमीन नष्ट होत चालली आहे. शेतीची जमीन कमी होऊन तिच्या जागी सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. त्यामुळे समाजात अनेक सामाजिक समस्या, विशेषतः अमली पदार्थांचे वाढते प्रमाण, निर्माण होत आहे. या परिस्थितीस कारणीभूत असलेल्या अन्यायकारक व कपटी धोरणांविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे. हा बुलंद आवाज या काव्यसंग्रहातून मांडला आहे.
कवी वरील ओळींतून निराश न होता संकटांवर मात करण्याचा संदेश देतो. जरी परिस्थिती प्रतिकूल असली, तरी राखेतून पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभे राहून नव्या जोमाने प्रगती करावी, असे तो सांगतो. कोणत्याही संकटाला घाबरून न जाता धैर्याने आणि जिद्दीने त्याचा सामना करण्याचे आवाहन या कवितेतून करण्यात आले आहे.
अनेक कवी संमेलन गाजविलेले कवी अनिकेत देशमुख यांची स्वतःची आवडती कविता म्हणजे 
नांगराचा फाळ असते कविता
भजनातील टाळ असते कविता
काळ्या आईला हसवणारं
काळंकुट्ट आभाळ असते कविता
ही कविता वाचकाच्या मनात रुंजी घालत राहते.
शहरात होणारी घुसमट कवी आपल्या कवितेत मांडताना लिहितो
चाल दोस्ता आतातरी जाऊ आपल्या गावा
माणसं यंत्र झालीत अन् जहरी झालीय हवा
या कवितेतून कवीला सांगायचे आहे की, आधुनिक जीवनात माणसे अत्यंत व्यस्त आणि यांत्रिक झाली आहेत. शहरातील धकाधकीच्या जीवनात माणसांमधील प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी कमी होत चालली आहे. तसेच प्रदूषणामुळे वातावरणही दूषित झाले आहे. त्यामुळे कवी आपल्या मित्राला म्हणतो की, आता तरी आपण आपल्या गावाकडे जाऊया. गावातील निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि माणसांमधील जिव्हाळा यामुळे मनाला शांतता आणि समाधान मिळेल. या ओळींतून शहरी जीवनातील कृत्रिमता आणि ग्रामीण जीवनातील साधेपणा, माणुसकी व निसर्गप्रेम यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
बघा एवढं करता आलं तर , साहेब, ओल आणि मढं या कवितेतून सध्याच्या व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.
 कवी शोकांतिका या कवितेतून जो शोक व्यक्त करत आहे, तो सर्वांनाच असायला हवा, ते म्हणतात, 
कुपोषणानं दरवर्षी इथं 
हजारो जीव मरतात 
मंदिरांना कळस मात्र 
दररोज सोन्याचे चढतात !
अर्थात समाजातील विषमता आणि संवेदनाहीनता यांवर या ओळींतून भाष्य करण्यात आले आहे. आपल्या देशात आजही अनेक गरीब, उपेक्षित आणि लहान मुले कुपोषणामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडतात. त्यांना अन्न, औषधे आणि मूलभूत सुविधा मिळत नाहीत. दुसरीकडे, मंदिरांवर मात्र मोठ्या प्रमाणात सोन्याचे कळस चढवले जातात आणि भरपूर पैसा खर्च केला जातो. कवी या विरोधाभासाकडे लक्ष वेधून समाजाला विचार करण्यास भाग पाडतो की, धार्मिक कार्यांवर खर्च करण्याबरोबरच गरजू, भुकेल्या आणि कुपोषित लोकांच्या मदतीसाठीही पुढे आले पाहिजे. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा संदेश या ओळींतून व्यक्त होतो.
चाटा कवितेतून कवी सध्याच्या राजकीय परिस्थितीचे वास्तव चित्रण केले आहे. कार्यकर्ते सतरंजी उचलण्यात अर्धे आयुष्य वाया घालवितातत आणि नेते मंडळी आपला वारसा म्हणून घरातील सदस्यांना पुढं आणतात. हे चित्र कुठं तरी बदलायला हवं. हा विचार कवी अनिकेत देशमुख यांची सशक्त कविता मांडते.
"बापू" या कवितेतून कवी बापूंनी दिलेली खेड्याकडे चला ही हाक आठवण करून देतात तसेच आज बापूजीच्या स्वप्नातील भारत हरवला असल्याची खंत देखील व्यक्त करतात. आपल्या कवितेत ते म्हणतात, 
आता हिम्मत नाही कुणातच बापू 
'चले जाव' म्हणायची 
इथं प्रत्येकालाच घाई 
चरख्याजवळ सेल्फी काढायची !!
या ओळींतून कवीने आजच्या समाजातील दिखाऊपणा आणि महात्मा गांधी यांच्या विचारांपासून दूर गेलेल्या समाजाचे वास्तव चित्रण मांडले आहे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी दिलेल्या 'चले जाव' (भारत छोडो) आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन लोकांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. परंतु आजच्या काळात अन्याय, भ्रष्टाचार आणि सामाजिक समस्यांविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य अनेकांमध्ये दिसत नाही.
लोक गांधीजींच्या विचारांचे आचरण करण्याऐवजी त्यांच्या स्मृतीचिन्हांजवळ, जसे की चरख्याजवळ, केवळ सेल्फी काढण्यात आणि दिखावा करण्यात अधिक रस घेतात. म्हणजेच, गांधीजींच्या तत्त्वांचा स्वीकार करण्याऐवजी त्यांचे केवळ बाह्य प्रदर्शन केले जाते. या ओळींतून कवीने समाजाला गांधीजींचे विचार प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचा आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान राजीव गांधी, देशाचे वीर सैनिक जवान, बळीराजा यांची महती सांगणाऱ्या या काव्यसंग्रहातील कविता देखील वाचनीय आहेत. 
पुस्तकाचे शीर्षक असलेल्या कवितेत कवी म्हणतो, 
माय, माती नि मातृभाषा
असतात जन्मांच्या सोबती
 शब्दांमध्ये कशी वर्णावी
 तिन्हींची महती
अर्थात आई, मातृभूमी आणि मातृभाषा या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. जन्मापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत या तिन्ही गोष्टी माणसाच्या सोबत असतात. आई आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देते; माती म्हणजे मातृभूमी आपल्याला ओळख, संस्कृती आणि अस्तित्व देते; तर मातृभाषा आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनते.
या तिन्हींचे महत्त्व इतके महान आणि अमूल्य आहे की, ते केवळ शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. कवी या ओळींतून आई, मातृभूमी आणि मातृभाषा यांच्याप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. या कवितेतून कवी मराठी भाषेची होणारी गळचेपी वाचकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
एकंदरीत हा काव्यसंग्रह म्हणजे आपल्याला जन्म देणाऱ्या आई विषयी, आपल्या मायभूमी विषयी, देशाविषयी, सर्वांचं पालनपोषण करणारा तारणहार बळीराजा, देशाचा संरक्षक सीमेवरचा जवान या सर्वांविषयी प्रत्येकाच्या मनात अभिमान तयार करणारा आहे. कवी विदर्भातील असल्याने काही शब्द वैदर्भीय वाटतात. मात्र भाषा साधी, सरळ आणि सोपी आहे. त्यामुळे ही कविता वाचकाला आपली वाटते आणि त्याच्या मनाला साद घालते हे या काव्यसंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत समर्पक असे आहे. अक्षरशिल्प प्रकाशन अमरावती कडून हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आलेला आहे. पुस्तकाची बांधणी, भाषा, अंतरंग, मुखपृष्ठ, मलपृष्ठ एकंदरीत सर्वच अत्यंत दर्जेदार झाले आहे. वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येक रसिक वाचकांनी हा काव्यसंग्रह विकत घेऊन वाचावा असा आहे.
आपल्या बहारदार निवेदनासाठी आणि वेगळ्या धाटणीच्या कवितेसाठी कवी अनिकेत देशमुख यांना त्यांच्या पुढील लेखनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ......!
****
पुस्तकाचे नाव - माय माती अन् ती (मराठी कवितासंग्रह)
कवी अनिकेत जयंतराव देशमुख गोपालखेड जि. अकोला
स्वागत मूल्य - २४५ ₹
प्रकाशक - अक्षरशिल्प प्रकाशन अमरावती
****
पुस्तक परिचय 
-  नासा येवतीकर 
मुख्याध्यापक, प्रा. शाळा पिंपळगाव 
ता. धर्माबाद जि. नांदेड 
Pin - 431809
मो. - 9423625769

पुस्तक परिचय वाचल्याबद्दल मनस्वी आभार !

काव्यसंग्रह मागविण्यासाठी संपर्क 
कवी अनिकेत देशमुख - 9689634332 

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - माय माती अन ती ( Book Review )

मातीशी नाळ जुळलेला काळजाचा ठाव घेणारा कवी अनिकेत देशमुख यांचा कवितासंग्रह " माय माती अन् ती " उच्चविद्याविभूषित असलेल्...