Sunday 29 July 2018

नजर हटी, दुर्घटना घटी

नजर हटी, दुर्घटना घटी

महाबळेश्वरनजीक आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळली आणि दापोली कृषी विद्यापीठातील 32 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही बातमी वाचताना काळीज भरून येत होते. खूपच हृदयद्रावक घटना. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वचजण घरातील कर्ते-सवरते होते. त्यांच्या अश्या अकाली जाण्याने त्या घरावर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल ? त्याची कल्पना देखील करवत नाही. या अपघातास कारणीभुत घटक जर कोणी असेल तर तो आहे त्या गाडीचा ड्रायव्हर. तो जर मागे वळून पाहिला नसता तर हा अपघात झाला नसता त्या बातमीनुसार मिळालेली माहिती. म्हणूनच बस किंवा इतर वाहनाने प्रवास करताना कधी कधी हसत म्हटले जाते की, आता आपल्या सर्वांचे जीव ड्रायव्हरच्या हातात आहे. कारण तो जर व्यवस्थित चालविला तर आपला प्रवास सुखकर होऊ शकतो. पण ड्रायव्हरने गाडी चालविण्यात हलगर्जीपणा केला तर त्याच्यासोबत असलेल्या अनेक प्रवाश्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणूनच ड्रायव्हरने गाडी चालविताना मोबाईल वर बोलू नये असे बोलल्या जाते. मात्र बहुतांशी ड्रायव्हर असे वागताना दिसत नाही. अनेक ड्रायव्हर चालत्या गाडीत वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. काही ड्रायव्हर तर विडिओ कॉल करतात आणि त्याचा वापर करून गाडी चालविताना बोलतात. ते चूक आहे, असे ड्रायव्हरला म्हटले तर त्यांना राग येतो आणि काही होत नाही असे बोलतात. आंध्रप्रदेश मध्ये एका स्कुलबसचा ड्रायव्हर कानात हेडफोन घालून गाडी चालवताना रेल्वे गाडीचा आवाज ऐकू न आल्यामुळे भीषण अपघात झाला होता आणि त्यात तीस-चाळीस शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. गाडी चालविताना मोबाईल वापरू नये यासाठी कायद्याची निर्मिती ही केली. मात्र त्या कायद्याचा वचक कोणावर देखील नाही. दिवसातून अनेक छोटे मोठे अपघात या मोबाईल फोनमुळे घडतच राहतात मात्र व्यक्ती त्यापासून काही धडा घेत नाही. ड्रायव्हर मंडळींनी फक्त ड्रायव्हिंग वर लक्ष द्यावे. प्रवाश्याच्या गपशपमध्ये लक्ष देऊ नये किंवा कोणतेही कंमेंटस करू नये. त्यामुळे लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोलत बोलत ड्रायव्हिंग करणे हे कधी ही धोक्याचे असते याची जाणीव ड्रायव्हर लोकांनी ठेवणे आवश्यक आहे. अति वेगात गाडी चालविणे किंवा माझ्या समोर कुणी जाऊ नये ही भावना मनात ठेवून अनियंत्रीतपणे गाडी चालविणे प्रवाश्याच्या दृष्टीने खूप घातक आहे. काही ड्रायव्हर माझ्या जीवनात आतापर्यंत एकही अपघात झाला नाही असे आत्मविश्वासाने सांगत गाडी बेफामपणे चालवितात. माझ्या हातात गाडीतील प्रवाश्याचे जीव आहे हे प्रत्येक ड्रायव्हरने लक्षात ठेवायला आहे. अपघात होण्यास एक सेकंदाचा कालावधी देखील भरपूर होतो. म्हणूनच हिंदीत म्हटले जाते नजर हटी, दुर्घटना घटी. म्हणून ड्रायव्हर मंडळींनी आपले पूर्ण लक्ष रोडवरच ठेवायला हवे. तसेच प्रवाश्यानी देखील ड्रायव्हरला त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे.  प्रवासाला गाडी सुरू करण्यापूर्वी गाडीची पूर्ण तपासणी करून घ्यावी. जेणेकरून काही तासांचा प्रवास झाल्यानंतर गाडी खराब होणे किंवा अपघात होणे ह्या घटना टाळता येतील. दिवसेंदिवस रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या वाढत आहे हे खरोखरच एक चिंता करण्याजोगी बाब झाली आहे. त्यासाठी शासनाने एक करायलाच हवे. सर्वप्रथम राज्यातील घाटातील रस्ते रुंद करून त्या रस्त्यांची दुरुस्ती करायलाच हवे. घाटात जाणाऱ्या गाड्या आणि त्याचे चालक याची पूर्ण तपासणी करूनच त्यांना पाठवावे. इतर भागातील रस्ते देखील दुरुस्त व्हायला पाहिजे. खड्ड्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत ज्यामुळे लोकांना हकनाक आपल्या जीवास मुकावे लागले. काल आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दापोली कृषी विद्यापीठातील सर्व  कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना खूप दुःख होतोय. पण येरे माझ्या मागल्या प्रमाणे न होता, घाटातील रस्ते त्वरीत दुरुस्ती करून त्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे राज्यातील जनतेच्या जीवासाठी आवश्यक आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

4 comments:

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...