Tuesday 19 June 2018

निरोगी जीवनात योगाचे महत्व

निरोगी जीवनात योगाचे महत्व

आपल्याकडे एखादे वाहन असेल तर काही ठराविक कालावधीनंतर आपण त्याची दुरुस्ती किंवा सर्व्हिसिंग करतो. कशासाठी तर ऐनवेळी आपणास धोका होऊ नये आणि आपला प्रवास सुखकारक व्हावे म्हणून. निर्जीव असलेल्या वाहनांची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी काळजी आपल्या सजीव शरीराची खरोखरच आपण घेत असतो का ? नाही. म्हणूनच अचानक मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग आणि आपण याचा काही तरी संबंध आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊ या. मनुष्य पृथ्वीतलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत.  मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण आपले आरोग्य कसे चांगले राहील ? याकडे विशेष लक्ष देत असतो. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले अभिनेता अमिताभ बच्चन आज ही न थकता चित्रपटात काम करताना दिसतो. याचे काय कारण असू शकते तर ते म्हणजे त्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे. सर सलामत तो पगडी पचास अशी एक हिंदी मधील म्हणीचा अर्थ काय सांगतो, आरोग्य चांगले असेल तर किती ही धन कमाविता येऊ शकेल. आपले आरोग्य म्हणजे आपले धन होय. परंतु एकूण लोकसंख्यापैकी फारच कमी म्हणजे 10 ते 20 टक्के लोक आपल्या शरीराची देखभाल करून आरोग्याची काळजी घेतात. बाकी इतर मंडळी मात्र आपल्या अमूल्य अश्या शरीराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना आरोग्याच्या विविध तक्रारीला तोंड द्यावे लागते. असे म्हटले जाते की, दवाखाना मागे लागले की कुटुंबाचा विकास होत नाही. म्हणून दवाखाना आपल्या मागे लागू नये यासाठी काय करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वप्रथम आपणांस चांगली सवय असावी लागते. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही सवय माणसाला निरोगी राहण्यास मदत करते. ज्याप्रकारे शाळा-महाविद्यालयात प्रत्येक विषय आणि कृतीचे नियोजनानुसार एक वेळापत्रक असते. अगदी त्याचप्रकारे माणसाने सुद्धा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृतीचे नियोजन करून त्याचे एक वेळापत्रक आपल्या मेंदूला दिले की, रोज त्या वेळेला मेंदू आठवण करून देते. एखाद्या दिवशी वेळापत्रकात मागे पुढे होईल पण वारंवार त्यात चुका करू नये. स्वच्छतेच्या आपल्या सवयी आपणाला निरोगी राहण्यास मदत करतात. कधी कधी आपल्या वागण्यामुळे इतरांना त्रास होतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते. आपले जेवण हे देखील आपले आरोग्य वाढविण्यासाठी नेहमी मदत करतात. आपल्या जेवणात संतुलित आहार नियमितपणे असेल तर आपल्या आरोग्याच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात असतात. बहुतांश लोक फळभाजी आणि पालेभाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतात. रोज एकसारखे अन्न जेवण केल्यास सर्व प्रकारचे जीवनसत्वे मिळत नाहीत. त्यामुळे मग कोणत्या तरी जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते आणि मग आपणांस आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. आपणाला मिळलेले शरीर हे एक अमूल्य वरदान आहे. मात्र त्याची आपणांस काहीच काळजी वाटत नाही हे आपल्या नेहमीच्या वागण्यावरून लक्षात येते. दारू पिणे, तंबाखू खाणे आणि विडी ओढणे यासारख्या व्यसनाच्या आहारी गेलेला व्यक्ती आपल्या शरीराविषयी जरा सुद्धा काळजी घेताना दिसत नाहीत. जर त्यांना खरोखरच आपल्या शरीराची काळजी राहिली असती तर दिवसरात्र दारू पिऊन स्वतः मृत्यूच्या खाईत गेला नसता. तंबाखू आणि गुटखा खाण्याच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातल्या त्यात शाळा-महाविद्यालयातील मुलां-मुलीच्या संख्येत वाढ होत आहे. जे की देशाच्या प्रगतीसाठी फायदेशीर नाही. राज्यात गुटखा बंदी असून देखील कोपऱ्या कोपऱ्यात गुटख्याचे पाकीट सर्रास विकले जात आहेत. यातच आपला देशातील तरूण युवक आपले आरोग्य गमावून बसत आहेत. तिशीच्या आत तो स्वर्गात आपली जागा करीत आहे. पूर्वीच्या लोकांचे जिवंत राहण्याचे सरासरी आयुष्य 100 वर्षे होते परंतु आजच्या लोकांचे वय 60 वर्षावर येऊन बसले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे मनुष्य स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मधुमेह, कँसर यासारख्या रोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. लोकांमध्ये एड्स विषयी जनजागृती निर्माण झाल्यानंतर या रोगाचे रुग्ण कमी झाले असले तरी पूर्णपणे संपले असे म्हणता येणार नाही. पोलियोसारख्या रोगांवर मात्र आरोग्य विभागाने चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळविले आहे. सन 1995 पासून भारतात दरवर्षी एकाच दिवशी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलियोचे दोन थेंब पाजवून त्याचे समूळ उच्चाटन करण्यात यश मिळाले आहे. 
लोकांनी आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी दिवसातून एक तास जरी दिले तरी आपले आरोग्य बिघडणार नाही. रोज सकाळी आणि सायंकाळी अर्धा तास चालणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. इतर काही करा किंवा न करा मात्र रोज अर्धा तास चालण्यासाठी द्या असे प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णाला सांगत असतात. आपल्या पूर्वजांनी देखील शरीराच्या तंदुरुस्ती साठी व्यायाम करण्याचे महत्व सांगितले आहे. त्याच अनुषंगाने करा योग रहा निरोग असे आयुर्वेदामधून नेहमी सांगितले जाते. 
21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसभेत मंजुरी देण्यात आली. म्हणून सर्वात पहिल्यांदा 21 जून 2015 रोजी सर्वात पहिल्यांदा संपूर्ण जगात योग दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसभेत योगाबाबत बोलतांना भारताचे पंतप्रधान म्हणाले की, शरीर आणि मन यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम योग करते. योग ही भारताची खूप जुनी परंपरा आहे. योग हे व्यायाम नसून निरोगी शरीर राहण्यासाठी एक चांगली सवय आहे.  लोकांमध्ये योगाविषयी जागृती निर्माण करणे हे या दिनाचे महत्व म्हणता येईल. म्हणून आज आंतरराष्ट्रीय योग दिनी आपल्या कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी रोज कमीतकमी अर्धा तास चालणे आणि योगा करण्याचा संकल्प करू या आणि निरोगी जीवन जगू या.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...