Sunday 26 March 2017

लेख स्पर्धा प्रगती मधील अडसर :- दारू

[3/26, 11:20 AM] VaishLi Deshmukh:

*साहित्य स्पंदन कमिटी*

      द्वारा आयोजित

*🌺 खुली लेखन स्पर्धा 🌺*

आयोजक -प्रा.वैशाली देशमुख आणि नासा सर

संयोजक - वृषाली वानखेडे आणि अनिल रेड्डी सर

सहसंयोजक - रोहिदास होले सर

परीक्षक -

ग्राफिक्स - कवी निखिल

*विषय -प्रगती मधला अडसर -दारू*

(शब्द मर्यादा -100 ते 700 पर्यंत)
  
🌷स्पर्धेची नियमावली   🌷

1⃣ स्पर्धच्या दरम्यान कुणीही इतर पोस्ट टाकू नये.
2⃣ लेख हा स्वलिखित असावा ,त्यामध्ये फक्त आपल्या विचारांची अभिव्यक्ती असावी.
3⃣ चांगला लेख हा न्यूज़ पेपर ला प्रकाशित केला जाईल.
त्याकरिता आपले पूर्ण नाव ,फोन नंबर ,email id ,असावी.
4⃣ वेळ - सकाळी 10 ते रात्री 07 पर्यंत
5⃣ वेळेच्या नंतर आलेला लेख स्पर्धत घेतला जाणार नाही.
6⃣ लेख लिहताना शाब्दिक चुका होणार नाही ,याची काळजी घ्यावी !
7⃣ काही अडचण आल्यास स्पर्धकांनी अड्मिन कमिटी कडे पर्सनल संपर्क साधावा.
8⃣ परीक्षकाचा निर्णय हा अंतिम राहील त्यात कुणीही वाद घालू नये ! स्पंदन कमिटी सुद्धा त्या निर्णायात दखल करीत नाही ,यात कुणाला शंका असल्यास त्यांनी परिक्षकांशी संवाद करून आपली शंका दूर करावी !

✏ चला उचला लेखणी आणि करा आपले विचार व्यक्त

         🙏धन्यवाद 🙏

[3/26, 1:18 PM] स्तंभलेखक नासा:

*हाइवे वर नो दारूबंदी*

 राज्य सरकारने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर असलेल्या परमिट रुम आणि सर्व बारचे परवाने पुन्हा देण्याचा आदेश अधिका-यांना दिला आहे. अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांचा सल्ला घेतल्यानंतर हे परवाने पुन्हा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा फक्त रिटेलमध्ये दारु विक्री करणा-यांसाठीच लागू असल्याचं मुकूल रोहतगी यांनी सांगितल्यामुळे दारूप्रेमी लोकांना हायसे वाटले असेल यात शंका नाही. नोटाबंदीमुळे आधीच राज्याला तीन हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे, आणि या निर्णयामुळे अजून 2 हजार 300 कोटींचं नुकसान झालं असतं. आज शासनाला या दारू विक्री वर कोट्यावधी रूपयाचा महसूल मिळतो ज्यावर सरकार आपला कार्यभार व्यवस्थित सांभाळत आहे. सरकार समोर आज भरपूर प्रश्न तोंड वासुन उभे आहेत आणि सर्व समस्याची सोडवणूक अर्थातच पैश्यानेच करावी लागते. सगळ्या प्रकारची सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. वास्तविक पाहता बंदी करुच नये. कोणत्याही गोष्टीवर बंदी टाकली की जनता त्याच गोष्टी वापरण्यावर जास्त भर टाकतात. आपल्या लोकांची एक वाईट सवय आहे जेथे मनाई किंवा बंदी असते नेमके त्याच ठिकाणी घाई करतात. गेल्या दोन वर्षापासून गुटखा विक्री वर बंदी टाकण्यात आली पण खरोखरच गुटखा विक्री बंद आहे का ? तर नाही उलट फार मोठ्या प्रमाणावर या गुटख्याची तस्करी चालू आहे. या बंदीमुळे काही लोकांची चांदी होत आहे. याचा त्रास मात्र सामान्य नागरिक आणि विक्री करणाऱ्या लोकांना होतो. असंच काही या दारू विक्रीच्या बंदी वर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहा एक वर्षापूर्वी  महाराष्ट्र लगतच्या आंध्रप्रदेश सरकारने दारूवर बंदी आणली होती तेव्हा सीमावर्ती भागात दारूचा महापूर पसरला होता. जागोजागी परमीट रूम उघडण्यात आले होते. बऱ्याच लोकांची चांदी झाली या बंदीमुळे मात्र दारू पिणे आवश्यक असलेल्या लोकांचे  खूपच हाल झाले. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते. दारू विक्रीवर बंदी करण्याऐवजी त्यांची विक्री आणि दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काही नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी केल्यास याचे चांगले परिणाम तरी बघायला मिळतील असे वाटते. 
जसे की दारू विक्रीच्या बाबतीत वेळेचे तंतोतंत पालन करण्याकडे लक्ष ठेवावे. दारू विक्री ज्या दिवशी बंद असते म्हणजे ड्राय डे च्या दिवशी विशेष पथक ठेवण्यात यावे. कारण याच दिवशी रोजच्या पेक्षा जास्त दारू विक्री होते आणि भरपूर पैसा कमविला जातो. सर्व प्रकारच्या दारूच्या किमतींचे फलक दुकानात दर्शनी भागावर लावण्यात यावे. बऱ्याच वेळा शीशीमागे 10 ते 20 रू जादा आकारणी केली जाते, याबाबतीत तक्रार मात्र ते कुठे करू शकत नाहीत आणि ज्या व्यक्ती जवळ दारू पिण्याचा परवाना आहे त्या व्यक्तीलाच दारू विकण्यात यावी. परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विक्री होत असेल तर त्या दुकानांस तात्काळ सील ठोकण्यात यावे. प्रत्येक नागरिक ज्यांना दारू पिण्याची हौस आहे त्यांनी परवाना घेणे बंधनकारक केल्यास या दारूचे सध्या जे दुष्परिणाम दिसत आहेत ते नक्कीच कमी होतील. आजची परिस्थिती अशी आहे की दारू विक्री वर कोणाचे बंधन नाही आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीवर नाहीच नाही.  दारू पिऊन रस्त्यावर लोळणाऱ्या व्यक्तींना एकदा तुरुंगवास भोगायला लावले की अश्या लोकांची संख्या आपोआप कमी होते. दारू पिऊन घरात गोंधळ घालणे, कुटुंबातील सदस्याना मारझोड करणे, रस्त्याने मोठ्याने ओरडत फिरणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यपूर्वक घेतल्यास या दारूचा त्रास नक्कीच कमी होतो. कधी कधी शाळेतील चिमुकल्या मुलांच्या तोंडून काल शाळेत का आला नाहीस ? या प्रश्नाचे उत्तर  ऐकण्यात आलं की " काल माझ्या बाबांनी माझ्या आईला खूप मारलं आणि शिव्या दिलं म्हणून माझ्या आईसोबत मी गावी गेलो होतो. " तेवढ्यात बाजूची पोरं जोरात ओरडून सांगतात " सर याचे बाबा रोज दारू पिऊन घरात भांडण करतात आणि ह्याच्या आई सोबत ह्याला सुध्दा मारतात " तेंव्हा त्या मुलाचा चेहरा उदास आणि काहीसा गडबडलेल्या अवस्थेत असतो. शाळेतून त्याच्यावर खूप काही चांगले संस्कार होत असतील, तो शाळेत कदाचित हुशार ही असेल परंतु कुटुंबाची वाताहत त्याला त्या असंस्कृत वातावरणात परफटत घेऊन जाते. अश्या प्रकारांवर कुठे तरी आळा बसायला हवे
दारूचे दुष्परिणाम सांगून लोकांवर काही फरक पडत नाही. शंभरातून एखादा व्यक्तीच हे समजून घेवू शकतो. बाकीच्या लोकांना कायद्याच्या भाषेतूनच सांगावे लागते. शासनाने दारूविक्री बंदी करण्यापेक्षा यावर कडक अंमलबजावणी केल्यास जनता सुखात राहू शकेल अन्यथा दारू विक्री बंदी करून ही त्याचा काही फायदा होणार नाही.
मुझे पीने का शौक नहीँ, पिता हूँ गम भूलाने को चित्रपटातील या गीताप्रमाणे बऱ्याच लोकांची अवस्था असते. दारू पिल्यामुळे थोडीशी झिंग येते आणि काही काळासाठी तो वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. यामूळे सर्व दुःख, वेदना आणि त्रास विस्मृतीत जाते मात्र कायमचे नष्ट होत नाही. जेंव्हा नशा संपते आणि माणूस पूर्व पदावर येतो त्यावेळी पुन्हा तोच त्रास जाणवतो आणि त्यासाठी परत दारूची मदत घेतली जाते. काही लोक आनंदात दारू पितात. असे करता करता दारू कधी त्याच्या घरात प्रवेश केला हे त्याला देखील समजत नाही. काही लोक डॉक्टर लोकांचा हवाला देऊन म्हणतात की  दारू शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहे. परंतु काही मर्यादेत कदाचित ते शरीरासाठी आवश्यक आणि चांगला घटक असेल ही. आपण त्याचा योग्य ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे. आज त्याचे दुष्परिणाम जास्त झाले आहेत. जयंती आणि पुण्यतिथी निमित्त जे रॅली काढली जाते त्यात नाचणारे बहुतांश जण दारुने झिंगलेले असतात. त्यांना त्या कार्यक्रमाशी काही देणे-घेणे नसते. यामूळे कित्येक लोकांच्या रोजच्या राहणीमानावर परिणाम पडतो, याचे जरासुध्दा भान ठेवत नाहीत.
राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या एकच प्याला या नाटकांतून सुधाकर चे चित्र समाजासमोर खूपच चांगल्या पध्दतीने मांडले होते त्याचा किती परिणाम झाला हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. दारूमुळे आज कित्येक संसार उघड्यावर आलेली आहेत. काही लोकांना दारू पिऊन गाडी चालविण्याची सवय आहे. मात्र दारू पिऊन गाडी चालविणे अत्यंत धोकादायक आहे. रोज सरासरी दोन तरी अपघात दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होतात आणि चार - पाच जिवांना हकनाक मुकावे लागते. या अपघातात मरण पावलेल्याचे कुटुंब वाऱ्यावर पडते. त्याच्या कुटुंबातील सदस्याचे खूपच हाल होतात. संपूर्ण कुटुंबच भेदरलेले आणि विस्कळीत असते. याच गोष्टीचा विचार करून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग या ठिकाणी होत असलेल्या दारुविक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष काढत सर्वोच्च न्यायालयाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून 500 मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे दारु विक्री करण्यास बंदी घातली होती. देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर असणारी दारुची दुकाने 1 एप्रिलपर्यंत हटवण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र मुकूल रोहतगी यांनी आपल्या तीन पानांच्या सल्ल्यामध्ये स्पष्ट केलं आहे की, 'रिटेलमध्ये दारुविक्री करणा-या दुकानांसाठी हा निर्णय असल्याचं स्पष्ट आहे. आपल्या परिसरात दारु पुरवणा-या रेस्टॉरंट आणि हॉटेल्सना हा निर्णय लागू नाही. यामुळे हाइवेवरील दारू विक्री बंदी उठविण्यात आली.
देशात शांतता व सुव्यवस्था रहावी यांसाठी कायद्याची निर्मीती आहे म्हणून त्याचा योग्य वापर होणे हे पुढील काळाची खरी गरज आहे. आज समाजात एक चांगला संदेश पाठविले तर त्याचे चित्रे पुढील काळात नक्कीच चांगले पहायला मिळेल. तेंव्हा आपण एक जागरूक नागरिक असाल तर याविषयी नक्की लढा उभारू या. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
nagorao26@gmail.com

[3/26, 1:54 PM] Hanmant Padwal: *प्रगती मधला अडसर: दारु*
रविवारचा दिवस होता. रेडिओवर गाण्यांची फर्माइश
चालू होती, ' मुझे पिने का शौक नही, पिता हॅू गम भूलाने को.. I ' थोडयाच वेळात दुसरं एक गाणं ऐकायला मिळाले,' थोडीसी जो पी है, कोई चोरी तो नही की... I ' अशी एकापाठोपाठ एक वेगवेगळी पण नशा आणि दारुशी संबंधीत गाणी ऐकयला मिळाली. मी फक्त मनोरंजन म्हणून गाणी ऐकत नव्हतो. त्या गाण्यांचा अर्थ आणि एकंदर प्रवृती शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. तेव्हाच मला एक एक दारू संबंधी गाणी आठवत गेली. त्यातच 'शराबी' चित्रपटातील अमिताभ बच्चनचे गाणे आठवले, "नशा शराब मे होता, तो नाचती बोटल... I नशेमे कौन नही है, मुझे बताओ जरा... I " खरंच आज कोण नशेत नाही....? कोणाला मोठेपणाचा नशा, कोणाला श्रीमंतीचा नशा, कोणाला सत्तेचा नशा तर कोणाला बुद्धी आणि हुशारीचा नशा. तर कोणाला मादकतेचा नशा. कोनतेही नशीले जीवन चांगले नक्कीच नाही. पण ज्यांच्या दिवसाची सुरुवात दारूने होते त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या कुटुंबाची ते राहात असणाऱ्या समाजाची पर्यायाने देशाची मानहानी तर होतेच होते पण प्रगतीत अडसर बणनारी ही प्रवृती घातक होवून बसतेय. पण ही प्रवृत्ती काल होती, आज आहे आणि उदयाही राहणार आहे. पण स्वतःचे कुटुंबाचे आणि समाजाचे स्वास्थ बिघडविणारे अनेक महाभाग दारूच्या आहारी जावून सर्वांनाच वेटीस धरताना दिसतात. पिढयानं पिढया दारिद्रयांशी लढणाऱ्या घरात दारूमुळे सत्यानाश होतो आहे हे आजूबाजूच्यांना कळत असते पण त्याच घरातील त्या वेसनी प्राण्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. दारूच्या वेसनात डुबून गेलेले कर्जाचा डोंगर उभारून बायका मुलांना वाऱ्यावर सोडून रोज नित्यनियमाने गुत्त्यावर हाजर असतात. दारुच्या आहारी गेलेल्याची कथा आणि व्याकूळता आजच्या सारखी पुर्वीपण होतीच. म्हणून तर लेखक प्रेमचंद यांचे "कफन" आणि गडकरीचां "एकच प्याला" आजही लोक लक्षात ठेऊन आहेत. दारूसाठी वाट्टेल ते करणारे कोणात्याही थराला जाऊ शकतात. अशी माणसे दुसऱ्यांसाठी जशी घातकी असतात तशी स्वतःसाठी आत्मघातकी होऊ शकतात.वस्तुस्थिती पाहणं आणि तिच्यावर व्यक्त होणं थोडं कठीण आहे. कारण शेतकरी हा घटक सर्वांच्याच आत्मसन्मानाचा आहे. पण आज होत असलेल्या आत्महत्या या केवळ कर्ज आणि नापीकी यामुळेच आहेत की नशा अर्थात दारूचे व्यसन हेही कारण आहे. याचा सरकारी अहवालानुसार शोध घेणे गरजेचे आहे.किड्या मुंग्यासारखी स्वतःहोवून माणसं का जीव देतात, का त्यांनी जीव दयावा आणि ती जीव देणारी शेतकरीच का आहेत. त्यांच्या जीव देण्याने कोणत्या समस्या सुटतात. समाज, सरकार, देश कोणती प्रगती साधतोय. सरकारी मदत मिळून कुटूंब सावरेलही पण आपल्या जीवाची सरकारी मदत येवढीच किमंत आहे का.?या ही पुढे जाऊन आपण  व्यसनांध लोकांच्या तऱ्हेचे निरिक्षण केले तर आनेक रहस्यमय कथा समोर येतील. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या कडेला असणारे ढाबे आणि बार हे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मौजेची ठिकाणे तर त्यांच्या कुटूंबासाठी धोक्याची ठिकाणी आहेत. ज्यांच्या गाडीच्या पाठीमागे सुंदर विचार आणि नक्कीच कांही घेण्यासारखे लिहलेले असते. ' घर कब आयोगे ' असं लिहलेले अनेक गाड्यांच्या मागे दिसते आणि ते वास्तवही आहे. त्यांचं कोणीतरी घरी वाट पाहत असतं पण नशा, दारू त्यांना घरापर्यंत पोहचू देत नाही. सुसाट बेभान आणि सैराट झालेली तरुणाई आणि ओठावर कोवळ्या मिसरुटाची पोरं एंजॉय म्हणून बीअरची सुरुवात करुन दारुच्या बाटलीत केव्हा डुबून जातात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. ज्यांच्या खांद्यावर देशाचं स्वप्न आधारल्यालं आहे त्यांच्या छातीच्या फासळ्या उघडया पडून खांदे लिचपीचे झालेले दिसतात.. मग काय साधणार आमचा तरुणभारत प्रगती..?अशात लग्न होवून कुटुंबाची जबाबदारी येवून पडते, वर्षात दोनाचे चार आणि त्यात भर पडते. पण याची नशाची आणि दारुची तलफ कांही कमी होत नाही. आणि मग कलह जे आधीच चालू होते ते आणखी वेगळे रंग घेतात. आणि घरात अशांतता आणि बायको दोघीही नांदत असतात सवती बनून ऐकमेकीच्या. त्याचा या नशेखोरावर कांहीच परिणाम होत नाही. नित्यनियमाने मारझोड करून
मधुशालेत हजेरी लावणारा हा महाभाग स्वतःची  जबाबदारी विसरून अडसर बनून राहतो सर्वासाठीच. घरातील भांडणाचा परिणाम नुकत्याच शाळेत चाललेल्या चिमुरडयावर होत असतो. त्याच्या या वागण्याला घरातील व नात्यातील लोकांचा विरोध होऊ लागला तर मग अनेक क्लृप्त्या या नशेबाजाकडे उपलब्ध असतात, मित्रांचा आग्रह, नको त्याची पार्टी, अनेक बहाणे आणि गऱ्हाने यातही कांही अडथळे आलेच तर चोरून दारु पिणे, हा उद्योग सर्रास चालू असतो. अर्थीक दुर्बलता येत जाते आणि मग जीवन लाचार बनते. मिळेल त्याच्या कडून आणि मिळेल तसली ढोसायला मिळाली की बस्स हा विचार घर करतो आणि हाडाची काडं होईपर्यंत शरीरात अल्कोहल घेतलं जातं. आणि मग बातमी वाचायला मिळते की आमुक ठिकाणी विषारी दारूचे शेकडयावर बळी. त्यात याचाही नंबर असतोच. मग संपून जातं आयुष्य आणि कोणाच्या तरी आयुष्यातील , कोणत्यातरी समाजाच्या, कोणत्या तरी घटकाचा प्रगतीचा अडसर. पण एक अडसर संपला तरी दिवसागणिक असे अनेक अडसर नव्याने निर्माण होत असतात.

           *श्री. हणमंत पडवळ.* मु. पो. उपळे(मा.) ता.उस्मानाबाद.
         hanamantpadwal8956@gmail.
                        8698067566.

[3/26, 3:40 PM] Pushpa Sadakal: विषय... प्रगती मधला अडसर दारू..

            लेख माला.

प्रगती मधला मोठा अडसर  "दारू" हेच प्रमुख कारण आहे. किती सहज आणि नकळत ही युवा पिढी या दारूच्या आहारी जातात हे त्यांच त्यांनाच कळत नाही.
त्यांना जबाबदारी व कर्तव्याच भान तर नाही पण प्रगतीची वाटचाल करण्या ऐवजी ते अधोगतीच्या बळी पडतात. ही खेदाची बाब आहे. त्यात रस्त्यावरच बिअर बार असल्याने जवळ गाडी आणि साथीला मस्तीसाठी दारू. तो त्यांना स्वर्गसुखाचा आनंद वाटतो. खरे तर सरकारने अशा दारू विक्रीला बंदी आणावी. हमरस्त्यावर हा खूप मोठा धोका आहे. बहुतेक अनर्थ दारु पिऊन गाडी चालविल्यानेच ओढवले आहेत.

व्यसन हे कोणते ही असो ते वाईटच. 
तारूण्यातील व्यसन त्या ही पेक्षा अधिक वाईट. आजची तरुणाई झटपट पैसे मिळवायच्या मागे आहे. थोडा पैसा येताच चैन, मौजमस्ती रंगेल जीवन जगण्याकडे कल वाढू लागला आहे. 
ड्रिंक करणे आता फॅशन झाली आहे स्वच्छंदी स्वैर वागणे फोफावते आहे. मग वाढदिवस, लग्न समारंभ, अशी कारणे शोधून पार्ट्या केल्या जातात. त्या मद्य धुंद नशेत कर्कश संगीत व बेताल नाचणे यात रात्री उजाडतात. मग हॉटेल चे खाणे पिझा, बर्गर, मंचुरियन असे खाणे पोटाचे वाटोळे करतात. त्यात भर विभक्त कुटुंब पद्धतीची. मग रान मोकळेच. ना धाक ना दरारा. मित्रांसोबत जास्त रहाणे रात्री बेरात्री घरी येणे सगळे च बेशिस्त. ना आईबापाच्या कष्टाची जाण ना स्वतःच्या जबाबदारीचे भान. 
    ऐन तारुण्याच्या बहरात हा नशेचा कहर अंतःकरण हेलवणारा आहे. म्हातारे आईबाप अजून ही गावाकडे कष्ट उपसत आहेत. हलाखीचे जिणं जगत आहेत. हे मात्र इथे राजेशाही थाटात जगतात. व स्वतःची बरबादी करून घेतात. बायका मुले आईबाप यांना दुःखाच्या खाईत ढकलतात. मग संसारात वाद, नैराश्य व असंतोष. सुखाचा मागमूसही नाही. 
    लेकरा अपार कष्ट सोसले तुजसाठी 
         म्हातारपणीची तू आमची काठी. 
            आहे का त्यांना जबाबदारी चे भान. राजकुमारासारखी ही सुस्वरूप मुल कुरुपता नशेत भिनली आहे. 
  तुमची ही धुंद नशेची खेळी आईबाप अक्षरशः जिवंतपणीच जाळत आहात. अजून वेळ गेली नाही. जागे व्हा. 
       अरे बाळांनो तुमच्या पुढे केवढी आव्हाने आहेत. कर्तव्याचा मोठ्ठा पसारा आहे. उद्या चे स्वप्न देशवासी तुमच्यात पहातात. तुम्ही देशाचे भवितव्य आहात. शान ही आहात. 
मनगटातील ताकद सत्कार्यासाठी कामी येवू द्या. सिमेवर आपले सैनिक 
उन, वारा पाऊस यांना न जुमानता 
देशाचे रक्षण करीत आहेत. तसेच बळीराजा ही कधी दुष्काळाला सामोरे जातो तर कधी अवकाळी पावसाला. 
तो तर जगाचा पोशिंदा आहे.

   हे तरुणांनो झिडकारून द्या या दारूच्या व्यसनाला. हा अडसर  खंबीरपणे दूर करा. बघा सृष्टीच्या कणाकणातआनंद भरला आहे. त्याचा आस्वाद घ्या. जग खूप सुंदर आहे. 
परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. सत्संगतीत रहा. खरेपणाला जोपासा. नम्रतेचा दागिना परिधान करा. सौजन्य अंगी 
बाणवा. म्हणजे सत्याचा मार्ग चुकणार नाही. आपल्या शूर वीरांचे  स्मरण ठेवा. इतिहास तुम्ही जाणता च. आता तुम्ही सज्ञान आहात. 
   म्हणून सांगणे पोटाची गटार गंगा करू नका. आत्म्याची भुख भागवायची तृप्ती तेथे आहे. जिभेच्या चोचल्यांना बळी पडू नका. सात्विक व सकस आहार घ्या. सद् वर्तनाने 
आयुष्याला सामोरे जा. यश नक्की तुमची पाठ थोपटील. यात शंका नाही. 
हा प्रगतीचा अडसर दूर करून
व्यसनमुक्तीचा नारा घराघरातून, गावागावातून वाजवू या. तरच उद्याची पिढी सक्षम होईल. आणि कर्तव्य व जबाबदारी यांचा चांगला मेळ बसवतिल. उभा देश तुमच्यात स्वप्न पाहिल.
        
      पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे. 
        9011659747.

[3/26, 3:43 PM] Kishor Jhote: लेख स्पर्धा साठी

*प्रगती मधला अडसर : दारू*

     दिड दोन महिन्या पूर्वी हायवेवर ५०० मीटर पर्यंत बिअर बार परमीट नुतनीकरण होणार नाही. तसेच नवीन परवाना मिळणार नाही. अशी बातमी वाचली आणि एक नवे पर्व सुरू होणार की काय? असे वाटले. एक चांगला व सामाजीक स्वास्थ टिकवणारा निर्णय म्हणता येईल... पण काल परवा तोच निर्णय सरकारने मागे घेतला. एवढा झटपट निर्णय का मागे घेतला ? कळत नाही. बार असोशिएशन ची याचीका निर्णय लागण्या आधी सरकारने आपला निर्णय बदलणे संदिग्ध वाटते. याचा अर्थ महसुल महत्वाचा सामाजिकतेचे कोणाला घेणे देणे नाही.
      बरं दारू पिणे हे काही आत्ताचे व्यसन नाही. मात्र आजकाल प्रत्येक क्षणाची साक्षीदार ही दारू झाली आहे. दारूच्या दुकानावर रांगा दिसतात आणि दूध विक्रेत्यांना घरोघर हिंडावे लागते ही माझ्या देशाची शोकांतिका झाली आहे.
     शेतजमीनी विकास नावासाठी सरकारने खरेदी केल्या व आलेला मोबदला लोकांनी दारु, ढाबे , बाईचा नाद करून घालवला. संसाराची राखरांगोळी झाली. अनैतिकता वाढली, खून, मारामारी इ. गुन्हेगारी प्रकारात वाढ झाली आहे. प्रत्येक वस्तीत नागरी समस्या मधे दारूने होणारी भांडणे वाढली आहेत. तर ग्रामिण भागातही नात्यांची जवळीक संपुष्टात येत आहे.
     एकच पेला सारखी गत झाली आहे. सुख, दुःख तसेच इतर कोणत्याही प्रसंगी ओली पार्टी ही ठरलेली असते. अकाली मृत्यू प्रमाण वाढत असून घरातील कर्ती व्यक्ती जात आहे. व्यसन इतके वाईट झाले आहे की ती व्यक्ती कोणत्याही स्थरावर उतरते.....
      सामाजिक प्रतिष्ठा व्यक्ती गमावून बसतो. अवहेलना वाट्याला येते तसेच लोकांचा विश्वास राहत नाही. प्रगती मधील खरा अडसर ही दारूच ठरत आहे. गंमत म्हणून सुरू केलेली ही नशा व्यसनात बदलते आणि घरातील सुख शांती गमावून बसतात.... केवळ घरच नव्हे तर , सामाजिक घडी विस्कटते. गुन्हाच्या प्रमाणात झालेली वाढ ही देखील या दारुच्या सेवनाने होत आहे.
     या मधुन बाहेर यायचे असल्यास आपले आचरण सुधारने गरजेचे आहे. तसेच बुध्दांनी दिलेली पंचशीला मधील अखेरच पाचवेे शील आचरण केले तर या समस्येचे निराकरण होईल. चला आपली प्रगती करायची असेल तर शीलाचरण करूया....
*सुरा - मेरय - मज्ज पमादठ्ठाणा वेरमणि सिख्खापदं समादियामिI*
( मदयपान करण्यापासून अलिप्त राहणे. )
*साधु | साधु | साधु*

किशोर झोटे @32
औरंगाबाद.
Samyakharshali@gmail.com
9423153509

[3/26, 3:46 PM] ‪+91 75883 89957‬: प्रगतीमधला अडसर: दारू

प्रगती म्हणजे काय ? आपल्या जवळ जे जे काही नाही ते सर्व मिळवु शकण्याची क्षमता.आर्थिक,सामाजिक,मानसिक ,शैक्षणिक अस सर्व प्रकारच सुख,समाधान प्राप्त करणारी अवस्था म्हणजे प्रगती.स्वतःला सामाजिक प्रतिष्ठा,वैवाहिक जीवनातील सुख,आई-वडिलांची सेवा,मुलाबाळांसाठी उज्जव भविष्य म्हणजे खरी प्रगती.पण समाजाच अवलोकन करताना मनाला हुरहुर लावणारी उदाहरण समोर येतात ती बहुतांशी दारूमुळेच.

आई-वडिल आपल्याला वैतागलेत,पत्नी दररोज हाता पाया पडून सांगती ती सोडा हो! मुलांचीही अपेक्षा बाबा वेळेत घरी यावेत,त्यांच्याशी बोलाव,खेळाव,त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावित,प्रसंगी रागवावे पण केवळ एका दारुमुळे त्याची इच्छा असली तरी तो कहीच करू शकत नाही.

दारू हे एक अस व्यसन आहे जे कधीच एकट नसतं. धुम्रपान,मटका,जुगार,तंबाखु,गुटका एवढेच नव्हे तर मादकतेच्या व्यसनालाही तो बळी पडतो.तरूण पिढी निरनिराळ्या नशेत सैराट होताना दिसते. तरूणाईकडून देशाला खुप अपेक्षा आहेत.सर्वांत जास्त तरूण वर्गाची संख्या भारतात आहे.दारू या व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणुस सतत त्या सवयीच्या पुर्ततेसाठी खोटे बोलना,मोठ्यांचा अनादर,बायकोकडे दुर्लक्ष,मुलांची हेळसांड,कौटुंबीक कलह, चोरी,आकस्मिक मृत्यु ,कर्जाचे डोंगरआणि त्याची परत फेड करता आली नाही की अखेर आत्महत्या...

दारूमुळे तो स्वतःच्याच उज्वल भविष्यापासुन दूर फेकला जातो तर तो राष्ट्रहित कसे साधणार,व्यवसायात प्रगती कशी करणार,समाजासाठी आदर्श म्हणुन कसा उभा राहणार,गमावलेली प्रतिष्ठा कशी परत मिळवणार.दारू ही अशी गोष्ट आहे जी गरीब-श्रीमंत,लहान-मोठा,जात-पात काहीकाही पाहत नाही ती फक्त अधोगतीच्या दलदलीतच फसवत जाते.

आज निर्वेसनी माणसास जो मान,आदर,प्रतिष्ठा,प्रगती यासह उज्वल भविष्य प्रदान केले जाते ते कधीच दारू पिणारा मिळवु शकत नाही मग  तुम्हीच विचार करा खरोखरच दारू प्रगतीस अडसरच असते.

 दारूपायी तु र घात केला संसाराचा।
 कसा अनादर केला तु र माय बापाचा।।

कसा विसरला तु र बायकोचा त्याग।
तुझ्याकड पाहुन लेकराला येतो तुझा राग।।

सारी कमई तु र दारूवर ओतली।
एवढी कशी प्रिय तुला ती र बाटली।।

होत नव्हत सार कष्टाच तुझ्यासव गेल।
एवढ अकरीत एका दारून र केल।।

नाद ह्या दारूचा बरा नाही र अती।
माग फिरून बघ कशी खुंटली प्रगती।।
 
आरडले सोनाली
उस्मानाबाद
मो.न.7588389957
Email:sonaliaradle18@gmail.com

[3/26, 3:50 PM] Sangita deshamukh Vasmat: *प्रगतीमधील अडसर दारू*
घरापासून समाज,समाजापासून गाव,गावापासून राज्य  आणि राज्यापासून बनतो देश! म्हणून प्रगती असो अथवा अधोगती ही घराची होते तेव्हा देशाची असते आणि देशाची असेल तेव्हा त्या देशातील घराची असते. प्रगती असो अथवा अधोगती यास अनेक घटक  कारणीभूत असतात. अनेक महत्वाच्या घटकांपैकी घराला,समाजाला, पर्यायाने देशाला आतून पोखरणारा घटक म्हणजे दारू होय. ही दारू गरीबाची असते तेव्हा ती पावशेरी असते,तर श्रीमंतांची असते तेव्हा ती व्हिस्की असते. गरीबांना आवडते तेव्हा ते व्यसन असते तर श्रीमंताला आवडते तेव्हा ती फॅशन बनून येते. ती पावशेरी म्हणून येवो अथवा व्हिस्की म्हणून,ती व्यसन म्हणून येवो अथवा फॅशन पण ती ज्याच्या पोटात जाते तेव्हा मात्र त्या व्यक्तीच्या घरावर,आरोग्यावर,समाजावर सारखाच विपरीत परिणाम करते.
       दारूमुळे आर्थिक नुकसान होणे हा अतिशय साधारण दुष्परिणाम आहे. दारू पिऊन आलेला माणूस हा माणूस रहात नाही,तो हैवान बनलेला असतो. त्या नशेत तो बायकोपोराना मारहाणीपर्यंत अत्याचार करतो,घाणेरड्या शिवीगाळ करतो. घरातील जे सामान विकता येईल ते विकतो. अशावेळी त्याच्या त्याच्या लेकरांचे शिक्षण कसे होत असेल ते कल्पना न केलेलीच बरी! लेकराना कपडे,शिक्षणाच्या सुविधा तो पुरवूच शकत नाही. त्यानंतर अशी सतत दारू पिण्याने त्याच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम म्हणजे किडन्या,लिव्हर खराब होऊन तो अल्पायुषीच ठरतो. घराचा आधार मध्येच निखळतो. अनेक कुटुंबात तर बापाप्रमाणे मुलगाही दारूचा व्यसनी बनतो. अशावेळी त्या कुटुंबात कोणी प्रगतीचे स्वप्न पाहू शकत असेल का? आपण  हीच बालके राष्ट्राची संपत्ती मानतो. मग देशाचा पायाच  दारूमुळे खचतो. आजतर लग्नाच्या वरातीत आणि निवडणुकांमध्ये तरुणांना दारू पाजून झिंगाट नाचवल्या जाते. जो तरूणवर्ग आमच्या देशाचा आधारस्तंभ तोच असा दारूने आतून पोखरलेला असेल तो देश किती प्रगती करेल,हा मनालाही पोखरणाराही प्रश्न आहे.
        देशात जेवढे खून होतात,बलात्कार होतात,अपघात होतात  त्यातील जास्तीत जास्त खून, बलात्कार,अपघात हे दारू पिऊन झालेले आहेत. हे दारूमुळे होणारे सामाजिक नुकसान तर कशानेही भरून निघणारे नसते. म्हणजे एक व्यक्ती जरी दारुडा असेल तर तर त्याच्यामुळे होणारे त्याचे वैयक्तिक नुकसान,कौटुंबिक नुकसान, सामाजिक नुकसान हे देशाच्या अधोगतीस कारणीभूत ठरते. या सर्व बाबींचा विचार केला तर सरकारने तडकाफडकी दारूबंदी करायला हवी. दारूबंदी करण्यामध्ये सरकारचे नुकसान होते ते फक्त अबकारी कराचे! तेवढी बाब सोडली तर राष्ट्रालाही दारूबंदी घातकच आहे. कारण सामान्य माणूस  दारिद्र्यामुळे आधीच कुपोषित असतो. त्याच्यात कुठली प्रतिकारक्षमता नसते. त्यामुळे लवकरच गंभीर आजाराला बळी पडतात. त्यांच्याकडे इलाज करण्याइतकी आर्थिक बळही नसते. अशावेळी या सामान्य लोकांचे इलाज हे सरकारी दवाखान्यात करावे लागतात. त्यामुळे सरकार जेवढा अबकारी करातून लाभ मिळवतो,त्याच्या कितीतरी अधिक पटीने ते या गरीबांच्या आजारावर खर्च  करत असतो. त्यामुळे  याची ही  दुसरी बाजू लक्षात घेतली तरी सरकारने दारूबंदी करणे हिताचे ठरते. "पण लक्षात कोण घेतो?" अशी म्हणण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे.आपल्याच शेजारच्या राज्यात दारूबंदी होऊ शकते मग ती महाराष्ट्रात का होऊ शकत नाही?हा अगदी सामान्यातील सामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे. डॉ. अभय बंग यांच्या भगीरथ प्रयत्नानंतर महाराष्ट्रातीलच गडचिरोली,वर्धा हे जिल्हे दारूमुक्त होऊ शकतात तर बाकी जिल्हे का नाही? हाही महत्वाचा प्रश्न आहे.
         आपल्या देशातील माणसे पायापेक्षा पैशानेच जास्त चालतात,असे खेदाने म्हणावे लागते. आताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हायवेलगतची ५०० मीटर अंतरावरची दारूविक्री बंद करण्यात आली होती. रस्त्याने होणारे अपघातांची संख्या पाहता सामान्य नागरिक या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अत्यंत खूश होते. पण माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक? हायवेवरच्या हॉटेल आणि बारची मोजमापे घेतली,एप्रिलमध्ये राज्यातील ८०% दारुविक्री करणारे हॉटेल बंद होणार होते. रात्रीत निर्णय बदलले  आणि अपघात हे दारू पिऊन होत नाहीत तर दारूचे पार्सल नेल्याने होतात,असा सरकारला साक्षात्कार झाला. आधीच नोटाबंदीमुळे देशाचे नुकसान खूप झाले आणि आता दारूतून येणाऱ्या अबकारी कर थांबवून होणारे नुकसान सहन होणारे नाही,असा युक्तिवाद सरकारने केला. जणूकाही नोटाबंदी ही जनतेने जनतेच्या स्वार्थापायी सरकारला करण्यास भाग पाडली होती. शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात,त्याप्रमाणे सत्तेने निर्णय मागे घेतला अन्  दारूविक्रेत्यांना पैशाने जणू जगच विकत घेतल्याचा आनंद झाला. ज्या गोष्टी सामान्य जनतेला कळतात त्या सरकारला कळू नयेत,यापेक्षा देशाचे दुर्दैव ते कोणते?आजही सरकारने शांत डोक्याने विचार केल्यास दारूबंदी हीच देशाला प्रगतीकडे नेऊ शकते,हे लक्षात येईल. म्हणून देशाच्या प्रगतीला आड येणारी दारूविक्री ही बंदच व्हायला हवी.
*संगीता देशमुख२०*

[3/26, 4:56 PM]  Subhadra Sanap: *✅स्पर्धेसाठी लेख*✅
➖➖➖➖➖➖➖➖➖
   *प्रगतीच्या अडथळा: दारु*
➖➖➖➖➖➖➖➖➖
परवा शाळेच्या वेळेत एक महिला पालक कडेवर छोटं बाळ, केस विस्कटलेले,चेहरा अगदी खगून गेलेला अशी तीसेक वर्ष वय असलेली ती पालक माझ्या ऑफिसमध्ये आली. रडवेला चेहरा करुन म्हणाली "बाई पोरं सांगत व्हती मव्हा आन्या साळात येत नाही.पण म्या तर त्याला रोज साळात लावते. पोर म्हणली त्यो साळात येत नाहीआण् साळाचा टाईम व्होऊस्तवर भायरच खेळतुया. हे बघा बाई मला काय टाईम मिळत न्हाय साळात यायला आज मव्हा रोज बी बुडाला बघा पण म्या मणलं आज बघूच साळात जावून .बाई म्या एव्हढ काम करती,काल पोरग मनल मला कपडे पायजीत तर मी ज्याच्या शेतात कामाला जाते त्याच्याकुन पैस घेवून त्याला कपडे घेतले बघा.अहो मला वाटतयं लेकरु तरी शिकून मोठ व्हईल अन् मव्ह पांग फेडल पण कसल काय मव्ह नशीबच आस."एका दमात ती माऊली एव्हढ बोलत होती.व एकीकडे रडत होती.मी तिला बसायला सांगितलं व शांतपणे तिला विचारले.तिचा मुलगा चौथीच्या वर्गात होता.मी वर्गशिक्षकाला बोलावले.त्यांनी सांगीतले मॅडम यांचा मुलगा हुशार आहे पण गेल्या चार दिवसापासुन तो शाळेत येत नाही.म्हणुन मीच यांना मुलांच्या हाती निरोप दिला होता. चौकशी केली असता त्या मुलाचे वडील खुप दारू पित होते.वती बाई मजुरी करुन घर चालवत होती.
       प्रसंग मनाला चटका लावून गेला.व्यसण मानसाला पशू बनवतो.त्यात दारूचे व्यसन तर भयानक वाईट.परवा झेड.पी.च्या निवडणुकीवेळी नगर जिल्ह्यातील पांगरमल येथे फुकटची दारु प्यायल्याने आठ जनांना आपले जीव गमवावे लागले.
    श्रीमंत लोक दारु पीतात पण ती ब्रॅडेड दारू त्यांचे काही नुकसान करत नाही.पण गोरगरीब जर या व्यसनाच्या मागे लागले तर,संपूर्ण कुटुंब बरबाद होते दारूपाई हे महाभाग पैसा नसेल तर,घरातील एक एक वस्तु विकून दारू पितात.बायकोला मारुन तिचे मंगळसुत्र सुध्दा विकायला हे मागेपुढे पहात नाहीत.असं हे व्यसन मानवी प्रगतीच्या आड येणारेच आहे.म्हणून मी तर असं म्हणेल की,दारूबंदी करण्यापेक्षा दारू उत्पादनच बंद झाले पाहिजे.
     कोणतेही व्यसन वाईटच.ज्या कुटुंबावर ही वेळ येते त्यांनाच त्याचे चटके बसतात.
     दारू पिऊ नका
     व्यसन करूनका
     आलेल हा जन्म
      फुकट घालवू नका

व्यसनाने होते
आरोग्याची हानी
चार लोकांत लेकरं
दिसतील केवीलवाणी

             दारूत घालतोस
              कष्टाचा तु पैसा
             कधी पूर्ण करनार
             लेकराबाळांच्या हौसा

सोड दारूचे व्यसन आता
बायको तुला माफ करेल
सगळ्या तुझ्या चुका विसरून
पुन्हा तुला आपलसं करेल

     या प्रसंगी मी कळकळीची विनंती करते दारु मुळे घरं बरबाद होतांना पहावत नाही .म्हणुनच मानवी प्रगतीच्या आड येणारी दारू हद्दपार करु.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  सौ.सुभद्रा खेडकर बीड

[3/26, 5:16 PM] ‪+91 98811 74784‬: *लेखस्पर्धा*

*प्रगतीमधला अडसर :- दारु.*

आले होते तुझ्या घरी
मी समजत होते राणी
स्वप्न होतं मोठं माझं
घरी दासी भरेल पानी.

कवी अजय बिरारी यांच्या कवितेच्या या ओळी वाचुन मुक्ताला गहिवरुन आलं. तिच्या डोळ्यातलंं पाणी रोखण्याचा प्रयत्न करत ती पुढच्या ओळी वाचु लागली

सुख होतं घरी दारी
डोळ्यात नव्हतं पाणी.
वाद नव्हता दोघांमधे
बोलत होतो गोड वाणी.

पुन्हा तिचे डोळे भरुन आले. आता मात्र ती तिने डोळ्यातल्या अश्रुंना मोकळी वाट करुन दिली. पोटभर रडुन झाल्यावर ती तिच्या भुतकाळाबद्दल विचार करु लागली. या कवितेने जणु तिचा भुतकाळ, वर्तमानकाळच तिच्या समोर आणला होता.
लग्न करुन मुकेश सोबत ती एका खेड्यातुन मुंबईत राहायला आली तेव्हा किती स्वप्न रंगवले होते तिने. अॅरेंज्ड मॅरेज होते. मुंबईला मुकेशला कंपनी तर्फे राहण्याची सोय होती. पगारही चांगला होता. मुक्ता स्वत: पदवीधर होती. सुंदर होती, सुशील आणि सुसंस्कारी होती. त्यामुळे मुकेशच्या पटकन मनात भरली. लग्न झाले. मुक्ता खरच सुखी होती. तीन चार वर्ष खुपच मजेत गेले. दोन मुले ही झालीत. सुखी संसार चालला होता.
मुकेशला मात्र नोकरी मधे इंटरेस्ट नव्हता.त्याला बिझिनेस करायची खुप इच्छा होती. आणि तशी संधीही त्याला चालुन आली. त्याचा एक मित्र राकेश त्याला भेटला. त्यालाही बिझिनेसमधेच इंटरेस्ट होता. त्याच्याकडे प्रोजेक्टही तयार होतं. दोघांनी मिळुन इंडस्ट्रियल एरियात प्लॉट घेतला. आणि थोडी मशिनरी घेऊन टुल रुम (इंजिनीयरींग) सुरु केली. मुकेश आणि राकेश दोघेही मेहनती आणि समजदार  होते. त्यामुळे बिझिनेस चांगला सेटल झाला. चांगल्या प्रकारे इन्कम सुरु झाले. मुकेश मुलांना आणि मुक्ताला काहीही कमी पडु देत नव्हता. बिझिनेस मधे इन्कम पुर्वीपेक्षा तिप्पट मिळायला लागलं. दोघांचही स्वप्न होतं मुलांना चांगल्या शाळेत, कॉलेजमधे शिक्षण द्यायचे. उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायचे.

         मुकेशच्या मधुन मधुन पार्ट्या व्हायच्या त्यावेळी तो थोडी फार व्हिस्की घ्यायचा. मुक्ताने विचारल्यावर तो एवढच सांगायचा की बिझिनेस मिटींग होती. मुक्तालाही ते खरं वाटत असे. पण तिला त्याच्या पार्ट्या मनापासुन आवडतच नव्हत्या. पण एवढं सगळं चांगलं चालत असतांना वाद नको म्हणुन ता गप्प बसायची. पण हळुहळु मुकेशचं पिणं वाढत चाललं तसे दोघांचे वाद वाढत गेले. मुकेश दररोज प्यायला लागला. वाद विकोपाला गेल्यावर तिने राकेशला विश्वासात घेऊन त्यालाच सांगितले,  'राकेशभाऊजी तुमच्या पार्ट्या कमी करा. खुप पिणं वाढत चाललय हल्ली.'
राकेश म्हणाला,' वहिनी, मी नसतो रोज त्याच्याबरोबर. तो कोणा बरोबर जातो. काय करतो काही सांगत नाही. उलट आमच्या फर्ममधुन तो जास्त पैसे काढतो. भांडवल कमी पडायला लागलं. कामात त्याचं लक्षच नसतं. मी पुष्कळ वेळा त्याला सांगुन पाहिले पण तो सुधरायची काही चिन्हे मला तरी दिसत नाहीत. शेवटी मलाही संसार आहे वहिनी. मी किती दिवस त्याचा विचार करणार सांगा ना. मी ही पार्टनरशिप ब्रेक करायचं ठरवलं.
हे ऐकुन मुक्ता सुन्न झाली. तिच्या डोळ्यापुढे मुलांचं काळवंडलेलं भविष्य दिसु लागलं. तरीही धीर करुन ती राकेशला म्हणाली, भाऊजी, एक संधी द्या मला प्लिज. मी एकदा समजावुन सांगते मुकेशला.
त्यानंतर मुक्ताने मुकेशला खुप प्रेमाने समजावुन सांगितले. मुलांच्या भवितव्याची जाणीव करुन दिली. मुकेशनेही पश्चाताप व्यक्त केला. पण दारुच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचा कधी भरोसा नसतो. दुसर्या दिवशी पुन्हा मुकेशचे पाय बारमधे वळले आणि तो नेहमीप्रमाणे तर्रर्र होऊनच घरी आला. मुक्ताने पुन्हा पुन्हा समजावुन उपयोग झाला नाही. शेवटी मुलांना घेऊन माहेरी जाण्याचीही धमकी दिली पण व्यर्थ. शेवटचा उपाय म्हणुन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली. पण सगळच व्यर्थ होतं हे मुक्ताला कळुन चुकलं.
त्यानंतर एक नाही तर तीन वेळा मैत्रीखातर राकेशनी मुक्ताला संधी दिली. पण आता मुक्ता आणि राकेश दोघांनी मुकेश सुधरण्याची आशा सोडली. शेवटी राकेशनी बिझिनेस मधुन मुकेशला काढुन टाकले.

मुक्ताची सगळी स्वप्न धुळीला मिळाली होती. तिला पुन्हा नव्याने सुरुवात करायची होती. तिनेच हिंमत धरली. पदवीधर होती म्हणुन एका ठिकाणी तिला नोकरी मिळाली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरते उत्पन्न मिळत होते. पण मुक्ता आणि मुकेशच आणि पर्यायाने मुलांचही भविष्य अंधकारमय झालं होतं.

राकेशचा मात्र प्रगतीतला अडसर दुर झाला होता. तो दारुच्या व्यसनाच्या अधीन झाला नव्हता म्हणुन त्याची प्रगती होऊ लागली .
मुकेश आणि राकेश दोघांना समान संधी होती. पण राकेशची प्रगती झाली आणि
मुकेश हा दारुच्या आहारी गेल्यामुळे तीच दारु त्याच्या प्रगतीमधे अडसर ठरली.
मुक्ता पुन्हा कविता वाचु लागली.

आले होते तुझ्या घरी
मी समजत होते राणी.
स्वप्न होतं मोठं माझं
घरी दासी भरेल पानी.

*अजय बिरारी नाशिक*

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...