Saturday 24 March 2018

जय जवान, जय किसान

जय जवान, जय किसान

आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. येथील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वी जेंव्हा भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीमधून नुकतेच स्वातंत्र्य झाले होते त्यावेळी भारतातील जनता पूर्णपणे स्वयंपूर्ण होती. शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या देखील भरमसाठ होती. त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजल्या जायचे. कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची त्या काळाची प्रथा सर्वाना सोईस्कर होती. म्हणूनच शेतीकाम करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळत होता. आत्महत्या म्हणजे काय असते हे तेंव्हाच्या शेतकऱ्यांना मुळी ओळखीचे नव्हते. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की, किती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना अच्छे दिन होते. मात्र हळू हळू काळ बदलत गेला. शेतकऱ्याच्या जीवनात कामाच्या बदल्यात धान्य ऐवजी पैसा आला आणि सर्व चित्र पलटत गेले. ही व्यापारी लोकांची चाल होती की अन्य कोणाची माहीत नाही मात्र देशात रुपया फुगू लागला तसा शेतकरी नागवू लागला. शेतकऱ्याला परावलंबी करून टाकले त्यामुळे आज शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावर जात आहे. फार पूर्वी शेतात मिळालेले उत्पन्नातुन अस्सल धान्य ठेवून तेच बी म्हणून वापरत होते. गाई म्हशी आणि इतर जनावरांचे मलमूत्र खत म्हणून वापरत होते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळत होते मात्र दर्जेदार मिळत होते. आज भरमसाठ उत्पन्न मिळते मात्र त्यातून काही निष्पन्न होत नाही अशी स्थिती आहे. गावागावात बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती, ज्यामुळे प्रत्येक काम व्यवस्थितपणे पार पडत होते. शिक्षणाने आपल्या सर्वांचा विकास झाला मात्र शेती ओस पडू लागली. महात्मा गांधीजी खेड्याकडे चला असे म्हणाले यातून त्यांना असा संदेश द्यायचा होता की, खेड्यातील शेती टिकवा. पण ह्याकडे कुणी लक्ष दिले नाही. जो तो शिकून सवरून नोकरी करण्याच्या मागे धावू लागला. शेतकरी दरवर्षी लॉटरीचा खेळ खेळतो कधी त्यात त्याला यश मिळते तर बहुतांश वेळा त्यात अपयशच मिळते, तरी ही शेतकरी नाउमेद न होता दरवर्षी नव्या उत्साहात कामाला लागतो. यावर्षी तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा तो करीत असतो.
शेतकऱ्याने शेतात काम केले तरच देशातील इतर नागरिकांची भूक मिटू शकते, याची जाणीव सर्वप्रथम तयार होणे आवश्यक आहे.  सर्व काही कारखान्यात तयार करता येईल मात्र अन्न म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे पदार्थ निर्मिती करण्यासाठी शेतातच जावे लागते त्याशिवाय पर्याय नाही. शासनाने या शेतकऱ्यांना स्वावलंबी जीवन जगता येईल असे मदत द्यायलाच हवे. कर्जमाफी करून कोणता शेतकरी स्वावलंबी होत नाही उलट तो आळशी बनतो त्यापेक्षा त्याला इतर जोड व्यवसाय कसे करता येतील याची माहिती गावोगावी देऊन शेतकऱ्यांना आज स्वतःच्या पायावर सक्षम उभे करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा आज जो मनोरथ ढासळलेला आहे त्यास कुठे तरी आधार मिळाला पाहिजे. साठ वर्षाच्या वरील वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची आपली योजना खरोखर त्यांना उभारी देईल आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करेल, अशी एक आशावाद निर्माण होत आहे. राजा शिवछत्रपतीच्या काळातील शेतकरी राजा पुन्हा एकदा तयार करण्यासाठी सर्वांनी त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते मात्र तोच पोशिंदा आज कुपोषित होत आहे. त्यास निसर्ग ही।साथ देत नाही आणि सरकार ही अश्या दुहेरी कोंडीत तो सापडतो. प्रत्येकजण त्यास लुबाडण्यासाठी सज्ज असतो. बियाणे वाले लुबाडतात, खत वाले लुबाडतात आणि व्यापारी देखील लुबाडतात. या अश्या परिस्थितीमुळे त्याची खूपच बिकट अवस्था होते. त्याच्या विषयी मनात कोणालाही कणव निर्माण होत नाही किंवा खंत वाटत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या देशातील शेतकरी हा एक महत्वपुर्ण व्यक्ती आहे. म्हणून प्रत्येकांनी त्याच्या कार्याला त्रिवार सलाम द्यायलाच हवे, त्याला।समाजात सन्मान मिळायलाच हवे. म्हणूनच भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी नारा दिला होता, जय जवान जय किसान. कारण जवान म्हणजे सैनिक हा देशाचे संरक्षण करतो तर किसान हा देशातील लोकांचे पोषण करतो. म्हणून हे दोन्ही देशाचे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लेख प्रकाशित झाल्यावर pdf पाठवून सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...