Saturday 17 October 2015

तस्मै श्री गुरवे नम:

कालच आपण सर्वत्र शिक्षकदिन मोठय़ा थाटात साजरा केला. 'गुरूब्रम्हा, गुरूविष्णू, गुरूदेवो महेश्‍वर: गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला खूप मोठे आदराचे स्थान आहे. गुरूमुळे जीवनातील अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरतो. म्हणूनच पुरातन काळ म्हणजे रामायण व महाभारताच्या काळापासून गुरूला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या काळातील राजे-महाराजे गुरूच्या सल्ल्याशिवाय पुढील मार्गक्रमण ठरवीत नसत. राजे गुरूंना आदर व सन्मान देत असत त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा त्यांचा आदर करीत असत. गुरूच्या मनाविरूद्ध वागल्यास गुरू क्रोधीत होतील,त्यांना संताप येईल आणि रागाच्या भरात शाप देतील अशी भिती सुद्धा लोकांच्या मनात होती. याचाच अर्थ समाजात गुरूचा फार मोठा दबदबा होता. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी करून घेण्याची कला राजा जवळ असणे आवश्यक होती. त्याकाळात गुरूगृही जाऊन विद्या शिकण्याची पद्धत होती ज्यास 'गुरूकूल' पद्धत असे संबोधल्या जाई. परंतु या गुरूकूल मध्ये काही ठराविक लोकांनाच विद्यादान केल्या जात असे. कारण द्रोणाचार्य गुरूंनी एकलव्यास विद्या शिकविण्यास नकार दिला होता परंतु त्याच्या गुरू भक्तीमुळे त्याला ज्ञान मिळविता आले. याचा एक अर्थ आपण असा काढू शकतो की, त्याकाळी सुद्धा गुरूंना शासनाचेच (राजांचे) ऐकावेच लागत असे. राजाच्या परवानगी शिवाय राजगुरूला कोणालाही शिकविता येत नव्हते.

कालाय तस्मै नम: नुसार काळ बदलत गेला आणि त्या अनुषंगाने समाज सुद्धा बदलत गेला. गुरूच्या घरी जाऊन शिकण्याच्या पद्धतीत हळूहळू बदल होत गेला. गुरूची जागा शिक्षकाने घेतली. समाजात आज वेगवेगळया क्षेत्रात वेगवेगळे प्रकारचे गुरू आहेत. मात्र समाजाचा सर्वात जास्त विश्‍वास ज्या गुरूवर आहे तो म्हणजे शिक्षक. परिस्थितीनुसार काळ बदलत राहतो आणि काळानुरूप परिस्थिती बदलते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले, त्यांना शाळेतला गुरू लाभलाच नाही तर ते एवढे मोठे साहित्यिक कसे झाले? गुरूदेव रविंद्रनाथ टागोर एक दिवस शाळेत जाऊन एवढे महान कवी कसे बनले? कवयित्री बहिणाबाई चौधरी एकही दिवस शाळेत न जाता प्रसिद्ध साहित्यिक कसे बनू शकल्या? तर त्याचे उत्तर आहे अनुभव. त्यांचा गुरू होता अनुभव आणि विलक्षण बुद्धीमत्ता यामुळे ते शक्य झाले. परंतु आपण सामान्य असलेले व्यक्ती आपणाला पदोपदी मार्गदर्शन करणारे, दिशा देणारे आणि रस्त्यावरून चालवत नेणार्‍या गुरूची गरज भासते. गुरूविना आपले जीवन अपूर्ण आहे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अपार कष्ट सोसले. लोकांकडून त्यांचा खूप छळ केला गेला पण त्यांनी शैक्षणिक काम थांबविले नाही. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात फुले दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपणास गाव तेथे शाळा बघायला मिळत आहे.

मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असे सध्या जे बोलल्या जात आहे ते महात्मा फुलेंनी सन १८८२ मध्ये हंटर कमिशनच्या समोर दिलेल्या साक्षी मध्ये म्हटले जाते. परंतु त्यांना त्याकाळी अनेक वाईट प्रसंग आणि अनुभवास तोंड द्यावे लागले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली परंतु त्या ठिकाणी श्किविण्यासाठी कोणीच तयार होईना. शिकविण्याचे काम बर्‍याच जणांना तुच्छतेचे वाटत असे. तसेच शिकविण्याचे काम हे येड्यागबाळ्याचे नाही. त्यासाठी खूप मोठी विद्या जवळ असावी लागते असा समज होता. परंतु जोतिबांनी आपल्या निरक्षर पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला शिकविले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान दिला. समाजात गुरूला कोणत्या संकटाला, त्रासाला तोंड द्यावे लागत होते याची प्रचिती यावरून आपणाला येते. समाजात हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. शिक्षणाचे महत्व लोकांना कळू लागले. देशातील नेते आणि पुढारी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागले. शिक्षणाविषयी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.' त्याच सोबत ते लोकांना स्वत:चा समाजाचा विकास करायचा असेल तर 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र दिला. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर श्क्षिणाचा खेडोपाडी दरी खोर्‍यात प्रसार केला. शाळा तर उघडल्या जात होत्या मात्र त्यांना शिकविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. सन १९९0 च्या दशकापर्यंत मुलांना शिकविण्यासाठी 'शिक्षक' म्हणून नोकरी करण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या फारच कमी होती. कारण या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजलं जात असे. त्यामुळे सहसा कोणी पुढे येत नव्हते. जे शिक्षक म्हणून काम करीत होते ते कधी तिकडे व्यवसाय म्हणून पाहिले नव्हते. ती त्यांची एक प्रकारे सेवा होती. असा त्यांचा स्वभाव होता.

निस्व:र्थ म्हणता येणार नाही परंतु जेवढे मिळते तेवढय़ावर समाधान मानून सेवाभावी मनाने काम करणारी शिक्षक मंडळी समाजात मानाचे स्थान मिळवून गेले.

आज शाळेतील शिक्षक मंडळी तणावाखाली वावरत आहेत असे म्हटले तर शिक्षकी पेशा सोडून जी मंडळी आहे त्यांना हसू येते आणि विनोदबुद्धी सुचते. मात्र जे या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना हे सत्य आहे असे वाटेल. शाळेमधून मुलांवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांनी करणे खरे तर आवश्यक आहे. मात्र किती शाळेतून मुलांवर संस्कार केले जातात. याची चाचपणी केल्या जात नाही. कारण आज त्यांना अभ्यासक्रमासमोर संस्कार काहीच वाटत नाही. येथूनच समाज रसातळाला जाणे प्रारंभ झाली म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. समाजात आज सुद्धा तस्मै श्री गुरवे नम: ची खरी गरज आहे. फक्त शिक्षक दिन आले म्हणून शिक्षकांचा सन्मान किंवा सत्कार न करता या दिवसांसारखे रोजच त्यांना सन्मान देणे खरेच गरजेचे आहे असे वाटते.

नागोराव सा. येवतीकर
मो. ९४२३६२५७६९

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...