Wednesday 1 November 2017

राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती

राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती

शाळेत शिकत असताना गुरुजी मुलांना संगत की, राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीमध्ये स्तब्ध उभे रहावे, कसल्याही प्रकारचे हालचाल करू नये. तसे केल्यास राष्ट्रगीताचा अपमान समाजल्या जातो. या सूचनेचे पालन करीत मुले रांगेत उभे राहून सरळ समोर पाहत ताठ मानेने राष्ट्रगीत एका सुरात आणि तालबध्द पद्धतीने म्हणतात. अश्या या रोजच्या कृतीमुळे मुलांमध्ये राष्ट्राभिमान जागृती करता येते. देशातील प्रत्येक शाळेची सुरुवात ही राष्ट्रगीताने होते. कधी कधी पावसाळ्याच्या दिवसांत बाहेर भरपूर पाऊस चालू असतो अश्या वेळी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी मैदानात जाता येत नाही त्यावेळी वर्गावर्गात राष्ट्रगीत म्हटले जाते. त्याशिवाय शाळेची सुरुवात केल्यास दिवसभर काही तरी हरवल्यासारखे अस्वस्थ वाटते. अगदी लहानपणापासून आपल्या मनात राष्ट्राविषयी स्वाभिमान जागे करण्याचे काम या राष्ट्रगीतामार्फत केल्या जाते. नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या जगप्रसिध्द पुस्तकातील जन गण मन हे काव्य भारताचे राष्ट्रगीत म्हणून सन 1950 मध्ये स्विकार करण्यात आले. त्यपूर्वी 27 डिसेंबर 1911 मध्ये कोलकताच्या राष्ट्रीय अधिवेशनात हे गीत सर्वात पहिल्यांदा गायिले गेले. प्रत्येक देशाला एक राष्ट्रगीत असतेच ज्यातून त्या देशाची इत्यंभूत माहिती दिली जाते. त्या देशाचा इतिहास आणि परंपरेची माहिती देखील यातून मिळते म्हणूनच राष्ट्रगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अश्या या देशाभिमान जागृत करणाऱ्या राष्ट्रगीताविषयी काही बोलले जाते तेच मुळात चुकीचे आहे. एकीकडे राजस्थानच्या जयपूरचे महापौर अशोक काटोल यांनी दोन वेळा राष्ट्रगीत सक्तीचे केले आहे म्हणून चर्चेचा विषय ठरतो तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायलयातील एका सेवानिवृत्त न्यायाधीशाने राष्ट्रगीत चालू असताना उभे रहाणे बंधनकारक नसावे असे म्हटले आहे. यावरून मग देशात चर्चेला सुरुवात होते. अन्य कुणी तरी हा विषय न्यायालयात दाखल करतात. म्हणजे हे सर्व असहिष्णुतेचे लक्षण आहेत. दिवसेंदिवस लोकांमधील देशाभिमान आणि देशभक्ती कमी कमी होताना दिसून येत आहे. याला कारण देखील भरपूर असतील. मात्र आज भारतात जे काही चित्र पाहायला मिळत आहे त्यास अनेक बाबी कारणीभूत आहेत. सर्वात पहिल्यांदा म्हणजे शालेय स्तरावर जे राष्ट्रगीत चालते ते फक्त दहाव्या वर्गापर्यंतच्या शाळेतच चालते. मुले कॉलेजमध्ये गेले की, त्यांना राष्ट्रगीताचा विसर पडतो. कारण इयत्ता अकरावी वर्गापासून मुलांना राष्ट्रगीत सक्तीचे नसते. कॉलेजमध्ये फक्त राष्ट्रीय सणाच्या म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशीच राष्ट्रगीताची धुन ऐकण्यास मिळते. त्यामुळे येथील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे राष्ट्रगीताविषयीचे प्रेम हळूहळू संपुष्टात येते. म्हणून कॉलेजमध्ये देखील राष्ट्रगीत म्हणायलाच आहे. विद्यापीठमधून देखील राष्ट्रगीत म्हटले तर देशभक्ती जागृत राहु शकेल. एक ठराविक वेळ ठरवून कॉलेज आणि विद्यापीठामधून राष्ट्रगीत चालू करणे आवश्यक आहे. तरच लोकांमध्ये देशभक्ती जागृत राहील. कळत्या आणि समजदार वयात हे राष्ट्रगीत त्यांच्या कानावर जात नाही त्यामुळे ते सदरील विषय गंभीरपणे घेत नाही. सर्व सरकारी कार्यालयाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोण वेळेवर उपस्थित राहतात याची ही माहिती होईल. सध्या ऑफिसमधले कर्मचारी आणि अधिकारी केंव्हाही येतात आणि केव्हाही जातात. अश्या वागणुकीवर नक्की बंधने येतील. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीताने झाली तर कार्यक्रमात खुप उत्साह आणि चैतन्य दिसून येते. चित्रपट सुरु होण्यापूर्वी सिनेमागृहात राष्ट्रगीतची धुन वाजविण्याची सक्ती योग्य वाटते. कभी ख़ुशी कभी गम या चित्रपटात सर्वप्रथम राष्ट्रगीताचा वापर झाला. त्यावेळी चित्रपट चालू असताना तो राष्ट्रगीताचा प्रसंग आल्यावर अनेक मंडळी सिनेमागृहात उभे राहिले होते. राष्ट्रगीताचा सिनेमात शक्यतो वापर करू नये.  जागतिक पातळीवर एखादा सामना सुरु होण्यापूर्वी त्या त्या देशाचे राष्ट्रगीता ची धुन वाजविली जाते. त्यातून एक प्रकारे राष्ट्रभक्ती प्रकट होते. म्हणून राष्ट्रगीताविषयी आपल्या मनात किंतु, परंतु अशी शंका मनात न आणता राष्ट्रगीत आपल्या कानावर पडले की ज्यांचे पाय आपोआप उभे होण्यासाठी उठतात, त्यांच्या मनातच खरी राष्ट्रभक्ती असते, असे वाटते. राष्ट्रभक्ती दाखविण्यासाठी कुण्या कायद्याची निश्चित अशी गरज नाही.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

3 comments:

  1. प्रत्येक भारतीयाच्या रक्तातच राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती भिनली पाहिजे.जय हिंद !

    ReplyDelete
  2. येवतीकर सर ह्या गोष्टीमुळे राष्ट्रभक्ती अंगात भिनली जाते जयहिंद

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...