Friday 7 February 2020

शिक्षकांच्या बदल्या

*शिक्षकांची ऑनलाईन बदली ऑफलाईन होणार ?*

शिक्षकांच्या बदल्या हा नेहमीच एक चर्चेचा विषय ठरत आला आहे. त्याला कारण ही तसेच आहे, शिक्षकांची संख्या भरपूर आहे. गावोगावी असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे सरकारी शाळेत शिकविणारे व्यक्ती म्हणजे प्राथमिक शिक्षक आणि या सरकारी कर्मचाऱ्यांवर गावातील लोकांपासून मंत्रालयाच्या आमदारापर्यंतचे लोकं विशेष लक्ष देतात. म्हणून तर शिक्षकांच्या बदल्या हा चर्चेचा गुऱ्हाळ ठरत असतो. तसं तर मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत हे गुऱ्हाळ सुरू होते मात्र यावेळी जरा लवकरच सुरू झाले कारण नुकतीच एक बातमी पेपरात झळकली की, शिक्षकांच्या बदल्याचे धोरण बदलण्यात येणार. ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या बदल्यावर चर्चा करण्यासाठी एक अभ्यासगट नेमण्यात आले असून त्यांच्या अहवालानुसार पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांसह अनेक लोकांचे त्या धोरणाकडे लक्ष लागले आहे. 
ऑनलाईन बदल्या - तत्कालीन शासनाने दोन वर्षांपूर्वी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यास सुरुवात केली. ही प्रक्रिया अगदी सुरुवातीला खूपच किचकट वाटली. यात संगणकीय प्रणालीद्वारे राज्यात एकदाच बदली करण्यात आली होती. ज्यात शिक्षकांना त्यांच्या पसंदीचे वीस शाळा निवड करून माहिती इंटरनेटच्या माध्यमातून भरायचे होते. ही माहिती भरत असतांना अनेक शिक्षक आणि शिक्षिकांना रात्र जागून काढावे लागले होते. ज्यांच्या घरी संगणक आणि इंटरनेटची सोय नव्हती त्यांना कॅफेमध्ये जाऊन किंवा इतरांच्या घरी जाऊन भरावे लागले. या सर्व प्रक्रियेत बहुतांश शिक्षकांचे उन्हाळी सुट्या संपून गेल्या, याचा अनेकांना त्रास झाला, हे मान्य करावेच लागेल. पण दुःखानंतरच सुखाचे दिवस येतात आणि तेंव्हाच सुखाचे महत्व कळते.  31 मे रोजी सर्व प्रक्रिया पूर्ण करून शाळा सुरू होण्यापूर्वी राज्यातल्या सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्या आणि शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन शाळेवर नवीन शिक्षक रुजू झाले. ज्यांना वीस पसंदीचे शाळा देऊनही शाळा भेटली नाही ते विस्थापित झाले. अश्या शिक्षक मंडळींना ही ऑनलाईन प्रक्रिया चांगली नाही असे वाटणे साहजिक आहे. मात्र यात बदली करणाऱ्या यंत्रणेची काही चूक नाही. कारण या मंडळीनी प्रक्रियेचा अभ्यास न करता पसंदीचे शाळा निवडले असावे किंवा सर्वात ज्युनियर असल्यामुळे त्यांना जवळच्या शाळा उपलब्ध नव्हते. तरी देखील पुढील टप्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. शिक्षकांचे संवर्ग एक ते चार असे प्रकार पाडून कोणावर ही अन्याय होणार नाही याची काळजी देखील घेतल्या गेली. संपूर्ण बदलाच्या प्रक्रियेत 90 टक्के शिक्षक आनंदी असलेले दिसून आले. फक्त 10 टक्के शिक्षकांना त्याचा त्रास झाला. संवर्ग एक मधील अनेक शिक्षकांना पहिल्याच पसंदीची शाळा मिळाली. ज्यामुळे त्यांची याबाबत कसलीही ही तक्रार नाही. ते या ऑनलाईनच्या बाजूने आहेत. पती पत्नी एकत्रिकरण करण्यात थोडा बहुत शिक्षकांना त्रास झाला. तर बहुतांश शिक्षक पती पत्नींना एकाच शाळेवर किंवा नजीकच्या शाळेत जागा मिळाली. पती पत्नी एकत्र शाळेत जाण्याचा योग या बदल्यामुळे मिळालं. दुर्गम भागात काम केलेल्या शिक्षकांना देखील पहिल्या पसंदीचे गाव मिळाले. त्यामुळे त्यांची देखील या बदलाच्या धोरणाविषयी तक्रार नाही. ते देखील याच बाजूने आहेत. राहिला प्रश्न सर्वसाधारण संवर्ग चार मधील शिक्षकांना सेवाजेष्टतेनुसार शाळा मिळाल्यामुळे ज्युनियर शिक्षकांना त्याचा खरा त्रास जाणवला. या संपूर्ण बदली प्रक्रियेत संवर्ग चारमधील शिक्षकांना थोडा मानसिक त्रास झाला पण बदलीसाठी द्यावा लागणारा अमाप पैसा वाचला हे सत्य स्वीकारावे लागेल.
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचा सर्वांगीण विचार केल्यावर यात ज्या त्रुटी असतील त्या दूर करून ही प्रक्रिया जशास तसे चालू ठेवावे असे अनेक शिक्षकांच्या मनात आज ही कायम आहे. पण यात काही बदल झाला आणि पूर्वीप्रमाणे प्रक्रिया सुरू झाली तर परत एकदा पैश्याचा घोडेबाजार चालू होणार यात शंकाच नाही. ज्या शिक्षकांचे लोकप्रतिनिधीसोबत चांगले संबंध आहेत त्यांच्या बदल्या सोईनुसार होतील आणि ज्या शिक्षकांचे कोणीच वाली नाहीत त्यांना परत एकदा दुर्गम भागात, शहरापासून दूर, वाडी-तांड्यावर, दऱ्याखोऱ्यात नोकरी करावी लागेल. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीचे अधिकार या ऑनलाईन बदलीमुळे कमी झाले आहेत ही गोष्ट फक्त लक्षात घेऊन या धोरणात बदल करण्यात येऊ नये. पूर्वी बदल्याचे आदशात कित्येक वेळा बदल केला जात होता. शासकीय अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधीचा दबाव असायचा त्यामुळे ते देखील काही करू शकत नव्हते. ऑनलाईन बदल्याने सर्वात जास्त डोकेदुखी कमी झाली ती अधिकारी वर्गाची. अनेक शिक्षक बदली झालेल्या शाळेवर रुजू होण्याऐवजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत चकरा मारत असे. हे सारे चित्र ऑनलाईन बदलीमुळे बदलून गेले आहे. या प्रक्रियेत ज्यांची बदली झाली त्यांना शाळेवर तात्काळ रुजू होणे अत्यावश्यक केले होते. त्यामुळे ज्या भागात कोणी जायला तयार होत नव्हते तेथे जाणे त्यांना भाग पडले. विरोधाला विरोध म्हणून किंवा जुन्या शासनाचे नियम बदलावेच अशी भावना मनात न ठेवता निर्णय घेतले जाणे अत्यावश्यक आहे. तसेच शिक्षक संघटना देखील शिक्षकांची बाजू समजून घेऊन या बदल्याच्या धोरणात आपले मुद्दे मांडायला हवे आहेत. शिक्षकांच्या संघटना देखील आपलं हित न पाहता सर्वसमावेशक शिक्षकांचे हित लक्षात घेऊन बाजू मांडायला हवी. शिक्षक संघटनकडे कोणता शिक्षक जातो ? ज्याच्यावर अन्याय झाला तोच शिक्षक जाऊन आपल्या व्यथा मांडतो. ज्याच्यावर अन्याय झाला नाही तो कशाला जाईल संघटनेकडे. दुःखी कष्टी शिक्षकांना न्याय मिळायलाच हवे. पण त्याची दुसरी बाजू देखील पाहणे आवश्यक आहे. म्हणून संघटनेतील नेत्यांनी दोन्ही बाजू विचारात घेणे आवश्यक आहे, असे वाटते. एकंदरीत शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत बदल करून ते ऑफलाईन करणे म्हणजे शिक्षण क्षेत्रात संगणकीय प्रणालीने केलेल्या बदल्या हे सर्व विभागासाठी एक आदर्श प्रणाली ठरली होती. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन झाले होते. ते सर्व बाहेर फेकून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे होय. राज्यातील बहुतांश शिक्षक बदल्याचे धोरण बदलू नये याच विचारात असल्याचे सध्या तरी दिसत आहेत. जर यदाकदाचित यात बदल झाला तरी शिक्षक मंडळी त्याच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, 9423625769

8 comments:

  1. नवीन बधली धोरण चुकीचे आहे

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर ,
    मी सहमत आहे

    ReplyDelete
  3. फक्त 10 वर्ष प्रशासकिय,व 5 वर्षोत विनंती असा निकष असावा.पण बदल्या online च असाव्यात.संवर्ग1,2 साठी थोडे निकष बदल असावे.

    ReplyDelete
  4. ऑलाईन बदल्या झाल्या पाहिजेत

    ReplyDelete
  5. [06/02, 18:23] SakhareVishvanath Shivaji: *27फेब्रुवारी 2017 मधील बदली प्रक्रियेत अपेक्षित बदल .बदली ऑनलाइन हवी पण सुधारणा असाव्यात.* 🔴सर्वात अन्यायकारक संवर्ग 4 मध्ये Junior ला senior ने खो खो देण्याची पद्धत बंद व्हावी. 🔴 पेसा क्षेत्रात आधी काम केल्याना बदली अधिकार मिळावा त्यांना बदली ऐच्छिक असावी. सर्वांच्या आधी पेसा व अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या होणे आवश्यक आहे. 🔴पती-पत्नी एकत्रीकरण असावे विभक्तीकरण असू नये. खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. 1)जिल्हयातील सर्व संवर्गाची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर त्यांनी ज्या जागांची पसंती दाखवली तेथील जागेवरील विस्थापित शिक्षकाना संवर्ग 1,2,3 यांच्या रिकाम्या जागा दाखवल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांच्या चांगल्या जागा देखील विस्थापित शिक्षकांना मिळतील. 2) विस्थापित शिक्षकांना 3 वर्षानंतर बदली अधिकार शिक्षकांचे स्थान मिळावे त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर त्यांची गैरसोय प्राधान्यानं दूर होईल. 3) दोन वर्षात जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 90 टक्के शिक्षकांची सोय झाली आहे त्यामुळे आता त्यांना बदली नको असेल याबाबीचा देखील विचार व्हावा. त्यामुळे बदली मागणारे शिक्षक यांची 10%विभागणी संवर्ग 1,2,3 करून ते जिल्ह्यातील त्यांच्या पसंतीच्या जागा घेतील व त्याजागी विस्थापित शिक्षक याना समुपदेशन द्वारे पाठवून 3 वर्षात त्यांना बदली अधिकार द्यावा. 4) बदल्या टप्याटप्याने व्हावेत. 5) नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षा , शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी अधिक वेळ देऊन मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना मु.अ. गटशिक्षणाधिकारी यांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळावे. अश्या शिक्षकांचे बदली ही ऐच्छिक असावी. 6) स्तनदामाता 2 वर्ष व गरोदर माता याना एकूण 3 वर्षे बदली पात्र नसावेत. 7) 30 किमी अंतरातील पती पत्नी यांना बदली ऐच्छिक ठेवावी. कारण 30च्या बाहेर गेल्यावर पुन्हा संवर्ग 2 चा दर्जा देण्यापेक्षा बदली ऐच्छिक ठेवली तर संयुक्तिक वाटते. मागील वर्षीच्या त्रुटीतील सर्वात मोठी त्रुटी होती. 30 च्या आत देणे शक्य नसल्याने ज्युनिअर ने सिनियर कडे बदली मागण्याचा अन्यायकारक बदल केला गेला. तो तात्काळ रद्द करून 30 किमी च्या आतील व बाहेरील शिक्षकांना दिलासा देने गरजेचे आहे. 8) रिक्त जागा या ऑनलाइन किमान 4 दिवस आधी कळले पाहिजेत कारण जिल्ह्यातील प्रत्येक गाव प्रत्येकाला माहिती करून घेण्यास वेळ हवा असतो. 9) ऑनलाइन तक्रारी करण्याची सुविधा असावी त्यासाठी वेगळी समिती असावी जी त्यावर निर्णय देईल। त्यावर 30 दिवसात निर्णय घेऊन तो निर्णय त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुखास अंमलात आणणे बंधनकारक करावे. 10) संवर्ग 1,2,3 चे पुरावे संगणकात upload करून घेऊन ते तपासून verified झाल्यावरच अर्ज मान्य करून बदली करावी. 11) संवर्ग 1, 2 साठी पुरावे खोटे असल्यास नोकरीतून बडतर्फ करण्याची शिफारस असावी.
    [06/02, 18:23] SakhareVishvanath Shivaji: *हे शक्य नसेल तर रामबाण उपाय पूर्वीचा 11 मे 2014 चा gr लागू करावा त्यात केवळ आपसी बदली रद्द करावी व ज्यांची प्रशासकीय बदली होईल त्यांना 3 वर्षानंतर बदली अधिकार द्यावा तेवढ्याच शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन द्वारे कराव्यात.*

    ReplyDelete
  6. पदवीधर विषय निहाय मॅपिंगच चुकीचे होते या मुळे विषय निहाय बदली साठी शाळा निवड करताना अडचणी आल्या नाईलाजाने बाहेर तालुक्यातील शाळा निवडल्या या मुळे तांत्रिक दृष्ट्या विस्थापित न होता ऑनलाइन बदली होऊन बाहेर तालुक्यत गेलेले असे अनेक बंधू आहे
    मात्र ते विस्थापित नाही मात्र तांत्रिक ऑनलाइन बदली मुळे त्यांच्या वर अन्याय झाला आहे
    फक्त विस्थापित व रँडम च नाहीतर खो खो ने प्रशासकीय कारणाने बाहेर तालुक्यात झलेल्या बडल्याही दुरुस्त व्हाव्यात याची आवश्यकता आहे
    Random व विस्थापित चा च विचार नको सर्वच च विचार करावा

    ReplyDelete
  7. We want only online transfer

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...