Monday 6 August 2018

राष्ट्रीय हातमाग दिवस

" हातमाग उद्योगाला अच्छे दिन "

खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत  खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत होती. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होते आणि त्याच्या मोबदल्यात खाण्यास लागणारे अन्नधान्य मिळत होते. शेतात उत्पादित झालेले धान्य त्याच गावात फिरत राहत होते. पैसा नावाची वस्तू त्यांना माहीतच नव्हते, त्यामुळे जो तो आपापली कामे अगदी चोख आणि व्यवस्थितपणे करीत असत.  यांच्यासाठी गावात बारा बलुतेदार ही पद्धत आस्तित्वात आली होती. ज्यामुळे प्रत्येकाचे काम अगदी सहजपणे कुठलीही समस्या निर्माण न होता पूर्ण होत असे. ज्याचे काम त्या॑नी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी ,चांभारानी चपला शिवाव्यात ,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुनब्यानी शेती करावी,  साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे . मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे . त्या  कापडाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापड जाडजूड, टिकाऊ आणि अनेक वर्षे ते कापड फाटले तरी फाटत नव्हते . उन्हाळ्याच्या दिवसात तर या कापडाला जास्तीची मागणी असते . भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपडा. हा कपडा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागावर विणून तयार करीत असत. आज ही ह्या समाजातील बरीच मंडळी हा उद्योग करतात. देशात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भिवंडी, सोलापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर सारख्या ठिकाणी हा समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे . या समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे कपडे विणणे ; परंतु इंग्रजांनी भारतात येऊन ज्याप्रमाणे इतर व्यवसायावर घाला घातला तसेच या हातमाग उद्योगांवर सुध्दा घाला घातला गेला . इंग्रजांनी भारतात येऊन जाडजुड कपड्यांच्या जागी मऊ तलम व वजनाने हलकी वाटणारी टेरीकॉट कापड तयार करण्याची यंत्रणा आणली आणि या खादी उद्योगाला घरघर सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात 07 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशीचा तीव्र लढा सुरू करण्यात आला  होता.  बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकाने  परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपले बलिदान देऊन स्वदेशीचा लढा सर्वदूर पोहोचविला होता. याच दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती . यावरून विदेशी कपड्याने भारतात किती मोठे साम्राज्य निर्माण केले होते , याची जाणीव होते . भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी या खादी कपड्यांच्या उद्योगाला चालना मिळेल अशी छोटी आशा होती . मात्र झाले उलटेच . खादी उद्योगाला स्वातंत्र्यानंतर सुध्दा घरघर लागली . ज्या समाजातील लोकांचा हा मुख्य व्यवसाय होता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती . या लोकांना पोट भरण्यासाठी इतर कामाच्या शोधात भटकत रहावे लागू लागले यातूनच हा समाज जो पूर्वी एका ठिकाणी स्थिर होता तो संपूर्ण देशात पसरलेला दिसून येतो . तरी ही त्या॑नी मूळ व्यवसाय सोडलेली नाही . आज ही या समाजातील 43 लाख हून अधिक लोक खास करून हातमागाचा व्यवसाय करतात . ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणारी कुटूंबातील महिलांसाठी हाच व्यवसाय उदरनिर्वाहचे एक  साधन आहे. या खादी व्यवसायास चालना मिळावी , प्रोत्साहन मिळावे , आपल्या देशी कापडाचा विस्तार व्हावा यांसाठी भारत सरकारने 2015 यावर्षीपासून 07 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हॅण्डलूम दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे . त्यामूळे सरकारच्या या निर्णयाने भविष्यात खादी हातमाग उद्योगाला अच्छे दिन येतील असा विश्वास करण्यास काही हरकत नाही. आपण सर्व भारतीय नागरिकांनी देखील या उद्योगास चालना मिळावी म्हणून वर्षातून एक तरी खादीच्या कापडाचा पोशाख वापरावे, असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर 
स्तंभलेखक
मु. येवती ता.धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. सर आपला आशावाद सत्यात उतरावा हिच मनोमन इच्छा.लेख अप्रतीम.

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...