Saturday 5 March 2016

🎗* भ्रष्‍टाचार बनलाय शिष्‍टाचार 🎗

‘पाचशे रूपयाची लाच घेताना अमूक कर्मचा-यांस अटक’ अशा आशयाच्‍या बातम्‍या आत्ता रोजच वर्तमानपत्रातून प्रकाशित होत आहे.  कदाचित अशा बातमी शिवाय त्‍या दिवशीचे पेपर पूर्णच होत नसेल!  राज्‍यात कुठे ना कुठे अशी घटना घडतेच.  कारण आज भ्रष्‍टाचार हाच शिष्‍टाचार बनत चालला आहे.  तसेच भ्रष्‍टाचार करण्‍यासाठी ही मंडळी मागे-पुढे अजिबात कसलाही विचार न करता इतरांसोबत वागत असतात.  सरकारी कर्मचारी त्‍यास शासनांकडून त्‍यांच्‍या कुटूंबाचे पालन पोषण होईल, एवढा पगार मिळतो.  तरी सुद्धा त्‍यांची पैसा कमाविण्‍याची लालसा काही केल्‍या कमी होत नाही.  मिळेल त्‍या पगारात जी व्‍यक्‍ती समाधानी असते त्‍याला कुठेच भ्रष्‍टाचार करण्‍याची गरज भासत नाही.  असे म्‍हटल्‍या जाते की, आडमार्गाने कमावलेला पैसा कसा येतो आणि किती येतो हे जसे कळत नाही तसे गेल्‍याचे सुद्धा कळत नाही.  कारण या पैश्‍यांसाठी आपल्‍या शरीरातील घाम गळत नाही.  घामाचा पैसा असेल तर त्‍याचा हिशेब सुद्धा लागतो.  आजकाल झटपट पैसा मिळविणे आणि आपले जीवन सुखी समृद्ध बनविण्‍यासाठी प्रत्‍येकजण आपली नैतिकता वेशीला टांगून अनैतिक कृत्‍य करीत आहेत.  भ्रष्‍टाचाराची सुरूवात घराच्‍या दारांपासून सुरू होते ते थेट मंत्रालयाच्‍या दारात जाऊन पोहोचते.  या दरम्‍यान अनेकांची दारे लागतात, त्‍या त्‍या ठिकाणी भ्रष्‍टाचार दृष्‍टीस पडतो.  म्‍हणजेच भ्रष्‍टाचाराची सुरूवात स्‍वत:पासून करावी लागते.  स्‍वत:पासून मग तो स्‍वत: खासदार असेल, आमदार असेल, उच्‍चपदस्‍थ अधिकारी असेल, साधा कर्मचारी असेल किंवा खाजगी कंपनीत काम करणारा असेल, त्‍यांनी भ्रष्‍टाचार करणार नसल्‍याचे जर ठरविले तर याचा नायनाट होऊ शकतो.
महात्‍मा गांधीजी म्‍हणतात की, कोणत्‍याही चांगल्‍या कामाची सुरूवात स्‍वत:पासून करण्‍यात यावी.  आपण मात्र इतरांकडे बोटं दाखवितो.  त्‍यामुळे कामाची सुरूवात होतच नाही.  या भ्रष्‍टाचाराला सुरूवात अगदी सहजपणे होते, तेव्‍हा आपणाला असे वाटत सुद्धा नाही की, माझ्यामूळे या भ्रष्‍टाचाराला सुरूवात झाली.  एका कार्यालयातील काम संबंधित कर्मचा-याने अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण करून आपल्‍या हाती दिल्‍यानंतर आपल्‍याला आनंद होणारच.  मग त्‍या आनंदाच्‍या भरात आपण त्‍या कर्मचा-याला ‘चला एक कप चहा घेऊ या’ असे म्‍हणणार.  कर्मचारी ही मग आपली टेबल व खुर्ची सोडून चहा पिण्‍यास जाई.  येथूनच मग सुरू होतो ‘चहा-पाण्‍याचा खर्च’.  काही ठिकाणी यापेक्षा वेगळा अनुभव असेल ही कदाचित.  परंतु व्‍यक्‍ती आपल्‍या कामाला जेव्‍हा सुरूवात करतो तेव्‍हा त्‍याला कामाची जाणिव अधिक प्रमाणात असते.  मात्र जसे जसे सेवा वाढत जाते आणि त्‍या क्षेत्रात रूळले जातात तसे तसे कामाला प्राधान्‍य देण्‍याऐवजी ‘चहा-पानाला’ प्राधान्‍य देत असतो.  यावरून आपण निष्‍कर्ष काढू शकतो की, भ्रष्‍टाचाराला सुरूवात कोणी केली, आपण की कर्मचा-याने.  प्रत्‍येक विभागात याचे वेगवेगळे अनुभव येतात  जर यदा कदाचित लाच न घेणारा अधिकारी कार्यालयाला भेटला तर त्‍याचे जीवन हे लोक तंगवून टाकतात.  त्‍याच्‍यावर वेगवेगळ्या स्‍तरांवरून दबाव टाकल्‍या जाते आणि प्रामाणिक असलेल्‍या कर्मचा-यास सुद्धा या भ्रष्‍टाचाराच्‍या खाईत ओढल्‍या जाते.  त्‍यांची ईच्‍छा नसतांना सुद्धा जेव्‍हा भ्रष्‍टाचार करण्‍याची पाळी येते तेव्‍हा त्‍यांना स्‍वत:ला पश्‍चाताप वाटत असेल ही कदाचित परंतु काहीच करता येत नाही.  राज्‍यात असे ही काही विभाग आहेत ज्‍या ठिकाणी भ्रष्‍टाचार न करणे एकप्रकारे अप्रामाणिक समजल्‍या जाते.  लाच घेणारा व्‍यक्‍ती कामाचा निपटारा तात्‍काळ करतो, हे सत्‍य आहे.
भ्रष्‍टाचाराची कीड समाजाला लागली आहे.  ती कीड समूळ नष्‍ट करण्‍यासाठी आपल्‍यात बदल करावा लागेल. माझ्या कामांसाठी मी एक ही रूपाया न देता काम पूर्ण करून घेण्‍याचा निर्धार करणे गरजेचे आहे.  मग त्‍यासाठी दहा वेळा चकरा मारले तरी चालेल असा विचार केल्‍यास यात बदल होऊ शकतो.  एखाद्या कर्मचा-यास लाच लुचपत विभागात पकडून दिल्‍याने समाजातील ही भ्रष्‍टाचाराची कीड नष्‍ट होणार नाही.  या गुन्‍ह्यातून सुद्धा अनेक लोक सुटतात त्‍यामूळे यावर सुद्धा लोकांचा आज विश्‍वास कमी होत चालला आहे.  शेवटी जाता जाता एक बाब सांगावेसे वाटते की, ज्‍या दिवशी एखाद्या गोष्‍टीत भ्रष्‍टाचार करून आपण पैसा कमाविला असेल त्‍या रात्री आपणांस गाढ झोप लागते का?  जर झोप लागत नसेल तर आपण कमाविलेले लाखो रूपये काही कामाचे नाहीत. कारण त्‍या पैशातून झोप विकत घेता येत नाही. इकडे प्रामाणिक काम करणा-या व्‍यक्‍तीला पैसा कमी मिळत असेल परंतु रात्री समाधानाने झोप लागते.  त्‍यासाठी झोपेची गोळी घ्‍यावी लागत नाही.  यावरून प्रत्‍येकाने विचार करावा आणि भ्रष्‍टाचार संपविण्‍यासाठी स्‍वत: पहिले पाऊल उचलावे, याशिवाय भ्रष्टाचार संपविणे शक्‍यच नाही.
- नागोराव सा.येवतीकर
मु.येवती, ता.धर्माबाद
    9423625769 

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...