Sunday, 5 October 2025

कोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri )

कोजागिरी पौर्णिमाचे महत्त्व -

पौराणिक कथेनुसार, एक सावकार होता, त्याला दोन मुली होत्या. सावकाराच्या दोन्ही मुली मनापासून पौर्णिमेचे व्रत करत असत. पण मोठी मुलगी हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि सर्व नियम पाळून करत असे. मात्र, लहान मुलगी व्रत अर्धवट ठेवत असे. त्यामुळे, तिच्या घरात जन्मलेली मुले जिवंत राहत नव्हती. हे पाहून ती खूप दुःखी झाली. एके दिवशी तिने एका ब्राह्मणाला यामागील कारण विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, 'तू पौर्णिमेचे व्रत नियमाने करत नाहीस, म्हणूनच मुझी मुलं लगेच मरण पावतात. मात्र, जर तू पौर्णिमेचे व्रत श्रद्धेने पूर्ण केलीस, तर तुला संततीसुख लाभेल'. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार, सावकाराच्या लहान मुलीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक उपवास केला. त्यानंतर, तिला एक लहान मुल झाला. मात्र, दुर्दैवाने त्या लहान बाळाचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. या घटनेमुळे, ती निराश झाली. पण, बाळाला एका पाटावर ठेवून सावकाराच्या लहान मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले. जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला गेली, तेव्हा तिच्याजवळ असलेली हंडी सावकाराच्या लहान मुलीच्या मृत मुलाला लागला आणि अचानक रडू लागला. हे पाहून तिची मोठी बहीण आश्चर्यचकित झाली आणि आपल्या लहान बहिणीला म्हणाली की, 'जर मी या पाटावर बसले असते, तर हा मुलगा मेला असता ना?' तेव्हा सावकाराची लहान मुलगी म्हणाली, 'हा मुलगा पूर्वीच मृत होता. मात्र, तुझ्या चांगल्या कर्मांमूळेच माझा मुलगा जिवंत झाला'. तेव्हापासून, अशी प्रथा सुरू झाली की, जो भाविक भक्तीभावाने कोजागिरी पौर्णिमाचे उपवास करेल, त्याला चांगले फळ मिळेल.

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात ?
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पितात. ही परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. पौराणिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो. त्यामुळे, दूध आणि इतर पौष्टिक पदार्थांना दैवी गुणांनी युक्त मानले जाते. इतकंच नाही, तर मसाला दुधातील औषधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असते आणि पित्तदोष कमी करण्यास मदत करतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

संकलन - नासा येवतीकर 

Tuesday, 30 September 2025

सेवानिवृत्ती कविता ( Sevanivrutti Kavita )

कर्मचाऱ्यांच्या जीवनातील एक अनमोल क्षण म्हणजे सेवानिवृत्ती. एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू अशी विपरीत स्थिती यावेळी असते. 
कभी खुशी, कभी गम
थोडा ज्यादा, थोडा कम
यानिमित्ताने काही रचना 👇

🌸 सेवानिवृत्ती कविता 🌸

आजचा दिवस खास ठरला,
कर्मभूमीचा प्रवास पूर्ण झाला।
कष्ट, निष्ठा, प्रामाणिकतेची शिदोरी,
घडविली आयुष्यभर सुंदर गोष्टी।

घामाच्या थेंबांनी उजळली वाट,
कर्तव्यपूर्तीतच मिळाली खरी साथ ।
सहकाऱ्यांची सोबत, आठवणींचा खजिना,
हेच ठरेल पुढच्या आयुष्याचा बहाणा ।

आज निरोप नाही, तर आहे नवा आरंभ,
स्वप्नांना देऊ या आता नवा उन्मेष, नवा रंग।
आरोग्य, आनंद, समाधान लाभो तुम्हाला,
आयुष्य फुलोऱ्यांनी भरून राहो सतत घराला।

🌹💐 "सेवानिवृत्ती ही शेवट नाही, नव्या जीवनाची सुरुवात आहे!" 💐🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~
🌸 सेवानिवृत्ती – एक भावनिक क्षण 🌸

आज निरोपाचा क्षण सोहळा हा खास,
डोळ्यांत दाटतोय आठवणींचा प्रकाश।
कष्टाने घडविले आयुष्य वर्षे अनेक 
आज सजवितो आहे नवीन क्षितिज एक 

हास्य, श्रम, अनुभव यांचा असा ठेवा,
राहील कायम सोबत साठवलेला मेवा।
तुमच्या सहवासात उजळल्या वाटा,
आम्हा सर्वांच्या हृदयात उमटल्या गाथा।

सेवा केलीत समर्पणाने, हेच तुमचे दान,
तुमच्या कार्याने सजला शाळेचा मान।
आज विराम असेल, तरी हा शेवट नाही 
नव्या प्रवासात मिळो सुख आणि समृद्धी 

पुढील आयुष्य फुलोऱ्यांनी नटावे,
आरोग्य, आनंद, समाधान लाभावे।
आमच्या मनात आठवणींचा दीप 
सदैव उजळत राहील,
तुमच्या योगदानाचा सुवास 
कायम दरवळत राहील।

🌹💐 “सेवानिवृत्ती हा निरोप नाही, तर नवे स्वप्न पाहण्याचा सुंदर आरंभ आहे.” 💐🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~
📖🌸 सेवानिवृत्त शिक्षकांस अर्पण 🌸📖

ज्ञानदीप तेवत ठेवला आयुष्यभर,
विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले संस्कार।
अंधारलेल्या वाटांना दिला प्रकाश,
घडवले भवितव्य, दिला आयुष्याला विकास।

आपली शिकवण म्हणजे खरा ठेवा,
तोच आमच्यासाठी अमूल्य मेवा।
शब्दांनी दिला आत्मविश्वासाचा हात,
विचारांनी घडवल्या नव्या पिढ्यांच्या वाट।

आज सेवेतून घेत आहात विश्रांती,
तरीही आठवणींनी राहील जुळलेली नाती।
विद्यार्थ्यांच्या हृदयात तुमचे नाव कोरलेले,
तुमचे योगदान सदैव स्मरणात राहिलेले।

देव करो पुढचे आयुष्य सुखमय व्हावे,
आरोग्य, आनंद, समाधान लाभावे।
जसा शिक्षकांचा दीप कधी विझत नाही,
तसेच तुमचे कार्य कधी विसरता येत नाही।

🌹💐 “शिक्षक सेवानिवृत्ती घेतो, पण त्यांची शिकवण कधीच निवृत्त होत नाही.” 💐🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~
🌸📖 आदरणीय शिक्षकांना निरोप 📖🌸

गुरु हेच ज्ञानाचे देवालय,
तुमच्यामुळे उजळले हे विद्यालय 
शिक्षणाची वाट दाखवली प्रेमाने,
जगणे शिकवले आम्हा संयमाने।

वर्गखोलीतले तुमचे शब्द होते अनमोल,
घडवले साऱ्यांचे जीवन सुंदर गोल।
कठीण प्रश्नात सापडला मार्ग नवा
तुमच्या मार्गदर्शनाने मिटला सर्व दुरावा ।

आज सेवेतून घेत आहात विराम,
मन मात्र आलं भरून, अश्रू दाटले डोळ्यांत
तुमच्या आठवणी राहतील कायम सोबत,
शिक्षणरूपी दिला जो वारसा, 
तीच  खरी संगत।

पुढचा प्रवास सुख, आरोग्य, समाधानाचा असो,
आयुष्य नवा आनंदाचा दरवळ घेत राहो।
गुरुचे कार्य कधी संपत नाही,
कारण त्यांच्या शिकवणीनेच पिढ्या घडत राहतात काही।

🌹💐 “सेवानिवृत्ती ही केवळ पदाची, पण शिक्षकत्वाची कधीच नसते.” 💐🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~
🌸 चारोळी १ 🌸
ज्ञानरूपी झाड लावले तुम्ही वर्षानुवर्षे,
विद्यार्थ्यांच्या जीवनात उमलले फुल नवनवीन सरसे।
सेवा संपली आज, पण कार्य राहील जिवंत,
गुरुंचा ठसा असतो आयुष्यभर अमर्याद संत।

🌸 चारोळी २ 🌸
गुरु म्हणजे दीप, अंधारातला प्रकाश,
त्यांच्या शिकवणीतच दडलेला विश्वास।
आज घेतो निरोप, तरी नाती अबाधित राहो,
तुमच्या आशीर्वादाने आमचे जीवन बहरो।


🌸 चारोळी ३ 🌸
सेवानिवृत्ती हा शेवट नाही, नव्या प्रवासाची सुरूवात,
गुरुंचा वारसा देतो जीवनाला खरीच साथ।
आठवणींच्या गंधाने राहील हा सोहळा सजून,
तुमचे योगदान राहील आमच्या हृदयात रुजून।


🌸 चारोळी 🌸

ज्ञानदीप तेवत राहील तुमच्या स्मरणाने,
शिकवण जगेल सदैव तुमच्या नामाने।
सेवा संपली तरी नातं कधी तुटणार नाही,
आपली आठवण हृदयातून कधी जाणार नाही।

संकलन - नासा येवतीकर 

Saturday, 6 September 2025

राजे उमाजी नाईक ( Raje Umaji Naik )

शेतकऱ्यांचा राजा व आद्य क्रांतीकारक - राजे उमाजी राजे नाईक 
राजे उमाजी नाईक (१७९१–१८३२) हे मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक शूर क्रांतिकारक व लोकनायक म्हणून ओळखले जातात. त्यांना "पहिला क्रांतिकारक" असेही संबोधले जाते. ई.स. १७९१ मध्ये भिवडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे त्यांचा जन्म झाला. ते नाईक घराण्यातील होते. लहानपणापासूनच त्यांच्यात शौर्य व न्यायप्रियता होती. सामान्य जनता, शेतकरी व गावकरी यांना ब्रिटिशांच्या अन्यायकारक करप्रणालीमुळे अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. इंग्रजांनी गावकऱ्यांवर लादलेले कर, महसूल व अन्याय याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यांचे साथीदार म्हणजे शेतकरी, धनगर व स्थानिक गावकरी होते. ते "गनिमी कावा" पद्धतीने लढा देत, त्यामुळे इंग्रजांना त्यांना पकडणे कठीण होत असे. इंग्रजांना उमाजी राजे यांच्या लढ्याची भीती वाटू लागली. शेवटी विश्वासघातामुळे ते इंग्रजांच्या ताब्यात आले. इ.स. १८३२ मध्ये पुण्यात त्यांना फाशी देण्यात आली.
त्यांच्या जीवनातील काही प्रसंग खूप महत्वाचे आहेत. 
शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला उमाजी
एकदा ब्रिटिश सरकारचे महसूल अधिकारी एका गावात कर वसुलीला आले होते. शेतकऱ्यांची पिके नीट आलेली नव्हती, त्यामुळे ते कर देऊ शकत नव्हते. पण इंग्रज अधिकाऱ्यांनी निर्दयीपणे कराची वसुली सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची साधने आणि अन्नधान्य जप्त करायला सुरुवात केली. गावकऱ्यांची अवस्था पाहून उमाजी राजे नाईक संतापले. ते थेट त्या अधिकाऱ्यांच्या तंबूत शिरले व म्हणाले, “हा शेतकरी हा आपल्या मायभूमीचा कणा आहे. याच्या घामावर राज्य उभे आहे, आणि तुम्हीच याला लुबाडता ? शेतकऱ्यांवर असा अन्याय मी सहन करणार नाही ! ” असे म्हणत त्यांनी इंग्रजांच्या सिपायांवर झडप घातली. तेव्हा गावकरीही धैर्याने उमाजींना साथ देऊ लागले. इंग्रज सिपाई पळून गेले आणि गावकरी मुक्त झाले. या प्रसंगानंतर शेतकऱ्यांमध्ये उमाजी राजेंविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. लोक त्यांना "शेतकऱ्यांचा राजा" म्हणू लागले.
उमाजी राजे हे शेतकरी–शोषित समाजाचे तारणहार म्हणून ओळखले जात. "शेतकऱ्यांचा राजा" अशी उपाधीही त्यांना लोकांनी दिली.
दुसरा प्रसंग म्हणजे गनिमी काव्याचा प्रसंग
ब्रिटिश सैन्याने उमाजी राजे नाईक व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी एक मोठी छावणी उभारली होती. त्या छावणीत शेकडो सिपाई होते. शेतकऱ्यांना दहशत बसावी म्हणून इंग्रजांनी गावकऱ्यांकडून धान्य व जनावरे जप्त केली होती.
हे पाहून उमाजी राजेंनी आपल्या मावळ्यांना एकत्र केले आणि गनिमी काव्याने हल्ला करण्याचे ठरवले. रात्रीच्या अंधारात ते सर्वजण छावणीभोवती शांतपणे लपून बसले. अचानक त्यांनी मशाली पेटवल्या, शिट्ट्या मारल्या, डफ वाजवले, आणि चारही बाजूंनी "हर हर महादेव!" असा जयघोष करत छावणीवर धावा चढवला.
इंग्रजांना वाटले की हजारो सैनिकांनी छावणी घेरली आहे. घबराटीत त्यांनी शस्त्रास्त्रे व सामान सोडून पलायन केले. उमाजी राजेंनी जप्त केलेले धान्य, जनावरे पुन्हा शेतकऱ्यांना परत दिले. या प्रसंगानंतर शेतकरी अधिक निर्भय झाले आणि उमाजी राजेंची कीर्ती संपूर्ण पुणे-जुन्नर भागात पसरली. इंग्रज मात्र अधिकच चिडले आणि त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले.
त्यांच्या जीवनातील विश्वासघाताचा प्रसंग
उमाजी राजे नाईक इंग्रजांना बराच काळ चकवून गेले. त्यांच्या शौर्यामुळे व गनिमी काव्यामुळे इंग्रजांना त्यांना पकडणे अशक्य झाले होते. इंग्रजांनी मग चलाखीचा डाव खेळला. त्यांनी जाहीर केले, “ जो उमाजींना पकडून देईल, त्याला मोठे बक्षीस व जमीनजुमला दिला जाईल.”
काही लोभी लोक त्यांच्या या प्रलोभनाला बळी पडले. त्यातीलच एकाने उमाजी राजेंचा ठाव इंग्रजांना सांगितला.
एकदा उमाजी राजे आपल्या मावळ्यांसोबत जंगलात विसावले होते. त्यावेळी त्या विश्वासघातकाने इंग्रज सैन्याला गुप्त खूण दिली. अचानक इंग्रज सिपायांनी सर्व बाजूंनी छापा टाकला. उमाजी राजे शूरपणे लढले, पण संख्येने प्रचंड असलेल्या इंग्रज सैन्यापुढे ते पकडले गेले. इ.स. १८३२ मध्ये पुण्यातील फाशीच्या चौकात उमाजी राजेंना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. तेव्हा त्यांनी शेवटचे वाक्य उच्चारले –
“हा बळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे ; माझा आत्मा मुक्त झाला ! ”
अशा रीतीने एका विश्वासघातामुळे शेतकऱ्यांचा राजा, मराठ्यांचा पहिला क्रांतिकारक हरपला. पण आजही त्यांचे नाव ऐकले की लोकांच्या डोळ्यांत आदर व अभिमान दिसतो. महाराष्ट्रात त्यांच्या स्मरणार्थ पुतळे, स्मारके उभारण्यात आली आहेत.
थोडक्यात, उमाजी राजे नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी, अन्यायाविरुद्ध व स्वराज्यासाठी इंग्रजांविरुद्ध झुंज देऊन आपले प्राण अर्पण केले. ते मराठी जनतेच्या मनात आजही क्रांतिकारक आदर्श म्हणून जिवंत आहेत.
त्यांच्यासाठी ही कविता 
🌾 उमाजी राजेंची शौर्यगाथा 🌾

होता शेतकऱ्यांचा राजा, 
जनतेचा होता आधार, 
उमाजी नाईक तो शूरवीर
अन्यायाशी सदैव लढणार

गनिमी कावा शास्त्राने
इंग्रजांच्या छातीत धडकी भरली 
गावकऱ्यांच्या हक्कासाठी 
इंग्रजी सिपाईवर झडप घेतली 

उमाजीची पसरली कीर्ती 
इंग्रजाची डोकेदुखी वाढली 
मग केला जालीम उपाय 
लाखोची बक्षीस जाहीर केली 

काही लोकांना झाला लोभ 
उमाजीचा विसरला त्यांनी त्याग 
राहण्याचा सांगून ठावठिकांना
पकडून दिले उमाजी नाईकाना 

असा विश्वासघात त्यांचा झाला
पण ते झुकले नाही कधी
त्या फाशीच्या दोरीवरही 
झळकली त्याची जिद्दी

आजही संपूर्ण महाराष्ट्रात 
गायली जाते त्यांची गाथा,
उमाजी राजे नाईक म्हणजे 
आपल्या स्वातंत्र्याचा प्रणेता

नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Friday, 5 September 2025

गणपती बाप्पा मोरया ( Ganpati Bappa Morya....)

सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप
सुमारे दीडशे वर्षे भारत देशावर इंग्रज लोकांनी राज्य केले आणि त्यांनी लोकांचा अतोनात छळ करू लागले. त्यांच्या त्रासाला सर्व जनता पुरती कंटाळून गेली होती. त्या अन्यायाला तोंड देण्यासाठी 1900 च्या दशकात एका युगपुरुषाने पुढाकार घेतला त्याचे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. समाजात जागृती निर्माण होण्यासाठी त्यांनी मराठा व केसरी यासारखे वृत्तपत्र चालू केले आणि त्यातून इंग्रज सरकारवर सडेतोड लेख लिहून प्रहार करू लागले. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय ? अश्या अग्रलेखामुळे इंग्रज सरकार हादरुन गेले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळावणारच अशी सिंहगर्जना केली. लोकांना सुद्धा लोकमान्य यांच्या प्रसार माध्यमामुळे बरीच माहिती मिळत होती आणि लोक जागृत होत होते. फोडा आणि राज्य करा अशी नीतिमत्ता असलेले इंग्रज सरकार लोकांत एकीची भावना निर्माण होऊ नये आणि जनता एकत्र येवू नये यासाठी लोकावर वेगवेगळी बंधने टाकत असे. कोणत्याही व्यक्तीला ते एकत्र येऊ देत नव्हते याचसाठी लोकमान्य टिळकानी यावर उपाय योजण्याचे ठरविले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून घरोघरी भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केल्या जात असल्याची नोंद इतिहासामध्ये दिसून येते. याच बाबीचा विचार करून सन 1896 मध्ये लोकमान्य टिळकानी घरोघरी बसणाऱ्या या  गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले. त्यास आज 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ज्या उद्देशाने हा उत्सव चालू केला होता त्या काळात ते अत्यंत गरजेचे आणि आवश्यक होते. इंग्रज सरकार लोकांना एकत्र येऊ देत नसताना लोकमान्य टिळकानी लोकांना एकत्र येऊन चर्चा करावी यासाठी ही युक्ती केली आणि त्यात ते  यशस्वीही झाले. पण आज समाजात सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरी होत आहे याचा जर विचार केला तर, नको हे गणेशोत्सव असे म्हणण्याची आपल्या वर वेळ आली आहे असे वाटते.
खरोखरच आज लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील सार्वजनिक गणेशोत्सव आहे का ? त्याचे उत्तर नाही असेच येते कारण आज हा उत्सव वेगळ्या स्वरुपात दिसत आहे यावर थोडे चिंतन करने आवश्यक आहे, असे वाटते.
गणेशोत्सवाच्या नावाखाली अकरा दिवस मंडळातील लोकांची खूप हौस होते. रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली वेगवेगळे उदयोगधंदे केले जातात. मंडळाकडून समाजोपयोगी कार्य करायचे तर दुरच, समाजाला त्रास देण्याचे काम केले जाते असे चित्र प्रत्येक ठिकाणी दिसून येते. गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत आहेत की खंडणी मागत आहेत तेच कळायला मार्ग नसतो. मुले आपल्या माघारी काय करीत आहेत याची जराही कल्पना आई बाबाला लागू देत नाहीत. आपल्या मनाप्रमाणे वागण्याची ही एक सुवर्ण संधी असते या मंडळातील युवकांना. अकरा दिवसानंतर अनंत चतुर्दशी म्हणजे विसर्जनच्या दिवशी तर युवकांचा गोंधळ पाहूच नये असे वाटते. कान बधिर होतील एवढ्या मोठ्या आवजात गाणे लावणे बेधुंद होऊन नाचणे यामुळे या उत्सवाला एक वेगळे स्वरूप मिळाले आहे. समाजाशी आमचे काही देणे घेणे नाही अश्या विचाराने वागणारी ही मंडळी वर्गणी मागत असताना फारच कनवाळु होतात. अमुक एवढे दिलेच पाहिजे असा हट्ट धरतात. असे करून मंडळाकडे भरपूर प्रमाणात पैसा जमा होतो. वास्तविक पाहता जी काही वर्गणी जमा केल्या जातो तो पूर्ण खर्च करायचा असतोच असे मंडळातील प्रत्येकजण विचार करतो. पण यातील रक्कम वाचवून आपण समाजासाठी काही विधयाक कार्य करू असा विचार करणारी गणेश मंडळ फार कमी प्रमाणात आढळून येतात. खरोखरच वर्गणी म्हणून जमा झालेल्या रक्कमेचे काय करायचे यावर एकदा तरी मंडळाने विचार केला आहे का ? जी गणेश मंडळी याचा विचार केले असतील त्यांचे त्रिवार अभिनंदन आणि ज्यानी काहीच विचार केला नाही त्यांनी विचार करायला सुरु करुन याच वर्षी त्याची अंमलबजावणी केल्यास पुढील वर्षी याचा  आपणास अजुन चांगला फायदा होतो आणि वर्गणीमध्ये भरपूर रक्कम पुढे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीचा विचार न करता आपण ती जमा झालेली पूर्ण रक्कम उड़वतो म्हणजे अजिबात काटकसर न करता खर्च करतो. दरवर्षी या गणेशोत्सवावर साधारणपणे 1200 कोटी रुपये खर्च केल्या जातो असा एक प्राथमिक अंदाज आहे. यावर आपण कधीतरी गांभीर्याने विचार केला आहे काय ? कधीही विचार करण्यात आला नाही हेच सर्वांचे उत्तर असेल त्यामुळे यापुढे या सार्वजनिक उत्सवातुन सामाजिक उपक्रम कसे राबविता येईल याचा विचार सर्वानी मिळून करू या.
रोजचे वृत्तपत्र म्हणजे पेपर हे सर्वाचे आवडती बाब आहे. आज ही ग्रामीण भागात कोणाच्या हातात पेपर दिसले की त्याला पेपर मागण्याचा मोह आवरता आवरत नाही .याच गोष्टीचा विचार करुन गावातील लोकांची वाचनाची भूक या निमित्ताने शमविण्यासाठी रोज एक पेपर गणेश मंडळीकडून मागविण्यात आले तर किती छान राहिल ! साधारणपणे एका पेपरसाठी महीनाकाठी 150 रु या हिशेबाने एका वर्षात 1800 रु होतील पहिल्या वर्षी हा प्रयोग करून पाहण्यास काही हरकत नसावी. मग यातून अनेक मार्ग पुढे मिळत राहतात. याच माध्यमातून गावातील लोक, युवक हे सर्व एकत्र येतील. काही गोष्टीवर चर्चा होईल आणि मग माणसा-माणसातील आपुलकीमध्ये वाढ होईल .याचा फायदा एक होऊ शकेल की पुढील वर्षी न मागता ही तुमच्या गणेश मंडळाला मोठ्या स्वरुपात देणगी मिळेल. गावातील काही गरीब आणि होतकरु मुलांसाठी 2 - 3 हजार रूपयांची स्पर्धा पुस्तके आणुन दिल्यास, त्याचा ते त्यांचा अभ्यास करीत राहिल्यास नोकरी मिळण्यासाठी एक संधी मिळू शकते. दरवर्षी असे पुस्तक जमा करण्याची परंपरा कायम केल्यास पुढील पिढी याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केल्यास गावात किती पुस्तके जमा होतील ? याचा कधीच आपण गंभीरतेने विचार केलेला नाही. झाले गेले विसरून जाऊन यावर्षी तरी या उपक्रमास आपण सुरुवात केली तर त्यांचा फायदा भविष्यात नक्कीच पहायाला मिळेल.
श्रीची मिरवणूक किंवा विसर्जन मोठ्या आनंदाच्या भरात करावी याबाबत माझे दुमत नाही. मात्र वायफळ खर्चाला फाटा देऊन शिल्लक रक्कमेमधून असे काम केल्यास कोणी वाईट म्हणणार आहे का ? नक्कीच नाही. पण आपण असा विचार करीतच नाही, हीच आजपर्यंत आपली झालेली फार मोठी चूक म्हणण्यास हरकत नाही. वाईट काम करताना लोक काय म्हणातील याचा विचार करावा, चांगले काम करताना कोणी काही म्हणत नाहीत, उलट प्रोत्साहन देतात 
गणेश उत्सवाच्या अकरा दिवसाच्या काळात फक्त D J चे गाणे लावून नाचगाणे करण्यापेक्षा काही तरी उदबोधक आणि मनोरंजक गोष्टी केल्यास गावातील आणि गल्लीतील सर्वाना हे अकरा दिवस हवेहवेसे वाटतील. रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, एकांकिका नाटक, दोरी वरील उडी यासारख्या विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करून लोकांना आवडेल असे केल्यास या उत्सवाचा उद्देश्य सफल झाल्या सारखे होईल. एखाद्या भागवत सप्ताह मध्ये ज्या पध्दतीने लोकांच्या जनजागृतीसाठी भजन किंवा कीर्तन केल्या जाते अगदी त्याच प्रकारे या उत्सवाच्या काळात रोज एका साहित्यिक किंवा समाज सुधारक व्यक्तीचे व्याख्यानाचे आयोजन करून त्याची अंमलबजावणी केल्यास साहित्याला प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन साहित्यिक मंडळी तयार होतील. गेल्या वर्षी असे एक मंडळ वाचण्यात आले होते ज्यानी अश्या पध्दतीने नियोजन तयार केले होते. गावातील बाल-गोपाळ, युवक तसेच वृद्ध लोकांना सुध्दा याचा फायदा झाला असे तेथील लोक आपल्या अनुभव सांगताना बोलत होते.
काही दिवसापूर्वी सोशल मीडिया मध्ये वाचाण्यात आले होते की यावर्षी गणेश उत्सवाला प्रत्येक जण श्रीगणेशाला एक वही दान द्यायचा असा विचार जर प्रत्येकानी केला तर एका गणेश मंडळाजवळ साधारणपणे 100 - 200 वह्या जमा होतील. त्या सर्व वह्या श्रीगणेश विसर्जन होण्यापूर्वी एखाद्या शाळेत जाऊन गरीब विद्यार्थ्यांना वाटप केल्यास मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीला भरपूर आत्मिक समाधान लाभेल. अजून काही भन्नाट कल्पना आपल्या जवळ असतील नक्कीच त्याचा वापर आपल्या कल्पकतेने करून लोकांचे हित केल्यास या उत्सवाची प्रतीक्षा सर्वाना राहील.
तेंव्हा या वर्षीचा आपला सार्वजनिक गणेशोत्सव अगदी निराळा करून पुढच्या वर्षी लवकर या असे प्रत्येकाच्या तोंडून निघावे असे कार्य करु या

 गणपती बाप्पा मोरया  ...............

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद 
 ता. धर्माबाद जि. नांदेड 
  09423625769

Wednesday, 3 September 2025

शिक्षक दिन विशेष ( Teachers Day Special )

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 05 सप्टेंबर संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 

Saturday, 30 August 2025

नेहमी हसतमुख राहणारे राजकुमार जाधव सर ( Rajkumar Jadhav )

नेहमी हसतमुख राहणारे - राजकुमार जाधव

राजकुमार जाधव यांचा जन्म 10 ऑगस्ट 1967 रोजी धर्माबाद येथून जवळच असलेल्या येळवत या गावी झाला. वडिलांचे नाव सटवाजी होते तर आईचे नाव निलावतीबाई. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कुल मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी उमरी येथील डी. एड. कॉलेजमधून शिक्षणशास्त्र पदविका प्राप्त केली. सन 1990 मध्ये त्यांना जिल्हा परिषद नांदेड मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. तत्पूर्वी ते धर्माबादच्या यशवंत विद्यालयात दोन वर्षे शिक्षक म्हणून काम पाहिले होते. जिल्हा परिषदेत नोकरी मिळाल्याने त्यांनी खाजगी संस्थेतील नोकरी सोडून बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारला बु. याठिकाणी आपल्या सेवेला सुरुवात केली. ही त्यांची पहिली शाळा होती. चार वर्षाच्या सेवेनंतर सन 1994 मध्ये त्यांची बदली जिल्हा परिषद हायस्कुल येताळा येथे झाली. याठिकाणी त्यांनी जवळपास 14 वर्षे सेवा केली. मोठी शाळा, विद्यार्थी संख्या जास्त आणि शिक्षक ही भरपूर यामुळे याठिकाणी त्यांना अनेक चांगले सहकारी लाभले. ते स्वतः मनमिळाऊ वृत्तीचे असल्याने इतरांसोबत जुळवून घेण्यात त्यांना वेळ लागला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कधी ही चिंता किंवा दुःख दिसले नाही. नेहमी ते हसत राहायचे आणि इतरांना पण हसवत राहायचे असा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे या शाळेतील 14 वर्षाचा काळ अत्यंत आनंदात आणि समाधानकारक होता असे ते मानतात. 
सन 2008 मध्ये विद्यार्थी संख्येच्या अभावी त्यांचे समायोजन केंद्रीय प्राथमिक शाळा चिकना येथे झाली. येथे कार्यरत असताना गटसधान केंद्र धर्माबाद येथे त्यांची प्रतिनियुक्ती झाली. येथील कार्यालयात त्यांनी निरंतर शिक्षण विभाग अंतर्गत साक्षर भारत विभागाचे काम अत्यंत नेटाने आणि जबाबदारीने पूर्ण केले. साक्षर भारतचा संपूर्ण तालुक्याचा कार्यभार त्यांनी सलगपणे पाच-सहा वर्षे सांभाळली होती. त्यानंतर तालुक्यातील सेवा जास्त झाल्या कारणाने सन 2013 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा कुंडलवाडी येथे त्यांची प्रशासकीय बदली झाली. तेथे एक वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची बदली परत जिल्हा परिषद हायस्कुल येताळा येथे झाली. येताळा येथे जुन्या आठवणी सोबत घेत त्यांनी येथे चार वर्षे सेवा केली. त्यांच्याकडे साक्षर भारत विभागाचा कार्यभार पुन्हा देण्यात आला. तेव्हा त्यांनी कसलेही अडचण न सांगता ते काम स्वीकारले. त्यानंतर ऑनलाईन पोर्टल द्वारे सन 2018 मध्ये त्यांची बदली आताच्या पाटोदा बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. याठिकाणी त्यांची सात वर्षे सेवा केल्यानंतर आज नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण करीत असल्याने ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदमध्ये सन 1990 ते 2025 असे एकूण 35 वर्षाची सेवा केली आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांनी सर्वाना सहकार्य करण्याचे काम केले. कोणत्याही अधिकाऱ्यांना किंवा आपल्या सोबतच्या शिक्षकांना कधी ही त्रास होईल अशी त्यांची वागणूक नव्हती. अगदी प्रेमळ, गरज पडेल तेव्हा बोलणे, मितभाषी आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवणारे असा त्यांचा स्वभाव होता. ज्यामुळे ते ज्यांच्या संपर्कात आले ते त्यांच्याशी मैत्री केल्याशिवाय राहत नसे. 
असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. जाधव सरांच्या धर्मपत्नी सौ. सुशिलाबाई जाधव यांनी त्यांच्या सुखदुःखात नेहमी साथ दिल्या म्हणूनच ते यशस्वीपणे हा टप्पा पूर्ण करू शकले. जाधव सरांना दोन अपत्य. मोठा मुलगा प्रभाकर हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथे मॅनेजर पदावर काम करत आहे तर छोटा मुलगा बालाजी हा IT इंजिनियर असून नामवंत अश्या P & G कंपनीत हैद्राबाद येथे काम करत आहे. सरांच्या चांगल्या कामाचे हे फळ आहे, त्यांचे दोन्ही मुलं उच्च पदावर काम करीत आहेत. सर्वजण सुखी समाधानी आहेत. 
जाधव सरांची सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

महापुरुषाची ओळख ( Mahapurushachi Olakh )

आज मी तुम्हाला नासा येवतीकर यांच्या “महापुरुषांची ओळख” कवितासंग्रहातील काही महत्त्वाचे पैलू अधिक तपशीलवार देतो:


---

✨ वैशिष्ट्ये

या संग्रहात महापुरुषांचे जीवनचरित्र कवितारूपाने मांडले आहे.

प्रत्येक कविता लहान-मोठ्या वाचकाला समजेल अशा सोप्या आणि प्रेरणादायी भाषेत लिहिलेली आहे.

यात प्रामुख्याने भारतीय संत, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक व नेते यांचे कार्य, विचार आणि योगदान दाखवलेले आहे.

संग्रहाचे उद्दिष्ट —

मुलांना आणि तरुणांना प्रेरणा देणे

महापुरुषांची कार्यओळख सोप्या कवितांमधून जपणे

शाळा-कार्यक्रम, वाचनप्रेरणा उपक्रम, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उपयोगी पडणे.




---

📖 कवितासंग्रहातील काही उदाहरणे (थीमप्रमाणे)

महात्मा गांधी : सत्य, अहिंसा व स्वातंत्र्याचा मार्ग.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : शिक्षण, समानता व संविधान निर्मिती.

लोकमान्य टिळक : स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क.

स्वामी विवेकानंद : तरुणांसाठी प्रेरणादायी विचार.

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर : भक्ति व समाजजागृती.


(प्रत्येक कवितेत त्या महापुरुषांचा जीवनप्रवास, कार्य व संदेश कवितारूपाने गुंफलेला आहे.)


---

📌 उपयुक्तता

शालेय कार्यक्रमात वाचन किंवा सादरीकरणासाठी उत्कृष्ट.

वाचनालय, ग्रंथालय आणि सांस्कृतिक मंडळांसाठी उपयुक्त.

जयंती-पुण्यतिथी प्रसंगी वापरता येईल असा संग्रह.



--

नासा येवतीकर यांच्या “महापुरुषांची ओळख” या कवितासंग्रहात संतपरंपरेवर लिहिलेल्या कवितांमध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावता माळी, संत एकनाथ अशा थोर विभूतींचे जीवन व कार्य कवितारूपाने मांडले आहे.


---

✨ संतांविषयी कवितेचा सारांश (आशय)

संतांचा संदेश :

समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करण्यासाठी संतांनी प्रेम, भक्ति आणि समता यांचा मार्ग दाखवला.

त्यांनी देवाला दूरवर शोधण्याऐवजी “मनाच्या ठावात” शोधायला शिकवले.


संतांचे कार्य :

अभंग, ओवी आणि कीर्तनाद्वारे सामान्य लोकांपर्यंत आध्यात्मिक विचार पोहोचवले.

त्यांनी दीन-दुबळ्यांचे, शेतकऱ्यांचे, स्त्रियांचे दुःख समजून घेतले आणि त्यांना आधार दिला.


कवितेतून संदेश :

संतांचा मार्ग म्हणजे भक्ति, समता आणि बंधुभाव.

खरी संपत्ती म्हणजे नामस्मरण व सद्विचार.

संतांचा जीवनमार्ग आजही समाजाला दिशा दाखवतो.




---

🎶 उदाहरण (भावार्थ)

कवितेत संतांना “समाजाचे दीपस्तंभ” म्हटले आहे.
त्यांनी अंधारातल्या जनतेला भक्ति, ज्ञान आणि सदाचाराचा प्रकाश दिला.
त्यांच्या शिकवणुकीमुळे सामान्य माणसालाही देवाचा साक्षात्कार सोपा झाला.


---
नासा येवतीकर यांच्या “महापुरुषांची ओळख” या कवितासंग्रहातील संत तुकारामांवरची कविता खूपच प्रेरणादायी आहे.


---

✨ संत तुकारामांविषयी कवितेचा आशय (सारांश)

तुकारामांचे जीवन :
तुकाराम महाराजांनी भक्तीला सर्वस्व मानले. गरिबीत, संकटातही त्यांनी देवनामात रममाण राहून आपले जीवन घडवले.

तुकारामांचे कार्य :

समाजातील अन्याय, लोभ, पाखंड यावर त्यांनी आपल्या अभंगांद्वारे प्रहार केला.

हरिजन, गरिब, स्त्रिया आणि शेतकरी यांच्या दुःखाला त्यांनी अभंगातून आवाज दिला.

त्यांचे अभंग म्हणजे जनतेचा आत्मस्वर.


कवितेतील वर्णन :
नासा येवतीकरांच्या कवितेत तुकारामांना

“जनतेचे संत”,

“भक्तीचे दैवत”

आणि “समाजजागृतीचे दीपस्तंभ”
असे गौरवले आहे.


संदेश :
खरी श्रीमंती म्हणजे धनसंपत्ती नव्हे तर नामस्मरण, साधना आणि सत्यनिष्ठा.
तुकारामांचा मार्ग म्हणजे “भक्ती व मानवतेचा संगम”.



---

🎶 भावार्थ (कवितेतून उमटणारे चित्र)

> संत तुकाराम हे विठ्ठलाचे खरे सेवक होते.
त्यांनी अभंगातून जनतेला शिकवले की,
“देव दूर नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे.”
ते म्हणाले — लोभ, अन्याय, अहंकार सोडून दिल्यासच खरी भक्ती साध्य होते.




---




कोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri )

कोजागिरी पौर्णिमाचे महत्त्व - पौराणिक कथेनुसार, एक सावकार होता, त्याला दोन मुली होत्या. सावकाराच्या दोन्ही मुली मनापासून पौर्णिम...