Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Monday, 11 July 2022

सोपे की अवघड ( mulanshi gappa )

मुलांशी गप्पा भाग - 1
सोपे व अवघड प्रश्न

आज शाळेतल्या मुलांना काही प्रश्न विचारल्यावर बहुतांश मुलांनी उत्तरे दिली. त्यात अर्धे बरोबर होते तर अर्धे चुकलेले होते. मुलांना यावर एक संशोधनात्मक प्रश्न विचारलं की, काही प्रश्नाचे उत्तर तुम्ही बरोबर दिलात ते कसे काय ? सर्व मुलांनी एका सुरात उत्तरं दिली, ' सर, ते सोपे प्रश्न होते.' त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलं की, काही प्रश्नांचे उत्तर चुकले ते कसे काय ?यावर मुलं म्हणाली, ' सर, ते अवघड प्रश्न होते. ' यावर मी मुलांना बोलते करण्यासाठी पुढचा प्रश्न विचारलं की, प्रश्न सोपे आहे की अवघड कश्यावरून ठरवता ? त्यावर वर्गातील चुणचुणीत आणि हुशार मुलीने उत्तर दिलं की, ' ज्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला माहीत असते ते सोपे आणि जे माहीत नसते ते अवघड.' तिच्या उत्तरावर तिला शाबासकी देऊन तिलाच प्रतिप्रश्न विचारलं की, ' काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला माहित होते आणि काही माहीत नव्हते, याचा अर्थ काय ? ' त्यावर ती मुलगी म्हणाली, ' ज्या प्रश्नांचे आम्ही उत्तर दिलोय ते प्रश्न आम्हांला कधी ना कधी विचारले जायचे त्यामुळे ते पाठ झाले किंवा माहीत झाले. ' तिची जिज्ञासा जाणून घेण्यासाठी पुढचा प्रश्न विचारलं की, ज्या प्रश्नांचे उत्तर माहीत नाही ते कसे मिळवाल ? यावर ती जरा विचारात पडली. काय उत्तर सांगावं याचा ती विचार करू लागली. पूर्ण विचार करून ती म्हणाली, ' सर, वाचन करावे लागते.' यावर मी म्हणालो, अगदी बरोबर, आपणाला जास्तीची माहिती मिळविण्यासाठी वाचन करावे लागते. वेगवेगळी पुस्तकं, मासिकं आणि वर्तमानपत्र वाचावे लागतात. त्यामुळे आपणाला खूप काही माहिती मिळते. शाळेत जे काही ज्ञान मिळते त्याही पलीकडचे ज्ञान मिळवायचे असेल तर अवांतर वाचन करत राहावे लागते.
 तसेच सर्व प्रश्न सारखेच असतात, ज्या प्रश्नांचे उत्तर आपणाला माहीत असतात ते सोपे वाटतात तर ज्या प्रश्नांचे उत्तर आपणाला माहीत नसतात ते अवघड वाटतात. सर्वच प्रश्न सोपे वाटावे असे जर वाटत असेल तर खूप वाचन करावे आणि आपल्या डोक्यात खूप माहिती साठवून ठेवावी. ही क्रिया एका तासात, एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होणारी नाही. त्यासाठी अविरत आणि निरंतर वाचन करणे आणि आपल्या माहितीमध्ये वाढ करत राहणे आवश्यक आहे. मनुष्य हा आजीवन विद्यार्थी आहे असे का म्हणतात ? तर ते यामुळेच. तेव्हा मुलांनो ज्ञान समृद्धी मिळविण्यासाठी काय कराल ? यावर मुलांनी जल्लोषात उत्तर दिलं ' वाचन ' आजपर्यंत जी व्यक्ती जीवनात आपले नाव कमावले आहे ते फक्त वाचन केल्यामुळे. तेव्हा भरपूर वाचन करून आपण ही समृद्ध होऊ या ....!  

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पूर्ण लेख वाचन केल्याबद्दल धन्यवाद .....! 

आपल्या प्रतिक्रिया व्हाट्सअप्प द्वारे जरूर कळवावे. 

Wednesday, 24 June 2020

पावसाळा आणि शेतकरी

पावसाळा आणि शेतकरी
- नागोराव येवतीकर
भारतात मुख्य तीन ऋतू आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्याचा आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा, ऑक्टोबर जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात उन्हाळा असतो. मानवी जीवनात तिन्ही ऋतू अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक ऋतू आपापले काम व्यवस्थितपणे केले तरच हे ऋतुचक्र व्यवस्थित राहते. अन्यथा असंतुलन होऊन मानवाचे जीवनचक्र बिघडून जाते. त्यातल्या त्यात पावसाळा हे सृष्टीमध्ये नविनता निर्माण करणारा ऋतू आहे. पाऊस पडला तरच शेतकरी आपल्या शेतात नवीन पीक घेऊ शकतो. झाडांना नवी पाने, फुले आणि फळे येऊ शकतात. नद्या, नाले, विहिरी आणि तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले तरच वर्षभर पुरते अन्यथा काही दिवसांनी दुष्काळ जाणवण्यास सुरुवात होते. पाऊस पडलाच नाही तर अनेक समस्या निर्माण होतात म्हणून दरवर्षी प्रत्येकजण पावसाची अगदी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहत असतात. मृग नक्षत्रांपासून पावसाचा काळ सुरू होतो. भारतात यास मान्सूनचा पाऊस म्हटले जाते. केरळमध्ये शक्यतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून येऊन धडकतो आणि त्याला संपूर्ण भारतात पोहोचायला साधारणपणे दहा दिवसांचा कालावधी लागतो. तो जर वेळेवर आला तर पुढील सर्व कामे वेळेवर होतात आणि तो जर येण्यास उशीर केला तर पुढील सर्व कामे उशिरा होत राहतात. खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते. पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होणे ही गरजेचे आहे. पावसाला सुरुवात झाली की सर्वात जास्त आनंदी कोण होतो तर तो म्हणजे शेतकरी. डोक्यावर किती ही कर्ज असले तरी कसलीही चिंता न करता बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने आपल्या शेताच्या कामाला सुरुवात करतो.पाऊस न येण्याने इतरांवर काही परिणाम होवो की नाही मात्र शेतकऱ्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसून येतो.म्हणूनच या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. 

- नागोराव सा. येवतीकर

Friday, 21 October 2016

जुनी पेंशन योजना

शासकीय कर्मचाऱ्यासाठी जुनी पेंशन योजना बंद
*शासन नव्हे शोषण व्यवस्था .....!*

शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल होतो. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा त्यासाठी अपार कष्ट सोसले. लोकांकडून फुले दाम्पत्याचा खूप छळ केला गेला पण त्यांनी आपले शैक्षणिक कार्य थांबविले नाही. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात फुले दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपणास गाव तेथे शाळा बघायला मिळत आहे आणि तळागाळातील व्यक्ती सुध्दा शिक्षण घेत आहे.
आज शासनाने जे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण चालू केले आहे ते महात्मा फुलेंनी सन १८८२ मध्ये हंटर कमिशनच्या समोर दिलेल्या साक्षी मध्ये म्हटले होते की " सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना  मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले जावे " परंतु त्यांना त्याकाळी अनेक वाईट प्रसंग आणि अनुभवास तोंड द्यावे लागले. दिनाक १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली परंतु त्या ठिकाणी शिकविण्यासाठी कोणीच तयार होईना. त्या काळी शिकविण्याचे काम बर्‍याच जणांना तुच्छतेचे वाटत असे. तसेच शिकविण्याचे काम हे येड्यागबाळ्याचे नाही, त्यासाठी खूप मोठी विद्या जवळ असावी लागते असा ही गैरसमज होता. परंतु जोतिबांनी आपल्या निरक्षर पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला घरीच शिकविले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान दिला. समाजात गुरूला कोणत्या संकटाला, त्रासाला तोंड द्यावे लागत होते याची प्रचिती यावरून आपणाला येते. समाजात हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. शिक्षणाचे महत्व लोकांना कळू लागले. देशातील नेते आणि पुढारी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागले. शिक्षणाविषयी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.' त्याच सोबत ते लोकांना स्वत:चा समाजाचा विकास करायचा असेल तर 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र दिला. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर शिक्षणाचा खेडोपाडी दरी-खोर्‍यात प्रसार झाला. शाळा तर उघडल्या जात होत्या मात्र त्यांना शिकविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते अशी स्थिती नव्वदच्या दशकात होती. सन १९९० च्या दशकापर्यंत मुलांना शिकविण्यासाठी 'शिक्षक' म्हणून नोकरी करण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या फारच कमी होती. कारण या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजलं जात असे. त्यामुळे सहसा कोणी पुढे येत नव्हते. जे शिक्षक म्हणून काम करीत होते ते कधी तिकडे व्यवसाय म्हणून पाहिले नव्हते. ती त्यांची एक प्रकारे सेवा होती. असा त्यांचा स्वभाव होता.
निःस्वार्थ म्हणता येणार नाही परंतु जेवढे मिळते तेवढय़ावर समाधान मानून सेवाभावी मनाने काम करणारी शिक्षक मंडळी समाजात मानाचे स्थान मिळवून गेले. परंतु पुढील दहा वर्षात शिक्षक पेशेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि झटपट नोकरी म्हणून प्रत्येक जन या क्षेत्रास पहिली पसंदी देऊ लागले. बघता बघता या क्षेत्रात स्पर्धा वाढू लागली. पाचवा वेतन आयोग लागू झाला अन शिक्षक मंडळीचे पगार तीन पट वाढले तसे लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पगारात वाढ झाली तसे शासनाच्या तिजोरीवर ताण पडल्याचे कारण समोर आणत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकार मधील शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शिक्षण सेवक ह्या पदाची निर्मिती केली. तीन वर्षे तीन हजार रुपया वर नोकरी करायची आणि तीन वर्षानंतर शिक्षक म्हणून नेमणुक करण्याची पध्दत सुरुवात केली. येथपासून शिक्षण क्षेत्रात घसरण सुरु झाली. शाळेत दोन प्रकारचे शिक्षक काम करू लागले एक फुल पगारी तर दुसरा अगदी तुटपुंजी वेतनावर. समान काम समान वेतन कायदा असून देखील तो या ठिकाणी लागू होत नव्हता. हे सरळ सरळ त्यांच्यावर अन्यायच होता आणि आहे. मात्र याबाबत अजुन लपर्यन्त काहीही झाले नाही. यापुढे जाऊन शासनाने 01 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्याना पेंशन योजना बंद करण्याची अधिसूचना 2009 मध्ये काढली त्यामुळे ही शिक्षक मंडळी पुन्हा हतबल झाली. शासकीय कर्मचारी हा सेवानिवृत्ती नंतर फक्त पेंशनवरच जगु शकतो. त्याशिवाय त्याचे उर्वरित आयुष्य जगणे फारच कठीण याची जाणीव शासनाला होऊ नये याचा अर्थ हे शासन नसून शोषण व्यवस्था आहे असे खेदाने म्हणावे लागेल, असे ही शिक्षक मंडळी आपसात बोलताना व्यक्त होत आहेत. शिक्षणावर मोठमोठ्या गोष्टी करणारे मंत्रीमंडळ यांच्या बाबतीत असा निर्णय का घेत असेल ? आमदारकी किंवा खासदारकी म्हणून पाच वर्षासाठी एकदा निवडून गेले की त्यांना पेंशन मिळते. पण तीस वर्षे जनतेची सेवा केलेल्या कर्मचारी वर्गास पेंशन दिले जात नाही हे खरोखरच खुप क्लेशदायक वाटत नाही काय ?
पेंशन ची गरज -
माणूस कोणत्या वयापर्यंत काम करू शकतो. साधारणपणे 58 वयापर्यंत अगदी चांगल्या पध्दतीने काम करतो. सेवानिवृत्तीनंतर पेंशन मिळत असल्यामुळे तो चिंतामुक्त असतो. त्याला कश्याची काळजी वाटत नाही, कसे ही आपला परिवार जगवू शकतो एवढं पेंशन मिळते या भरवश्या वर तो जगत राहतो. पेंशन असल्यामुळे घरात थोडी फार इज्जत देखील मिळते. म्हातारपणात कुणी जरी साथ दिली नाही तरी पेंशन मात्र निश्चितपने आधार बनते. याचा अनुभव आजपर्यंतच्या पेंशनधारक लोकांना आलेले आहे. पण मध्येच ही योजना बंद केल्यामुळे आज सन 2005 नंतरचा प्रत्येक सरकारी कर्मचारी चिंताग्रस्त आहे, त्यातल्या त्यात शिक्षक मंडळी तर जास्तच आहेत. आज त्यांच्याकडे भविष्य निर्वाह निधी च्या खात्या ऐवजी सन 2009 पासून खास या लोंकासाठी DCPS नावाचे खाते चालू करण्यात आले. ज्यात एकूण पगारीच्या 10 टक्के रक्कम जमा करावीच लागते असे बंधन आहे. या योजनेत खाते असलेल्या अनेक कर्मचारी मंडळींना खाते क्रमांक मिळाले नाही, या खात्यात जमा झालेला पैसा कुठे आहे याचा मागमुस नाही, पैसे भरल्याची पावत्या नाहीत. सर्व काही आलबेल चालू आहे. सर्व जमा रक्कम गोपनीय आहे मात्र त्यांचा पैसा त्यांना परत मिळत नाही ही खरी शोकांतिका आहे. घटनेतील कलम सहा नुसार संधीची व दर्जाची समानता असावी असे म्हटले जाते मग इथे ही असमानता का ? 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी चे लोक जनतेची सेवा करीत आहेत म्हणून त्यांना पेंशन आणि त्यानंतर जे शासकीय कर्मचारी म्हणून जनतेची सेवा करीत नाहीत काय ? मग त्यांना पेंशन पासून दूर का केल्या जातोय ? सध्या हा प्रश्न राज्यातील लाखाच्या वर कर्मचारी लोकांच्या मनात छळत आहे. पेंशन बंद झाल्यामुळे त्यांना पुढील जीवन अंधकारमय दिसत आहे. याच काळजीपायी अनेक शिक्षक मंडळीचा मृत्यु देखील झाला. त्याबदल्यात कुटुंबाला काहीही मिळाले नाही असे सांगणारे कुटुंब देखील आज राज्यात आढळून येतात. त्यांचे कुटुंब उघड्यावर आणि पोरं वाऱ्यावर आहेत. शाळेत न येणाऱ्या मुलांसाठी शासन खुप पैसा खर्च करते, मात्र त्याच व्यवस्थेतील कुटुंबाला मात्र काही मिळत नाही. याच संदर्भात शासन समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी रविवारी 23 ऑक्टोबर रोजी शिक्षक, ग्रामसेवका सह सर्व शासकीय कर्मचाऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मचारी लोकांना आक्रोश करण्याची त्यांच्यावर वेळ यावी यापेक्षा नामुश्की काय असू शकेल. एकाच राज्यात एक कर्मचारी तुपाशी आणि एक कर्मचारी उपाशी हा दुजाभाव कशासाठी ? अश्या बाबीमुळे कर्मचारी मन लावून काम करेल काय ? सध्या राज्यात जे डिजिटल चे वारे चालू आहेत. त्यात या काळातील शिक्षक मंडळीचा सिंहाचा वाटा आहे. आधुनिक तंत्रज्ञाना मध्ये ही मंडळी खूपच हुशार असल्या कारणामुळे शाळा डिजिटल होण्याचे प्रमाण वाढीस लागले हे सत्य नाकारुन चालणार नाही. ज्याप्रकारे बुडत्याला काठीचा आधार जिवंत ठेवतो अगदी त्याच पध्दतीने शासकीय कर्मचारी साठी पेंशन ही एक आधाराची काठी आहे. तेंव्हा शासनाने याविषयी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी लोकांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याचे चांगले परिणाम नक्कीच पाहायला मिळेल असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद
   09423625769


Saturday, 15 October 2016

स्वच्छतेचे महत्व

                


                     स्वच्छतेचे महत्त्व
                          - नागोराव सा. येवतीकर

स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ह्या एका गुणा मुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. ही एक सवय आहे. स्वच्छता म्हटली की आपल्या समोर अनेक बाबी उभ्या राहतात. स्वच्छता कश्याकश्याची आणि कशी ठेवायाची हा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. स्वच्छतेची सुरुवात ही स्वतः पासून म्हणजे स्वतःच्या शरीर स्वच्छते पासून करावी. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या स्वच्छते विषयी आपण जागरूक राहून कार्य केल्यास आपली छाप इतरावर निश्चितपणे पडते. लहानपणी सकाळी उठले की आई मुलांच्या मागे राहून दात स्वच्छ घास, चूळ भर आणि हात-पाय स्वच्छ धुउन घेण्याविषयी तगादा लावते. कारण स्वतः च्या स्वच्छतेची सुरुवात ही याच क्रियेपासून होते. लहानपणी लागलेली स्वच्छतेची चांगली सवय त्यांच्या सोबत आयुष्यभर राहते ही तर चांगली गोष्ट आहेच यासोबत आपल्या दाताचे आयुष्यही वाढते. दाताचे विकार होत नाही. आपल्या जीवनात दाताचे काय महत्त्व आहे हे दात नसणाऱ्या लोकांना विचारून पहिल्याशिवाय कळणार नाही. स्नान करणे ही त्या नंतरची अत्यंत महत्वाची क्रिया. बहुतांश व्यक्ती स्नान ही क्रिया महादेवाला पाणी घातल्यासारखे डोक्यावरुन पाणी ओततात त्यामुळे अंगाची सफाई होत नाही. साबणाचा वापर करीत अंग घासुन स्नान केल्यास आपल्या अंगाचा वास येत नाही. विशेष म्हणजे त्वचा रोगापासून आपण दूर राहू शकतो. दररोज स्वच्छ कपडे परिधान करून बाहेर पडण्याची आपली सवय इतराना त्रासदायक ठरत नाही. मळके कपडे अंगावर असतील आणि प्रवासात कुठे तरी आपण बसलात तर कपड्याच्या दुर्गन्धी मुळे कुणी आपल्याजवळ बसत नाही. शाळेत तर याचा फार वेगळा अनुभव येतो. त्यामुळे घराबाहेर जाताना स्वच्छ कपडे एक तर आपणास शोभुन दिसते आणि आपल्यामुळे इतराना त्रास ही होत नाही. म्हणून स्वच्छ कपडे वापरण्याची सवय शाळेत असताना जी लागते ती आयुष्यभर सोबत राहते. बाहेरुन घरात येताना हात-पाय स्वच्छ धूउन घरात प्रवेश करावा. बहुतांश वेळा मुले बाहेर उघड्यावर खेळतात आणि तसेच घरात प्रवेश करतात. ज्यामुळे बाहेरील अनेक किटक थेट घरात प्रवेश मिळवितात आणि घरातील अनेक लोक आजारी पडतात. शौचास जाऊन आल्यावर सुद्धा स्वच्छ हात-पाय धुवावे आणि मगच घरात यावे. जेवण करण्यापूर्वी हात अगदी स्वच्छ धुवावे आणि कोरड्या रुमालाने साफ करावे. रात्री झोपण्या पूर्वी सुद्धा स्वच्छ हात-पाय धुतल्या नंतर छान झोप लागते की नाही ते पहा. म्हणजे स्वतः ची स्वच्छता ही जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय आपले जीवन दीर्घायुष्य होउच शकत नाही. अस्वच्छ रहाणे म्हणजे आपले अर्धे आयुष्य कमी करून घेण्यासारखे आहे. त्याच अनुषंगाने नुकतेच आपण जागतिक हात धुण्याचा दिवस साजरा केला आहे. त्यातून आपणास हाच संदेश मिळतो की स्वच्छ रहा ; निरोगी रहा.

स्वतःच्या स्वच्छतेनंतर आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो आणि ते आवश्यक आहे. कारण आपले ज्याठिकाणी उठणे, बसणे, खाणे, आणि पिणे असते त्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी आपले घर झाड़ूने साफ करीत असतो. आपले अंगण स्वच्छ करतो. घरातील आणि अंगणातील कचरा परिसरात टाकतो. म्हणजे आपणास परिसर घाण असलेले चालते परंतु आपले घर आणि अंगण स्वच्छ असावे असे वाटते ही प्रत्येकाची मानसिकता आहे. हा बदल करण्यासाठी स्वच्छतेचे धडे किंवा पाठ आज समाजाला शिकविण्याची खरी गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे हे चुकीचे आहे हे कळतय पण वळत नाही अशी स्थिती झाली आहे. 
आज ग्रामीण भागात जर गेलो तर गावाच्या प्रवेशालाच दुर्गन्धी सुरु होते. प्रत्येक जण उघड्यावर शौचास जाउन गावाचा प्रवेशाचा संपूर्ण रस्ता अस्वच्छ करतात. यात कधी बदल होणार आहे ? गावात असलेली शाळा आपणास कधीच स्वच्छ ठेवता येत नाही. शाळा सुटली की गावातले काही रिकामटेकडे पोरे शाळेत येऊन वर्ग खोल्याच्या भिंती खराब करतात. काही गुटखा शौकीन मुले पान तंबाखू खातात आणि सर्व परिसर कधी कधी भिंती रंगवून टाकतात. दारू पिणारे मंडळी दारू पितात आणि वर्ग खोलीत बाटली फेकतात तर काही जण बाटली मैदानावर टाकतात, अश्या रीतीने सकाळी स्वच्छ केलेला शाळेचा परिसर सायंकाळी घाण केल्या जातो. शालेय स्वच्छालय कोणत्याच गावात चांगली ठेवली जात नाहीत. ज्या गावात शालेय स्वच्छालयाची देखभाल स्वतः गावकरी करीत असतील त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. गावात इतर काही ठिकाणी सुध्दा ही मंडळी अस्वच्छता पसरवितात. ज्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे गावात साथीचे अनेक रोग पसरतात. मग दवाखाना आपल्या मागे लागते. जेथे लाखो रुपये खर्च करावे लागते तरी आपले डोळे उघडत नाही आणि आपला गांव स्वच्छ ठेवत नाही. डेंग्यू सारखा आजार तर कधी कधी आपला जीव ही घेतो. हा रोगप्रसार फक्त आणि फक्त आपल्या अस्वच्छतेमुळे होते याची जाणीव आपणास व्हायला हवी. ग्रामपंचायत कार्यालय जमेल तेवढे कार्य करते पण संपूर्णपणे त्यावर अवलंबून रहाणे हे ही चूक आहे. वैयक्तिक स्वच्छते सोबत गावाची स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे.
सार्वजनिक ठिकाणी आपली वागणूक चांगली असेल तर परिसर स्वच्छ राहू शकते. बरेच जण सार्वजानिक ठिकाणी बेजबाबदरपणे वागतात आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करताना असा अनुभव खास करून येतो. बसमध्ये प्रवास करणारे काही मंडळी पान तंबाखू आणि गुटखा खाऊन कोपऱ्यात थुंकुन सर्व जागा घाण करतात. त्यामुळे इतर प्रवाश्याना त्याचा त्रास होतो. धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे ह्या फलक ऐवजी कोपऱ्यात थुंकू नका असे फलक लावावे लागेल असे वाटते. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तिस दंड लावण्याचा कायदा अस्तित्वात आहे मात्र फक्त तो कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी जर करण्यात आली आणि दंड लावण्याची प्रक्रिया चालू केल्यास अस्वच्छता कमी होईल, असे वाटते. बसनंतर सर्वात जास्त प्रवासी वाहून नेणारे रेल्वेमध्ये स्वच्छता दिसणे खूपच दुरापास्त आहे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणारे नागरिक रेल्वेत मात्र सर्व काही विसरून वागतात. जेथे काही खाल्ली तेथेच कचरा करतात. ज्याचा त्रास इतर प्रवाश्याना होतो. कधी कधी त्याचे बळी आपणच ठरतो हे ही सत्यच आहे. बागेत सुध्दा आपली हीच बेफिकिर वृत्ती दिसून येते. पर्यटननाच्या स्थळी सुध्दा आपण स्वच्छ वागतो असे काही दिसून येत नाही. त्यामुळे बस आणि रेल्वेमधील स्वच्छता असो वा इतर ठिकाणची स्वच्छता ही आपल्या हातात आहे. ती आपली सर्वाची मालमत्ता आहे अशी काळजी घ्यावी. आपण एकटे स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करू या आपल्या सोबत एक-दोन व्यक्ति तरी निश्चितपणे या मार्गावर येतात. महात्मा गांधीजी यांनी ज्याप्रकारे आपल्या जीवनात स्वच्छतेला महत्त्व दिले होते. तसे आपण ही महत्त्व देऊ या. स्वच्छ भारत निर्माण करण्यात आपले ही काही योगदान देऊ या.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769
nagorao26@gmail.com
★★★★★★◆◆◆◆◆◆★★★★★★★★
[10/16, 3:37 PM] ‪+91 99228 61408‬
*स्वच्छतेचे महत्त्व*                 
------------------- शामल कुलकर्णी             
स्वच्छता म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नाही.तर स्वछता हे आरोग्यदायी जीवनाचे बहुसमावेशक तत्व आहे.ती मनाची व अंतः करणाची अवस्था देखील आहे. ज्यामध्ये आपली नैतिक मूल्ये आणि उपासना यांचा समावेश होतो.                   गावागावातून ज्यांनी स्वच्छतेचे धडे दिले त्या संत गाडगेबाबांना एकाने प्रश्न विचारला , बाबा आपण मंदिरात का येत नाहीत? तेंव्हा बाबा बोलले अरे देव दगडात नाही तर माणसात आहे. आणि त्याच्या निरोगी जीवनासाठी मला हा मंदिराबाहेरील पडलेले फुले, नारळाचा कचरा साफ करणे गरजेचे वाटते. त्यांचा हा विचार आपल्याला अगदी विचार करायला लावणारा आहे.
          जगभरात स्वच्छतेविषयी एकसमान दर्जे नाहीत आणि वेगवेगळ्या लोकांना स्वच्छतेविषयी वेगवेगळ्या कल्पना असतात. पूर्वी, शाळेचा परिसर स्वच्छ, नीटनेटका असायचा आणि त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लागत असतात. 

 दररोजच्या जीवनात किंवा व्यापारी जगातही स्वच्छतेच्या बाबतीत प्रौढ नेहमीच आदर्श नसतात. जसे की, पुष्कळशी सार्वजनिक ठिकाणे घाणेरडी, गलिच्छ असतात. काही कंपन्यांमुळे वातावरणात प्रदूषण होते. प्रदूषणाला, कारखाने आणि व्यापार नव्हे तर त्यातील लोक जबाबदार आहेत. प्रदूषण व त्याच्या दुष्परिणामांच्या जागतिक समस्येचे प्रमुख कारण स्वार्थ असला तरीही लोकांच्या अस्वच्छ वैयक्तिक सवयी देखील काही अंशी याला कारणीभूत आहेत. ऑस्ट्रेलियन राष्ट्रसंघाचे भूतपूर्व अध्यक्ष यांनीही या निष्कर्षाला सहमती दर्शवत असे म्हटले: “सार्वजनिक आरोग्यासंबंधीचे सर्व प्रश्न प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलावर अवलंबून आहेत.”
           स्वच्छता स्वतः पासून सुरु करा . वैयक्तिक  स्वचतेच्या लक्ष्मण रेषा पाळल्या की सामाजिक स्वच्छता आपोआपच घडून येते.
म्हणूनच घेऊ वसा मन प्रसन्न करण्याचा, शरीर निरोगी करण्याचा , घर -परिसर स्वच्छ ठेवण्याचा,समाज निरोगी करण्याचा!!                        शामल कुलकर्णी                      kulkarnishamal79@gmail.com
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:25 PM] ‪+91 94228 62625‬

स्वच्छता आपली मुलभूत गरजच आहे.केवळग पंतप्रधानांनी आवाहन केले म्हणुन नाही तर प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून स्वच्छतेच पालन केल पाहीजे.
जवळजवळ ६०% आजारांच मुळ अस्वच्छतेत असत.
प्रत्येक व्यक्तीन लहानपणापासुनच स्वच्छतेचा धडा गिरविला पाहीजे जो आयुष्यभर पक्का लक्षात बसेल..घर, परिसर, गल्ली, गाव, शहर देश  अस स्वच्छतेच अव्याहत चक्र चालु असेल तर आपल जीवन सुकर होईल अन्यथा घाण, रोगराई, प्रदुषण याचा पडत असलेला विळखा आणखी घट्ट होऊन मानवी जीवन जगण कठीण होत जाईल..
आपलआरोग्य निसर्ग याच्या संरक्षणार्थ स्वच्छतेचा मार्ग हाच सुखी जीवनाचा मार्ग असेल 
..पुष्पा गायकवाड 
नांदेड🙏
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:41 PM] 
 विश्वची माझे घर असे संत मंडळी बोलून गेलीआहेत .आपण स्वत: ते विश्व या आयुष्याच्या प्रवासात आपले कुटुंब,घर, शेजारी पाजारी,परिसर,गाव ,तालुका,जिल्हा ,राज्य, देश या सार्यांशी आपली व्यक्ती म्हणून देशाचा जबाबदार नागरीक म्हणून बांधिलकी असते.
        'स्वच्छता' ही अशीच वैयक्तिकते कडून सामाजिकते कडे नेणारी गोष्ट आहे.
       स्वच्छतेचे बाळकडू 
बालपणापासून आपणास मिळत आले,स्वच्छतेच्या चांगल्या सवयी जोपासत आपण शाळा शिकलो ,मोठे झालो.कुटुंबातून ,शिक्षकांकडून ,पाठ्यपुस्तकातून स्वच्छता का करायची हे ऐकत आलोआणि तेपटणारेच होते. सकाळच्या रम्य प्रहरी शरीराची ,घराची ,परिसराची स्वच्छता झाली की प्रसन्न वाटते.या प्रसन्नतेत देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले वा घरच्याच देव्हार्यासमोर प्रार्थना श्लोक म्हटले की मनही ताजे तवाने होऊन जाते.मनातील नकारात्मक विचारांची जागा सुविचार कधी घेतात कळतही नाही.आणि मग जाणीव होते स्वच्छता म्हणजे नेमके काय याची.शरीरातील,मनातील घरातील नको असणारे निरूपयोगी,अडगळ ,अस्वच्छ असे सारे दूर केल्याने योग्य विल्हेवाट लावल्याने मंगलमय असे वातावरण तयार होते.ज्याची सर्व प्राणी मात्रांना गरज आहे.
    देह देवाचे मंदीर
    आत्मा एक पंढरपूर
हे खरे आहे.जसे देहामधे परमेश्वराचे अस्तित्व आहे तसेच ते चरचरात भरून उरले आहे मग आपण या सृष्टीची किती स्वच्छता ठेवायला हवी हे वेगळे सांगायला नको. 
      स्वच्छ शरीरामुळे व स्वच्छतेच्या सवयींमुळे उत्तम आरोग्याचा लाभ होतो .हे वैयक्तिक आरोग्य ा बरोबरच सामाजिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.कचर्याची योग्यप्रकारे सुका कचरा ओला कचरा अशी विभागणी करण्याची सवयही अंगीकारणे गरजेचे आहे.डंपिंग ग्राउंडची समस्या उग्र रूप धारण करते आहे .हे सामाजिक भान आपल्यात जागवणे ही काळाची गरज आहे.आज ई_कचरा ही सुद्धा दिवसा गणिक वाढणारी समस्या ठरते आहे याकडेही  समाजाचे लक्ष वेधणे व स्वच्छतेच्या प्रश्नाकडे अधिक सजगतेने पहाणे गरजेचे आहे.
    मी ,माझ्यापुरते पाहून चालणार नाही.देशाच्या स्वच्छता अभियानाचे आपण सारे जण अग्रदूत होउन काम केले तर स्वच्छ गाव,स्चछ देश हे स्वप्न सत्या त उतरेल नाहीतर माझ्या एकट्याने स्वच्छतेचे महत्व जाणून काय होणार? हा नकारात्मक विचार झटकून स्वच्छतेची क्रांती लाट यायला हवी.विज्ञानयुगात स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणार्या अनेक बातम्या, शोध ,जाहिराती प्रसारीत होतात.अनेक रोगजंतूचा प्रसार रोखण्यासाठी रोग बरे होण्यासाठी औषधांबरोबरच आरोग्यदायी वातावरणाची
नितांत आवश्यकता आहे.
सत्यम शिवम सुंदरम,अशी वाटचाल करायची तर स्वच्छ  शरीर
       व स्वच्छ सुंदर मन
घडवायलाच हवे.ज्याची सुरूवात स्वतापासून करूया तरच स्वताची कर्तव्ये पार पाडण्यासाठी
योग्य उर्जेची प्राप्ती होईल.निसर्ग सुंदर आहे,आयुष्य सुंदरआहे.
चला तर मग हाती घेऊन हात
अस्वच्छतेवर करू मात
सुविचारांना देऊ साथ
आरोग्यदायी  उगवेल प्रभात
[10/16, 6:42 PM] विद्या प्रभू: विद्या प्रभु मुंबई९७६९३९४६४८
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

[10/16, 6:51 PM] ‪+91 80079 17680‬

 स्वच्छतेच महत्व 
  स्वच्छता ही एक कला आहे,
    स्वच्छता कशी राखायची,
      हे ज्याने त्याने ठरवायच,
प्रॉब्लेम सर्वानाच असतात,प्रॉब्लेम सोडवायचे,
 की रडत बसायचे 
   हे ज्याने त्याने ठरवायाचे.
खरच स्वच्छता ही आपल्या जीवनात नंदनवन फुलविते.स्वच्छतेचाच आग्रह सर्वानी धरला पाहिजे.त्यामुळे केवळ आपल्या शारीरिक च नव्हे तर सामाजिक तक्रारी देखील दूर होतील.कारण आपण पाहतो आजुबाजुला पडलेला कचरा केवळ आपलेच नाही तर प्राण्यांच्या आरोग्य करिता अपाय कारक आहे.म्हणूनच सर्वाना हीच विनंती की आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच परिसर ही स्वच्छ ठेवन्यास कटीबध् असावे.
 आपण शारीरिक स्वच्छता नियमित करावी.त्यामुळे आपण इतरासाठी आदर्श ठरू शकतो.
  ओला कचरा व् सुका कचरा याचे योग्य व्यवस्थापण व्हायला हवे.चला तर मग स्वच्छता पाळू,रोगराई टाळू.
जायभाये एस बी




Friday, 14 October 2016

वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन निमित्त

वाचाल तर वाचाल अशी एक म्हण आपल्याकडे प्रसिध्द आहे. वाचन हा प्रत्येक मानवाच्या मेंदुचा खुराक आहे. वाचन केल्यामुळे आपणास बरीच माहिती मिळते. ज्ञानाचा साठा वाढतो. त्याच सोबत आपण प्रगल्भ देखील बनत असतो. आजकाल वाचन करणे फार कमी होत चालले आहे अशी समाजात ओरड सुरु आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. याउलट सोशल मीडिया नावाच्या whatsapp आणि फेसबुक मुळे लोकांची वाचन संस्कृती वाढली असे म्हणण्यास काही हरकत नसावी. दिवसातुन अनेक ग्रुपच्या माध्यमातुन बरीच अनोळखी माहिती बघायला आणि वाचायला मिळत आहे. हे काय कमी आहे. त्यातल्या त्यात ebook लाईब्रेरी मुळे तर पुस्तकांच्या पुस्तके pdf मध्ये वाचता येत आहेत. आज जे पुस्तक म्हटले त्या पुस्तकाची माहिती नेट वर उपलब्ध होत आहे आणि त्यातून वाचन संस्कृती मध्ये वाढ होत आहे. असे जरी दिसत असेल किंवा भास होत असेल तरी वास्तव थोडे वेगळे आहे. हे ही नाकारुन चालत नाही.
वाचनाच्या प्रक्रियेला शाळेतुन सुरु होते. तसे मुले लहान असताना चित्र वाचन अगदी छान रित्या करतात. तेथून त्यांच्या वाचन कौशल्य विकसित होण्यास सुरु होते. मग त्यानंतर अक्षर आणि अंकाची ओळख होते. हळूहळू वाचन कला जमायला लागते. भाषा कौशल्यामध्ये श्रवण व भाषण हे फार महत्वाचे आहे. कारण त्यावरच वाचन ही क्रिया पूर्णपणे अवलंबून आहे. ज्यांच्या वरील दोन क्रिया योग्य प्रकारे होते त्या मुलांचा विकास योग्य दिशेने होतो. तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना श्रवण व भाषण ही क्रिया जमवण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी केला जातो. तेथे प्रगती नक्की दिसते. खाजगी शाळेत यावर आवर्जून लक्ष दिले जाते. तर इकडे सरकारी बालवाडी मध्ये खाऊ वाटप करण्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. यात मला त्यांना दोष द्यायचा नाही पण पाया मजबूत करण्याकडे कुणाचेच अजिबात लक्ष नसते आणि मुले वरच्या वर्गात गेली की त्याला लिहिता वाचता येत नाही म्हणून त्या दोषाचे खापर शिक्षकांच्या अंगी फोडून मोकळे होणे एवढे मात्र सर्वाना जमते. एखादा रस्ता ख़राब होताना वेळीच लक्ष दिले आणि तातपुरती दुरुस्ती केली तर रस्ता दीर्घकाळ टिकू शकतो. त्याकडे लक्षच दिले नाही तर रस्ता पुन्हा नव्याने करावा लागतो. विद्यार्थ्यांचे जवळपास तसेच आहे. प्राथमिक वर्गात असताना त्यांच्या चूका व त्रुटी लक्षात घेऊन त्यात दुरुस्ती केल्यास ती मुले शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाणार नाहीत. अमुक विद्यार्थ्याला लिहिता वाचता येत नाही हे वरच्या वर्गात गेल्यावर लक्षात आल्यास काहीच करता येत नाही. रस्ता पुन्हा नव्याने करता येऊ शकेल पण विद्यार्थ्यांना पुन्हा पाहिली किंवा दूसरी चा अभ्यास शिकवून तयार करणे फार कठीन आणि जिकरीचे आहे. त्यासाठी वेळीच पालक शिक्षक यांनी जागरूक होऊन त्यांच्या प्रगती कडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांच्या एकूणच शैक्षणिक प्रगती मध्ये वाचनाचा सिंहाचा वाटा आहे. जी मुले योग्य गतीत वाचन करतात त्यांची प्रगती नियमानुसार होत राहते. वाचन केल्याचा खरा आनंद जर आपणास पहायचा असेल तर ते पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मुलांच्या चेहऱ्यावर पाहता येईल. वर्गातील एक दोन मुले खुप छान वाचन करतात तेंव्हा ज्याना वाचन करता येत नाही त्यांना त्या मुलाचा हेवा वाटते. वर्गातील सर्वच्या सर्व मुले वाचू लागली की त्याचा खरा आनंद त्या शिक्षकाना होतो. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ठळक दिसून येते. असा आनंद मिळविण्यासाठी मात्र शिक्षक मंडळींना खुप प्रयत्न करावे लागते हे ही सत्य आहे. वाचन प्रेरणा दिवस साजरा करून कोणाची वाचन कौशल्य मध्ये प्रगती होणार नाही त्यासाठी दररोज अर्धा तास तरी मुले वाचन करतील असे नियोजन शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. दिनविशेष पुरते त्याला बंधनात न ठेवता ती प्रक्रिया रोज राबविण्यासाठी मुलांकडून पाठाच्या उताऱ्यातील पाच वाक्याचे रोज वाचन करून घ्यावे. वाचन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण कितीही वाचन केलो तरी नित्य नविन माहिती मिळविण्यासाठी वाचन हे करावेच लागते. रोज पाच वाक्य वाचन करण्याचा सराव कधी पाठ वाचन करण्यात होते हे कळतच नाही. मुले सुद्धा अगदी योग्य गतीत वाचन करतात. वर्गातील धीम्या गतीने वाचन करणारा मुलगा देखील येथे गती घेतो. हा प्रयोग मात्र सतत चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सतत वाचन करण्यात व्यस्त असत त्या वाचनातुन ते विद्वान झाले. असेच अजून एक महान व्यक्ती म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांनी सुद्धा आपल्या जीवनात वाचनाला खुप महत्त्व दिले आहे. ते दिवसाचे सोळा-सतरा तास वाचनात घालवित असे. म्हणूनच त्यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर  संपूर्ण महाराष्ट्रात *वाचन प्रेरणा दिवस* म्हणून गेल्या वर्षीपासून साजरी केली जात आहे. फक्त आजच्या दिवशी एक तासभर वाचन करण्यापेक्षा रोज किमान पाच वाक्याचे वाचन प्राथमिक वर्गात केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

Friday, 7 October 2016

जीवन सुंदर आहे भाग चार

*जीवनातील यशस्वी पुरुष*
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
  09423625769

दोन बायका एका छताखाली जीवन जगुच शकत नाहीत हे निर्विवाद सत्य आहे. मग त्या दोन बायका सासू-सुन असेल जावा-ननंद असो वा दोन जावा. ज्यांच्या घरात ही जोडी आनंदाने एकत्र राहतात असे दिसेल त्यांना उत्कृष्ट परिवार म्हणून घोषित करण्यास काही एक हरकत नाही. यांचे एकमेकांना कधीच
पटत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन यांचे वाद आणि भांडण होत राहतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब व परिवार काळजी व चिंता ग्रस्त होऊन जातो. घरातील सदस्य म्हटल्यावर सर्वावर सारखेच प्रेम असते आणि हक्क सुद्धा सारखेच. एकीला बोलावे तर दुसरीला राग घरातील पुरुषाची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारी सारखी होते. काय करावे हेच सूचत नाही. इकडे आड आहे अन इकडे विहीर.
अश्या विपरित परिस्थिती मध्ये पुरुषाची खरी सत्वपरीक्षा ठरते. पुरुष शेवटी आपल्या आई-बहीन यांचेच ऐकतो बायकोचे काहीच ऐकत नाही असा आरोप सासरची मंडळी तिच्याकडून बोलताना करतात. पत्नी समजून घेईल या आशेवर पुरुष घरातील मंडळी कडून बोलते झाला की त्याची अवस्था धोबी का कुत्ता घर ना घाट का अशी होऊन जाते. एखाद्या घरात पुरुष आपल्या बायकोचे ऐकून वागतो तेंव्हा त्याला आपल्या जवळचीच मंडळी खुप नावे ठेवतात. हा बायकोचा ऐकणारा बाईलगा झालाय. बायकोपुढे याला काहीच दिसत नाही. लहानाचा मोठा केला तर साधी विचारपुस नाही की चौकशी नाही. असे वेगवेगळे आरोप आत्ता घरातील लोकच लावतात तेंव्हा पुरुषानी वागावे तरी कसे असा प्रश्न सतावितो. याच वैमनस्य मधून कुटुंबातील कलहाने एकाचा मृत्यू अश्या आशयाची बातमी वाचली की कुटुंबातील हे चित्र डोळ्यासमोर येते. वास्तविक पाहता बायकोला पुरुषानी विश्वासात घेऊन एकांतात जर समज दिली तर हे वाद मिटू शकतात. मी करतो मारल्यासारख आणि तू कर रडल्या सारख ही *सर्जिकल पध्दत* वापरली तर आपले जीवन यशस्वी होऊ शकेल.वाद विवाद भांडण तंटा प्रत्येकाच्या घरी आहे. असे एकही घर सापडणार नाही जेथे भांडण नाही. त्यामुळे घरातील समस्याचा निपटारा पुरुषानी योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या सुंदर जीवनाचे तीन तेरा वाजले म्हणून समजा.

🖊 नासा येवतीकर, धर्माबाद

Thursday, 6 October 2016

जीवन सुंदर आहे भाग तीन

*परिक्षेपेक्षा जीवन महत्वाचे*
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
  09423625769
विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्वाचा भाग म्हणजे परीक्षेत मिळविलेले यश. त्यासाठी तो वर्षभर जीव तोडून रात्रंदिवस अभ्यास करतो आणि केलेल्या अभ्यासाची दोन किंवा तीन तासात आपली स्मरणशक्ती पणाला लावून परीक्षा द्यायची. ती परीक्षा चांगली झाली तर विद्यार्थी खुश राहतो आणि तीच परीक्षा थोडी अवघड किंवा कठीण गेली असे वाटले की मुले नाराज होतात. त्यांचे कुठेही मन लागत नाही. निकाल लागण्यापूर्वीच "पेपर अवघड गेला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या" अशी बातमी वृत्तपत्रात वाचायला मिळते. ज्या आई-बाबा नी मग ते गरीब असो श्रीमंत त्यांनी आपल्या भविष्याचा आधार म्हणून आपणास पालन पोषण केले आहे आणि एवढं शिक्षण पण दिले आहे. मी जर आत्महत्या केली तर माझ्या आई-बाबावर काय बितेल ? त्यांचे हाल कसे होतील ? आई-बाबा क्षणभरा साठी रागावतात कारण आपली मुले वाइट मार्गाला जाऊ नये, मुलांचे भविष्य उज्जवल व्हावे यासाठी प्रत्येक पालक धडपड करीत असतो. गरीब आई-बाबा तर आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या शिक्षणावर पैसा खर्च करतात. फाटक के कापड वापरतात मात्र मुलांना सर्व हवे नाही ते बघतात. तेंव्हा खरोखरच विद्यार्थ्यांनी परिक्षेचा पेपर अवघड गेला किंवा परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून जीवन संपविणे योग्य आहे का ? याचा प्रत्येक विद्यार्थ्यांने विचार करणे आवश्यक आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा जीवनात अत्यंत महत्वाचे आहेत याबाबत काही दुमत नाही. ह्या परीक्षा जीवनाला वळण देतात त्यामुळे या कडे पालक आणि विद्यार्थी गांभीर्याने लक्ष देतात नव्हे दिलेच पाहिजे. परंतु त्याची तयारी फक्त दहावी किंवा बारावीच्या वर्षात करून चालणार नाही हे ही लक्षात घ्यावे. प्राथमिक वर्गापासून मुलांच्या अभ्यासाकडे पालकानी लक्ष द्यायला हवे. मुलांना दडपण वाटेल अशी आपली वागणूक मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरु शकते. मुलांची आवड निवड लक्षात घेऊन त्यांच्या सोबत मैत्रीपूर्वक वागल्यास मुले आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. विद्यार्थ्यांनी सुद्धा पालकांच्या आणि परिवारातील सर्व सदस्यचा विचार करून आपले वर्तनुक ठेवावी. एका परीक्षेत अपयश मिळाले म्हणून नाराज न होता कश्यामुळे अपयश मिळाले याचा मागोवा घेऊन त्रुटी पूर्ण करावे आणि पुन्हा नव्या जोमाने परिक्षेला तोंड द्यावे. त्यावेळी जे यश मिळेल त्याची जीवन भर संपणार नाही. आपल्या हातून एक सुंदर विश्व निर्माण होणार आहे आणि त्याचे श्रेय अर्थातच आपणास मिळणार आहे. तेंव्हा चला कवी केशवसुत यांचे कवितेतील ओळी सदा स्मरणात ठेवू या " जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका"

🖊 नासा येवतीकर, धर्माबाद

जीवन सुंदर आहे भाग दूसरा

*आत्महत्या हा पर्याय नाही*
🖊 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
     09423625769

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या समाजात असलेली एक मोठी समस्या बनून पुढे येऊ पाहत आहे. सरसरी दररोज तीन शेतकरी विविध कारणामुळे मृत्यूला जवळ करीत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाची ही साथ मिळत नाही ना सरकारची साथ यामुळे तो समस्याग्रस्त बनत चालला आहे आणि त्याच विवंचणेत आत्महत्या शिवाय दूसरा पर्याय त्याला सुचेना झाले. यावर्षी शेतात भरघोस पीक येईल आणि डोक्यावर असलेले कर्ज संपून जाईल या विचारात दरवर्षी नव्या उमेदीने तो शेतात राबतो पण त्यांच्या कपाळी सुख लिहिलेले नाही तर कसे सुख मिळणार ? घरात खाणारी तोंडे जास्त आणि कमविणारा मात्र तो एकटा त्यामुळे घराचा पूर्ण भार त्याच्यावर असणार हे ठरलेले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी त्यांना कुटुंबातील, परिवारातील आणि मित्राचा आधार असायला हवे. आज ना उद्या समस्या संपतील या आशेवर जगणे आवश्यक आहे, मात्र चिंता ही स्वस्थ बसू देत नाही. पण खरोखर आपण आत्महत्या केली आणि आपले जीवन संपविले तर आपल्या समोर ज्या काही समस्या होत्या त्यापासून आपली कायमची सुटका होईल मात्र त्याच समस्या आपल्या कुटुंबातील आणि परिवारातील सदस्यना अजून गंभीर स्वरुपात भेडसावते याचा एक वेळ विचार केलाय का ? नाही. जीवनातील कोणत्याही समस्यावर आत्महत्या किंवा जीवन संपविने हा पर्याय होऊच शकत नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या डोक्यावरील कर्जाचा किंवा शेतातील नापिकीचा जास्त डोक्यात न घेता काम करीत रहा. भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं ही गोष्ट लक्षात ठेवा.
जीवन खूप सुंदर आहे, त्याला फक्त योग्य दिशेने चालण्याचा प्रयत्न करीत रहावे. फक्त शेती न करता त्यासोबत काही लघू उद्योग करता येईल काय याचाही विचार करून तसा जोड व्यवसाय केल्यास आपल्या जीवनाला नक्कीच उभारी मिळेल. आज दुधाचा व्यवसाय करणारी शेतकरी मंडळी झालेला नुकसान दुसऱ्या व्यवसायतुन भरून काढू शकतात आणि त्यासाठी आपणास काही वेगळी प्रक्रिया करावे लागत नाही. शेळीपालन व्यवसाय ही आपणाला अगदी सहजपणे करता येईल त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. असे काही व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार केल्यास हे जीवन किती सुंदर आहे याची प्रचिती येईल.

🖊 नासा येवतीकर, धर्माबाद

जीवन सुंदर आहे

..... *जीवन सुंदर आहे* ......
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
   09423625769
"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे रेडियो वरील गाणे ऐकत असतानाच एक बातमी वाचण्यात आली. एका वीस वर्षीय युवतीने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. त्या बातमीने रेडियो वरील गाण्याचे माझे लक्ष पार उडून गेले आणि त्या मुलीच्या अश्या कृतीने तिच्या आई-बाबावर आणि त्या परिवारावर काय प्रसंग ओढवाले असेल याची साधी कल्पना जरी केली तरी ह्रदय धडधड करायला लागले, छातीचे ठोके वाढले. नेमके आयुष्याला आत्ता सुरुवात होऊ लागली होती आणि तिने आपल्या हाताने आपले आयुष्य नष्ट करून टाकली.

जीवन सुंदर आहे ते जगता आले पाहिजे असाच काहीसा संदेश त्या गितातून देण्याचा कवीचा प्रयत्न आहे. आपण जीवन जगण्याचा कधीही मनातून प्रयत्न करीत नाही. आपण आपली जीवन क्रिया समजून घेतली नाही त्यामुळे त्याचा त्रास आपणास नक्की होतोच. त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या परीने आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्नच करायला हवा. फार लवकर हताश होणे, नाराज होणे यामुळे मनात नैराश्य निर्माण होते. मग आपले विचार एका वेगळ्याच दिशेने धाव घेते. मनात न्यूनगंड निर्माण होते. त्या मुलीला घरात काही त्रास होता का ? नव्हता ? हे प्रश्न महत्वाचे नाही तर या टोकापर्यंत ती का गेली ? याचा ही विचार केला पाहिजे. वास्तविक पाहता अश्या घटना सहजासहजी किंवा एका क्षणी घडलेल्या नसतात तर खुप दिवसापासून त्यांच्या मनात याची सल बोचत असते. वारंवार त्याच विषयावर चिंतन करून मन बधीर होत राहते आणि असे पाऊल उचलले जाते.
त्यामुळे कुटुंबात वादविवाद, भांडण असे प्रकार शक्यतो होऊ देऊ नये. घरातील सर्वाशी प्रेमाने वागत रहावे शक्यतो या गोष्टी पाळले तर असे प्रकार होत नाहीत. मुलींनी सुद्धा फार लहान गोष्टी मनावर न घेता सामंजस्यपणाने विचार करून परिवारामध्ये आंनदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. मग पहा खरोखरच जीवन सुंदर असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

Saturday, 24 September 2016

संतुलित आहार


संतुलित आहार
      - नागोराव सा. येवतीकर,
        मु. येवती ता. धर्माबाद
अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीनुसार या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अश्मयुगीन काळातील माणूस प्राण्याची शिकार करून कच्चे मांस खात असे. याच बरोबर जंगलातील फळे आणि कंदमुळे हे त्यांचे प्रमुख खाद्य होते. अग्निचा शोध लागल्यानंतर हा माणूस शिकार केलेले प्राणी भाजुन खाऊ लागला. त्याला भाजलेल्या अन्नाची चव माहित झाली तसे प्रत्येक अन्न पदार्थ भाजुन खाण्यास सुरुवात केली. पाण्याजवळ वास्तव्य करून राहत असल्यामुळे त्यांनी मग हळू हळू शेती करण्यास सुरुवात केली. शेतातुन आलेल्या अन्नधान्याचा वापर जेवण्यात करता येतो हे कळायला लागल्यावर माणसाच्या जेवण्यात सुधारणा होऊ लागली. त्यानंतर मग माणूस एकत्र राहू लागले. त्यांचा समूह तयार झाला या समुहाचे एका वस्ती मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. पाहता पाहता गाव आणि नगर त्यानंतर महानगर ही तयार झाले. अन्नाच्या शोधात आपण आज या स्तरापर्यन्त येऊन पोहोचलो आहोत आणि आज ही आपण त्याच अन्नाच्या शोधात रोजच फिरत असतो. मात्र याच अन्नाविषयी किंवा आहारा विषयी आपण खरोखर जागरूक आहोत ? याचा एकदा तरी विचार करीत नाही. मानवाला जीवन जगण्यासाठी किंवा शारीरिक वाढीसाठी अन्नाची गरज असते. म्हणून अन्न मिळविण्यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करीत असतो. आज आपण जे काही काबाडकष्ट करीत आहोत ते सर्व या अन्नासाठी नव्हे काय ? आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर खायला मिळावे म्हणून कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुष आणि स्त्री दिवस रात्र काम करीत असतात. त्याच केलेल्या कामाच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैश्यावर घरात लागणाऱ्या अन्नाची पूर्तता करीत असतो. अन्न जर नसेल तर आपल्या पोटाचे नीट पोषण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मानवाला मग तो गरीब असो वा श्रीमंत त्याला अन्नाची गरज आहे. भारतात एका बाजूला उपासमारी ने मरणारी माणसे दिसतात तर दूसरी कडे जास्त जेवल्यामुळे पोटा च्या विविध आजाराने त्रस्त माणसे दिसतात हे पाहून मन खिन्न होते. अन्नाचे अति सेवन करणे शरीराला जसे घातक आहे तसे कमी जेवण करणे हे ही धोकादायक आहे विशेष करून लहान मुलांना त्यांच्या वाढत्या वयात पोषक आणि संतुलित आहार मिळणे आवश्यक आहे.
शरीर बळकट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काजू, बादाम, साजुक तूप यासरखी महागडी पदार्थ खावे लागतात, असा एक गोड गैरसमज जनमाणसात पसरलेले आहे. रोजच्या जेवणात सर्व अन्नघटकाचा समावेश केल्यास सुध्दा आपले शरीर शारीरिक व मानसिकदृष्टया सुदृढ राहू शकते. मेळघाटसारख्या विभागातील कुपोषणाचा प्रश्न जेंव्हा आपल्या समोर येतो तेंव्हा संतुलित आहार घ्यावे अशा प्रकारची सहज प्रतिक्रिया आपण देऊन टाकतो. दररोज एक प्रकारचे जेवण केल्यामुळे आपण कंटाळून जातो त्यामुळेच वेगवेगळ्या पदार्थची चव घेतो, न जाणतेपणाने आपण संतुलित आहार घेत असतो. परंतु यात काही जाणीवपूर्वक बदल करून गृहिणीने आठवड्याचा वेळापत्रक तयार करून तसे खाद्य म्हणजे जेवण आपल्या मुलांना उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा मुलांसोबत आपणाला  सुध्दा होतो.
घरातील लहान मुले जेवण्याच्या बाबतीत नेहमीच हे नको, ते हवे अश्या तक्रारी करीत असतात. आंबट फळे खात नाहीत, फक्त गोड असलेल्या फळाची मागणी करतात. त्यामुळे ते जीवनभर त्या फळापासून दुरच राहण्याची शक्यता नकारता येत नाही. कारले कडू लागतात म्हणून बऱ्याच मुलांना ते घशाखाली उतरत नाही. प्रत्येक भाजी खाण्याबाबत त्यांना आग्रह केल्यास त्यांच्या शरीराला फायदा होईल. आपल्या शरीराला जेवढे पिष्टमय, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाची गरज आहे तेवढीच क्षार व जीवनसत्वाची सुध्दा आहे. हिरव्या पालेभाज्या आणि फळे यातून क्षार व जीवनसत्व मिळते. शरीरात ए जीवनसत्वाचे प्रमाण कमी झाल्यास रात्रीला अंधुक अंधुक दिसणे म्हणजे रांताधळेपणाचा रोग होतो. त्यासाठी हिरव्या भाज्या आणि फळे आहारात असणे आवश्यक आहे.  बी जीवन सत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होणे व त्वचा खरखरीत होणे असे रोग होऊ शकतात.  दाताच्या हिरड्या मजबूत राहण्यासाठी सी जीवनसत्वाची गरज असते आणि हे जीवनसत्व सर्व आंबट गोड फळातुन मिळतात. सकाळी कोवळया सूर्यप्रकाशात बसल्यामुळे डी जीवनसत्व मिळते आणि त्यामुळे पायाची हाडे मजबूत होतात व पाठीला बाक येत नाही. कैल्शियम मिळविण्यासाठी मांस व अंडी चा जेवणात वापर करण्याच्या सल्ला वैद्यकीय मंडळी याच साठी देतात. असे काही विकार आपल्या मुलांना होऊ नये यासाठी सर्व मातानी जागरूकपणे आपल्या स्वयंपाकात संतुलित आहाराचा समावेश केल्यास आपला मुलगा अर्थात देशाचा भावी नागरिक बळकट, तंदुरुस्त आणि सुदृढ होईल यात शंकाच नाही.
जेवण करताना घ्यायची काळजी
जेवण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावे. जेवणाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यावे. अस्वच्छ परिसरात जेवण परिपूर्ण होतच नाही. दिवसातुन दोनच वेळा जेवण करण्याची सवय लावून घ्यावी. भूक लागली की जेवण असे शक्यतो करू नये. सकाळी उठल्यानंतर दात स्वच्छ साफ केल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर अर्धा तास काही ही सेवन न करता तसेच रहावे. सर्वात महत्वाचे सकाळी शक्यतो चहा टाळावे त्याऐवजी दुधाचा वापर करावा. दूध हे पूर्ण अन्न आहे आणि चहामुळे आपल्या भूकेचा सर्व नाश होतो. त्यामुळे सकाळी चहासोबत बिस्किट किंवा पाव खाऊ नये त्याऐवजी मोड आलेली कडधान्ये किंवा इतर काही अन्नघटकाचा नाष्टा करावा ज्यामुळे आपण दुपारच्या जेवणापर्यन्त थांबु शकतो. दुपारच्या वेळी जर आपण कार्यालयात काम करणारे कर्मचारी असाल तर झोप येणार नाही असे जेवण करावे. शाळेतील मुलांनी सुध्दा दुपारी पोट भरून जेवण करू नये त्यामुळे वर्गात लक्ष राहत नाही. सायंकाळी जेवण शक्यतो रात्री आठ च्या पूर्वी आटोपते घ्यावे. त्याच बरोबर सायंकाळी हलके अन्न घ्यावे त्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होते. उशिरा जेवण केल्याने आणि जड अन्न खाल्याने पचन क्रियेवर सुद्धा ताण येतो आणि मग पोटाचे विकार सुरु होतात. सायंकाळी जेवण केल्यानंतर शतपावली करणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जेवताना आपण प्रसन्न असावे. उदास किंवा रागावलेल्या परिस्थितीत जेवण करू नये. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करावे आणि जेवताना फक्त कौटुंबिक चर्चा करावी. त्यामुळे सर्वांशी संवाद होईल. आज घराघरातील संवाद लोप पावले आहे असे वाटत आहे. ते यामुळे जुळून येतील. प्रत्येकाचे जेवणाच्या वेळा वेगवेगळे आहेत त्यामुळे कोणाचे कोणाच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नाही. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे असे म्हटले जाते त्यामुळे अन्नाचा नाश न करता त्याचा पूर्ण वापर करावा म्हणूनच पूर्वी चे लोक म्हणतात की फेकून माजण्यापेक्षा खाऊन माजावे. फिरत फिरत किंवा सोप्यावर किंवा पलंगावर बसून जेवण करणे टाळावे कारण जेवताना थोडे फार तरी शीत खाली पडतात आणि त्याच्या शोधात बारीक लाल मुंग्या फिरत असतात. ते शीत जर सोप्यात किंवा पलंगावर पडले तर तिथे लाल मुंग्या येणार. जेव्हा आपण सोप्यावर किंवा पलंगावर बसू तर त्याचा त्रास आपणालाच होणार. जेवणापूर्वी थोडा वेळ तरी शांत बसून मनोमन प्रार्थना म्हणावी.  रेडियो ऐकत, टीव्ही पाहत किंवा पेपर वाचन करीत जेवण करू नये त्यामुळे आपले लक्ष अन्ना वर राहत नाही. घाईघाईने जेवण न करता अगदी स्वस्थपणे जेवण करावे. गाय, बैल किंवा म्हैस या सारख्या प्राण्याना जशी रवंथ करण्याची सोय आहे तशी आपल्या शरीरात नाही याची जाणीव ठेवावी. या सर्व बाबी लक्षात ठेवून जेवण केल्यास आपणास नक्कीच उत्तम आरोग्य लाभेल यात शंकाच नाही.

Tuesday, 9 August 2016



*मरावे परी कीर्तिरूपे उरावे *

          - नागोराव सा. येवतीकर 
            मु. येवती ता. धर्माबाद
            जि. नांदेड 
            09423625769

आज भारताचा 69 वा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 15 आॅगस्ट, अर्थात स्वातंत्र्य दिन ! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर मंडळीची आठवण करतो.
" भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही. 
स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटविणारे मंगल पांडेे, सुराज्याला स्वराज्याची सर येणार नाही आम्हाला स्वराज्य पाहिजे असे इंग्रज सरकारला ठासुन सांगणारे पितामह दादाभाई नोरोजी, स्वातंत्र्यसाठी अगदी तरुण वयात सर्वस्व पणाला लावणारे सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंग, सायमन कमिशन ला विरोध करणारे प्रथम भारतीय लाला लजपतराय, प्रार्थना समाजाची निर्मिति करून समाजाला व्यपक धर्म तत्वाची ओळख करून देणारे न्यायमूर्ती रानडे,  आपल्या कुशाग्र बुद्धिमतेच्या जोरावर ज्यानी वयाच्या आठरव्या वर्षी पदवी मिळविली आणि देशातील सर्व प्रश्नाना प्राधान्य देऊन त्याची सोडवणूक केली असे ना. गोपाळ कृष्ण गोखले, तरुण वयातच समाज सुधारण्यासाठी व समाजाच्या ऐक्यसाठी आणि जागृतीसाठी ज्यानी लेखणीला तलवार केले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यलढा चे प्रमुख ,अहिंसा व सत्याग्रहाचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी, महाराष्ट्रात प्रती सरकार स्थापन करणारे क्रांतीसिंह नाना पाटील ,तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूँगा असे देशातील लोकांना आवाहन करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, भारताचे पोलादी पुरुष म्हणून ज्याची ख्याती अजरामर आहे असे थोर  सरदार वल्लभभाई पटेल , मौलाना अबुल कलाम आझाद, अस्पृश्यता समूळ नष्ट करणारे व दलिताच्या उध्दारासाठी अविरत धडपडणाऱ्या झुंजार व्यक्तिमत्व असलेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरच्या वैभवापेक्षा देशाच्या स्वातंत्र्याच्या वैभववर लक्ष ठेवलले लहान मुलांचे आवडते चाचा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादीसह अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजातील रुढ, परंपरा व सनातन पद्धतीच्या काळात फुले दाम्पत्याना खूप हालअपेष्टा सोसावे लागले. तरीही त्या॑नी न डगमगता शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे महान काम केले त्यास्तव शैक्षणिक क्षेत्रातील त्याचे कार्य विसरून चालणार नाही. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले हे तर लक्षात राहतेच शिवाय त्यांना घडविणारी राजमाता जिजाऊ यांची आठवण पदोपदी येत राहते. भारतीय स्वातंत्र्य युध्दात ज्या महान स्त्रियांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवला वाहले त्यात सरोजिनी नायडू यांचे नाव प्रथम घ्यावे लागते. भारत छोडो आंदोलनात भूमिगत राहून महत्वाचे काम करणाऱ्या अरुणा असफअली, सहा महिन्यांचे तान्हे बाळ पाठीशी बांधून इंग्रज लोकांशी दोन हात करणारी आणि मेरी झाँसी नहीँ दूँगी अशी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाईचे शौर्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. गरीब व अनाथांची आई मदर तेरेसा हे त्यांच्या अविरत सेवेमुळे कायम स्मरणात राहतात. या सर्वच लोकाना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांचे नाव आपण स्मरणात ठेवतो, आठवण करतो, त्यांना विसरत नाही. कारण त्या॑नी कामच असे केले आहे की त्यास कोणीच विसरू शकत नाही यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. 

आपणाला सुद्धा असेच काही लोकांच्या आठवणीत, स्मरणात रहावे असे कार्य करणे गरजेचे आहे. तसा निर्धार आपण करायला हवे. प्रसिद्ध विचारवंत साईरस म्हणतो की, ' कीर्ती मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात ; मात्र अपकिर्ती होण्यासाठी एक वाईट काम पुरेसे असते'. अनेक लोक जन्मतात आणि किती तरी लोक रोज मरण पावतात. परंतु ज्यांनी समाजाच्या उपयोगी पडेल असे काम केले आहे त्यांचीच समाजामध्ये कीर्ती आणि नाव शिल्लक राहते. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व धडपडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हेन्नी एस. सटन यांनी म्हटल्याप्रमाणे ' कीर्ती मिळवायचे असेल तर दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करा'. आपण जेंव्हा इतरांचे दुःख समजून घेऊन त्याना हातभार किंवा दिलासा देतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी करुणा, प्रेम, माया आणि ममतेची भावना निर्माण होते आणि नक्कीच आपली कीर्ती होते. या जगात आपण रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत ही जगज्जेता सिकंदराची शिकवण विसरून चालणार नाही. कविवर्य भा. रा. तांबे आपल्या कवितेत म्हणतात की, ' जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? ' असा प्रश्न त्या॑नी सर्वांना विचारला  परंतु आपल्या मृत्यूनंतर या जगात काय उरते तर ते फक्त नाव आणि कीर्ती. म्हणून आपल्या माघारी आपले नाव सर्वांनी घ्यावे असे वाटत असेल तर काही जगापेक्षा वेगळे करू या. स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. 








Tuesday, 14 June 2016


opening day



*शाळा प्रवेशोत्सवाचा उत्सव*

जून महीना उजाडला की सर्वत्र शाळा प्रवेशाची धामधुम चालू होते. शहरात या प्रक्रियेसाठी किती हालअपेष्टा सहन करावे लागते याची जाणीव शहरात गेल्याशिवाय येणार नाही. पालक  आपल्या मुलाना चांगल्यात चांगली शाळा मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न करतात. वाटेल तेवढे पैसे खर्च करण्याची ही त्यांची तयारी असते. काही शाळेत प्रवेशासाठी रांगाच्या रांगा असतात, मुलाच्या प्रवेशासाठी अनेक जण सुट्टी सुध्दा टाकतात. मोठ्या लोकांची शिफारस पत्र लावतात. मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर लाखो रूपये खर्च करणारे ही पालक आढळून येतात तर एक ही रूपया खर्च न करणारा पालक ही येथे सापडतो. मात्र खेडोपाडी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील प्रवेश प्रक्रिया वेगळीच असते. गरीबाची शाळा म्हणून या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेची ओळख आहे ,त्यामुळे या शाळेकडे लोकांचे आकर्षण व्हावे आणि या शाळेत प्रवेश वाढावा यासाठी शासनच्या शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात उदाहरणार्थ प्रवेश पंधरवडा, लक्षवेधी नमस्कार यासारखे उपक्रम तयार केले जातात आणि त्या अनुषंगाने कार्यवाही केल्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या वाढेल अशी प्रशासनाला खात्री आहे.
शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या प्रवेशानिमीत्त प्रवेश उत्सव म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. गावात देशभक्तिपर गीते व नारे देत बालकाची प्रभातफेरी काढणे आणि प्रवेशपात्र मुलांची त्याच्या घराजवळ फूल देऊन स्वागत करून त्याच फेरीतून प्रवेश प्रक्रिया करण्याची योजना खरोखरच मुलाना शाळेत सहजरित्या प्रवेश देऊन जाते. शाळेत आणि परिसरात रांगोळी टाकून वर्ग सजावट केल्यामुळे मुले पहिल्या दिवसापासून उत्साही असतात. शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या नविन अभ्यासक्रम आणि नविन वर्गशिक्षकाची ओळख करून देणे, हा एक चांगला कार्यक्रम होतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे बहुतांश शाळेवर जुन्या शिक्षकांच्या ठिकाणी नविन शिक्षक आलेले आहेत. त्यांची ओळख करून देणे आणि त्यांचे स्वागत करणे यामुळे सर्वाना उत्साह येईल. पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम गवाकरी समक्ष करून, गेल्या वर्षी अभ्यासात चांगली प्रगती केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचा गौरव केल्यास त्याचे फायदे आपणास वर्षभर अनुभवास येतात. शालेय गणवेश वाटप करण्याचा कार्यक्रम सुध्दा याच अनुषंगाने पार पाडल्यास मुले अजुन आनंदुन जातील. अर्थातच शाळेचा पहिला दिवस कोणालाही अवजड वाटू नये ,याप्रकारे खेळीमेेळीच्या वातावरणात पूर्ण केल्यास शाळेत नवागत येणाऱ्या बालकावर अनुकूल परिणाम बघायला मिळतात. याउलट जर चित्र शाळेत पाहायला मिळले तर त्या नव्याने प्रवेश करणाऱ्या मुलांवर प्रतिकूल परिणाम होऊन मूल हळूहळू शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वीच्या काळात शाळेत येणारी मुले सदा रडतच येत होती. आंगणवाडी किंवा बालवाडी नावाचा प्रकार फार कमी होता. मुलाना शाळेचा अजिबात गंध राहत नव्हता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही , तीन वर्षाच्या मुलापासून शाळेला सुरुवात होत आहे त्यामुळे पहिल्या वर्गात येणारा मुलगा हसत खेळत प्रवेश करीत आहे. या गोष्टीचा विचार करून शासनाने प्रत्येक शाळेला आंगणवाडी किंवा बालवाडी जोडल्यास शाळेच्या गुणवत्तेत आणि शैक्षणिक प्रगतीत नक्कीच वाढ होईल. सर्वाना मोफत शिक्षणाच्या कायदे मध्ये सुधारणा करून सहा ऐवजी तीन ते चौदा वयोगट करणे भविष्यात अत्यंत आवश्यक आहे असे वाटते.
मुलाना प्रवेश करणे या उपक्रमाची जबाबदारी ही शाळाप्रमुख या नात्याने मुख्याध्यापकाची आणि शिक्षकांची तर आहेच शिवाय गावस्तरावरील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच ,उपसरपंच व इतर सदस्य , महिला बचतगट आणि इतर समित्त्या यानी यात सहभाग घेतले तर उपक्रम पूर्णपणे यशस्वी होईल. गावाच्या विकासासाठी शाळेने पूर्ण प्रयत्न करावे तर शाळेच्या विकासासाठी गावातील प्रत्येक घटकानी मदतीच्या स्वरुपात उभे राहिल्यास गावातील शाळा नावरूपास येण्यास वेळ लागणार नाही.
कोणत्याही कामाची सुरुवात चांगली झाली तर अर्धे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असे म्हटले जाते त्यामुळे शाळा प्रवेशोत्सव आपण सर्वानी अगदी आनंदात आणि उत्साहात सहभागी झालात म्हणजे मुलाना शाळेच्या वातावरणचे दडपण वाटणार नाही आणि त्याच्या मनात शाळेविषयी गोडी निर्माण होईल.

नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती पो. येताळा
ता. धर्माबाद जि. नांदेड 
09423625769

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...! "वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!" आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार ...