Friday, 31 July 2026

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...!


"वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!"

आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार येतात. कधी आनंदाचे क्षण असतात, तर कधी दुःखाचे. कधी निसर्ग आपल्याला मोहून टाकतो, तर कधी एखादी घटना मनाला स्पर्श करून जाते. पण हे सारे विचार आपण शब्दांत मांडतो का ? जे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात ते लेखक आणि कवी बनतात. मग आपण ही लेखक आणि कवी बनू शकतो का ? यावर कधी विचार केला आहे काय ? नाही ना ? चला, आजपासून आपण लिहायला सुरुवात करू या !

लेखन म्हणजे फक्त परीक्षेतील उत्तरपत्रिका भरणे नाही. परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तराचे लेखन करणे म्हणजे लेखन नव्हे. लेखन म्हणजे आपल्या मनातील भावना, कल्पना, अनुभव आणि स्वप्ने शब्दांत व्यक्त करण्याची सुंदर कला आहे. जो विद्यार्थी लिहितो, तो अधिक विचार करतो. जो विचार करतो, तो अधिक समजून घेतो. आणि जो समजून घेतो, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.

आपल्या हातात पेन किंवा पेन्सिल असते; पण त्या छोट्याशा लेखणीत आपल्या भविष्याचा प्रकाश दडलेला असतो. एक सुंदर शब्द, एक प्रभावी वाक्य, एक छोटी कविता किंवा एखादा अनुभव यातूनच मोठे लेखक, विचारवंत आणि समाजाला दिशा देणारी माणसे घडतात. 

आपण रोज खूप काही पाहतो, ऐकतो आणि आणि अनुभवतो. पावसाचे थेंब, पक्ष्यांचा किलबिलाट, शाळेतील गमती-जमती, आईची माया, मित्रांची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन, आपल्या गावातील माणसे, निसर्गाचे सौंदर्य हे सारे आपल्या मनात साठत असते. पण या अनुभवांना शब्द मिळाले, तर तेच साहित्य बनते. म्हणूनच लेखन म्हणजे मनातील विचारांना शब्दांचे सुंदर पंख देण्याची कला होय.

आपल्या मनात कायम एक प्रश्न पडतो चांगले लिहायचे कसे ? तर याचे उत्तर आहे वाचन !

जसा मजबूत पाया असेल तशी इमारत भक्कम उभी राहते, तसाच भरपूर वाचनाचा पाया असेल तर लेखन अधिक सुंदर, समृद्ध आणि प्रभावी होते. वाचनामुळे नवीन शब्द मिळतात, भाषेची समज वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते, विचारांना दिशा मिळते आणि अभिव्यक्ती अधिक परिणामकारक बनते. म्हणूनच वाचन आणि लेखन ही एका रथाची दोन चाके आहेत. एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे. कोणताही महान व्यक्ती एका कवितेतून किंवा एका लेखातून घडला नाही. त्यासाठी सातत्यपणे वाचन आणि लेखन दोन्ही महत्वाचे आहेत. 

आपल्या मराठीतील अनेक थोर साहित्यिक याच मार्गाने घडले. साने गुरुजी यांनी प्रेम, करुणा आणि संस्कार शब्दबद्ध केले. कुसुमाग्रज यांच्या कवितांनी समाजाला नवी चेतना दिली. पु. ल. देशपांडे यांनी विनोदातून माणुसकीचा संदेश दिला. वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तर फक्त दीड दिवस शाळेत गेले तरीही ते महान लेखक व लोकशाहीर झाले. कारण त्यांनी आपले अनुभव शब्दात मांडले. कष्टकरी लोकांच्या समस्या त्यांनी जसे पाहिले, जसे अनुभवले तसे ते शब्दात मांडले. म्हणूनच त्यांचे नाव साहित्य विश्वात जगभर पोहोचले. सर्व साहित्यिकांनी सातत्याने वाचन केले, जीवन अनुभवले आणि अखंड लेखन केले. म्हणूनच त्यांचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देते.

जगातील महान लेखकही असेच घडले. त्यांनी भरपूर वाचन केले, जगाकडे जिज्ञासेने पाहिले आणि नियमित लिहित राहिले. लेखक जन्माला येत नाही; तो सातत्यपूर्ण वाचन, चिंतन आणि लेखनातून घडत असतो.

मुलांनो, लेखन केल्याने फक्त वही भरत नाही, तर मन समृद्ध होते. लिहिणारा विद्यार्थी निरीक्षक बनतो. तो प्रश्न विचारतो, विचार करतो, स्वतःचे मत मांडतो आणि आपल्या भावनांना योग्य शब्द देऊ लागतो. लेखन आत्मविश्वास वाढवते, भाषेवर प्रभुत्व मिळवून देते आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवते.

सुरुवातीला मोठे निबंध किंवा कविता लिहिण्याची गरज नाही. दररोज फक्त काही ओळी लिहा. आज शाळेत काय घडले ? पाऊस कसा वाटला ? आईबद्दल, मित्राबद्दल, झाडाबद्दल, शिक्षकांबद्दल किंवा आपल्या गावाबद्दल लिहा. एखादी छोटी कविता करा, गोष्ट लिहा किंवा एखादा सुंदर विचार वहीत नोंदवा. प्रत्येक दिवसाचे लेखन तुमच्या प्रगतीची साक्ष देईल. रोज काही ना काही नवीन लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला रोज काही तरी नवीन सुचत जाते. चुका झाल्या तरी घाबरू नका. चुका म्हणजे शिकण्याची पहिली पायरी असते. प्रत्येक नवीन लेखन तुम्हाला कालपेक्षा अधिक सक्षम बनवत असते. 

आज मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात अनेक जण फक्त पाहतात आणि वाचतात; पण स्वतः काही लिहित नाहीत. तुम्ही मात्र वेगळे बना. फक्त माहितीचे ग्राहक बनू नका, तर विचारांचे निर्माते बना. तुमच्या लेखणीत समाज बदलण्याची ताकद आहे.

चला, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा होत आहे, त्यानिमित्ताने एक छोटा संकल्प करूया, "मी दररोज काहीतरी वाचेन, दररोज काहीतरी लिहीन, नवीन शब्द शिकेन, सुंदर विचार मांडेन, लेखणीला माझा मित्र बनवेन, आणि उत्तम लेखक होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीन."

तेव्हा मुलांनो, चला लिहू या...! कारण आज वहीत लिहिलेला प्रत्येक शब्द, उद्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया ठरणार आहे.

आजची छोटी लेखणी, उद्याचा मोठा लेखक घडवू शकते. वाचू या... विचार करू या... आणि मनापासून लिहू या ! कारण शब्द बदलतात मन, आणि मन बदलते जग.


- नासा येवतीकर, धर्माबाद

Tuesday, 28 July 2026

दिनविशेष माहिती - 29 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

गुरुपौर्णिमा विशेष

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

कसे आहात? मजेत ना?

मी नासा येवतीकर. आपल्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज आपण भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी अशा गुरुपौर्णिमा या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

लक्षपूर्वक ऐका हं ! कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

चला तर मग, सुरुवात करूया...


आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस महान ऋषी महर्षी वेदव्यास यांची जयंतीचा दिवस. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन केले, महाभारत या महान ग्रंथाची निर्मिती केली तसेच अठरा पुराणांच्या रचनेतही त्यांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्यांना महान गुरु मानले जाते.

भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. आई-वडील आपल्याला जन्म देतात; पण गुरु आपल्याला ज्ञान, संस्कार, शिस्त आणि योग्य जीवनमार्ग देतात. अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तोच खरा गुरु.

संत कबीरांनी गुरुचे महत्त्व सांगताना म्हटले आहे—

"गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय ?
बलिहारी गुरु आपल्या, गोविंद दियो बताय."

याचा अर्थ असा की, गुरु आणि देव दोघेही समोर उभे असतील तर प्रथम गुरुंनाच वंदन करावे, कारण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात.

आपणास शिकविणारे शाळेतील शिक्षकही आपल्या जीवनातील खरे गुरु आहेत. ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर चांगले विचार, उत्तम संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम, सहकार्य आणि देशप्रेम यांसारखी जीवनमूल्येही शिकवतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरुजनांचा नेहमी आदर केला पाहिजे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना वंदन करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. ही परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीचे वैभव आहे.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया—

• आपल्या गुरुजनांचा नेहमी आदर करू.
• नियमित अभ्यास करू.
• शिस्तीचे पालन करू.
• चांगले संस्कार अंगीकारू.
• आपल्या आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे नाव उज्ज्वल करू.

शेवटी, एक सुंदर ओळ आठवूया—

"गुरुविण कोण दाखवील वाट,
ज्ञानदीप तेच लावितात."

चला, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने ज्ञान, संस्कार आणि यशाचा मार्ग स्वीकारूया.

मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला नक्की कळवा.

आता या माहितीवर आधारित काही प्रश्न पाहूया.

प्रश्न १ : आषाढ महिन्यातील पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो?
उत्तर : गुरुपौर्णिमा.

प्रश्न २ : गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाची जयंती साजरी केली जाते?
उत्तर : महर्षी वेदव्यास यांची.

प्रश्न ३ : महाभारताची रचना कोणी केली?
उत्तर : महर्षी वेदव्यास यांनी.

प्रश्न ४ : गुरुपौर्णिमेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर : व्यासपौर्णिमा.

प्रश्न ५ : भारतीय संस्कृतीत कोणाचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे?
उत्तर : गुरुचे.

(ही माहिती विविध विश्वसनीय संदर्भांच्या आधारे संकलित करण्यात आली आहे.)

चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार!

संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद
मो. ९४२३६२५७६९

धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...! "वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!" आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार ...