Showing posts with label दिनविशेष. Show all posts
Showing posts with label दिनविशेष. Show all posts

Saturday, 7 February 2026

दिनविशेष माहिती - 08 फेब्रुवारी

डॉ. झाकीर हुसेन

डॉ. झाकीर हुसेन (8 फेब्रुवारी 1897 – 3 मे 1969) हे थोर शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षणाला जीवनाशी जोडणारी मूल्याधिष्ठित संकल्पना मांडली आणि आधुनिक भारताच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान दिले.
त्यांचा जन्म तेलंगणातील हैदराबाद येथे झाला. प्रारंभीचे शिक्षण भारतात पूर्ण करून त्यांनी जर्मनीतील बर्लिन विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली. शिक्षणक्षेत्रात त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाशी घनिष्ठ संबंध ठेवले आणि पुढे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे संस्थापक व पहिले कुलगुरू म्हणून कार्य केले.
डॉ. झाकीर हुसेन यांनी शिक्षण हे केवळ परीक्षाभिमुख न राहता जीवनोपयोगी, नैतिक मूल्यांवर आधारित आणि राष्ट्रनिर्मितीला सहाय्यक असावे, असा आग्रह धरला. त्यांनी शिक्षक प्रशिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि मूल्यशिक्षणावर विशेष भर दिला.
ते बिहारचे राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. 1963 साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. राष्ट्रपतीपद भूषविणारे ते पहिले शिक्षणतज्ज्ञ होते.
डॉ. झाकीर हुसेन यांचे जीवन हे शिक्षण, सेवा आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या विचारांमुळे भारतीय शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आणि ते आजही आदर्श शिक्षणतज्ज्ञ म्हणून स्मरणात राहतात.

दिनविशेष माहिती - 09 जानेवारी

डॉ. हरगोविंद खुराना

डॉ. हरगोविंद खुराना (9 जानेवारी 1922 – 9 नोव्हेंबर 2011) हे जगप्रसिद्ध भारतीय-अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी आनुवंशिक कोड (Genetic Code) उलगडण्यात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे 1968 साली नोबेल पारितोषिक मिळवले. आधुनिक जीवशास्त्र व वैद्यकशास्त्राच्या प्रगतीत त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे मानले जाते.
खुराना यांचा जन्म पंजाबमधील रायपूर (आताचे पाकिस्तान) येथे झाला. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि पंजाब विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी इंग्लंडमध्ये केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. केली आणि अमेरिकेत संशोधन कार्य सुरू केले.
त्यांनी डीएनए व आरएनए यांच्या रचनेचा अभ्यास करून जनुकीय कोडमधील संकेत कसे कार्य करतात हे स्पष्ट केले. यामुळे प्रथिननिर्मितीची प्रक्रिया समजण्यास मदत झाली आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा मिळाली. त्यांच्या संशोधनामुळे आनुवंशिक आजारांचे निदान व उपचार शक्य होण्यास मोठी मदत झाली.
1968 साली मार्शल निरेनबर्ग आणि रॉबर्ट होली यांच्यासोबत त्यांना नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. त्यांनी अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये अध्यापन व संशोधन केले आणि विज्ञान क्षेत्रात तरुणांना प्रेरणा दिली.
डॉ. हरगोविंद खुराना यांचे जीवन हे परिश्रम, चिकाटी आणि वैज्ञानिक जिज्ञासेचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्यामुळे मानवजातीला जीवनरहस्य समजून घेण्याच्या दिशेने मोठी झेप घेता आली आणि ते जागतिक वैज्ञानिक इतिहासात अढळ स्थान प्राप्त करून गेले.

दिनविशेष माहिती - 02 जानेवारी

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे (23 एप्रिल 1873 – 2 जानेवारी 1944) हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत, लेखक आणि अस्पृश्यता निवारण चळवळीचे अग्रणी कार्यकर्ते होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक समता, मानवी हक्क आणि धर्मातील उदात्त मूल्यांचा प्रचार केला. समाजातील दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
शिंदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील जमखिंडी येथे झाला. प्रारंभीचे शिक्षण पुणे येथे झाले. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि इंग्लंडमध्ये मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड येथे धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. तेथे त्यांना युनिटेरियन विचारधारेचा प्रभाव लाभला, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक विचारांना व्यापक मानवतावादी दिशा मिळाली.
भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी संघटित प्रयत्न सुरू केले. 1906 साली त्यांनी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ (Depressed Classes Mission) स्थापन करून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक प्रतिष्ठा या क्षेत्रांत वंचित समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांनी शाळा, वसतिगृहे आणि समाजप्रबोधन केंद्रांची उभारणी केली.
विठ्ठल रामजी शिंदे हे प्रभावी वक्ते व संवेदनशील लेखक होते. त्यांनी समाजातील जातिभेद, धार्मिक अंधश्रद्धा आणि अन्यायकारक प्रथा यांवर निर्भीडपणे टीका केली. त्यांचे आत्मचरित्र ‘माझ्या आठवणी’ हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथ मानले जाते. त्यांच्या लेखनातून समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार झाला.
महात्मा गांधी, गोपाळकृष्ण गोखले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा वैचारिक संवाद व कार्यसंबंध होता. जरी काही विषयांवर मतभेद असले तरी अस्पृश्यता निर्मूलन व समाजसुधारणा या ध्येयांसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले.
विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन हे समाजातील अन्यायाविरुद्ध शांततामय, विवेकनिष्ठ आणि सेवाभावी लढ्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक समतेच्या चळवळीला नवी दिशा मिळाली आणि आधुनिक महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ राहिले आहे.

दिनविशेष माहिती - 16 जानेवारी

*न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे*

महादेव गोविंद रानडे हे आधुनिक महाराष्ट्राचेअत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. समाजसुधारक, न्यायमूर्ती, अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, लेखक आणि विवेकवादी विचारवंत अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी आयुष्यभर कार्य केले.
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कृत, धर्मग्रंथ व भारतीय परंपरांचा प्रभाव होता. पुढे त्यांनी पुणे व मुंबई येथे उच्च शिक्षण घेतले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय होते. पाश्चात्त्य शिक्षणामुळे त्यांना विवेकवाद, लोकशाही व मानवतावादी विचारांची ओळख झाली.
रानडे यांची १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना सामाजिक न्याय, नैतिकता व मानवतावाद यांना विशेष महत्त्व दिले. त्यांनी कायद्याकडे केवळ नियम म्हणून नव्हे, तर समाजहिताचे साधन म्हणून पाहिले.
महादेव गोविंद रानडे यांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांनी एकेश्वरवाद, नैतिकता, विवेक व सामाजिक समतेचा पुरस्कार केला. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह आणि स्त्रियांचे दुय्यम स्थान यांविरुद्ध ठामपणे आवाज उठवला.
विधवाविवाहाचा पुरस्कार करणे हे त्या काळात धाडसाचे मानले जात होते; तरीही रानडे यांनी या विषयावर लेखन, व्याख्याने व संघटनात्मक कार्य केले. स्त्रीशिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
रानडे यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांचा मोलाचा वाटा होता. बालविवाहामुळे त्यांचे शिक्षण थांबले होते; मात्र रानडे यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी शिक्षण घेतले व पुढे त्या स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्वसन व महिला संघटनांच्या कार्यात अग्रणी ठरल्या.
महादेव गोविंद रानडे हे एक प्रखर अर्थचिंतक होते. स्वदेशी उद्योग, सहकार, औद्योगिकीकरण व शिक्षण यांद्वारे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, असे ते मानत.
रानडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेशी संबंधित होते. ते मवाळ राजकारणाचे समर्थक होते. ब्रिटिश सत्तेशी संघर्षाऐवजी चर्चा, सुधारणा व घटनात्मक मार्गाने स्वराज्य मिळवावे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नेत्यांवर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला.
रानडे यांचे लेखन इतिहास, धर्म, अर्थशास्त्र व समाजसुधारणा या विषयांवर आधारित होते.
त्यांच्या लेखनात भारतीय परंपरा व पाश्चात्त्य विचारसरणी यांचा समन्वय दिसून येतो. समाजात बदल हळूहळू, पण मूलभूत पातळीवर घडवून आणला पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता.
इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. 
महादेव गोविंद रानडे हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून, ते आधुनिक महाराष्ट्राच्या विवेकवादी परंपरेचे प्रतीक आहेत. समाज सुधारण्यासाठी धैर्य, संयम, ज्ञान व करुणा आवश्यक असते, हे त्यांनी आपल्या जीवनकार्याने सिद्ध केले. त्यामुळेच भारतीय समाजप्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे.
दिनांक १६ जानेवारी १९०१ रोजी पुणे येथे महादेव गोविंद रानडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदर्शी विचारवंत गमावला. तथापि, त्यांच्या विचारांचा वारसा आजही समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण, आर्थिक नियोजन व विवेकवादाच्या क्षेत्रात मार्गदर्शक ठरतो.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन 
*संकलन*

दिनविशेष माहिती - 15 जानेवारी

खाशाबा जाधव – भारतीय कुस्तीचा तेजस्वी तारा

खाशाबा दादासाहेब जाधव हे भारताच्या क्रीडाक्षेत्रातील एक महान कुस्तीगीर होते. त्यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आणि देशाच्या क्रीडा ईतिहासात अजरामर स्थान प्राप्त केले. 
खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच खाशाबा जाधव यांना कुस्तीची आवड होती. त्याचे वडील दादासाहेब जाधव हे कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्यांना वयाच्या ५ व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. ग्रामीण वातावरणात मातीच्या आखाड्यात त्यांनी कुस्तीचे प्राथमिक धडे घेतले. आर्थिक अडचणी, अपुरी साधने आणि मर्यादित सुविधा असूनही त्यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपले कौशल्य विकसित केले. त्यांच्या कुटुंबाने आणि गुरूंनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले.
१९५२ साली हेलसिंकी (फिनलंड) येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या फ्री-स्टाईल प्रकारात कांस्य पदक ( ब्रांझ मेडल ) पटकावले. हे भारतासाठी ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक होते. या ऐतिहासिक यशामुळे त्यांनी संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल केले. त्या काळात परदेशी खेळाडूंशी सामना करणे अत्यंत कठीण होते, तरीही खाशाबा जाधव यांनी आपल्या ताकदीने आणि तंत्राने जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली.
ऑलिम्पिकनंतर त्यांनी काही काळ पोलीस सेवेत काम केले आणि तरुण पिढीला कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे कार्यही केले. मात्र, त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्धात त्यांना अपेक्षित असा सन्मान मिळाला नाही. तरीही त्यांचे योगदान भारतीय क्रीडाजगतात अमूल्य आहे.
खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ रोजी झाले. सन २००१ मध्ये त्यांना अतिशय प्रसिद्ध असा अर्जुन आवार्ड देण्यात आला. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने विविध उपक्रम सुरू केले असून, त्यांच्या नावाने पुरस्कार आणि क्रीडांगणे उभारण्यात आली आहेत.
खाशाबा जाधव यांचे जीवन हे संघर्ष, चिकाटी आणि देशभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी दाखवून दिले की कठीण परिस्थितीतूनही कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर महान यश मिळवता येते. त्यामुळेच ते भारतीय कुस्तीचे आणि क्रीडाक्षेत्राचे अभिमानस्तंभ मानले जातात.
*संकलन*

दिनविशेष माहिती 13 जानेवारी


राकेश शर्मा - भारतीय अंतराळवीर

राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर असून त्यांनी भारताचा झेंडा अंतराळात फडकावण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पाटणा (बिहार) येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान, आकाश आणि उड्डाण याविषयी विशेष आकर्षण होते.
राकेश शर्मा यांनी भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची निवड अंतराळ मोहिमेसाठी करण्यात आली. ३ एप्रिल १९८४ रोजी ते सोयुझ टी-११ (Soyuz T-11) या रशियन अंतराळयानातून अंतराळात गेले. ही मोहीम भारत व सोव्हिएत रशिया यांच्यातील सहकार्याचे प्रतीक होती.
राकेश शर्मा यांनी जवळपास ८ दिवस अंतराळात वास्तव्य केले. या काळात त्यांनी पृथ्वीचे निरीक्षण, वैज्ञानिक प्रयोग तसेच भारताशी संबंधित छायाचित्रण केले. जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना “अंतराळातून भारत कसा दिसतो?” असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर –
“सारे जहाँ से अच्छा” – हे उत्तर आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाने कोरले गेले आहे.
अंतराळ मोहिमेनंतर राकेश शर्मा यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव अंतराळवीर आहेत. नंतर त्यांनी भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेतली आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) येथे चाचणी वैमानिक म्हणून काम केले.
राकेश शर्मा यांचे जीवन धैर्य, कष्ट, देशभक्ती आणि विज्ञाननिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी भारताला जागतिक स्तरावर अंतराळ क्षेत्रात ओळख मिळवून दिली. त्यामुळेच ते भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत.

Saturday, 17 January 2026

19 जानेवारी दिनविशेष माहिती ( 19 January )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर, आपल्यासाठी घेऊन आलोय दिनविशेष माहिती. आजच्या कार्यक्रमात आपण वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावणारे 
जेम्स वॅट यांच्या विषयी माहिती पाहू या. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग पाहू या ......

Video पाहण्यासाठी खालील नावावर क्लिक करावे. 


जगाच्या इतिहासात औद्योगिक क्रांतीने मानवाच्या जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले. या क्रांतीमागे अनेक शास्त्रज्ञ व संशोधकांचे योगदान असले, तरी जेम्स वॅट यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्टीम इंजिनमध्ये ( वाफेवर चालणारे इंजिन ) केलेल्या मूलभूत सुधारणा यांमुळे त्यांनी उद्योग, वाहतूक, शेती आणि अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांना नवी दिशा दिली. म्हणूनच जेम्स वॅट यांना औद्योगिक क्रांतीचे जनक म्हटले जाते.
जेम्स वॅट यांचा जन्म 19 जानेवारी 1736 रोजी स्कॉटलंडमधील ग्रीनॉक येथे झाला. त्यांचे वडील जहाजबांधणी व व्यापारी व्यवसायात होते. बालपणापासूनच वॅट यांना गणित, यांत्रिकी व विज्ञानाची विशेष आवड होती. त्यांचे आरोग्य नाजूक असल्यामुळे नियमित शालेय शिक्षण त्यांना फारसे घेता आले नाही; मात्र त्यांनी स्वअध्ययनाच्या जोरावर मोठे ज्ञान संपादन केले. पुढे लंडन येथे त्यांनी वैज्ञानिक उपकरणे बनवण्याचे प्रशिक्षण घेतले, ज्यामुळे त्यांच्या संशोधनाला योग्य दिशा मिळाली.
जेम्स वॅट यांच्या काळात स्टीम इंजिनचा वापर सुरू झाला होता. थॉमस न्यूकोमेन यांनी तयार केलेले स्टीम इंजिन प्रामुख्याने कोळसा खाणींमधील पाणी काढण्यासाठी वापरले जात असे. तथापि, हे इंजिन अत्यंत अपकार्यक्षम होते. त्यात मोठ्या प्रमाणावर इंधन खर्च होत असे आणि त्याची कार्यक्षमता कमी होती. या त्रुटी वॅट यांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी स्टीम इंजिन सुधारण्याचा निश्चय केला.
सन 1765 मध्ये जेम्स वॅट यांनी स्टीम इंजिनमध्ये एक क्रांतिकारी सुधारणा केली. स्वतंत्र कंडेन्सर (Separate Condenser). या शोधामुळे इंजिनचा सिलिंडर सतत गरम राहू लागला आणि वाफेचे संघनन वेगळ्या भागात होऊ लागले. परिणामी इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि इंजिनाची कार्यक्षमता सुमारे 60 टक्क्यांनी वाढली. ही सुधारणा औद्योगिक क्रांतीसाठी अत्यंत निर्णायक ठरली.
याशिवाय वॅट यांनी इंजिनची सरळ हालचाल फिरत्या हालचालीत रूपांतरित करण्याची पद्धत विकसित केली. त्यामुळे स्टीम इंजिनचा वापर केवळ पाणी काढण्यापुरता मर्यादित न राहता कारखाने, गिरण्या, यंत्रमाग आणि इतर औद्योगिक यंत्रे चालवण्यासाठी होऊ लागला. इंजिनचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी सेंट्रिफ्युगल गव्हर्नर विकसित केला, ज्यामुळे यंत्रे अधिक सुरक्षित व स्थिरपणे चालू शकली.
सन 1775 मध्ये जेम्स वॅट यांनी उद्योगपती मॅथ्यू बोल्टन यांच्याशी भागीदारी केली आणि Boulton & Watt ही कंपनी स्थापन झाली. या कंपनीच्या माध्यमातून सुधारित स्टीम इंजिन्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व प्रसार झाला. ब्रिटनसह संपूर्ण युरोपमध्ये उद्योगधंद्यांचा झपाट्याने विकास झाला. उत्पादन वाढले, रोजगारनिर्मिती झाली आणि शहरांचा विस्तार झाला.
जेम्स वॅट यांच्या कार्यामुळे औद्योगिक क्रांतीला गती मिळाली. हातमजुरीऐवजी यंत्रांचा वापर वाढला, उत्पादन स्वस्त व जलद झाले आणि आधुनिक औद्योगिक समाजाची पायाभरणी झाली. त्यांच्या सन्मानार्थ शक्तीचे एकक “वॅट” (Watt) असे नाव देण्यात आले. घरगुती वापरात किलो वॅट आणि आणि वीज प्रकल्पात मेगावॅट वापरले जाते.
25 ऑगस्ट 1819 रोजी वयाच्या 83व्या वर्षी जेम्स वॅट यांचे निधन झाले. मात्र त्यांनी दिलेले योगदान आजही मानवजातीच्या प्रगतीचा पाया आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील त्यांचे कार्य अजरामर असून, इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
अशा प्रकारे, जेम्स वॅट हे केवळ एक संशोधक नसून आधुनिक औद्योगिक युगाचे शिल्पकार होते.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - औद्योगिक क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, जेम्स वॅट यांना औद्योगिक क्रांतीचे जनक म्हटले जाते.

दुसरा प्रश्न - जेम्स वॅट यांनी कशाचा शोध लावला ? 
बरोबर उत्तर आहे, वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी लावला.

तिसरा प्रश्न - जेम्स वॅट यांना कोणत्या विषयाची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, गणित, यांत्रिकी आणि विज्ञान या विषयाची जेम्स वॅट यांना आवड होती.

चौथा प्रश्न - जेम्स वॅट यांनी कोणती कंपनी स्थापन केली ? 
बरोबर उत्तर आहे, बोल्टन अँड वॅट ही कंपनी स्थापन केली. 

शेवटचा पाचवा प्रश्न - वॅट हे कशाचे एकक आहे ? 
बरोबर उत्तर आहे - वॅट हे शक्तीचे एकक आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...! "वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!" आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार ...