Tuesday, 13 January 2026

मकरसंक्रांत ( makarsankrant )

मकरसंक्रांती निमित्त लेख
गोड गोड बोलण्याचा सण
नविन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. 
मकरसंक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर  राशीत प्रवेश करतो तो दिवस. सूर्य या दिवशी  दक्षिणायनातुन उत्तरायनात मार्गक्रमण करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. याच दिवसापासून हिवाळा हळूहळू संपू लागतो आणि उन्हाळ्याची सुरूवात होते. याच दिवशी पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. 
इंग्रजी महिन्यानुसार मकरसंक्रांत हा दिवस १४  जानेवारी रोजीच येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एका दिवसानी पुढे सरकते. महाराष्ट्रात हा सण तीन दिवसात साजरी करण्याची पध्दत आहे. संक्रांतीच्या पूर्वी भोगी आणि संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांती म्हणजे कर सण साजरा केली जाते. संक्रांती सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातलग आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला तिळगुळ देतात आणि 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह, प्रेमात वाढ होण्याविषयी  शुभकामना दिली जाते. थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. जीवनामध्ये नेहमीच आपणाला हा संदेश उपयोगात येऊ शकतो. जगात बंधुता निर्माण करायची असेल तर सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे. गोड बोलणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याने त्रास होणार नाही असे बोलणे होय. बहुतांश वेळा मोठ्या भांडणाचे मूळ जर शोधले तर ते बोलण्यावरुन घडल्याचे लक्षात येते. त्यामुळे असे म्हटले जाते की, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणे केव्हाही चांगले. सतत आपले बोलणे चालू ठेवण्यापेक्षा फार कमी बोलल्यास त्याचा फायदा आपणास नक्की होतो. ' उचलली जीभ लावली टाळ्याला ' या म्हणीनुसार जर आपण बोलत असू, तर आपल्या बोलाण्याला काहीच किंमत उरणार नाही. त्यास्तव आपले महत्त्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकही घर शोधून ही  सापडणार नाही, ज्यांच्या शेजारी शेजारी भांडण होत नाही. परंतु आपण आजच्या दिवसाचे तत्व वर्षभर अवलंबिले तर शेजाऱ्यांसोबत नक्कीच भांडणे होणार नाहीत. संकट काळात किंवा अडीअडचणीत आपणाला आधार कोण देतो ? तर तो असतो शेजार. घराला कुलूप लावून जायचे असेल तर आपण कुलुपाची  चावी कुठे ठेवणार ? दुपारच्या सुट्टीत घरी येणाऱ्या मुलांची व्यवस्था कोठे होते ? घरी वडील नसते वेळी घरात काही अपघात घडले तर कोणाला बोलवणार ? अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरे शेजाऱ्यांच्या घरी जाऊन थांबतात. म्हणून विशेष करून शेजाऱ्यांपाजाऱ्यांना नेहमीच गोड बोलणे फायद्याचे ठरते.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचा कुठे ना कुठे शेतीशी संबंध येतो. जानेवारीच्या दिवसांमध्ये शेतातून उत्पन्न येण्यास प्रारंभ झालेले असते. शेतातून आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रम करतात. हरभरे, उस, बोरे गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात तसेच सुवासिनीची ओटी ही भरतात. 
भारतातल्या विविध प्रदेशात वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. जसे की उतर भारतातील हिमाचल प्रदेश आणि पंजाब मध्ये लोहरी या नावाने हा सण साजरा केला जातो. पूर्व भारतातीलआसाम राज्यात भोगाली बिहू असे म्हटले जाते. पश्चिम भारतात गुजरात व राजस्थान मध्ये हा सणउत्तरायण म्हणजे पतंग उडविण्याचा सण म्हणून ओळखला जातो. आबालापासून वृध्दापर्यंत सर्वच जण खुप मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून धमाल करतात. भारताच्या दक्षिण भागातील तामिळनाडू राज्यात हा सणपोंगल या नावाने खुप प्रसिध्द आहे. भारतातल्या  इतरत्र भागात संक्रांती या नावानेच हा सण प्रसिध्द आहे. 
मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी यात्रा आयोजित केले जातात. प्रामुख्याने प्रत्येक बारा वर्षांनी आयोजित करण्यात येणारी कुंभमेळा यात्रा, ज्याची बरेच जण प्रतिक्षा करतात. याशिवाय कोलकाता शहराजवळ जेथे गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. भारतातल्या विविध भागातील आणि प्रदेशातील लोक यादिवशी एकत्र येतात. भारतातील ही सर्वात मोठी यात्रा समजली जाते. केरळ राज्याच्या शबीरमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते. मकरसंक्रांत हा सण जरी एक असेल परंतु भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पध्दतीने सण साजरी करतात. त्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे एकमेकांना प्रेम देणे आणि घेणे. तेंव्हा चला तर मग पुढच्या मकरसंक्रांती पर्यंत काळजी घेऊ स्वतःची आणि हो शेजाऱ्यांची सुध्दा.

- नागोराव सा. येवतीकर 


तीळ आणि गुळ म्हणजे
प्रेमाचे एक प्रतिक आहे
तुमची आणि माझी 
मैत्री अप्रतिम आहे

- नासा येवतीकर, धर्माबाद
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
W - 9423625769

।। चारोळीमय शुभेच्छा ।।

प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत होवो
नव्या मित्रांची यादी वाढत राहो
नवे नवे आविष्कार रोजच घडो
पुढील संक्रांतीपर्यंत गोडी टिको

*नासा येवतीकर, धर्माबाद*
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक

।। सण संक्रांतीचा ।।

आला सण संक्रांतीचा
घेऊन गोडवा साखरेचा
एकमेकां देऊन तिळगूळ
संदेश पसरवू या प्रेमाचा 

घराघरांत वाहतो कसा
मधूर आनंदाचा झरा
वैर विसरुनी एकत्र येती
स्नेह मिळतो यात खरा

गळाभेट घेऊन म्हणती
तिळगुळ घ्या गोड बोला
झाले गेले सारे विसरुनी
सोडावा आता अबोला

प्रत्येक सण आपणाला
काहीतरी संदेश देतो
सणाच्या निमित्ताने तरी
आपण सर्व एकत्र येतो

साजरा करू सण संक्रांतीचा
साजरा करू सण प्रेमाचा
वर्षभर असू द्यावं गोडवा
स्वीकार करावा शुभेच्छाचा

नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

भोगी आणि मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

माहेरचा संक्रांत

दूरदेशी असलेल्या मुली
परतून आल्या बघा माहेरी
मकरसंक्रांतीचा हा सण
आनंद घेऊन आला घरी

भाज्या होऊन एकत्र
सण येतो हा भोगी
विठ्ठल नाम घेत घेत
फुगडी खेळती दोघी
बालपणीच्या आठवणी
बघा कश्या दाटतात उरी
मकरसंक्रांतीचा हा सण
आनंद घेऊन आला घरी

तिळगुळ वाटण्याचा 
सण आहे मकरसंक्रांती
एकमेका गोड बोलूनी
सुखदुःखाचे होऊ सोबती
विसरून सारे राग द्वेष
अखंड करू प्रेमाची दोरी
मकरसंक्रांतीचा हा सण
आनंद घेऊन आला घरी

अंगणात रांगोळी काढून
सुखसमृद्धीचा संदेश देऊ
उंच उंच पतंग उडवूनी
आकाशात भरारी घेऊ
संपता सण संक्रांतीचा
निरोप करू या सासरी
मकरसंक्रांतीचा हा सण
आनंद घेऊन आला घरी

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

धन्यवाद ......!

Tuesday, 6 January 2026

प्रजासत्ताक दिन भाषण ( Republic Day Speech )

इयत्ता ५ वी ते ७ वीसाठी साधारण २ मिनिटांचे, सोप्या भाषेतले प्रजासत्ताक दिनाचे भाषण 

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या दिवशी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठ्या आदराने स्मरण करतो.

अज्ञानाचा अंधार फोडला,
शब्दांनी न्याय जागवला,
समतेचा दीप पेटवला,
आंबेडकरांनी देश घडवला.

बाबासाहेब हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी आपल्या देशाला संविधान दिले. या संविधानामुळे भारत एक प्रजासत्ताक देश बनला. संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. कोणीही मोठा किंवा लहान नाही, श्रीमंत किंवा गरीब नाही—सर्वजण समान आहेत, हे बाबासाहेबांनी शिकवले.
बाबासाहेबांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. ते म्हणत असत, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” शिक्षणामुळेच माणूस विचार करायला शिकतो आणि योग्य-अयोग्य ओळखतो.
आज आपण विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचा संदेश लक्षात ठेवला पाहिजे. आपण चांगले शिकले, शिस्त पाळली आणि एकमेकांना मदत केली, तरच खरा प्रजासत्ताक दिन साजरा झालेला असेल. 
जय भीम ! जय भारत !
************************

२) महात्मा गांधी 
आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज प्रजासत्ताक दिन. महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
गांधीजींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांचा विश्वास होता की सत्य आणि अहिंसेने मोठ्यात मोठा लढा जिंकता येतो.
गांधीजींचे जीवन अतिशय साधे होते. ते नेहमी सत्य बोलत आणि प्रामाणिकपणे वागत. त्यांनी स्वच्छतेचे, स्वावलंबनाचे आणि शिस्तीचे महत्त्व सांगितले.
आजच्या दिवशी आपण गांधीजींच्या विचारांपासून प्रेरणा घ्यायला हवी. खोटे न बोलणे, भांडण न करणे, एकमेकांचा आदर करणे हीच गांधीजींना खरी आदरांजली आहे.
चला तर मग, आपण सर्वजण चांगले नागरिक बनण्याचा संकल्प करूया.
जाता जाता एवढे म्हणावे वाटते 

सत्य, अहिंसा, साधेपणा,
हाच गांधीजींचा धर्म,
प्रामाणिकपणे जगण्याचा 
जगाला दिला अमर मंत्र.

जय हिंद ! जय भारत !

************************

३) भगतसिंग 
आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज 26 जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिन. भगतसिंग हे भारताचे महान क्रांतिकारक होते. त्यांनी देशासाठी लहान वयातच बलिदान दिले.
भगतसिंग खूप धाडसी होते. त्यांना अन्याय अजिबात आवडत नव्हता. ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांची क्रांती केवळ शस्त्रांची नव्हती, तर विचारांची होती.
भगतसिंगांना देशातील तरुणांवर खूप विश्वास होता. ते म्हणत की तरुणांनी जागृत राहिले पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत आणि चुकीच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे.
आज आपण विद्यार्थी आहोत. आपण शाळेत शिस्त पाळली, प्रामाणिक राहिलो आणि चुकीच्या गोष्टींना “नाही” म्हणायला शिकलो, तर आपण भगतसिंगांचे स्वप्न पूर्ण करू शकतो. भगतसिंग विषयी म्हणावे वाटते, 

हसत स्वीकारले मरण,
भीतीला त्यांनी दूर सारले,
क्रांतीचा आवाज बनून,
तरुणांना त्यांनी जागवले.

इंकलाब जिंदाबाद ! जय भारत !
************************

४) सुभाषचंद्र बोस 
आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

स्वातंत्र्यासाठी दिली झुंज,
धैर्याने केली सेना उभी,
“तुम मुझे खून दो” ची हाक,
कायम स्मरणात राहिली.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताचे शूर आणि धाडसी नेते होते.
त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची नवी ऊर्जा दिली. “तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन” हे त्यांचे वाक्य आजही आपल्याला प्रेरणा देते.
नेताजींनी आजाद हिंद सेना स्थापन केली. त्यांनी शिस्त, धैर्य आणि देशप्रेम यांचे महत्त्व सांगितले. त्यांचे जीवन बलिदान आणि साहसाने भरलेले होते.
आज आपण सैनिक नाही, पण विद्यार्थी म्हणून आपली कर्तव्ये आहेत. वेळ पाळणे, अभ्यास करणे, शिक्षकांचा आदर करणे आणि देशावर प्रेम करणे हीच नेताजींना खरी मानवंदना आहे.

भीतीला त्यांनी दिला नकार,
स्वातंत्र्यासाठी रण पेटवला,
धैर्य, शौर्य, देशभक्तीने,
नेताजींनी भारत जागवला.

जय हिंद ! जय भारत !
************************

५) पंडित जवाहरलाल नेहरू 
आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

कोटाला गुलाब, ओठावर हसू,
मुलांसाठी ते होतेच खास,
चाचा नेहरूच्या प्रेमातून,
घडला भारताचा श्वास.

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांना चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जाते.
नेहरूजींना मुलांवर खूप प्रेम होते. त्यामुळेच १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी शिक्षण, विज्ञान आणि आधुनिक भारत यावर भर दिला.
त्यांचे स्वप्न होते की भारत हा शिक्षित, प्रगत आणि शांतताप्रिय देश व्हावा. आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात प्रगती करत आहोत, यामागे नेहरूजींचे विचार आहेत.
आजच्या प्रजासत्ताक दिनी आपण चांगले शिकून, नवे विचार करून देशाच्या प्रगतीस हातभार लावण्याचा संकल्प करूया.

बच्चों के सपने, उनका संग,
नेहरूजी ने बढ़ाया अनोखा रंग।
हँसी बच्चों की, दिल में प्यार,
नेहरूजी ने दिया उज्ज्वल संसार।

जय हिंद ! जय भारत !
************************

6 ) अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक उद्योगी तरुण क्रांतिकारी होते. ते ७ जानेवारी १८९२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आयानी (आंजनी) या खेड्यात जन्मले. शिक्षणासाठी त्यांनी इंदूर, निझामाबाद आणि नंतर छत्रपती संभाजीनगर (माजी औरंगाबाद) येथे इंग्रजीचे शिक्षण घेतले. शिक्षणाच्या काळात त्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित गुप्त संघटनांशी झाला आणि त्यांनी ब्रिटिश राजाविरुद्ध क्रांतिकारक चळवळीमध्ये भाग घेतला.
२१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ब्रिटिश कलेक्टर आर्थर मेसन टिपेट्स जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा एक अत्यंत धाडसी आणि इतिहासात महत्त्वाचा प्रसंग मानला जातो.
या घटनेनंतर अनंत कान्हेरेंवर कडक कायदेशीर कारवाई झाली आणि त्याला ठाणे तुरुंगात फाशीची शिक्षा सुनावली गेली. ते केवळ १८–१९ वर्षांचे असताना या देशासाठी आपले प्राण कुरबान केले. त्यांच्या सहकारी विनायक देशपांडे आणि कृष्णाजी कर्वे यांनाही फाशी झाली.
अनंत कान्हेरे यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देते आणि आजही भारतीय इतिहासातील एक शहीद आणि क्रांतिकारक नायक म्हणून स्मरणात आहे.

तरुण धाडसी होते नायक शूर,
देशासाठी दिले आपले प्राण,
उभे राहिले फाशीच्या रणभूमीत ,
अनंत कान्हेरेची ठेवू नेहमी स्मरण

जय हिंद ! जय भारत !

************************
क्रमश : चालू 

Sunday, 4 January 2026

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती ( Rajmata Jijau & Swami Vivekanand )

आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो,
आज मी आपल्या समोर भारतमातेचे दोन महान तेजस्वी दीप—राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद—यांच्या विषयी दोन शब्द बोलणार आहे.
राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताच नव्हे, तर त्या एका महान राष्ट्रपुरुषाच्या घडणाऱ्या शिल्पकार होत्या. त्यांनी शिवरायांना लहानपणापासून रामायण, महाभारत आणि स्वराज्याची स्वप्ने सांगितली. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, धर्म, न्याय व स्वाभिमान जपणे—हे संस्कार त्यांनी शिवरायांच्या मनात रुजवले. म्हणूनच राजमाता जिजाऊ या केवळ एका राजाच्या आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या जननी होत्या. त्यांच्या त्यागातून, धैर्यातून आणि संस्कारातून एक आदर्श राजा घडला.
दुसरीकडे, स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारताचे महान विचारवंत होते. त्यांनी तरुणांना आत्मविश्वासाचा मंत्र दिला— “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.” त्यांनी भारताला जगासमोर अभिमानाने उभे केले. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नसून, मानवतेची सेवा हाच खरा धर्म आहे, हे त्यांनी शिकवले. युवकांमध्ये देशभक्ती, चारित्र्य आणि आत्मबल निर्माण करणे, हेच त्यांचे खरे कार्य होते.
राजमाता जिजाऊ यांनी कर्मातून राष्ट्र घडवले, तर स्वामी विवेकानंदांनी विचारातून राष्ट्र जागे केले. एकीने आदर्श राजा घडवला, तर दुसऱ्यांनी आदर्श नागरिक घडवण्याचा संदेश दिला. या दोघांचे जीवन आपल्याला सांगते की, मजबूत राष्ट्र घडवायचे असेल तर संस्कार, आत्मविश्वास आणि सेवा भावना आवश्यक आहे.
आजच्या तरुण पिढीने राजमाता जिजाऊ यांच्याकडून धैर्य व त्याग शिकावा आणि स्वामी विवेकानंदांकडून आत्मविश्वास व देशप्रेम शिकावे. आपण असे केले, तरच खऱ्या अर्थाने भारताचे उज्ज्वल भविष्य घडेल.
माझे भाषण संपवताना मी एवढेच म्हणेन—
जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदांचे विचार आपल्या जीवनात उतरवूया.
धन्यवाद! 🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाषण - 1
आदरणीय अध्यक्ष महोदय, शाळेचे मुख्याध्यापक, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज मी आपल्यासमोर राजमाता जिजाऊ विषयी दोन शब्द सांगणार आहे.

राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड येथे झाला. त्या जाधव घराण्यातील सुसंस्कृत, धैर्यशील आणि दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या.

 त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या.

जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर बालपणापासूनच संस्कार केले. रामायण, महाभारत, संतांचे विचार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली. “स्वराज्य निर्मितीची ” भावना जिजाऊंच्या संस्कारांतूनच शिवाजी महाराजांच्या मनात रुजली.

पती शहाजीराजे भोसले यांच्यापासून दूर राहूनही त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिवाजी महाराजांचे संगोपन केले. संकटे, अपमान आणि संघर्ष असूनही त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. म्हणूनच जिजाऊ या त्याग, धैर्य आणि मातृत्वाच्या सर्वोच्च प्रतीक मानल्या जातात.

राजमाता जिजाऊ आपल्याला शिकवतात की, एक सशक्त आई घडली तर ती संपूर्ण पिढी घडवू शकते. त्यांच्या संस्कारांमुळेच शिवाजी महाराजांसारखा महान राजा आणि लोककल्याणकारी शासक घडू शकला.

शेवटी एवढेच म्हणेन की,
राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याची जननी, संस्कारांची मूर्ती आणि नारीशक्तीचा तेजस्वी आदर्श आहेत.

धन्यवाद! 🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाषण - 2

आदरणीय अध्यक्ष महोदय, आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,
इतिहासात अनेक योद्धे होऊन गेले…
अनेक राजे झाले…
पण राजा घडवणारी माता फार क्वचित जन्माला येते.
अशीच एक तेजस्वी माता म्हणजे — राजमाता जिजाऊ!
राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची आई नव्हे,
तर स्वराज्याची जननी,
संस्कारांची शिल्पकार,
आणि नारीशक्तीचा तेजस्वी आदर्श होय.
ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा, विचाराचा अधिकार नव्हता,
त्या काळात जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात
स्वराज्याचे स्वप्न पेरले.
रामायण-महाभारत सांगून त्यांनी केवळ गोष्टी सांगितल्या नाहीत,
तर धैर्य, न्याय आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ज्वाला पेटवली.
पती शहाजीराजे दूर असताना,
शत्रूंनी वेढलेल्या भूमीत,
अनेक संकटांचा सामना करत,
जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे संगोपन केले.
त्या कधी डगमगल्या नाहीत…
कारण त्या केवळ माता नव्हत्या —
त्या राष्ट्रनिर्मितीचे बळ होत्या.
शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहताना
आपण तलवार पाहतो, गड पाहतो, विजय पाहतो…
पण त्या पराक्रमामागे उभी असलेली
संस्कारांची शक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ हे विसरता कामा नये.
म्हणूनच असे म्हणावेसे वाटते —
शिवाजी महाराज जर स्वराज्याचे शिल्पकार असतील,
तर राजमाता जिजाऊ त्या शिल्पाच्या शिल्पकार होत्या!
आजच्या काळातही जिजाऊ आपल्याला संदेश देतात —
आई घडली तर पिढी घडते,
पिढी घडली तर राष्ट्र घडते!
शेवटी एवढेच म्हणेन,
राजमाता जिजाऊ अमर आहेत —
कारण त्या इतिहासात नाहीत,
त्या आपल्या विचारांत जिवंत आहेत!

जय जिजाऊ!
जय शिवराय!
जय हिंद! 🇮🇳
~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाषण - 3

आदरणीय अध्यक्ष महोदय, शाळेचे मुख्याध्यापक, गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,

इतिहासाच्या पानांवर अनेक शूर योद्ध्यांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत.
पण त्या इतिहासाला दिशा देणारी,
त्या योद्ध्यांना घडवणारी
एक माता होती —
ती म्हणजे राजमाता जिजाऊ !

राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची आई नव्हे,
तर स्वराज्याची जननी,
संस्कारांची मूर्ती
आणि नारीशक्तीचा तेजस्वी दीपस्तंभ होय.

मित्रांनो,
ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता,
स्वतःचे मत मांडण्याची मुभा नव्हती,
त्या काळात जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात
स्वराज्याचे स्वप्न पेरले.
रामायण, महाभारत, संतांचे विचार सांगत
त्यांनी शिवरायांच्या मनात
धर्म, न्याय, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्वाला पेटवली.

पती शहाजीराजे दूर असताना, शत्रूंनी वेढलेल्या भूमीत,
अपमान, संकटे आणि असुरक्षिततेच्या छायेत
जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे संगोपन केले.

त्या कधीही कमकुवत झाल्या नाहीत,
कारण त्यांना माहिती होते 
आपण एका मुलाला नव्हे, तर एका राष्ट्राच्या भविष्याला घडवत आहोत!

शिवाजी महाराज तलवार चालवायला शिकले,
तेव्हा त्यांच्या हातात केवळ शस्त्र नव्हते,
तर जिजाऊंनी दिलेले संस्कार होते.

महाराजांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली,
तेव्हा त्या शपथेच्या मुळाशी
राजमाता जिजाऊंची प्रेरणा उभी होती.

आपण शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहतो,
गड-किल्ले पाहतो,
विजय आणि राज्याभिषेक पाहतो…
पण त्या प्रत्येक यशामागे
एक माता शांतपणे उभी होती ती म्हणजे राजमाता जिजाऊ!

म्हणूनच अभिमानाने म्हणावेसे वाटते 
शिवाजी महाराज जर स्वराज्याचे शिल्पकार असतील,
तर राजमाता जिजाऊ त्या शिल्पाच्या शिल्पकार होत्या!

आजच्या काळातही जिजाऊ आपल्याला एक मोठा संदेश देतात 
आई घडली तर पिढी घडते,
पिढी घडली तर समाज घडतो,
आणि समाज घडला तर राष्ट्र घडते!

मित्रांनो,
राजमाता जिजाऊ इतिहासात नाहीत,
त्या केवळ पुस्तकांत नाहीत,
त्या आपल्या विचारांत, आपल्या मूल्यांत आणि आपल्या जबाबदाऱ्यांत जिवंत आहेत.

शेवटी एवढेच म्हणेन 
राजमाता जिजाऊ अमर आहेत!
कारण त्यांनी शिवाजी महाराज घडवले,
आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले!

जय जिजाऊ! जय शिवराय!
जय महाराष्ट्र!
जय हिंद! 🇮🇳
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाषण - 4 लहान वर्गासाठी 

सर्वाना माझा नमस्कार, 

आदरणीय शिक्षकवर्ग
आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज मी आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे.

राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या.

त्या खूप शूर, हुशार आणि संस्कारी होत्या.

जिजाऊंनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना
चांगले संस्कार दिले.

त्या त्यांना रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगत.

त्यातून शिवाजी महाराजांना
सत्य, धैर्य आणि न्याय शिकायला मिळाले.

जिजाऊंनी शिवाजी महाराजांना
देशावर प्रेम करायला शिकवले.

त्यामुळेच शिवाजी महाराज
मोठे, शूर आणि चांगले राजे झाले.

राजमाता जिजाऊ आपल्याला शिकवतात की,
आईने दिलेले संस्कार खूप महत्त्वाचे असतात.

म्हणूनच आपण राजमाता जिजाऊंचा
आदर करायला हवा.

धन्यवाद! 🙏

जय जिजाऊ!
जय शिवराय!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वामी विवेकानंद भाषण - 1
आदरणीय अध्यक्ष महोदय, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग
आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

आज मी आपल्यासमोर स्वामी विवेकानंद या महान विचारवंताविषयी थोडे मनोगत व्यक्त करणार आहे.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म
१२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते लहानपणापासूनच बुद्धिमान, निर्भय आणि जिज्ञासू होते.

स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. गुरूंच्या विचारांतून त्यांनी आत्मविश्वास, सेवा आणि मानवतेचा संदेश घेतला.
त्यांचा ठाम विश्वास होता की, “प्रत्येक माणसात ईश्वर वास करतो.”

मित्रांनो,
१८९३ साली अमेरिकेतील शिकागो धर्मपरिषदेत
स्वामी विवेकानंदांनी केलेले भाषण
आजही जगभर प्रसिद्ध आहे.
“My brothers and sisters of America”
या एका वाक्याने त्यांनी संपूर्ण सभागृह जिंकले
आणि भारताची मान जगात उंचावली.

स्वामी विवेकानंदांनी तरुणांना नेहमी सांगितले
“उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.”
त्यांना आळशीपणा, भीती आणि न्यूनगंड अजिबात आवडत नव्हता.

त्यांचा विश्वास होता की
तरुणांमध्येच देशाचे भविष्य दडलेले आहे.
त्यांनी आपल्याला आत्मविश्वास, परिश्रम,
देशप्रेम आणि माणुसकी शिकवली. म्हणूनच १२ जानेवारी हा दिवस
राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

शेवटी एवढेच म्हणेन स्वामी विवेकानंद हे केवळ संत नव्हते,
ते युवकांचे मार्गदर्शक आणि भारताचे तेजस्वी विचारवंत होते.
चला तर मग,
त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया.

धन्यवाद! 🙏
जय हिंद! 🇮🇳
~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वामी विवेकानंद भाषण - 2

आदरणीय अध्यक्ष महोदय, मुख्याध्यापक, 
आदरणीय गुरुजन
आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

जर तुम्हाला कोणी विचारले,
“तरुणाईला जागं करणारा एक आवाज कोणता?”
तर ठाम उत्तर आहे —
स्वामी विवेकानंद!

स्वामी विवेकानंद म्हणजे
केवळ एक संन्यासी नव्हे,
ते होते धैर्य, आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीचा जिवंत ज्वालामुखी!

१२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेले
नरेंद्रनाथ दत्त
हे पुढे जगाला ओळख मिळालेले 
स्वामी विवेकानंद बनले.

त्यांच्या विचारांत भीतीला जागा नव्हती,
आणि कमजोरीला माफी नव्हती!

मित्रांनो,
१८९३ साल…
अमेरिकेतील शिकागो धर्मपरिषद…
आणि ते ऐतिहासिक शब्द —
“My brothers and sisters of America!”
एका वाक्याने त्यांनी
संपूर्ण जग जिंकले
आणि भारताचा अभिमान उंचावला!

स्वामी विवेकानंदांनी तरुणांना एकच मंत्र दिला 
“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका!”
ते म्हणत,
“तुम्ही कमजोर नाही,
तुम्ही पापी नाही,
तुमच्यात अमर शक्ती आहे!”

त्यांना रडणारी, घाबरणारी तरुणाई नको होती,
तर स्वतःवर विश्वास ठेवणारी, मेहनती आणि ध्येयवेडी तरुणाई हवी होती.
त्यांचा ठाम विश्वास होता की 
तरुण जागा झाला, तर देश आपोआप जागा होईल!

म्हणूनच मित्रांनो,
स्वामी विवेकानंद केवळ इतिहासात नाहीत,
ते आपल्या रक्तात आहेत,
आपल्या विचारांत आहेत,
आणि आपल्या ध्येयांत आहेत!

आज १२ जानेवारी हा दिवस
राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा होतो,
कारण स्वामी विवेकानंद म्हणजे युवकांचे श्वास!

चला तर मग,
भीती झटकून टाकूया,
आळस दूर करूया,
आणि स्वामी विवेकानंदांचे स्वप्न असलेला
सशक्त, आत्मविश्वासी भारत घडवूया!

जय विवेकानंद! जय युवा शक्ती!

जय भारत माता!
जय हिंद! 🇮🇳
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वामी विवेकानंद भाषण - छोट्या वर्गासाठी 

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग
आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

आज मी आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. ही नम्र विंनती 

स्वामी विवेकानंद हे खूप थोर संत होते.
त्यांचे लहानपणीचे नाव नरेंद्र होते.
ते खूप हुशार आणि धाडसी होते.
स्वामी विवेकानंद आपल्याला नेहमी सांगत 
“उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका!”
ते मुलांना आणि तरुणांना खूप आवडत.
त्यांनी आपल्याला आत्मविश्वास, मेहनत आणि देशप्रेम शिकवले.
१२ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन
राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

आपणही स्वामी विवेकानंदांसारखे
धैर्यवान, मेहनती आणि चांगले नागरिक बनूया.
धन्यवाद! 🙏

जय स्वामी विवेकानंद!
जय हिंद! 🇮🇳
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
धन्यवाद! 🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Wednesday, 31 December 2025

नवीन वर्षाभिनंदन ( Happy New Year 2026 )

           आलं रे नवीन वर्ष

आलं रे नवीन वर्ष
सर्वाना झालंय हर्ष 
हसत गाऊ गोड गाणी,
त्याने हृदयास होई स्पर्श ।

हाती घेऊ पुस्तक नि पेन
छोटी स्वप्नं नवी पाहू या
चांगल्या सवयी सोबत
रोज गोड गोष्टी करूया ।

आई-बाबांचा ठेवून मान
शिक्षकांचे रोज ऐकूया
सर्व एकत्र राहून प्रेमाने 
चला नवीन वर्ष जगूया ।

नासा येवतीकर, धर्माबाद 
~~~~~~~~~~~~~~~~
       नवा वर्ष : नवा हर्ष 
नवे नवे सूर घेऊन येताना 
आशेचा एक किरण हसतो
निरोप देता जुन्या गोष्टीला
नव्या स्वप्नांचा रस्ता दिसतो ।

मागे ठेवून कालच्या चुका
आज नवी उमेद घेऊ या
जिद्द, विश्वास नि कष्टाने
उज्ज्वल भविष्य घडवू या ।

गार वारा नव्या पहाटेचा
मनामनात आनंद पेरतो
पालवी नव्या विचारांची
पुन्हा जीवन फुलवतो ।

वैर संपवूनी, प्रेम वाढवू
मनातील द्वेष दूर करू या,
आपण सारे एक भावनेने
वर्ष नवीन साजरा करू या ।

प्रत्येक दिवशी धडा नवा
प्रत्येक क्षणी अर्थ नवा
प्रत्येकाचा संकल्प नवा
प्रत्येकासाठी हा वर्ष नवा ।

नासा येवतीकर, धर्माबाद 
~~~~~~~~~~~~~~~~

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .......!

नासा येवतीकर, स्तंभलेखक, 9423625769

Tuesday, 30 December 2025

सूत्रसंचालन

      🌸 सावित्रीबाई फुले जयंती  🌸

            🌸 सूत्रसंचालन 🌸
आगतम.... स्वागतम..... सुस्वागतम.......
सर्वाना माझा नमस्कार. 
आज 03 जानेवारी अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने उपस्थित सर्वांचे मी ________ सहर्ष स्वागत करते.

ज्ञानाचा दीप उजळला, अज्ञानाचा अंधार गेला,
सावित्रीच्या शब्दांनी, इतिहास नवा घडला,
स्त्री शिक्षणाची वाट दाखवली जगाला,
नमन त्या माऊलीला, क्रांतिज्योती सावित्रीबाईला ।

कोणताही कार्यक्रम म्हटलं की त्याला अध्यक्षाची गरज भासते. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक ________ यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकार करण्याची विनंती करते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेतील शिक्षकांना विनंती आहे की, आपण प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारावे. 

सन्माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील मान्यवर, शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो…
आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत त्या ज्ञानज्योती, स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक, समाजक्रांतीच्या अग्रदूत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त. 
आता आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करूया.
त्यासाठी मान्यवर पाहुण्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे. 🙏

हातात पुस्तक, मनात ध्यास,
समाजबदलाचा होता विश्वास,
दिवा ज्ञानाचा पेटवून गेल्या,
सावित्रीबाई आम्हाला वाट दाखवून गेल्या ।

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन नंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत गीताने करूया. त्यासाठी ________ यांना विनंती आहे की त्यांनी स्वागत गीत सादर करावे. 👏

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करणे आमचे कर्तव्य आहे. म्हणून 
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ________ यांचे स्वागत ________ हे करतील. 

स्वागताचा कार्यक्रमानंतर मी उपस्थित सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करते. 

शब्द नव्हते फक्त शिकवणीचे,
ते होते परिवर्तनाचे शस्त्र,
स्त्री शिक्षणासाठी उभी राहिली,
सावित्रीबाई – समाजक्रांतीची दृष्टी।

आता आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी ________ यांना आमंत्रित करते.

सावित्रीबाई फुले यांचा परिचय :
सावित्रीबाई फुले म्हणजे
✔ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका
✔ स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणारी क्रांतिकारक
✔ अन्याय, अज्ञान आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारी थोर समाजसुधारक
त्यांचे विचार आजही आपल्याला दिशा देतात.

लहान हातात मोठी मशाल, ज्ञानाची ओंजळ भरी,
सावित्रीच्या पावलांवरून, चालते आजची पिढी खरी,
स्वप्न पाहा, शिका, उभे रहा निर्भयपणे,
हीच खरी मानवंदना, सावित्रीच्या कार्यास सन्मानाने।

यानंतर आपल्या समोर आमच्या शाळेतील काही चिमुकली मुले भाषण करण्यासाठी आतुर आहेत. 
सर्वप्रथम भाषण करण्यासाठी येत आहे..... ________
खूप छान भाषण केले आहे. 

लहान पावलांत मोठे स्वप्न,
ज्ञानाने बदलले जीवन,
सावित्रीच्या विचारांची पालखी,
आजच्या पिढीकडे चालली निश्चित ।

यानंतर त्यांच्या महान कार्याला शब्दरूप देण्यासाठी ________  यांना भाषण सादर करण्यासाठी आमंत्रित करते. 👏

शिक्षणाचा अर्थ कळवणारी,
सावित्री समाज घडवणारी.

• पुस्तक हातात, धैर्य मनात,
सावित्रीबाई प्रेरणा प्रत्येक क्षणात.

• स्त्री शिक्षणाचा पाया रचला,
इतिहासाने तिला वंदन केलं.

सावित्री म्हणजे विचार, विचार म्हणजे क्रांती.

• पुस्तकातली शक्ती, सावित्रीने ओळखली.

• स्त्री शिक्षणाची सुरुवात, सावित्रीच्या नावावर.

• इतिहास घडवणारी, एक शिक्षिका साधी पण थोर.

अंधेरों से जो लड़ी, वो उजाला बन गई,
शिक्षा की राह में, मिसाल बन गई,
नारी को जिसने पहचान दी ज्ञान की,
वो सावित्री इतिहास की मशाल बन गई।

छोटे कंधों पर बड़े सपनों का भार है,
सावित्री के विचारों से रोशन संसार है,
(प्रत्येक कार्यक्रमानंतर थोडेसे अभिनंदन शब्द)

विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहुणे यांचे भाषण - 
ज्या विचारांनी घडवला इतिहास,
त्या विचारांची आजही आहे आस,
मार्गदर्शनाच्या दीपासाठी,
मान्यवरांना करते नम्र आवाहन खास।

यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य आकर्षण असलेले मा. ________  प्रमुख पाहुण्यांना नम्र विनंती करते मार्गदर्शन करावे. 👏

सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार. आपण आमच्या मुलांना खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

सत्कार / गौरव :
नवीन वर्षानिमित्ताने आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुंदर भेट कार्ड तयार केल्याबद्दल शाळेकडून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याचा कार्यक्रम होईल.
सत्कारासाठी ________ यांना विनंती आहे. त्यांनी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारावा.

शिका, लढा आणि पुढे चला,
अज्ञानाच्या बेड्या तोडत रहा,
सावित्रीचा वारसा जपू या,
खरी मानवंदना तिलाच देऊ या।

यानंतर कार्यक्रमाला दिशा देणारे अध्यक्षीय भाषणासाठी
आदरणीय ________ यांना आमंत्रित करते. त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. 

अंधेरों से जो लड़ी, वो उजाला बन गई,
शिक्षा की राह में, मिसाल बन गई,
नारी को जिसने पहचान दी ज्ञान की,
वो सावित्री इतिहास की मशाल बन गई।

आता शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनासाठी ________ यांना आमंत्रित करते.
समारोप :
नुसते स्मरण नको आज, हवे आचरण खरे,
सावित्रीचे विचार जपणे, हेच वंदन सारे,
शिक्षण, समता, माणुसकी, या वाटेवर चालू या,
क्रांतिज्योती सावित्रीबाई, तुमच्याच मार्गी राहू या।

सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आपण सर्वांनी स्वीकारूया,
स्त्री-पुरुष समानतेचा विचार आचरणात आणूया
आणि त्यांच्या कार्याला खरी मानवंदना देऊया.

याच शब्दांत आजचा कार्यक्रम इथेच संपवते.
आपल्या सर्वांच्या उपस्थितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🌸

जय हिंद....! जय भारत.....!

Monday, 29 December 2025

नवीन वर्ष समृद्धीचे जावो ( Happy New Year 2026 )

         नवीन वर्ष समृद्धीचे जावो 

जुना वर्ष संपून नवीन वर्ष येतो तेव्हा वेळेच्या दारावर अलगद टिकटिक आवाज होते. “मी आलो आहे” असे जणू ते हळूच कानात सांगते. जुन्या वर्षाच्या पायऱ्या ओलांडून ते आपल्या जीवनात प्रवेश करते आणि मनात नकळत नवे विचार, नवी उमेद जागवते. कॅलेंडरवरची तारीख बदलते, पण त्या बदलासोबत मनाच्या कोपऱ्यात काहीतरी नव्याने उमलू लागते.
जुन्या वर्षाच्या आठवणीत मन रमून जाते. सुख-दुःखाच्या कडू-गोड प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर तरळू लागतात. त्या सर्व आठवणी म्हणजे रंगीबेरंगी चित्रांसारख्या असतात. काही आनंदाच्या, काही दुःखाच्या, तर काही शिकवण देणाऱ्या. त्या आठवणी मनाच्या कप्प्यात नीट जपून ठेवून पुढे जाण्याचे धैर्य नवीन वर्ष देते. ते आपल्याला सांगते की भूतकाळ विसरायचा नाही, पण त्यात अडकून देखील राहायचे नाही.
तशी तर रोजच्या सारखी पहाट होते पण आज नवीन वर्षाची पहाट ही खास असते. वातावरणात एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. हिवाळाच्या थंड वाऱ्यासोबत आशेची चाहूल लागते. मनात नकळत विचार येतात की, या वर्षी काहीतरी वेगळं करूया, काहीतरी चांगलं घडवूया. मग संकल्प जन्माला येतात, काही ठाम असतात तर काही हळवे असतात. ते संकल्प कधी पूर्ण होतात, कधी वाटेत हरवतात, पण प्रयत्न करण्याची प्रेरणा मात्र कायम देऊन जातात.
नवीन वर्ष आपल्याला एक नवी दिशा देतो, नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो. रोजची तीच घाई, मनावर असलेला  ताणतणाव, अपूर्ण राहिलेल्या इच्छा यांमधून थोडावेळ थांबून स्वतःकडे पाहण्याची एक संधी देते. आपण खरंच आनंदी आहोत का ? समाधानी आहोत काय ? आपल्याला नेमकं काय हवं आहे ? या सर्व बाबीचा विचार करण्यासाठी हा क्षण जणू खासच असतो.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळालेले शुभेच्छांचे संदेश आणि हास्याने भरलेले चेहरे पाहण्यात नवीन वर्ष साजरे होते. एकीकडे खूप घोंगाट, युवा वर्गात नवीन वर्ष साजरा करण्याची क्रेज वेगळीच असते. पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते मनातले शांत समाधान. कदाचित हे कळायला खूप वेळ लागतो. त्यापेक्षा गरजू व्यक्तीला दिलेली मदत, कुणाच्या रडवेल्या चेहऱ्यावर फुलवलेले हसू, किंवा स्वतःशी केलेला एक प्रामाणिक संवाद यातच नवीन वर्षाचा खरा आनंद दडलेला असतो.
शेवटी नवीन वर्ष आपल्याला एवढेच सांगतो की, मी फक्त एक सुरुवात आहे. पुढची वाट तुम्हालाच चालायची आहे. प्रेम, मेहनत आणि आशेचा हात धरून जर आपण पुढे चाललो, तर हे नवीन वर्ष नक्कीच आपल्या आयुष्यात उजेड घेऊन येईल. आपण ठरवलेल्या इच्छा, आकांक्षा आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या इच्छा आणि संकल्प पूर्ण होवो, नवीन वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे जावो हीच या नवीन वर्षाच्या आगमन निमित्ताने शुभेच्छा ...... ¡

- नासा येवतीकर, स्तंभलेखक 

नवीन वर्ष 2026 ( New Year 2026 )

महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे ?

प्रत्येकजण नवीन वर्षाचे हर्षउल्लासने स्वागत करत असतो. नवीन वर्ष हे प्रत्येकासाठी एक नवी सुरुवात असते. महिलांच्या आयुष्यातही नवीन वर्ष म्हणजे नवी आशा, नवी संधी आणि आत्मविकासाचा नवा टप्पा असतो. महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत केवळ उत्सव म्हणून न करता स्वाभिमान, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांच्या निर्धाराने करणे अधिक उचित ठरेल.
नवीन वर्षाचे स्वागत करताना महिलांनी सर्वप्रथम आत्मपरीक्षण करावे, असे वाटते. सरलेल्या वर्षात आपण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी काय केले याचा विचार करणे आवश्यक आहे. स्वतःच्या गरजा, आवडी-निवडी आणि स्वप्ने यांना वेळ न देणे ही अनेक महिलांची समस्या असते. त्यामुळे या नवीन वर्षात स्वतःसाठी वेळ काढण्याचा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा संकल्प केल्यास स्वचा विकास होईल.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याला विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण घरातील महिला निरोगी आणि सक्षम असेल तर त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य देखील निरोगी राहू शकते. त्यामुळे नवीन वर्षात शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा आपण निर्धार करावा. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे आपले जीवन अधिक सशक्त बनते. स्वतः निरोगी असणे म्हणजे संपूर्ण कुटुंब निरोगी असणे होय. त्याचसोबत नव्या वर्षाचे स्वागत करताना महिलांनी शिक्षण, करिअर आणि कौशल्य विकासाकडेही लक्ष द्यावे. नवीन काही शिकणे, आपली आवड जोपासणे, आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपला वेळ मोबाईल मधील रिल किंवा इतर काही बघण्यात घालविण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचनात घालावावे. त्याचे अनुकूल परिणाम कुटुंबात पाहायला मिळतात. शाळेत जाणारी आपली मुलं आपले अनुकरण करत असतात. त्यामुळे लहान मुलावर योग्य संस्कार होतील असे आपले वर्तन, राहणे, वागणे आणि बोलणे असायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज असे सहज घडले नाहीत तर त्यांना त्यांची आई राजामाता जिजाऊ यांनी घडविले. आपल्या कुटुंबाला घडविण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असतो. आधुनिक युगात महिलांनी आर्थिक स्वावलंबन आणि आत्मसन्मान यांचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. आपणाला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वावलंबी होण्याचा मार्ग निवडावे.
महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत कौटुंबिक व सामाजिक जाणीव ठेवून करावे. इतर महिलांना प्रोत्साहन देणे, गरजू स्त्रियांना मदत करणे, मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देणे आणि स्त्रीसन्मान जपणे हे संकल्प समाजाला योग्य दिशा देतात. महिलांनी एकमेकींचा आधार बनल्यास समाज अधिक मजबूत होतो.
घर आणि कुटुंब सांभाळताना स्वतःच्या ओळखीला विसरू नये, हा संकल्प नव्या वर्षात करणे गरजेचे आहे. आपले विचार मोकळेपणाने मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणे ही महिलांची खरी ताकद आहे.
जाता जाता असे म्हणता येईल की, महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करावे. स्वतःचा विकास, कुटुंबाचे कल्याण आणि समाजाची प्रगती या तिन्ही गोष्टींचा समतोल साधल्यास नवीन वर्ष महिलांसाठी यश, समाधान आणि आनंद घेऊन येईल, यात शंकाच नाही. सर्वाना नवीन वर्ष 2026 च्या खूप खूप शुभेच्छा ...!
- नासा येवतीकर, स्तंभलेखक 

मकरसंक्रांत ( makarsankrant )

मकरसंक्रांती निमित्त लेख गोड गोड बोलण्याचा सण नविन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत.  मकरसंक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर ...