Tuesday, 11 March 2025

जीवन गाणे (Jeevan Gaane )

जीवन गाणे - आनंदी तराणे
चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ...... त्या गुणगुण्याचा आवाज कानी पडताच बाळ अलगद आपले डोळे मिटतो आणि झोपी जातो. थोडं मोठा झाल्यावर जेव्हा तो चालू आणि पळू लागतो त्यावेळी त्याला बडबड गाणे एकविले जाते आणि बोबड्या बोलीतून बोलाविले जाते. तो आपल्या बोबड्या बोलीत जेव्हा एखादे गाणे म्हणतो तेव्हा आई-वडिलांना किती आनंद होतो. अर्थात गाणे सुरात म्हटले पाहिजे असा आपला अट्टाहास कधीच नसतो आणि तो नसायला ही नको हवे. त्यानंतर मूल ज्यावेळी शाळेत प्रवेश करतो त्यावेळी त्याला अनेक कविता व गाण्याची ओळख होत जाते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात त्या मुलांचा आवडता भाग म्हणजे गाणे. जे शिक्षक या वर्गातील मुलांना जास्तीत जास्त गाणे ऐकू घालतात ते त्या मुलांचे सर्वात प्रिय बाई किंवा गुरुजी म्हणून ओळखल्या जातात. गाण्यात काय ताकद आहे ? हे त्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना चांगलेच ठाऊक असायला हवे. शाळेच्या प्राथमिक वर्गात मुले जे काही काही शिकतात ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहतात, त्यात गाण्याची खूप मोठी भूमिका असते. आज पन्नाशी ओलांडलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बालपणाविषयी विचारले तर ती व्यक्ती बालपणीची स्मरणात असलेली एखादी कविता गाऊन दाखवितो. यावरून गाण्याची ताकद आपणाला समजून येईल.
माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे गाण्याची आवड देखील बदलत जाते. पूर्वीच्या काळी गाणे ऐकण्यासाठी रेडिओ हे एकच माध्यम होते. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे गाणी ऐकण्यासाठी कान आसुसलेले असायचे. बऱ्याच आकाशवाणी केंद्रावरून त्याकाळी पत्रव्यवहारावर आधारित आपली आवड किंवा आपकी पसंद अश्या कार्यक्रमात तून गाणी ऐकविले जात असे. आपले आवडते गीत ऐकावे म्हणून बरेच रसिक मंडळी पत्राद्वारे आपल्या आवडीचे गाणे लिहून पाठवत असत यासाठी आजही सिलोन व विविधभारती या आकाशवाणी केंद्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरीच्या काळात टेपरेकॉर्डर आल्याने आपल्या मनावर गाणे ऐकण्याची सोय झाली. कॅसेटच्या माध्यमातून अनेकजण आपल्या आवडीचे गाणे ऐकू लागले. गुलशन कुमार यांची टी सिरीज नावाची कंपनी याच काळात भरभराटीस आली होती. अश्याच काळात फक्त गाण्याचा शो म्हणून ऑर्केस्ट्रा खूप चालला होता. अनेक कलाकारांना यामुळे स्टेज शो करण्याची संधी ही मिळाली होती. अनेक जणांनी यातून आपले करिअर देखील घडविले. पण गाण्याच्या या स्टेज शोला देखील गळती लागली. त्यानंतर टीव्हीचा जमाना सुरू झाल्यावर लोकांना गाणे ऐकण्यासोबत बघण्याची संधी उपलब्ध झाली. ज्यावेळी दूरदर्शन ही एकच वाहिनी देशभरात बघितले जायचे त्यावेळी येथे प्रसारित होणारी हिंदी सुमधुर गाण्याची रंगोली कोणी ही विसरू शकत नाही. ह्या कार्यक्रमाने प्रत्येकाच्या रविवारची सकाळ प्रसन्नतेने सुरुवात व्हायची. एका तासाभराच्या कार्यक्रमात एखादे गाणे दिवसभर मनात रुंजी घालायचं. याच टीव्हीमुळे टेपरेकॉर्डर मागे पडून व्हीसीआर पुढे आलं. त्यातून रसिक मंडळी आपले आवडते गाणे वाट्टेल तेव्हा टीव्हीवर पाहू लागले. मग डीव्हीडीचा जन्म झाला. मग श्रोते खूप गाणे एका डीव्हीडी मध्ये पाहू लागले. असे करता करता मोबाईलची क्रांती झाली आणि रेडिओ, टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, डीव्हीडी हे सर्व एका अडगळीत कोपऱ्यात जाऊन बसले. आज एका क्लीकवर आपणाला आवडणारी गाणी ऐकू शकतो आणि पाहू शकतो. त्याला ना वेळेचे बंधन आहे ना काळाचे. पण अर्थातच जुन्या काळात ठराविक वेळेत मिळणारी मजा या मोबाईलच्या जमान्यात नक्कीच नाही. 
तरी देखील गाणे हे मनाला आनंद व समाधान देणारी एक बाब आहे. म्हणून प्रत्येकाने आपले आवडते गाणे ऐकायला व पाहायलाच पाहिजे. अजून त्यापुढील संतोष मिळविणारी बाब म्हणजे आपला आवाज कसे ही का असेना ते गुणगुण करायला पाहिजे. जसे की एक मराठी गीत आहे, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सखे गं साजनी ये ना. तसे आपण ही गाण्याच्या धुंदीत लहरीत जगायला शिकले पाहिजे. मनावरील ताणतणाव, चिंता, काळजी आणि नैराश्य दूर करण्यासाठी आपल्या मनपसंत गायक गायिका यांच्या आवाजातील सुमधुर आणि कर्णमधुर गाणे ऐकायला पाहिजे. घरात निवांत क्षणी अगदी बारीक आवाजात किशोरदा, रफी साहेब आणि लता दीदी यांचे गाणे घरातील वातावरण अजून प्रसन्न केल्यासारखे वाटते. मित्रांनो, आपल्या जीवनात समाधान मिळविण्यासाठी गाणे ऐकणे हा एक सुंदर पर्याय तुम्हांला कसा वाटतो ? यावर एकवेळ जरूर विचार करावा. 

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

अक्षय्य तृतीया ( Akshayya Trutiya )

      अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठ...