Sunday, 13 December 2015

आपल्या जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी समस्या,अडचणींना सामोरे जावे लागलेलेच आहे,कारण जीवन एक संघर्ष आहे .
कधी स्वतःशी,इतरांशी,व्यवस्थेशी तर कधी परिस्थितीशी आपण झगडत असतो,समस्या,त्रास,दुःख यांना वगळून कोणीही 
जीवन जगलेले नाही,जगणार ही नाही ...या समस्यांना तोंड देता देता बऱ्याचदा जीव नकोसा होऊन जातो,अन् मग अशा वेळी 
अनाहूतपणे आठवण होते एखादया दैवी शक्तीची जी आपल्याला यातून बाहेर काढू शकेल,कधी आपण त्याचा धावा करतो,तर 
kadhi अचानक आपणांस त्याची अनुभूती मिळते,अन् कोणाचे आयुष्यभर न सुटलेले संकट क्षणात सुटत,तर कोणाचा 
अचानक उद्भवलेली समस्या सहज सुटते. अशा वेळी खरोखरच देव समोर प्रकट होतो का ?पाहिलंय का कोणी त्या देवाचे 
देवस्वरूप.... नक्कीच नाही,पण प्रचीती मात्र आली असेन कोणाच्या हाकेस त्याने ओ ...दिली असेल.पण प्रत्यक्षात नाही तर 
अप्रत्यक्षपणे एखादया व्यक्तीच्या रूपात ....देवमाणसाच्या रूपात.... एक देव माणूस म्हणून.
                      
                     शोधलं र मी तुला,
                     कुठं कुठं नाही,
                     अन भेटलासी तू मला,
                     साध्या माणसाच्या ठायी.
                      
        विचार मंथनचा आजचा विषय हाच आहे .... देवमाणुस. आपल्या जीवनातील असे प्रसंग कथन करा जेथे माणसातील 
देव तुमच्या मदतीला धावून आला ...नास्तिकाला ही आस्तिक बनवितात असे प्रसंग,माणसातले देवत्व सिध्द करणारे प्रसंग.
चला आज विचार मंथन करूया,सर्वांनी आपले विचार उत्स्फूर्तपणे  व्यक्त करा....

सुप्रभात 🙏.

💥 साहित्य मंथन ग्रुप 💥
🔻विचारमंथन भाग ....
🔻विषय :- माणसातला देव 
🔻संयोजक व परीक्षक :- श्री संदीप धोंडगे सर 
🔻ग्राफिक्स :- उत्कर्ष देवणीकर सर
🔻स्पर्धेचा दिनांक : 13 डिसेंबर 2015
🔻वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 7पर्यंत .
=============================================

=============================================
🙏🏼"माणसातला देव"🙏🏼
"दुसरयासाठी जगलास तर जगलास
स्वतःसाठी जगलास तर मेलास"..... असे अनंत काणेकर म्हणून गेलेत.मी ज्यांच्या विषयी लिहीतेय त्या खरोखरीच देवमाणूस शोभतात.
       "स्वामी तिन्ही जगाचा
         आई विणा भिकारी"....कवी यशवंत म्हणतात ते खोटे नव्हे.परंतू स्वतःचं लेकरू दुसरयाला देवून स्वतः अनाथांची माय बननं; हे केवळ एक दैवी गूणसंपन्न व्यक्तीच करू शकते.
         होय.....अनाथांची माय 'सिंधूताई सपकाळ'ह्या  आहेत माझ्या दृष्टीने माणसातील देव.
          अख्ख जीवन ज्यांच खस्ता खाण्यात चाललयं.लहानपणी गरीबीअभावी त्या शाळेत धड शिकू शकल्या नाहीत.शेणात ज्यांनी 'श्री' गिरवला..एकेक अन्नाच्या दाण्यासाठी ज्या तरसत होत्या त्यांच्यापुढे आज सर्व देव हात जोडून उभे आहेत.
        लग्न झाल्यावर गरोदरपणी नवरयाने हाकलून दिलं.गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला.स्मशानभुमीत रात्री काढल्या.प्रसंगी रेल्वेत व मंदीरासमोर भीक मागीतली.पण जगण्यापुढे हार मानली नाही.
        पोटची मुलगी 'ममता' श्रिमंत दगडूशेट हलवाई यांच्या ट्रस्टला देवून टाकली अन स्वतः अनाथांची माय बनल्या.कित्येक ठिकाणी माई गोशाळा चालवीतात.गाईची कृतज्ञता जपताय.पुण्यात मोठे ममता सदन बांधले तिथे अनाथांचे पालन पोषण होते.त्या खर्चासाठी माई अहोरात्र फिरताय.भाषणं देतात.झोळी पसरून लेकरांसाठी भीक मागतात.त्यांची किर्ती आज जगभर पसरलीय.माईंना भरपूर पुरस्कार मिळतात पण त्या खेदाने म्हणतात की पुरस्काराने पोट भरत नाही.
        आज माई खूप थकल्यात.तरी न थकता अनाथांची माय बनून फिरताय.कित्येक मुला मुलींची लग्ने लावली.आज त्यांना शेकडो सुना जावई आहेत.आज कित्येक लोक येथील मुलींना सून बनवित आहेत.आज अनेक कार्यकर्ते त्यांना जोडली गेलीय.अगदी अमिताभ बच्चन न नाना पाटेकरसारखे दिग्गज  देखील इथे सेवा दान करतात.कित्येक लोक आपला वाढदिवस इथे येवुन साजरा करतात.
        "बोले तैसा चाले
          त्याची वंदावी पाऊलॆ"....या ओळींच मुर्तीमंत उदाहरण म्हणजेच माई.त्यांच्या भाषणात त्या मुलींचे महत्व सांगतात.जिवनाशी कसे दोन हात करावे हे देखील शिकवितात. आत्महत्या न करता कसे धिराने तोंड द्यावे हे शिकवितात.त्या शेरोशायरी करतात.एकदा वसमतला त्यांचे व्याख्यान संपल्यावर मी त्यांचा ऑटोग्राफ मागीतला तर म्हणाल्या मी अडाणी आहे गं बाई.पण दिला ऑटोग्राफ.
        त्यांच्या जिवनावर अनंत महादेवन यांनी' मी सिंधूताई सपकाळ'हा चित्रपट काढला तसेच डी.बी.महाजन यांनी 'आमची माई' हे माईंचे चरित्र लिहीले.
       अशी ही अनाथांची माय मानसातील देवच ना ?.तीला निरोगी व दिर्घायुष्य लाभो अशीच प्रार्थना करूया🙏🏼.जाता दाता माईंसाठी....
"झडो दुदूंभी तुझ्या यशाच्या
उंच उंच अंबरात......
तुझी पोवाडे गातील पुढती
शाहीर अन् भाट"🙏🏼🙏🏼🙏🏼
...............जयश्री पाटील.
            वसमतनगर.
=============================================
🔴माणसातला देव 🔴
माझ्या पत्निच्या आजारपणातली गोष्ट ! माझ्या पत्निला हेपाटायटीस बी ही काविळ झाली होती .तिला अंबेजोगाईच्या मेडीकल काॅलेज मधे अॅडमिट केले होते .निदान होण्यास उशिर झाल्यामुळे पत्निची पृकृती गंभिर झाली होती .त्या भागात मी नविन होतो .कोणी नातेवाईक अथवा कोणी ओळखीचे नव्हते .पैसे देउन मी 3 रक्ताच्या बाटल्या घेतल्या पण अजून ही रक्ताची गरज होतीच ,डाॅक्टरांनी निर्वानीचा इशारा दिला ,आज जर रक्त मिळाले नाही तर तुमची पत्नि काॅमा मधे जाउ शकते ! माझ्या जवळचे सर्व पैसे संपले होते .अशावेळेस श्री .मधुकर देशपांडे सर माझ्या मदतीला धाउन आले त्यांनी विना मोबदला 3 रक्ताच्या बाटल्या दिल्या व म्हणाले मी माझ्या बहीणीसाठी दिल्यात .
या पुर्वी त्यांची व माझी कुठलीच ओळख नव्हती ! त्यांची पत्नि ही तिथे अॅडमिट होती येवढीच ओळख !
त्यांनी दिलेल्या रक्तामुळे माझ्या पत्निचे प्राण वाचले ! 
तेंव्हा पासून माझी पत्नि प्रत्येक राखी पौर्णिमेस देशपांडे सरांना न चुकता राखी पाठवते !
हा आहे मला भेटलेला "माणसातला देव " !
@ अरविंद कुलकर्णी .अहमदनगर 
=============================================
१३/१२/२०१५
माणसातला देव: 
विचारमंथन भाग ३४
© जागृती निखारे
         माणसाला देवाने अत्यंत विचारांती तयार केले आहे.तुम्ही पूर्णतः दोषविरहीत व्यक्ति अद्याप पाहिलीही नसेल.गुणदोष प्रत्येक माणसात असतात.तरीही आपल्याला  काही कठीण प्रसंगी अकस्मात कांही माणसे अशी भेटून जातात की, मनातून त्यांची आठवण सहजासहजी पुसली जात नाही, नाते- गोते काहीही नसले ,तरीही ती माणसे ह्दयाच्या गाभ्यात जपलेली  असतात.जीवन वाटेवर मार्गक्रमण करतांना खुप बरीवाईट , विकृत मनाची लोकं भेटतात.त्यातील वाईटही लक्षात राहतात.काही अनुभव आपल्यासमवेत पुनःश्चः  अनुभवते.
         आम्ही दोघेच घरात, त्यावेळी सासूसासरे भोपाळच्या दिराकडे गेले होते.आणि माझी तब्येत बिघडली.३ महिने झालेले जवळ कुणी नाही.पण डॉ.सक्सेना, आणि डॉ बहादुरच्या आई होत्या त्यांना कॉल केला.त्या धावतच आल्या.माझी रवानगी हॉस्पिटलमध्ये झाली.माझे आई- बाबा देवाघरीच स्वर्गात,  ते येऊ शकत नव्हते. हे डॉ.असूनही चिंतेत!  दोनही मम्मींनी मी अतिशय सिरीयस असतांना  २/२ तास वाटून घेतले.आणि बेटा२ करत माझी सख्ख्या आईपेक्षाही खुप काळजी घेतली.त्यात माझ्या डॉक्टरमैत्रिणी, डॉक्टरांच्या पत्नी तसेच माझी बाई या सगळ्यांचा फार मोठा सहभाग आहे.मला देवाच्या दारातून परत आणायला, मानसिक आधार द्यायला देवासारख्या धावून आल्या होत्या.मी कातड्यांचे जोडे करून घातले तरी कमीच पडतील.
       मला स्लीपडिस्क झाल्यावर, काविळ झाल्यावर ह्या मैत्रिणीसोबत सहकारी मैत्रिणीही खुप आस्था दाखवून गेल्या. 
  हीच ती देव माणसे! 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
=============================================

योग्य विषयाची निवड,पोस्ट वरच्या प्रतिकिया व योग्य परिक्षण यासाठी प्रथम मी सर्वांचेच आभार मानतो.आजचा  विषय खरच खुप मस्त आहे
            "माणसातला देव"
थोडक्यातच काय,'देवमाणुस"च...
संकटकाळात आपण देवाकडं मदतीची मागणी करतच असतो,व हीच मागणी एखादा माणुस येऊन पुर्ण करतो...त्यावेळी नकळत वाटत"अगदी देवासारखं धावुन आला हा माणुस" जे देवानं कराव,ते या माणसानं केलेलं असतं...खरतर देवमाणुस ही कल्पनाच मला काल्पनीक वाटते.मदत करणारा मानव पण credit जात 'देव'माणुस या नावे..! असो,याती एक श्रद्धा असेल कदाचीत...असे अनेक प्रसंग घडतात ज्यात असे अनेक देवमाणुस भेटतात...
पण...पण...माझ्या कायम लक्षात रहाणारा व सदा माझ्याबरोर असणारा देवमाणुस म्हणजे"माझे बाबा"...पप्पा... :-) हो..माझे पप्पा.आईने जन्म दिला,पण ज्या देवमाणसाने जगणं शिकवल,ते माझे पप्पा.आई फक्त चुका माफ करायची पण पप्पा? पप्पा चुका समजुन घेऊन ती सुधारुन घेतात,त्यातुन बरच काही शिकवतात.
आईला घराचा वासा म्हणतो,रोज आपल्यासाठी जगते म्हणुन...पण याच घराच छत,चौकट,व आधार असतो बाप...चुका माफ करणं,सुधारायला लावणं,जगाची ओळख करुन देण, व बरचं काही शिकवणं...हे सर्व "माणसातली देव"च करु शकतो ना??म्हणुच माझ्यासाठी माझे बाबा पहिले देवमाणुस आहेत.मला एखादे यश मिळाले कि जग जिंकल्याचा आनंद असतो त्यांच्या डोळ्यांत...तसेच अपयश मिळाले तर 'प्रयत्न करुन जग जिंकशील' याची खात्री असते त्यांना...राग,कठेरता,शासन,बंधन हे आहेच सर्व त्यांच्यात (आमच्या भल्यासाठीच),
पण कष्ट,आपुलकी,प्रेम,प्रामाणिकपणा यासारख्या गोष्टीही ठासुन भरल्या आहेत...
           तुम्हालापण माणसातला देव तुमचे वडीलच दिसतील,एकदा डोळे मिटुन त्यांनी तुमच्यासाठी  केलेलं  कष्ट,मेहनत,धडपड आठवा तर एकदा!
              खुप सारं प्रेम कसं करायच हे बर्याचजणांकडुन शिकता येतं पण ज्या त्या वेळी थोडकसंच पण अत्यंत गरजेच प्रेम कस करावं हे वडीलांकडुनच शिकता येतं...माझं शिक्षण,माझ्या गरजा,ईतकच काय...माझे ऐषोआराम ही तेच पुर्ण करतात.जर प्रथम स्थानाच्या आधी कोणतं श्रेष्ठ स्थान असेल तर माझ्या आयुष्यातली ती जागा माझ्या पप्पांनाच देऊ ईच्छितो....कोणतंही काम करताना पप्पांच्या पाया जरुर पडतो मी,पण त्यांनी आशिर्वाद द्यावा अस नाही वाटत...कारण ते आशिर्वाद देऊन माझ्या पाठीशी ऊभारत नाहित,दरवेळी प्रत्येक कामात ते माझ्या बरोबरच असतात....
म्हणुनच,,म्हणुनच माझा पहिला गुरु,आदर्श,हितचिंतक, व देव...माझे बाबाच आहेत... :-)खरच खुप सार्थकी झाल्यासारख वाटत,जेव्हा समजत की 'दगडी मुर्तीत असणार्या देवाला रोज नमस्कार येतो करता...पण मी रोज खरया देवाचे आशिर्वाद घेऊन बाहेर पडतो..आणि हे आशिर्वाद खरे ठरतातही...
पप्पांसमोर कधी बोलु नाहि शकलो हे,पण खरचं,,,""thank you पप्पा...मला ह्या सुंदर जीवनाचा हिस्सा बनवल्याबद्दल...""

        बस्स ईतकचं लिहु शकलो,कारण काही भावना लिहुन बंदिस्त करता येत नाहित...त्या मनातच घर करुन असतात..ईतका चांगला विषय निवडुन काही भावना लिहिता आल्या..
मनपुर्वक धन्यवाद...
_/"\_
    निलेश आळंदे, गडहिंग्लज
                           (8857912164)
=============================================

विचारमंथन- भाग 34
विषय:- माणसातला देव.

कोण म्हणतो फेसबुक टाईमपास करण्याचे साधन आहे? 
या फेसबुकने माझ्या जीवनाला कलाटणी दिलीय. माझे ध्येय निश्चित केलेय. ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग याच फेसबुक वर मिळाला.  याच फेसबुक वर मला सन्माननीय श्री. रमेश सरकाटे सरजी (मुंबई)  हे गुरु म्हणून लाभले. त्यांच्याच कृपेने व आशिर्वादाने मी जगापुढे गजलकार म्हणून आलीय. त्यांचे प्रोत्साहन व प्रेरणेमुळेच मी हा मार्ग चालू शकले. 
मी आधी हिंदी भाषेत कविता लिहायची. पण त्यात सुसूत्रता नव्हती. कसे ही लिहायची अन् फेसबुक वर पोस्ट करायची. 
माझ्या चौथ्या कवितेला पहिल्यांदा त्यांची कमेंट आली. ती कमेंट मला खूप प्रोत्साहन देणारी ठरली. मी रोज कविता पोस्ट करायची आणि ते सर रोज कमेंट द्यायचे. माझ्या कवितेतील त्रुटि सांगायचे.
बघता बघता ते माझे कधी गुरु बनले कळलेच नाही. सरकाटे सरांनी माझ्यातील गुण/ हुनर पाहून मी गजल लिहू शकते हे त्यांनी मला वारंवार सांगणे सुरु केले. पण मला गजल म्हणजे काय हे सुद्धा ठावूक नव्हते. पण तरी ही त्यांनी मला मार्गदर्शन करणे सुरु ठेवले.

सरांच्या मार्गदर्शनाखाली माझे गजल शिकणे सुरु झाले. काहीच कळत नव्हते, पण लिहायची. तपासणीसाठी त्यांच्या कडे मॅसेज बाॅक्स मधे पाठवायची. असे ऑनलाइन शिकणे सुरु होते. गजल जमतच नव्हती.  वाटत होते नाही लिहू शकणार. पण सर मला प्रोत्साहन देत राहिले. सतत मार्गदर्शन करीत राहिले. 
तब्बल तीन महिन्यांनी माझी पहिली गजल फेसबुक वर आली. त्या गजलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. आणि मला नवा मार्ग आणि ध्येय मिळाले. 
पण या मागे सरकाटे सरांचे  प्रोत्साहन होते. त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी. 
या थोर माणसाचे उपकार विसरणे शक्यच नाही. ज्यांनी गजलकार म्हणून मला जगासमोर आणले ते माझ्यासाठी देवमाणूसच आहे. 

माझे गुरु सन्माननीय श्री. रमेश सरकाटे सरजी यांना माझे शतशः प्रणाम. 

निर्मला सोनी.
=============================================







No comments:

Post a Comment

विद्यार्थी प्रिय शिक्षक : कृष्णा येरावार

विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक कृष्णा येरावार धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील पी एम श्री जि. प. प्रा. शाळा बे...