नागोराव सा. येवतीकर

Friday, 6 February 2026

दिनविशेष माहिती - 07 फेब्रुवारी ( 07 February )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण माता रमाई आंबेडकर यांच्या विषयी माहिती पाहू या.

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
   माता रमाई आंबेडकर येथे clik करावे.

रमाबाई भीमराव आंबेडकर अर्थात रमाई आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्‍नी होत्या. रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1897 रोजी एका गरीब कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) तर आईचे नाव रुक्मिणी होते. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाईच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडिलांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांनी त्यांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी यांना रमाई पसंत पडली. रमाई व डॉ. बाबासाहेबांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १५ वर्षे तर रमाईचे वय अवघे ९ वर्षे होते. 
माता रमाई यांनी जीवनात फार दुःख सहन करावे लागले. स्वाभिमानी पतीची ते स्वाभिमानी पत्‍नी होत्या. जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने प्रत्यक्ष डोळ्यांनी अनेक मरणे पाहिली. 
परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी त्यांनी शेण गोवऱ्या वेचल्या,  सरपणासाठी वणवण फिरल्या. बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोकं नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री लोकं झोपी गेल्यानंतर गोवऱ्या थापायला जात असत.
रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना रामू या नावाने हाक मारत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या.
आजारपणामुळे दिनांक 27 मे 1935 रोजी मुंबईत रमाईची प्राणज्योत मावळली म्हणजे निधन झाले.
रमाई आंबेडकर यांचे जीवन त्याग, सहनशीलता आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. आज या महान माता रमाई यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - माता रमाई यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, माता रमाई यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे झाला.

पहिला प्रश्न - माता रमाई यांच्या पतीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माता रमाई यांचे पती होते. 

तिसरा प्रश्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचे लग्न कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे, मुंबईच्या भायखळा भाजी मार्केटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईयांचे लग्न झाले.


चौथा प्रश्न - डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना कोणत्या नावाने हाक मारत असत ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना रामू या नावाने हाक मारत असत ?

शेवटचा पाचवा प्रश्न - माता रमाईचे निधन केव्हा झाले ? 
बरोबर उत्तर आहे - 27 मे 1935 रोजी मुंबई येथे माता रमाईचे निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment