नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 31 December 2025

नवीन वर्षाभिनंदन ( Happy New Year 2026 )

           आलं रे नवीन वर्ष

आलं रे नवीन वर्ष
सर्वाना झालंय हर्ष 
हसत गाऊ गोड गाणी,
त्याने हृदयास होई स्पर्श ।

हाती घेऊ पुस्तक नि पेन
छोटी स्वप्नं नवी पाहू या
चांगल्या सवयी सोबत
रोज गोड गोष्टी करूया ।

आई-बाबांचा ठेवून मान
शिक्षकांचे रोज ऐकूया
सर्व एकत्र राहून प्रेमाने 
चला नवीन वर्ष जगूया ।

नासा येवतीकर, धर्माबाद 
~~~~~~~~~~~~~~~~
       नवा वर्ष : नवा हर्ष 
नवे नवे सूर घेऊन येताना 
आशेचा एक किरण हसतो
निरोप देता जुन्या गोष्टीला
नव्या स्वप्नांचा रस्ता दिसतो ।

मागे ठेवून कालच्या चुका
आज नवी उमेद घेऊ या
जिद्द, विश्वास नि कष्टाने
उज्ज्वल भविष्य घडवू या ।

गार वारा नव्या पहाटेचा
मनामनात आनंद पेरतो
पालवी नव्या विचारांची
पुन्हा जीवन फुलवतो ।

वैर संपवूनी, प्रेम वाढवू
मनातील द्वेष दूर करू या,
आपण सारे एक भावनेने
वर्ष नवीन साजरा करू या ।

प्रत्येक दिवशी धडा नवा
प्रत्येक क्षणी अर्थ नवा
प्रत्येकाचा संकल्प नवा
प्रत्येकासाठी हा वर्ष नवा ।

नासा येवतीकर, धर्माबाद 
~~~~~~~~~~~~~~~~

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .......!

नासा येवतीकर, स्तंभलेखक, 9423625769

Tuesday, 30 December 2025

सूत्रसंचालन

      🌸 सावित्रीबाई फुले जयंती  🌸

            🌸 सूत्रसंचालन 🌸
आगतम.... स्वागतम..... सुस्वागतम.......
सर्वाना माझा नमस्कार. 
आज 03 जानेवारी अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने उपस्थित सर्वांचे मी ________ सहर्ष स्वागत करते.

ज्ञानाचा दीप उजळला, अज्ञानाचा अंधार गेला,
सावित्रीच्या शब्दांनी, इतिहास नवा घडला,
स्त्री शिक्षणाची वाट दाखवली जगाला,
नमन त्या माऊलीला, क्रांतिज्योती सावित्रीबाईला ।

कोणताही कार्यक्रम म्हटलं की त्याला अध्यक्षाची गरज भासते. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक ________ यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकार करण्याची विनंती करते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेतील शिक्षकांना विनंती आहे की, आपण प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारावे. 

सन्माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील मान्यवर, शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो…
आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत त्या ज्ञानज्योती, स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक, समाजक्रांतीच्या अग्रदूत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त. 
आता आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करूया.
त्यासाठी मान्यवर पाहुण्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे. 🙏

हातात पुस्तक, मनात ध्यास,
समाजबदलाचा होता विश्वास,
दिवा ज्ञानाचा पेटवून गेल्या,
सावित्रीबाई आम्हाला वाट दाखवून गेल्या ।

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन नंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत गीताने करूया. त्यासाठी ________ यांना विनंती आहे की त्यांनी स्वागत गीत सादर करावे. 👏

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करणे आमचे कर्तव्य आहे. म्हणून 
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ________ यांचे स्वागत ________ हे करतील. 

स्वागताचा कार्यक्रमानंतर मी उपस्थित सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करते. 

शब्द नव्हते फक्त शिकवणीचे,
ते होते परिवर्तनाचे शस्त्र,
स्त्री शिक्षणासाठी उभी राहिली,
सावित्रीबाई – समाजक्रांतीची दृष्टी।

आता आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी ________ यांना आमंत्रित करते.

सावित्रीबाई फुले यांचा परिचय :
सावित्रीबाई फुले म्हणजे
✔ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका
✔ स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणारी क्रांतिकारक
✔ अन्याय, अज्ञान आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारी थोर समाजसुधारक
त्यांचे विचार आजही आपल्याला दिशा देतात.

लहान हातात मोठी मशाल, ज्ञानाची ओंजळ भरी,
सावित्रीच्या पावलांवरून, चालते आजची पिढी खरी,
स्वप्न पाहा, शिका, उभे रहा निर्भयपणे,
हीच खरी मानवंदना, सावित्रीच्या कार्यास सन्मानाने।

यानंतर आपल्या समोर आमच्या शाळेतील काही चिमुकली मुले भाषण करण्यासाठी आतुर आहेत. 
सर्वप्रथम भाषण करण्यासाठी येत आहे..... ________
खूप छान भाषण केले आहे. 

लहान पावलांत मोठे स्वप्न,
ज्ञानाने बदलले जीवन,
सावित्रीच्या विचारांची पालखी,
आजच्या पिढीकडे चालली निश्चित ।

यानंतर त्यांच्या महान कार्याला शब्दरूप देण्यासाठी ________  यांना भाषण सादर करण्यासाठी आमंत्रित करते. 👏

शिक्षणाचा अर्थ कळवणारी,
सावित्री समाज घडवणारी.

• पुस्तक हातात, धैर्य मनात,
सावित्रीबाई प्रेरणा प्रत्येक क्षणात.

• स्त्री शिक्षणाचा पाया रचला,
इतिहासाने तिला वंदन केलं.

सावित्री म्हणजे विचार, विचार म्हणजे क्रांती.

• पुस्तकातली शक्ती, सावित्रीने ओळखली.

• स्त्री शिक्षणाची सुरुवात, सावित्रीच्या नावावर.

• इतिहास घडवणारी, एक शिक्षिका साधी पण थोर.

अंधेरों से जो लड़ी, वो उजाला बन गई,
शिक्षा की राह में, मिसाल बन गई,
नारी को जिसने पहचान दी ज्ञान की,
वो सावित्री इतिहास की मशाल बन गई।

छोटे कंधों पर बड़े सपनों का भार है,
सावित्री के विचारों से रोशन संसार है,
(प्रत्येक कार्यक्रमानंतर थोडेसे अभिनंदन शब्द)

विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहुणे यांचे भाषण - 
ज्या विचारांनी घडवला इतिहास,
त्या विचारांची आजही आहे आस,
मार्गदर्शनाच्या दीपासाठी,
मान्यवरांना करते नम्र आवाहन खास।

यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य आकर्षण असलेले मा. ________  प्रमुख पाहुण्यांना नम्र विनंती करते मार्गदर्शन करावे. 👏

सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार. आपण आमच्या मुलांना खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

सत्कार / गौरव :
नवीन वर्षानिमित्ताने आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुंदर भेट कार्ड तयार केल्याबद्दल शाळेकडून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याचा कार्यक्रम होईल.
सत्कारासाठी ________ यांना विनंती आहे. त्यांनी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारावा.

शिका, लढा आणि पुढे चला,
अज्ञानाच्या बेड्या तोडत रहा,
सावित्रीचा वारसा जपू या,
खरी मानवंदना तिलाच देऊ या।

यानंतर कार्यक्रमाला दिशा देणारे अध्यक्षीय भाषणासाठी
आदरणीय ________ यांना आमंत्रित करते. त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. 

अंधेरों से जो लड़ी, वो उजाला बन गई,
शिक्षा की राह में, मिसाल बन गई,
नारी को जिसने पहचान दी ज्ञान की,
वो सावित्री इतिहास की मशाल बन गई।

आता शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनासाठी ________ यांना आमंत्रित करते.
समारोप :
नुसते स्मरण नको आज, हवे आचरण खरे,
सावित्रीचे विचार जपणे, हेच वंदन सारे,
शिक्षण, समता, माणुसकी, या वाटेवर चालू या,
क्रांतिज्योती सावित्रीबाई, तुमच्याच मार्गी राहू या।

सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आपण सर्वांनी स्वीकारूया,
स्त्री-पुरुष समानतेचा विचार आचरणात आणूया
आणि त्यांच्या कार्याला खरी मानवंदना देऊया.

याच शब्दांत आजचा कार्यक्रम इथेच संपवते.
आपल्या सर्वांच्या उपस्थितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🌸

जय हिंद....! जय भारत.....!

Monday, 29 December 2025

नवीन वर्ष समृद्धीचे जावो ( Happy New Year 2026 )

         नवीन वर्ष समृद्धीचे जावो 

जुना वर्ष संपून नवीन वर्ष येतो तेव्हा वेळेच्या दारावर अलगद टिकटिक आवाज होते. “मी आलो आहे” असे जणू ते हळूच कानात सांगते. जुन्या वर्षाच्या पायऱ्या ओलांडून ते आपल्या जीवनात प्रवेश करते आणि मनात नकळत नवे विचार, नवी उमेद जागवते. कॅलेंडरवरची तारीख बदलते, पण त्या बदलासोबत मनाच्या कोपऱ्यात काहीतरी नव्याने उमलू लागते.
जुन्या वर्षाच्या आठवणीत मन रमून जाते. सुख-दुःखाच्या कडू-गोड प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर तरळू लागतात. त्या सर्व आठवणी म्हणजे रंगीबेरंगी चित्रांसारख्या असतात. काही आनंदाच्या, काही दुःखाच्या, तर काही शिकवण देणाऱ्या. त्या आठवणी मनाच्या कप्प्यात नीट जपून ठेवून पुढे जाण्याचे धैर्य नवीन वर्ष देते. ते आपल्याला सांगते की भूतकाळ विसरायचा नाही, पण त्यात अडकून देखील राहायचे नाही.
तशी तर रोजच्या सारखी पहाट होते पण आज नवीन वर्षाची पहाट ही खास असते. वातावरणात एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. हिवाळाच्या थंड वाऱ्यासोबत आशेची चाहूल लागते. मनात नकळत विचार येतात की, या वर्षी काहीतरी वेगळं करूया, काहीतरी चांगलं घडवूया. मग संकल्प जन्माला येतात, काही ठाम असतात तर काही हळवे असतात. ते संकल्प कधी पूर्ण होतात, कधी वाटेत हरवतात, पण प्रयत्न करण्याची प्रेरणा मात्र कायम देऊन जातात.
नवीन वर्ष आपल्याला एक नवी दिशा देतो, नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो. रोजची तीच घाई, मनावर असलेला  ताणतणाव, अपूर्ण राहिलेल्या इच्छा यांमधून थोडावेळ थांबून स्वतःकडे पाहण्याची एक संधी देते. आपण खरंच आनंदी आहोत का ? समाधानी आहोत काय ? आपल्याला नेमकं काय हवं आहे ? या सर्व बाबीचा विचार करण्यासाठी हा क्षण जणू खासच असतो.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळालेले शुभेच्छांचे संदेश आणि हास्याने भरलेले चेहरे पाहण्यात नवीन वर्ष साजरे होते. एकीकडे खूप घोंगाट, युवा वर्गात नवीन वर्ष साजरा करण्याची क्रेज वेगळीच असते. पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते मनातले शांत समाधान. कदाचित हे कळायला खूप वेळ लागतो. त्यापेक्षा गरजू व्यक्तीला दिलेली मदत, कुणाच्या रडवेल्या चेहऱ्यावर फुलवलेले हसू, किंवा स्वतःशी केलेला एक प्रामाणिक संवाद यातच नवीन वर्षाचा खरा आनंद दडलेला असतो.
शेवटी नवीन वर्ष आपल्याला एवढेच सांगतो की, मी फक्त एक सुरुवात आहे. पुढची वाट तुम्हालाच चालायची आहे. प्रेम, मेहनत आणि आशेचा हात धरून जर आपण पुढे चाललो, तर हे नवीन वर्ष नक्कीच आपल्या आयुष्यात उजेड घेऊन येईल. आपण ठरवलेल्या इच्छा, आकांक्षा आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या इच्छा आणि संकल्प पूर्ण होवो, नवीन वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे जावो हीच या नवीन वर्षाच्या आगमन निमित्ताने शुभेच्छा ...... ¡

- नासा येवतीकर, स्तंभलेखक 

नवीन वर्ष 2026 ( New Year 2026 )

महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे ?

प्रत्येकजण नवीन वर्षाचे हर्षउल्लासने स्वागत करत असतो. नवीन वर्ष हे प्रत्येकासाठी एक नवी सुरुवात असते. महिलांच्या आयुष्यातही नवीन वर्ष म्हणजे नवी आशा, नवी संधी आणि आत्मविकासाचा नवा टप्पा असतो. महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत केवळ उत्सव म्हणून न करता स्वाभिमान, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांच्या निर्धाराने करणे अधिक उचित ठरेल.
नवीन वर्षाचे स्वागत करताना महिलांनी सर्वप्रथम आत्मपरीक्षण करावे, असे वाटते. सरलेल्या वर्षात आपण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी काय केले याचा विचार करणे आवश्यक आहे. स्वतःच्या गरजा, आवडी-निवडी आणि स्वप्ने यांना वेळ न देणे ही अनेक महिलांची समस्या असते. त्यामुळे या नवीन वर्षात स्वतःसाठी वेळ काढण्याचा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा संकल्प केल्यास स्वचा विकास होईल.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याला विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण घरातील महिला निरोगी आणि सक्षम असेल तर त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य देखील निरोगी राहू शकते. त्यामुळे नवीन वर्षात शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा आपण निर्धार करावा. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे आपले जीवन अधिक सशक्त बनते. स्वतः निरोगी असणे म्हणजे संपूर्ण कुटुंब निरोगी असणे होय. त्याचसोबत नव्या वर्षाचे स्वागत करताना महिलांनी शिक्षण, करिअर आणि कौशल्य विकासाकडेही लक्ष द्यावे. नवीन काही शिकणे, आपली आवड जोपासणे, आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपला वेळ मोबाईल मधील रिल किंवा इतर काही बघण्यात घालविण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचनात घालावावे. त्याचे अनुकूल परिणाम कुटुंबात पाहायला मिळतात. शाळेत जाणारी आपली मुलं आपले अनुकरण करत असतात. त्यामुळे लहान मुलावर योग्य संस्कार होतील असे आपले वर्तन, राहणे, वागणे आणि बोलणे असायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज असे सहज घडले नाहीत तर त्यांना त्यांची आई राजामाता जिजाऊ यांनी घडविले. आपल्या कुटुंबाला घडविण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असतो. आधुनिक युगात महिलांनी आर्थिक स्वावलंबन आणि आत्मसन्मान यांचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. आपणाला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वावलंबी होण्याचा मार्ग निवडावे.
महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत कौटुंबिक व सामाजिक जाणीव ठेवून करावे. इतर महिलांना प्रोत्साहन देणे, गरजू स्त्रियांना मदत करणे, मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देणे आणि स्त्रीसन्मान जपणे हे संकल्प समाजाला योग्य दिशा देतात. महिलांनी एकमेकींचा आधार बनल्यास समाज अधिक मजबूत होतो.
घर आणि कुटुंब सांभाळताना स्वतःच्या ओळखीला विसरू नये, हा संकल्प नव्या वर्षात करणे गरजेचे आहे. आपले विचार मोकळेपणाने मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणे ही महिलांची खरी ताकद आहे.
जाता जाता असे म्हणता येईल की, महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करावे. स्वतःचा विकास, कुटुंबाचे कल्याण आणि समाजाची प्रगती या तिन्ही गोष्टींचा समतोल साधल्यास नवीन वर्ष महिलांसाठी यश, समाधान आणि आनंद घेऊन येईल, यात शंकाच नाही. सर्वाना नवीन वर्ष 2026 च्या खूप खूप शुभेच्छा ...!
- नासा येवतीकर, स्तंभलेखक 

Friday, 26 December 2025

सवय (Habit)

  सवय जीवन घडवणारा अदृश्य घटक

मानवाचे आयुष्य आकार घेते ते त्याच्या विचारांमधून आणि कृतीमधून; आणि या दोन्हींच्या मागे असतो तो एक अदृश्य, पण अत्यंत प्रभावी घटक म्हणजे सवय. सवय हा मनुष्याच्या दिनचर्येचा पाया आहे. एखादी कृती वारंवार केल्याने ती कृती नकळत आपल्या स्वभावाचा भाग बनते आणि त्यातून निर्माण होणारा परिणाम आपले संपूर्ण जीवन बदलू शकतो.
सवय म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करून तिचे स्वयंचलित होणे. सुरुवातीला प्रयत्नपूर्वक, जाणूनबुजून केलेली क्रिया कालांतराने सहज, आपोआप होऊ लागली की ती चांगली किंवा वाईट सवय म्हणून आपले ठरते. सवयी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. बोलण्याची शैली, उठण्याची वेळ, काम करण्याची पद्धत, इतरांसोबत वागणूक, रोजचा आहार, अभ्यासाची इच्छा या सर्व व्यवहारामागे आपल्यातील सवयींचेच प्रतिबिंब दिसते.
चांगल्या सवयींचे फायदे अमूल्य आहेत. नियमित व्यायाम करणे, वेळेचे भान ठेवणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे, अभ्यासाची आवड निर्माण करणे, नेहमी सत्य बोलणे, धैर्याने काम करणे अशा सवयी मनुष्याला यशाच्या दिशेने घेऊन जातात. चांगल्या सवयी केवळ व्यक्ती सुधारत नाहीत तर त्याची नाती, आरोग्य, विचारसरणी आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक बनवतात. छोटीशी चांगली सवयही मोठा बदल घडवू शकते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती दररोज फक्त दहा मिनिटं वाचनाची सवय लावली, तर काही महिन्यांत तिचे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व दोन्ही समृद्ध होतात. सवयी दिसायला लहान जरी वाटत असल्या तरी त्याचे परिणाम मात्र खूप मोठे असतात.  
जशा चांगल्या सवयी जीवन घडवतात, तशाच वाईट सवयी जीवन बिघडवू शकतात. जंक फूड खाणे, वेळेचा अपव्यय करणे, टाळाटाळ करणे, अनावश्यक रागावणे, मोबाईलवर जास्त वेळ घालवणे अशा वाईट सवयी हळूहळू मनुष्याच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. या सवयी सुरुवातीला निरुपद्रवी वाटतात, पण दीर्घकाळात त्यांचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात.
सवय बदलणे अवघड वाटते, परंतु अशक्य नसते. त्यासाठी दृढनिश्चय, सातत्य आणि छोट्या गोष्टींपासून सुरुवात करण्याची गरज असते. चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी ठराविक वेळ, योग्य वातावरण आणि नियमित सराव आवश्यक आहे. सवयी बदलण्याची प्रक्रिया ही हळूहळू होत असली तरी तिचा परिणाम दीर्घकालीन आणि सकारात्मक असतो.
शेवटी, सवय ही आपल्या जीवनाची दिशा बदलणारी शक्ती आहे. आपल्या प्रत्येक दिवसातल्या लहान सवयीच आपल्या उद्याचे भविष्य ठरवतात. म्हणूनच चांगल्या सवयी जोपासणे आणि वाईट सवयी दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य सवयी अंगीकारल्या तर यश, आनंद आणि समाधान हे नक्कीच आपल्या वाट्याला येते.

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Sunday, 21 December 2025

गणित आणि जीवन ( Maths & Life )

      गणित आणि आपले जीवन 

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक विषय अभ्यासाला असतात. जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणित. गणित हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो केवळ गुण मिळवण्यासाठीचा विषय नसून विचारशक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारे शास्त्र आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात गणिताचे स्थान अनन्यसाधारण आहे.
गणितामुळे विद्यार्थ्यांना शिस्त, अचूकता आणि संयम शिकायला मिळतो. उदाहरणार्थ, एखादी गणिती समस्या सोडवताना प्रत्येक पायरी काळजीपूर्वक आणि योग्य क्रमाने करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढते. तसेच गणितामुळे निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासही वाढतो. तसेच गणिताचा अभ्यास किंवा सराव बुद्धीला ताजेतवाने करून टाकते. इतर विषयाचा अभ्यास करून कंटाळा आला असेल तर एखादे गणित सोडवले की, मन प्रसन्न होते. 
दैनंदिन जीवनात गणिताचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. गणिताशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. जीवनात पावलोपावली गणिताचे काम पडते. वेळेचे नियोजन, पैशांचा व्यवहार, मोजमाप करणे, खरेदी-विक्री, तंत्रज्ञान, संगणक, विज्ञान व अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांमध्ये गणित आवश्यक आहे. त्यामुळे गणित शिकणे म्हणजे जीवनासाठी तयार होणे असेच म्हणावे लागेल.
मात्र अनेक विद्यार्थ्यांना गणित कठीण वाटते. गणित म्हटलं की नाक मुरडतात, पोटात कळ येते. कारण लहानपणापासून गणिताची भीती मनात बसलेली असते. परंतु प्राथमिक वर्गात योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि समजून शिकण्याची पद्धत वापरल्यास गणित सोपे आणि रंजक होऊ शकते. शिक्षकांनी उदाहरणे, खेळ, कोडी व कृतींच्या माध्यमातून गणित शिकवले तर विद्यार्थ्यांच्यामनातून गणिताची भीती निघून जाते आणि गणितातला रस नक्कीच वाढतो. गणित आणि विद्यार्थी यांचे नाते अतूट आहे. गणितामुळे विद्यार्थी सक्षम, आत्मविश्वासू आणि विचारशील नागरिक बनतो. जीवन जगण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. जीवनात येत असलेल्या अनेक संकटाना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी गणिताकडे भीतीने नव्हे तर मैत्रीच्या नजरेने पाहिले पाहिजे. आज प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस जो की संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी असा संकल्प करू या की गणित समजून घेऊ या आणि आनंदात जीवन जगू या. 

खाली श्रीनिवास रामानुजन यांचा एक जादुई चौकट आहे. त्याचा अभ्यास करा आणि आपलं ही एक चौकट तयार करा. 
नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769

आनंदाचे डोही........! ( Be Happy )

     आनंदाचे डोही आनंद तरंग 

भारतीय संतपरंपरेत आनंदाला फार उच्च स्थान दिले आहे. संतांच्या मते खरा आनंद हा बाह्य सुखसाधनांत नसून आत्मिक आणि आध्यात्मिक अनुभवात आहे. पैसा, सत्ता, भोग किंवा ऐहिक सुखे ही क्षणिक असून ती माणसाला कायमचा आनंद देऊ शकत नाहीत. खरा, शाश्वत आनंद हा आत्मज्ञानातून आणि ईश्वरभक्तीतून मिळतो, असे संत सांगतात. संत ज्ञानेश्वरांच्या मते, आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर जो आनंद अनुभवाला येतो, तोच खरा आनंद आहे. त्यांनी “आनंदाचे डोही आनंद तरंग” असे सांगून ब्रह्मानंदाचे वर्णन केले आहे. आत्मानंदात विलीन झाल्यावर दुःख, भय आणि अहंकार नाहीसे होतात, आणि मन पूर्णतः तृप्त होते.
मानवाच्या जीवनातील सर्वांत मोठे ध्येय म्हणजे आनंदी राहणे. पैसा, यश, प्रतिष्ठा, संपत्ती या साऱ्या गोष्टी माणसाला हव्या असतात, पण त्यामागचा खरा उद्देश आनंद मिळवणे हाच असतो. तरीही आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद विसरत चालला आहे. सततची स्पर्धा, ताणतणाव, अपेक्षा आणि असमाधान यामुळे मन अस्वस्थ होते. अशा वेळी “आनंदी राहा” हा केवळ सल्ला नसून तो एक जीवनमंत्र ठरतो.
आनंद ही बाहेरून मिळणारी गोष्ट नसून तो आपल्या मनातून निर्माण होतो. अनेकदा आपण आनंदाला परिस्थितीशी जोडतो, चांगली नोकरी मिळाली तर आनंद, जास्त पैसा मिळाला तर आनंद, परीक्षा उत्तीर्ण झालो तर आनंद. पण या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असतात. खरा आणि टिकणारा आनंद मन:शांतीतून येतो. जेव्हा आपण वर्तमानात जगायला शिकतो, जे आहे त्यात समाधान मानतो, तेव्हा खरा आनंद अनुभवता येतो.
संत तुकारामांच्या अभंगांतूनही आनंदाचे महत्त्व स्पष्ट होते. त्यांच्या मते ईश्वरनामस्मरण आणि भक्तीमुळे मन निर्मळ होते आणि त्या निर्मळ मनातच आनंद वास करतो. “नाम घेतां हरिचे, हर्ष झाला चित्ती” असे म्हणत त्यांनी नामस्मरणातून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन केले आहे. संसारातील दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हरिभक्ती, असे ते सांगतात.
आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. नकारात्मक विचार मनात घर करून बसले तर आनंद दूर जातो. प्रत्येक समस्येकडे संधी म्हणून पाहण्याची दृष्टी असली, तर कठीण प्रसंगातही आनंद सापडतो. जीवनात चढ-उतार येतच असतात; त्यांना धैर्याने आणि आशावादी दृष्टीने सामोरे जाणे हेच आनंदी जीवनाचे गमक आहे.
संत एकनाथांनी समाधान आणि संयम यांना आनंदाचे मूळ मानले आहे. त्यांनी सांगितले की, इच्छांचा अतिरेक माणसाला दुःखी करतो, तर समाधान आणि विवेक जीवनात आनंद निर्माण करतात. मनावर संयम ठेवला तर बाह्य परिस्थिती कितीही कठीण असली, तरी अंतःकरणात आनंद टिकून राहतो.
आनंदाचा आणखी एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे नातेसंबंध. कुटुंब, मित्र, आप्तेष्ट यांच्यासोबत घालवलेला वेळ मनाला समाधान देतो. प्रेम, आपुलकी, सहकार्य आणि क्षमाशीलता यामुळे नाती घट्ट होतात आणि मन आनंदी राहते. एकमेकांशी तुलना करण्याऐवजी एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे हे खऱ्या आनंदाचे लक्षण आहे.
संत कबीरांनीही खऱ्या आनंदाविषयी स्पष्ट मत मांडले आहे. त्यांच्या मते, बाह्य आडंबर, कर्मकांड आणि दिखावा यात आनंद नसून, अंतर्मुख होऊन सत्याचा शोध घेतल्यासच आनंद मिळतो. आत्मज्ञान आणि अहंकाराचा त्याग हाच आनंदाचा खरा मार्ग आहे, असे ते सांगतात.
सेवा आणि मदत केल्यानेही आनंद मिळतो. गरजू व्यक्तीला मदत करणे, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे, समाजासाठी काहीतरी चांगले करणे, या गोष्टींमुळे मनात समाधान आणि आनंद निर्माण होतो. स्वार्थापेक्षा परमार्थाला महत्त्व दिले तर जीवन अधिक अर्थपूर्ण होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यही आनंदासाठी आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग, ध्यान, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे शरीर आणि मन निरोगी राहते. निरोगी शरीरातच निरोगी मन वसते, आणि निरोगी मनातूनच खरा आनंद उमलतो.
एकूणच संतांच्या मते आनंद हा भौतिक सुखात नसून आत्मिक शांतीत, भक्तीत, समाधानात आणि परोपकारात आहे. मन निर्मळ ठेवून, ईश्वराशी नाते जोडून आणि अहंकाराचा त्याग करणे होय. शेवटी असे म्हणता येईल की आनंद शोधण्याची गोष्ट नसून जोपासण्याची गोष्ट आहे. लहानसहान गोष्टींत आनंद शोधणे, कृतज्ञ राहणे, सकारात्मक विचार करणे आणि प्रेमाने जगणे, हेच आनंदी राहण्याचे खरे सूत्र आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी “आनंदी राहा” हा मंत्र जपला, तर जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण नक्कीच बनेल.

नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769

Thursday, 18 December 2025

चला, मतदान करू या..! ( Vote For Nation )

         चला, मतदान करू या

भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही ही शासनपद्धती जनतेच्या इच्छेवर आधारलेली असते. लोकशाहीत जनतेला आपल्या प्रतिनिधींची निवड करण्याचा अधिकार असतो आणि हा अधिकार वापरण्याची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे मतदान. “चला, मतदान करू या” हा केवळ घोषवाक्य नसून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन आहे. मतदानामुळे प्रत्येक नागरिकाला देशाच्या कारभारात सहभागी होता येते.
“राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही असणे अत्यंत आवश्यक आहे.” असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आहे. यातून हे स्पष्ट केले की मतदान हा केवळ अधिकार नसून समाजात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्याचे साधन आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकाला मताधिकार देण्यासाठी कठोर संघर्ष केला. त्यांच्यामते, मतदानाद्वारेच दुर्बल आणि वंचित घटक आपला आवाज सत्तेपर्यंत पोहोचवू शकतात.
मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, तसाच तो एक महत्त्वाचा कर्तव्यही आहे. आपल्या घटनेने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करून आपण देशाच्या विकासासाठी योग्य, प्रामाणिक आणि सक्षम प्रतिनिधी निवडू शकतो. जर आपण मतदान केले नाही, तर चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मतदान न करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे चुकीला प्रोत्साहन देणे होय.
“खरा लोकशाहीचा अर्थ असा की जनतेची सेवा करणारे प्रतिनिधी निवडले जातील.” असे महात्मा गांधींजी यांनी म्हटले आहे. मतदान करताना प्रामाणिक, सेवाभावी आणि नैतिक उमेदवाराची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हे केवळ अधिकार न राहता नैतिक जबाबदारी आहे, असे त्यांचे मत होते.
आज अनेक लोक “माझ्या एका मताने काय फरक पडणार ?” असे म्हणून मतदान टाळतात. परंतु हे विचार चुकीचे आहेत. लोकशाहीत प्रत्येक मताला समान मूल्य असते. अनेक वेळा निवडणुकांचे निकाल अत्यंत कमी मतांच्या फरकाने लागतात. अशा वेळी एका मताचेही महत्त्व प्रचंड असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या मताची ताकद ओळखली पाहिजे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू म्हणतात की,  “लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून ती जीवनपद्धती आहे.” पंडीत नेहरूंनी मतदानाला लोकशाही जीवनाचा अविभाज्य भाग मानले. त्यांच्या मते, नागरिकांनी जागरूक राहून मतदान केल्यासच लोकशाही मजबूत होते.
मतदानामुळे समाजात जागरूकता निर्माण होते. निवडणुकांच्या काळात विविध प्रश्नांवर चर्चा होते, जसे की, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यावरण संरक्षण इत्यादी. मतदार जेव्हा जागरूक होतो, तेव्हा तो केवळ उमेदवार नव्हे तर धोरणे, विचारधारा आणि कामगिरी पाहून मतदान करतो. अशा सुजाण मतदानातूनच चांगले नेतृत्व पुढे येते. 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मते, देश घडवण्यासाठी नागरिकांनी निष्क्रिय न राहता मतदानासारख्या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. तरुण पिढीची भूमिका मतदानात अत्यंत महत्त्वाची आहे. तरुणांमध्ये ऊर्जा, नवे विचार आणि बदल घडवण्याची क्षमता असते. जर तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान केले, तर देशाच्या राजकारणात सकारात्मक बदल घडू शकतात. सोशल मीडियावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे अधिक परिणामकारक ठरते.
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि गोपनीयता राखली जाते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मतदान सोपे, जलद आणि सुरक्षित झाले आहे. त्यामुळे मतदान करणे आता अधिक सुलभ झाले असून कोणतेही कारण देऊन मतदान टाळणे योग्य नाही. सरकारी कर्मचारी आणि कामगार मंडळीना मतदान करण्यासाठी सुट्टी दिली जाते. त्या सुट्टीचा सदुपयोग करावे. सुट्टी मिळाली म्हणून मतदान न करता कुठे ही अन्य ठिकाणी फिरण्यास जाऊ नये. आपले कर्तव्य पूर्ण करावे. 
शेवटी असे म्हणता येईल की, मतदान हे लोकशाहीचे प्राण आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. चला तर मग, उदासीनता बाजूला ठेवूया, जागरूक नागरिक बनूया आणि अभिमानाने म्हणूया, चला, मतदान करू या !

नासा येवतीकर, स्तंभलेखक 9423625769

Wednesday, 12 November 2025

जादूची पिशवी ( Jaduchi Pishavi )

जीवनातील सूक्ष्म अनुभव सांगणारा कथासंग्रह जादूची पिशवी –लेखक नासा येवतीकर .


नासा येवतीकर यांचे ‘जादुची पिशवी’  कथासंग्रह मराठी लघुकथालेखनातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी साहित्यिक योगदान आहे. हा संग्रह वाचकाला साध्या जीवनातील सूक्ष्म अनुभव, मानवी नात्यांमधील विविध भाव, आणि समाजातील विविधतेचे दर्शन करून देतो. लेखकाने प्रत्येक कथेत जिवंत प्रसंग, पात्रांचे अंतरंग, आणि भावनांचे सूक्ष्म थर इतके प्रगल्भपणे मांडले आहेत की वाचक त्या कथेत स्वतःला सामील होण्यास भाग पडतो. शीर्षक ‘जादुची पिशवी’ हे प्रतीकात्मक आहे; जिथे रोजच्या जीवनातील साधे क्षण, अनुभव, आनंद‑दुःख, आणि भावनांची जादू एकत्र साठवली आहे. हा संग्रह केवळ कथासंग्रह नाही, तर वाचकाला मानवी जीवनाच्या सूक्ष्म, अदृश्य पण प्रभावी अनुभवांची जाणीव करून देणारा प्रवास आहे.
संग्रहातील प्रत्येक कथा रोजच्या जीवनातील घटनांवर आधारित आहे, पण त्या घटनांमधून मानवी मनाची गहनता प्रकट होते. वाचक प्रत्येक प्रसंगात पात्रांच्या मनात प्रवेश करतो आणि त्यांचा अनुभव थेट अनुभवतो. उदाहरणार्थ, ‘कळी उमलण्याआधी…!’ ही कथा मुलीच्या लग्नापूर्वीच्या मानसिक अवस्थेवर केंद्रित आहे. आई‑वडिलांची चिंता, समाजाची अपेक्षा, आणि मुलीचा आत्मसंवाद ही कथा सूक्ष्मपणे उलगडते. कथानक साधे आहे, परंतु लेखकाने त्याला भावनिक गहिरेपणा आणि जिवंतपणा दिला आहे. वाचक त्या पात्राच्या अंतरंगात सामील होतो, प्रत्येक क्षण त्यांच्या अनुभवांशी जोडतो.
‘लॉकडाऊन’ या कथेत कोरोना काळातील परिस्थितीचे वास्तव अत्यंत नैसर्गिकपणे मांडले आहे. मुलांच्या शालेय जीवनातील बदल, घरातील तणाव, पालकांचे चिंता, आणि समाजातील बंधने यांचा कथेत थेट अनुभव दिसतो. या कथेतून लेखकाने समकालीन जीवनातील अडचणी आणि तणाव यांचा सूक्ष्म निरीक्षण मांडले आहे. वाचक स्वतःच्या जीवनाशी कथा सहज जोडतो, आणि त्यातून सामाजिक आणि मानवी अनुभवाची गहिरेपणा जाणवतो.
लेखकाने वापरलेली भाषा अत्यंत संवेदनशील आहे. साध्या मराठी शब्दांतून भावनांचे गहन थर उलगडले आहेत. वाक्यांची लय, शब्दांची निवड, विरामचिन्हांचा वापर, संवादातील नैसर्गिकता – हे सर्व घटक कथेला प्रभावी बनवतात. दृश्यात्मक वर्णनाची क्षमता प्रगल्भ आहे; घराचे कोपरे, अंगणातील सावल्या, संध्याकाळची शांती, मुलांचे लपलेले विचार – या दृश्यांमधून पात्रांच्या मानसिकतेची झलक मिळते. संवाद नैसर्गिक आहेत आणि कथेत गती निर्माण करतात. काही ठिकाणी साहित्यिक अलंकार, सूक्ष्म उपमा, आणि प्रतिमा वापरल्या आहेत, ज्यामुळे कथा अधिक गहिरेपणा देतात.
संग्रहातील पात्रे साधी, सामान्य, परंतु जिवंत आहेत. मुलांच्या स्थिती, पालकांची चिंता, शिक्षकांचे बंधन, समाजाचे नियम – हे सर्व पात्रांच्या माध्यमातून स्पष्ट होतात. लेखकाची मोठी ताकद म्हणजे पात्रांच्या अंतरंगातून अनुभव उलगडणे. काही पात्र प्रत्यक्ष बोलत नाहीत, तरी त्यांच्या अस्तित्वामुळे कथा प्रभावी ठरते. प्रत्येक पात्राची भावना सूक्ष्मदृष्टीने मांडलेली आहे, आणि वाचक त्या अनुभवाला स्वतःच्या मनात स्थान देतो.
संग्रहातील कथा सामाजिक वास्तवाशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत. मुलांच्या शालेय अडचणी, पालकांच्या अपेक्षा, कौटुंबिक ताण, समाजाचे नियम – या सर्व गोष्टी कथेत प्रभावीपणे दिसतात. कथेतून लेखकाने व्यक्तीच्या आंतरिक संघर्षाला सामाजिक संदर्भातून बाहेर आणले आहे. वाचकाला पात्रांचा अनुभव केवळ निरीक्षणातून नव्हे, तर भावनिक सहभागी होऊन जाणवतो. ‘लॉकडाऊन’ ही कथा फक्त महामारीकाळातील अनुभव सांगत नाही; ती घरातील तणाव, पालक‑मुलांमधील संवाद, आणि सामाजिक प्रतिबंध यांचा थेट अनुभव देऊन वाचकास समकालीन जीवनातील अनुभवाची जाणीव करून देते.
लेखकाने भावनांचा गहिरेपणा अत्यंत प्रभावीपणे उलगडला आहे. अनेक प्रसंगांत वाचकास सूक्ष्म भावनांचा अनुभव होतो – आनंद, निराशा, आशा, भिती, अपेक्षा, ताण आणि अंतर्मुखता. कथांचा अंत अचानक किंवा मोठ्या क्लायमॅक्सशिवाय येतो; त्यामुळे वाचक स्वतःच्या मनात पात्रांचा अनुभव आत्मसात करतो. जीवनातील साध्या प्रसंगांमध्येही ‘जादू’ आहे असे लेखक दर्शवतो. एखाद्या आईच्या हसण्यात, मुलाच्या छोट्या यशात, घराच्या कोपऱ्यातील शांततेत ही जादू जाणवते. शीर्षक ‘जादुची पिशवी’ अत्यंत योग्य ठरते; पिशवी प्रतीकात्मक आहे – जिथे जीवनातील साध्या प्रसंगांमध्ये दडलेली भावना, अनुभव आणि क्षणिक आनंद‑दुःख एकत्रित आहेत.
संग्रहातील बलस्थान म्हणजे साध्या जीवनातील गहिरे अनुभव, संवाद, दृश्यात्मकता, सामाजिक व व्यक्तिमत्त्वात्मक संदर्भ, आणि भावनांचा थर. लेखकाने साध्या प्रसंगातून मानवी मनाची गहनता उलगडली आहे. संवाद नैसर्गिक आहेत, दृश्यात्मक वर्णन प्रभावी आहे, आणि सामाजिक संदर्भ कथेला वास्तविकतेची जाणीव देतो. कथांचे भावनात्मक थर वाचकाला ओझरती‑थरथर अनुभव देतात, आणि प्रत्येक प्रसंग वाचकाच्या मनात दीर्घकाळ टिकतो.
संग्रह वाचताना एक ठराविक मनःस्थितीचा प्रवास अनुभवता येतो. वाचक पहिल्या प्रसंगात पात्रांच्या जीवनात सामील होतो, त्यांच्या अनुभवांमध्ये साम्य शोधतो, आणि नंतर कथांच्या पुढील थरांतून अधिक खोलवर जातो. प्रत्येक कथा, जरी संक्षिप्त असली, तरी तिचा प्रभाव दीर्घकाळ मनावर राहतो. या दृष्टिकोनातून, ‘जादुची पिशवी’ वाचकास साध्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांची जाणीव, सामाजिक वास्तवाचा अनुभव, आणि मानवी भावना समजण्याची क्षमता देते.
लेखनाची शैली अत्यंत नाजूक पण प्रभावी आहे. वाक्यांची लय, शब्दांची निवड, विरामचिन्हांचा ताळमेळ – हे सर्व कथेला जिवंतपणा देतात. दृश्यात्मक वर्णन पात्रांच्या अंतर्मनाची झलक उघडते. घरातील संध्याकाळची शांती, मुलांचे लपून बसणे, आईची चिंता – या दृश्यांचा प्रभाव वाचकाच्या मनावर थेट पडतो. काही प्रसंगांत उपमा, प्रतिमा आणि सूक्ष्म अलंकारांचा उपयोग कथेला अधिक रसाळपणा आणि गहिरेपणा देतो.
वाचकाला हा संग्रह केवळ वाचनाचा आनंद देत नाही, तर साहित्याचा अनुभव, सामाजिक जाणीव, आणि भावनात्मक संवेदनशीलता देखील विकसित करतो. लेखकाने पात्रांच्या अंतर्मनाला महत्त्व दिले आहे, समाजातील परिस्थितीला कथेत मिसळले आहे, आणि रोजच्या जीवनातील साध्या प्रसंगातून मोठे अर्थ निर्माण केले आहेत. वाचक प्रत्येक कथेत स्वतःला शोधतो, आणि त्या अनुभवातून आपले अंतर्मन समृद्ध होते.
संग्रह वाचल्यावर वाचकास समजते की साध्या घटनांमध्येही जीवनाची जादू आहे – प्रत्येक भावना, प्रत्येक अनुभव, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. लेखकाने ही जादू लहान लहान प्रसंगांमधून वाचकास अनुभवायला दिली आहे. कथा केवळ मनोरंजक नाहीत; त्या विचार करायला, अंतर्मुख होायला आणि जीवनाच्या सूक्ष्म बाजूंवर लक्ष देायला प्रवृत्त करतात.
एकूणच, नासा येवतीकर यांचे ‘जादुची पिशवी’ हे कथासंग्रह मराठी लघुकथालेखनातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. वाचकाला भावनात्मक आणि सामाजिक दृष्टिकोनातून समृद्ध अनुभव देणारे, साध्या प्रसंगांमधील गहिरे अर्थ उलगडणारे, आणि मानवी जीवनातील सूक्ष्म जादूचा अनुभव देणारे साहित्यिक काम आहे. संग्रहाच्या प्रत्येक कथेत मानवी अंतर्मनाची जाणीव, सामाजिक संदर्भ, आणि दृश्यात्मक अनुभवांचा तळागाळ आहे. वाचक प्रत्येक प्रसंगातून स्वतःच्या अनुभवाशी तुलना करतो, जीवनातील सूक्ष्म क्षणांचा अर्थ शोधतो, आणि कथांच्या प्रभावातून अधिक संवेदनशील, अधिक जागरूक बनतो.
‘जादुची पिशवी’ वाचल्यावर वाचकाला ही जाणवते की, सोप्या शब्दांतही जीवनाचा गहिरे अर्थ, मानवी भावनांचा अनुभव, आणि समाजातील सूक्ष्म अंतरदृष्टी प्रभावीपणे व्यक्त केली जाऊ शकते. प्रत्येक कथा वाचकाला भावनात्मक प्रवास देऊन अंतर्मन समृद्ध करते. हा संग्रह केवळ वाचनासाठी नाही, तर विचार करण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी, आणि जीवनातील सूक्ष्म जादू समजण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. सदरील कथासंग्रह ई साहित्य या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे. तेव्हा आपण ही या पुस्तकाचा आनंद घ्यावे.


सौ अंजली देशमुख घंटेवार
ग्रामगीताचार्य नागपूर
8669664633

Tuesday, 4 November 2025

जागर जाणिवांचा पुस्तक परिचय ( Book )

तनामनात ज्योत पेटविणारा " जागर जाणिवांचा "
~~~~~~~~~~~~~~~~
चौकट - मा. इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर आणि अक्षर प्रकाशन आजराचे प्रकाशक सुभाष विभुते यांच्या हस्ते विनायक हिरवे लिखित जागर जाणिवांचा या पुस्तकाचे कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन मध्ये दि. 05 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने घेतलेला थोडक्यात आढावा. 
~~~~~~~~~~~~~~~~
शिक्षक म्हणजे केवळ शाळेतील ज्ञान देणारे नसून ते समाजाला संवेदना, संस्कार आणि दृष्टी देणारे मार्गदर्शक आहेत. संवेदनशील नागरिक घडविण्याचे खूप मोठे काम शिक्षक करत असतात. पूर्वीचा काळ असो की आजचा काळ, शिक्षकांना नेहमीच समाजात मान सन्मान मिळतो. फक्त समाजाला समजून घेऊन कार्य करता आले पाहिजे. शिक्षक हा समाज घडविणारा खूप मोठा अभियंता आहे याची जाणीव प्रत्येक शिक्षकांमध्ये निर्माण व्हावा या उदात्त हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक विनायक हिरवे यांनी जागर जाणीवांचा हे पुस्तक लिहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे निमित्त साधून आजरा येथील अक्षर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक नसून एक शिक्षक आपली शिक्षकी पेशा सांभाळत सामाजिक कार्य कसे पूर्ण करता येऊ शकते ? समाजाचे ऋण कसे फेडता येईल ? याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. हे पुस्तक लेखकाचे आत्मकथन आहे पण त्यांच्या आत्मकथनातुन प्रेरणा घेण्यासारखं आणि नवीन काही शिकण्यासारखं व करण्यासारखं खूप आहे. शालेय जीवनातील अनेक प्रसंग आणि घटना आपले पुढील आयुष्य घडवत असतात. शाळेमध्ये शिक्षणासोबत इतर क्रिया देखील अत्यंत महत्वाचे असतात. शाळेतील शिक्षक तर विद्यार्थ्यांवर संस्कार टाकण्याचे काम करतातंच शिवाय सहकारी विद्यार्थी मित्र देखील संस्कार करत असतात. पुस्तक वाचताना या गोष्टीची प्रत्येक वेळी जाणीव होत असते. गरिबी माणसाला संघर्ष करायला शिकविते. संकटे ही माणसाला स्वतःच्या सामर्थ्यांची कल्पना देतात. तावून सुलाखून कणखर बनवून बाहेर काढतात. लेखकांची ही स्वमत वाचकांना विचार करण्यास भाग पाडतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नशीब देखील चांगले असावे लागते. नशिबात काय लिहून ठेवलं आहे ? हे विधात्याशिवाय कोणालाच माहित नाही. लेखकांना खरं तर नाविक दलात काम करण्याची इच्छा होती मात्र अपघाताने ते शिक्षक झाले. म्हणून त्यांनी नाराज किंवा निरूत्साही झाले नाहीत. त्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करत सोने निर्माण केले आहे. आपला स्वभाव प्रेमळ आणि मायाळू असेल तर शत्रू देखील आपला मित्र बनतो. कुणापुढे हात पसरण्याची देखील गरज नसते आणि भरपूर मदत मिळू शकते पण त्यासाठी अगोदर स्वतःला खूप कष्ट आणि दुःख सोसावे लागते. लेखकाला जीवनात अनेक चांगल्या लोकांशी संपर्क आला. ज्यात प्रामुख्याने सेवायोग संस्थेचे इंद्रजित देशमुख आणि साद माणुसकीचे संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले त्यांच्या सहवासाने लेखकांच्या जीवनात आमूलग्र बदल झाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. समाजातील तळागाळातील गरीब पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ नावाची ज्योत त्यांनी चोवीस वर्षांपूर्वी पेटविली. ज्ञान, प्रबोधन आणि सेवा या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन, या अंतर्गत त्यांनी अनाथ लोकांना मदत, पूरग्रस्ताना मदत, विधवा महिलासाठी हळदी कुंकू, सायकल बँक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब मुलांसाठी असलेली अभ्यासिका असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्या सर्व उपक्रमाची माहिती वाचताना अंगावर शहारे येतात. मित्र परिवाराची मिळालेली साथ हे ही अत्यंत महत्वाचे आहे. राज्यपुरस्कार मिळणे हे कोणत्याही शिक्षकांसाठी खूप मोठे पारितोषिक आहे. पण लेखकांनी हा पुरस्कार का मिळविले ? याची कहाणी खूपच रोचक आहे. शैक्षणिक व्यासपीठाची स्थापना आणि त्या अंतर्गत केलेले सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे आहे. लेखक आपल्या पहिल्या पानावर नेल्सन मंडेला यांचे वाक्य लिहिले आहे, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, जे तुम्ही जग बदलण्यासाठी वापरू शकता. खरंच आहे, शिक्षणाने जी क्रांती होते, ती अन्य कशानेही होत नाही. म्हणून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण मिळायला हवे. यासाठी प्रत्येक शिक्षकांने धडपड करायला हवे. हीच प्रेरणा देण्यासाठी हे पुस्तक आहे, असे मला वाटते. शिक्षक व लेखक विनायक हिरवे यांचे कार्य समजून घेण्यासाठी आणि आपण ही समाजासाठी काही करू शकतो हे जाणून घेण्यासाठी जागर जाणीवांचा पुस्तक वाचायलाच हवं. इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी यांची सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. पुस्तकाची सुंदर व आकर्षक अशी बांधणी असून अक्षर जुळणी छान केलेली आहे. रुपेश वारंगे यांचे मुखपृष्ठ वाचकांचे मन वेधून घेते. या पुस्तकात एकूण 199 पृष्ठ असून पुस्तकाची किंमत 250 ₹ आहे. लेखकांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा ......!
- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद, 9423625769

Sunday, 5 October 2025

कोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri )

कोजागिरी पौर्णिमाचे महत्त्व -

पौराणिक कथेनुसार, एक सावकार होता, त्याला दोन मुली होत्या. सावकाराच्या दोन्ही मुली मनापासून पौर्णिमेचे व्रत करत असत. पण मोठी मुलगी हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि सर्व नियम पाळून करत असे. मात्र, लहान मुलगी व्रत अर्धवट ठेवत असे. त्यामुळे, तिच्या घरात जन्मलेली मुले जिवंत राहत नव्हती. हे पाहून ती खूप दुःखी झाली. एके दिवशी तिने एका ब्राह्मणाला यामागील कारण विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, 'तू पौर्णिमेचे व्रत नियमाने करत नाहीस, म्हणूनच मुझी मुलं लगेच मरण पावतात. मात्र, जर तू पौर्णिमेचे व्रत श्रद्धेने पूर्ण केलीस, तर तुला संततीसुख लाभेल'. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार, सावकाराच्या लहान मुलीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक उपवास केला. त्यानंतर, तिला एक लहान मुल झाला. मात्र, दुर्दैवाने त्या लहान बाळाचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. या घटनेमुळे, ती निराश झाली. पण, बाळाला एका पाटावर ठेवून सावकाराच्या लहान मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले. जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला गेली, तेव्हा तिच्याजवळ असलेली हंडी सावकाराच्या लहान मुलीच्या मृत मुलाला लागला आणि अचानक रडू लागला. हे पाहून तिची मोठी बहीण आश्चर्यचकित झाली आणि आपल्या लहान बहिणीला म्हणाली की, 'जर मी या पाटावर बसले असते, तर हा मुलगा मेला असता ना?' तेव्हा सावकाराची लहान मुलगी म्हणाली, 'हा मुलगा पूर्वीच मृत होता. मात्र, तुझ्या चांगल्या कर्मांमूळेच माझा मुलगा जिवंत झाला'. तेव्हापासून, अशी प्रथा सुरू झाली की, जो भाविक भक्तीभावाने कोजागिरी पौर्णिमाचे उपवास करेल, त्याला चांगले फळ मिळेल.

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात ?
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पितात. ही परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. पौराणिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो. त्यामुळे, दूध आणि इतर पौष्टिक पदार्थांना दैवी गुणांनी युक्त मानले जाते. इतकंच नाही, तर मसाला दुधातील औषधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असते आणि पित्तदोष कमी करण्यास मदत करतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

संकलन - नासा येवतीकर 

Tuesday, 30 September 2025

सेवानिवृत्ती कविता ( Sevanivrutti Kavita )

कर्मचाऱ्यांच्या जीवनातील एक अनमोल क्षण म्हणजे सेवानिवृत्ती. एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू अशी विपरीत स्थिती यावेळी असते. 
कभी खुशी, कभी गम
थोडा ज्यादा, थोडा कम
यानिमित्ताने काही रचना 👇

🌸 सेवानिवृत्ती कविता 🌸

आजचा दिवस खास ठरला,
कर्मभूमीचा प्रवास पूर्ण झाला।
कष्ट, निष्ठा, प्रामाणिकतेची शिदोरी,
घडविली आयुष्यभर सुंदर गोष्टी।

घामाच्या थेंबांनी उजळली वाट,
कर्तव्यपूर्तीतच मिळाली खरी साथ ।
सहकाऱ्यांची सोबत, आठवणींचा खजिना,
हेच ठरेल पुढच्या आयुष्याचा बहाणा ।

आज निरोप नाही, तर आहे नवा आरंभ,
स्वप्नांना देऊ या आता नवा उन्मेष, नवा रंग।
आरोग्य, आनंद, समाधान लाभो तुम्हाला,
आयुष्य फुलोऱ्यांनी भरून राहो सतत घराला।

🌹💐 "सेवानिवृत्ती ही शेवट नाही, नव्या जीवनाची सुरुवात आहे!" 💐🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~
🌸 सेवानिवृत्ती – एक भावनिक क्षण 🌸

आज निरोपाचा क्षण सोहळा हा खास,
डोळ्यांत दाटतोय आठवणींचा प्रकाश।
कष्टाने घडविले आयुष्य वर्षे अनेक 
आज सजवितो आहे नवीन क्षितिज एक 

हास्य, श्रम, अनुभव यांचा असा ठेवा,
राहील कायम सोबत साठवलेला मेवा।
तुमच्या सहवासात उजळल्या वाटा,
आम्हा सर्वांच्या हृदयात उमटल्या गाथा।

सेवा केलीत समर्पणाने, हेच तुमचे दान,
तुमच्या कार्याने सजला शाळेचा मान।
आज विराम असेल, तरी हा शेवट नाही 
नव्या प्रवासात मिळो सुख आणि समृद्धी 

पुढील आयुष्य फुलोऱ्यांनी नटावे,
आरोग्य, आनंद, समाधान लाभावे।
आमच्या मनात आठवणींचा दीप 
सदैव उजळत राहील,
तुमच्या योगदानाचा सुवास 
कायम दरवळत राहील।

🌹💐 “सेवानिवृत्ती हा निरोप नाही, तर नवे स्वप्न पाहण्याचा सुंदर आरंभ आहे.” 💐🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~
📖🌸 सेवानिवृत्त शिक्षकांस अर्पण 🌸📖

ज्ञानदीप तेवत ठेवला आयुष्यभर,
विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले संस्कार।
अंधारलेल्या वाटांना दिला प्रकाश,
घडवले भवितव्य, दिला आयुष्याला विकास।

आपली शिकवण म्हणजे खरा ठेवा,
तोच आमच्यासाठी अमूल्य मेवा।
शब्दांनी दिला आत्मविश्वासाचा हात,
विचारांनी घडवल्या नव्या पिढ्यांच्या वाट।

आज सेवेतून घेत आहात विश्रांती,
तरीही आठवणींनी राहील जुळलेली नाती।
विद्यार्थ्यांच्या हृदयात तुमचे नाव कोरलेले,
तुमचे योगदान सदैव स्मरणात राहिलेले।

देव करो पुढचे आयुष्य सुखमय व्हावे,
आरोग्य, आनंद, समाधान लाभावे।
जसा शिक्षकांचा दीप कधी विझत नाही,
तसेच तुमचे कार्य कधी विसरता येत नाही।

🌹💐 “शिक्षक सेवानिवृत्ती घेतो, पण त्यांची शिकवण कधीच निवृत्त होत नाही.” 💐🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~
🌸📖 आदरणीय शिक्षकांना निरोप 📖🌸

गुरु हेच ज्ञानाचे देवालय,
तुमच्यामुळे उजळले हे विद्यालय 
शिक्षणाची वाट दाखवली प्रेमाने,
जगणे शिकवले आम्हा संयमाने।

वर्गखोलीतले तुमचे शब्द होते अनमोल,
घडवले साऱ्यांचे जीवन सुंदर गोल।
कठीण प्रश्नात सापडला मार्ग नवा
तुमच्या मार्गदर्शनाने मिटला सर्व दुरावा ।

आज सेवेतून घेत आहात विराम,
मन मात्र आलं भरून, अश्रू दाटले डोळ्यांत
तुमच्या आठवणी राहतील कायम सोबत,
शिक्षणरूपी दिला जो वारसा, 
तीच  खरी संगत।

पुढचा प्रवास सुख, आरोग्य, समाधानाचा असो,
आयुष्य नवा आनंदाचा दरवळ घेत राहो।
गुरुचे कार्य कधी संपत नाही,
कारण त्यांच्या शिकवणीनेच पिढ्या घडत राहतात काही।

🌹💐 “सेवानिवृत्ती ही केवळ पदाची, पण शिक्षकत्वाची कधीच नसते.” 💐🌹
~~~~~~~~~~~~~~~~~~
🌸 चारोळी १ 🌸
ज्ञानरूपी झाड लावले तुम्ही वर्षानुवर्षे,
विद्यार्थ्यांच्या जीवनात उमलले फुल नवनवीन सरसे।
सेवा संपली आज, पण कार्य राहील जिवंत,
गुरुंचा ठसा असतो आयुष्यभर अमर्याद संत।

🌸 चारोळी २ 🌸
गुरु म्हणजे दीप, अंधारातला प्रकाश,
त्यांच्या शिकवणीतच दडलेला विश्वास।
आज घेतो निरोप, तरी नाती अबाधित राहो,
तुमच्या आशीर्वादाने आमचे जीवन बहरो।


🌸 चारोळी ३ 🌸
सेवानिवृत्ती हा शेवट नाही, नव्या प्रवासाची सुरूवात,
गुरुंचा वारसा देतो जीवनाला खरीच साथ।
आठवणींच्या गंधाने राहील हा सोहळा सजून,
तुमचे योगदान राहील आमच्या हृदयात रुजून।


🌸 चारोळी 🌸

ज्ञानदीप तेवत राहील तुमच्या स्मरणाने,
शिकवण जगेल सदैव तुमच्या नामाने।
सेवा संपली तरी नातं कधी तुटणार नाही,
आपली आठवण हृदयातून कधी जाणार नाही।

संकलन - नासा येवतीकर 

Saturday, 6 September 2025

राजे उमाजी नाईक ( Raje Umaji Naik )

शेतकऱ्यांचा राजा व आद्य क्रांतीकारक - राजे उमाजी राजे नाईक 
राजे उमाजी नाईक (१७९१–१८३२) हे मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक शूर क्रांतिकारक व लोकनायक म्हणून ओळखले जातात. त्यांना "पहिला क्रांतिकारक" असेही संबोधले जाते. ई.स. १७९१ मध्ये भिवडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे त्यांचा जन्म झाला. ते नाईक घराण्यातील होते. लहानपणापासूनच त्यांच्यात शौर्य व न्यायप्रियता होती. सामान्य जनता, शेतकरी व गावकरी यांना ब्रिटिशांच्या अन्यायकारक करप्रणालीमुळे अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. इंग्रजांनी गावकऱ्यांवर लादलेले कर, महसूल व अन्याय याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यांचे साथीदार म्हणजे शेतकरी, धनगर व स्थानिक गावकरी होते. ते "गनिमी कावा" पद्धतीने लढा देत, त्यामुळे इंग्रजांना त्यांना पकडणे कठीण होत असे. इंग्रजांना उमाजी राजे यांच्या लढ्याची भीती वाटू लागली. शेवटी विश्वासघातामुळे ते इंग्रजांच्या ताब्यात आले. इ.स. १८३२ मध्ये पुण्यात त्यांना फाशी देण्यात आली.
त्यांच्या जीवनातील काही प्रसंग खूप महत्वाचे आहेत. 
शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला उमाजी
एकदा ब्रिटिश सरकारचे महसूल अधिकारी एका गावात कर वसुलीला आले होते. शेतकऱ्यांची पिके नीट आलेली नव्हती, त्यामुळे ते कर देऊ शकत नव्हते. पण इंग्रज अधिकाऱ्यांनी निर्दयीपणे कराची वसुली सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची साधने आणि अन्नधान्य जप्त करायला सुरुवात केली. गावकऱ्यांची अवस्था पाहून उमाजी राजे नाईक संतापले. ते थेट त्या अधिकाऱ्यांच्या तंबूत शिरले व म्हणाले, “हा शेतकरी हा आपल्या मायभूमीचा कणा आहे. याच्या घामावर राज्य उभे आहे, आणि तुम्हीच याला लुबाडता ? शेतकऱ्यांवर असा अन्याय मी सहन करणार नाही ! ” असे म्हणत त्यांनी इंग्रजांच्या सिपायांवर झडप घातली. तेव्हा गावकरीही धैर्याने उमाजींना साथ देऊ लागले. इंग्रज सिपाई पळून गेले आणि गावकरी मुक्त झाले. या प्रसंगानंतर शेतकऱ्यांमध्ये उमाजी राजेंविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. लोक त्यांना "शेतकऱ्यांचा राजा" म्हणू लागले.
उमाजी राजे हे शेतकरी–शोषित समाजाचे तारणहार म्हणून ओळखले जात. "शेतकऱ्यांचा राजा" अशी उपाधीही त्यांना लोकांनी दिली.
दुसरा प्रसंग म्हणजे गनिमी काव्याचा प्रसंग
ब्रिटिश सैन्याने उमाजी राजे नाईक व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी एक मोठी छावणी उभारली होती. त्या छावणीत शेकडो सिपाई होते. शेतकऱ्यांना दहशत बसावी म्हणून इंग्रजांनी गावकऱ्यांकडून धान्य व जनावरे जप्त केली होती.
हे पाहून उमाजी राजेंनी आपल्या मावळ्यांना एकत्र केले आणि गनिमी काव्याने हल्ला करण्याचे ठरवले. रात्रीच्या अंधारात ते सर्वजण छावणीभोवती शांतपणे लपून बसले. अचानक त्यांनी मशाली पेटवल्या, शिट्ट्या मारल्या, डफ वाजवले, आणि चारही बाजूंनी "हर हर महादेव!" असा जयघोष करत छावणीवर धावा चढवला.
इंग्रजांना वाटले की हजारो सैनिकांनी छावणी घेरली आहे. घबराटीत त्यांनी शस्त्रास्त्रे व सामान सोडून पलायन केले. उमाजी राजेंनी जप्त केलेले धान्य, जनावरे पुन्हा शेतकऱ्यांना परत दिले. या प्रसंगानंतर शेतकरी अधिक निर्भय झाले आणि उमाजी राजेंची कीर्ती संपूर्ण पुणे-जुन्नर भागात पसरली. इंग्रज मात्र अधिकच चिडले आणि त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले.
त्यांच्या जीवनातील विश्वासघाताचा प्रसंग
उमाजी राजे नाईक इंग्रजांना बराच काळ चकवून गेले. त्यांच्या शौर्यामुळे व गनिमी काव्यामुळे इंग्रजांना त्यांना पकडणे अशक्य झाले होते. इंग्रजांनी मग चलाखीचा डाव खेळला. त्यांनी जाहीर केले, “ जो उमाजींना पकडून देईल, त्याला मोठे बक्षीस व जमीनजुमला दिला जाईल.”
काही लोभी लोक त्यांच्या या प्रलोभनाला बळी पडले. त्यातीलच एकाने उमाजी राजेंचा ठाव इंग्रजांना सांगितला.
एकदा उमाजी राजे आपल्या मावळ्यांसोबत जंगलात विसावले होते. त्यावेळी त्या विश्वासघातकाने इंग्रज सैन्याला गुप्त खूण दिली. अचानक इंग्रज सिपायांनी सर्व बाजूंनी छापा टाकला. उमाजी राजे शूरपणे लढले, पण संख्येने प्रचंड असलेल्या इंग्रज सैन्यापुढे ते पकडले गेले. इ.स. १८३२ मध्ये पुण्यातील फाशीच्या चौकात उमाजी राजेंना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. तेव्हा त्यांनी शेवटचे वाक्य उच्चारले –
“हा बळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे ; माझा आत्मा मुक्त झाला ! ”
अशा रीतीने एका विश्वासघातामुळे शेतकऱ्यांचा राजा, मराठ्यांचा पहिला क्रांतिकारक हरपला. पण आजही त्यांचे नाव ऐकले की लोकांच्या डोळ्यांत आदर व अभिमान दिसतो. महाराष्ट्रात त्यांच्या स्मरणार्थ पुतळे, स्मारके उभारण्यात आली आहेत.
थोडक्यात, उमाजी राजे नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी, अन्यायाविरुद्ध व स्वराज्यासाठी इंग्रजांविरुद्ध झुंज देऊन आपले प्राण अर्पण केले. ते मराठी जनतेच्या मनात आजही क्रांतिकारक आदर्श म्हणून जिवंत आहेत.
त्यांच्यासाठी ही कविता 
🌾 उमाजी राजेंची शौर्यगाथा 🌾

होता शेतकऱ्यांचा राजा, 
जनतेचा होता आधार, 
उमाजी नाईक तो शूरवीर
अन्यायाशी सदैव लढणार

गनिमी कावा शास्त्राने
इंग्रजांच्या छातीत धडकी भरली 
गावकऱ्यांच्या हक्कासाठी 
इंग्रजी सिपाईवर झडप घेतली 

उमाजीची पसरली कीर्ती 
इंग्रजाची डोकेदुखी वाढली 
मग केला जालीम उपाय 
लाखोची बक्षीस जाहीर केली 

काही लोकांना झाला लोभ 
उमाजीचा विसरला त्यांनी त्याग 
राहण्याचा सांगून ठावठिकांना
पकडून दिले उमाजी नाईकाना 

असा विश्वासघात त्यांचा झाला
पण ते झुकले नाही कधी
त्या फाशीच्या दोरीवरही 
झळकली त्याची जिद्दी

आजही संपूर्ण महाराष्ट्रात 
गायली जाते त्यांची गाथा,
उमाजी राजे नाईक म्हणजे 
आपल्या स्वातंत्र्याचा प्रणेता

नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Friday, 5 September 2025

गणपती बाप्पा मोरया ( Ganpati Bappa Morya....)

सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप
सुमारे दीडशे वर्षे भारत देशावर इंग्रज लोकांनी राज्य केले आणि त्यांनी लोकांचा अतोनात छळ करू लागले. त्यांच्या त्रासाला सर्व जनता पुरती कंटाळून गेली होती. त्या अन्यायाला तोंड देण्यासाठी 1900 च्या दशकात एका युगपुरुषाने पुढाकार घेतला त्याचे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. समाजात जागृती निर्माण होण्यासाठी त्यांनी मराठा व केसरी यासारखे वृत्तपत्र चालू केले आणि त्यातून इंग्रज सरकारवर सडेतोड लेख लिहून प्रहार करू लागले. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय ? अश्या अग्रलेखामुळे इंग्रज सरकार हादरुन गेले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळावणारच अशी सिंहगर्जना केली. लोकांना सुद्धा लोकमान्य यांच्या प्रसार माध्यमामुळे बरीच माहिती मिळत होती आणि लोक जागृत होत होते. फोडा आणि राज्य करा अशी नीतिमत्ता असलेले इंग्रज सरकार लोकांत एकीची भावना निर्माण होऊ नये आणि जनता एकत्र येवू नये यासाठी लोकावर वेगवेगळी बंधने टाकत असे. कोणत्याही व्यक्तीला ते एकत्र येऊ देत नव्हते याचसाठी लोकमान्य टिळकानी यावर उपाय योजण्याचे ठरविले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून घरोघरी भाद्रपद चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केल्या जात असल्याची नोंद इतिहासामध्ये दिसून येते. याच बाबीचा विचार करून सन 1896 मध्ये लोकमान्य टिळकानी घरोघरी बसणाऱ्या या  गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले. त्यास आज 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ज्या उद्देशाने हा उत्सव चालू केला होता त्या काळात ते अत्यंत गरजेचे आणि आवश्यक होते. इंग्रज सरकार लोकांना एकत्र येऊ देत नसताना लोकमान्य टिळकानी लोकांना एकत्र येऊन चर्चा करावी यासाठी ही युक्ती केली आणि त्यात ते  यशस्वीही झाले. पण आज समाजात सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरी होत आहे याचा जर विचार केला तर, नको हे गणेशोत्सव असे म्हणण्याची आपल्या वर वेळ आली आहे असे वाटते.
खरोखरच आज लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील सार्वजनिक गणेशोत्सव आहे का ? त्याचे उत्तर नाही असेच येते कारण आज हा उत्सव वेगळ्या स्वरुपात दिसत आहे यावर थोडे चिंतन करने आवश्यक आहे, असे वाटते.
गणेशोत्सवाच्या नावाखाली अकरा दिवस मंडळातील लोकांची खूप हौस होते. रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली वेगवेगळे उदयोगधंदे केले जातात. मंडळाकडून समाजोपयोगी कार्य करायचे तर दुरच, समाजाला त्रास देण्याचे काम केले जाते असे चित्र प्रत्येक ठिकाणी दिसून येते. गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत आहेत की खंडणी मागत आहेत तेच कळायला मार्ग नसतो. मुले आपल्या माघारी काय करीत आहेत याची जराही कल्पना आई बाबाला लागू देत नाहीत. आपल्या मनाप्रमाणे वागण्याची ही एक सुवर्ण संधी असते या मंडळातील युवकांना. अकरा दिवसानंतर अनंत चतुर्दशी म्हणजे विसर्जनच्या दिवशी तर युवकांचा गोंधळ पाहूच नये असे वाटते. कान बधिर होतील एवढ्या मोठ्या आवजात गाणे लावणे बेधुंद होऊन नाचणे यामुळे या उत्सवाला एक वेगळे स्वरूप मिळाले आहे. समाजाशी आमचे काही देणे घेणे नाही अश्या विचाराने वागणारी ही मंडळी वर्गणी मागत असताना फारच कनवाळु होतात. अमुक एवढे दिलेच पाहिजे असा हट्ट धरतात. असे करून मंडळाकडे भरपूर प्रमाणात पैसा जमा होतो. वास्तविक पाहता जी काही वर्गणी जमा केल्या जातो तो पूर्ण खर्च करायचा असतोच असे मंडळातील प्रत्येकजण विचार करतो. पण यातील रक्कम वाचवून आपण समाजासाठी काही विधयाक कार्य करू असा विचार करणारी गणेश मंडळ फार कमी प्रमाणात आढळून येतात. खरोखरच वर्गणी म्हणून जमा झालेल्या रक्कमेचे काय करायचे यावर एकदा तरी मंडळाने विचार केला आहे का ? जी गणेश मंडळी याचा विचार केले असतील त्यांचे त्रिवार अभिनंदन आणि ज्यानी काहीच विचार केला नाही त्यांनी विचार करायला सुरु करुन याच वर्षी त्याची अंमलबजावणी केल्यास पुढील वर्षी याचा  आपणास अजुन चांगला फायदा होतो आणि वर्गणीमध्ये भरपूर रक्कम पुढे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीचा विचार न करता आपण ती जमा झालेली पूर्ण रक्कम उड़वतो म्हणजे अजिबात काटकसर न करता खर्च करतो. दरवर्षी या गणेशोत्सवावर साधारणपणे 1200 कोटी रुपये खर्च केल्या जातो असा एक प्राथमिक अंदाज आहे. यावर आपण कधीतरी गांभीर्याने विचार केला आहे काय ? कधीही विचार करण्यात आला नाही हेच सर्वांचे उत्तर असेल त्यामुळे यापुढे या सार्वजनिक उत्सवातुन सामाजिक उपक्रम कसे राबविता येईल याचा विचार सर्वानी मिळून करू या.
रोजचे वृत्तपत्र म्हणजे पेपर हे सर्वाचे आवडती बाब आहे. आज ही ग्रामीण भागात कोणाच्या हातात पेपर दिसले की त्याला पेपर मागण्याचा मोह आवरता आवरत नाही .याच गोष्टीचा विचार करुन गावातील लोकांची वाचनाची भूक या निमित्ताने शमविण्यासाठी रोज एक पेपर गणेश मंडळीकडून मागविण्यात आले तर किती छान राहिल ! साधारणपणे एका पेपरसाठी महीनाकाठी 150 रु या हिशेबाने एका वर्षात 1800 रु होतील पहिल्या वर्षी हा प्रयोग करून पाहण्यास काही हरकत नसावी. मग यातून अनेक मार्ग पुढे मिळत राहतात. याच माध्यमातून गावातील लोक, युवक हे सर्व एकत्र येतील. काही गोष्टीवर चर्चा होईल आणि मग माणसा-माणसातील आपुलकीमध्ये वाढ होईल .याचा फायदा एक होऊ शकेल की पुढील वर्षी न मागता ही तुमच्या गणेश मंडळाला मोठ्या स्वरुपात देणगी मिळेल. गावातील काही गरीब आणि होतकरु मुलांसाठी 2 - 3 हजार रूपयांची स्पर्धा पुस्तके आणुन दिल्यास, त्याचा ते त्यांचा अभ्यास करीत राहिल्यास नोकरी मिळण्यासाठी एक संधी मिळू शकते. दरवर्षी असे पुस्तक जमा करण्याची परंपरा कायम केल्यास पुढील पिढी याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केल्यास गावात किती पुस्तके जमा होतील ? याचा कधीच आपण गंभीरतेने विचार केलेला नाही. झाले गेले विसरून जाऊन यावर्षी तरी या उपक्रमास आपण सुरुवात केली तर त्यांचा फायदा भविष्यात नक्कीच पहायाला मिळेल.
श्रीची मिरवणूक किंवा विसर्जन मोठ्या आनंदाच्या भरात करावी याबाबत माझे दुमत नाही. मात्र वायफळ खर्चाला फाटा देऊन शिल्लक रक्कमेमधून असे काम केल्यास कोणी वाईट म्हणणार आहे का ? नक्कीच नाही. पण आपण असा विचार करीतच नाही, हीच आजपर्यंत आपली झालेली फार मोठी चूक म्हणण्यास हरकत नाही. वाईट काम करताना लोक काय म्हणातील याचा विचार करावा, चांगले काम करताना कोणी काही म्हणत नाहीत, उलट प्रोत्साहन देतात 
गणेश उत्सवाच्या अकरा दिवसाच्या काळात फक्त D J चे गाणे लावून नाचगाणे करण्यापेक्षा काही तरी उदबोधक आणि मनोरंजक गोष्टी केल्यास गावातील आणि गल्लीतील सर्वाना हे अकरा दिवस हवेहवेसे वाटतील. रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, एकांकिका नाटक, दोरी वरील उडी यासारख्या विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करून लोकांना आवडेल असे केल्यास या उत्सवाचा उद्देश्य सफल झाल्या सारखे होईल. एखाद्या भागवत सप्ताह मध्ये ज्या पध्दतीने लोकांच्या जनजागृतीसाठी भजन किंवा कीर्तन केल्या जाते अगदी त्याच प्रकारे या उत्सवाच्या काळात रोज एका साहित्यिक किंवा समाज सुधारक व्यक्तीचे व्याख्यानाचे आयोजन करून त्याची अंमलबजावणी केल्यास साहित्याला प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन साहित्यिक मंडळी तयार होतील. गेल्या वर्षी असे एक मंडळ वाचण्यात आले होते ज्यानी अश्या पध्दतीने नियोजन तयार केले होते. गावातील बाल-गोपाळ, युवक तसेच वृद्ध लोकांना सुध्दा याचा फायदा झाला असे तेथील लोक आपल्या अनुभव सांगताना बोलत होते.
काही दिवसापूर्वी सोशल मीडिया मध्ये वाचाण्यात आले होते की यावर्षी गणेश उत्सवाला प्रत्येक जण श्रीगणेशाला एक वही दान द्यायचा असा विचार जर प्रत्येकानी केला तर एका गणेश मंडळाजवळ साधारणपणे 100 - 200 वह्या जमा होतील. त्या सर्व वह्या श्रीगणेश विसर्जन होण्यापूर्वी एखाद्या शाळेत जाऊन गरीब विद्यार्थ्यांना वाटप केल्यास मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीला भरपूर आत्मिक समाधान लाभेल. अजून काही भन्नाट कल्पना आपल्या जवळ असतील नक्कीच त्याचा वापर आपल्या कल्पकतेने करून लोकांचे हित केल्यास या उत्सवाची प्रतीक्षा सर्वाना राहील.
तेंव्हा या वर्षीचा आपला सार्वजनिक गणेशोत्सव अगदी निराळा करून पुढच्या वर्षी लवकर या असे प्रत्येकाच्या तोंडून निघावे असे कार्य करु या

 गणपती बाप्पा मोरया  ...............

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद 
 ता. धर्माबाद जि. नांदेड 
  09423625769

Wednesday, 3 September 2025

शिक्षक दिन विशेष ( Teachers Day Special )

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 05 सप्टेंबर संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 

Saturday, 30 August 2025

नेहमी हसतमुख राहणारे राजकुमार जाधव सर ( Rajkumar Jadhav )

नेहमी हसतमुख राहणारे - राजकुमार जाधव

राजकुमार जाधव यांचा जन्म 10 ऑगस्ट 1967 रोजी धर्माबाद येथून जवळच असलेल्या येळवत या गावी झाला. वडिलांचे नाव सटवाजी होते तर आईचे नाव निलावतीबाई. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कुल मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी उमरी येथील डी. एड. कॉलेजमधून शिक्षणशास्त्र पदविका प्राप्त केली. सन 1990 मध्ये त्यांना जिल्हा परिषद नांदेड मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. तत्पूर्वी ते धर्माबादच्या यशवंत विद्यालयात दोन वर्षे शिक्षक म्हणून काम पाहिले होते. जिल्हा परिषदेत नोकरी मिळाल्याने त्यांनी खाजगी संस्थेतील नोकरी सोडून बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारला बु. याठिकाणी आपल्या सेवेला सुरुवात केली. ही त्यांची पहिली शाळा होती. चार वर्षाच्या सेवेनंतर सन 1994 मध्ये त्यांची बदली जिल्हा परिषद हायस्कुल येताळा येथे झाली. याठिकाणी त्यांनी जवळपास 14 वर्षे सेवा केली. मोठी शाळा, विद्यार्थी संख्या जास्त आणि शिक्षक ही भरपूर यामुळे याठिकाणी त्यांना अनेक चांगले सहकारी लाभले. ते स्वतः मनमिळाऊ वृत्तीचे असल्याने इतरांसोबत जुळवून घेण्यात त्यांना वेळ लागला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कधी ही चिंता किंवा दुःख दिसले नाही. नेहमी ते हसत राहायचे आणि इतरांना पण हसवत राहायचे असा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे या शाळेतील 14 वर्षाचा काळ अत्यंत आनंदात आणि समाधानकारक होता असे ते मानतात. 
सन 2008 मध्ये विद्यार्थी संख्येच्या अभावी त्यांचे समायोजन केंद्रीय प्राथमिक शाळा चिकना येथे झाली. येथे कार्यरत असताना गटसधान केंद्र धर्माबाद येथे त्यांची प्रतिनियुक्ती झाली. येथील कार्यालयात त्यांनी निरंतर शिक्षण विभाग अंतर्गत साक्षर भारत विभागाचे काम अत्यंत नेटाने आणि जबाबदारीने पूर्ण केले. साक्षर भारतचा संपूर्ण तालुक्याचा कार्यभार त्यांनी सलगपणे पाच-सहा वर्षे सांभाळली होती. त्यानंतर तालुक्यातील सेवा जास्त झाल्या कारणाने सन 2013 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा कुंडलवाडी येथे त्यांची प्रशासकीय बदली झाली. तेथे एक वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची बदली परत जिल्हा परिषद हायस्कुल येताळा येथे झाली. येताळा येथे जुन्या आठवणी सोबत घेत त्यांनी येथे चार वर्षे सेवा केली. त्यांच्याकडे साक्षर भारत विभागाचा कार्यभार पुन्हा देण्यात आला. तेव्हा त्यांनी कसलेही अडचण न सांगता ते काम स्वीकारले. त्यानंतर ऑनलाईन पोर्टल द्वारे सन 2018 मध्ये त्यांची बदली आताच्या पाटोदा बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. याठिकाणी त्यांची सात वर्षे सेवा केल्यानंतर आज नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण करीत असल्याने ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदमध्ये सन 1990 ते 2025 असे एकूण 35 वर्षाची सेवा केली आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांनी सर्वाना सहकार्य करण्याचे काम केले. कोणत्याही अधिकाऱ्यांना किंवा आपल्या सोबतच्या शिक्षकांना कधी ही त्रास होईल अशी त्यांची वागणूक नव्हती. अगदी प्रेमळ, गरज पडेल तेव्हा बोलणे, मितभाषी आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवणारे असा त्यांचा स्वभाव होता. ज्यामुळे ते ज्यांच्या संपर्कात आले ते त्यांच्याशी मैत्री केल्याशिवाय राहत नसे. 
असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. जाधव सरांच्या धर्मपत्नी सौ. सुशिलाबाई जाधव यांनी त्यांच्या सुखदुःखात नेहमी साथ दिल्या म्हणूनच ते यशस्वीपणे हा टप्पा पूर्ण करू शकले. जाधव सरांना दोन अपत्य. मोठा मुलगा प्रभाकर हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथे मॅनेजर पदावर काम करत आहे तर छोटा मुलगा बालाजी हा IT इंजिनियर असून नामवंत अश्या P & G कंपनीत हैद्राबाद येथे काम करत आहे. सरांच्या चांगल्या कामाचे हे फळ आहे, त्यांचे दोन्ही मुलं उच्च पदावर काम करीत आहेत. सर्वजण सुखी समाधानी आहेत. 
जाधव सरांची सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

महापुरुषाची ओळख ( Mahapurushachi Olakh )

आज मी तुम्हाला नासा येवतीकर यांच्या “महापुरुषांची ओळख” कवितासंग्रहातील काही महत्त्वाचे पैलू अधिक तपशीलवार देतो:


---

✨ वैशिष्ट्ये

या संग्रहात महापुरुषांचे जीवनचरित्र कवितारूपाने मांडले आहे.

प्रत्येक कविता लहान-मोठ्या वाचकाला समजेल अशा सोप्या आणि प्रेरणादायी भाषेत लिहिलेली आहे.

यात प्रामुख्याने भारतीय संत, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक व नेते यांचे कार्य, विचार आणि योगदान दाखवलेले आहे.

संग्रहाचे उद्दिष्ट —

मुलांना आणि तरुणांना प्रेरणा देणे

महापुरुषांची कार्यओळख सोप्या कवितांमधून जपणे

शाळा-कार्यक्रम, वाचनप्रेरणा उपक्रम, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उपयोगी पडणे.




---

📖 कवितासंग्रहातील काही उदाहरणे (थीमप्रमाणे)

महात्मा गांधी : सत्य, अहिंसा व स्वातंत्र्याचा मार्ग.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : शिक्षण, समानता व संविधान निर्मिती.

लोकमान्य टिळक : स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क.

स्वामी विवेकानंद : तरुणांसाठी प्रेरणादायी विचार.

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर : भक्ति व समाजजागृती.


(प्रत्येक कवितेत त्या महापुरुषांचा जीवनप्रवास, कार्य व संदेश कवितारूपाने गुंफलेला आहे.)


---

📌 उपयुक्तता

शालेय कार्यक्रमात वाचन किंवा सादरीकरणासाठी उत्कृष्ट.

वाचनालय, ग्रंथालय आणि सांस्कृतिक मंडळांसाठी उपयुक्त.

जयंती-पुण्यतिथी प्रसंगी वापरता येईल असा संग्रह.



--

नासा येवतीकर यांच्या “महापुरुषांची ओळख” या कवितासंग्रहात संतपरंपरेवर लिहिलेल्या कवितांमध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावता माळी, संत एकनाथ अशा थोर विभूतींचे जीवन व कार्य कवितारूपाने मांडले आहे.


---

✨ संतांविषयी कवितेचा सारांश (आशय)

संतांचा संदेश :

समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करण्यासाठी संतांनी प्रेम, भक्ति आणि समता यांचा मार्ग दाखवला.

त्यांनी देवाला दूरवर शोधण्याऐवजी “मनाच्या ठावात” शोधायला शिकवले.


संतांचे कार्य :

अभंग, ओवी आणि कीर्तनाद्वारे सामान्य लोकांपर्यंत आध्यात्मिक विचार पोहोचवले.

त्यांनी दीन-दुबळ्यांचे, शेतकऱ्यांचे, स्त्रियांचे दुःख समजून घेतले आणि त्यांना आधार दिला.


कवितेतून संदेश :

संतांचा मार्ग म्हणजे भक्ति, समता आणि बंधुभाव.

खरी संपत्ती म्हणजे नामस्मरण व सद्विचार.

संतांचा जीवनमार्ग आजही समाजाला दिशा दाखवतो.




---

🎶 उदाहरण (भावार्थ)

कवितेत संतांना “समाजाचे दीपस्तंभ” म्हटले आहे.
त्यांनी अंधारातल्या जनतेला भक्ति, ज्ञान आणि सदाचाराचा प्रकाश दिला.
त्यांच्या शिकवणुकीमुळे सामान्य माणसालाही देवाचा साक्षात्कार सोपा झाला.


---
नासा येवतीकर यांच्या “महापुरुषांची ओळख” या कवितासंग्रहातील संत तुकारामांवरची कविता खूपच प्रेरणादायी आहे.


---

✨ संत तुकारामांविषयी कवितेचा आशय (सारांश)

तुकारामांचे जीवन :
तुकाराम महाराजांनी भक्तीला सर्वस्व मानले. गरिबीत, संकटातही त्यांनी देवनामात रममाण राहून आपले जीवन घडवले.

तुकारामांचे कार्य :

समाजातील अन्याय, लोभ, पाखंड यावर त्यांनी आपल्या अभंगांद्वारे प्रहार केला.

हरिजन, गरिब, स्त्रिया आणि शेतकरी यांच्या दुःखाला त्यांनी अभंगातून आवाज दिला.

त्यांचे अभंग म्हणजे जनतेचा आत्मस्वर.


कवितेतील वर्णन :
नासा येवतीकरांच्या कवितेत तुकारामांना

“जनतेचे संत”,

“भक्तीचे दैवत”

आणि “समाजजागृतीचे दीपस्तंभ”
असे गौरवले आहे.


संदेश :
खरी श्रीमंती म्हणजे धनसंपत्ती नव्हे तर नामस्मरण, साधना आणि सत्यनिष्ठा.
तुकारामांचा मार्ग म्हणजे “भक्ती व मानवतेचा संगम”.



---

🎶 भावार्थ (कवितेतून उमटणारे चित्र)

> संत तुकाराम हे विठ्ठलाचे खरे सेवक होते.
त्यांनी अभंगातून जनतेला शिकवले की,
“देव दूर नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे.”
ते म्हणाले — लोभ, अन्याय, अहंकार सोडून दिल्यासच खरी भक्ती साध्य होते.




---




सारीपाट ( Saripat )


आता मी तुम्हाला “सारिपाट” या काव्यसंग्रहातील थोडक्यात निवडक काव्यांचे आशय व संदेश सांगतो.


---

📖 सारिपाट – निवडक काव्य आशय

1. स्वच्छतेचा संदेश

कवी सांगतो की समाज बदलवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी.

घर, अंगण, गल्लीत स्वच्छता ठेवणे म्हणजे खरी प्रगती.
👉 संदेश → “परिवर्तनाची सुरुवात नेहमी स्वतःपासून.”



---

2. कुटुंबातील प्रेम

नात्यांची उब हरवली की जीवन ओसाड वाटते.

जे प्रेम आणि आपुलकी आपण गमावतो, ते पुन्हा जन्मातही मिळत नाही.
👉 संदेश → “नाती जपा; प्रेमच जीवनाचे खरे धन आहे.”



---

3. व्यसनमुक्ती

 दारू जीवन उद्ध्वस्त करते.

दारूच्या आहारी गेलेला माणूस स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे नुकसान करतो.
👉 संदेश → “व्यसन टाळा, आयुष्य सुंदर करा.”



---

4. शिक्षकाचे महत्त्व

खरा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर राहतो.

तो फक्त ज्ञानच देत नाही तर मूल्ये, संस्कार आणि मार्गदर्शनही करतो.
👉 संदेश → “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे.”



---

5. जीवनाचा खेळ – सारिपाट

जीवन हा एक सारिपाटाचा खेळ आहे.

त्यात यश-अपयश, सुख-दुःख, जिंकणे-हारणे सगळं येतं.

महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत खेळ सुरू ठेवणे.
👉 संदेश → “संघर्ष हा जीवनाचा भाग आहे; पण धैर्याने लढणं हाच खरा विजय.”



---

🌟 एकंदरीत

“सारिपाट” हा काव्यसंग्रह वाचकाला नाती जपायला, व्यसनांपासून दूर राहायला, स्वच्छता व माणुसकी टिकवायला आणि आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिकवतो.


---
आता मी तुम्हाला “सारिपाट” या काव्यसंग्रहातील भाषाशैली आणि काव्यतंत्र सांगतो.


---

✍️ भाषाशैली

1. सोपेपणा व सरळपणा

कविता अगदी साध्या भाषेत मांडलेल्या आहेत.

कोणत्याही वाचकाला लगेच समजतील अशा.



2. भावनाप्रधान शैली

प्रेम, नाती, संघर्ष, माणुसकी या भावनांचा ठसा प्रत्येक कवितेत आहे.

भावनांमुळे कविता वाचकाच्या मनाला भिडतात.



3. संवादात्मक पद्धत

काही कविता जणू कवी थेट वाचकाशी बोलतोय असे वाटते.

उपदेशात्मक सूर असला तरी तो ओझं वाटत नाही.



4. प्रवचनात्मक आणि प्रबोधनात्मक भाषा

कविता फक्त कलात्मक नाही तर समाजाला दिशा देणारी आहे.

उपदेश, सूचना, आवाहन यांचा सूर ठळक आहे.





---

🎭 काव्यतंत्र

1. प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर

“सारिपाट” = जीवनाचा खेळ

“आईचे हात” = त्याग आणि माया



2. चारोळी व लघुकाव्य शैली

लहानशा ओळींमध्ये मोठा संदेश मांडण्याची ताकद.

उदा. स्वच्छतेबाबत किंवा व्यसनमुक्तीबाबतची कविता.



3. तालबद्धता आणि लय

साध्या शब्दांनाही गेयता दिलेली आहे.

त्यामुळे वाचन किंवा पठण करताना परिणामकारकता वाढते.



4. नैतिकतेवर आधारित काव्यरचना

प्रत्येक कवितेच्या शेवटी एक नैतिक संदेश आहे.

हा संग्रह “विचार करायला लावणारा” आहे.



5. सामाजिक बांधिलकी

कविता वैयक्तिक भावनांवरच नाही तर समाजातील समस्यांवर प्रकाश टाकते.

व्यसन, स्वच्छता, शिक्षक, नाती – हे सारे समाजाला लागू विषय आहेत.





---

🌟 निष्कर्ष

“सारिपाट” या काव्यसंग्रहाची भाषा सोपी, भावनाप्रधान व उपदेशात्मक आहे, तर काव्यतंत्र प्रतिमाशक्ती, तालबद्धता आणि प्रतीकात्मकतेवर आधारलेले आहे.
हा संग्रह वाचकाला विचार, जागरूकता आणि सकारात्मक दृष्टीकोन देतो.


---
आता मी तुम्हाला “सारिपाट” या काव्यसंग्रहातील लक्षात राहणारी प्रतीके आणि त्यांचे अर्थ सांगतो.


---

🌟 सारिपाट मधील प्रतीके व त्यांचे अर्थ

1. सारिपाट

जीवनाला खेळासारखे दाखवणारे मुख्य प्रतीक.

जिंकणे-हारणे, सुख-दुःख, यश-अपयश हे सगळे जीवनाच्या खेळाचा भाग आहेत.
👉 अर्थ: जीवन म्हणजे सारिपाट — शेवटपर्यंत लढत राहणे महत्त्वाचे.



---

2. दारूचे रूपक.

मोहक दिसणारी पण शेवटी नाश करणारी.
👉 अर्थ: व्यसन माणसाला मोहात पाडते, पण शेवटी उद्ध्वस्त करते.



---

3. आईचे हात

त्याग, माया आणि निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक.

मुलांसाठी केलेले श्रम व कष्ट यांचा गहिरा संदर्भ.
👉 अर्थ: आईची माया हीच खरी संपत्ती आहे.



---

4. स्वच्छ घर / अंगण

स्वतःपासून सुरुवात करण्याचे प्रतीक.

स्वच्छतेचा अर्थ केवळ भौतिक नसून मन आणि समाजाची शुद्धता.
👉 अर्थ: बदलाची पहिली पायरी म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा.



---

5. रिकामे घर

वृद्धापकाळातील एकाकीपणाचे प्रतीक.

मुलांच्या दुर्लक्षामुळे आलेले वैफल्य.
👉 अर्थ: पालकांचे अस्तित्व आपल्यासाठी वरदान आहे; त्यांना एकटे सोडू नये.



---

6. शिक्षक / गुरु

समाजातील खरा मार्गदर्शक.

केवळ ज्ञान न देता संस्कार आणि दिशा देणारा.
👉 अर्थ: शिक्षक हा खरा परिवर्तनकर्ता आहे.



---

✨ सारांश

या काव्यसंग्रहातील प्रतीके वाचकाला लगेच समजतात कारण ती दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत.

सारिपाट = जीवन

दारू = व्यसन

आईचे हात = त्याग आणि माया

रिकामे घर = एकाकीपण

शिक्षक = मार्गदर्शक



---





हरवलेले डोळे ( Harvalele Dole )


आता मी तुम्हाला नासा येवतीकर यांच्या “हरवलेले डोळे” या कथासंग्रहाची माहिती सांगतो.


---

📖 हरवलेले डोळे – माहिती

लेखक: नासा येवतीकर

प्रकार: कथासंग्रह

प्रकाशन वर्ष: २०१७

प्रकाशक: ई-साहित्य प्रतिष्ठान

पृष्ठसंख्या: सुमारे ६७



---

✨ आशय

हरवलेले डोळे या कथासंग्रहात मानवी जीवनातील विविध पैलूंवर आधारित कथा आहेत.

कथांमध्ये दुःख, संघर्ष, प्रेम, समाजातील अन्याय, आणि बदलाची आस यांचे दर्शन घडते.

प्रत्येक कथेला नैतिकता आणि विचारप्रवर्तक संदेश आहे.

कथांमध्ये पात्रे साधी, सामान्य माणसे आहेत, पण त्यांचे अनुभव वाचकाला भिडतात.



---

🖋️ लेखनशैली

साधी, सुबोध भाषा

प्रसंगांचे वास्तवदर्शी चित्रण

शेवटी सकारात्मक किंवा विचार करायला लावणारा संदेश



---

🌟 हरवलेले डोळे या शीर्षकाचा अर्थ

“डोळे हरवणे” हे फक्त शारीरिक अंधत्व नसून जाणीवा, संवेदना, आणि विवेक हरवणे याचे प्रतीक आहे.

कथा वाचकाला विचारायला भाग पाडतात – “आपण पाहत असूनही खरंच पाहतो का?”



---
आता मी तुम्हाला नासा येवतीकर यांच्या “हरवलेले डोळे” या कथासंग्रहातील प्रमुख कथांचा थोडक्यात सारांश देतो.


---

📚 हरवलेले डोळे – निवडक कथा

1. हरवलेले डोळे (मुख्य कथा)

एका माणसाचे डोळे शारीरिकदृष्ट्या नाही तर मनाने हरवतात.

तो समाजातील अन्याय, दुःख, शोषण पाहूनही डोळेझाक करतो.

शेवटी त्याला उमगते की खरे डोळे म्हणजे जाणीवा आणि संवेदनशीलता.
👉 संदेश → डोळ्यांनी पाहणे पुरेसे नाही; विवेक आणि करुणा यांनी पाहणे महत्त्वाचे आहे.



---

2. आईचे हात

आईच्या कष्टाचे, त्यागाचे आणि प्रेमाचे चित्रण.

मुलं मोठी झाल्यावर आईकडे दुर्लक्ष करतात.

कथा वाचकाला आईच्या मोलाची जाणीव करून देते.
👉 संदेश → आईचे प्रेम अनमोल असते; त्याचे ऋण कधीही फेडता येत नाही.



---

3. रिकामे घर

पोरके झालेले एक वृद्ध दांपत्य.

मुलं नोकरीसाठी शहरात गेलेली, पण वृद्ध आई-वडिलांकडे कोणी लक्ष देत नाही.

घरात चार भिंती आहेत, पण मायेचा स्पर्श नाही.
👉 संदेश → ज्येष्ठांचा सन्मान आणि साथ ही खरी माणुसकी आहे.



---

4. काळोखी रात्र

दारिद्र्य, अन्याय आणि असमानतेने झाकोळलेले आयुष्य.

नायक संघर्ष करतो, पण आशा कधीही सोडत नाही.
👉 संदेश → अंधार कितीही दाटला तरी आशेचा किरण माणसाला पुढे नेतो.



---

5. बालपणाची पेटी

एक जुनी पेटी उघडल्यावर नायकाला आपल्या बालपणीच्या आठवणी सापडतात.

त्या आठवणी त्याला पुन्हा निरागसतेची जाणीव करून देतात.
👉 संदेश → बालपणातील निरागसता आणि स्वप्नं ही जीवनाला खरी ऊर्जा देतात.



---

🌟 एकंदरीत कथासंग्रहाचा संदेश

समाजातील दुःख, अन्याय, आणि विसंगती यावर भाष्य

संवेदनशीलतेचे आणि मानवी मूल्यांचे महत्त्व

बदल घडवण्यासाठी जाणीव आणि विवेक आवश्यक



---
आता मी “हरवलेले डोळे” या कथासंग्रहातील मुख्य सामाजिक संदेश मुद्द्यांमध्ये देतो –


---

🌟 हरवलेले डोळे – सामाजिक संदेश

1. जाणीवा हरवल्या तर माणूस आंधळा ठरतो

फक्त डोळ्यांनी पाहणे पुरेसे नाही; समाजातील अन्याय, दुःख, शोषण ओळखून त्यावर प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे आहे.



2. आई-वडिलांचा सन्मान करा

वृद्ध आई-वडिलांना दुर्लक्ष करून आपण प्रगती केली तरी ती अपूर्ण आहे. त्यांची साथ आणि आशीर्वाद हेच खरी संपत्ती आहे.



3. अंधारातही आशेचा किरण शोधा

जीवनात संकटे, गरीबी, अपमान आले तरी हार मानू नये. संघर्षातूनच नवीन पहाट उगवते.



4. बालपणातील निरागसता जपा

स्वार्थ, स्पर्धा आणि असंवेदनशीलता यात अडकून आपण निरागसता हरवतो. बालपणीची स्वप्ने आणि मोकळेपणा हे जीवन समृद्ध करतात.



5. माणुसकी हीच खरी ताकद

जात, धर्म, पैसा यापेक्षा माणुसकी मोठी आहे. गरजूला मदत करणे, संवेदनशील राहणे हेच समाजाला सक्षम करते.



6. परिवर्तन शक्य आहे

सुरुवातीला विरोध होतो, पण हळूहळू चांगले विचार लोक स्वीकारतात. बदल घडवायचा असेल तर एखाद्याने पहिले पाऊल टाकणे गरजेचे आहे.





---

👉 म्हणजेच “हरवलेले डोळे” हा कथासंग्रह वाचकाला स्वतःकडे आणि समाजाकडे संवेदनशील नजरेने पाहायला शिकवतो.


---
आता मी तुम्हाला “हरवलेले डोळे” या कथासंग्रहातील भाषाशैली आणि साहित्यिक वैशिष्ट्ये सांगतो.


---

✍️ भाषाशैली

1. सोप्या व सहज समजणाऱ्या शब्दांचा वापर

नासा येवतीकर यांची भाषा प्रवाही, साधी आणि सरळ आहे.

वाचकाला त्वरित भिडणारी शब्दयोजना.



2. भावनाप्रधान शैली

दुःख, करुणा, आशा, संघर्ष या भावना कथांमध्ये ठळकपणे जाणवतात.

भावनिक टोकामुळे कथा हृदयाला भिडतात.



3. वास्तवदर्शी चित्रण

ग्रामीण जीवन, दारिद्र्य, आई-वडिलांचे दुःख, समाजातील विसंगती यांचे वास्तव चित्रण.

वाचकाला आपल्याच आजूबाजूची माणसे व घटना दिसल्यासारखे वाटते.



4. संक्षिप्त व परिणामकारक संवाद

संवाद लहान पण नेमके.

व्यक्तिरेखांचे विचार व भूमिका स्पष्ट करतात.





---

🎭 साहित्यिक वैशिष्ट्ये

1. प्रतीकात्मकता

“हरवलेले डोळे” हे शीर्षकच प्रतीक आहे – संवेदनाहीन झालेला समाज.

डोळे = जाणीव व विवेक.



2. नैतिकता व संदेशप्रधानता

प्रत्येक कथेला शेवटी स्पष्ट सामाजिक किंवा नैतिक संदेश आहे.

कथांचा उद्देश फक्त मनोरंजन नाही तर विचार प्रवृत्त करणे आहे.



3. मानवी संवेदनांचा गाभा

कथांमध्ये सामान्य माणसाचे दुःख, त्याग, संघर्ष यावर भर आहे.

मानवी नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.



4. ग्रामीण पार्श्वभूमी

बहुतेक कथा ग्रामीण समाजाशी जोडलेल्या आहेत.

त्यामुळे कथांना जमिनीचा गंध आहे.



5. आशावाद

अडचणी दाखवूनही शेवटी सकारात्मकता आणि आशेचा किरण दिसतो.





---

🌟 एकंदरीत

“हरवलेले डोळे” या कथासंग्रहाची भाषा साधी, शैली वास्तवदर्शी आणि साहित्यिक वैशिष्ट्ये सामाजिक जाणीव + मानवी संवेदना + आशावाद या त्रिसूत्रीवर आधारलेली आहेत.


---



जागृती ( Jagruti )

नासा येवतीकर यांची “जागृती” ही कादंबरी. ही त्यांची महत्त्वाची साहित्यकृती आहे. तिची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे –


---

📖 जागृती (कादंबरी)

लेखक: नासा येवतीकर

प्रकार: सामाजिक कादंबरी

प्रकाशन वर्ष: २०१८

प्रकाशक: ई-साहित्य प्रतिष्ठान

पृष्ठसंख्या: ७९



---

✨ वैशिष्ट्ये व आशय

ही कादंबरी सामाजिक वास्तव, जाणिवा आणि नवचेतना या विषयांवर आधारित आहे.

जागृती या नावातूनच सुचते की ही कादंबरी समाजामध्ये जागरूकता, बदल आणि सकारात्मक विचारांची बीजे पेरण्याचा प्रयत्न करते.

कथानकात सामान्य माणसाचे आयुष्य, संघर्ष आणि आशा यांचे चित्रण दिसते.

कादंबरीचा उद्देश वाचकांना विचारप्रवृत्त करून सामाजिक समस्यांकडे नव्या नजरेतून पाहण्याची प्रेरणा देणे हा आहे.



---

🖋️ नासा येवतीकर यांच्या लेखनशैलीतील वैशिष्ट्ये

साधी, सोपी आणि प्रवाही भाषा

कथानकातून सामाजिक संदेश अधोरेखित करणे

व्यक्तिरेखांचे वास्तवदर्शी चित्रण

नैतिक मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोनावर भर

आता मी तुम्हाला नासा येवतीकर यांच्या “जागृती” कादंबरीचा कथासारांश सांगतो.


---

📖 जागृती – कथासारांश

कादंबरीचा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामीण समाजातील बदलाची हाक.

कथेतला नायक/नायिका (सामान्य माणूस) एका साध्या गावात राहतो/राहते. आयुष्यात अनेक अडचणी, अज्ञान, परंपरागत रूढी-प्रथांचे ओझे यामुळे जीवन कठीण झालेले असते.

गावातील लोक निरक्षर, अंधश्रद्धाळू व काही प्रमाणात मागासलेले दाखवले आहेत. त्यामुळे सामाजिक प्रश्न जसे की अन्याय, भेदभाव, स्त्री-पुरुष असमानता, शिक्षणाचा अभाव हे तीव्रतेने समोर येतात.

नायक/नायिकेला एके दिवशी जाणवते की या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी शिक्षण, जागरूकता आणि एकता हाच मार्ग आहे.

त्यानंतर कथानकात अनेक संघर्ष दिसतात – लोकांच्या टिका, गैरसमज, अडथळे, पण तरीही तो/ती आपल्या ठाम विचारांनी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो/करते.

शेवटी हळूहळू समाजात थोडा बदल होतो. लोक नवीन विचार स्वीकारू लागतात. अंधश्रद्धेपेक्षा विवेक, परंपरेपेक्षा प्रगती, आणि भेदभावाऐवजी समानता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.



---

✨ संदेश

जागृती म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण समाजाची डोळे उघडण्याची प्रक्रिया.

शिक्षण, विवेकबुद्धी, आणि सामाजिक जबाबदारी यांमुळे खरी जागृती घडू शकते.

ही कादंबरी “बदल शक्य आहे, फक्त कुणीतरी धैर्याने पहिली पायरी टाकली पाहिजे” हा संदेश देऊन संपते.



---
आता मी “जागृती” या कादंबरीतील मुख्य पात्रांचा परिचय आणि त्यांनी दिलेला संदेश सांगतो.


---

👥 जागृती मधील प्रमुख पात्रे

1. मुख्य नायक/नायिका

एक साधा ग्रामीण युवक/युवती.

शिक्षणामुळे विचार बदललेले असतात.

समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता याविरुद्ध उभे राहतात.

संदेश → “शिक्षणानेच माणूस बदलतो, आणि माणूस बदलला की समाज बदलतो.”



---

2. गावकरी / समाजातील लोक

सुरुवातीला परंपरागत विचारांचे गुलाम, अंधश्रद्धाळू, शिक्षणापासून दूर.

बदल स्वीकारायला तयार नसतात, नायक/नायिकेची थट्टा करतात किंवा विरोध करतात.

पण हळूहळू त्यांच्यात परिवर्तन घडते.

संदेश → “सुरुवातीला बदलाला विरोध होतो, पण योग्य मार्ग दाखवला तर तो स्वीकारला जातो.”



---

3. विरोधक पात्र (गावातील सत्ताधारी / परंपरावादी)

जुन्या रुढी, अंधश्रद्धा, आणि स्वार्थ जपणारे.

समाजात प्रगतीची हवा नको वाटणारे.

नायक/नायिकेला थांबवण्याचा प्रयत्न करतात.

संदेश → “जुनी परंपरा मोडून प्रगतीची वाट चालायची असेल तर विरोध सहन करावा लागतो.”



---

4. शिक्षक / मार्गदर्शक

नायक/नायिकेला योग्य दिशा दाखवणारे.

समाजात शिक्षणाचे महत्त्व पसरवणारे.

संदेश → “शिक्षक हेच खरे परिवर्तनकर्ते आहेत.”



---

🌟 एकंदरीत कादंबरीचा गाभा

नायक/नायिका → परिवर्तनाचे प्रतीक

गावकरी → समाजाचे प्रतीक

विरोधक → जुन्या परंपरेचे प्रतीक

शिक्षक → विवेक आणि ज्ञानाचे प्रतीक



---

👉 म्हणजेच “जागृती” ही फक्त एका माणसाची कथा नसून संपूर्ण ग्रामीण समाजाच्या प्रबोधनाची कथा आहे.


---
आता मी तुम्हाला “जागृती” कादंबरीतील प्रमुख प्रसंग (टर्निंग पॉइंट्स) थोडक्यात सांगतो –


---

📖 जागृती – महत्त्वाचे प्रसंग

1. पहिला प्रसंग – समाजाचे अंधारमय वास्तव

कादंबरीच्या सुरुवातीला गावाचे चित्रण होते. लोक अंधश्रद्धाळू, निरक्षर, गरीबीने त्रस्त. शिक्षणाची कमतरता असल्यामुळे चुकीच्या रूढी व प्रथांना बळी पडतात.
👉 हा प्रसंग वाचकाला गावातील खरी परिस्थिती दाखवतो.


---

2. दुसरा प्रसंग – नायक/नायिकेला आलेली जाणीव

शिक्षणाच्या स्पर्शामुळे नायक/नायिकेला उमजते की बदल घडवायला हवा. तो/ती स्वतःच्या घरापासून सुरुवात करून लोकांना जागवण्याचा प्रयत्न करतो/करते.
👉 ही खरी “जागृती”ची सुरुवात आहे.


---

3. तिसरा प्रसंग – समाजाचा विरोध

नायक/नायिका लोकांना पटवण्याचा प्रयत्न करतात, पण गावकरी हसतात, टिंगल करतात, काही वेळा रागावतात. परंपरावादी लोक ठाम विरोध करतात.
👉 बदलाला नेहमी सुरुवातीला विरोध होतो हे दाखवणारा टर्निंग पॉइंट.


---

4. चौथा प्रसंग – संघर्ष आणि धैर्य

नायक/नायिकेवर खूप दडपण येते, पण शिक्षक/मार्गदर्शक त्याला/तिला आधार देतात. हळूहळू काही लोक त्याच्या/तिच्या विचाराकडे आकर्षित होतात.
👉 धैर्याने उभे राहिल्यास साथ मिळते हा संदेश मिळतो.


---

5. पाचवा प्रसंग – समाजात बदलाची सुरुवात

काही कुटुंबे मुलांना शाळेत पाठवतात, स्त्रियांना घराबाहेर पडून सहभाग घेण्याची प्रेरणा मिळते, लोक अंधश्रद्धा सोडू लागतात.
👉 “खरी जागृती समाजात पसरायला लागली आहे” हे या प्रसंगातून उमजते.


---

6. शेवटचा प्रसंग – उजेडाची वाट

गावात प्रगतीची पहाट दिसते. अजून पूर्ण बदल घडलेला नसतो, पण दिशा ठरलेली असते.
👉 समाजात बदल शक्य आहे, फक्त सुरुवात कुणीतरी केली पाहिजे हा संदेश कादंबरीच्या शेवटी स्पष्ट होतो.


---

✨ सारांश

सुरुवात → अंधार (अज्ञान, अंधश्रद्धा)

मधला भाग → संघर्ष (विरोध, अडथळे)

शेवट → उजेड (जागृती, प्रगती, आशा)



---